Category: ठाणे

Thane news

‘बिट्टू बॉस’ बिबट्याच्या आठवणींना सरनाईक कुटुंबियांचा भावनिक उजाळा

‘बिट्टू बॉस’ बिबट्याच्या आठवणींना सरनाईक कुटुंबियांचा भावनिक उजाळा अनिल ठाणेकर ठाणे, सहा वर्षांपूर्वी पूर्वेशच्या वाढदिवसानिमित्त संजय गांधी नॅशनल पार्क येथून दत्तक घेतलेला बिबट्याचा बछडा ‘बिट्टू बॉस’ आता कायमचा निरोप देऊन गेला. या छोट्या जीवाच्या जाण्याने आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. अशी भावना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. प्रताप सरनाईक म्हणाले ‘बिट्टू बॉस’ हा केवळ एक प्राणी नव्हता, तर कुटुंबाचा जिव्हाळ्याचा सदस्य बनला होता. त्याच्या निरागस हालचाली, लाघवी स्वभाव आणि प्रेमळ वागणुकीने सर्वांच्या मनात खास स्थान निर्माण केले होते. गेल्या सहा वर्षांत त्याने कुटुंबीयांशी एक अतूट नातं जोडले होते. आता त्याच्या जाण्याने घरातील प्रत्येक कोपऱ्यात त्याच्या आठवणी दाटून आल्या आहेत. त्याच्यासोबत घालवलेले क्षण, त्याचा निरागसपणा आणि जिव्हाळा हे सर्व आता स्मरणरूपानेच उरले आहेत. आमच्या साठी ही अपूरणीय हानी असून, ‘बिट्टू बॉस’ची जागा कोणीच घेऊ शकणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ‘बिट्टू बॉस, तुझ्या आठवणी आमच्या हृदयात सदैव जिवंत राहतील. तुझ्या आत्म्यास शांती लाभो,’ अशा भावनिक शब्दांत सरनाईक कुटुंबीयांनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

जिल्हा परिषदेत शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना अभिवादन

जिल्हा परिषदेत शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना अभिवादन अनिल ठाणेकर ठाणे, स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणारे महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा परिषद ठाणे येथे त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी देशासाठी दिलेल्या त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवत त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचा संकल्प व्यक्त केला.या कार्यक्रमास पशुसंवर्धन विभागाचे प्रमुख जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ. वल्लभ जोशी, सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय) डॉ. किर्ती डोईजोडे, जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे या अमर क्रांतिकारकांना अभिवादन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.

मुंब्रा पोलीस स्टेशनकडून रमजाननिमित्त गरजूंना राशन किट वाटप

मुंब्रा पोलीस स्टेशनकडून रमजाननिमित्त गरजूंना राशन किट वाटप दिवा: पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा पोलीस स्टेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत गरीब व गरजवंत नागरिकांसह शासकीय कामात सहकार्य करणाऱ्या पोलीस…

वन्य प्राण्यांची पाण्यासाठी वणवण

वन्य प्राण्यांची पाण्यासाठी वणवण शहापूरात वन्यप्राण्यांसाठी आणलेले कृत्रिम पाणवठे काष्ट विक्री आगारात पडून अविनाश उबाळे ठाणे : शहापूर तालुक्यातील प्रादेशिक वनविभागाच्या जंगलातील वन्यप्राण्यांना उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी कृत्रिम पाणवठ्यांचा पुरवठा करण्यात आला होता.परंतु धक्कादायक वास्तव म्हणजे हे बशीच्या आकाराचे सरकारी पाणवठे मार्च महिना संपत आला तरीही वनविभागाकडून जंगलात अद्यापही बसविण्यात आले नाहीत हे पाणवठे चक्क आसनगाव काष्ट विक्री आगारात भंगारात पडून असल्याचे संतापजनक चित्र येथे दिसत आहे.जंगलात पाणवठे न ठेवता अगदी निष्काळजीपणे हे कृत्रिम पानवठे येथे टाकून देण्यात आले आहेत.या प्रकारामुळे वनविभागाचा भोंगळ कारभार समोर येत आहे. उपवनसंरक्षक,कार्यालयाच्या प्रादेशिक वनविभागाच्या,शहापूर,धसई,डोळखांब,वाशाळा,विहीगाव,खर्डी या सहा वनपरिक्षेत्रीतील जंगलात हे कृत्रिम बशीच्या आकाराचे पाणवठे दाट जंगलात बसविण्यात येणार होते.येथील विस्तीर्ण व घनदाट अशा जंगलात बिबटे,तरस,कोल्हे,भेकर,नीलगाय चौशिंग,ससे,रानडुक्कर,वानर,रानमांजर यांसह अन्य लहान वन्यप्राणी व दुर्मिळ अशा पक्ष्यांचा अधिवास आढळतो.या प्राण्यांना उन्हाळ्यात जंगलातच त्यांच्या अधिवासात पिण्यासाठी पाणी मिळावे तसेच पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांनी जंगल सोडून गाव वस्त्यांवर व इतरत्र स्थलांतर करू नयेत यासाठी सरकारने बशीच्या आकाराचे  कृत्रिम असे पाणवठे म्हणजेच वॉटर होल जंगलात ठेवण्यासाठी वनविभागाला पुरवठा केले होते या कृत्रिम पाणवठ्यात वनविभागाकडून टँकर अथवा बैलगाडीने पाणी आणून ओतले जाणार असे प्रयोजन होते हे पाणवठे खरेदीसाठी वनविभागाकडून लाखो रुपयांचा निधीही खर्च करण्यात आला. परंतु हे कृत्रिम पाणवठे उन्हाळ्यातील मार्च महिना संपत आला तरीही जंगलात अद्यापही बसविण्यात आलेच नाहीत हे पाणवठे येथील काष्ट विक्री आगारात पडून असल्याचे संतापजनक असे चित्र पाहावयास मिळत आहे.जंगलात वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय करण्यात आलेली दिसत नाही.परिणामी पाण्याच्या शोधात पाणवठ्याकडे येणाऱ्या वन्यप्राण्यांना पाण्याअभावी येथून माघारी फिरावे लागते आहे.उन्हाच्या काहीलीनं पाण्यसाठी तहानेने व्याकूळ झालेल्या असंख्य वन्यप्राण्यांची व पक्ष्यांची पाण्याअभावी जंगलात घुसमट होत आहे.वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या अक्षरशः बेफिकिर व निष्काळजीपणामुळे हे पाणवठे जंगलात उन्हाळ्यात वेळेवर बसविण्यात आले नसल्याने परिणामी वन्य प्राण्यांना पाण्याच्या शोधात जंगलात वणवण भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. याकडे प्रादेशिक वनविभागाने गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे.

किर्तन व प्रवचन कार्यक्रमासह मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर

किर्तन व प्रवचन कार्यक्रमासह मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर उल्हासनगर : उल्हासनगर आगरी सेना ठाणे जिल्हाप्रमुख स्वर्गीय विठ्ठलजी तुकाराम जोशी यांच्या सातवे पुण्यस्मरण दिनानिमित्त ठाणे जिल्हा आगरी सेना नेते विजय जोशी यांनी किर्तन व प्रवचन कार्यक्रमासह मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते आयोजित करण्यात आलेले या शिबिरात मोफत नेत्र तपासणी, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, मोतीबिंदू निदान, व निवडक रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया ठेवण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. हा कार्यक्रम माणेरेगाव येथील सोमेश्वर पॅलेस या ठिकाणी शुक्रवारी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला होता. तसेच ह. भ. प राजेश महाराज देसाई यांचे कीर्तन व प्रवचन ठेवण्यात आले होते. नागरिकांनी कीर्तन व प्रवचनला मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थिती भाजप जिल्हा प्रमुख नंदू परब , शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी, नगरसेवक महेशजी पाटील, निलेशजी शिंदे, नवीनजी गवळी, आगरी सेना कार्यअध्यक्ष प्रदीप साळवी, जिल्हा प्रमुख चंद्रकांतजी ठाणकर, संघर्ष समितीचे सुमित वजे, संजय फुलोरे ,नगरसेविका पूजा गायकवाड, कविता म्हात्रे , सरोज रॉय, इंदिरा तरे, हेमलता पावशे आदी मान्यवर उपस्थित होते अशी माहिती उल्हासनगर आगरी सेना तालुकाप्रमुख जितेंद्र जोशी यांनी दिली.

साबेगाव खाडी परिसरात विसर्जन व दशक्रिया घाटासाठी पाठपुरावा सुरू

साबेगाव खाडी परिसरात विसर्जन व दशक्रिया घाटासाठी पाठपुरावा सुरू खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना नगरसेविका अर्चना पाटील यांच्याकडून निवेदन आरती परब दिवा: साबेगाव खाडी परिसरात दिवा शहरासाठी स्वतंत्र व भव्य गणेश विसर्जन घाट तसेच दशक्रिया विधीसाठी घाट उभारण्याची मागणी पुढे आली असून, यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे यांची नगरसेविका अर्चना पाटील यांनी भेट घेऊन निवेदन सादर केले. या प्रस्तावासाठी महाराष्ट्र सागरी महामंडळ यांची परवानगी मिळविण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. दिवा शहरातील वाढती लोकवस्ती आणि मोठ्या सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी सध्या शहराबाहेर जावे लागत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शहरातच योग्य व सुरक्षित विसर्जन व्यवस्था उभी करावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. नगरसेविका अर्चना निलेश पाटील यांनी या प्रकल्पाची सविस्तर संकल्पना खासदारांना समजावून सांगितली. या संकल्पनेचे कौतुक करत “ही चांगली आणि उपयुक्त योजना आहे,” असे मत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. संबंधित विभागाला याबाबत पत्र पाठवून पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. माजी उपमहापौर तथा शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या सूचनेनुसार या कामाचा पाठपुरावा सुरू असल्याचे नगरसेविका अर्चना पाटील यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक बाबाजी बाळाराम पाटील आणि विभाग प्रमुख नीलेश पाटील हेही उपस्थित होते. या प्रस्तावित घाटामुळे दिवा शहरातील नागरिकांना गणेश विसर्जन व दशक्रिया विधींसाठी सुरक्षित, सोयीस्कर आणि स्थानिक सुविधा उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कल्याणमधिल भूमाफियांविरूध्द ‘एमआरटीपी’चा गुन्हा दाखल

कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत २७ गावातील द्वारली येथे बेकायदा इमारत उभारणाऱ्या तीन भूमाफियांच्या विरूध्द आय प्रभागाच्या अधीक्षकांनी वरिष्ठांच्या आदेशावरून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना कायद्याने (एमआरटीपी) कलमाने तक्रार केली आहे.…

रेल्वेच्या खांबावर चढून अज्ञात युवकाचा धिंगाणा

 करंट लागून खाली पडला ० रेल्वेसेवा विस्कळीत कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात एक अज्ञात व्यक्तीने ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढून धिंगाणा घातल्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला, तो जवळपास दोन तास त्या खांबावरच…

आसाममध्ये भाजपाचा प्रवास ५ जागांपासून ७५ पर्यंतचा  भाग पहिला

राजू रावल पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा होताच देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी येथे निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली…

 बेतवडे ग्रामस्थांचा बिल्डरविरोधात संताप

बेतवडे ग्रामस्थांचा बिल्डरविरोधात संताप करारातील त्रुटी, RERA नोंदणीचा अभाव; २८ मार्चला मोर्चा कल्याण: दिवा-बेतवडे परिसरात एका खाजगी बांधकाम व्यावसायिकाविरोधात ग्रामस्थांचा संताप उसळला असून, करारातील त्रुटी, विकास कामांबाबतची अनिश्चितता आणि जबरदस्तीने जमीन हस्तगत केल्याचे आरोप समोर आले आहेत. गाव समितीला डावलून व्यवहार केल्याचा आरोप करत स्थानिकांनी “ही सरळ फसवणूक” असल्याचे म्हटले आहे. ग्रामस्थांच्या बैठकीत अनेक गंभीर मुद्दे पुढे आले. करारामध्ये विकास कामांची सुरुवात कधी होणार, याचा स्पष्ट उल्लेख नसल्याचे वकील तृप्ती पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच संबंधित प्रकल्पाची RERA नोंदणी नसल्याचा आरोपही करण्यात आला. “करार व्यवस्थित नसल्याने पुढे मोठे नुकसान होऊ शकते,” असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी उपस्थितांनी सांगितले की, न्यायालयीन स्थगिती (स्टे) असतानाही बांधकाम सुरू असल्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे तातडीने न्यायालयात जाऊन स्थगिती आदेश मिळवण्याची आणि कायदेशीर लढा उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली. पोलीस आयुक्तालयाकडे निवेदन देण्याचा निर्णयही घेण्यात आला असून, “खोटे गुन्हे दाखल करू नका, कायद्याच्या चौकटीत राहूनच लढा द्या,” असे पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले. लोकप्रतिनिधींनीही या प्रकरणात भूमिका मांडली. आमदार राजेश मोरे यांनी फोनद्वारे “ग्रामस्थ जो निर्णय घेतील, त्याला पाठिंबा देऊ,” असे स्पष्ट केले. नगरसेवक दिपक जाधव यांनीही “ठरलेल्या कालावधीत मोबदला मिळालेला नाही,” असे सांगत ग्रामस्थांना पाठिंबा जाहीर केला. ब्रह्म पाटील यांनी “या प्रश्नात राजकारण आणू नये,” असे मत व्यक्त केले. ग्रामस्थ नेते संतोष केणे यांनी “वाद घालण्यात अर्थ नाही, एकजूट ठेवून कायदेशीर मार्गाने लढा देणे गरजेचे आहे,” असे सांगितले. रमाकांत मढवी आणि काळू कोमासकर यांनीही बिल्डरकडून विश्वासघात व फसवणुकीचे आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर २८ मार्च रोजी मुंब्रा येथे मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “आंदोलन योग्य ठिकाणी आणि कायदेशीर चौकटीतच होईल, मात्र गरज पडल्यास आक्रमक भूमिकाही घ्यावी लागेल,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला. बिल्डरविरोधात “फसवणूक” दर्शवणारे फलक लावण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, विविध गावांमधील ग्रामस्थ आणि संघटनांनी या लढ्याला पाठिंबा दर्शवला असून, आगरी सेनेनेही समर्थन जाहीर केले आहे. “गावपण टिकवण्यासाठी आणि हक्कांसाठी न्यायालयीन तसेच रस्त्यावरची लढाई एकत्रितपणे लढू,” असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.