Category: ठाणे

Thane news

 नगरसेविका नीला सोन्स यांच्याकडून महासभेत प्रश्नांची सरबत्ती

नगरसेविका नीला सोन्स यांच्याकडून महासभेत प्रश्नांची सरबत्ती भाजपला घरचा आहेर मिरा – भाईंदर महानगरपालिकेच्या काल झालेल्या महासभेत अनेक ठराव पास करण्यात आले. मिरा-भाईंदरमधील भाडेतत्त्वावर दिलेल्या खासगी मालमत्तांवर कर आकारणीसंदर्भातील प्रस्ताव भाजपच्या मागणीनुसार महासभेपुढे चर्चेला आला होता. यावेळी नक्की कोणत्या मालमत्तांकडून कर वसूल केला जाणार? त्यावर नियंत्रण कसे ठेवले जाणार? नागरिकांना दिलासा न देता पहिल्याच महासभेत कराचा बोजा टाकणे योग्य आहे का? असे प्रश्न नगरसेविका नीला सोन्स यांनी उपस्थित केले. नवीन घर घेणारे तसेच नवे गाळे घेणारे व्यापारी हे या शहराचे रहिवासी आहेत त्यांच्यावर हा बोजा टाकणे ठीक होणार नाही असे मत त्यांनी मांडले, तसेच या प्रस्तावाच्या बाजूने मतदान न करता तटस्थ राहण्याची भूमिका त्यांनी मांडली. १ एप्रिल २०२६ पासून नवे घर, दुकाने घेण्याऱ्यांवर कराचा बोजा वाढणार आहे. नागरिकांना काही दिलासा मिळणार नाही हे स्पष्ट झाले. बहुमताच्या जोरावर भाजपा नगरसेवकांनी सगळे ठराव पास करून घेतले, नागरिकांसाठी पुढे काही होणार का?  हे येणाऱ्या काळात बघावं लागेल.

दिव्यातील साई सृष्टी हेरिटेज सोसायटीत शिवजयंती उत्साहात साजरी

दिव्यातील साई सृष्टी हेरिटेज सोसायटीत शिवजयंती उत्साहात साजरी दिवा : दिव्यातील साई सृष्टी हेरिटेज नारायण म्हात्रे को-ऑप. हौसिंग सोसायटी, खर्डी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी सन्मानीय नगरसेवक बाबाजी पाटील, नगरसेविका वेदिका साहिल पाटील, माजी नगरसेवक हिरा पाटील, जयंता वालीकर आणि शक्ती पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमात सोसायटीतील लहान मुलांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणे करून उपस्थितांची दाद मिळवली. तसेच सोसायटीतील वरिष्ठ नागरिकांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. सोसायटी कमिटीच्या वतीने मोहन मांडवकर यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमा साठी कार्याध्यक्ष संदीप कोकणे, उपाध्यक्ष चिलवेरी, खजिनदार रितेश मिश्रा तसेच राहुल शर्मा, मोहन मांडवकर, जीत शुक्ला, संजीव नारायणकर, सुशील राजपूत, दुर्गेश आणि सतीश गंगातीवरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश गंगातीवरे यांनी केले. यावेळी सोसायटीचे सेक्रेटरी गौतम कदम यांनी उपस्थित सर्व रहिवाशांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.

राहुल गांधी शनिवारी  भिवंडी न्यायालयात

भिवंडी:  राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेच्या मानहानी प्रकरणी भिवंडी न्यायालयात दाखल याचिकेच्या सुनावणी साठी लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी येत्या शनिवार २१ फेब्रुवारी रोजी भिवंडी न्यायालयात हजर होणार आहेत.२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकी काळात भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथे आयोजित प्रचार सभेत राहुल गांधी यांनी महात्मा गांधी हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक या संघटनेचा हात असल्याचे विधान केले होते.त्याविरोधात  संघटनेचे पदाधिकारी राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात आर एस एस संघटनेची बदनामी झाल्याबद्दल भा.दं.सं.कलम ५०० प्रमाणे खाजगी फिर्याद दाखल केली होती.या प्रकरणात राहुल गांधी यांनी दिलेले जमीनदार माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाल्याने न्यायालयात नवीन जामीनदार सादर करण्यात येणार आहे.त्या साठी राहुल गांधी न्यायालयात येत असल्याची माहिती त्यांचे वकील अँड.नारायण अय्यर यांनी दिली आहे.या प्रकरणात राजेश कुंटे यांची सरतपासणी आणि उलटतपणी झालेली आहे.

भारतरत्न मास्टरब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी आज पत्नी अंजली यांच्यासह नंदनवन निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेऊन मुलगा अर्जुन याच्या विवाहाचे आमंत्रण दिले.

छत्रपतींची ४००वी शिवजयंती वर्ल्डक्लास करणार – फडणवीस

पुणे – छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर साजरी केली…

उल्हासनगरात टँकर पॉईंट येथील पिण्याच्या पाण्याचा गटारीचे चेंबर साफ करण्यासाठी वापर

उल्हासनगरात टँकर पॉईंट येथील पिण्याच्या पाण्याचा गटारीचे चेंबर साफ करण्यासाठी वापर उल्हासनगर : एकीकडे उल्हासनगर शहरात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या नागरिकांना भेडसावत असताना दुसरीकडे टँकर पॉइंट येथील पिण्याच्या पाण्याचा वापर मलनिःसारण सफाईच्या गाडीमधून पिण्याचे पाणी भरून ते चक्क गटारीचे चेंबर साफ करण्यासाठी वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार ॲड प्रशांत चंदनशिव यांनी उघडकीस आणून याबाबत अभियंता पालिका आयुक्त व पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना तक्रार केली आहे. ॲड प्रशांत चंदनशिव यांनी सांगितले उल्हासनगर शहरातील पूर्व परिसरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये दसरा मैदान जवळ टँकर पॉईंट आहे. शहरात ज्या ठिकाणी सुरळीत पाणीपुरवठा होत नाही अशा ठिकाणी या टँकर पॉइंटवरून पिण्याचे पाणी टँकर मध्ये भरून त्या परिसरातील नागरिकांना पुरवले जाते. पण १८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १ च्या सुमारास ॲड प्रशांत चंदनशिव हे त्या ठिकाणाहून जात असताना त्या टँकर पॉईंट इथे मलनिःसारण सफाईची गाडी उभी होती. टँकर पॉईंट वरील पिण्याचे पाणी त्या गाडीत भरत असताना दिसून आले. ते पाणी गटारीचे चेंबर साफ करण्यासाठी वापरले जात असल्याचे त्यांना चौकशीत समजले. एकीकडे शहरात काही परिसरात पाण्याची भीषण टंचाई. तर काही ठिकाणी सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने. तर काही भागात कमी दबावाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे नागरिकांच्या हक्काचे हे टँकर पॉईंट मधील पाणी मलनिःसारण सफाई करण्याकरिता वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार शहरात घडत असताना याकडे संबंधित अधिकाऱ्याचे व पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष केले जात असल्याचे ॲड प्रशांत चंदनशिव यांनी सांगितले या घटनेबाबत ॲड प्रशांत चंदनशिव यांनी तक्रार करण्यासाठी उल्हासनगरातील कॅम्प नंबर ५ येथील उपविभागीय कार्यालय मध्ये गेले असता अभियंता मिरकुटे यांना या घटनेबाबत त्यांनी तक्रार केली. तसेच पालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांना ई-मेल द्वारे तक्रार करून पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना देखील तक्रार केली आहे. आताही अधिकारी मंडळी या घटनेबाबत कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टरबूजावर साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची कोरीव प्रतिकृती

टरबूजावर साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची कोरीव प्रतिकृती कल्याण :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्याण येथील कला शिक्षक यश महाजन यांनी यावर्षी टरबूजावर ब्लेडच्या साहाय्याने महाराजांची आकर्षक कोरीव प्रतिकृती साकारली. ही प्रतिकृती तयार करण्यासाठी त्यांना सुमारे दोन ते अडीच तासांचा कालावधी लागला. दरवर्षी न चुकता महाराजां विषयी चा आपला श्रद्धाभाव व्यक्त करण्यासाठी महाजन विविध माध्यमांचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटत असतात. यामध्ये भाकरी, पिंपळाचे पान, तुळशीचे पान, केळीचे पान, दगड, माती, तांदूळ, खडू वरील कोरीव काम तसेच रांगोळी, पोर्ट्रेट आणि कॅनव्हास पेंटिंग अशा विविध माध्यमांचा समावेश आहे. यंदा त्यांनी टरबूज वर तसेच मोराच्या पंखांवर ही महाराजांची प्रतिकृती साकारत आपल्या कले. द्वारे अभिवादन केले आहे. त्यांच्या या अनोख्या कलाकृतीचे शालेय स्तरावर तसेच परिसरात कौतुक होत आहे. कलेच्या माध्यमातून इतिहासाबद्दल आदर आणि प्रेरणा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा हा उपक्रम स्तुत्य मानला जात आहे.

 सर्वधर्मसमभाव ही शिवाजी महाराजांची शिकवण काँग्रेस पक्ष पुढे नेत आहे – राजकुमार पातकर

सर्वधर्मसमभाव ही शिवाजी महाराजांची शिकवण काँग्रेस पक्ष पुढे नेत आहे – राजकुमार पातकर कल्याणमध्ये कॉंग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन सुराज्य निर्माण केलं. त्यामुळे शिवाजी महाराजांची सर्वधर्मसमभाव हि शिकवण कॉंग्रेस पक्ष पुढे नेत असल्याचे मत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजकुमार पातकर यांनी व्यक्त केले. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, रयतेचे राजे, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी’ तर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा कार्यालयात करण्यात आले यावेळी पातकर बोलत होते. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष राजकुमार पातकर यांच्यासह राजेश वाघमारे, मामा पगारे, सलीम शेख, गोपाळ शर्मा, दशरथ पाटील, अरुण वायले, हाफिज कुरेशी, संकेत लोके, अमोल गायकवाड, शामराव यादव, सुजित सिंह, चंद्रकांत पगारे, हरिश्चंद्र पाटील, जयराज पवार, वैशाली वाघ, किशोर वाघ आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलतांना पातकर यांनी सांगितले कि, शिवाजी महाराज शौर्याचे प्रतीक होते. शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नेहमी होत असते. वर्षाचे 365 दिवस जरी जयंती साजरी केली तरी कमी आहे कारण त्यांचं कार्य तेवढं मोठं आहे. त्यांची जयंती साजरी करणे आपले आद्य कर्तव्य आहे. कल्याणच्या सुभेदारांच्या सुनेचा सन्मान करून स्त्रियांचा आदर करण्याचे शिवाजी महाराजांनी शिकवले. काँग्रेस पक्ष सर्वधर्मसमभाव ही शिवाजी महाराज यांची शिकवण पुढे नेत असल्याचे पातकर यांनी सांगितले.

शुक्रवारपासून रामशेठ ठाकूर मैदानावर रंगणार कबड्डीचा थरार

शुक्रवारपासून रामशेठ ठाकूर मैदानावर रंगणार कबड्डीचा थरार पनवेल : दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्ष निमित्ताने  रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्‌डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उलवेनोडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हास्तरीय प्रौढ महिला आणि पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्‌डी २०२६ स्पर्धेचा उदघाटन सोहळा शुक्रवार दिनांक २० फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार महेश बालदी यांच्या हस्ते होणार आहे. उलवे नोडमधील सेक्टर १२ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल जवळील रामशेठ ठाकूर मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौर प्रमिला पाटील यांची तर  शिव छत्रपती पुरस्कार विजेते प्रमोद म्हात्रे,  शिव छत्रपती पुरस्कार विजेते सुर्यकांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ०६ वाजता पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभाचे अध्यक्ष म्हणून पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी सरकार्यवाह ऍड. आस्वाद पाटील यांची तर अर्जुन पुरस्कार विजेते शकुंतला खटावकर, अर्जुन पुरस्कार विजेते अभिलाषा म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. आगामी राज्यस्तरीय स्पर्धेच्या धर्तीवर जिल्ह्याचा संघ निवड करण्याच्या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत जिल्ह्यातील १९८ पुरुष कबड्डी संघ आणि ३२ महिला संघ सहभागी होणार आहेत. यातून निवड झालेल्या खेळाडूंचा संघ महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये रायगडचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने जवळपास १०० पंच कार्यरत असणार आहेत. सुसज्ज अशी चार क्रीडांगणे त्याचबरोबर मुख्य स्टेज, प्रशस्त प्रेक्षक गॅलरी, प्रथमोपचार केंद्र, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच इतर पूरक सुविधा या ठिकाणी आहे. या स्पर्धेचा कबड्डी रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन  रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हा राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह चित्राताई पाटील,  रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर, उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, स्पर्धा संयोजन समितीचे सचिव शरद कदम यांनी केले आहे.

 साई चौक, सह्याद्री नगर ते कल्याण स्टेशन केडीएमटी बस सेवा सुरु

साई चौक, सह्याद्री नगर ते कल्याण स्टेशन केडीएमटी बस सेवा सुरु शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमांतर्गत बराच काळ बंद असलेली  मार्ग क्र.३ साई चौक-सह्याद्री नगर-कल्याण स्टेशन बससेवा परिवहन कामगार कर्मचारी संघटना अध्यक्ष तथा शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गुरुवारपासून नागरिकांच्या सेवेत पुन्हा सुरू झाली आहे. आज गुरुवारी सकाळी खडकपाडा साई चौक येथे या बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. जेष्ठ नागरिकांच्याहस्ते नारळ फोडून या बसला भगवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, उपशहर प्रमुख सुनील वायले, नगरसेवक किरण भांगले, रुपेश सकपाळ, नगरसेविका शालिनी वायले, प्रमिला पाटील, तनुजा वायले, युवासेना कल्याण उपशहर प्रमुख अनिरुद्ध पाटील, प्रथमेश पाटील आदी पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, महिला, स्थानिक नागरिक, परिवहन सेवेचे अधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. साई चौक, सह्याद्री नगर ते कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन हे अंतर ४ किलोमीटर असून या मार्गासाठी नागरिकांना २५ ते ३० रुपये भाडं रिक्षाला मोजावे लागत होते. मात्र आता केडीएमटीच्या बससेवेमुळे नागरिकांना अवघ्या १० रुपयांत स्टेशनपर्यंत जाता येणार आहे. नागरिकांच्या मागणीनुसार आणि शिवसेनेच्या पाठपुराव्याने हि बससेवा पुन्हा सुरु करण्यात आली असून या बसचा मार्ग साई चौक-साईबाबा मंदिर-ब वार्ड-संघवी इस्टेट-इंदिरा बंगला-आरटीओ-सह्याद्री नगर-कोकण वसाहत-सह्याद्री नगर फाटा-बिर्ला कॉलेज-इंदिरा नगर-भवानी चौक,प्रेम ऑटो-पौर्णिमा चौक-सिंडिकेट-स्टेट बँक-बाईचा पुतळा-रामबाग-कल्याण स्टेशन या महत्त्वाच्या ठिकाणांमार्गे धावणार असल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली.