Author: bittambatami.com

वींद्र कृष्णाजी तामरस सरांचा अमृत महोत्सव सोहळा संपन्न

मो. ह. विद्यालयातील पदार्थ विज्ञानाचे तज्ञ माजी शिक्षक ठाणे : कर्तृत्वाचा सुवर्ण महोत्सव अन वयाचा अमृत महोत्सव असा अपूर्व योग लाभलेले मो. ह. विद्यालयातील पदार्थ विज्ञानाचे तज्ञ शिक्षक म्हणून नावलौकिक मिळवलेल्या रवींद्र कृष्णाजी तामरस सरांचा अमृत महोत्सव शाळेने 18 जानेवारी 2025 रोजी शाळेत आयोजित केला होता. आजी-माजी शिक्षक-शिक्षकेतर व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन, पुढाकार घेऊन हा सोहळा करणे म्हणजे एका कर्मयोगी शिक्षकांच्या जीवन प्रवासातील तो अत्युच्च आनंदाचा क्षण ठरावा. मानपत्र, शाल, श्रीफळ व पुस्तके देऊन सरांचा यथोचित सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर, संस्थेचे कार्याध्यक्ष शैलेंद्र साळवी, माजी शिक्षक गणेश पेंडसे, सुबोध देशपांडे व मुख्याध्यापक विकास पाटील यांनी केला. याप्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ सदस्य, आजी-माजी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, हितचिंतक, मित्रपरिवार, नातेवाईक सरांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. या सुवर्णक्षणी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जमा केलेल्या निधीतून शाळेत अधिक दोन सौर ऊर्जा पॅनल चे उद्घाटन रवींद्र कृष्णाजी तामरस सरांच्या हस्ते केले. सरांच्या कार्याची, कर्तृत्वाची, अखंड सेवेची दखल उपस्थित प्रत्येकाने घेतली. अध्यक्ष, कार्याध्यक्ष, शाळेचे मुख्याध्यापक यांनी सरांच्या प्रामाणिकपणाच्या निरलस सेवेचे भरभरून कौतुक केले. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश अभय ओक यांनी मी घडलो तामरस सरांमुळे असे गौरवपर पत्र पाठवले. विविध क्षेत्रांतील उच्च पदावर असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी सरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तामरस सरांच्या मनोगतातून बालपणापासून ते वयाच्या 75 पर्यंतचा चढता आलेख ऐकून सरांच्या अचाट आणि अफाट स्मरणशक्तीचे सभागृहाने कौतुक केले. अत्यानंदाची बाब म्हणजे एरवी गौरवमूर्तीला भेटवस्तू म्हणून धनादेश दिला जातो उलट इथे मात्र तामरस सरांनीच मुख्याध्यापकांकडे दीड लाखाचा धनादेश सुपूर्द केला. गुरुवर्य कै. अक्षीकर, एस. व्ही. कुलकर्णी, कै. चितळे सर यांच्या संस्कारांमुळे, प्रेरणेमुळेच घडल्याचे सरांनी सांगितले. आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे ही त्यांनी कौतुक केले अशा हृदय सोहळ्याचे सुवर्णक्षण अनेकांनी आपल्या मनात आणि कानात साठवून ठेवले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थिनी व सहकारी शिक्षिका स्नेहा शेडगे यांनी केले.

…तर रिपाइं (आठवले) ठामपाची निवडणूक स्वबळावर लढणार – सुरेश बारशिंगे

ठाणे : विधानसभा निवडणुकीत रिपाईने महायुतीला प्रचंड मदत केली आहे. त्यामुळेच महायुतीला बहुमत मिळाले आहे. मात्र रिपाईवर अन्यायच केला जात आहे. त्यामुळेच आगामी ठामपा निवडणुकीत मानाचे स्थान न दिल्यास एकूण जागांपैकी १०%  जागा स्वबळावर लढणार आणि महायुतीला धडा शिकवणार, असा इशारा रिपाई आठवले गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश बारसिंगे यांनी दिला. ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात रिपाइंच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर बारसिंगे पत्रकारांशी बोलत होते. या प्रसंगी नवनियुक्त ठाणे प्रदेशाध्यक्ष अण्णा रोकडे,  ठाणे प्रदेश कार्याध्यक्ष महेंद्र गायकवाड,  प्रदेश सरचिटणीस बाळाराम गायकवाड,  ठाणे जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे, सरचिटणीस प्रमोद इंगळे, विनोद भालेराव, साहेबराव सुरवाडे, निरीक्षक प्रल्हाद मगरे आदी उपस्थित होते. बारसिंगे म्हणाले की, ठाणे जिल्ह्यात  महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. या यशामागे आमच्या कार्यकर्त्याकडून केलेली मेहनत आहे. मात्र, आम्हाला सत्तेत वाटा मिळालेला नाही. सत्तेत वाटा मिळावा, यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. त्यानंतरही जर आम्हाला सत्तेत वाटा मिळाला नाही तर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत. त्यासाठी फक्त आरक्षितच नव्हे तर खुल्या जागांवरही निवडणुका लढवून प्रस्थापित पक्षांना धक्का देऊ. उमेदवार निवडताना बहुजन समाजाला अधिक प्राधान्य दिले जाईल, असेही बारसिंगे यांनी सांगितले. दरम्यान, सोमनाथ सुर्यवंशी संशयास्पद मृत्यूप्रकरणी कारवाई करण्यासाठी लाँग मार्च काढण्यात येत आहे. या मोर्चात रिपाइंचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असेही ते म्हणाले.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यात लाखाचा टप्पा ओलांडला

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने बुधवारी एक लाख घरांचा टप्पा ओलांडला, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य ग्राहकांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीवर भर दिला आहे. या योजनेत घराच्या छतावर सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल्स बसवून वीज निर्माण केली जाते. घरगुती वापरापेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीजबिल शून्य होते तसेच अतिरिक्त वीज महावितरणच्या जाळ्यात पाठवून उत्पन्नही मिळते. छतावर सौर ऊर्जा पॅनेल्स बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून तीन किलोवॅटला 78 हजार रुपयांपर्यंत थेट अनुदान मिळते. घरगुती ग्राहकांच्या मदतीसाठी पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ही योजना सुरू केली होती. राज्यात 21 जानेवारी अखेर या योजनेत एकूण 1,00,700 घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प बसविले गेले. त्यामध्ये 392 मेगावॅटची क्षमता निर्माण झाली व ग्राहकांना 783 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले.  21 जानेवारीला एका दिवसात 1195 घरांवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले. राज्यात नागपूर जिल्ह्याने सर्वाधिक 16,949 घरांवर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. पुणे (7931 घरे), जळगाव (7514 घरे), छत्रपती संभाजीनगर (7008 घरे), नाशिक (6626 घरे), अमरावती (5795 घरे) आणि कोल्हापूर (5024 घरे) हे जिल्हे योजनेचा लाभ घेण्यात आघाडीवर आहेत. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महावितरणकडे आहे. या योजनेतील ग्राहकांना मोफत नेट मीटर देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना…

साकेत विद्यामंदिर इंग्लिश हायस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

कल्याण : कल्याण पूर्व, साकेत विद्या मंदिर इंग्लिश हायस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आमदार  सुलभा गायकवाड या  उपस्थित होत्या.  या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नृत्य, नाटक, गायन अशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी स्नेहसंमेलनात साकेत ज्ञानपीठचे सी.ई.ओ.  शोभा नायर , प्रमोद राम उजागर तिवारी साकेत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे डायरेक्टर डॉ.सनोज कुमार, साकेत महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. वसंत भऱ्हाटे, साकेत कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य  विद्याप्रकाश मोरया, डॉ. सरोज कुमार, साकेत कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य पिऊली भट्टाचार्य, साकेत विद्यामंदिर इंग्लिश हायस्कूलच्या मुख्याध्यापिका ममता सिंग या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नृत्य .नाटक अशा विविध कार्यक्रमांचा सोहळा यशस्वीरित्या साजरा करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयातही आता ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’

मुंबई : गंभीर आजारांवरील उपचारांसाठी गरजू नागरिकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून अत्यावश्यक आर्थिक मदत पुरवली जाते. त्यामुळे या कक्षाकडे अर्ज सादर करण्याबरोबरच त्याचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना मंत्रालयात यावे लागते. त्यामुळे त्यांना होणारा त्रास लक्षात घेता ही सेवा सहजपणे उपलब्ध व्हावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैशाचा अपव्यय टाळेल. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून अनेक दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाकरीता रुग्णांना संबंधित रुग्णालयामार्फत आर्थिक सहाय्य देण्यात येते. तसेच आपत्ती प्रसंगीही आर्थिक मदत देण्यात येते. या अनुषंगाने मदत मिळविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामध्ये असंख्य अर्ज प्राप्त होतात. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षामार्फत दुर्धर आणि महागड्या आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक साहाय्य मिळाल्याने अनेक कुटुंबांना आधार मिळाला आहे. ही मदत मिळविण्यासाठी नागरिकांना राज्याच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयात यावे लागते. त्यामुळे नागरिकांचा होणारा त्रास कमी करण्यासाठी आता जिल्हाधिकारी कार्यालयातच ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’ सुरू करण्यात येणार आहे. रुग्णांना त्यांच्या जिल्ह्यातच ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा’कडे मदतीचा अर्ज करण्याबरोबर, मदतीसाठी पाठपुरावा करणे सोपे होणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ व पैशाचा अपव्यय टाळता येईल, अशी माहिती ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा’चे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली. तज्ज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन जिल्ह्यातील ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा’स प्राप्त अर्जांची सद्यस्थिती नागरिकांना उपलब्ध करून देणे व समस्यांचे निराकरण करणे, अर्ज भरण्यास सहाय्य करणे, आर्थिक मदत झालेल्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन भेट घेणे, जनजागृती आणि प्रसिद्धी करणे, जिल्ह्यातील आपत्तीच्या ठिकाणी भेटी देणे, तसेच अर्थसहाय्य देण्यासाठी आजारांचे पुनर्विलोकन करणे व अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निर्धारित करणे यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे. उपचारांचा खर्च दिवसेंदिवस वाढत असून अर्थसहाय्याच्या रकमेचा समितीमार्फत आढावा घेण्यात येणार आहे. कारभार कागदविरहित होणार गरजू रूग्णांना अत्यावश्यक आरोग्यसेवा पुरविण्यासाठी, आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा’चा कारभार कागदविरहित होणार आहे. त्यामुळे हा निधी मिळविण्याच्या प्रक्रियेसाठी रुग्णांना मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही. यासाठी लवकरच स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाला जोडणार रुग्णांना अधिक सोयीस्कर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष ऑनलाईन प्रणाली आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष ऑनलाईन प्रणाली (सीएमआरएफ पोर्टल) जोडण्यात येणार आहे. सध्याच्या प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे रुग्णाला दिला जाणारा एओ क्रमांक आणि एम क्रमांक एकत्र करण्यात येणार आहे.

‘एसटीची भाडेवाढ दरवर्षी होणे गरजेचे’

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती ठाणे : गेल्या अनेक वर्षांपासून एसटीची भाडेवाढ झाली नव्हती ती भाडेवाढ गुरुवारी प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूर करण्यात आली. याबैठकीत लोकप्रतिनिधींचा सहभाग नसल्यामुळे अद्याप माझ्याकडे एसटी भाडेवाढीची अधिकृत फाईल आलेली नाही. परंतू, १४.९७ टक्के भाडेवाढ करण्यात आली अशी माहिती परिवहन खात्याचे प्रधान सचिव यांच्याकडून मिळाली. एसटीची भाडेवाढ ही दरवर्षी होणे गरजेचे आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना सांगतिले. ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ऑल इंडिया आर्किटेक्ट असोसिएशन च्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यासंमेलनात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः एसटीच्या जमीन विकासाच्या आराखड्याचे सादरीकरण केले. या कार्यक्रमा दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, एसटी महामंडळाला दररोज तीन कोटी तर, महिन्याला ९० कोटीचा तोटा सहन करावा लागतो आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत भाडेवाढ शिवाय पर्याय नाही. मी प्रधान सचिवांना सांगितले आहे की, भाडेवाढ करत असताना वार्षिक गुणवत्तेवर आधारित भाडेवाढ करावी, असेही ते म्हणाले. तसेच येत्या १ फेब्रुवारी पासून टॅक्सी आणि रिक्षाची भाडेवाढ होणार असून टॅक्सी आणि रिक्षाचे प्रति किलो मीटर प्रमाणे तीन रुपयांनी वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील एसटी आगारांचा विकास होणार राज्यातील एसटी आगारांचा विकास होणे गरजेचे आहे. अनेक वर्षांपासून प्रवाशांची मागणी होती की, अत्याधुनिक बस स्थानक मिळावं तेथे विविध सोयी सुविधा असाव्यात यासाठी सरकारने सर्व एसटी आगारांचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू, यासाठी राज्यशासनाकडे तेवढा निधी उपलब्ध नसल्याने हा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर किंवा बीओपी तत्त्वावर राबविण्यात येणार आहे, असे सरनाईक म्हणाले.

मिलिंदनगर येथे आरोग्य आणि रक्तदान शिबिराचे आयोजन

कल्याण : श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित -गौरीपाडा, कल्याण .प व स्फूर्ती फाउंडेशन संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी रोजी  सकाळी १० ते ५ वा. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, कौस्तुभ बिल्डिंगच्या बाजूला, श्रीराम कॉलनीच्या मागे, मिलिंदनगर येथे भव्य रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीर आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य शिबीर मध्ये नेत्र तपासणी, चॅरिटेबल दरात चष्मे, मोतिबिंदू शस्त्रक्रिया, हृदय विकार उपचार,मोफत बॉल्स पेसमेकर सर्जरी, कॅन्सर सर्जरी, अॅजोप्लेस्टी, डायलेसिस, हाडांची सर्जरी, बायपास सर्जरी, किडनी स्टोन सर्जरी, मधुमेह, रक्तदाब, ईसीजी तपासणी करण्यात येणार आहे. नागरीकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा तसेच रक्तदान शिबीर मध्ये रक्तदान करून एखादा व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक रक्तदान नक्की करा असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व स्फूर्ती फाउंडेशन वतीने करण्यात आले आहे.

ठाणे महानगरपालिकेत राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

ठाणे : पंधराव्या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे मतदान शपथ घेण्यात आली. त्याप्रसंगी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, विधी अधिकारी मकरंद काळे, महिला व बालविकास अधिकारी दयानंद गुंडप, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने बजावला पाहिजे याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. यावेळी, भारत निवडणूक आयोगाने ‘मतदानासारखे दुसरे काही नाही, मी मतदान करणारच’ अशी संकल्पना निश्चित केली आहे. त्याची माहिती अधिकारी आणि कर्मचारी यांना देण्यात आली. त्यानंतर, सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मतदान करण्याबाबतची शपथ घेतली.

७ कलमी कृती आराखडा प्रभावीपणे राबविण्याचे केडीएमसी आयुक्तांचे निर्देश

कल्याण  :  मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार १०० दिवसांमध्ये ७ कलमी कृती आराखडा प्रभावीपणे राबविण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी नियोजनबध्द कार्यवाही करून अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व अधिकारी वर्गास दिले…

ठाण्यातील समारोह बॅक्वेट्स येथे दि.25 जानेवारी रोजी

15 व्या राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमाचे आयोजन ठाणे :25 जानेवारी 2025 रोजी 15 वा राष्ट्रीय मतदार दिवस राज्यस्तर, जिल्हास्तर व मतदान केंद्र स्तरावर साजरा करावयाचा आहे. या 15 व्या राष्ट्रीय मतदार दिवसासाठी “Nothing like voting. I Vote for sure” हा विषय  आयोगाकडून देण्यात आला आहे. मा.भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार दि.25 जानेवारी 2025 हा कामकाजाचा दिवस नसल्याने दि.24 जानेवारी 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व कार्यालयामध्ये मतदान शपथ (मराठी, इंग्रजी व हिंदी मधील शपथेचा नमुना सोबत जोडला आहे) घेण्यात येणार आहे. त्यानुषंगाने ठाणे जिल्ह्याचा जिल्हास्तरीय कार्यक्रम दि.25 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता समारोह बॅंक्वेट्स, तिसरा मजला, सी.के.पी. हॉल, एन.के.टी. कॉलेजच्या बाजूला, खारकर आळी, ठाणे पश्चिम येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे हे असतील तर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बित्तंबातमी वृत्तपत्राचे संपादक तथा मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, ठाणे भूषण तथा सरस्वती विद्या प्रसारक ट्रस्ट, ठाणेच्या अध्यक्ष श्रीमती एम.एस. कोरडे, चित्रपट दिग्दर्शक नितीन कांबळे हे तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणेचे सचिव ईश्वर सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमात ठाणे जिल्हा को.ऑप.हौ.सो. फेडरेशनचे सिताराम राणे, अपंग विकास महासंघ, कल्याणचे अध्यक्ष अशोक भोईर, किन्नर अस्मिता नीता केणे व ठाणे सिटिझन्स फाऊंडेशनचे अध्यक्ष कॅस्बर ऑगस्टीन हे निवडणूक दूत म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये नवमतदारांना निवडणूक ओळखपत्राचे वाटप व उत्कृष्ट काम केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात येणार आहे. तरी या राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमास दि.25 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता समारोह बॅंक्वेट्स, तिसरा मजला, सी.के.पी. हॉल, एन.के.टी. कॉलेजच्या बाजूला, खारकर आळी, ठाणे पश्चिम येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी उर्मिला पाटील, 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी इब्राहिम चौधरी, 149 मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी विठ्ठल इनामदार आणि 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी सर्जेराव मस्केपाटील यांनी केले आहे.