मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी एक ऊर्जा देणारा दिवस आहे. १९ जून हा राहुल गांधी यांचा वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षी मुंबई काँग्रेस प्रत्येक जिल्ह्यात व वार्डात वृक्षारोपण करून, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार आहे.
यासंदर्भात माहिती देताना मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस म्हणाले की, ‘मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून पर्यावरणचा संदेश दिला जाणार आहे. भाजपाचे सरकार विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा मोठा प्रमाणात ऱ्हास करत आहे. अंदमान निकोबार बेटावरील विपुल जंगल संपत्ती तोडून अदानीला ती जागा देण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. मुंबईतही आरे कॉलनीतील हजारो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. मदर डेअरीच्या जागेवरील शेकडो मोठ्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवली जात आहे. निसर्ग उद्यान मोडीत काढले जात आहे. नाशिकमधील तपोवनही नष्ट केले जात आहे. मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा फटका मुंबईकरांनाही बसत आहे.’ वृक्षारोपणाच्या माध्यमातून ‘झाडे लावा, झाडे जगवा व पर्यावरण वाचवा’, हा संदेश राहुल गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देण्याचा संकल्प करण्यात आल्याची माहिती मुंबई काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली आहे.
