अशोक गायकवाड
रत्नागिरी : “योग हा आपल्या जीवनाचा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग असून संपूर्ण जगाने याचा स्वीकार केला आहे. योगामुळे आरोग्याला भरपूर फायदे होत असल्याने प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा,” असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी येथे केले.जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ‘मेरा युवा भारत’, आयुष विभाग आणि जिल्हा योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते.या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी जिंदल म्हणाले, ‘आज जगभरात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. जपानपासून युरोप, आफ्रिका आणि अमेरिकेपर्यंतच्या सर्वच देशांनी योगाचे महत्त्व ओळखून त्याचा स्वीकार केला आहे. उत्तम आरोग्यासाठी सर्वांनी नियमित योग करावा’. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रानडे म्हणाल्या, ‘भारताच्या प्राचीन परंपरेमध्ये शतकानुशतके योगाभ्यास केला जात असून, याचे मूळ स्थान भारतीय उपखंडातच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू झाला आणि त्याची महती संपूर्ण जगभर पोहोचली. एरवी आपण पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करतो. मात्र, आज पाश्चिमात्य जगताने आपली योग संस्कृती स्वीकारली आहे, ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आजच्या दिनाचे औचित्य साधून ज्यांनी योगाभ्यासाला सुरुवात केली आहे, त्यांनी शरीराची लवचिकता आणि उत्तम स्वास्थ्यासाठी हा अभ्यास नियमित व कायमस्वरूपी सुरू ठेवावा.’ या कार्यक्रमात योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी योगासनांची प्रात्यक्षिके केली. कार्यक्रमाला क्रीडा शिक्षक, योग शिक्षक, पालक यांच्यासह पटवर्धन कॉलेज, मिस्त्री हायस्कूल, एम. एस. नाईक हायस्कूल व फाटक हायस्कूलचे विद्यार्थी, तसेच एनसीसी, एनएसएस आणि स्काऊट गाईडचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *