Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

“घुसखोर पंडित” वेबसिरीज विरोधात महाराष्ट्र करणी सेनेची पोलिसांत धाव

“घुसखोर पंडित” वेबसिरीज विरोधात महाराष्ट्र करणी सेनेची पोलिसांत धाव रमेश औताडे मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रसारित होत असलेल्या ‘घुसखोर पंडित’ या वेब सिरीजमुळे ब्राह्मण समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत महाराष्ट्र करणी सेनेने खांदेश्वर पोलिस ठाणे, नवी मुंबई येथे तक्रार दाखल केली आहे. या वेब सिरीजचे शीर्षक व कथानक समाजात द्वेष आणि तेढ निर्माण करणारे असल्याचा दावा संघटनेने केला आहे. महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ घुसखोर पंडित ” हे नाव ब्राह्मण समाजाचा अपमान करणारे असून हिंदू धर्मासाठी पूज्य मानल्या जाणाऱ्या ब्राह्मण समुदायाची अवहेलना करण्याचा प्रयत्न यातून होत आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक धार्मिक विधी ब्राह्मणांद्वारे पार पाडले जातात आणि त्यामुळे ब्राह्मण जातीचा अपमान म्हणजे संपूर्ण हिंदू धर्माचा अपमान असल्याचे त्यांनी सांगितले. या वेब सिरीजमुळे ब्राह्मण समाजासह विविध हिंदू संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, सामाजिक शांतता बिघडण्याची शक्यता निर्माण झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. संबंधित वेब सिरीज समाजात द्वेष, असंतोष आणि धार्मिक तेढ वाढवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला असल्याचे सेंगर यांनी सांगितले. या प्रकरणी वेब सिरीजचे दिग्दर्शक मनोज बाजपेयी तसेच संबंधित निर्मात्यांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १९६, २९९, ३५२, ३५३ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र करणी सेनेने केली आहे. पोलिसांनी तक्रार स्वीकारून पुढील तपास सुरू करावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

  रस्त्यावर खायला टाकणाऱ्या प्राणीमित्रांवर बंदी

रस्त्यावर खायला टाकणाऱ्या प्राणीमित्रांवर बंदी विशिष्ट ठिकाणी भटक्या श्वानांना मिळणार मेजवानी मिरा -भाईंदर: नागरिकांकडून अनेकदा मुक्या प्राण्यांना भररस्त्यात अन्न टाकले जाते. यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने उघड्यावर खाद्यपदार्थ टाकण्यास सगळ्यांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र असे करतानाच भटक्या कुत्र्यांची उपासमार होऊ नये याकरता महापालिकेने शहरात २० ठिकाणी फिडिंग स्पॉट तयार केले असून या ठिकाणी येऊन श्वानांना यतेच्छ ताव मारावा लागणार आहे. न्यायालयाने नोव्हेंबर २०२५ मध्ये मोकळ्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खाद्यपदार्थ देणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तसेच महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींनी भटक्या कुत्र्यांसाठी जागा निश्चित करून त्या ठिकाणी पाणपोई व फिडिंग स्पॉट तयार करण्याचे आदेश दिले होते. परिपत्रक राज्य शासनाकडून काढण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांनंतर मिरा- भाईंदर महापालिकेकडून भाईंदर पूर्वेत १, पश्चिमेत ७ व मीरा रोडमध्ये १३ फिडिंग स्पॉट तयार करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी दिली आहे. प्राणीमित्र रस्त्यावर तसेच मोकळ्या ठिकाणी या भटक्या कुत्र्यांना खायला टाकतात. एकाच ठिकाणी खाद्यपदार्थ मिळत असल्याने भटके कुत्रे त्या ठिकाणी टोळी बनवतात. परिणामी रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांवर भुंकणे आणि हल्ला केल्याच्या घटना घडतात. याला आळा घालण्यासाठी, नागरिकांची सुरक्षा व प्राणी मित्रांना शिस्त लावल्यासाठी महापालिकेकडून हे फिडिंग स्पॉट तयार करण्यात आले असून त्याबाबत जनजागृती करणे सुरू असल्याची माहिती महापालिकेने दिली. फिडिंग स्पॉटसाठी केलेला खर्च वाया जाऊ नये यासाठी भटक्या प्राण्यांसाठी निश्चित केलेल्या ठिकाणांवर प्राणीमित्रांनी खाद्यपदार्थ टाकण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या फिडिंग स्पॉटला उत्तम प्रतिसाद मिळाल्यास आवश्यकतेनुसार ठिकाणे वाढवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी दिली.

  कुंभमेळ्यासाठी नाशिक होणार प्रकाशमान!

कुंभमेळ्यासाठी नाशिक होणार प्रकाशमान! सिन्नरच्या बंद वीज प्रकल्पातून पुन्हा सुरू होणार वीज निर्मिती हरिभाऊ लाखे नाशिक – सिन्नर येथील खासगी औष्णिक वीज प्रकल्प सर्वाधिक बोली लावून ताब्यात घेतल्यानंतर महाजनकोने आता २७० मेगावॉट वीज निर्मिती क्षमतेची दोन संयंत्रे पुन्हा सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. या माध्यमातून सुरुवातीला ५२० मेगावॉट इतकी वीज निर्मिती होईल. सिंहस्थ कुंभमेळ्यात विजेची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी ही वीज निर्मिती महत्वाची ठरणार आहे. सि्न्नर तालुक्यातील हा औष्णिक वीज प्रकल्प पूर्वी बहुचर्चित इंडिया बुल्स कंपनीचा होता. विभाजनानंतर तो रतन इंडिया पॉवर कंपनीकडे गेला. १३५० मेगावॉट क्षमतेचा हा प्रकल्प आहे. पहिल्या टप्प्याचे बांधकाम झाल्यानंतर थकबाकी न भरल्यामुळे दिवाळखोरीत निघाला. लिलाव प्रक्रियेत महाराष्ट्र सरकारच्या मालकीची वीज निर्मिती कंपनी महाजनको आणि सार्वजनिक क्षेत्रातील नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनने (एनटीपीसी) यांनी एकत्रितपणे ३८०० रुपयांची सर्वाधिक बोली लावली. फेब्रुवारी अखेरपर्यंत या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण होऊन प्रकल्पावर पूर्णत: नियंत्रण मिळणार आहे. या माध्यमातून रतन पॉवरच्या प्रकल्पाचा हिश्याचा भाग आणि ‘नॉन प्रोसेसिंग क्षेत्र’ ताब्यात येईल. या भागातील उर्वरित मोकळ्या जागेशी महाजनकोचा कुठलाही संबंध नसल्याचे सांगितले जाते. आता महाजनकोने बंद पडलेला औष्णिक वीज प्रकल्प नव्याने सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. सिन्नर येथील हा प्रकल्प १३५० मेगावॉट क्षमतेचा आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येकी २७० मेगावॉटचे दोन संयंत्र (युनिट) सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. हे काम पुढील सहा ते आठ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे महाजनकोचे संचालक (प्रकल्प) अतुल सोनजे यांनी सांगितले. नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी नाशिकला वीज पुरवठ्याचा एक शाश्वत स्त्रोत उपलब्ध करून देणे हे महाजनकोचे मुख्य उद्दिष्ट आहे. एक मार्चपासून सिन्नर येथील प्रकल्पावर कर्मचारी नियुक्ती आणि इतर प्राथमिक कामांना वेगाने सुरुवात होणार असल्याचे सोनजे यांनी नमूद केले. तूर्तास रस्ते मार्गाने कोळसा वाहतूक सिन्नरचा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी कोळसा वाहतुकीसाठी एकलहरे ते सिन्नर असा रेल्वे मार्ग टाकण्यासाठी महाजनकोने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. जोपर्यंत रेल्वे मार्ग तयार होत नाही, तोपर्यंत एकलहरे येथील प्रकल्पात कोळसा उतरवला जाईल.आणि तेथून रस्ते मार्गाने तो सिन्नरला नेला जाणार आहे. प्रारंभी कार्यान्वित केल्या जाणाऱ्या दोन संयंत्रांसाठी दररोज आठ हजार टन कोळसा लागणार आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रेल्वे मार्गातील काही क्षेत्राचे भूसंपादन होणे बाकी आहे. रेल्वेमार्ग कार्यान्वित झाल्यानंतर सिन्नरचा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे सुलभ होणार असल्याचे सांगितले जाते.

 घंटागाडी चालकांचा थकीत पगार त्वरित अदा करा

घंटागाडी चालकांचा थकीत पगार त्वरित अदा करा महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनची मागणी कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत घंटागाडीवर कार्यरत असलेल्या चालकांचा थकीत पगार त्वरित अदा करण्याची मागणी महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनने केली असून याबाबत त्यांनी केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी थविल यांची भेट घेतली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत घंटागाडीवर कार्यरत असलेले ठोक पगारी जड वाहन चालक नियमितपणे आपले काम पार पाडत असतानाही त्यांचा १५ डिसेंबर पासून अद्यापपर्यंतचा पगार अदा करण्यात आलेला नाही. त्यामुळे संबंधित कामगारांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत तातडीने दखल घेऊन संबंधित ठोक पगारी जड वाहन चालकांचा थकीत पगार त्वरित अदा करण्याची व्यवस्था करावी. तरोच, सदर कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या दृष्टीने सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी महापौरांकडे करण्यात आली. यावेळी युनियनचे संघटक मच्छिंद्र सकट, कॉम्रेड उदय चौधरी उपस्थित होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता गांधी विचार व संविधान स्विकारायला हवे – सुरेशचंद्र राजहंस

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता गांधी विचार व संविधान स्विकारायला हवे – सुरेशचंद्र राजहंस आरएसएसला सलमान खान, अदनान सामींसह सिने तारे तारकांची गरज का भासावी? मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १०० वर्षे पूर्ण करताना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर वंदन केले ही संघाला लागलेली उपरती आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींना संघ शरण गेलाच आहे तर आता गांधी विचार मान्य करायला हवा आणि देशाच्या संविधानाचाही स्विकार करावा, असे मुंबई काँग्रेस प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे. संघाच्या शतकपूर्ती कार्यक्रमा संदर्भात बोलताना काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस पुढे म्हणाले की, मुंबईतील संघाच्या कार्यक्रमात सिनेमाविश्वातील तारे तारकांना बोलावण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला गरज का भासावी हा प्रश्न आहे. यात सलमान खान, अदानान सामी यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. एरवी हिंदु मुस्लीम, हिरवा रंग, औरंग्यांची औलाद म्हणून मुस्लीम समाजाचा अपमान करायचा, समाजात द्वेष पसरवायचा आणि आपल्या कार्यक्रमाला मात्र मुस्लीम समाजातील लोकप्रिय व श्रीमंत लोकांना बोलावायचे हा दुटप्पीपणा आहे. तारे तारकांना बोलवण्यात काहीच गैर नाही पण हिंदु मुस्लीम करून गरिबांवर बुलडोझर चालवायचा, दडपशाही करायची आणि लोकप्रिय व श्रीमंत मुस्लीमांना जवळ करायचे आणि मुस्लीम तुष्टीकरणाचा आरोप मात्र काँग्रेस पक्षावर करायचा हे ढोंग व सोंग आता थांबायला हवे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईच्या कार्यक्रमात केलेली विधाने व वस्तुस्थिती यांच्यातही मोठी तफावत आहे. संघप्रमुख कोणत्याही समाजाचा होऊ शकतो असे ते म्हणतात तर मग आजपर्यंत एकही महिला, दलित, आदिवासी, मुस्लीम समाजाचा व्यक्ती सरसंघचालक का झाला नाही, याचे उत्तरही त्यांनी द्यायला हवे. संघाच्या करनी व कथनीत फरक आहे. सरसंघचालक जे बोलतात त्याचे प्रतिबिंब संघाच्या कार्यातून व भाजपाच्या राजकारणातूही दिसत नाही, असेही सुरेशचंद्र राजहंस म्हणाले.

 व्यवस्थेला दोष न देता मेहनतीने परिस्थ‍िती बदला – डॉ. मिताली संचेती

व्यवस्थेला दोष न देता मेहनतीने परिस्थ‍िती बदला – डॉ. मिताली संचेती ठाणे :   क्षेत्र कोणतेही असले तरी मेहनतीश‍िवाय पर्याय नाही. केवळ आपल्या सभोवताली असलेल्या व्यवस्थेला, यंत्रणेला दोष न देता कोणतीही परिस्थ‍िती बदलायची असेल तर त्यासाठी मेहनत करा. नोकरीचे ठिकाण असो की, श‍िक्षण क्षेत्र नियमित अभ्यास आण‍ि मेहनत घेतली तरच परिस्थ‍िती बदलते असे मार्गदर्शनपर वक्तव्य ठाणे महापालिकेच्या उपायुक्त डॉ. मिताली संचेती यांनी नुकतेच झालेल्या प्रश‍िक्षण कार्यक्रमात केले. ठाणे महानगरपालिका व रोटरी क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या एसी, रेफ्रिजरेटर,वॉटर कुलर या उपकरणांच्या  दुरुस्तीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याना पदवीप्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या. नौपाडा येथील पालिका शाळा क्र १९ येथील रोटरी सेंटर मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे महानगरपालिका, रोटरी क्लब ऑफ लेक सिटी, रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ व ब्लू स्टार कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक १९, विष्णुनगर, ठाणे (प) येथे स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्यात आलेले आहे. पहिल्या टप्प्यात ११ मुलानी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तीन महिन्याचे हे  प्रशिक्षण असून ते मोफत आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीना नोकरी व व्यवसायसाठी देखील रोटरीतर्फे सहकार्य केले जाते. यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्त मिताली संचेती यांनी पूर्ण सेंटरची पाहणी करून सर्व उपक्रमाची माहिती घेतली आणि त्या आपल्या मनोगतात म्हणाल्या की रोटरीने हा चालू केलेला उपक्रम हा एक अभिनव असा उपक्रम असून याच्यात रोटरी विद्यार्थ्यांना पूर्णपणे अती उच्च प्रतीच्या साधन सामुग्रीसह प्रशिक्षण देतच आहेत तसेच त्यांनी त्यांना रोजगार निर्मितीचे पण साधन निर्माण करून दिलेला आहे. या उपक्रमाचा  जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा मिळावा यासाठी महापालिका सर्वतोपरी सहकार्य करेल असे डॉ. मिताली संचेती यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिस्ट्रिक्ट ३१४२ चे प्रांतपाल हर्ष माकोल हे होते. ठाणे महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी शेषराव बडे, ब्लू स्टार ट्रेनिंग सेंटरचे मॅनेजर हरीश हे उपस्थित होते.तसेच यावेळी नियोजित प्रांतपाल चंद्रहास शेट्टी,माझी प्रांतपाल डॉक्टर मोहन चंदावरकर,रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटीचे अध्यक्ष सुरेश कल्याणकर, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या अध्यक्षा श्रीमती ममता वंजानी, जगदीश चेलारमानी, प्रशांत पात्रो,मेधा जोशी,देवयानी वेद,सुनील सोमण राजेश परांजपे, नियोजित अध्यक्ष निशा कपीला, यतीन कोळंबेकर आणि अनेक रोटेरियन्स उपस्थित होते.

२ मार्च रोजी नवी मुंबई महापालिकेचा लोकशाही दिन

२ मार्च रोजी नवी मुंबई महापालिकेचा लोकशाही दिन नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार माहे मार्च २०२६…

  उपमुख्यमंत्री पदाचा सुनेत्रा अजितदादा पवार यांनी स्वीकारला पदभार

उपमुख्यमंत्री पदाचा सुनेत्रा अजितदादा पवार यांनी स्वीकारला पदभार दादांच्या प्रतिमेला अभिवादन करताना भावूक… सिध्दीविनायक मंदिरात जाऊन दर्शन तर चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन… मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारला. त्याअगोदर सकाळी आपल्या पक्षाच्या नेत्यांसह सिध्दीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले.त्यानंतर चैत्यभूमीवर जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना नतमस्तक झाल्या. सिध्दीविनायक मंदिर आणि चैत्यभूमीवर गेल्यानंतर उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात जाऊन दादांच्या केबिनमध्ये प्रतिमेला अभिवादन केले. यानंतर मंत्रालयात पदभार स्वीकारला. यावेळी दादांच्या प्रतिमेला अभिवादन करताना उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार भावूक झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, युवा नेते पार्थ पवार,वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री धनंजय मुंडे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे,सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे,पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे,प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर,माजी मंत्री अनिल भाईदास पाटील,आमदार सना मलिक शेख, आमदार सतिश चव्हाण, आमदार अमोल मिटकरी,आमदार विक्रम काळे, आमदार शेखर निकम, आमदार प्रतापराव चिखलीकर पाटील, आमदार राजू नवघरे, आमदार आशुतोष काळे,आमदार हिरामण खोसकर, आमदार पंकज भुजबळ,माजी आमदार झिशान सिद्दीकी, मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे,सहकोषाध्यक्ष संजय बोरगे,आदींसह सर्व आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंगळवारी बारावी एच एस सी बोर्ड ची परीक्षेला सुरुवात झाली असून ठाण्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत फुल उधळून करण्यात आले. यामुळे विद्यार्थी च्या चेहऱ्यावर एकच आनंद दिसत होता त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर…

हिरवी सावर जातीचे बहूउपयोगी झाड तोडल्याप्रकरणी केडीएमसी आयुक्तांकडे तक्रार

हिरवी सावर जातीचे बहूउपयोगी झाड तोडल्याप्रकरणी केडीएमसी आयुक्तांकडे तक्रार कल्याण : डोंबिवली मिलापनगर परिसर हा विविध वृक्षराजीने बहरला आहे. यामुळे या परिसरात आल्यावर एक प्रकारचा पर्यावरणीय आनंद सर्वाना मिळतो. सद्या या परिसरात गटारे नाले, भूमिगत सांडपाणी वाहिन्या यांची कामे चालू आहेत. त्यामुळे काही झाडांना इजा होऊन ती पडतात किंवा सुकून मरून जात आहेत. काही रहिवाशांना आता ही मोठी झालेली काही झाडे नकोशी झाली आहेत. त्यापासून विविध अडचणी आल्याने त्यांना ही झाडे पूर्णपणे तोडून हवी आहेत. त्यासाठी कायदेशीर मार्गाने न जाता झाड तोडणाऱ्यांना कंत्राट देऊन झाडे तोडली जात आहेत. असेच एक मिलापनगर RL-१३० आणि RL-१३१भूखंड मधील रस्त्याचा कडेला असलेले “हिरवी सावर” जातीचे बहुउपयोगी मोठे झाड हे सोमवारी अचानक माणसे आणून तोडण्यात आले. त्यामुळे काही वृक्षप्रेमी हळहळले. मिलापनगर मधील एक वृक्षप्रेमी ज्येष्ठ नागरिक मुकुंद वैद्य यांनी हे झाड बेकायदेशीर तोडण्यास हरकत घेतली असता झाड तोडण्यास सांगणाऱ्या त्या रहिवाशाने त्यास विरोध केला. मुकुंद वैद्य यानी या झाडाच्या फांदया छाटाव्यात व जर पूर्ण झाड तोडायचे असेल तर प्रशासनाकडून रीतसर परवानगी घ्या, असा सल्ला दिला. परंतु त्या रहिवाशाचा हट्टापायी हे “हिरवी सावर” जातीचे बहुउपयोगी झाड पूर्ण तोडले गेले. यामुळे व्यथित होऊन वृक्षप्रेमी मुकुंद वैद्य यानी फोटो सहित याची तक्रार केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे इमेल द्वारे केली आहे. त्या तक्रारीची प्रत त्यानी मिलाप नगर रेसी. वेलफेअर असोसिएशनला दिली आहे. या तक्रारीची दखल घेऊन केडीएमसी कडून यावर काय कार्यवाही होते का ते पाहावे लागेल.