Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

फेस्कॉमची मुंबई महापौर रितू तावडेसोबत सदिच्छा भेट

फेस्कॉमची मुंबई महापौर रितू तावडेसोबत सदिच्छा भेट महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) अध्यक्ष आण्णासाहेब टेकाळे,  मुंबई विभाग अध्यक्ष सुरेश पोटे व सदस्य दिलीप धारकर यांनी नवनिर्वाचित महापौर  रितू तावडे यांची सदिच्छा भेट घेतली व ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या तसेच ज्येष्ठ नागरिक धोरण २०१३ व १८ बाबत कल्पना दिली मुंबई मधील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्या बाबत मा महापौर रितू तावडे यांनी सकारात्म प्रतीसाद दिला व लवकरच मिटिंग घेणे बाबत सूचना दिल्या, ज्येष्ठाचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले त्या बद्दल आम्ही आभार व्यक्त केले.

मानसिक आरोग्य जपण्यासाठी अध्यात्म आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करणे ही काळाची गरज – गौरांग दास

मानसिक आरोग्य जपण्यासाठी अध्यात्म आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करणे ही काळाची गरज – गौरांग दास अनिल ठाणेकर ठाणे : आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे मानसिक तणाव मोठ्या प्रमाणात वाढला असून जगभरात मानसिक तणावामुळे दरवर्षी सुमारे एक ट्रिलियन डॉलरचे आर्थिक नुकसान होत आहे. धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात वाढता मानसिक तणाव ही जागतिक समस्या बनली आहे.  भारतातही आत्महत्यांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून मानसिक आरोग्य हा अत्यंत गंभीर विषय बनला आहे. शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्य जपण्यासाठी अध्यात्म आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करणे काळाची गरज असल्याचे मार्गदर्शन इस्कॉनचे आध्यात्मिक नेते आणि गोवर्धन इकोव्हिलेजचे संचालक गौरांग दास यांनी ‘तणावमुक्ती आण‍ि आनंदी जीवनाची गुरूकिल्ली’ या महत्वपूर्ण विषयावर केले. ठाणे महानगरपालिका आणि इस्कॉन ठाणे यांच्यावतीने ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी  यांच्यासाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन गुरूवारी (१२ फेब्रुवारी) डॉ. काश‍िनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास ठाणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, उमेश बिरारी, दिनेश तायडे, अनघा कदम, मिताली संचेती, दिपक झिंजाड यांच्यासह सर्व सहायक आयुक्त, महानगरपालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौर शर्मिला पिंपळोलकर,आुयक्त सौरभ राव यांच्या हस्ते गौरांग दास यांचा सन्मान करण्यात करण्यात आला.आज प्रत्येक व्यक्ती हा तणावातून जात आहे, मग तो  विद्यार्थी असो, गृहिणी असो की, नोकरदार वर्ग असो, प्रत्येकाला काही ना काही चिंता असते. यातून मार्ग काढणे गरजेचे असते. खरं आनंदी जीवन जगण्यासाठी संतुलन, समाधान आणि सकारात्मकतेची गरज भासत असल्याचे नमूद करीत महापालिकेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे कौतुक महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले.प्रत्येक क्षेत्रात काम करत असताना अडचणी येत असतात, त्यामुळे तणाव  निर्माण होत असतो, दोष व्यवस्थेचा नसतो तर आपण कशा पध्दतीने प्रतिक्रिया देतो, येणाऱ्या आव्हानांना कसे सामोरे जातो हे महत्वाचे असते. धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला तणावमुक्त जीवन जगता यावे, तणावमुक्ती का आवश्यक आहे.संतुलित जीवनाचे नेमके सूत्र कसे अवलंबावे यासाठी इस्कॉनने ठाणे महापालिकेच्या अध‍िकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयुक्त सौरभ राव यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी भगवद्गीतेतील शिकवणीचा संदर्भ देत तणावाचे मूळ कारण अपेक्षा आणि वास्तव यांतील अंतर आहे. “आपण सर्वजण सत्ता, पैसा, प्रतिष्ठा मिळविण्याचा प्रयत्न करतो; पण परिणाम आपल्या हातात नसतो. आपल्या हातात केवळ प्रयत्न असतात, परिणामावर नियंत्रण नसते, ही जाणीव तणावमुक्तीची पहिली पायरी आहे,” असे गौरांग दास यांनी नमूद केले.जीवनातील स्पर्धा, बढती, यश-अपयश यामुळे निर्माण होणारा ताण वाढतो, अपेक्षा पूर्ण न झाल्यास मनावर ताण वाढतो आणि त्याचे परिणाम मानसिक आरोग्यावर होतात, असे सांगून भगवद्गीतेच्या मार्गदर्शनाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.  सन्मान, सेवा आणि सामूहिक शक्तीचा स्वीकार हे तणावमुक्त जीवनाचे महत्त्वाचे घटक असल्याचे सांगण्यात आले. “आपल्यापेक्षा मोठी शक्ती कार्यरत आहे, ही जाणीव ठेवून नम्रता आणि सेवा वृत्ती स्वीकारली तर मन शांत राहते,” असे मार्गदर्शन करण्यात आले. ‘चिंता सोडा आणि जगायला शिका’  (‘Stop Worrying and Start Living’ ) हा मंत्र दिला. बाह्य परिस्थितीवर आपले नियंत्रण नसले तरी, आपल्या जाणीवा आणि विचारांवर आपण ताबा मिळवू शकतो असे गौरांग दास यांनी नमूद केले. ठाणे महानगरपालिकेने इस्कॉनच्या सहकार्याने अशा प्रकारच्या व्याख्यानाचे आयोजन केल्याबद्दल महापालिका अधिकाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.

सनियंत्रण समिती बरखास्त करण्याची स्थानिकांची मागणी

सनियंत्रण समिती बरखास्त करण्याची स्थानिकांची मागणी मुकुंद रांजाणे माथेरान: माथेरान मधील हातरीक्षा ओढण्याची अमानवीय प्रथा पूर्णपणे बंद करून या श्रमिकांना एकूण ९४ पर्यावरण पूरक ई रिक्षा देण्यात याव्यात यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले असताना देखील सनियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हे आदेश धुडकावून लावले असून फक्त २० ई रिक्षा देण्यात येतील असा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी सनियंत्रण समितीचे अध्यक्ष के. पी. बक्षी, सचिव तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली यामध्ये आणखीन फक्त वीस ई रिक्षांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यातील १३ ई रिक्षा प्रशासन खरेदी करणार असून सात ई रिक्षा नगरपरिषदेने उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश बैठकीत देण्यात आले आहेत.त्याबाबतची अंमलबजावणी केव्हा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सध्या वीस ई रिक्षा सुरू असल्या तरी त्यासुध्दा वाढत्या पर्यटनामुळे खूपच कमी पडत आहेत.त्यामुळे उर्वरित ५४ हातरीक्षा चालकांच्या वाट्याला पुन्हा एकदा ही अमानवीय प्रथा नशिबी असणार आहे. सनियंत्रण समितीने घेतलेल्या या निर्णयामुळे ही समिती ज्यांना या गावाविषयी सहानुभूती नाही,इथले पर्यटन बहरावे,स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याबाबत काहीएक देणेघेणे नसल्याने ही समितीच बरखास्त करून टाकावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. ———————————— सनियंत्रण समितीच्या झालेल्या बैठकीत प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत काही निमंत्रित पदाधिकारी,पर्यावरण क्षेत्रात काम करणारे काही सामाजिक कार्यकर्ते आणि रिक्षा संघटनेचे काही सदस्य उपस्थित होते.या प्रतिनिधींना बैठकीत चर्चा करण्याची कोणतीही संधी दिली नाही.या समितीने सुप्रीम कोर्टाचे आदेश धुडकावल्याने ई रिक्षा वाढीसंदर्भात प्रश्न पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ———————– महाराष्ट्रातुनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातुन याठिकाणी मोठया प्रमाणावर पर्यटक येत असतात.स्वातंत्र्य पूर्वकाळापासून इथे हातरीक्षा ओढण्याची अमानवीय प्रथा सुरू आहे.ही प्रथा बंद करण्यासाठी स्थानिकांनी थेट न्यायालयात धाव घेतली होती.त्यानंतर ई रिक्षाचा प्रायोगिक तत्वावरील प्रयोग यशस्वी झाल्याचा अहवाल आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने  ६ फेब्रुवारी पर्यंत ७४ हातरीक्षा बंद करून चालकांचे ई रिक्षा द्वारे पुनर्वसन करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते.ही मुदत संपून गेल्यावर आंदोलन सुध्दा करण्यात आले त्यानंतर प्रशासनाने १२ फेब्रुवारी पर्यंतची मुदतवाढ मागवून घेतली होती.

 रक्तदानातील उत्कृष्ट कार्यासाठी मुंबई विद्यापीठातर्फे एसएसटी महाविद्यालयाचा गौरव

रक्तदानातील उत्कृष्ट कार्यासाठी मुंबई विद्यापीठातर्फे एसएसटी महाविद्यालयाचा गौरव कल्याण : सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या एस.एस.टी. कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटचा मुंबई विद्यापीठातर्फे प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. रक्तदान शिबिरांच्या यशस्वी आयोजनाबरोबरच जनजागृतीत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची ही दखल आहे. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी भवन येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात विद्यापीठाच्या एनएसएस सेलचे ओएसडी प्रा.सुशील शिंदे, कार्यक्रम अधिकारी रमेश देवकर तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत महाविद्यालयाचा सन्मान करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा एनएसएसचे ठाणे जिल्हा समन्वयक प्रा.जीवन विचारे आणि एनएसएस स्वयंसेवक उपस्थित होते. एस.एस.टी. महाविद्यालयाने रक्तदान शिबिरांसाठी व्यापक जनजागृती करत विद्यार्थ्यांमध्ये व नागरिकांमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजवले. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून रक्तदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करून प्रत्यक्ष शिबिरांचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संस्थापक प्राचार्य डॉ. पुरस्वानी यांनी सांगितले की, एस.एस.टी. महाविद्यालय सामाजिक जबाबदारी जपत रक्तदानाबरोबरच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बालके, समाजातील उपेक्षित घटक आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रातही सातत्याने कार्यरत आहे. भविष्यातही विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत समाजासाठी कटिबद्ध राहण्याचा महाविद्यालयाचा निर्धार आहे.

 मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग कधी पूर्ण होणार? – वर्षा गायकवाड

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग कधी पूर्ण होणार? – वर्षा गायकवाड मुंबईला देशातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना विलंब का? नवी दिल्ली : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु होऊन १५ वर्षे झाली तरी अद्याप हा महामार्ग पूर्ण झालेला नाही. भाजपा सरकार केवळ मोठमोठ्या घोषणा करते पण कोणताच प्रकल्प पुर्ण करत नाही व जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत आहे. एक महामार्ग बनवण्यास एवढी वर्षे लावून सरकार कंत्राटदारांचे खिसे भरत आहेत का? असा प्रश्न काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी लोकसभेत विचारला आहे. मुंबईला देशातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या महामार्गावर खासदार वर्षा गायकवाड यांनी लोकसभेत प्रश्न विचारले. खासदार वर्षा गायकवाड यांनी आपल्या प्रश्नात असे विचारले आहे की, दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) मुंबईला दिल्ली, नगर, पुणे आणि गोवा यासारख्या प्रमुख शहरांशी जोडणाऱ्या या प्रकल्पांमध्ये वारंवार विलंब होत असून खर्च वाढत आहे. हे प्रकल्प कधी पूर्ण होणार याबाबत सरकारकडे काही निश्चित रोडमॅप आहे का, या प्रकल्पांना होत असलेल्या विलंबामुळे मुंबई महानगर प्रदेशातील मालवाहतूक, बंदर कनेक्टिव्हिटी आणि दैनंदिन प्रवाशांवर परिणाम झाला आहे का, आणि मुंबईला इतर प्रमुख शहरांशी जोडणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) प्रकल्पांची जबाबदारी, गुणवत्ता मानके आणि जलद पूर्णता सुनिश्चित करण्यासाठी कोणती सुधारात्मक पावले उचलली जात आहेत? असे प्रश्न खासदार वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केले. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना आपल्या उत्तरात असे म्हटले आहे की, मुंबई (पनवेल) ते गोवा/महाराष्ट्र सीमेपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग (एनएच) क्रमांक ६६ ची लांबी अंदाजे ४८५ किमी आहे. या राष्ट्रीय महामार्गाला चारपदरी मार्गाच्या कामास डिसेंबर २०११ मध्ये सुरूवात झाली असून १२ प्रकल्प पॅकेजेसमध्ये टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले व आजपर्यंत, ४६५ किमीचे चार पदरी काम पूर्ण झाले आहे आणि उर्वरित २० किमी अंतरावरील काम सुरू असून जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. जमिनीची अडचण, मंजुरींना होणारा विलंब आणि काही कंत्राटदारांच्या संथ प्रगतीमुळे प्रकल्पाला विलंब झाला आहे. समृद्धी महामार्ग महाराष्ट्र राज्य सरकारने विकसित केला आहे, हा द्रुतगती महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.मुंबईला जोडणाऱ्या सर्व प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारांसह सर्व भागधारकांसोबत नियमित बैठका घेतल्या जातात जेणेकरून प्रगतीला गती मिळेल आणि सर्व प्रकल्प लवकर पूर्ण करता येतील. दिल्ली-मुंबई प्रकल्पाची एकूण लांबी सुमारे १३५० किमी असून, भूसंपादन, वृक्षतोडीच्या परवानग्यांमध्ये विलंब होत आहे. काही पॅकेजेसना युटिलिटीजच्या स्थलांतरातील विलंब आणि सवलतीधारक डिफॉल्टशी संबंधित समस्यांमुळे विलंब झाला आहे. आतापर्यंत, अंमलबजावणीचा खर्च एकूण कॉरिडॉरच्या मंजूर खर्चाच्या आत आहे. एक्सप्रेसवेचा सुमारे ८७५ किलोमीटरचा भाग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. शिवाय, गुजरातमध्ये तीन प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहेत, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NAI) वरील काम वगळता, जे २०२७-२८ आर्थिक वर्षात पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. दिल्ली ते वडोदरा विभागासाठी मे २०२६ आणि वडोदरा ते मुंबई विभागासाठी जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

  दुबईत दिव्यातील एस.एम.जी. ग्रुप ऑफ स्कूल्सचा सन्मान

दुबईत दिव्यातील एस.एम.जी. ग्रुप ऑफ स्कूल्सचा सन्मान बालविकास क्षेत्रातील कार्याची आंतरराष्ट्रीय दखल दिवा : Early Childhood Development Forum यांच्या वतीने दुबई येथील ग्लेंडल इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित विशेष समारंभात दिवा शहरातील एस.एम.जी. ग्रुप ऑफ स्कूल्सचा सन्मान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात विशेषतः बालविकास आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात आला. या समारंभात एस.एम.जी. ग्रुप ऑफ स्कूल्सचे सचिव स्वप्निल मारुती गायकर आणि विश्वस्त प्रणाल मारुती गायकर यांनी सन्मान स्वीकारला. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे आणि शिक्षण क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानामुळे संस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळत आहे. एस.एम.जी. ग्रुप ऑफ स्कूल्सने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक शैक्षणिक पद्धती, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि बालकेंद्रित उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. या आंतरराष्ट्रीय सन्मानामुळे दिवा शहराच्या शैक्षणिक क्षेत्राचीही प्रतिष्ठा उंचावली आहे. या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

  नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ६०० कोटींचा प्रारूप आराखडा

नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ६०० कोटींचा प्रारूप आराखडा राज्य नियोजन समितीची झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्याच्या वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ च्या प्रारूप आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी सुमारे ६०० कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा पालकमंत्री नितेश राणे यांनी सादर केला. जिल्ह्यात सध्या सुरू असलेली कामे, तसेच आगामी काळात प्रस्तावित विविध विकास प्रकल्पांची सविस्तर माहिती यावेळी मांडण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या विकासाच्या गरजा लक्षात घेता पायाभूत सुविधा, पर्यटनविकास, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण भागातील रस्ते व जलसंधारण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी जिल्हा नियोजन निधीत भरीव तरतूद करण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री राणे यांनी केली. प्रस्तावित निधीमुळे जिल्ह्यातील प्रलंबित कामांना गती मिळून सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या बैठकीस मंत्री उदयजी सामंत, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिषजी जैसवाल, आमदार दीपकजी केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र खेबूडकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गर्दीच्या वेळी जलद गाड्यांना मुंब्र्यात थांबा द्यावा – मनोज प्रधान

गर्दीच्या वेळी जलद गाड्यांना मुंब्र्यात थांबा द्यावा – मनोज प्रधान अनिल ठाणेकर ठाणे : गर्दीच्या वेळी धिम्या लोकलची संख्या न वाढविल्याने  गर्दी वाढत आहे. परिणामी रेल्वेतून पडून प्रवाशांचे दुर्देवी मृत्यू होत आहेत. त्यामुळे नवीन रेल्वे मार्गिकांवरही गर्दीच्या वेळेत धिम्या लोकलच्या चालवाव्यात, तसेच, दहावी , बारावी परीक्षार्थींसाठी लोकलचा एक डबा राखीव ठेवावा, आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने रेल्वे प्रबंधक कार्यालयावर धडक दिली. दरम्यान, रेल्वे अपघात रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,  असा इशारा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिला. १० फेब्रुवारी २०२६ रोजी, बारावीचा पहिला पेपर देण्यासाठी निघालेल्या सोहम कटरे या विद्यार्थ्याचा दिवा-मुंब्रा दरम्यान गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू झाला. या वाढत्या गर्दीला सामावून घेण्याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढीस लागले आहेत, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे प्रबंधक कार्यालयावर धडक देण्यात आली. या प्रसंगी स्टेशन प्रबंधक अपर्णा देवधर यांच्याशी झालेल्या चर्चेत मनोज प्रधान, नगरसेवक सुधीर भगत, नगरसेविका दिपाली भगत,  मनिषा भगत  यांनी रेल्वे प्रवाशांच्या समस्या मांडल्या. या समस्यांवर मार्ग काढण्याचे आश्वासन देवधर यांनी दिले. दरम्यान, सोहम कटरे या मुलाचा मृत्यू वाढत्या गर्दीमुळे झाला असल्याने ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी धिम्या रेल्वे गाड्यांची संख्या वाढवावी; पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांची निर्मिती केल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेवर धिम्या रेल्वेगाड्या चालविणे गरजेचे असताना त्यावर जलद गाड्या सोडण्यात येत आहेत. परिणामी, कोपर, ठाकूर्ली, दिवा, मुंब्रा आणि कळवा या स्थानकांवरील गर्दी वाढत असते. त्यामुळे तिसऱ्या (अप)  व चौथ्या (डाऊन)  मार्गिकेवर गर्दीच्या वेळात ( अनुक्रमे सकाळी सात ते अकरा आणि सायंकाळी पाच ते रात्रौ नऊ ) धिम्या गाड्या चालवाव्यात;  पंधरा डब्यांच्या लोकल चालविण्याऐवजी एसी लोकलची संख्या कमी करून धिम्या लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात;  दिवा स्टेशनवरील होम प्लॅटफॉर्मवरून लोकल सुरू करावी आणि  मुंब्रा येथून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने शक्य असल्यास मुंब्रा ते छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनस लोकल सुरू करावी आदी मागण्यांचे स्टेशन प्रबंधक अपर्णा देवधर यांना  निवेदन देण्यात आले. हे निवेदन पुढे वर्ग करण्याबाबतही स्टेशन प्रबंधक देवधर यांनी शिष्टमंडळास सांगितले.पत्रकारांशी संवाद साधताना मनोज प्रधान यांनी,  मध्य रेल्वेवर वर्षाकाठी २१८० अपघाती मृत्यू होत आहेत. ठाणे स्टेशन परिसरात वर्षाला २८7 अपघात होत आहेत. म्हणजेच दररोज सरासरी सात मृत्यू होत आहेत. हे मृत्यू फक्त गर्दीमुळे होत आहेत. एसी ट्रेनची गरज असली तरी सलग एसी ट्रेन न चालविता दोन एसी ट्रेनदरम्यान दोन ते तीन साध्या लोकल सोडणे गरजेचे आहे. जेणेकरून गर्दीचा निचरा होणे सोयीचे होणार आहे.  मुंब्रा स्टेशन येथे कौसा, शिळपासूनचे लोक येत आहेत. तेथेही होम प्लॅटफाॅर्मची गरज आहे, असे सांगितले. तसेच, आगामी काळात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची वेळ गर्दीच्या काळातील नसावी, यासाठी विनंती शिक्षण खात्याला करणार असून परिक्षार्थींसाठी एक डबा राखीव ठेवण्यासाठीही रेल्वेकडे आपण मागणी केली असल्याचेही मनोज प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर,  वाढती गर्दी आटोक्यात आणण्यासाठी तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेवर स्लो लोकल चालविणे गरजेचे आहे, असे सुधीर भगत यांनी सांगितले. या वेळी  नगरसेविका दिपाली भगत, महिला कार्याध्यक्षा साबिया मेमन, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम ,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मकसूद खान , जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साटम , मेहरबानो पटेल , गजानन चौधरी, ज्योती निबार्गी, शशिकला पुजारी, राजु चापले,विष्णू माने , जगत सिंग,  सुनील तिवारी , साहिल उदुगडे , श्रीकांत बर्वे, वनिता भोर, दिलीप नाईक, पद्माकर पाटील, शिवा कालू सिंह, रुबीना शेख, दिपा गावंड, बबन सांगळे, नथु चव्हाण, रेश्मा भानुशाली, निलेश जाधव, पुजा जाधव, चंद्रकांत गायकवाड, मेघराज पांडे, मंदार गांगळ, धर्मेंद्र अस्थाना, सायना आझमी, हाजी बेगम शेख आदी उपस्थित होते.

परभणी महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचा मुस्लीम महापौर

परभणी महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचा मुस्लीम महापौर परभणी : परभणी महानगरपालिकेच्या महापौरपदी अखेर काँग्रेसच्या मदतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मुस्लिम महापौर विराजमान झाला. आज पार पडलेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सय्यद इकबाल सय्यद…

उच्च न्यायालयाचे मल्याला अल्टीमेटम

उच्च न्यायालयाचे मल्याला अल्टीमेटम मुंबई : भ्रष्ट्राचाराचे आरोप असणाऱ्या विजय मल्याला आज मुंबई हायकोर्टाने भारतात परतण्यासाठी शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. विजय मल्या याने भारतात येऊन कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारे प्रकरण चालवावे, असे नमूद करून तो भारतात येणार की नाही हे स्पष्ट करण्यासाठी उच्च न्यायालयाने गुरुवारी त्याला शेवटची संधी दिली. मध्यसम्राट मल्या हा त्याच्याविरोधात सुरू केलेल्या कार्यवाहीपासून पळ काढून दिलासा मागू शकत नाहीत, असेही मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालीला खंडपीठाने मल्या याला उपरोक्त इशारा देताना स्पष्ट केले. भारतात कधी परतणार किंवा भारतात परणार आहात की नाही ? याबाबत मल्याला प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश याआधी न्यायालयाने दिले होते. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने पुन्हा एकदा मल्याला तो भारतात आल्यावरच त्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले. मल्ल्याला फरारी घोषित केल्यानंतर आणि लंडनमध्ये प्रत्यार्पणाची कार्यवाही प्रगतीपथावर असतानाच त्याने एफईओएला आव्हान दिल्याचा युक्तिवाद केंद्र सरकारच्या वतीने महाअभिकर्ता तुषार मेहता यांनी केला. दुसरीकडे, कायद्याचे स्वरूप पाहता, मल्या हा प्रत्यक्ष भारतात परतल्याशिवाय त्याची बाजू ऐकली जाऊ शकते, असा दावा त्याच्या वतीने वरिष्ठ वकील अमित देसाई यांनी केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद थोडक्यात ऐकल्यानंतर मल्या हा परत येण्यास इच्छुक नाही असे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करू शकतो. परंतु, त्यला फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्याला आव्हान द्यायचे असल्यास भारतीय न्यायक्षेत्रात यावेच लागेल, असेही न्यायालयाने मल्याला भारतात परत येणार की नाही याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची शेवटची संधी देताना स्पष्ट केले.