Category: मुंबई

Mumbai news

शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध विकास कामांचे भूमिपूजन

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र. १२ च्या वतीने प्रभागातील विविध विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. स्थानिक नगरसेविका सारिका शशिकांत झोरे यांच्या प्रयत्नांतून…

मुलांमध्ये डिहायड्रेशन आणि हीट स्ट्रोकचा वाढता धोका- डॉक्टरांचा इशारा

दर दिवशी ३ ते ४ लहान मुलांवर होत आहेत उपचार मिरा -भाईंदर : देशातील अनेक भागांमध्ये तापमान सातत्याने वाढत असून अनेक ठिकाणी पारा ४५°C पेक्षा जास्त नोंदवला जात आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी पालकांना २५ मे ते २ जूनदरम्यानच्या “नौतपा” काळात लहान मुले आणि बालकांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तीव्र उष्णतेमुळे मुलांमध्ये डिहायड्रेशन, उष्माघात आणि हीट स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, विशेषतः नवजात बालक आणि सहा वर्षाखालील मुलांमध्ये हीटवेव्ह आणि नौतपामुळे संपूर्ण भारतात तापमानात मोठी वाढ होत असून त्यामुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण होत आहेत. अनेक शहरांमध्ये पाण्याची टंचाई, वीज कपात तसेच डिहायड्रेशन आणि हीट स्ट्रोकच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे. मिरा रोड येथील वोक्हार्टहॉस्पिटल्सच्या तज्ज्ञांच्या मते, लहान मुलांचे शरीर प्रौढांच्या तुलनेत तापमान नियंत्रित करण्यात कमी सक्षम असते. त्यामुळे त्यांना उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांचा धोका अधिक असतो. अतिप्रमाणात घाम येणे, चिडचिड होणे, ओठ कोरडे पडणे, लघवी कमी होणे, उलट्या होणे, चक्कर येणे, जास्त झोप येणे, जलद श्वास घेणे आणि शरीराचे तापमान वाढणे ही त्याची सामान्य लक्षणे आहेत. डॉक्टरांनी पालकांना मुलांना दुपारी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत बाहेर न नेण्याचा आणि त्यांना थंड व हवेशीर वातावरणात ठेवण्याचा सल्ला दिला आहे. मुलांमध्ये हीट स्ट्रोकची सूचना देणारी लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या जास्त ताप येणे, त्वचा कोरडी, लालसर आणि गरम होणे चक्कर येणे, गोंधळ उडणे किंवा अतिशय सुस्ती येणे जलद श्वास घेणे किंवा अनियमित हृदयाचे ठोके वारंवार उलट्या होणे किंवा पाणी पिण्यास नकार देणे.

आखाती युद्धामुळे ‘आंबा कॅनिंग’ उद्योगालाही बसला फटका…!

शेतकरी बागायतदारांचे दुहेरी नुकसान…! सिंधुदुर्ग (प्रतिनिधी )–आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता कोकणातल्या आंबा प्रक्रिया उद्योगालाही बसला असून परदेशातील मागणी घटल्याने ‘कॅनिंग’ कंपन्यांनी यंदा आंब्याची कमी प्रमाणात खरेदी केली असल्याचे आढळून आले आहे.परिणामी आंब्याचा दर आता थेट ६२ रुपयांवरून थेट १7 रुपयापर्यंत प्रती किलो इतका खाली घसरला आहे. अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे यंदाच्या वर्षी आंबा पिक संपूर्णपणे धोक्यात आल्याने शेतकरी आणि बागायतदारांचे फार मोठे नुकसान झाले आहे. दहा ते पंधरा टक्के इतकेच आंब्याचे पीक यंदा शेतकरी – बागायतदारांच्या हाती लागले आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना आता ‘कॅनिंग’च्या आंब्याचे दर कमालीचे घसरल्याने शेतकरी – बागायतदारांवर एक प्रकारे दुहेरी संकट ओढवले आहे. यंदाच्या हंगामात आंबा उत्पादनात एकूणच घट होणार असल्याची सिंधुदुर्गातील शेतकरी  बागायतदारांची ओरड सुरू झाली होती. या हंगामातील तब्बल 8५ ते ९० टक्के पीक हातचे  गेल्याने शेतकरी – बागायतदार आधीच नुकसानीत गेले होते. आंब्याला नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी -बागायतदार आक्रमक बनले होते. गेले महिनाभर आंदोलने, मोर्चे काढण्यात आले. राज्य सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली मात्र जाहीर केलेली रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्याचे म्हणत आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील शेतकरी-बागायतदारांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या  ‘वर्षा ‘ निवासस्थानी धडक देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार मोर्चाही निघाला मात्र पोलिसांनी धरपकड केल्याने आंदोलनाची हवाच गेली. आंबा काढणीनंतर प्रतवारी झाल्यावर उरलेला आंबा प्रक्रिया उद्योगांना ( कॅनिंग ) दिला जातो त्यामुळे मिळेल त्या दराने आंबा द्यावा लागतो आणि त्याला पर्याय नसतो. यातून संभाव्य नुकसान टाळण्यासाठी ‘कॅनिंग’च्या आंब्याला हमीभाव मिळावा ही शेतकरी आणि बागायतदारांची फार जुनी मागणी आहे. परंतु शासन दरबारी याही मागणीची दखल घेतली गेली  नसल्यामुळे आता त्यांच्यासमोर  दुहेरी संकट उभे राहिले आहे. राज्य सरकारने या प्रश्नातही लक्ष घालून शेतकरी आणि बागायतदारांना दिलासा देण्याची गरज आहे. ‘कॅनिंग’चा दर सुरुवातीला ६२ रुपये प्रति किलो इतका होता  त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा दर घसरत जाऊन आता तो १7 रुपये प्रति किलो  इतका खाली आला आहे. आंब्यापासून रस (पल्प)जाम, आंबा वडी, सरबते,लोणची, चॉकलेट आदी  विविध खाद्य पदार्थ तयार केले जातात. सिंधुदुर्गातील अनेक महिला  बचत गट हा उद्योग करत आहेत. शिवाय आईस्क्रीम साठी या आंब्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. आईस्क्रीम उद्योगातील मोठमोठ्या कंपन्यांमार्फत या आंब्याची खरेदी केली जाते. मात्र शेतकरी- बागायतदारांना हवा तसा दर दिला जात नाही. परिणामी त्यांना नुकसान सोसावे लागते.परदेशात ‘पल्प’ ला  मोठी मागणी आहे मात्र आखाती युद्धामुळे यंदा निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी- बागायतदार धास्तावले आहेत. ‘कॅनिंग’च्या आंब्याला हमीभाव मिळावा ही शेतकरी- बागायतदारांची मागणी सरकारने मान्य केल्यास हाही प्रश्न सुटू शकतो असं त्यांचं मत आहे.  गतवर्षीपेक्षा यंदा हापूसचे उत्पादन प्रचंड प्रमाणात घटल्याने प्रक्रिया उद्योगाकडे वळणारा हापूसही कमी प्रमाणात आला आहे. त्यातही युद्धजन्य परिस्थितीमुळे ‘कॅनिंग’च्या आंब्याची मागणी कमालीची घटली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा 3० टक्के आंबाच  ‘कॅनिंग’ उद्योगाला गेला आहे.त्यातही फळमाशीचा प्रादुर्भाव, आंब्याची  हाताळणी करताना होणारे फळांचे नुकसान यामुळे प्रक्रिया उद्योगाकडे गेलेला सुमारे २० टक्के आंबा हा फेकून द्यावा लागला. याचाही परिणाम ‘कॅनिंग’चे दर घसरण्यावर झाला आहे. परिणामी प्रक्रिया  उद्योगांनीही सावधगिरी बाळगत खरेदीचे प्रमाण कमी केले आहेत. शिवाय दरही  पडला आहे. त्यामुळे शेतकरी- बागायतदारांची चिंता आणखी वाढली आहे.

ऐरोलीतील अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाई

मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या जी विभाग ऐरोली कार्यालयामार्फत अनधिकृत बांधकामाविरोधात तोडक कारवाई करण्यात आली. नोटीस बजावूनही संबंधितांनी त्याची दखल न घेतल्याने ही निष्कासन मोहीम राबविण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ.…

आंबिवलीत पाण्यासाठी अ प्रभाग कार्यालयात महिलांचे ठिय्या आंदोलन

‘बेकायदेशीर नळ जोडण्या तोडा, नियमित पाणी द्या’ची जोरदार मागणी कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील आंबिवली परिसरात गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ संतप्त महिला आणि नागरिकांनी अ प्रभाग कार्यालयात धडक देत ठिय्या आंदोलन केले. यावेळी “पाणी आमचा हक्क आहे”, “बेकायदेशीर नळ जोडण्या बंद करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंबिवलीतील अटाळी परिसरातील शंभू पाटील चाळ, साईकृपा चाळ, धर्मात्मा नगर, ज्योतिर्लिंग चाळ आदी भागांमध्ये अनेक दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. विशेषतः महिलांना पाण्यासाठी दररोज भटकंती करावी लागत असून घरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना याचा मोठा फटका बसत आहे. सकाळपासून पाण्याच्या प्रतीक्षेत राहूनही नळ कोरडेच राहत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आंदोलनकर्त्यांनी महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप करत परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर नळ जोडण्या झाल्याचे सांगितले. काही अनधिकृत बांधकामांना चोरून पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे नियमित कर भरणाऱ्या नागरिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप महिलांनी केला. “आम्ही नियमित घरपट्टी आणि पाणीपट्टी भरतो, तरीही आम्हाला पुरेसे पाणी मिळत नाही. मात्र बेकायदेशीर जोडण्यांमुळे पाण्याचा दाब कमी होत असून आमच्या भागात पाणीच पोहोचत नाही,” असे रेशमा बोत्रे आणि जयश्री ढेकळे यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले. दरम्यान, आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याचे पाहून पालिकेचे सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी आंदोलनस्थळी भेट देत नागरिकांशी चर्चा केली. त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पाहणी करण्याचे आदेश देत लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले. ००००००

अंमली पदार्थांच्या व्यापाराला विरोध केल्यामुळे कुटुंबावर हल्ला

कल्याण : कल्याण पश्चिम येथील फिश मार्केट कॉम्प्लेक्समध्ये अंमली पदार्थांच्या व्यापाराला विरोध करणाऱ्या एका कुटुंबावर हल्ला झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात कुटुंबातील अनेक सदस्य जखमी झाले असून…

– राष्ट्रवादीच्या आंदोलनाकडे खासदार सुरेश म्हात्रे यांनी फिरवली पाठ ?

– राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी कल्याण : कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने वाढत्या महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. मात्र भिवंडी लोकसभेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे हे आज दिवसभर कल्याणच्या शासकीय विश्रामगृहात उपलब्ध असतांना देखील त्यांनी या आंदोलनात उपस्थित न राहिल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून कार्यकर्त्यांकडून खासदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहेत. तर खासदार सुरेश म्हात्रे यांनी नुकतेच भाजपा सरपंचांचे आणि शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामाचे कौतुक केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्यातच त्यांनी राष्ट्रवादीच्या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.

नगराध्यक्षांच्या प्रयत्नातून माथेरानचा पाणीप्रश्न मार्गी

मुकुंद रांजाणे माथेरान :एखादे काम हाती घेतल्यावर त्याचा संपूर्ण निपटारा होईपर्यंत प्रयत्न करून गावाला अभिप्रेत असणाऱ्या महत्वपूर्ण कामाला तडीस नेण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणाऱ्या कार्यक्षम नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरींनी अनेक दिवसांपासून पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे पाणी प्रश्नांची उकल करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून ऐन सुट्टयांच्या हंगामात पाण्याची समस्या उद्भवली होती ती अखेरीस मार्गी लावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्यामुळे सहज शक्य झाले आहे. त्यांच्यासोबत उप नगराध्यक्ष संतोष शेलार सुध्दा वेळोवेळी हजर राहून जातीने लक्ष देत होते.आजवर नेरळ माथेरानला पाणी पुरवठा करणाऱ्या या योजनेच्या अधिकारी वर्गाने पाण्याच्या जुन्या पंपांकडे दुर्लक्ष केल्यामुळे याठिकाणी अनियमित पाणी पुरवठा होत असे.तर या पाण्याच्या पाईप मधून सर्रासपणे पाण्याची चोरी करणाऱ्या लोकांकडे देखील दुर्लक्ष करीत असल्याने माथेरानला अनियमित पाणी पुरवठा व्हायचा. मागील चार महिने तर हा पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता.त्यामुळे शारलोट तलावातून पाण्याचा उपसा केला जात होता. उल्हास नदीतून होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली होती परंतु सदर बाब स्थानिकांनी गांभीर्याने घेतली नाही. त्याचवेळी माथेरान करांनी लक्ष दिले असते तर एवढा खटाटोप करण्याची वेळ आली नसती असेही बोलले जात आहे. दरम्यान  महाराष्ट्र सोमवारी जीवन प्राधिकरणाच्या पनवेल येथील कार्यालयात नगराध्यक्ष चौधरी आणि शेलार यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन पिंपरी चिंचवड येथून नवीन पंप खरेदी करून संबंधित ठेका असलेल्या कल्पतरू या कंपनीच्या माध्यमातून नवीन पंप माथेरान नियोजित पाणीपुरवठ्यासाठी वॉटरपाईप पंपिंग हाऊस येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदर पंप रात्री ११वाजता स्वतः नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या देखरेखी खाली वॉटर पाईप येथील पंपिंग हाऊस येथे युद्ध पातळीवर बसवण्यात आला आहे.त्यामुळे मंगळवार पासून माथेरानकरांना पाणीपुरवठा सुरळीत चालू झाला आहे. मागील काही दिवसांपासून गेले दोन-तीन आठवडे पाण्यासंदर्भात चाललेल्या समाजमाध्यमांवरील  चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून नागरिकांनी कार्यक्षम नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उप नगराध्यक्ष संतोष शेलार यांचे अभिनंदन केले आहे.

उथळसर प्रभाग समिती परिसरात पहिल्याच पावसात पूर परिस्थिती?

भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांची भीती ठाणे : उथळसर प्रभाग समितीच्या परिसरात पहिल्याच पावसात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची भीती भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी व्यक्त केली आहे. नालेसफाईचे काम समाधानकारक झाले नसून, अनेक नाल्यांमधील गाळ व कचरा नाल्यालगत ठेवण्यात आला आहे. पहिल्या पावसात कचरा पुन्हा नाल्यात गेल्यामुळे पूराचा फटका नागरिकांना बसेल, अशी शक्यता नारायण पवार यांनी व्यक्त केली. प्रभाग समितीच्या हद्दीत अनेक ठिकाणी नाल्यांमधील कचरा उचलून नाल्यालगत ठेवण्यात आला आहे. तर अनेक नाल्यांमध्ये अजूनही प्लॅस्टिक कचरा व गाळ साचलेला आहे. या संदर्भात भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घनकचरा विभागाकडे सातत्याने तक्रारी केल्या. मात्र, त्याची दखल घेण्यात आलेली नाही. संबंधित कंत्राटदार अधिकाऱ्यांनाही जुमानत नसून, त्याला काळ्या यादीत टाकण्यासाठी नोटीस बजाविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पावसाळा सुरू होण्यास काही दिवसांचा अवधी राहिलेला आहे. येत्या आठवड्यात कोणत्याही दिवशी वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यावेळी नाल्यालगत ठेवलेला कचरा पुन्हा नाल्यात गेल्यामुळे पहिल्याच पावसात उथळसर प्रभाग समितीच्या परिसरात पूर येण्याची भीती आहे. त्यामुळे नालेसफाई करण्याबरोबरच नाल्यालगत ठेवलेला गाळ उचलावा, अशी मागणी नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.

ग्राहक तक्रार निवारण व स्मार्ट मीटरिंगवर विशेष प्रशिक्षण

मुंबई : महावितरणच्या ग्राहकांना अधिक सक्षम व पारदर्शक सेवा देण्यासाठी तसेच अधिकारी- कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी भांडुप परिमंडलात ‘ग्राहक तक्रार निवारण मंच’ व स्मार्ट मीटरिंग या विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…