Category: ठाणे

Thane news

केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत ‘टीबी मुक्त भारत अभियान २.०’ ची सुरुवात

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त १०० दिवसांची विशेष मोहीम- निक्षय मित्रांचा होणार सत्कार कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने ‘टीबी मुक्त भारत अभियान २.०’ अंतर्गत १०० दिवसांच्या विशेष मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाद्वारे शहरातील क्षयरोगाचे उच्चाटन करून “टीबी मुक्त कल्याण-डोंबिवली” हे उद्दिष्ट साध्य करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. जागतिक क्षयरोग दिना निमित्त रुक्मिणीबाई रुग्णालय येथे विशेष जनजागृती पर कार्यक्रम राबवण्यात आला. या वेळी रुग्णासाठी पोषण आहार वाटप तसेच MDR रुग्णाकरिता विशेष PFT आणि XRAY तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. इनरव्हील क्लब ऑफ  कल्याण, रोटरी क्लब ठाणे जिल्हा ३१४२ आणि आय एम ए कल्याण यांच्यावतीने एकूण २१० क्षय रुग्णांना पोषण आहार किट यांचे वाटप करण्यात आले. यावेळी रुग्णांनी आपल्या आहाराची काळजी घ्यावी आणि उपचार पूर्ण करावा शिवाय भारत सरकारतर्फे  राबविण्यात येणाऱ्या या पुढील शंभर दिवसाच्या कार्यक्रमात सर्वांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन आयएमए प्रेसिडेंट डॉ सुरेखा इटकर यांनी  केले. या कार्यक्रमावेळी बाई रुक्मिणी बाई रुग्णालय यांच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ सुलक्षणा त्रिभुवन,डॉ गणेश डोईफोडे , शहर क्षयरोग अधिकारी डॉ पौर्णिमा ढाके, चेस्ट फिजिशियन डॉ श्रेयस गोडबोले, डॉ रुतिका भोसले, डॉ धाकतोडे इनरव्हील क्लब ऑफ कल्याणच्या दीप्ती दिवाडकर, डॉ चिटणीस, एड नीता कदम आणि राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचा संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होता. जागतिक आरोग्य संघटनेच्या आवाहनानुसार दरवर्षी २४ मार्च हा दिवस क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो. १८८२ साली डॉ. रॉबर्ट कोच यांनी क्षयरोगाच्या जीवाणूचा शोध लावल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात विविध जनजागृती उपक्रम, आरोग्य शिबिरे, तसेच तपासणी व उपचार सुविधा राबविण्यात येणार आहेत. २४ मार्च पासून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात पुढील १०० दिवस निरनिराळे कार्यक्रम राबवून क्षयारोगाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. या मोहिमेत  घराघरांत जाऊन संशयित रुग्णांचा शोध घेणे. मोफत कफ तपासणी व एक्स-रे सुविधा, निदान झालेल्या रुग्णांना तत्काळ उपचार सुरू करणे, उपचार पूर्णत्व दर वाढवण्यासाठी विशेष पाठपुरावा, उच्च जोखमीच्या भागांमध्ये विशेष आरोग्य शिबिरे राबविण्यात येणार आहेत. क्षयरोग निर्मूलनासाठी “निक्षय मित्र” ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येत असून, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, उद्योगसमूह तसेच नागरिकांनी टीबी रुग्णांना दत्तक घेऊन त्यांना पोषण आहार, मानसिक आधार व आवश्यक मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या निक्षय मित्रांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. शासनाच्या “निक्षय पोषण योजना” अंतर्गत टीबी रुग्णांना उपचार कालावधीत दरमहा ₹१०००/- आर्थिक सहाय्य दिले जाते. यामुळे रुग्णांच्या पोषण स्थितीत सुधारणा होऊन उपचार परिणामकारक होण्यास मदत होते. “क्षयरोग हा संसर्गजन्य पण पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. नागरिकांनी लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी व उपचार पूर्ण करावेत. तसेच ‘निक्षय मित्र’ बनून या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवावा.” असे आवाहन या वेळी महापालिकेतर्फे करण्यात आले. 0000000

 पियुष कनोजियाचे २ धावांत ६ बळी

ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धा ठाणे : पियुष कनोजियाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अरुप्रीत टायगर्स एलएलपी संघाने गोदरेज स्टाफ क्लबचा सात गडी राखून दणदणीत पराभव करत सुवर्णमहोत्सवी ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट…

सुवर्ण महोत्सवी सांगता सोहळ्यानिमित्त संगीत रजनी

ठाणे – ज.ए.ई.चे मो. ह. विद्यालय आणि रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय व अभिरुची मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्ष, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने २८ मार्चला सायं. ६ वा. मो. ह. विद्यालय शाळेचे…

पत्रकार आरती मुळीक परब यांना मातृशोक

पत्रकार आरती मुळीक परब यांना मातृशोक दिवा, दि. २५ मार्च : पत्रकार आरती मुळीक परब यांच्या आई कै. सौ. लक्ष्मी चंद्रकांत मुळीक परब यांचे दिनांक २४ मार्च २०२६ रोजी सायन…

उत्तरार्ध एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी २ एप्रिलला गडकरीमध्ये

उत्तरार्ध एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी २ एप्रिलला गडकरीमध्ये रंगतदार प्राथमिक फेरी ठाण्यात उत्साहात संपन्न ठाणे : सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखा यांच्या सहकार्याने मोरया इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट आयोजित उत्तरार्ध एकांकिका स्पर्धेची रंगतदार प्राथमिक फेरी ठाण्यात उत्साहात पार पडली. अंतिम फेरी २ एप्रिलला सकाळी ११ वाजल्यापासून गडकरी रंगायतन, ठाणे येथे पार पडणार आहे. २२ मार्च रोजी गडकरी रंगायतन, तालीम हॉल मध्ये उत्तरार्ध एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली.  स्पर्धेत सहभागी होणाऱ्या लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांचे वय हे ५० किंवा त्यापेक्षा जास्त असावं, या विशेष नियमामुळे ही स्पर्धा इतर स्पर्धांपेक्षा वेगळी ठरत आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून ठाणे, नवी मुंबई, मुंबई, चिपळूण, अलिबाग, नाशिक, सोलापूर, सातारा, कल्याण, पुणे इथल्या एकूण १५ संघांनी स्पर्धेला भरघोस प्रतिसाद दिला. सॉफ्ट कॉर्नरचे एमडी आणि सीईओ दिलीप कुलकर्णी, त्यांच्या पत्नी आणि मुलासह स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेचे पदाधिकारी आणि अनोख्या स्पर्धेचे कल्पनासूचक रवी मिश्रा देखील प्राथमिक फेरीतील एकांकिकांचा अनुभव घेण्यासाठी उपस्थित होते. प्राथमिक फेरीसाठी एकांकिका, नाटक, सिनेमा, मालिका या क्षेत्रात लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयाचा अनुभव असलेले विशाल कदम आणि विनोद जाधव हे परीक्षक होते. वयाची पन्नाशी उलटल्यानंतर राहून गेलेल्या किंवा जबाबदाऱ्यांमुळे मागे ठेवलेल्या इच्छा आणि कलागुणांना पुन्हा एकदा नव्याने वाव देता यावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणांच्या जोश आणि उत्साहात आपण कुठे मागे पडतोय असेही होऊ नये म्हणून खास या वयोगटासाठी ही स्पर्धा आणि त्याला नवीन संहिता, उत्तम अभिनय याद्वारे मिळालेला प्रतिसाद याचे दोन्ही परीक्षकांनी तोंडभरून कौतुक केले आणि सहभागी संघांना प्रोत्साहन दिले. तरुण वयात अनुभवलेला किंवा काही कारणास्तव राहून गेलेला रंगमंचावर प्रयोग सादर करण्याचा जोश अनेक वर्षांनी पुन्हा अनुभवता आला, अशा प्रतिक्रिया अनेक स्पर्धकांनी दिल्या. त्याचबरोबर स्पर्धेच्या आयोजनाचे आणि नियोजनाचे सुद्धा कौतुक केलं. स्पर्धेला आलेल्या प्रतिसादाचं कौतुक करत ही स्पर्धा अजून संपूर्ण महाराष्ट्रभर पसरावी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संघांनी स्पर्धेत सहभागी व्हावं, अशी इच्छा स्पर्धेचे आयोजक मोरया इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंटचे प्रमुख प्रफुल्ल गायकवाड, कल्पिता पावसकर आणि शिशिर कोण्णुर यांनी व्यक्त केली. प्राथमिक फेरीतून प्राण, मुंबई – ‘साठी’, कला संस्कृती, ठाणे – ‘आर्टिकल २१’, रंगा थिएटर्स, ठाणे – ‘तरुणाई’, मित्र सहयोग, ठाणे – ‘अनोळखी’, ठाणे आर्टगिल्ड – ‘ती येते आणिक जाते’ या पाच एकांकिका अंतिम फेरीत दाखल झाल्या आहेत. दमदार नाट्यप्रयोग पाहण्यासाठी प्रेक्षकांनी आवर्जून उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे. यासंबंधी अधिक माहितीसाठी शिशिर – ९९२०१३७८०५, प्रफुल्ल – ९००४९१२४६८, कल्पिता – ९१६७२४६८३३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

गावदेवी मंडईत दहशत, भाजी विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला

गावदेवी मंडईत दहशत, भाजी विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला भाजप नगरसेवक संजय वाघुले यांची कठोर कारवाईची मागणी ठाणे : महापालिकेच्या गावदेवी मंडईत काही समाजकंटकांमुळे दहशत पसरली असून, एका समाजकंटकाने भाजी विक्रेत्यावर सोमवारी दुपारी हल्ला केला. या हल्ल्यात भाजी विक्रेता जखमी झाला आहे. या प्रकाराने विक्रेत्यांमध्ये घबराट पसरली आहे. या प्रकरणी भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनी आरोपीविरोधात व प्रवेशद्वार बळकावणाऱ्या बेकायदा विक्रेत्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून गावदेवी भाजी मंडईच्या प्रवेशद्वारावर बेकायदा विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. मंडईत ये-जा करणाऱ्या ग्राहकांनी तक्रार केल्यास, बेकायदा विक्रेत्यांकडून ग्राहकांना शिविगाळ केली जाते.त्यातील एक विक्रेता समाजकंटक नवनाथ वायकर याच्या आईचे मंडईत गाळे आहेत. मात्र, त्याच्याकडून व त्याच्या काही साथीदारांकडून प्रवेशद्वारालगत दुकाने उभारून अधिकृत भाजी विक्रेत्यांवर दादागिरी केली जात आहे. तसेच अनेक गाळेधारकांना मारहाणही करण्यात आली, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केला. गावदेवी मार्केटमध्ये किशोर नऱ्हे यांचे तीन गाळे आहेत. तर मार्केटमध्येच नवनाथ वायकर याच्या आईच्या नावावरील तीन गाळे आहेत. त्याच्याबरोबर अनेक गाळेधारकांचे सातत्याने वाद होत आहेत. मार्केटमधील एक जादा गाळा किशोर नऱ्हे यांच्या नावावर आहे. त्याच्या ताब्यावरून नवनाथ याच्याकडून धमक्या दिल्या जात होत्या. मार्केटमध्ये दिसल्यास जिवंत सोडणार नाही, अशी त्याने धमकी दिली होती, असे किशोर नऱ्हे यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. गावदेवी मंदिराबाहेरील श्री साईबाबा मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्ताने गाळेधारकांकडून बुधवारी वर्गणी जमा केली जात होती. त्यावेळी नवनाथ याने किशोर नऱ्हे याच्यावर शहाळे सोलण्याच्या सुऱ्याने हल्ला केला. त्यात ते जखमी झाले. नवनाथ याने गाळेधारक अलका काजळे व प्रमिला कोल्हे यांनाही शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. तसेच पंकज काजळे यांनाही मारहाण केली. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे गावदेवी भाजी मंडईमध्ये घबराट पसरली आहे. गावदेवी मंडईतील मूळ विक्रेते हे बेकायदा विक्रेत्यांच्या अतिक्रमणांमुळे हैराण झाले आहेत. या अतिक्रमणांकडे महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केला.

ग्रामीण विकास, डिजिटल पारदर्शकता, सामाजिक सक्षमीकरणाला गती देणारा रु. ११६.९९ कोटीचा अर्थसंकल्प – रणजित यादव

ग्रामीण विकास, डिजिटल पारदर्शकता, सामाजिक सक्षमीकरणाला गती देणारा रु. ११६.९९ कोटीचा अर्थसंकल्प – रणजित यादव अनिल ठाणेकर ठाणे- ठाणे जिल्हा परिषदेच्या सन २०२६-२७ च्या हा अर्थसंकल्प केवळ निधी वाटपाचा दस्तऐवज नसून ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला सक्षम, सुरक्षित आणि स्वावलंबी बनविण्याचा संकल्प आहे. सर्वांगीण ग्रामीण विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण व आरोग्य सेवा, जलसुरक्षा व शाश्वत कृषी, सामाजिक सक्षमीकरण आणि डिजिटल पारदर्शक प्रशासन या पाच प्रमुख तत्वांवर आधारित हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. ई-गव्हर्नन्स व डिजिटल उपक्रमांच्या माध्यमातून प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख करण्याचा आमचा प्रयत्न राहील. या माध्यमातून ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल,” असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी केले. सन २०२६-२७ या वर्षासाठी एकूण अंदाजपत्रकीय जमा रु. ११६.९९ कोटी इतकी असून एकूण खर्च रु. ११६.९३ कोटी प्रस्तावित करण्यात आला आहे. वर्षअखेरीस रु. ५.८४ लाख इतकी शिल्लक अपेक्षित आहे. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत प्रमोद काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, कार्यकारी अभियंता बांधकाम पद्माकर लहाने, उपायुक्त पशुसंवर्धन वल्लभ जोशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छ भारत मिशन) पंडित राठोड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देविदास महाजन, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास संजय बागुल, जिल्हा कृषी अधिकारी एम. एम. बाचोटीकर, समाज कल्याण विभाग प्रमुख उज्वला सपकाळे, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी अंजली अंबेकर, जनसंपर्क अधिकारी रेश्मा आरोटे आदी अधिकारी उपस्थित होते. ठाणे जिल्हा परिषदेचा सन २०२५-२६ चा सुधारित व सन २०२६-२७ या वित्तीय वर्षाचा मूळ अर्थसंकल्प बुधवार, २५ मार्चला सकाळी ११ वाजता बी. जे. हायस्कूल येथील सभागृहात सादर करण्यात आला.जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्याकडे अर्थसंकल्पाची प्रत सुपूर्द केली. राज्यातील नागरी व ग्रामीण संस्कृतीचा समतोल साधत ठाणे जिल्हा परिषद ही विकासाच्या दृष्टीने अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते. अशा या जिल्हा परिषदेचा सन २०२५-२६ चा सुधारित व सन २०२६-२७चा मूळ अर्थसंकल्प सादर करताना मला अभिमान वाटतो. या अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील विकासाचा प्रत्येक पैलू लक्षात घेऊन रचनात्मक व परिणामकारक नियोजन करण्यात आले आहे. पंचायत सशक्तीकरण, ग्रामीण आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि विविध केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ठाणे जिल्हा परिषदेला राज्यस्तरावर मानाचे स्थान मिळाले आहे.ठाणे जिल्हा परिषदेच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पामध्ये विविध विभागांसाठी भरीव तरतूद करण्यात आली असून विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागासाठी रु. १.१५ कोटी तर संकीर्ण सामान्य प्रशासनासाठी रु. २.६१ कोटी निधी राखीव ठेवण्यात आला आहे. शिक्षण विभागासाठी रु. ११.३६ कोटी तर प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी रु. २.०८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी बांधकाम विभागासाठी सर्वाधिक रु. १९.८७ कोटी निधी देण्यात आला आहे. लघुपाटबंधारे व जलसंधारण विभागासाठी रु. २.४८ कोटी, तर आरोग्य विभागासाठी रु. ३.७८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागासाठी रु. २ कोटी निधी प्रस्तावित आहे. कृषी विभागासाठी रु. ३.७४ कोटी तर पशुसंवर्धन विभागासाठी रु. ३.७२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. समाजकल्याण विभागासाठी रु. ९.७९ कोटी व दिव्यांग कल्याणासाठी रु. ३.०५ कोटी निधी राखीव ठेवण्यात आला आहे. महिला व बालकल्याण विभागासाठी रु. ४.८९ कोटी तर ग्रामपंचायत विभागासाठी मुद्रांक शुल्क वाटपासाठी रु. ३७.५० कोटी आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानासाठी रु. ३.६५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच वित्त विभागासाठी विविध प्रशासकीय बाबींसाठी सुमारे रु. ०.६७ कोटी निधी राखीव ठेवण्यात आला आहे. अशा प्रकारे सर्व विभागांना समतोल निधी वाटप करून सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी माहिती दिली आहे.

बेकायदेशीर कर्जवसुलीविरोधात अ‍ॅड. श्वेता सराफ उतरल्या रस्त्यावर

बेकायदेशीर कर्जवसुलीविरोधात अ‍ॅड. श्वेता सराफ उतरल्या रस्त्यावर अनिल ठाणेकर ठाणे, ठाण्यातील अ‍ॅड.श्वेता सराफ यांनी सार्वजनिक रस्त्यांवर कार्यरत असलेल्या बेकायदेशीर कर्ज वसुली एजंटांच्या वाढत्या उपस्थिती बद्दल कायदा आणि सुव्यवस्थेबाबत एक गंभीर चिंता औपचारिकपणे व्यक्त केली आहे. रस्त्यावर बेकायदेशीर पद्धतीने कर्जवसुली करणार्‍या एजंटांविरोधात कठोर कारवाईची मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. काही अज्ञात व्यक्ती वाहन क्रमांकाची यादी घेवून रस्त्यावर वाहनचालकांना अडवून जबरदस्तीने कर्जवसुली करण्याचा प्रयत्न करत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. काही अज्ञात व्यक्ती रस्त्याच्या मधोमध वाहने थांबवत आहेत, नागरिकांशी वाद घालत आहेत आणि बळजबरीने व बेकायदेशीर मार्गांनी कर्जाची रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. संबंधित पोलीस अधिकार्‍यांकडे एक लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे, ज्यात असे नमूद केले आहे की, अशी कृत्ये बेकायदेशीर असून ती छळवणुकीच्या स्वरूपाची आहेत आणि सार्वजनिक सुरक्षा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करतात. वसुली एजंटांना रस्त्यावर वाहने थांबवण्याचा किंवा वसुलीसाठी बळाचा वापर करण्याचा कोणताही अधिकार नाही. वकील श्वेता सराफ यांनी सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि रस्त्यावर कोणतीही अज्ञात व्यक्ती अशी कृत्ये करताना दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी यावर जोर दिला की, जबाबदार नागरिक म्हणून आपण कोणतीही बेकायदेशीर कृती सहन करू नये, जरी ती कर्ज थकवणार्‍यांशी संबंधित समस्या असली तरी. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही व्यक्तीचा छळ किंवा बेकायदेशीर वागणूक दिली जाऊ शकत नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक आहे.    

एकनाथ शिंदे यांचे हस्ते, २९ मार्चला गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा भव्य अमृतमहोत्सवी सत्कार

एकनाथ शिंदे यांचे हस्ते, २९ मार्चला गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा भव्य अमृतमहोत्सवी सत्कार अनिल ठाणेकर ठाणे, आपल्या गायकीने मराठी गढल सातासमुद्रापार पोहोचविणारे गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा निमित्त ‘स्नेहगझल’ या भव्य सोहळ्याचे आयोजन २९ मार्च, दुपारी ४.३० वाजता राम गणेश गडकरी रंगायतन येथे करण्यात आले आहे. या सोहळ्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भीमराव पांचाळे यांचा सत्कार करण्यात येणार असून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि प्रख्यात गायक पद्मश्री सुरेश वाडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या सोहळ्याच्या निमित्ताने गझलनवाज भीमराव पांचाळे आणि डॅा. भाग्यश्री पांचाळे यांची मराठी आणि उर्दू गझलांची भावरम्य स्नेहमैफिल होणार आहे.मराठी गझलला केवळ महाराष्ट्रातच नाही तर सातासमुद्रापार पोहोचविणारे, मराठी गजलला आपल्या कतृत्वाने नावलौकिक मिळवून देणारे गझलनवाज पं. भीमराव पांचाळे ३० मार्चला अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. गझल सम्राट सुरेश भटसाहेबांनंतर मराठी गझलला सुवर्णकाळ प्राप्त करून देण्याचे प्रामाणिक काम त्यांनी केले आहे. मराठी गझलला सातासमुद्रापार नेले. तिला लोकप्रियता मिळवून दिली. गझल कार्यशाळा, गझल मुशायरे, गझल मैफिली आयोजित करून मराठी गझल लोकप्रिय करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. मराठी गझलला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी गझल सागर प्रतिष्ठानची स्थापना केली. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये अखिल भारतीय मराठी गझल संमेलने आयोजित केली. या प्रवासात त्यांना अनेक साथीदार मिळाले. त्यांच्या साथीने हा गझलप्रवास अधिक व्यापक आणि समृद्ध होत गेला. त्या सर्व जुन्या-नव्या साथीदारांच्या साक्षीने हा साहळा नटणार आहे. गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी मराठी गजलसाठी केलेल्या अतुलनीय कामगिरीची दखल राज्य आणि केंद्र शासन तसेच अनेक संस्थांनी त्यांना सन्मानित केले आहे.  अलीकडेच महाराष्ट्र शासनाने भारतरत्न लता मंगेशकर या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या सोहळ्याचे निमित्त साधून गझलनवाज भीमराव पांचाळे आणि डॅा. भाग्यश्री पांचाळे यांची मराठी आणि उर्दू गझलांची भावरम्य मैफिल आयोजित करण्यात आली असून ही मैफिल सर्वांसाठी विनाशुल्क आहे. या मैफिलीच्या सन्मानिका राम गणेश गडकरी रंगायतन येथे उपलब्ध असणार आहेत. तरी गझल रसिकांनी या मैफिलीचा लाभ घ्यावा असे आवाहन गझलनवाज भीमराव पांचाळे सत्कार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

बाबासाहेबांच्या विचारांच्या अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी सारख्या संस्था समाजाचा उत्कर्ष करतील- ॲड. संघराज रुपवते

बाबासाहेबांच्या विचारांच्या अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी सारख्या संस्था समाजाचा उत्कर्ष करतील- ॲड. संघराज रुपवते अनिल ठाणेकर ठाणे, मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात “अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी”चा तिसरा वर्धापन दिन सोहळा,संस्थेचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक ज.वि.पवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी शानदारपणे साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे सर्वोच्च न्यायालयाचे महाधिवक्ता ॲडव्होकेट संघराज रुपवते यांनी अपरांत साहित्य कला प्रबोधिनीच्या लौकिकाला साजेल असं,गालिब पासून वामनदादा कर्डक यांच्या शेरोशायरीची पाखरण करत ‘काव्यमय न्याय’देणारं भाष्य केलं. ते म्हणाले, ‘आजच्या नेत्यांनी विश्वासार्हता गमावली आहे. परंतु अपरान्त सारख्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपणाऱ्या साहित्यिक संस्था बाबासाहेबांचे विचार नक्कीच पुढे नेतील.’ अपरान्तचे सरचिटणीस पत्रकार संदेश पवार यांनी आपल्या प्रास्ताविकात चिपळूण,कणकवली आणि क्रांती भूमी महाड येथे भरवलेल्या तीन “सम्यक साहित्य संगीती” पुस्तक प्रकाशन,काव्य संमेलनं,अपरान्त विशेषांक वगैरे वाटचाली विषयी आढावा घेतला.केंद्रीय उपाध्यक्ष आणि  पदसिद्ध रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संजय गमरे आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले,”संस्था आणि व्हाट्सअप ग्रुप या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आजच्या वर्धापन दिनापेक्षा जिल्हास्तरीय कार्यक्रमाला भरपूर गर्दी असते. संघटनेची भरीव बांधणी अद्याप म्हणावी तशी झालेली नाही. ‘पुस्तक पूर्व प्रकाशन योजना’ अपरान्तच्या वतीने राबवली गेली पाहिजे.”कार्याध्यक्ष प्राध्यापक आनंद देवडेकर सर म्हणाले,”अपरान्त संस्था बुद्धिझम आणि बाबासाहेबांच्या विचारांच्या मार्गानेच गेली पाहिजे. इतर संस्थेसारखी त्याची जडणघडण न होता. ध्येय आणि उद्दिष्ट लक्षात ठेवून संस्थेची वाटचाल केली पाहिजे.”आपल्या अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पॅंथर आणि साहित्यिक ज.वि.पवार यांनी केंद्रीय कार्यकारिणी आणि उपस्थितांना भावनिक आवाहन केले. “तुम्ही सगळेजण चांगलं काम करीत आहात. माझ्या सहवासातल्या प्रत्येक लेखकाचं पुस्तक लवकरात लवकर आलं पाहिजे. मी अजूनही काम करीत आहे. करीत राहणार! परंतु इतक्या प्रदीर्घ वाटचालीने थकलो आहे. तरी तुम्ही माझ्या खांद्यावर उभे रहा.आणि अपरान्तच्या माध्यमातून आंबेडकरी विचारांचे दूरदृष्टीने व्हिजन पहा.मी तुम्हाला सर्वतोपरी मदत करीन.”अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या तिसऱ्या वर्धापन दिन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट संघराज रूपवते, विद्यमान संस्थापक अध्यक्ष ज.वी.पवार ,कार्याध्यक्ष प्रा.आनंद देवडेकर,ज्येष्ठ केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. श्रीधर पवार यांच्या अमेरिका स्थित आंबेडकरी चळवळ चालवणाऱ्या मुलीचे सृजनाचे दोन इंटरव्यू असलेले छोट्या पुस्तिकेचे प्रकाशन झाले.