आमदार राजेश मोरे यांची कल्याण डोंबिवली आयुक्तांकडे मागणी
आरती परब
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव येथे दिवा- वसई रेल्वे मार्गावरील प्रस्तावित रेल्वे उड्डाण पुलाच्या (ROB) बांधकामासाठी निविदा प्रक्रिया तातडीने राबवून कामाला गती द्यावी, अशी मागणी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन केली.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या महत्त्वाच्या उड्डाण पुलाला मंजुरी मिळाली आहे. मात्र मंजुरीनंतरही प्रत्यक्ष काम सुरू होण्यास विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत आमदार मोरे यांनी आयुक्त गोयल यांना निवेदन सादर करून निविदा प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम तसेच शहर अभियंता अनिता परदेशी उपस्थित होत्या.
मोठागाव परिसरात मानकोली खाडी पुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मोठागाव रेल्वे क्रॉसिंग परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून वाहन चालकांचा वेळ आणि इंधनाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. तसेच रेल्वे फाटक ओलांडताना अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची बाबही समोर येत आहे.
स्थानिक नागरिक, प्रवासी आणि वाहनचालकांना दररोज या समस्यांचा सामना करावा लागत असल्याने उड्डाण पुलाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. मंजुरी मिळूनही कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याबाबत आमदार मोरे यांनी आयुक्तांकडे विचारणा केली असता, संबंधित कामाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून लवकरच प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त अभिनव गोयल यांनी दिले. मोठागाव रेल्वे उड्डाण पूल साकार झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *