Category: रायगड

raigad news and updates

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी घेतला पेण विधानसभेचा आढावा

अशोक गायकवाड रायगड : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी पेण विधानसभा मतदारसंघाला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. तसेच पेण येथील स्ट्रॉगरूमला भेट देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. उपविभागीय अधिकारी पेण कार्यालयात जिल्हाधिकारी यांनी पेण विधानसभा मतदार संघात निवडणूकीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. या बैठकीस पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण पवार, पेण तहसीलदार तानाजी शेजाळ, उत्तम कुंभार, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. निवडणूकीमध्ये प्रत्येक विभागाची भूमिका महत्वाची आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी चोख पणे पार पाडावी. आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी असे जावळे यांनी यावेळी सांगितले. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील विविध कक्षांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन आढावा घेतला. जिल्हाधिकारी जावळे व पोलीस अधीक्षक घार्गे यांनी ईव्हीएम यंत्राचे वाटप व मतमोजणीच्या दिवशी स्ट्रॉगरूममधील जागेचे नियोजन याची माहिती घेतली. ईव्हीएम सुरक्षेच्यादृष्टीने स्ट्राँगरूमचे ठिकाण व परिसराची पाहणी केली. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी कायदा व सुव्यवस्था आणि सुरक्षेचा आढावा घेतला. 0000

निवडणुक निर्भय, भयमुक्त, पारदर्शक पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे-राजेश कुमार

अशोक गायकवाड रायगड : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ७ मतदार संघामध्ये निवडणुक निर्भय, भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे व सदैव दक्ष राहून पार पाडावी, असे निर्देश पनवेल, पेण, कर्जत, उरण मतदारसंघ निवडणूक खर्च निरीक्षक राजेश कुमार यांनी दिले. भारत निवडणूक आयोगाने रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघासाठी दोन निवडणूक खर्च निरीक्षक नियुक्त केले आहेत. पनवेल, पेण, कर्जत, उरण मतदारसंघासाठी भारतीय महसूल सेवेतील २००५ च्या तुकडीचे अधिकारी राजेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड मतदार संघांसाठी भारतीय महसूल सेवेतील २०१५ च्या तुकडीच्या अधिकारी ज्योती मीना यांची नियुक्ती केली आहे. त्यांचे मंगळवारी,(दि.२२ ऑक्टोंबर २०२४) रोजी रायगड येथे आगमन झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात (दि. २२) रोजी या दोन्ही खर्च निरीक्षकांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व कार्यान्वयीन यंत्रणाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे, राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिक्षक रविकिरण कोले, खर्च तपासणी विभागाचे नोडल अधिकारी तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांचेसह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. यावेळी राजेश कुमार यांनी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान बँकांमध्ये होणारे दैनंदिन व्यवहार, संशयास्पद व्यवहारांवर विशेष लक्ष द्यावे. तसेच विधानसभा क्षेत्रनिहाय अतिसंवेदनशील भागाविषयी माहिती जाणून घेतली व अशा भागात विशेष उपाययोजना राबविण्याबाबत उत्पादन शुल्क विभाग, आयकर अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सुचना दिल्या. तसेच निवडणूक खर्च व्यवस्थापन वेळीच व योग्य प्रकारे करण्याच्या सुचना दिल्या. इलेक्ट्रॉनिक मिडीया, सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रसिध्द होणा-या जाहिरातींकडे लक्ष देण्याबाबत जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या नोडल अधिका-यांना निर्देश दिले. निवडणूक खर्च निरीक्षकांनी सर्व सहायक निवडणूक अधिकारी व नोडल अधिका-यांकडून निवडणूकीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली. निवडणूक काळात प्रलोभन दाखविण्यासाठी साड्या, मद्य, वस्तू, पैसे यांचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे सजग राहून अशा बाबींना तत्काळ निर्बंध घालावा व संबंधितांवर कारवाई करावी. उमेदवाराकडून प्रचारासाठी केल्या जाणा-या प्रत्येक खर्चाची काटेकोरपणे नोंद घ्यावी. निवडणूक आयोगाच्या निर्देश व सूचनांचा कुठेही भंग होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असेही निर्देश खर्च निरीक्षक राजेश कुमार यांनी दिले.निवडणूक खर्च निरीक्षक ज्योती मीना यांनी सहकारी बँका मार्फत होणारे व्यवहार तसेच राष्ट्रीयकृत बँका मार्फत होणारे व्यवहार यावर करडी नजर ठेवण्याचे निर्देश दिले. पेड न्युज वर देखील विशेष लक्ष ठेवावे असेही सांगितले. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार प्रत्येक यंत्रणेनी कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या.यावेळी सर्व कार्यान्वयीन यंत्रणानी केलेल्या कार्यवाहीचा आढावा सादर केला.यावेळी खर्च निरीक्षक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाला भेट दिली आणि आढावा घेतला.

खाजगी बसेसमधून प्रवाशाकडून जादा भाडेदर आकारल्यास तक्रार करा – महेश देवकाते

अशोक गायकवाड रायगड: खाजगी बसेसमधून प्रवाशाकडून जादा भाडेदर आकारल्यास नागरिकांनी योग्य तक्रारी कळवाव्यात असे आवाहन, पेण जि. रायगडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी केले आहे. १ नोव्हेंबर २०२४ पासून सुरु होणाऱ्या दिवाळी सणानिमित्त प्रवासी मोठ्या प्रमाणात गावी येत व जात असतात. त्यादरम्यान प्रवासी बसेसकडून जादा भाडे आकारल्याबद्दल वारंवार तक्रारी प्राप्त होत असतात. यास्तव खाजगी वाहतूकदारांकडून प्रवाश्यांकडून जादा भाडे – आकारण्यात येणाच्या प्रवृतीला आळा घालण्यासाठी व रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून २१.१०.२०२४ ते ९.११.२०२४ या कालावधीत खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसची तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी जादा भाडेदर आकारलेबाबतची तक्रार नोंदविण्याकरिता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय हेल्पलाईन क्रमांक:- २५२२३४-०२१४३ व कार्यालय ई-मेल आयडी:- dyrto.06-mh@gov.in येथे संपर्क साधावा. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण कार्यालयाच्या कार्याक्षेत्रातील खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणापासूनचे कि.मी. प्रमाणे खाजगी, बस मालकांनी पूर्ण बससाठी आकारावयाचे महत्तम भाडे बाबतचा विहित नमुन्यात तक्ता तयार करुन व त्यप्रमाणे येणारा प्रती आसन दर दर्शवून सदर खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच प्रवाश्यांच्या माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक देखील प्रदर्शित करण्यात येणार आहे. ५० प्रवाशांना प्रवास करताना येणाऱ्या अडचणीबाबत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय. पेण कार्यालयाच्या ई-मेल आयडीवर तक्रार नोंदविण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी योग्य तक्रारी कळवाव्यात असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण जि. रायगड यांनी केले आहे.

 १५ वर्षांत न फुटलेले नारळ १५ दिवसांत फुटले,

 सुभाष पवार यांचा किसन कथोरेंवर हल्लाबोल   बदलापूर : मुरबाड तालुक्यात १५ वर्षांत फुटले नव्हते, तेवढे नारळ गेल्या १५ दिवसांत मुरबाडमध्ये फुटले, असा टोला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व महाविकास आघाडीचे मुरबाड मतदारसंघातील नियोजित उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांनी आमदार किसन कथोरे यांना लगावला. सुभाष पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केल्यानंतर माध्यमांश संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कथोरे यांच्यावर विविध विषयांवर टीका केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केल्यानंतर सुभाष पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. विद्यमान आमदार किसन कथोरे यांना भाजपातून उमेदवारी जाहिर झाल्यानंतर सुभाष पवार यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला होता. त्याचवेळी पवार कथोरे यांच्याविरूद्ध मुरबाड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार हे स्पष्ट झाले होते. प्रवेश होताच पवार यांनी कथोरे यांच्यावर विविध विषयांवर टीकास्त्र सोडले. खड्डे संपल्यानंतर मुरबाड मतदारसंघ लागतो, असे म्हणणाऱ्यांच्या कारकिर्दीतच मुरबाड मतदारसंघ खड्ड्यात गेला आहे, अशी टीकाही सुभाष पवार यांनी यावेळी बोलताना केली. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचा आणि बदलापूर शहराचा विकास याच मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे यावेळी पवार यांनी स्पष्ट केले. गेल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत मुरबाड विधानसभा मतदारसंघाचा अपेक्षित विकास झालेला नाही. मुरबाड शहरातील एमआयडीसीतील अनेक उद्योग निघून गेले. त्यामुळे मुरबाडमध्ये तरुणांना रोजगारात वाढ झालेली नाही, ही वस्तूस्थिती आहे, याकडे सुभाष पवार यांनी लक्ष वेधले. एकनाथ शिंदेंबद्दल आदर पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आजही आदर आहे. त्यांच्या सहकार्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक कामे पूर्ण करता आली, असे सुभाष पवार यांनी नमूद केले. मात्र यंदाची विधानसभा निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्यामुळे मला शिवसेनेबाहेर पडावे लागले, असेही सुभाष पवार म्हणाले. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे भातपिकासह विविध पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणीही पवार यांनी यावेळी केली.

सेनादलाच्या विर मराठा रेजिमेंटच्या कबड्डी संघ चांगली कामगिरी करणार – लक्ष्मण गांवड

अशोक गायकवाड अलिबाग : सेनादलाच्या विर मराठा रेजिमेंटच्या कबड्डी सराव शिबिर रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पिपंळपाडा येथे घेण्यात आले. न्युयंग संघ पिपळपाडा यांच्या क्रिडांगणावर या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी बिकानेर येथे होणाऱ्या सेनादलाच्या कबड्डी स्पर्धेमध्ये हा संघ चांगली कामगिरी करुन अंतिम विजेतेपद मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आसल्याचे वीरमराठा रेजिमेंटचे प्रशिक्षक लक्ष्मण गांवड यांनी सांगितले.* या शिबीराच्या सांगता समारंभाप्रसंगी न्यूयंग संघ पिपळपाडा संघाने सेना दलाच्या संघाचा सत्कार केला या वेळी जेएसडब्ल्यू कंपनीचे अधिकारी पेण तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हरिचंद्र शिंदे, कराटे, किकबॉक्सिंगचे आंतराष्ट्रीय खेळांडु किकबॉक्सिंग पंच प्रविण पाटील, सेनादल संघाचे प्रशिक्षक राष्ट्रीय प्रशिक्षक तथा रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य लक्ष्मण गावंड, न्यू यंग संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्ता पाटील, न्यू यंग संघाचे अध्यक्ष विकास पाटील,खजिनदार सुनिल पाटील, उपाध्यक्ष गजानन पाटील सरचिटणीस हरिश्चंद्र पाटील, कासु ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सुनंदा गांवड,राष्ट्रीय कबड्डी पंच हिरामण भोईर, योगेश पाटील, योगेश टेमकर , धावपटू गजानन भोईर, महेंद्र पाटील, आकाश पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. रायगड ही कबड्डीची पंढरी मानली जाते रायगड जिल्ह्याने अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळांडू दिले तर राष्ट्रीय प्रशिक्षक दिले रायगडच्या कबड्डीचे आकर्षण सगळ्यानाच असते अनेक राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन रायगड जिल्ह्यात केले जाते. सेनादलाच्या विर मराठा रेजिमेंट, बीकानेर-राजस्थान या संघाचा सराव शिबिरासाठी सेना दलाने देखील रायगगड जिल्ह्याची निवड केली. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पिपंळपाडा येथे सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर न्यूयंगसंघ पिपंळपाडा संघाचा कबड्डी खेळांडू सध्या सेनादलात कार्यरत असलेला प्रदिप भगत यांनी वीरमराठा रेजिमेंट संघाचे सराव शिबिर घेण्याचे ठरविले येथील क्रिडांमंडळाच्या सदस्यांनी व ग्रामस्थांनी या खेळांडूना क्रिडांगण उपलब्ध करुन दिले. तर खेळांडुच्या राहाण्याची व सर्व व्यवस्था केली. या संघाला प्रशिक्षण देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय प्रशिक्षक लक्ष्मण गांवड यांची निवड करण्यात आली. लक्ष्मण गांवड हे अनुभवी प्रशिक्षक असल्याने त्यांनी या संघाला उत्तम प्रकारे प्रशिक्षण देण्याचे काम केले बिकानेर येथे होणाऱ्या सेनादलाच्या कबड्डी स्पर्धेमधे हा संघ सहभागी होणार असून या संघासोबत लक्ष्मण गांवड प्रशिक्षक तर सहाय्यक प्रशिक्षक म्हणून न्यू यंग संघाचे तथा पोलीस दलातील नंदकुमार पाटील हे असणार आहेत. या गोदर लक्ष्मण गांवड यांनी 2010 ला फिरोजपुर पंजाब येथे या संघाला प्रशिक्षण दिले आहे त्यावेळी लक्ष्मण गांवड यांना सेनादलाने आर्मी कॅप देवून सन्मानित केले होते.सेनादलाच्या वीरमराठा रेजिमेंटच्या संघाला दोन वेळा प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली. या संघामधे चांगले खेळाडू आहेत खेळांडूनी चांगली मेहनत घेतलीच आहे तर न्युयंग संघ पिपळपाडा संघाने या सराव शिबिरासाठी चांगले सहकार्य केले आहे. यावर्षी बिकानेर येथे होणाऱ्या सेनादलाच्या कबड्डी स्पर्धेमध्ये हा संघ चांगली कामगिरी करुन अंतिम विजेतेपद मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आसल्याचे वीरमराठा रेजिमेंटचे प्रशिक्षक लक्ष्मण गांवड यांनी सांगितले.आम्ही जे सुखाने जगतो ते तुमच्या मुले सेनादलाने येथे कबड्डीचा सराव शिबिराचे आयोजन आमच्या पिपंळपाडा गावात केले हे आमचे भाग्य आसल्याचे न्युयंगसंघ पिपंळपाडा संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्ता पाटील. यांनी या वेळी सांगितले.या सराव शिबीरास न्यू यंग संघाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी ऊत्तम सहकार्य केले. तसेच संघाचे खेळाडू नंदकुमार पाटील, दुर्वास पाटील, गजानन पाटील, विजय भगत सतिष पाटील तसेच अन्य वरिष्ठ खेळाडुंनी शिबीरात ऊत्तम मार्गदर्शन केले.या प्रशिक्षण शिबीरास सर्वश्री विकास पाटील, चंद्रकांत पाटील, विश्वनाथ पाटील, सुनिल पाटील, संदेश पाटील, देवेंद्र भोईर , दत्तात्रेय पाटील, हिरामण भोईर, लिलाधर म्हात्रे, प्रविण पाटील, जयेश पाटील या सर्वांनी आर्थिक व अन्य स्वरुपात मदत केली.

दीपक फर्टिलायझर्स प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वततेसाठी कटिबद्ध – मुकुल अग्रवाल

अशोक गायकवाड   पनवेल:अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रदूषण नियंत्रणात दीपक फर्टिलायझर्स आघाडीवर असून दीपक फर्टिलायझर्समध्ये आम्ही प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वततेसाठी कटिबद्ध आहोत, अशी माहिती दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग विभागाचे अध्यक्ष मुकुल अग्रवाल यांनी दिली. दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून प्रगत पर्यावरणीय तंत्रज्ञानाचा वापर करून प्रदूषण कमी करण्यासाठी सक्रिय पावले उचलले जातात. त्यानुसार प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी उपकरणे निवडण्यासाठी त्या प्रक्रियेचे काळजी पूर्वक विश्लेषण केले जाते, त्या अनुषंगाने सध्याच्या आणि भविष्यातील नियमांची पूर्तता करण्यासाठी कंपनीने आपल्या सुविधांमध्ये आधुनिक वायू प्रदूषण नियंत्रण प्रणाली कार्यान्वित केली आहे.तळोजा प्रकल्पात दीपक फर्टिलायझर्सने स्पेनच्या इन्क्रोएसए कंपनीच्या सहयोगाने एनपीके खते तयार करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला. या नवीन प्रणालीमुळे उत्पादनात वापरले जाणारे जवळजवळ सर्व अमोनिया पकडण्यास मदत होते, ज्यामुळे ते हवेत सोडण्यापासून रोखले जाते. याचा परिणाम असा होतो की अमोनियाचे उत्सर्जन खूप कमी ठेवले जाते आणि ते भारतीय मानकांपेक्षा तीनपट कमी आहे. या प्रणालीमुळे दरवर्षी ५०० टन अमोनियाची बचत होत असून कोणताही हानिकारक द्रव कचरा तयार होत नाही, त्यामुळे प्रक्रिया अधिक स्वच्छ होते. जगातील सर्वोत्कृष्ट म्हणून इन्क्रोने मान्यता दिलेले हे तंत्रज्ञान पर्यावरणाचे रक्षण आणि वायू प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल आहे. या संदर्भात मॅन्युफॅक्चरिंगचे विभागाचे अध्यक्ष मुकुल अग्रवाल म्हणाले कि,“दीपक फर्टिलायझर्समध्ये आम्ही प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वततेसाठी कटिबद्ध आहोत. तळोजा प्रकल्पातील आमची उत्सर्जन कमी करणारी प्रणाली पर्यावरणीय प्रभाव लक्षणीयरित्या कमी करते, अमोनिया उत्सर्जन नियामक मर्यादेपेक्षा खूप कमी आहे आणि जवळजवळ संपूर्ण अमोनियाची पुनर्प्राप्ती होते. इनक्रोएसएच्या सहकार्याने, आम्ही हवेची गुणवत्ता आणि संसाधन संवर्धनासाठी नवीन उद्योग बेंचमार्क स्थापित केले आहेत. एक जबाबदार कॉर्पोरेट नागरिक म्हणून, आम्ही हरित, अधिक शाश्वत भविष्यासाठी आमच्या ऑपरेशन्समध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानात गुंतवणूक करत आहोत”. दीपक फर्टिलायझर्सने अलीकडेच तळोजा येथील अमोनिया प्रकल्पात या योजनेची सुरुवात केली आहे, ज्याचे व्यवस्थापन परफॉर्मन्स केमिसर्व्ह लिमिटेड या उपकंपनीद्वारे केले जाते. या प्रकल्पातून दररोज १५०० टन अमोनियाचे उत्पादन होऊ शकते. पर्यावरण रक्षणासाठी दीपक फर्टिलायझर्सने प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. त्यांनी हानिकारक नायट्रोजन ऑक्साईड उत्सर्जन 80% पेक्षा जास्त कमी करणारे विशेष बर्नर आणि प्रगत तंत्रज्ञान स्थापित केले आहे. यामुळे हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते आणि प्रकल्प पर्यावरणपूरक बनतो.तसेच विसर्गापूर्वी वायू प्रदूषकांच्या सांद्रतेचा मागोवा घेण्यासाठी प्रगत ऑनलाइन निरंतर उत्सर्जन देखरेख प्रणाली स्थापित केले आहे. पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि जलद कारवाई सक्षम करण्यासाठी डेटावर २४/७ लक्ष ठेवले जाते आणि केंद्र आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेबसाईटवर अपलोड केले जाते.

 तोपर्यंत नैना प्रकल्पाची वीट देखील ठेऊ देणार नाही

आमदार प्रशांत ठाकूर यांची ग्वाही पनवेल : जो पर्यंत सर्वांच्या शंकांचे निरासन होत नाही तो पर्यंत नैना प्रकल्पाची वीट देखील ठेऊ देणार नाही याची ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी चिपळे येथे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटनावेळी दिली. तसेच भाजपची भूमिका सर्व सामान्य जनतेमध्ये पोहचवून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार पुन्हा निवडून देण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. पनवेल विधानसभा मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरु आहे. या पार्श्ववभूमीवर तालुक्यातील चिपळे गावात भारतीय जनता पार्टीचे कार्यालय सुरु करण्यात आले आहे. याचे उदघाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी झाले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून अनेकांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टी जनसामान्यांमध्ये मिळून काम करणारी पार्टी आहे. आज सुरु झालेल्या या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांना आपल्या समस्या सोडवण्यासाठी एक हक्काचे ठिकाण उपलब्ध झाले आहे. त्यामुळे मला खात्री आहे निवडणुकी नंतर देखील संपूर्ण परिसरातील लोकांना सेवा देणारे हे केंद्र बनणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून उभाटा गटाचे भोकरपाडा गावातील शाखा प्रमुख गजानन फुलोरे, अनिकेत फुलोरे, अभिजित फुलोरे तसेच विहिघर मधील रहिवासी तथा वीरार येथील उभाटा गटाचे शाखाप्रमुख विश्वनाथ कांबळे यांनी भाजपमध्ये सामील होत पक्षाची ताकद अधिक मजबूत केली. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वागत करून त्यांचा निर्णय सार्थ ठरेल असे काम भाजपच्या माध्यमातून होईल असा विश्वास त्यांना दिला. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष अमित जाधव, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच अनंत ढवळे, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस विश्वजीत पाटील, हनुमान फुलोरे, अशोक फुलोरे, रुपेश फुलोरे, गिरीश फुलोरे, बूथ अध्यक्ष भास्कर फुलोरे, कल्पेश फुलोरे, किशोर फुलोरे, गणेश फुलोरे, राजेश फुलोरे, हरिदास फुलोरे, गणेश फुलोरे, धीरज फुलोरे, अमोल फुलोरे, लहू फुलोरे, रमेश फुलोरे, दत्ता फुलोरे, माजी सरपंच रमेश पाटील, माजी सदस्य गणेश म्हसकर, माजी उपसरपंच धनंजय पाटील, रोशन पाटील, महेश शाह, नागेश म्हसकर, ह.भ.प. धनाजी परशुराम म्हसकर, आकाश पाटील, कुलदीप पाडवी, विवेक पांडेय, रोहित पाटील, चंद्रकांत राणे, अनुराग पांड्या, सुनील फडके, समाधान फडके, रुपेश फडके, कान्हा फडके, अनंता फडके, मंगेश फडके, दीपक फडके, समीर पाटील, दुशांत पवार, सुनील पाटील, भरत पाटील, नामदेव पाटील, साईनाथ पाटील, दिनकर पाटील, सागर पाटील, संदेश फडके, भावेश फडके, अभिनय पाटील, नितीन पाटील, अक्षय पाटील, स्वप्नील फडके, समीर पाटील, विजय पाटील, विशाल पाटील, तुकाराम पाटील, तन्मय पाटील, सुभाष पाटील, शरद म्हस्कर, सचीन पाटील, प्रतिप पाटील, प्रतीक फडके, प्रनिल फडके, प्रसाद पाटील, निलेश पाटील, नारायण पाटील, महेंद्र पाटील, किरण पाटील, सैरभ पाटील, योगेश पाटील, दिनकर पाटील, धीरज म्हात्रे, अविनाश म्हात्रे, संजय पाटील, रोहीत पाटील, विठ्ठल पाटील हौशिराम फडके, हरीश्चंद्र पाटील, हरीष पाटील, अजीत म्हात्रे, विष्णू पाटील, रवी पाटील, नरेश पाटील, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 000

माथेरानमधील मर्कटलीला पर्यटकांचे आकर्षण

    माथेरान : माथेरान मध्ये चिक्की चपला प्रसिद्ध आहेत पण त्याचबरोबर इथले खास आकर्षण म्हणजे इथली माकडे आहेत. माथेरान मध्ये कुठेही गेल्यास माकडांच्या टोळ्या गटागटाने दिसतात.प्रत्येक पॉईंट्स वर ही…

माथेरानमध्ये मैला उचलण्याची प्रथा आजही कायम

माथेरान : जग एकविसाव्या शतकात जात असताना माथेरान मध्ये ब्रिटिश काळापासून पूर्वापार चालत आलेली मैला उचलण्याची प्रथा आजही कायम असल्याने पर्यटकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पूर्वी पाच दशकांपूर्वी माथेरान…

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत निवडणूक यंत्राची पहिली सरमिसळ संपन्न

अशोक गायकवाड रायगड : जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील प्रथमस्तरीय तपासणी झालेल्या ३ हजार ६८१ मतदान यंत्रांची पहिली जिल्हास्तरीय सरमिसळ (रँडमायझेशन) प्रक्रिया करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे , आचारसंहिता पथक प्रमुख उपजिल्हाधिकारी संदीपान सानप, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी निलेश लांडगे आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघाच्या आवश्यकतेनुसार ६ हजार २०० बॅलेट युनिट, ३ हजार ४०५ कंट्रोल युनिट आणि ३ हजार ६८१ व्हीव्हीपॅट यंत्रांची पहिली सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. तत्पूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी जावळे यांनी सरमिसळ प्रक्रियेची माहिती दिली.सर्व मतदान यंत्रांची राजकीय पक्षांच्या उपस्थितीत प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली असून ते सुस्थितीत आहेत. सर्व विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राच्या १२० टक्के बॅलेट आणि कंट्रोल युनिट, तर १३० टक्के व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात येणार आहेत. वितरणानंतर ही यंत्रे संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षा बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत. त्या-त्या विधानसभा मतदारसंघातदेखील मतदान केंद्रनिहाय मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रिया करण्यात येणार आहे, असे जावळे यांनी सांगितले. 0000