Category: मुंबई

Mumbai news

सिंधुदुर्गातील प्रारूप मतदार यादीत ६ लाख ५ हजार ४९९ मतदारांची नोंद…!

अचूक मतदार यादीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्ग : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआय आर -२०२६) प्रारुप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे.  जिल्ह्यातील प्रारुप मतदार यादीमध्ये एकूण ६ लाख ५ हजार ४९९ मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ३ लाख ५ हजार ७५६ पुरुष मतदार आणि २ लाख ९९ हजार ७४३ महिला मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण ९२१ मतदान केंद्रे आहेत. ही माहिती सिंधुदुर्गच्या जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पत्रकार परिषद दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक बालाजी शेवाळे उपस्थित होते जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय प्रारुप मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. २६८-कणकवली विधानसभा मतदारसंघात ३३२ मतदान केंद्रे असून २ लाख ९ हजार २४२ मतदार, २६९-कुडाळ विधानसभा मतदारसंघात २७९ मतदान केंद्रे असून १ लाख ९१ हजार ८४६ मतदार, तर २७०-सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ३१० मतदान केंद्रे असून २ लाख ४ हजार ४११ मतदार आहेत. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी नागरिकांनी प्रारुप मतदार यादी तपासून आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावे व हरकती सादर कराव्यात, असे आवाहन धोडमिसे यांनी यावेळी बोलतांना केले.  प्रारुप मतदार यादीतील आपले नाव निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर, जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर तसेच आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदारांना पडताळता येईल असे त्यांनी सांगितले. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. या प्रक्रियेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूर्वीच्या ६ लाख ८८ हजार १४ मतदारांपैकी ८२ हजार ५१७ नोंदी वगळण्यात आल्या असून, प्रारुप मतदार यादीतील मतदारांची संख्या आता ६ लाख ५ हजार ४९९ इतकी झाली आहे. वगळण्यात आलेल्या नोंदींमध्ये ३६ हजार ६०९ मृत मतदार, ३३ हजार ७६६ कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, ७ हजार ६६७ दुबार नोंदी तसेच ४ हजार ४८३ इतर कारणांमुळे अपात्र अथवा शोधूनही न सापडलेल्या मतदारांच्या नोंदींचा समावेश आहे. त्यामुळे मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि वास्तवस्थितीशी सुसंगत करण्याच्या उद्देशाने ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. बऱ्याच नागरिकांना मतदार यादीतील आपल्या नावाबाबत किंवा नोंदींबाबत शंका असू शकतात. मतदारांनी प्रारुप मतदार यादीमध्ये आपले नाव, पत्ता तसेच इतर तपशील तपासून घ्यावेत. नावाचा समावेश करणे, चुकीची नोंद दुरुस्त करणे अथवा मतदार यादीतील इतर नोंदींबाबत हरकत असल्यास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत दावे व हरकती सादर करता येतील असे त्यांनी सांगितले. प्राप्त दावे व हरकतींवर नियमानुसार सुनावणी घेऊन त्यांचा निपटारा करण्याची प्रक्रिया २९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व आवश्यक कार्यवाही पूर्ण करून अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

पुनर्वसन जमिनींबाबत गैरकृत्ये करणाऱ्यांवर कारवाईचे महसुलमंत्र्यांचे आदेश

रमेश औताडे मुंबई : पुणे जिल्ह्यात पुनर्वसन जमीनीची खोटी संपादन शीटे बनवून त्यावर भुमी-अभिलेख कार्यालयाचे शिक्के घेऊन  प्रमाणित भासवून काही व्यक्ती शासन व प्रकल्पग्रस्त यांची करीत असलेली फसवणूक याबाबत सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांच्या निवेदनानुसार महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी यांना कारवाईचे लेखी आदेश दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील चासकमान, गुंजवणी व इतर काही प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन शासनाने शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, जातेगाव भागात केलेले आहे. एकाच जमिनीची दोन संपादनशीटे दाखवून अनेक ठिकाणी प्रकल्पग्रस्त यांना जमिनी ताब्यात दिलेल्या नाहीत,त्यामुळे अनेक प्रकल्पग्रस्त त्रस्त होऊन जमिनी विकत आहेत ही बाब गंभीर असल्याचे टाव्हरे यांनी निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी काही व्यक्ती गेली काही वर्षे दोन संपादनशीटे आहेत,मुळ मालकांवर अन्याय झाला आहे असे सांगून शासन व महसुलमंत्री यांच्याकडे पाठपुराव्यासाठी सहकार्य करण्यास सांगितले होते,त्यानुसार अनेक प्रकरणी शासन व मंत्रीमहोदयांनी चौकशीचे निर्देश दिले होते.काही बाबतीत मुळ मालकांवर अन्याय होत आहे,तिथे न्याय मिळणे आवश्यक आहे,परंतु शिक्रापूर परिसरातील एका शेतकऱ्याची ३ एकर पुनर्वसनासाठी संपादित झाली होती. संबधित गट ३ एकर २९ गुंठे क्षेत्राचा होता.प्रकल्पग्रस्त व्यक्तीने इतरांना सदर जमीन विक्री केली होती,ताबा यापुर्वी शासनाने दिला होता; परंतु दोन संपादनशीटे असल्याचे दाखवून मोजणी करण्यास विरोध केला जातो व त्यातून महसुल मंत्री यांच्या निर्देशानुसार अप्पर जिल्हाधिकारी यांनी चौकशी अहवाल  दोन महिन्यापुर्वी स्थगिती दिली होती. या प्रकरणाचा पाठपुरावा करीत असलेल्या एका वकीलाला टाव्हरे यांनी दोन संपादनशीटे कशी तयार होतात अशी महिन्यापुर्वी विचारणा केल्यानंतर त्याने तो स्वतः बनवून उपअधिक्षक भुमी-अभिलेख शिरूर कार्यालयातून त्यावर शिक्के घेऊन प्रमाणित भासवतो असे सांगितले व अनेक प्रकरणी त्याच पद्धतीने केल्याचे सांगितल्यानंतर टाव्हरे यांनी याबाबत सखोल चौकशी होऊन कारवाईची मागणी शासनाकडे केल्यानंतर महसुलमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून प्रसंगी आझाद मैदान येथे आंदोलन करणार असल्याचे टाव्हरे यांनी सांगितले. 0000

 नगर विकास विभागाचे चौकशी आदेशाने हिंदुराव अडचणीत

नगरपंचायत घोटाळा आला आंगलट राजीव चंदने मुरबाड :  नगरपंचायत मध्ये कोट्यावधी रुपयांची कामे न करताच बिले काढून होणाऱ्या चौकशीत आपण अडचणीत येऊ नये,म्हणुन नगरपंचायतचे खात्यात सुमारे आठ लाख रुपये जमा केल्या प्रकरणी आर्थिक घोटाळा करणारा ठेकेदार राहुल हिंदुराव याची पत्रकार प्रकाश जाधव यांनी नगरविकास सचिवाकडे लेखी तक्रार दाखल केली असता,त्याची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश राज्याचे नगरविकास मंत्रालयाने ठाणे जिल्हाधिकारी व मुरबाड नगरपंचायतीला दिले असल्याने हिंदुराव याचे अडचणीत वाढ झाली असुन केलेला आर्थिक घोटाळा चांगलाच आंगलट आल्याने तालुक्यातील ठेकेदारामध्ये खळबळ माजली आहे. मुरबाड नगरपंचायतचे प्रभाग क्रमांक तेरा मध्ये कागदोपत्री कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली आहेत, परंतु नागरिकांच्या समस्या वाढत्या तक्रारी पाहता याबाबत नगरपंचायत कडे पत्रव्यवहार केला असता राहुल हिंदुराव या ठेकेदाराने सन २०२३ मध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत.परंतु त्याने सुमारे आठ लाख रुपये नगरपंचायतचे खात्यात जमा का केले, याची चौकशी केली असता.सदर प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नागरिकांनी तक्रारी केल्या असून.त्याची उपविभागीय अधिकारी कल्याण हे चौकशी करत आहेत असे सांगण्यात आले.दरम्यान मे २०२६ मध्ये नगरपंचायतचे वार्षिक लेखा परीक्षण अहवालाची प्रत हाती आली असता.राहुल हिंदुराव याने जमा केलेली रक्कम नगरपंचायतकडे बेवारशी असल्याचे समजले.अधिक चौकशी केली असता ती रक्कम कोणत्या कामावर खर्च करावी किंवा तिचा विनियोग काय करावा याचे कोडे नगरपंचायतला उलगडत नव्हते.अखेर याप्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्यासाठी प्रकाश जाधव यांनी राज्याचे नगरविकास सचिव यांचेकडे लेखी तक्रार दाखल केली असता.नगरविकास विभागाने सदर प्रकरणाची ठाणे जिल्हाधिकारी व मुरबाड नगरपंचायत यांनी चौकशी करून तातडीने कारवाई करावी व झालेल्या कार्यवाहीचा अहवाल नगरविकास विभागाकडे सादर करावा असे आदेश दिले असल्याने या आर्थिक घोटाळ्यावर जिल्हाधिकारी आणि मुरबाड नगरपंचायत  कारवाई करणार की हिंदुराव याला क्लिनचीट देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 0000

 महसूल लोक अदालतीतून प्रलंबित प्रकरणांना ‘तडजोडीचा’ मार्ग

 सप्टेंबरपासून रायगडात ‘महात्मा फुले महसूल लोक अदालत’ अभियान अशोक गायकवाड अलिबाग: महसूल विभागातील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे जलदगतीने आणि तडजोडीने निकाली काढण्यासाठी १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत रायगड जिल्ह्यात ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येणार आहे, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी दिली. महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त हे अभियान राबविण्यात येत असून, जमिनीशी संबंधित महसुली दावे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने कायमस्वरूपी निकाली काढण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाचण्याबरोबरच महसूल न्यायालयांवरील प्रलंबित प्रकरणांचा भार कमी होणार आहे. अभियानांतर्गत अपर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार स्तरावर ५ ऑक्टोबर ते ७ डिसेंबर २०२६ या कालावधीत महसूल अदालती आयोजित करण्यात येणार आहेत. अलिबाग, पेण, पनवेल, कर्जत, माणगाव, महाड, रोहा, श्रीवर्धन आदी ठिकाणी संबंधित तालुक्यांतील प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत.

पुण्याच्या घटनेनंतर केडीएमसीत शिवसेना-भाजपा युती तुटण्याच्या उंबरठ्यावर

 पुणे घटनेच्या निषेधार्थ केडीएमसीची स्थायी समिती सभा १० मिनिटे तहकूब कल्याण : पुण्याच्या घटनेनंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना भाजपा युती तुटण्याच्या उंबरठ्यावर असून याबाबत केडीएमसीत भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक संपन्न…

आंबिवली स्टेशन ते आंबिवली गाव रस्त्याचा कायापालट                                            

दुरावस्था झालेल्या रस्त्याचे काम युद्धपातळीवर केले पूर्ण कल्याण : आंबिवली स्टेशन ते आंबिवली गाव रस्त्याचा कायापालट झाला असून दुरावस्था झालेल्या रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून महापौर हर्षाली चौधरी यांनी नागारिकांना…

दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाळकेश्वर येथील बाणगंगा तलाव परिसरात पिंपळेश्वर मित्र मंडळाच्या गोविंदा पथकाकडून मानवी मनोरा रचण्याचा सराव करताना गोविंदा. छाया: पी. सुशील.

 मौलाना आझाद महामंडळाच्या योजनांना गती देण्यासाठी सलीम सारंग यांनी घेतली सुनेत्रा पवार यांची भेट

 शैक्षणिक कर्जाची मर्यादा २० लाखांपर्यंत वाढविण्यासह व्यावसायिक कर्ज योजना, ओटीस आणि प्रलंबित योजनांना निधी देण्याची मागणी दिनेश मराठे मुंबई : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजना अधिक प्रभावीपणे…

मैत्री” वर आधारीत मंगळागौर स्पर्धा

 विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा व नगरसेविका परिषा सरनाईक आयोजित अनिल ठाणेकर ठाणे- विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा व नगरसेविका परिषा सरनाईक यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शनिवार, २९ ऑगस्टला श्रावण महिन्यानिमित्ताने लोकमान्य नगर, वर्तकनगर ते…

अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण पुस्तिका

रमेश औताडे मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात आर्टी यांच्या वतीने अण्णाभाऊंच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध प्रशिक्षण उपक्रमांची माहिती देणाऱ्या मोफत माहिती पुस्तिकांचे वाटप तसेच…