Category: मुंबई

Mumbai news

 सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने ‘मार्ड’चा आंदोलनाचा इशारा

निवासी डॉक्टर आक्रमक   मुंबई : छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या एका निवासी डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण केली असून याप्रकरणी निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘मार्ड’ने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी त्वरित आणि निर्णायक कारवाई करावी अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यास राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा ‘मार्ड’ने दिला आहे. छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सोमवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास शस्त्रक्रिया विभागातील कक्षात कर्तव्यावर असलेल्या कनिष्ठ निवासी डॉक्टरवर रुग्णाच्या नातेवाईकांनी हल्ला केला. मागील वर्षभरात महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांवर सात ते आठ वेळा हल्ले झाले आहेत. अशा हल्ल्यामुळे डॉक्टरांच्या जीवाला धोका निर्माण होतोच, पण रुग्णसेवेमध्येही व्यत्यय येतो. डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी वारंवार सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र त्यावर अद्यापपर्यंत काहीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. परिणामी, वारंवार डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी त्वरित आणि निर्णायक कारवाई करावी. निवासी डॉक्टर अहोरात्र रुग्ण सेवा करत असतात. त्यामुळे त्यांना अशा हल्ल्यापासून संरक्षण मिळणे आवश्यक आहे. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने तातडीने लक्ष घालावे, अशी विनंती ‘मार्ड’ने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना केली आहे, अशी माहिती ‘केंद्रीय मार्ड’चे अध्यक्ष अभिजित हेलगे यांनी दिली. दरम्यान, सरकारने डॉक्टरांच्या सुरक्षेकडे लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही. डॉक्टरांवर आंदोलनाची वेळ आणू नये, असा इशाराही ‘मार्ड’ने सरकारला दिला आहे. 000000

पावसाळा कालावधीत मदतकार्यासाठी सुसज्ज राहण्याचे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश

नवी मुंबई : यावर्षी अदयापपर्यंत पुरेशा प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली नसून येत्या काही दिवसात मोठया प्रमाणावर पावसाला सुरुवात होईल हे लक्षात घेऊन सतर्कता राखावी असे निर्देशित करीत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दरडप्रवण क्षेत्राकडे विशेष लक्ष द्यावे असे निर्देश दिले. विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत आयुक्तांनी नाले व गटारे सफाईच्या कामांचा आढावा घेत नाल्यांच्या प्रवाह क्षेत्रात अजूनही काही झोपडया शिल्लक असतील तर संबधित विभाग अधिकारी यांनी पुन्हा बारकाईने प्रत्यक्ष पहाणी करावी व अशा झोपड्या आढळल्यास संभाव्य हानी टाळण्यासाठी त्या त्वरित हटवाव्यात असे स्पष्ट निर्देश दिले. पाऊस लांबल्यामुळे सद्यस्थितीत नमुंमपा क्षेत्रात आठवडयातील तीन दिवस संध्याकाळच्या वेळेत पाणी पुरवठा देता येत नाही यामागील भूमिका नागरिकांनी समजून घेतली आहे. महानगरपालिकेच्या मोरबे धरणात आणखी 39 दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असून पुरेशा प्रमाणात पाऊस पडावा याच्या आपण प्रतिक्षेत आहोत. त्यानुसार पाणी पुरवठयाचे नियोजन केले जात आहे. त्याची माहिती वेळोवेळी नागरिकांना देण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या. यावर्षी पूर्वापार पध्दतीने नाल्यांमधील प्रवाहात येणारे अडथळे दूर करून नालेसफाई करण्यात आली असून आगामी काळात नाल्यांची गाळ काढून सखोल सफाई करणेबाबत नियोजन करावे असे आयुक्तांनी सूचित केले. तसेच धारण तलावांच्या सफाईबाबतही आवश्यक परवानग्या मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. पावसाळी कालावधीत उद्भवणारे आजार लक्षात घेऊन आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात तसेच साथरोगांवरील आवश्यक औषधांची उपलब्धता करुन ठेवणेबाबत आरोग्य विभागास निर्देशित करण्यात आले. पावसाळा लांबल्यामुळे डासांच्या प्रमाणात वाढ होईल अशी नैसर्गिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रभावीपणे  प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. पावसाळी कालावधीत संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी जाहीर केलेल्या अतिधोकादायक इमारतींमधील रहिवास वापर पूर्णपणे थांबविण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशित करतानाच आपत्कालीन निवा-याच्या दृष्टीने समाजमंदिरे, विविध भवने व इतर अनुषांगिक जागांची उपलब्धता करणेबाबत तसेच सिडकोकडे यासाठी जागा उपलब्धतेबाबत पाठपुरावा करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. घाटकोपर, मुंबई येथील दुर्घटनेनंतर नवी मुंबई महानगरपालिकेने अत्यंत तत्परतेने अनधिकृत होर्डिंग निष्कासीत करण्याची कार्यवाही केली असून नोंदीत 53 पैकी 47 अनधिकृत होर्डिंग हटविलेले आहेत. उर्वरित 4 एमआयडीसी अखत्यारितील होर्डिंगही त्यांचेमार्फत त्वरित हटविण्यासाठी अधिक पाठपुरावा करण्यात यावा असे आयुक्तांनी निर्देशित केले. परवाना विभाग तसेच नगररचना विभाग यांच्यामार्फत दिल्या जाणा-या परवानग्या, परवाने, प्रमाणपत्रे याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर अपलोड करण्याचे निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले. त्याचप्रमाणे जन्मदाखले संबधितांपर्यंत पोहचविण्यासाठी ऑनलाईन प्रणाली सक्षम करावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले. या सर्व बाबींवर तत्परतेने कार्यवाही करण्याचे निर्देशित करण्यात आले. 15 जूनपासून यंदाच्या शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली असून साधारणत: 6 हजार नवीन विद्यार्थी नमुंमपा शाळांमध्ये प्रविष्ट झाले आहेत. त्यांच्यासाठी पुरेशी बैठक व्यवस्था असल्याबाबतचा आढावा आयुक्तांनी घेतला. त्याचप्रमाणे शाळांमधील डिजीटल बोर्ड सुविधा, प्रयोगशाळा, ग्रंथालय, मैदाने अशा सेवांचाही आढावा घेण्यात आला. याप्रसंगी उपस्थित अतिरिक्त आयुक्त्‍ श्री. सुनिल पवार व श्री. शिरीष आरदवाड तसेच इतर विभागप्रमुख यांच्याकडून शासन, लोकन्यायालय आदी स्तरावरील पत्रव्यवहाराचा आढावा घेण्यात आला. पावसाळी कालावधीत सर्व घटकांनी क्षेत्रीय स्तरावर सतर्क रहावे व मदतकार्यासाठी सुसज्ज असावे असे निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी यावेळी दिले.

मुंबई महापालिका अ‍ॅक्शन मोडवर

काँक्रीटीकरणाचा विलंब टाळण्यासाठी कार्यादेश मुंबई : पावसाळा संपल्यानंतर रस्ते काँक्रिटीकरणाची कामे वेगाने मार्गी लागण्यासाठी मुंबई महापालिकेने आतापासूनच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या कामांसाठी ज्या कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला आहे, त्यांना कार्यादेश (वर्क ऑर्डर) दिला जाणार आहे. पावसाळ्यामुळे काँक्रिटीकरणाची कामे थांबवण्यात आली आहेत. सध्या कार्यादेश देऊनही मागील वर्षी शहर भागातील कामे रखडली होती. त्यामुळे जुन्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करून नव्याने निविदा काढल्या होत्या. फेब्रुवारी महिन्यात आणखी ४०० किमी लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी निविदा यापूर्वीच मागवल्या आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कंत्राट दिले नव्हते. आता मात्र लोकसभा निवडणूक संपल्यामुळे कंत्राट देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कंत्राटदारांशी चर्चा करून अंतिम कंत्राटदार निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. सगळी कामे पावसाळ्यानंतरच सुरू होणार आहेत. पुन्हा आचारसंहिता पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता रस्त्यांच्या कामात अडथळा ठरेल की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे याबाबत निवडणूक आयोगाचा सल्ला घेण्यात येईल, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. १) शहर विभाग ९७ किमी २) पूर्व उपनगर ७० किमी ३) पश्चिम उपनगर २५३ किमी रस्त्यांची कामे १) २०२२-२३ सालासाठीचा खर्च शहर – १३६२ कोटी ३४ लाख ६ हजार २) पूर्व उपनगर-  ८६४ कोटी १७ लाख ६१ हजार ३) पश्चिम उपनगर – ३ हजार कोटी २०२५ सालापर्यंत सर्व रस्ते काँक्रीटचे मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त्त करण्यासाठी सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे निर्देश मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेला दिले होते. त्यानुसार ६०७८ कोटी रुपयांच्या कामासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. 000000

कोस्टल रोडवरून मुंबईकर सुसाट

पहिल्या ४ दिवसांत उत्तर मार्गिकेवरून ८० हजार वाहनांचा प्रवास   मुंबई : कोस्टल रोडमुळे मुंबईकरांच्या प्रवासाला गती मिळाली असून, आतापर्यंत दक्षिणमार्गिकेवरून १२ लाख २८ हजार २७९ वाहनांनी प्रवास केला आहे, तर दुसरीकडे नुकत्याच खुल्या करण्यात आलेल्या उत्तर मार्गिकेवरून ४ दिवसांत ८० हजारांहून अधिक वाहने धावली. वरळी ते मरिन ड्राइव्हदरम्यान एका मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता मरिन ड्राइव्ह ते वरळीदरम्यानची मार्गिका खुली झाल्याने वेळ आणि इंधनाची बचत होत आहे. ४० मिनिटांच्या प्रवासासाठी आठ ते दहा मिनिटे लागत असल्याने मुंबईकर कोस्टल रोडला पसंती देत आहेत. वांद्रे वरळी सी-लिंक जोडणीचे काम पूर्ण झाल्यावर मरिन ड्राइव्ह ते वांद्रे हा प्रवास १२ मिनिटांत करता येईल. धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची (कोस्टल रोड) वरळी ते मरिन ड्राइव्ह ही दक्षिण मार्गिका मार्चमध्ये खुली झाली, तर उत्तर मार्गिका ११ जूनपासून सुरू झाली. बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा या मार्गाबाबत मुंबईकरांना प्रचंड उत्सुकता होती. दक्षिण वाहिनीवरून पहिल्याच दिवशी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत १५ हजार ८३६ वाहनांनी प्रवास केला होता, तर उत्तर वाहिनीवरून पहिल्या दिवशी २० हजार वाहने मार्गस्थ झाली. कोस्टल रोड (मरिन ड्राइव्ह ते वरळी-दक्षिण वाहिनी)- वाहनांची संख्या- १) मार्च २०२४- २,६३,६१० २) एप्रिल २०२४ – ४,३६,१५० ३) मे २०२४- ५,२८,५१९ ४)  ११ जून -२०,४५० मरिन ड्राइव्ह ते वांद्रे प्रवास जुलैनंतर कोस्टल रोड प्रकल्पाचे आतापर्यंत ८९.६७ टक्के काम पूर्ण झाले असून, जुलैपर्यंत वांद्रे वरळी सी-लिंक जोडणीसाठी बो स्ट्रिंग आर्च गर्डर बसवण्याचे काम प्रगतिपथावर आहे. जुलैअखेर वांदे वरळी सी-लिकचा प्रवास करणे शक्य होणार आहे. वांद्रे वरळी सी-लिंक जोडणीचे काम पूर्ण झाल्यावर मरिन ड्राइव्ह ते वांदे हा प्रवास फक्त १२ मिनिटांत करता येईल. 00000

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची चौवार्षिक निवडणूक २१ जुलैला होणार

अध्यक्ष अजितदादा पवार यांची वार्षिक सभेत घोषणा   मुंबई:- महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.ची चौवार्षिक निवडणूक २१ जुलै २०२४ रोजी होणार. असे राज्य संघटनेचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी वार्षिक सभेत जाहीर केले. राज्य कबड्डी संघटनेची वार्षिक सभा  १८जून २०२४ रोजी सकाळी दादर येथील कबड्डी महर्षी स्व. शंकरराव(बुवा) साळवी सभागृहात होऊन विषय पत्रिकेवरी सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.या वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानी अजितदादा पवार होते. होणारी निवडणूक ही प्रचलित घटने प्रमाणे पण क्रीडा संहितेला आधारभूत ठेवून घेतली जाईल असे पवार म्हणाले.  निवृत्त न्यायधीश दिलीप जोशी यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्तीला या सभेने मंजुरी दिली. या निवडणुकी करीता संलग्न २५ जिल्हा संघटनेकडून प्रत्येकी चार(४) प्रतिनिधींची नावे (त्यात एक महिला प्रतिनिधींचे नाव असणे आवश्यक राहील) राज्य संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे यांनी एका परीपत्रकाद्वारे मागविली आहेत. शासनाच्या क्रीडा आचार संहितेचा सर्वांनी मान राखून त्याची अंमलबजावणी करणे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्राची क्रीडा परंपरा फार जुनी असून ती देखील जोपासली गेली पाहिजे असे ते पुढे म्हणाले. या सभेला पदाधिकारी, प्रतिनिधी, आजीव सदस्य, खेळाडू असे सर्व मिळून २०० सदस्य हजर होते. त्यात मुंबई शहरचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, माजी आमदार दिनकर पाटील, आमदार अमरसिंह पंडित, शकुंतला खटावकर आदी मान्यवर उपस्थित होते. अशी माहिती एका पत्रकाद्वारे संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे यांनी सर्व प्रसार माध्यमांना दिली. 000000

कोकण पदवीधर-शिक्षक मतदारांना २६ जूनला विशेष नैमित्तीक रजा मंजूर-अमोल यादव

अशोक गायकवाड   नवी मुंबई : कोकण विभाग पदवीधर मतदार संघातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावणेसाठी मतदानाच्या दिवशी दि. २६ जून, २०२४ रोजी पदवीधर-शिक्षक मतदारांना विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आली आहे. अशी माहिती उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगाने दिनांक २४ मे २०२४ च्या प्रसिध्दी पत्रकानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. या घोषित कार्यक्रमानूसार कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान बुधवार दि.२६ जून २०२४ रोजी सकाळी ७.०० ते सायं ६.०० वाजेपर्यंत या वेळेत होणार असून, मतमोजणी दिनांक ०१ जुलै, २०२४ रोजी होणार आहे. विधानपरिषद शिक्षक/ पदवीधर मतदारसंघाकरिता मर्यादित स्वरुपात मतदार असल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा. यासाठी पदवीधर/ शिक्षक निवडणूकीमध्ये मतदार असलेल्या व्यक्तीला विशेष नैमित्तीक रजा जाहीर करण्यात आली आहे. सदरची रजा ही त्यांच्या अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजे व्यतिरिक्त असणार आहे. या रजे बाबतचा शासन निर्णय www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जाहीर करण्यात आलेल्या नैमित्तीक रजेचा लाभ घेऊन पदवीधर- शिक्षक मतदारांनी मोठया संख्येने मतदानाचा हक्क बजावाव असे आवाहन उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी केले आहे. 00000

महाराष्ट्रात प्रभारी-सहप्रभारीपदी केंद्रातील दोन मंत्र्यांची नियुक्ती

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या प्रभारीपदी केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे, राज्यातील संघटनात्मक बदलही केली जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी…

शिंदे सरकारची जनतेला अनोखी आरोग्य विमा भेट !

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विधानसभा निवडणुकांआधी राज्यातील नागरिकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. आता राज्यातील नवी आरोग्य विमा योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सर्वांसाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात…

वंदना सुर्यवंशीनी बाथरुममधून संशयास्पद फोन कॉल केले

निवडणूक अधिकाऱ्यांवर अनिल परबांचे गंभीर आरोप मुंबई : उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी वादात सापडली आहे. “१९ व्या फेरीनंतर सरळ २३ व्या फेरीला सगळे निकाल वाचले गेले. तसेच निवडणूक प्रक्रिया संपताना ठाकरे…

मुंबईत पाणीबाणी ; धरणांनी तळ गाठला

मुंबई : मुंबईतून मान्सून दाखल होऊन आठवडा उलटून गेला तरीही मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला आहे. धरणक्षेत्रात पावसाने दडी मारल्याने एकुण सात पैकी पाच जलाशयांनी तळ गाठला असून दोन जलाशयांमध्ये…