Category: ठाणे

Thane news

दिव्यातील साबेगावमध्ये धक्कादायक प्रकार; सीलबंद पाण्याच्या जारमध्ये आढळला साप 

दिव्यातील साबेगावमध्ये धक्कादायक प्रकार; सीलबंद पाण्याच्या जारमध्ये आढळला साप दिवा, दि. ५ मार्च : दिव्यातील साबेगाव परिसरात अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. पिण्यासाठी विकत आणलेल्या २० लिटरच्या…

ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धा

ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धा ओमकारच्या २१ धावांत ५ बळी ठाणे : ओमकार सावंतची भेदक  गोलंदाजी आणि सुमेद वेवट्रेची अर्धशतकी खेळीच्या जोरावर अप्लाईड क्लाऊड कॉम्प्युटिंग संघाने विहंग इंटरप्राइजेसचा आठ गडी…

महावितरणच्या कल्याण परिमंडळ कार्यालयामध्ये राष्ट्रीय लाईनमन दिवस साजरा

महावितरणच्या कल्याण परिमंडळ कार्यालयामध्ये राष्ट्रीय लाईनमन दिवस साजरा कल्याण : महावितरण कंपनीच्या कल्याण परिमंडळात राष्ट्रीय लाईनमन दिन साजरा करण्यात आला. परिमंडळ कार्यालयात उपस्थित लाईनमन (जनमित्र) यांना मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा…

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय परिसंवाद संपन्न

भारतीय राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय परिसंवाद संपन्न नवी मुंबई : (अशोक गायकवाड )—भारतीय राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी ७५ वर्षानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ऐरोली आणि मुंबई विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र व आंबेडकर चेअर (सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय राज्यघटनेची ७५ वर्षे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विकासदृष्टी’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद यशस्वी रितीने संपन्न झाला. कार्यक्रमाचा शुभारंभ नवी मुंबईच्या महापौर सुजाता सुरज पाटील यांच्या हस्ते झाला. स्वागतपर भाषण प्रा. मनीषा कर्णे यांनी तर प्रास्ताविक डॉ. कैलास गायकवाड यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त आयएएस अधिकारी जे. एस. सहारिया यांनी भारतीय राज्यघटनेतील मूल्ये व त्यांचे सामाजिक महत्त्व यावर मार्गदर्शन केले. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी परिषदेस शुभेच्छा दिल्या. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समाजविकास विभागाचे उपायुक्त संजय शिंदे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत विविध तांत्रिक सत्रांमध्ये १६ संशोधनपर निबंध सादर करण्यात आले. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, हैदराबाद आदी राज्यांतील संशोधकांनी यामध्ये सहभाग घेतला. साऊथॅम्प्टन युनिव्हर्सिटी, लंडन येथील संशोधकानेही आपला संशोधन निबंध या परिषदेत सादर केला. समारोप सत्रात थायलंड येथील डॉ. श्रीरंजन आवटे यांनी संविधानिक मूल्ये समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व अधोरेखित करत सामाजिक न्यायाच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले. अधिवेशनाच्या विशेष सत्रात दीपक करंजीकर यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर : दूरदर्शी अर्थतज्ज्ञ” या विषयावर व्याख्यान दिले. परिषदेत संविधानिक मूल्ये, सामाजिक न्याय, स्त्री-पुरुष समानता, आरक्षण धोरण, लोकशाही व विकास या विषयांवर सखोल चर्चा झाली. सत्रांचे मॉडरेशन मुंबई विद्यापीठाच्या डॉ. प्रिया वैद्य व डॉ. सोनाली वाखर्डे यांनी केले. कार्यक्रमाचा तपशीलवार आढावा सादर करण्यात आला तसेच सहभागी अभ्यासकांना प्रमाणपत्रे व समिती सदस्यांना स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राशी बग्गा यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन संध्या आंबाडे व दशरथ गंभीरे यांनी केले. हा आंतरराष्ट्रीय परिसंवाद भारतीय राज्यघटनेच्या ७५ वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेणारा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विकासदृष्टीचा पुनर्विचार करणारा ठरला.

८ ते २२ मार्चदरम्यान जिल्ह्यात ‘जल महोत्सव’ साजरा होणार

८ ते २२ मार्चदरम्यान जिल्ह्यात ‘जल महोत्सव’ साजरा होणार अनिल ठाणेकर ठाणे, ग्रामीण पाणी पुरवठा व्यवस्था अधिक शाश्वत, सक्षम व लोकसहभागावर आधारित करण्याच्या उद्देशाने दि. ८ ते २२ मार्च या कालावधीत जिल्ह्यात ‘जल महोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नदी उत्सव’च्या धर्तीवर ‘जल उत्सव’ साजरा करण्याची परंपरा विकसित करण्यावर भर दिला होता. त्यानुसार राष्ट्रीय पेयजल विभाग, केंद्र शासन व NITI Aayog यांच्या सहकार्याने २०२४ मध्ये देशातील २० महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर जल उत्सव राबविण्यात आला होता. त्यास मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर यंदा हा महोत्सव देशभर आयोजित करण्यात येत आहे.ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत वैयक्तिक नळजोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे हे जल जीवन मिशन या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या योजनांचे उन्नतीकरण करून स्टँड पोस्ट नळ पाणीपुरवठा योजना तसेच दरडोई किमान ४० लिटर प्रतिदिन पूर्ण झालेल्या योजनांना ५५ लिटर प्रतिदिन क्षमतेनुसार सुधारित करण्यात येत आहे.ठाणे जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्या, अनुदानित आश्रमशाळा व शासकीय वसतिगृहांना नळजोडणी सुविधा देण्यात येत असून, एकाकी व आदिवासी वाडी-पाड्यांसाठी सौरऊर्जा आधारित नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहेत.‘जल महोत्सव’ राष्ट्रीय, राज्य आणि ग्राम अशा तीन स्तरांवर आयोजित करण्यात येणार आहे. ग्राम व पंचायत समिती स्तरावर ‘लोकजल उत्सव’ साजरा करण्यात येईल, जो पूर्णपणे लोकसहभागावर आधारित असेल.ग्रामसभा व पाणी समितीमार्फत गावपातळीवर पुढील उपक्रम राबविण्यात येणार आहेत : जलस्रोतांचे संरक्षण व पुनरुज्जीवन, पाणीपुरवठा योजनांचे औपचारिक हस्तांतर, सामुदायिक जल शपथ, ग्रामपंचायत विकास आराखड्यात पाणी विषयाचा समावेश, महिलांकडून फिल्ड टेस्टिंग किटद्वारे जल गुणवत्ता तपासणी, सार्वजनिक स्वच्छता व जलसंवर्धनाबाबत जनजागृती लोकप्रतिनिधी, नागरिक, महिला बचत गट व युवक मंडळांच्या सहभागातून गावातील जलस्रोतांची स्वच्छता व देखभाल केली जाणार आहे.‘जल महोत्सव’ यशस्वीपणे राबविण्याची जबाबदारी जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावरील प्रशासनावर सोपविण्यात आली आहे. जिल्हा परिषद ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संबंधित विभाग, पाणी समित्या व स्थानिक संस्था यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. “जल महोत्सव’ हा केवळ उत्सव नसून ग्रामीण पाणी व्यवस्थापन अधिक शाश्वत व लोकसहभागावर आधारित करण्याचा एक प्रभावी उपक्रम आहे. जलस्रोतांचे संवर्धन, पाणी बचत, गुणवत्ता तपासणी आणि सामुदायिक जबाबदारी यावर भर देऊन ‘जल महोत्सव’च्या माध्यमातून प्रत्येक गावात जलजागृतीची चळवळ उभी राहील. ग्रामसभा, पाणी समित्या, महिला बचत गट व युवकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.” – उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता विभाग) पंडित राठोड व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग कार्यकारी अभियंता प्रकाश सासे या उपक्रमातून ग्रामीण भागात पाण्याबाबत जागरूकता वाढून जलस्रोतांचे संवर्धन, शाश्वत पाणीपुरवठा व लोकसहभाग अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

अखेर शहापूर आदिवासी प्रकल्प अधिकारी निलंबित

अखेर शहापूर आदिवासी प्रकल्प अधिकारी निलंबित विद्यार्थिनी आत्महत्या प्रकरणी आमदार संजय केळकर आक्रमक अनिल ठाणेकर ठाणे, मुरबाड तालुक्यातील मोरोशी आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी मुख्याध्यापक आणि स्त्री अधीक्षिकेला निलंबित केले असले तरी प्रकल्प अधिकारी मात्र अद्याप मोकळे आहेत. त्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत केली. त्यानंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या निर्देशानंतर शहापूर आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात आले. मोरोशी आश्रम शाळेतील एका दहावीच्या विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकरण गेल्या वर्षी २५ डिसेंबरला घडले होते. या प्रकरणी आमदार संजय केळकर यांनी अधिवेशन आवाज उठवून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली होती. खूप खूप शिक गं पोरी, ताठ मानेने जगशील तरी असे आवाहन राज्य शासन ग्रामीण भागात करत असताना दुसरीकडे मात्र ग्रामीण भागातील आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये सेवा-सुविधा, सुरक्षा आणि दर्जा यांचा अभाव असतो. आदिवासी प्रकल्प विभागाकडून वेळोवेळी दौरे आखणे, आश्रमशाळा आणि वसतिगृहांची पाहणी करून आवश्यक सेवा सुविधा देणे हे प्रकल्प अधिकाऱ्याचे काम असून येथील प्रत्येक घटनेला प्रकल्प अधिकारी जबाबदार असतो. मात्र मोरोशी आश्रमशाळेतील घटनेप्रकरणी जबाबदार अधिकारी असलेले प्रकल्प अधिकारी यांच्यावर कारवाईच झालेली नसून तेच इतरांचे निलंबन करत आहेत. त्यामुळे तातडीने प्रकल्प अधिकाऱ्याला निलंबित करण्याची जोरदार मागणी आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केली. त्याचबरोबर पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचीही त्यांनी मागणी केली.यावर उत्तर देताना मंत्री अशोक उईके यांनी अशी प्रकरणे आश्रमशाळांमध्ये वारंवार होत असल्याचे मान्य केले. या प्रकरणी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मोरोशी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी २५ डिसेंबरला चौकशी समिती गठित करण्यात आली तर २६ डिसेंबरला अहवाल प्राप्त होऊन आश्रमशाळा मुख्याध्यापक प्रल्हाद भोई आणि स्त्री अधीक्षिका जयश्री वागळे यांना निलंबित करण्यात आले. तसेच पीडित कुटुंबाला दोन लक्ष रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आल्याची माहिती  उईके यांनी दिली. यावर केळकर यांनी आक्रमक भूमिका घेत प्रकल्प अधिकाऱ्याला निलंबित करण्यात येणार आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला. अखेर मंत्री उईके यांनी निर्देश दिल्यानंतर प्रकल्प अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले.

दुसऱ्या दिवशीही आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच

दुसऱ्या दिवशीही आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच नगरसेविका डॉ. तनुजा वायले, शालिनी वायले यांची आंदोलक आणि प्रशासनात मध्यस्थी एक महिन्याचा पगार केडीएमसी त्वरित देणार कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व आरोग्य केंद्रांवर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबर महिन्यापासून पगार थकला असून, आज दुसऱ्या दिवशीही या कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले. या आंदोलक आरोग्य कर्मचाऱ्यांची नगरसेविका डॉ. तनुजा वायले आणि शालिनी वायले यांनी भेट घेत समस्या जाणून घेतल्या. कर्मचाऱ्यांच्या या समस्या आयुक्तांपुढे मांडून एका महिन्याचा पगार महापालिका त्वरित देणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तर इतर महानगरपालिकेत या आरोग्य कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या वतीने प्रोत्साहन भत्ता दिला जातो. असाच प्रोत्साहन भत्ता केडीएमसी अंतर्गत काम करणाऱ्या आरोग्य कर्मचार्यांना मिळावा यासाठी महासभेत प्रस्ताव मांडणार असल्याचे नगरसेविका डॉ. तनुजा वायले यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एनयुएचएम अंतर्गत कर्मचाऱ्यांचे मागील एक वर्षापासून सुरळीत पगार होत नाही. नोव्हेंबर २०२५ पासून मार्च २०२६ पर्यंतचा पगार जमा झालेला नाही. तसेच जुलै २०२५ पासूनचा वाढीव पगार मिळालेला नाही. इतर महानगरपालिका एनयुएचएम कर्मचार्यांना १५ हजार वाढीव पागार देते. मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिका कोणताही वाढीव पगार देत नाही. तसेच नागरी आरोग्य केंद्रातील एएनएम, जीएनएम यांचे रिक्षा बिल, सपोर्ट ग्रुप, आरोग्य वर्धिनी हि बिले थकीत आहेत. या सर्व समस्यांमुळे एनयुएचएम  स्टाफलं आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून लवकरात लवकर निवारण करण्याची मागणी या आंदोलनकर्त्यांची आहे. आज दुसऱ्या दिवशी देखील या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन सुरु ठेवले होते. यावेळी या आंदोलनकर्ते आणि प्रशासन यांच्यात नगरसेविका डॉ. तनुजा वायले आणि शालिनी वायले यांनी मध्यस्थी करत कर्मचाऱ्यांची बाजू आयुक्तांपुढे मांडली. या आरोग्य कर्मचाऱ्यांचा पगार हा शासनाकडून येत असल्याने विलंब होत असून कर्मचार्यांची अडचण लक्षात घेता महापालिकेच्या वतीने एक महिन्याचे वेतन महापालिका त्वरित देणार असल्याचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी या आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगितले. तर आपण स्वता डॉक्टर असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न आपल्याला कळतात. ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, वसई विरार महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका याठिकाणी एनयुएचएम कर्मचार्यांना महापालिकेतर्फे १५ हजार प्रोत्साहन भत्ता दिला जातो. त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील एनयुएचएम कर्मचार्यांना प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी महासभेत प्रस्ताव मांडणार असल्याचे वायले यांनी सांगितले

‘वी नीड यू’ सोसायटीचे २०२५चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर

‘वी नीड यू’ सोसायटीचे २०२५चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर अनिल ठाणेकर ठाणे: ‘वी नीड यू’ सोसायटीतर्फे समाजात ‘व्रतस्थ वृत्तीने कार्य करणार्‍या व्यक्तींच्या कामास प्रोत्साहन देण्यासाठी व ठाणे शहर आणि जिल्ह्यालगतच्या परिसरात सुरू असलेल्या सामाजिक व शैक्षणिक कामाच्या मागे उभे राहण्यासाठी गेली ८ वर्षे समाजव्रती, शिक्षणव्रती आणि कार्यव्रती हे पुरस्कार दिले जातात. सन २०२५चे हे तिन्ही पुरस्कार संस्थेच्या१५ फेब्रुवारी झालेल्या विश्‍वस्त मंडळाच्या बैठकीत एकमताने देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार समाजव्रती पुरस्कार स्टालिन दयानंद यांना, शिक्षणव्रती पुरस्कार सुनिता भोसले यांना तसेच कार्यव्रती पुरस्कार बाळासाहेब आठरे यांना घोषित झाले आहेत. भांडूप, मुंबई येथे ‘वनशक्ती’ या पर्यावरणवादी संस्थेत धडाडीने काम करणारे ज्येष्ठ कार्यकर्ते दयानंद स्टालिन यांना या वर्षीचा समाजव्रती पुरस्कार मिळाला आहे. मुंबई विद्यापीठातून बी.एससी. आणि एम. बी. ए.चे शिक्षण घेणाऱ्या मुंबई शहर, कोकण किनारपट्टी आणि देशातील अनेक भागात झपाट्याने लुप्त होत असलेली जैवविविधता टिकवण्यासाठी गेली पंचवीस वर्षे व्रतस्थपणे काम केले आहे. २००९मधे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कांजुरमार्गमधील १४० हेक्टर पाणथळ जमिनीवर कचरा डेपो करण्याची परवानगी केंद्राकडे मागितली. स्टालिन यांनी या मागणीला विरोध केला आणि न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने एक केंद्रीय अभ्यासगटाद्वारे अभ्यास करून घेत कचरा डेपो करण्यास परवानगी नाकारली. ही एकच जमीन नव्हे तर मुंबईतील पाणथळ जमिनीवर बिल्डर लॉबीचे अतिक्रमण रोखण्यासाठीही ते सातत्याने कार्यरत असतात. त्यांच्या या कामाने अस्वस्थ झालेल्या काही बिल्डरनी त्यांच्यावर गुंडांकरवी हल्लेही केले आहेत. २०१०मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या खाणींच्या प्रकल्पालाही प्रखरपणे विरोध केला आणि अखेर प्रकल्प रोखण्यात यश मिळवले. खारफुटी वन किंवा कांदळवन टिकवून त्यात वृद्धी करण्यासाठी ते कार्यरत आहेत. केवळ पाचवीपर्यंत शिक्षण घेऊन वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी मानवी हक्क अभियान या संस्थेच्या माध्यमातून समाजकार्यात प्रवेश करणाऱ्या आणि पुढे समाज कार्याबरोबरच समाज शिक्षण, कायदा शिक्षण घेता घेता थेट पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या तसेच शिक्षणाचा गंध नसलेल्या फासेपारधी आणि अन्य भटक्या तसेच आदिवासी समाजात शिक्षणाचे मोल पोहोचवण्यासाठी अथकपणे काम करणाऱ्या, आणि तब्बल १५०हून अधिक विद्यार्थी दत्तक घेतलेल्या सुनिता भोसले यांना या वर्षीचा शिक्षणव्रती पुरस्कार मिळाला आहे. २०१२ साली त्यांनी क्रांती संस्था स्थापन करून या सर्व मुलांची शैक्षणिक प्रगती तपासणे, त्यांचं वह्या, पुस्तके, कपडे आदी गरजा पाहणे, त्यांच्या शालेय शुल्काची व्यवस्था पाहणे, अशी अनेक कामे केलेली आहेत. इतकेच नव्हे तर बालमजुरी रोखणे, बालविवाह रोखणे, त्यासाठी पालकांत जागृती करत राहणे, त्यासाठी बालक पालक संवाद घडवून आणणे, हे काम सुनिता सातत्याने करत आहेत. ‘विंचवाचे तेल’ या आत्मकथनातून त्यांनी फासेपारधी समाजावर होणाऱ्या अन्यायाचा धांडोळा घेतानाच समाजांतर्गत, विशेषतः स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायावर अत्यंत प्रखर प्रकाशझोत टाकलेला आहे. आगामी काळात वंचित, पारधी, भटके आणि आदिवासी समूहातील मुलांसाठी आश्रमशाळा अगर वसतिगृह निर्माण करण्याची त्यांची योजना आहे. तालुका कृषी अधिकारी म्हणून करणाऱ्या बाळासाहेब आठरे यांनी शासकीय सेवेच्या मर्यादा ओलांडून केलेल्या लोकाभिमुख कामाचा गौरव त्यांना कार्यव्रती पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे. पाणलोट क्षेत्र विकास, महिला स्वयंसहायता गट बळकटीकरण, आदिवासी विकास संदर्भातील योजना, शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बीज उपलब्ध व्हावे म्हणून शुद्ध बीजोत्पादन कार्यक्रम, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार विकास योजना अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रम, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, सेंद्रिय शेती उत्पादन कार्यक्रम आदि अनेक कार्यक्रम राबवले आहेत. तसे करताना शेतकऱ्यांची अनोखी शेतीशाळा व घोंगडी बैठक राबवून शेतकरी हितासाठी काम केले आहे. पथनाट्य लेखन, गीतलेखन करून त्यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने व सामाजिक कार्यात सहभाग दिलेला आहे. ठाणे जिल्ह्यातील पालघर या आदिवासी जिल्ह्यातही त्यांनी सामाजिक आणि ग्रामविकास संस्थांबरोबर काम केले आहे. हे पुरस्कार रविवार ८ मार्च सायंकाळी ५.३० वाजता नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महानगरपालिका, ठाणे येथे होणार असून ज्येष्ठ सामाजिक तसेच स्त्रीवादी कार्यकर्त्या शारदा साठे यांच्या हस्ते दिले जाणार आहेत. शिरूर जिल्हा पुणे येथे जीवन विकास मंदिर शाळेचे अध्यक्ष आणि युवक क्रांती दलाचे उपाध्यक्ष रविंद्र धनक यांची यावेळी विशेष उपस्थिती असणार आहे. वी नीड यू सोसायटी ही संस्था १९८६पासून ठाणे व नवी मुंबई परिसरात काम करत आहे. या कामाचा परीघ शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार व प्रबोधन असा आहे. यासाठी बालवाडी, प्राथमिक शिक्षणात उमंग वर्ग, कॉम्प्युटर आधारित गणित शिक्षण, ब्युटीशीयन व शिवण प्रशिक्षण वर्ग चालवले जातात. लोकशिक्षण होण्यासाठी नियमित व्याख्याने, चर्चासत्रे व शिबिरे आदी प्रबोधन कार्यक्रम केले जातात. ठाणे शहर आणि परिसरातील सुजाण नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन वी नीड यू सोसायटीचे अध्यक्ष अतुल गोरे यांनी तसेच सर्व विश्‍वस्त मंडळाने केले आहे.

मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीतील २६५ रहिवाशांना एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप

मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीतील २६५ रहिवाशांना एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप अनिल ठाणेकर ठाणे, मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना हक्काच्या घरात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या रहिवाशांना हक्काच्या घरांच्या चाव्यांचे वाटप आज उपमुख्यमंत्रीच्या हस्ते करण्यात आले. गेली २५ वर्षे जुन्या चिखलवाडीचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित होता. या काळात ३६ विकासकांनी हा पुनर्विकास करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस ३७ वे विकासक म्हणून आलेल्या श्रीपती डेव्हलपर आणि आमदार पराग शहा यांनी मिळून हा प्रकल्प हातात घेऊन पूर्ण केला. अवघ्या २ वर्षात या इमारतींचे काम पूर्ण झाले असून त्यामुळे २६५ रहिवाशांना घर देणे शक्य झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काही रहिवाशांना प्रतिकात्मकरित्या या चाव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार पराग शहा, म्हाडाचे अध्यक्ष संजीव जयस्वाल, मुख्याधिकारी मिलिंद शंभरकर, श्रीपती डेव्हलपर्सचे सतीश चतुर्वेदी, जुनी चिखलवाडी रहिवाशी संघाच्या अध्यक्ष सुरेखा परब, सरचिटणीस चिंतामण दळवी आणि सर्व रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वतःच्या हक्काच्या घरात राहणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते, ते स्वप्न आज जुन्या चिखलवाडीतील रहिवाशांचे पूर्ण होत असल्याचा विशेष आनंद वाटत असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. शासनाने क्लस्टर योजनेला मंजुरी दिली, त्या अंतर्गत देण्यात आलेल्या इन्सेटिव्हचा लाभ रहिवाशांना देण्याचे निर्देश दिले त्यामुळेच १२० चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या लोकांना आता ५८५ स्क्वेअर फुटांचे मोठे असे २ बीएचके घरे देणे शक्य झाले असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. याठिकाणी अतिशय उत्तम घरे विकासकाने दिलेली असून, विक्रीयोग्य घरांच्या एवढीच उत्तम घरे स्थानिक रहिवाशांनाही दिलेली असल्याचे सांगितले. याठिकाणी जिम, लायब्ररी, लग्नाचा हॉल अशा अनेक सुखसोयी देण्यात आल्या आहेत असे सांगितले. मुंबईतील ४० लाख लोकांना घरे देण्याचे स्वप्न स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिले होते. क्लस्टर योजनेला मंजुरी देऊन तेच स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे उपमुख्यमंत्री  शिंदे यांनी सांगितले. या सेस इमारतींप्रमाणे नॉन सेस इमारतींचे क्लस्टर उभारण्याचा देखील प्रयत्न म्हाडाच्या माध्यमातून करण्यात येईल. घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगरचा रखडलेल्या पुनर्विकासाला आम्ही चालना दिली असून १७ हजार घरांचा प्रकल्प तिथे साकारला जात आहे. हा प्रकल्प एसआरए आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून राबवला जात आहे, तर ठाण्यातील क्लस्टर प्रकल्प ठाणे मनपा आणि सिडकोच्या माध्यमातून राबवला जात आहे. याशिवाय मुंबईतील जे प्रकल्प विकासकांनी अर्धवट सोडून दिलेत ते पूर्ण करण्यासाठी म्हाडा, एस आर ए, बी एम सी, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, महाप्रीत अशा प्राधिकरणाच्या माध्यमातून गती देण्यात येणार आहे. जनतेला वेळेत घरे देणाऱ्या विकासकाला फुले तर लोकांना नाडणाऱ्या विकासकाला नारळ देण्यात मी मागेपुढे पाहत नाही असे  शिंदे यांनी स्पष्ट केले. पुनर्विकास प्रकल्प रखडल्यामुळे मुंबईबाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्याचा आमचा प्रयत्न असून त्यासाठीच अशा क्लस्टर योजनांना प्रोत्साहन देत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कोरोना काळात विकासकाना संजीवनी देण्यासाठी ५० टक्के प्रिमियम कमी करण्याचा आणि स्टॅम्प ड्युटी मध्येही ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मुंबईतील विकासकांना आणि घरे घेणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाल्याची आठवण करून दिली.गृहनिर्माण मंत्री झाल्यानंतर आपण अनेक पथदर्शी निर्णय घेतले असून नवीन गृहनिर्माण धोरणाला मंजुरी दिली असल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले. या अंतर्गत नोकरदार, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक, मुंबईचे डबेवाले यांनाही सवलतीच्या दरात घरे देण्याचे निश्चित करण्यात आले असून मुंबईत काम करण्यासाठी येणाऱ्या नोकरदार महिलांसाठी पहिले वसतिगृह ताडदेव येथे उभारण्याला मंजुरी दिली असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.जुनी चिखलवाडीतील रहिवाशांना शिंदेच्या विनंतीवरून मिळणार रंगीत टीव्ही. जुनी चिखलवडीमधील रहिवाशांना नवीन घरे मिळाल्यामुळे त्यांचे गृह स्वप्न पूर्ण झालेच आहे. पण नवीन घरची चावी द्यायला मी आल्याने त्यांना घरासह एखादी भेटवस्तू मिळायला हवी अशी अपेक्षा शिंदे यांनी यावेळी विकासाकडे व्यक्त केली. तसेच नवीन घरासह त्यांना एक टीव्ही देखील द्या अशी आग्रही मागणीच त्यांनी विकासक सतीश चतुर्वेदी यांना केली. अखेर शिंदे यांचा मान राखून चतुर्वेदी यांनी प्रत्येक रहिवाशाला घरासोबतच २४ इंची कलर टीव्ही भेट म्हणून देऊ असे यावेळी कबूल केले.

‘लोकशाही भारत-राष्ट्र की, सनातनी हिंदुराष्ट्र?’ या पुस्तकाचा, ७ मार्च रोजी ठाण्यात प्रकाशन सोहळा

‘लोकशाही भारत-राष्ट्र की, सनातनी हिंदुराष्ट्र?’ या पुस्तकाचा, ७ मार्च रोजी ठाण्यात प्रकाशन सोहळा ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांच्यासह, अनेक दिग्गजांची राहणार उपस्थिती अनिल ठाणेकर ठाणे : ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आनंदा होवाळ यांच्या, “लोकशाही भारत-राष्ट्र की, सनातनी हिंदुराष्ट्र?” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार, ७ मार्चला, ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात संपन्न होणार आहे. ‘इंडियन सोशल मूव्हमेंट’ या संघटनेच्या १९व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संपन्न होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते राजन राजे यांच्यासह, अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. गेली अनेक वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत, त्याचा प्रचार आणि प्रसार करुन बहुजनवर्गात विशेषत: तरुणांमध्ये, संविधान-लोकशाही-समता-बंधुता-राष्ट्रीय एकात्मता यांबाबत जनजागृती करण्याचा वसा, आनंदा होवाळ यांनी अखंडपणे सुरु ठेवलेला आहे. देशातील वाढता जातीयवाद, धर्मविद्वेष याबाबत, आपल्या व्याख्यानांतून भाजप-आरएसएस या धर्मांध संघटनांविरोधात त्यांनी अनेकदा प्रहार केलेला आहे. त्या सर्वांचा उहापोह त्यांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर मांडला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते सद्यस्थितीतील भारतीय राजकारणावर, आनंदा होवाळ यांनी परखड भाष्य केले आहे. दरम्यान, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली असून, त्यांनीदेखील मोदी-शहा यांचे भाजपाई सरकार व धनदांडग्या भांडवलदारी व्यवस्थेविरोधात तसेच, केंद्र सरकारने लादलेल्या चार काळ्या कामगार कायद्याविरोधात, कष्टकरी कामगारवर्गाला गुलामगिरीत ढकलणाऱ्या कंत्राटी पद्धती विरोधात ताशेरे ओढले आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन ‘इंडियन सोशल मूव्हमेंट’च्या अध्यक्षा सविता सोनावणे यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षणतज्ज्ञ अरविंद वैद्य भूषवणार आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. राम पुनयानी, माजी न्यायमूर्ती डॉ. डी.के. सोनावणे, अर्थतज्ज्ञ डॉ. विश्वास उटगी, काँग्रेस प्रवक्ते डॉ. विवेक कोरडे, ॲड. गाथा ढाले आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या या कार्यक्रमाला जास्तीतजास्त लोकशाहीवादी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आनंदा होवाळ यांनी केले आहे.