Category: मुंबई

Mumbai news

मालमत्ता कर पावती वाटप करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना भत्ता द्या

एक हात मदतीचा’ संस्थेची उल्हासनगर महापालिका आयुक्तांकडे मागणी सुनिल इंगळे उल्हासनगर : यंदा पहिल्यांदाच मालमत्ता कर पावती वाटपाचे काम उल्हासनगर महानगरपालिकेने कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिले असून या कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देण्यात यावा अशी मागणी ‘एक हात मदतीचा’ या सामाजिक संस्थेने महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. संस्थेचे अध्यक्ष विजय कदम, उपाध्यक्ष रवी वलेचा, सचिव अतुल शिंदे, उपसचिव करण दराडे, खजिनदार जयेश बेलदार व सल्लागार दत्तात्रय कदम यांच्या स्वाक्षरीने आयुक्तांना हे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी मालमत्ता कर पावती वाटपाचे काम महिला बचत गटांमार्फत केले जाते व त्यांना त्याचा मोबदला दिला जातो. परंतु यावर्षी हे काम महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहे. कंत्राटी कर्मचारी हे काम चोखपणे व योग्य प्रकारे करत आहेत. मात्र, हे काम करताना कर्मचाऱ्यांना गाडी भाडे, पाणी, जेवण यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागत आहेत. सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने शारीरिक त्रासही होत आहे. तरीही कर्मचाऱ्यांनी कोणतीही तक्रार किंवा अपेक्षा व्यक्त केलेली नाही. ‘आपली महानगरपालिका एक कुटुंब आहे आणि आपण या कुटुंबाचे प्रमुख आहात. त्यामुळे याचा सकारात्मक विचार करून मालमत्ता कर भरणा पावती वाटपासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्वखुशीने काहीतरी विशेष भत्ता देण्यात यावा अशी विनंती ‘एक हात मदतीचा’ या सामाजिक संस्थेने केली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या या अतिरिक्त कामाची दखल घेऊन त्यांना योग्य मोबदला मिळावा जेणेकरून त्यांचे मनोबल वाढेल अशी अपेक्षा देखील ‘एक हात मदतीचा’ संस्थेने व्यक्त केली आहे.

नालेसफाईच्या कामातील हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही

आयुक्त राधा बिनोद शर्मा यांचा कडक इशारा मिरा -भाईंदर : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, आयुक्त राधाविनोद ए. शर्मा यांनी मंगळवारी सुरू असलेल्या मान्सूनपूर्व नाले सफाई मोहिमेचा भाग म्हणून महानगरपालिका क्षेत्रातील विविध भागांची पाहणी केली. त्यांनी अधिकारी आणि कंत्राटदारांना स्पष्ट सूचना दिल्या की, नाले सफाईच्या कामातील हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही आणि सर्व कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण केली पाहिजेत. आयुक्त शर्मा यांनी प्रमुख नाले, तुंबलेल्या गटारवाहिन्या आणि जलनिःसारण प्रणालीची स्थिती तपासण्यासाठी शहराच्या विविध भागांना भेट दिली. या पाहणीदरम्यान, टाटा पॉवर हाऊस मीरा रोड, जेपी इन्फ्रा, साई पॅलेस, लक्ष्मी बाग, रेल्वेला समांतर असलेला नाला आणि डीबी रियल्टी परिसरातील सुरू असलेल्या साफसफाईच्या कामाचा आढावा घेतला. त्यांनी अधिकाऱ्यांना नाल्यांमधून गाळ आणि कचरा पूर्णपणे काढून टाकण्याचे निर्देश दिले. नाले स्वच्छता मोहीम पावसाळ्यात नाल्यांमध्ये अडकलेला कोणताही कचरा तात्काळ काढून टाकण्याचे आदेश स्वच्छता निरीक्षकांना देण्यात आले. ज्या ठिकाणी नाले रुंद आहेत, त्या भागात अतिरिक्त कर्मचारी आणि यंत्रसामग्री तैनात करण्याचे निर्देशही देण्यात आले. रस्त्याच्या कडेला आणि नाल्यांच्या बांधकाम स्थळांवर पडलेला कचरा तात्काळ काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले. आयुक्तांनी नियमित देखरेख आणि कामाची वेळेवर पूर्तता सुनिश्चित करण्याची जबाबदारी संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांवर सोपवली. पावसाळ्यात पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि जनतेची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या जात असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने सांगितले. स्वच्छता केल्यानंतर महानगरपालिकेने पाण्याचा सुरळीत प्रवाह सुनिश्चित करावा आणि आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता राखावी. आयुक्तांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रमुख नाल्यांवर मजबूत आणि उच्च दर्जाची लोखंडी जाळी बसवण्याचे निर्देश दिले.

बालभवनच्या नूतनीकृत इमारतीचे मुख्यमंत्री फडणीस यांच्या हस्ते लोकार्पण

अशोक गायकवाड मुंबई : मुंबईच्या चर्नी रोड परिसरातील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनाच्या परिसरात ‘मुक्त विज्ञान उद्यान’ उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री फडणीस यांच्या हस्ते बालभवनच्या नूतनीकृत इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. त्यांनतर मध्यमांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, कौशल्य, रोजगार आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार दीपक केसरकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण विभागाचे आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह, बालभवनच्या संचालक नीता पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. बालभवनच्या नूतन वास्तूची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महानगरपालिका शाळांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांना या केंद्राशी जोडण्यासाठी महापौर रितू तावडे यांनी पुढाकार घ्यावा. यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लागेल. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, बालभवन ही केवळ इमारत नसून लाखो मुलांच्या स्वप्नांना आकार देणारे प्रेरणास्थान आहे. नवीन वास्तूमुळे महाराष्ट्रातील बालकांच्या कल्पकतेला नवे पंख मिळतील. मुलांना बालभवनाच्या माध्यमातून खेळ, गायन, नृत्य, चित्रकला, शिल्पकला आणि विविध सृजनशील उपक्रमांद्वारे स्वतःला शोधण्याची संधी येथे मिळते; तसेच त्यांना मातीशी, रंगांशी आणि संगीताशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बालभवन गेली ७५ वर्षे सातत्याने काम करत आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, ४ ते १६ वयोगटातील मुलांच्या कल्पनाशक्तीला आणि सृजनशीलतेला वाव देण्याचे कार्य ही संस्था सातत्याने करत आहे. नूतनीकरण करण्यात आलेल्या या इमारतीत तळमजल्यावर अत्याधुनिक प्रेक्षकगृह आणि सुसज्ज ग्रंथालय तयार करण्यात आले आहे. पहिल्या मजल्यावर नृत्य दालन, नाट्य कक्ष आणि संगीत कक्ष आहे. दुसऱ्या मजल्यावर विद्यार्थ्यांच्या सादरीकरणासाठी व्यासपीठ; तसेच मूर्तिकला आणि चित्रकला दालने उभारण्यात आली आहेत. या वास्तूमध्ये १०० विद्यार्थी क्षमतेची तीन सुसज्ज सभागृहे आहेत. एकाच वेळी ५०० विद्यार्थी विविध कलांचे प्रशिक्षण घेऊ शकतील. दररोज ५०० विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण क्षमतेनुसार महिन्याला सुमारे १० हजार, तर वर्षभरात जवळपास १ लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळू शकणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक बालभवन सुरू करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा मानस आहे, असे शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी सांगितले. यावेळी सर जे. जे. कला महाविद्यालय आणि महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. बालभवनच्या संचालक नीता पाटील आणि सर जे. जे. कला महाविद्यालयाचे संचालक किशोर इंगळे; तसेच कुलसचिव शशिकांत काकडे यांच्यात सामंजस्य कराराच्या प्रतींचे आदानप्रदान करण्यात आले. या करारामुळे विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे कला प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

अशोक समेळ, वारे गुरुजी, कोकरे युआरएल पुरस्काराचे मानकरी

अशोक समेळ, वारे गुरुजी, कोकरे युआरएल पुरस्काराचे मानकरी २९ मे रोजी ‘कृतज्ञता दिवस’ निमित्त पुरस्कार वितरण सोहळा मुंबई : विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यासाठी यूआरएल…

नगरसेविका राजोल पाटील यांच्या पुढाकाराने नागरिकांसाठी विविध शासकीय दाखले शिबिराचे आयोजन

(राजेंद्र साळसकर) मुंबई  – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रभाग क्रमांक ११४ मधील नगरसेविका राजोल संजय पाटील यांच्या पुढाकारातने नागरिकांच्या सोयीसाठी विविध शासकीय दाखले उपलब्ध करून देणारे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया सुलभ व्हावी तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी व कामगार वर्गाला एकाच ठिकाणी विविध सेवा मिळाव्यात या उद्देशाने हे शिबिर राबविण्यात येत आहे. या शिबिरामध्ये उत्पन्नाचा दाखला, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, अधिवास दाखला (डोमिसाईल सर्टिफिकेट), स्थानिक वास्तव्याचा दाखला तसेच आधार कार्डाशी संबंधित सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अनेक वेळा नागरिकांना विविध दाखल्यांसाठी सरकारी कार्यालयांमध्ये वारंवार जावे लागते, आवश्यक कागदपत्रांची माहिती नसल्यामुळे अडचणी निर्माण होतात. त्यामुळे वेळ व पैशाचा अतिरिक्त खर्च होतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांना योग्य मार्गदर्शन व तत्काळ सेवा देण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. उत्पन्नाचा दाखला मिळविण्यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड, मागील तीन वर्षांचे आर्थिक प्रमाणपत्र किंवा आयकर विवरणपत्र, तसेच वीज बिल किंवा इतर आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे. ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्मतारीख दर्शविणारे कागदपत्र, शाळा सोडल्याचा दाखला आदी कागदपत्रे आवश्यक असतील. अधिवास दाखल्यासाठी मतदार ओळखपत्र, शैक्षणिक पुरावे, बँक पासबुक तसेच मागील दहा वर्षांच्या वास्तव्याचे पुरावे मागविण्यात येणार आहेत. स्थानिक वास्तव्याच्या दाखल्यासाठी देखील विविध ओळखपत्रे व दीर्घकालीन वास्तव्याचे पुरावे आवश्यक राहणार आहेत. याशिवाय आधार कार्डाशी संबंधित नोंदणी व दुरुस्तीची सुविधाही नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे शिबिर २५ ते २९ मे या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे ठिकाण ज्येष्ठ नागरिक कार्यालय, ९० फूट रोड, लालबहादूर कंपाऊंड, अशोक केदार चौक, भांडुप (प.) असे असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेविका राजोल पाटील यांनी केले आहे. या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून विविध सरकारी प्रक्रियांबाबत जागरूकता निर्माण होण्यासही मदत होणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांना या शिबिराचा मोठा फायदा होणार असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात अनुसूचित जाती समन्वय अभियानास प्रारंभ

रमेश औताडे मुंबई: आम्ही संगतीत आणि पंगतीत सोबत बसत नाही हा दूरूभाव अनुसूचित जातीच्या विविध घटकांना खटकत असतो, मग आम्ही यांच्या जवळ गेलो तर रोटी बेटीची सोयरिक साधतील का? तसेच रिपब्लिकन ऐक्याचे ग्रहण अजुन सुटले नसताना आमच्या फाटाफुटी मुळे उपवर्गिकरणाच्या चर्चेला बळ मिळत आहे. असे मत आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केली ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनुसूचित जाती समन्वय अभियानाच्या प्रारंभ करताना बोलत होते. बागडे यांच्या निवासस्थानी मातंग समाजातील महिला कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी सम्राट अशोक सेनेचे अध्यक्ष रवी भाऊ शेंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश बनसोड, गर्जना संघटनेचे अध्यक्ष भाई महेश ठाकूर, आंरिमोचे नेते धर्माजी बागडे, ओबीसी नेते राजू पांजरे, राष्ट्रीय संघटक देवेंद्र बागडे, रिपाइं आठवले शहर अध्यक्ष विनोद थुल, सेवानिवृत्त वित्त लेखा अधिकारी म्हाडा चे जयदेव चिंवडे, मातंग मोर्चा चे नेते मनोहर इंगोले, चर्मकार समाजाचे नेते व सुप्रसिद्ध शायर तन्हा नागपुरी, आंरिमो नागपूर विभागीय अध्यक्ष प्रवीण आवळे, सामाजिक कार्यकर्ते गौतम तिरपुडे, संजय मोटघरे,सुधिर मोटघरे, हंसराज उरकुडे,माजी नगरसेवक अमर बागडे, युवा नेते सुरज ढोणे, पंकज पाटील, गौतम बागडे, सुदर्शन, वाल्मिकी मोर्चा चे नेते सुभाष बढेल, चरणदास गायकवाड,नरेश खन्ना, वैशाली तभाने, संगिता चंद्रिकापुरे, डॉ सुधा जनंबधू,जुलैखा बेगम रुबिना खान,सरिता थुल, अनिता थुल,भागनबाई मेश्राम, सुशिला जनंबादे, जयश्री मसराम यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रमेश दुपारे यांनी केले तर आभार प्रदर्शन पुण्यशील बोदिले यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंतुल गंगापूरकर,भोजराज नंदागवळी अमोल बागडे यांनी केले. ०००००००

एमसीएफ कॅरम स्पर्धा माजी विश्व् विजेता योगेश परदेशी विजयी 

मुंबई: मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशनच्यावतीने व रोटरी क्लब ऑफ बोरिवली यांच्या सहकार्याने एम सी एफ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बोरिवली ( पश्चिम ), येथे संपन्न झालेल्या ११ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुण्याकडून…

ऑसम अंधेरीचे थरारक विजेतेपद

मुंबई महापौर चषक इनडोअर क्रिकेट स्पर्धा  महिलांमध्ये रणरागिणी क्लबचा दणदणीत विजय मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील पार्क क्लबच्या अर्बन स्पोर्ट्स टर्फवर रंगलेल्या भव्य ‘मुंबई महापौर चषक इनडोअर क्रिकेट स्पर्धे’च्या अंतिम सामन्याने क्रिकेटप्रेमींना अक्षरशः खुर्चीच्या टोकावर बसवले. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमांचकारी लढतीत ऑसम अंधेरी इनडोअर क्रिकेट क्लबने वियोम फाऊंडेशन इनडोअर क्रिकेट क्लबवर अवघ्या १ धावेने (३३-३२) मात करत विजेतेपद पटकावले. विजयाचा क्षण येताच मैदानावर प्रेक्षकांनी जल्लोष करत उत्सव साजरा केला. याआधी झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात रणरागिणी इनडोअर क्रिकेट क्लबने शक्ती इनडोअर क्रिकेट क्लबचा ६१ धावांनी (९८-३७) दणदणीत पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. या स्पर्धेला सरस्वत बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, नितीन दलाल – स्टार सीसी आणि श्री स्वामी समर्थ मेडिकल यांचे सहकार्य लाभले. स्पर्धेत प्रथमच नाणेफेक गमावल्याने वियोम फाऊंडेशनला प्रथम फलंदाजी करावी लागली आणि त्याचा संघाला मोठा फटका बसल्याचे कर्णधार ओमकार पाटोळे यांनी सामन्यानंतर सांगितले. वियोमच्या पहिल्या जोडीतील सिद्धेश घोगरे (५) आणि श्रेयस वैद्य (६) यांनी ११ धावा केल्या. मात्र दिपेनने श्रेयसला बाद करत ५ धावांचा फटका दिला. दुसऱ्या जोडीतील ओमकार पाटोळे (-४) आणि रोहन गावडे (२) यांना मोठी कामगिरी करता आली नाही. ओमकारला आदिलने दोनदा बाद करत वियोमच्या धावसंख्येला मोठा धक्का दिला. त्यानंतर अनिकेत माडीये (७) आणि प्रसाद आंब्रे (३) यांनी १० धावांची भर घातली. शेवटच्या जोडीतील शुभम गुरव (५) आणि अजित सेठी (८) यांनी महत्त्वपूर्ण १३ धावा जोडत वियोमला ३२ धावांपर्यंत पोहोचवले. ३३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑसम अंधेरीची सुरुवात खराब झाली. मुसा सय्यद (०) आणि मोनू यादव (-४) यांना रोहन गावडेच्या अचूक गोलंदाजीसमोर टिकता आले नाही. त्यानंतर संतोष जाधव (०) आणि अहमद (६) यांनी संघर्ष केला, मात्र सतत विकेट गमावल्याने संघ अडचणीत सापडला. तिसऱ्या जोडीतील दिपेन दांडेकर (१८) यांनी दमदार खेळी करत संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले. शेवटच्या जोडीला विजयासाठी १६ धावांची गरज असताना रोहित खरात (१७) आणि आदिल सय्यद (-१) यांनी जबरदस्त धैर्य दाखवत सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेला. अखेर शेवटच्या चेंडूवर २ धावा घेत रोहितने ऑसम अंधेरीला थरारक विजय मिळवून दिला. महिलांच्या अंतिम सामन्यात रणरागिणी इनडोअर क्रिकेट क्लबने एकतर्फी वर्चस्व राखत शक्ती इनडोअर क्रिकेट क्लबवर ६१ धावांनी विजय मिळवला. रणरागिणीकडून नाजूका (२७), प्राजक्ता (२४), प्रिया (११) आणि दृष्टी व पूजा (प्रत्येकी ११) यांनी शानदार फलंदाजी केली. तर शक्तीकडून लावण्या (१३) आणि आचल (११) यांनी झुंजार लढत दिली. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू (मालिकावीर) म्हणून श्रेयस वैद्य (वियोम फाऊंडेशन) याची निवड करण्यात आली. सामन्यातील सर्वोत्कृष्ट फलंदाज : दिपेन दांडेकर (ऑसम अंधेरी) व सर्वोत्कृष्ट गोलंदाज : रोहन गावडे (वियोम फाऊंडेशन) ठरले.   स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, प्रभाग समिती अध्यक्ष व नगरसेवक यशवंत किल्लेदार व नगरसेवक आकाश पुरोहित यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी बाळ वाडवलीकर (माजी क्रीडा अधिकारी, आरसीएफ), विलास पाटील (माजी जनरल व्यवस्थापक, आरसीएफ), संजय चुरी (पीडीजी, लायन्स क्लब ऑफ मुंबई), जेष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी, वरदा चुरी (कार्याध्यक्षा – पार्क क्लब), दतात्रय वेदक (माजी अध्यक्ष – मुंबई महिला क्रिकेट), विनया तोरसकर (अध्यक्षा – वियोम फाऊंडेशन), संस्थापक चेअरमन क्षितिज वेदक आणि संस्थापक सचिव बाळासाहेब (बाळ) तोरसकर व इनडोअर क्रिकेटचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना अजिंक्य नाईक यांनी, “मुंबईतील सर्व प्रकारच्या क्रिकेटला चालना देणे हेच आमचे ध्येय आहे. क्रिकेटसाठी आवश्यक सुविधा आणि उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन कायम पुढाकार घेईल,” असे सांगितले. तर यशवंत किल्लेदार यांनी, “आजची मुले मोबाईल आणि मनोरंजन विश्वात अधिक रमली आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा मैदानावर आणण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे,” असे मत व्यक्त केले. विजेत्या ऑसम अंधेरी इनडोअर क्रिकेट क्लबला रु. २५,०००, चषक आणि सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले. तर उपविजेत्या वियोम फाऊंडेशनला रु. १५,०००, चषक आणि रौप्यपदक प्रदान करण्यात आले. ०००००००

 सीरत, समायरा उप-उपांत्यपूर्व फेरीत

अवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धा मुंबई: वांद्रे येथील ऑटर्स क्लब कोर्टवर खेळल्या गेलेल्या आवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धेत १३ वर्षांखालील मुली एकेरीच्या मुख्य ड्रॉच्या राऊंड ऑफ ३२ फेरीमध्ये…

– काळू नदीत आंघोळीला गेलेल्या १५ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

 अथक प्रयत्नांनंतर मृतदेह काढला बाहेर कल्याण : कल्याणनजीक  काळू नदीत आंघोळीला गेलेल्या १५ वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर उशिरापर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली, मात्र मुलाचा शोध लागला नव्हता. अखेर दुसऱ्या दिवशी अग्निशमन दलाने अथक प्रयत्नांनंतर त्याचा मृतदेह नदीतून बाहेर काढला. मृत मुलाची ओळख अटाळी कोळीवाडा येथील ऋषभ रवींद्र राणे अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ सोमवारी सायंकाळी आपल्या तीन मित्रांसोबत कालू नदीकाठी आंघोळीसाठी गेला होता. यावेळी अचानक त्याचा पाय घसरल्याने तो खोल पाण्यात गेला आणि नदीच्या प्रवाहात वाहू लागला. ऋषभला बुडताना पाहून त्याचा एक मित्र त्याला वाचवण्यासाठी नदीत उतरला. मात्र तोही पाण्याच्या प्रवाहात अडकला. किनाऱ्यावर उभ्या असलेल्या इतर दोन मित्रांनी प्रसंगावधान राखत त्या मुलाला सुरक्षित बाहेर काढले, मात्र ऋषभचा काहीच मागमूस लागला नाही. मित्रांनी जवळपास अर्धा तास नदीत शोध घेतला. मात्र यश न आल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच कल्याण पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली. कल्याण अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी नामदेव चौधरी यांनी सांगितले की, सोमवारी उशिरापर्यंत सुरू असलेल्या शोधमोहीमेत मुलाचा शोध लागला नाही. त्यानंतर मंगळवारी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली आणि मोठ्या प्रयत्नांनंतर ऋषभचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. ऋषभ हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. तो घरातून हात-पाय धुवून येतो असे सांगून मित्रांसोबत नदीकाठी गेला होता. मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कल्याण पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.