Category: होम

05 ऑगस्टला नवी मुंबई महापालिका लोकशाही दिन

मुंबई –  महाराष्ट्र शासन निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. माहे ऑगस्ट 2024 महिन्याचा लोकशाही दिन दि. 05 ऑगस्ट 2024 रोजी होणार असून अर्जदारांनी विहित नमुन्यात आपला अर्ज दोन प्रतींमध्ये दि. 19 जुलै 2024 पर्यंत मा. आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांचे नावे ‘लोकशाही दिनाकरीता अर्ज’ असे दर्शनी भागी ठळकपणे नमूद करुन सादर करावयाचा आहे. सदर अर्जात नमूद तक्रार / निवेदन हे वैयक्तिक स्वरुपाचे असावे. अर्ज एकाच विभागाशी संबंधित एकाच विषयाबाबत असावा. अर्जदाराने संबंधित विषयाबाबत या आधी विभाग कार्यालय, विभागप्रमुख स्तरावर निवेदन सादर केलेले असावे. याशिवाय लोकशाही दिनामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवाविषयक- आस्थापनाविषयक बाबी याबाबतचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घेण्यात यावी. विहित नमुन्यात नसणारे व अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तसेच तक्रार / निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर तसेच यापूर्वीच अंतिम उत्तर दिलेले आहे/ देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत याचीही नागरिकांनी नोंद घ्यावी असे सूचित करण्यात येत आहे. लोकशाही दिनाकरीता करावयाच्या अर्जाचा विहित नमुना नागरिकांसाठी महानगरपालिका नूतन मुख्यालय इमारत, जनसंपर्क विभाग, तिसरा मजला, से. 15 ए, किल्लेगांवठाण जवळ, सी.बी.डी., बेलापूर येथे विनामूल्य उपलब्ध असून नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ (Website) www.nmmc.gov.in यावरील डाऊनलोड आयकॉनवरून अर्ज नमुना प्रत सहजपणे डाऊनलोड करुन घेता येऊ शकते याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. 0000

सर्व प्रभागांमध्ये ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज नोंदणी कक्ष

तातडीने सुरु करण्याचे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश     नवी मुंबई : “मुख्यमंत्री – लाडकी बहीण योजने”ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने 8 विभाग कार्यालयांप्रमाणेच महानगरपालिका वा शासकीय इमारतींमध्ये सर्व प्रभागांत अर्ज नोंदणी कक्ष तात्काळ सुरु करावेत व त्याची यादी नागरिकांच्या माहितीसाठी सर्व प्रसारमाध्यमांतून व्यापक स्वरुपात प्रसिध्द करावी असे निर्देश देत नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी एकही पात्र महिला लाभ घेण्यापासून वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी असे स्पष्ट निर्देश योजनेच्या आढावा बैठकी प्रसंगी दिले. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजना जाहीर करण्यात आली असून 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला तसेच त्या कुटूंबातील केवळ 1 अविवाहित महिला यांना त्यांच्या आधार लिंक असलेल्या सक्षम बँक खात्यात दरमहा रु. 1500/- इतकी रक्कम डिबीटीव्दारे प्राप्त होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र महिला ह्या नारीशक्ती दूत ॲपव्दारे स्वत: ऑनलाईन अर्ज भरु शकतात, तसेच ज्या महिलेला ऑनलाईन अर्ज भरता येत नाही त्या महिलांसाठी अर्ज भरण्याची सुविधा महानगरपालिकेने स्थापित केलेल्या विभाग कार्यालयातील विशेष नोंदणी कक्षामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या नोंदणी कक्षांची संख्या मोठया प्रमाणात वाढवून प्रत्येक प्रभागात किमान 1 असे 111 नोंदणी कक्ष तात्काळ कार्यान्वित करावेत असे निर्देश आयुक्तांनी या बैठकीत दिले. त्याचप्रमाणे योजनेसाठी पात्र महिलांच्या सुविधेच्या दृष्टीने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या कक्षांची वेळ सकाळी 8 ते दुपारी 2 आणि दुपारी 2 ते रात्री 8 अशाप्रकारे 2 सत्रात असावी असेही आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. योजनेकरिता भरण्यात येणारे अर्ज बिनचूक भरावेत व शासन निर्णयात नमूद केलेली पुराव्यांची आवश्यक ती योग्य कागदपत्रे तपासून अपलोड करावीत असेही निर्देश यावेळी देण्यात आले. एकही पात्र लाभार्थी महिला नोंदणी कक्षातून परत जाणार नाही याची दक्षता घ्यावी व अर्ज भरण्याची संपूर्ण कार्यवाही विनामूल्य होईल याची काटेकोर दक्षता घ्यावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. अर्जात भरली जाणारी माहिती आधारकार्ड पायाभूत मानून त्यानुसार भरावी व अर्ज भरतानाच तो पूर्णपणे योग्य प्रकारे भरला जाईल याची विशेष काळजी घेण्याची आयुक्तांनी नमूद केले. जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचविण्याच्या दृष्टीने फलक लावण्यात यावेत, हस्तपत्रके वितरीत करावीत, सर्व सोशल माध्यमांचा वापर करावा, अर्ज भरणा सुविधा केंद्रांची यादी जास्तीत जास्त माध्यमांतून प्रसिध्द करावी तसेच शाळांमध्येही विद्यार्थ्यांना या योजनेची माहिती देऊन त्यांच्‍यामार्फत त्यांच्‍या घरांपर्यंत योजनेची माहिती पोहचावी यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. बालवाडी शिक्षिका/सेविका, आशा वर्कर तसेच समाजविकास विभागातील समुह संघटक यांच्यामार्फतही त्यांच्या कार्यक्षेत्रातील घराघरात या योजनेची प्रसिध्दी करावी अशा सूचना देण्यात आल्या. विभाग कार्यालयांप्रमाणेच शाळा, रुग्णालये याठिकाणीही होर्डिंग – बॅनर्सव्दारे योजनेची प्रसिध्दी करण्याचे सूचित करण्यात आले. लाभार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारे घ्यावेत व ऑफलाईन घेतलेल्या अर्जांची पोहोच लाभार्थ्यांना द्यावी अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे, वैदयकिय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड आणि सर्व विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी तसेच शासनाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीम.ज्योती पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. बालविकास विभागाच्या वतीनेही नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 226 अंगणवाड्या सुरु असून त्याठिकाणीही अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी सेविकांमार्फत सुरु आहे. याशिवाय नवी मुंबई महानगरपालिकेची सर्व प्रभागांमध्ये अर्ज भरण्यासाठी नोंदणी कक्ष कार्यान्वित करण्यात येत आहेत. “मुख्यमंत्री – लाडकी बहीण” योजनेची माहिती जास्तीत जास्त प्रसारित करावी व प्रत्येक पात्र लाभार्थ्याला त्याचा लाभ मिळेल अशाप्रकारे कार्यवाही करावी असे स्पष्ट निर्देश नमुंमपा आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी दिले.

 कृषी क्रांतीचा जनक

मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार       नवी दिल्ली : पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून राज्याकडून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेत, 15व्या कृषी नेतृत्व समितीचा 2024 चा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुरस्कार राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत स्वीकारला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. १५ व्या कृषी नेतृत्व समितीच्या- 2024 काँनक्लेव्हचे एग्रीकल्चर टुडे समूहाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व केरळचे राज्यपाल पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखाली 15व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने राज्यातील पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा आणि शाश्वत विकास धोरणांची दखल दखल घेत महाराष्ट्र राज्याला सर्वोत्तम कृषी राज्य म्हणून निवड केली आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, एग्रीकल्चर टुडे समूहाचे अध्यक्ष डॉ. एम.जे. खान, राज्याच्या कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल व इतर मान्यवर उपस्थित होते. ०००००

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कचऱ्याचे साम्राज्य – नरेंद्र पंडित

अनिल ठाणेकर     ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झालेले असून, यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरुन, रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाव्यतिरिक्त, याच परिसरात असणाऱ्या शिधावाटप कार्यालयाच्या दारातच कचऱ्याचे ढिगारे साचलेले असून, याचा अभ्यांगतांना मोठ्याप्रमाणात त्रास होत आहे, अशी तक्रार धर्मराज्य पक्षाचे सहसचिव नरेंद्र पंडित यांनी, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे एका लेखी पत्राद्वारे केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील या कचऱ्यातून निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे, रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने, साचलेल्या कचऱ्यावर डासांचे प्रमाण वाढलेले आहे. परिणामी, डेंग्यू आणि मलेरिया या आजारांची लागण होण्याचा धोका जास्त आहे. संतापजनक बाब म्हणजे, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच महाराष्ट्र शासनाचे “राष्ट्रीय हिवताप प्रतिरोध योजना, ठाणे जिल्हा” यांचे कार्यालय याच ठिकाणी असून, दुर्दैवाने या कार्यालयात कोणीही संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याची बाब ‘धर्मराज्य पक्षा’च्या निदर्शनास आलेली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत साथीचे आजार मोठ्याप्रमाणात उद्भवत असतात. त्यातच ठाणे शहर आणि जिल्ह्यात, डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याचे वृत्त, प्रसिद्धीमाध्यमांतून प्रकाशित झालेले असताना, या पार्श्वभूमीवर, खुद्द ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होणे, हे प्रशासनाला नक्कीच भूषणावह नाही. तरी, याप्रकरणी गांभीर्याने दखल घेत, रोगराईला आमंत्रण देणारे, कचऱ्याचे ढिगारे त्वरित काढून टाकण्यात येऊन, स्वच्छता राखावी आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी विनंती ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव नरेंद्र पंडित यांनी, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे केली आहे. 00000

पातलीपाडा येथील महापालिका शाळेची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी

ठाणे : ठाणे महापालिकेच्या पातलीपाडा येथील शाळेची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरूवारी सकाळी पाहणी केली. या शाळेच्या इमारतीची प्रस्तावित दुरुस्ती आणि इतर कामांबद्दल आयुक्त राव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम त्वरीत पूर्ण करणार-  देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे बांधकाम वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. पुतळ्याचे प्रारुप (मॉडेल) सुद्धा मान्य झाले आहे. तथापि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या…

गणवाड्या उभारणी, दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात तरतुदीसाठी प्रस्ताव तयार करणार- आदिती तटकरे

मुंबई : अंगणवाड्या उभारणी तसेच दुरुस्तीसाठी पुढील अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव महिला व बाल विकास विभागामार्फत तयार करण्यात येईल, अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत…

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुधारित

किमान वेतनातील फरकाच्या रकमेसाठी अर्थसंकल्पात तरतूद- गिरीश महाजन     मुंबई : राज्यात सध्या २७ हजार ९११ ग्रामपंचायती असून त्यात ४८ हजार १८८ कर्मचारी कार्यरत आहेत. या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या अधिसूचनेनुसार किमान वेतन लागू करण्यात आले आहे. शासनाने या कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतनातील फरकाची रक्कम प्रदान करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. याबाबत सदस्य सुनील भुसारा यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेमध्ये ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, नाना पटोले, दीपक चव्हाण, सुरेश वरपूडकर यांनी सहभाग घेतला. मंत्री श्री. महाजन म्हणाले की, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन व आकृतीबंधाबाबत शिफारस करण्यासाठी यावलकर समिती गठित करण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अहवाल  वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे. तसेच ग्रामपंचायतीचे उत्त्पन्न व लोकसंख्येचा विचार करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी सहाय्यक अनुदानाच्या हिस्साची टक्केवारी ठरविण्यात आली आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीची रक्कम नियमानुसार जमा करण्यात येत असून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ करण्यात आली असून अनुदानही वेळोवेळी देण्यात येत असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.

मुंबई शहरातील प्रकल्पबाधितांना घरे देण्याबाबत शासन सकारात्मक-उदय सामंत

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात विविध नागरी विकास प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे प्रकल्पबाधितांची संख्या वाढत असल्याने त्यांच्याकडून सदनिका, अनिवासी गाळ्यांची मागणी वाढत आहे. मुंबई शहरात 2017 पासून 4870 प्रकल्पबाधितांना घरे…

पुढील टप्प्यातील परिक्षा 18 जुलैपासून सुरू

 जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत गट- क सरळ सेवा भरती 2023     ठाणे : जिल्हा परिषद गट क सरळसेवा पदभरती प्रक्रिया 2023 मध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परिक्षा पार पडलेल्या आहेत. पुढील टप्प्यात ठाणे जिल्ह्यातील परिक्षा केंद्राची निवड केलेल्या  आरोग्य सेवक (पुरुष) 40%, आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी), आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)), कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील परिक्षा 18 जुलै ते 30 जुलै पर्यंत होणार आहेत. जिल्हा परिषद ठाणे कार्यालयातील अधिकृत संकेतस्थळावर परिक्षे संदर्भात वेळोवेळी प्राप्त झालेल्या सूचना उमेदवारांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सरळ सेवा भरती पुढील टप्प्यातील परिक्षा 18 जुलै रोजी मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका, 19 व 23 जुलै रोजी आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)), 20, 22 व 23 जुलै रोजी आरोग्य सेवक (पुरुष) 40%, 19 व 24 जुलै रोजी आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी), 25,29 व 30 जुलै रोजी कंत्राटी ग्रामसेवक या पदाची परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांना जिल्हा परिषद ठाणे कार्यालयातील अधिकृत संकेतस्थळावरून माहिती घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना परिक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येत आहे. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी जिल्हा परिषद ठाणे कार्यालयातील अधिकृत संकेतस्थळावरील आयबीपीएस द्वारे उपलब्ध करून दिलेल्या लिंकवरून हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावे. विशेष सुचना ज्या महिला उमेदवारांनी त्यांचे नाव बदलले आहे त्यांच्या बाबतीत त्यांनी मूळ राजपत्र अधिसूचना / त्यांचे विवाह प्रमाणपत्र सादर केल्यास परिक्षेस बसण्याची परवानगी दिली जाईल. अन्यथा महिला उमेदवारांना परिक्षेसाठी बसू दिले जाणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. 000000