Category: ठाणे

Thane news

मिरा-भाईंदर महापालिकेचा संतुलित अर्थसंकल्प सादर

मिरा-भाईंदर महापालिकेचा संतुलित अर्थसंकल्प सादर शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधांवर मोठा भर महापालिकेतील कामाविषयी आमदारांचं पत्रकारांसमोर स्पष्टीकरण अरविंद जोशी मिरा-भाईंदर : शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी मिरा-भाईंदर महानगरपालिका कडून संतुलित अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून शिक्षण, आरोग्य, परिवहन व पायाभूत सुविधांमध्ये मोठे बदल घडवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. पुढील एका वर्षात शहरात लक्षणीय बदल दिसून येतील,असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.अशी माहिती भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माननीय महापौर डिंपल मेहता, माननीय उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील व माननीय स्थायी समिती सभापती हसमुख गेहलोत उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घेत CBSE बोर्ड सुरू करण्याचा विचार पुढे आणण्यात आला आहे. तसेच एका वर्गात ५० टक्के खाजगी विद्यार्थी व ५० टक्के महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांचा समावेश करण्याचा अभिनव प्रयोग, यासोबतच शिक्षण संस्थांनी शाळा दत्तक घेण्याची संकल्पना, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बस सेवा सुरू करण्याचाही प्रस्ताव आहे.याच बरोबर क्रीडा विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विपक्षण केंद्र, पशु चिकित्सक, अग्निशमन संगणक, मालमत्ता शोध मोहीम, जेष्ठ नागरिक, तलाव सुशोभीकरण, नवीन रस्ते, नाले, वैध्यकीय विभाग, औषध आरोग्य केंद्र, घणकचरा अश्या अनेक गोष्टीचा देखील अर्थ संकल्पात समावेश करण्यात आला आहे. 100 नवी शौचालय, विद्यमान शौचालयांची स्थिती सुधारली जाणार आहे. वाहतूक व बाजार व्यवस्थापनासाठी रामदेव पार्क आणि मिरारोड स्थानक परिसरात तळमजल्यावर फेरीवाल्यांसाठी व्यवस्था व त्यावर पार्किंग सुविधा उभारण्यात येणार आहे. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचेही स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. तसेच १० एप्रिलपासून शहरातील रस्ते रुंदीकरणाच्या कामांना सुरुवात होणार आहे. पाणी व्यवस्थापनासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग, परिवहन सेवेतही सुधारणा, आरोग्य क्षेत्रात मोठा निर्णय घेत शहरात MRI मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा पुरवठा आणि डॉक्टरांची उपलब्धता सुनिश्चित केली जाणार आहे. एकूणच, या अर्थसंकल्पातून मिरा-भाईंदर शहराच्या विकासाचा रोडमॅप स्पष्ट झाला असून आगामी काळात नागरिकांना अधिक सुविधा आणि सुधारित पायाभूत व्यवस्था मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. प्लेझन्ट पार्क परिसरात लागलेल्या आगीमध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई देण्या संदर्भात कोणताही निर्णय झाला नसल्याचे, तसेच यासंदर्भात आलेल्या प्रस्तानावर विचार चालू असल्याचे आमदार नरेंद्र मेहता म्हणाले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तरं देत होते. आगी नंतरच्या केलेल्या पाहणीत आमदार तसेच महापौर आणि उपमहापौर यांनी लोकांना नुकसान भरपाईचं आश्वासन दिलं होतं.

४८व्या इंडियन मास्टर्स (व्हेटरन) राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत ठाण्याच्या ज्येष्ठांचा ‘पराक्रम’

जिद्द, अनुभव आणि खेळातील उत्कटतेची दोन कांस्य पदकांत झळाळी! गोवा येथे उत्साहात पार पडलेल्या योनेक्स-सनराईज ४८व्या इंडियन मास्टर्स (व्हेटरन) राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२६ मध्ये देशभरातील तब्बल २००७ खेळाडूंनी सहभाग नोंदवत स्पर्धेची प्रतिष्ठा अधिक उंचावली. या अत्यंत स्पर्धात्मक आणि उच्च दर्जाच्या राष्ट्रीय स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या ज्येष्ठ आणि अनुभवी खेळाडूंनी आपल्या जिद्दीच्या, चिकाटीच्या आणि खेळावरील निष्ठेच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी करत दोन कांस्य पदकांची मानाची कमाई केली. अजिता रविंद्रन यांनी महिला एकेरी ५० वर्षांखालील गटात तर विनोद धराप यांनी पुरुष दुहेरी ७५ वर्षांवरील गटात चमकदार यश मिळवत ठाण्याच्या क्रीडा परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला. ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडांगणातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल येथे सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेअंतर्गत चालणाऱ्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे हे दोन्ही खेळाडू केवळ ज्येष्ठच नव्हे तर तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. सातत्यपूर्ण सराव, शिस्तबद्ध जीवनशैली आणि खेळावरील अपार प्रेम याच्या जोरावर त्यांनी राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला आहे. महिला एकेरी ५० वर्षांखालील गटात अजिता रविंद्रन यांनी अत्यंत प्रभावी आणि लढाऊ खेळाचे दर्शन घडवले. त्यांनी पहिल्याच फेरीत गुजरातच्या आरती महेश्वरी हिला २१-११, २१-१० अशा सरळ सेटमध्ये पराभूत करत आत्मविश्वासपूर्ण सुरुवात केली. त्यानंतर दिल्लीच्या अंशू महाजन हिच्याविरुद्धचा सामना हा खऱ्या अर्थाने त्यांच्या जिद्दीची परीक्षा घेणारा ठरला. पहिला सेट गमावल्यानंतर त्यांनी जबरदस्त पुनरागमन करत २२-२० असा थरारक दुसरा सेट जिंकला आणि तिसऱ्या सेटमध्ये २१-९ अशी सरशी करत सामना आपल्या नावावर केला. पुढील फेरीत उत्तर प्रदेशच्या चौथ्या मानांकित सुषमा हिला २१-५, २१-४ अशा एकतर्फी सामन्यात सहज पराभूत करत त्यांनी आपली वर्चस्व सिद्ध केले. उपांत्यपूर्व फेरीत उर्वशी थापा विरुद्धच्या चुरशीच्या लढतीत त्यांनी संयम, कौशल्य आणि अनुभव यांचा उत्कृष्ट संगम साधत २१-१६, १६-२१, २१-१७ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत त्यांना बलाढ्य प्रतिस्पर्धी शालिनी शेट्टीविरुद्ध झुंज द्यावी लागली आणि अखेर पराभव पत्करावा लागला, मात्र त्यांच्या एकूण कामगिरीने सर्वांचे मन जिंकले. पुरुष दुहेरी ७५ वर्षांवरील गटात विनोद धराप यांनी त्यांच्या जोडीदार आनंद घाटे यांच्या समवेत उत्कृष्ट समन्वय आणि अनुभवाच्या जोरावर कांस्य पदकाची कमाई केली. त्यांनी तेलंगणाच्या रोमेश चंद्र ग्रोव्हर आणि कीर्ती मेहता या जोडीवर २१-१९, २१-१४ असा शानदार विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांच्या खेळात दिसलेली समज, टायमिंग आणि कोर्टवरील उपस्थिती यामुळे प्रेक्षकांनी त्यांचे विशेष कौतुक केले. उपांत्य फेरीत त्यांना पराभव पत्करावा लागला, मात्र त्यांनी दिलेली लढत अत्यंत उल्लेखनीय ठरली. या यशाबद्दल मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी अत्यंत समाधान व्यक्त करत सांगितले की, “ज्येष्ठ वयोगटातही ठाण्याचे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर अशी सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरी करत आहेत, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्यांच्या जिद्दीमुळे आणि खेळावरील प्रेमामुळे ते केवळ पदके जिंकत नाहीत, तर संपूर्ण पिढीला प्रेरणा देत आहेत.” ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपायुक्त मीनल पलांडे यांनीही खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करत सांगितले की, “ज्येष्ठ खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश ठाण्याच्या क्रीडा संस्कृतीचे प्रतीक आहे. त्यांच्या परिश्रम, सातत्य आणि खेळातील आवड यामुळे ते सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.” 00000000

धोरणात्मक बदलावर जोर द्या – प्रशांत जाधवर

धोरणात्मक बदलावर जोर द्या – प्रशांत जाधवर पार्किंग प्लाझा, ए आय, रोबोटिक्स तंत्रज्ञान, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातली धोरणात्मक बदलांबाबत मांडले विचार ठाणे : ठाणे शहराला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि धोरणात्मक उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचे ठाम प्रतिपादन ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सहाचे नगरसेवक प्रशांत ( राजा) जाधवर यांनी केले. ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पीय चर्चेत सहभागी होत जाधवर यांनी शहराच्या ठोस विकासाची गरज बोलून दाखवताना विकासाबरोबर पालिकेच्या उत्पन्नात भर पडण्यासाठी काही उपायही सुचवले आहेत. ठाणे महापालिकेचा पुढील आर्थिक वर्षाचा ६२२१ कोटी १२ रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी नुकताच सादर केला. ठाणे महापालिकेत पहिल्यांदाच निवडून आलेल्या प्रशांत (राजा) जाधवर यांनी अर्थसंकल्पावर सुरु असलेल्या चर्चेत वेगवेगळे मुद्दे, आर्थिक उपाय योजना आणि उत्पन्नाच्या स्त्रोताबाबत विचार मांडून सभागृहाचे लक्ष वेधून घेत राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा दाखला दिला. विकासाभिमुख प्रशासनाकरिता आर्थिक नीतीची अमंलबजावणी करण्यासाठी उत्तम प्रशासकाची आवश्यकता असल्याची यशवंतराव चव्हाणांच्या वाक्याची आठवण करुन दिली. प्रशासकीय सुधारणा आणि महसूलवाढी करता जाधवर यांनी पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागा ताब्यात घेऊन त्याठिकाणी वाहनतळ सुरु करणे, परिवहन सेवेत नव्याने सामील होणाऱ्या दुमजली बसेस फिरते डिजिटल फलक लावणे, महापलिकेच्या शाळा शालेय वेळेनंतर नाममात्र दरात खासगी शिबिरे, कार्यक्रमांना भाड्याने देणे, करवसुली करण्यासाठी १०० टक्के कर भरणाऱ्या गृहनिर्माण संकुलनांना विशेष सवलत देणे, स्वछ व प्रमाणिक गृहनिर्माण संकुल स्पर्धा घेण्याची मागणी केली आहे. याशिवाय शहरातील वाढते प्रदूषण टाळण्यासाठी नवीन बांधकामांच्या जागी डास्ट कंट्रोल युनिट सक्तीचे करण्याची गरज जाधवर यांनी बोलून दाखविली. सुमारे एक कोटी रुपयांचे नगरसेवकांचे अभ्यास दौरे आयोजित करण्यापेक्षा शहरात राष्ट्रीय महापौर परिषद आयोजित करून त्यातून विकास कामाबाबत विचाराची देवघेव करण्याची सूचना जाधवर यांनी यावेळी मांडली. पालिकेच्या शाळांची रंगरंगोटी करण्यापेक्षा शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम, रोबोटिक्स लॅब, परदेशी भाषांचे वर्ग सुरु करण्याची आग्रही मागणीही केली. स्वतः राष्ट्रीय कबड्डीपटू असल्याने दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये विविध खेळांचे हाय परफॉर्मन्स सेंटर सुरु करण्याची मागणी केली. महापालिकेच्या तिजोरीत वाढ होण्यासाठी कांदळवनाभोवती लोखंडी कुंपण लावण्याऐवजी त्याठिकाणी पर्यटन क्षेत्र तयार करताना लाकडी वॉकवेज, बोटिंग सुरू करण्याची मागणी जाधवर यांनी केली. शहरातील सुमारे ९५टक्के पाण्याचे मीटर्स चोरी झाले असल्याने, सरसकट पाण्याचे मीटर हटवून त्याऐवजी १५६० रुपयांनुसार पाण्याची देयके आकारण्याची सूचना केली. शहरातील नाल्यांची पक्की डागडुजी करणे, विठ्ठल क्रीडा मैदान आणि त्याच्या शेजारी असणाऱ्या छत्रपती शिवजी महाराजांच्या स्मारक परिसराचे सुशोभिकरण करण्याची आवश्यकता असल्याची भावना जाधवर यांनी बोलून दाखवली. प्रशांत (राजा) जाधवर यांनी शिवसेना ( एकनाथ शिंदे गट) तिकिटावर प्रथमच निवडणूक लढवून पहिल्याच प्रयत्नात प्रभाग क्रमांक सहामधून महापालिकेत प्रवेश केला आहे.

ठाण्यात भ्रष्टाचाराचे ‘गटार’ २५६० कोटींचा घोटाळा !

ठाण्यात भ्रष्टाचाराचे ‘गटार’ २५६० कोटींचा घोटाळा ! गटार पायवाटांमध्ये भ्रष्टाचाराचा भाजपाचाच आरोप  श्वेतपत्रिका काढण्याची मृणाल पेंडसे यांची मागणी सिद्धेश शिगवण ठाणे : भ्रष्ट्राचार करणाऱ्यांनी ‘गटाराला’ही सोडले नाही. गेल्या चार वर्षांत ठाणे महानगरपालिकेला राज्य सरकारकडून तब्बल…

पनवेलमध्ये २२ शाळा अनधिकृत

पनवेलमध्ये २२ शाळा अनधिकृत पनवेल – पनवेल तालुक्यामध्ये आतापर्यंत एकुण २२ शाळा अनधिकृत असल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ११ अनधिकृत शाळांवर गुन्हे दाखल झाले आहेत. अजून उलवे येथील एका शाळेवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाची सुरू आहे. पनवेल तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी शाहू सतपाल यांनी पदभार स्विकारल्यापासून अनधिकृत शाळांविरोधात कठोर मोहीम हाती घेतली आहे. सतपाल यांनी पदभार स्विकारला त्यावेळेस १२ शाळा अनधिकृतपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर प्रत्येक महिन्याला एक ते दोन अशा आतापर्यंत ११ अनधिकृत शाळा चालविणा-या शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापकावर सतपाल यांनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले. पनवेल तालुका पोलीस ठाण्यात चार दिवसांपूर्वी (ता.२६ मार्च) शिक्षण विभागाच्या तक्रारीनंतर नेरे येथील न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थाचालक, अध्यक्ष आणि मुख्याध्यापकांविरोधात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गट शिक्षणाधिकारी सतपाल यांनी दिलेल्या तक्रारीत २०२३ पासून ही शाळा अनधिकृत चालविली जात होती. यामुळे पालक व विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या शाळेत पहिली ते आठवी या इयत्तेमधील ६९ मुले शिकत होती. पनवेल तालुक्यामध्ये अजून उलवे येथील एका अनधिकृत शाळेविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या व्यतिरीक्त तालुक्यामध्ये अजून १० शाळा अनधिकृत आहेत. गटशिक्षण अधिका-यांनी केंद्रप्रमुखांना अनधिकृत शाळेविषयी सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. त्यामध्ये या १० शाळा अनधिकृत असल्याचे आढळले आहे.

ठाणे – पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची शिवसेनेकडून प्राथमिक मोर्चेबांधणी

ठाणे – पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची शिवसेनेकडून प्राथमिक मोर्चेबांधणी ठाणे:  ठाणे-पालघर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम व त्यासाठी लागणाऱ्या मतदार यादीचे काम चालू झालेले आहे. तसेच नजीकच्या काळामध्ये मतदार यादी कायम होऊन नवीन यादी जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ठाणे महानगरपालिका येथे महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, सभागृह नेते हणमंत जगदाळे, शिवसेना सचिव राम रेपाळे, महाराष्ट्र सहकार बोर्डाचे संचालक अरुण पानसरे, शिवसेना गटनेते पवन कदम, शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी संघटक मिनाक्षी शिंदे, नगरसेवक बाबाजी पाटील व शिवसेना पक्षाचे सन्मा नगरसेवक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेन पक्ष ज्या पध्दतीने महाराष्ट्रामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे त्याप्रमाणे सहकार क्षेत्रामध्ये यशस्वी पदार्पण करत आहे. त्याचबरोबर सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रगण्‌य आहे असे मानले जाते. सहकाराच्या माध्यमातून जिल्हयातील सहकार क्षेत्रामध्ये नागरिकांच्या अडचणी सोडविण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून करण्यात येते. त्यामुळे सर्व दृष्टीने एकत्र येवून ठाणे जिल्हा मध्यवर्ती व पालघर जिल्हा मध्यवर्ती निवडणूक लढवावी अशा प्रकारचे साकडे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचेकडे निवेदनाद्वारे मांडण्याबाबतची भूमिका घेतली आहे. या संदर्भात मतदार यादी करण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांचे व पतसंस्थांचे ठराव किंवा पुढील प्रक्रिया राबविण्याबाबत आज झालेल्या बैठकीमध्ये ठाणे शहरातील सर्व सन्मा. नगरसेवकांना त्याच्या प्रभागामध्ये असणाऱ्या गृहनिर्माण संस्था व पतसंस्था यांचे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी नियमाप्रमाणे जो ठराव लागतो तो ठराव 5 तारखेच्या आत अनिल भोर, खांडेकर व ज्ञानेश्वर गायकवाड समन्वयक म्हणून त्यांचेकडून देणेबाबतचा निर्णय घेण्यात आला. सर्व पदाधिकारी, ठाणे व पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्व पदाधिकारी एकत्र येऊन शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचेबरोबर निवेदनाद्वारे चर्चा करतील व त्याप्रमाणे निवडणुकीची तयारी करण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला.

जुन्या ठाणे शहराच्या विकासाचा महापालिकेला विसर : नम्रता कोळी

जुन्या ठाणे शहराच्या विकासाचा महापालिकेला विसर : नम्रता कोळी फेरीवाल्यांवरील दंड ५ हजार रुपये करावा ठाणे  : ठाणे महापालिकेने नव्या ठाणे शहरात विविध विकास प्रकल्प राबवितानाच, जुन्या ठाणे शहराचा विसर पडू देऊ नये, अशी सूचना भाजपच्या नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पीय चर्चेवेळी केली. तसेच शहराच्या विविध भागातील फेरीवाल्यांकडील साहित्य जप्त केल्यानंतर १२०० रुपयांऐवजी किमान ५ हजार रुपये दंड आकारावा, अशी मागणीही नम्रता कोळी यांनी केली. ठाणे महापालिकेकडून नव्याने वसलेल्या ठाणे शहरात विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पांबद्दल आनंद आहे. परंतु, नवे प्रकल्प राबविताना जुन्या शहराचा विचार करायला हवा. गायमुख, नागला बंदर, बाळकूम, कोपरी येथे खाडीकिनारी सुशोभिकरण व पर्यटन सुविधा निर्माण करण्यात आल्या. मात्र, माझ्या प्रभागातील व जुन्या ठाण्यातील महागिरी खाडी परिसराला वगळण्यात आले. या खाडीत साचलेला गाळ नालेसफाईच्या मोहिमेतून काढण्याची मागणीही पूर्ण झालेली नाही, याबद्दल नम्रता कोळी यांनी खंत व्यक्त केली. ठाणे शहराच्या विविध भागातून येणारे सांडपाणी प्रक्रियेविना थेट खाडीमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) उभारावे, अशी मागणीही त्यांनी केली. ठाणे रेल्वे स्टेशन ते कोर्ट नाका, अशोक टॉकीज ते सिडको बस स्टॉप, सिद्धिविनायक मंदिर ते तलावपाळी पर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. त्यांच्याविरोधात महापालिकेकडून ठोस कारवाई केली जात नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना चालण्यासाठी जागा नाही. या रस्त्यावरूनच टीएमटीची वाहतूक सुरू असल्याने लाखो लोक सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडीत अडकतात. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरुपी अतिक्रमण विरोधी पथकाची जीप फिरती ठेवावी. तसेच बेकायदा फेरीवाल्यांकडून सामान व साहित्य जप्त केल्यानंतर ते सोडविण्यासाठी किमान ५ हजार रुपये दंड आकारावा, अशी मागणी नगरसेविका नम्रता कोळी यांनी केली. तसेच जुन्या स्टेशन रोडवर वाहतूककोंडी सोडविण्यासाठी १० वॉर्डनची नियुक्ती करण्याची मागणीही त्यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारासमोरील शाळा क्र. १ बंद आहे. या शाळेच्या ठिकाणी नवी इमारत उभारून तेथे महापालिकेची सीबीएससी शाळा सुरू करावी. तसेच चरई येथील जलकुंभासाठी तरतूद करावी, अशी मागणीही नगरसेविका नम्रता कोळी यांनी केली.

ठाणे जिल्ह्याचा डिजिटल कायापालट

ठाणे जिल्ह्याचा डिजिटल कायापालट जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव अनिल ठाणेकर ठाणे, महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने नागरीकरण होणारा आणि औद्योगिकदृष्ट्या प्रगत जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्याने आता डिजिटल प्रशासनाच्या क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. जिल्ह्याचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, शासकीय सेवा शेवटच्या घटकापर्यंत पारदर्शकपणे पोहोचविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. हे आव्हान स्वीकारून जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘ई-गव्हर्नन्स सुधारणा अभियानांतर्गत राबविलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांमुळे ठाणे जिल्हा आज संपूर्ण राज्यासाठी एक प्रेरणादायी मॉडेल म्हणून उदयास आला आहे. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित विशेष कार्यक्रमात ठाणे जिल्हा प्रशासनाचा विशेष गौरव करण्यात आला. प्रशासकीय पारदर्शकता वाढविण्यासाठी डॉ.पांचाळ यांनी तंत्रज्ञानाचा वापर करीत ‘सेवा संवाद’ आणि ‘डिजी संवाद’ सारखे महत्त्वाचे उपक्रम कार्यान्वित केले आहेत. १५ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झालेल्या ‘सेवा संवाद’ या उपक्रमामुळे जिल्ह्यातील ८७३ ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांच्या कामकाजात मोठी शिस्त आली आहे. प्रत्येक केंद्रावर उपलब्ध असलेल्या QR-Code मुळे नागरिकांना मिळणाऱ्या सेवेचा दर्जा, सरकारी दरपत्रकाची अचूकता आणि केंद्र चालकाचे वर्तन यावर थेट ऑनलाईन अभिप्राय देण्याची सोय उपलब्ध झाली आहे. या रेटिंग प्रणालीमुळे केंद्र चालकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण झाली असून, अतिरिक्त शुल्काच्या तक्रारींवरही प्रभावी नियंत्रण आले आहे. त्याचबरोबर, नागरिकांना तक्रार निवारणासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी ‘डिजी संवाद’ या WhatsApp आधारित (९९३०००११८५) उपक्रमाद्वारे २४x७ तक्रार नोंदणीची सुविधा दिली गेली आहे. घरबसल्या केवळ एका मेसेजद्वारे तक्रार नोंदवणे आणि तिचे डिजिटल ट्रॅकिंग करणे शक्य झाल्याने प्रशासन खऱ्या अर्थाने गतिमान झाले आहे.केवळ दैनंदिन कामकाजातच नव्हे, तर ऐतिहासिक वारसा जतन करण्यातही जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दूरदृष्टी दाखवली आहे. ‘ई-संजीवन’ प्रणालीच्या माध्यमातून १८९० पासूनची जन्म-मृत्यू नोंदणीची जुनी ‘कोतवाल रजिस्टर्स’ आता AI आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षित करण्यात आली आहेत. यामुळे शंभर वर्षांपूर्वीच्या नोंदी शोधणे आता काही सेकंदांचे काम झाले आहे. तसेच, ‘राजभूमी’ पोर्टलच्या माध्यमातून शासकीय जमिनींचे डिजिटल व्यवस्थापन सुरू करून प्रशासनाने भू-माफियांवर मोठा वचक बसवला आहे. अक्षांश-रेखांश आणि जिओ-रेफरन्सिंगमुळे सरकारी जमिनींचे अचूक क्षेत्र निश्चित झाले असून, ‘लँड बँक’ सुविधेमुळे विकास प्रकल्पांसाठी जागा निवडणे आता अधिक सुलभ झाले आहे. या पोर्टलवरील ‘Street View’ आणि विविध GIS लेयर्समुळे अतिक्रमणे शोधणे आणि जमिनींचे संरक्षण करणे सोपे झाले असून हे भू-व्यवस्थापनातील एक मोठे पाऊल मानले जात आहे.जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांचेही डिजिटल मॅपिंग डॉ. पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले आहे. जिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, शासकीय शाळा आणि आपत्कालीन सेवांची माहिती नकाशावर उपलब्ध केल्यामुळे सामान्य नागरिकांना या सेवा शोधणे सुलभ झाले आहे. मुख्य रस्त्यांचे जाळे आणि ड्रेनेज व्यवस्थेची डिजिटल माहिती उपलब्ध असल्याने भविष्यातील आपत्ती व्यवस्थापन आणि पूरनियोजन अधिक शास्त्रोक्त पद्धतीने करणे शक्य झाले आहे. अतिदुर्गम शहापूर-मुरबाडपासून ते गजबजलेल्या ठाणे-कल्याणपर्यंतच्या प्रत्येक नागरिकाचा वेळ, पैसा आणि श्रम वाचवण्याचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद ठरले आहे. ‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा’ कार्यक्रमांतर्गत राबवलेल्या या मूलभूत परिवर्तनासाठी आज एका विशेष सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनिषा आव्हाळे, पोलीस अधीक्षक डॉ. डी. स्वामी आणि नवी मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांचा गौरव करण्यात आला. हा सन्मान ठाणे जिल्हा प्रशासनातील प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी आणि समस्त ठाणेकरांसाठी अभिमानास्पद असून, डॉ.पांचाळ व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांनी कार्यान्वित झालेल्या या डिजिटल अध्यायाने प्रशासकीय उत्तरदायित्वाचा एक नवा मापदंड प्रस्थापित केला आहे.

‘मर्मबंधातील ठेव’ कार्यक्रमातून प्रभाकर कारेकरबुवांना आदरांजली

‘मर्मबंधातील ठेव’ कार्यक्रमातून प्रभाकर कारेकरबुवांना आदरांजली विश्वास सामाजिक संस्थेतर्फे कार्यक्रम ठाणे: स्वरांचा शिलेदार पंडित प्रभाकर कारेकर यांच्या गायकीतील ठुमरी, होरी, नाट्यसंगीत, अभंग, भैरवीतील नजाकतीचे स्मरण करीत पार पडलेल्या `मर्मबंधातील ठेव’ कार्यक्रमातून प्रभाकर कारेकरबुवांना प्रथम स्मृतीदिनानिमित्ताने आदरांजली वाहण्यात आली. भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी पुढाकार घेत विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात `मर्मबंधातील ठेव’ कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन केले होते. प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आशा खाडिलकऱ कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या. साहित्य अकादमीचे सदस्य नरेंद्र पाठक, प्रसिद्ध गायक व कारेकरबुवांचे ज्येष्ठ शिष्य पंडित सुरेश बापट, अमित प्रभाकर कारेकर, संजय वाघुले, भाजपाचे महापालिकेतील गटनेते मुकेश मोकाशी, विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमित वाघचौरे, पदाधिकारी वृषाली वाघुले-भोसले यांनी दीपप्रज्वलन केले. पंडित सुरेश बापट यांनी `मर्मबंधातील ठेव’ या नाट्यगीताने कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर `धन्य आनंद दिन’ पूर्ण हे नाट्यपद, `राम होऊनि राम गा रे’ हे भक्तीगीत, `बोलावा विठ्ठल’ हा अभंग, `या कागदी फुलांच्या’ भावगीताने मैफल रंगत गेली. प्रत्येक कलाकाराच्या गायनाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कारेकर बुवांनी स्वत:ची गायकी घडविली. सुरुवातीला त्यांचा पातळ गळा होता. मात्र, त्यांनी रियाझाने दमदार बनविला होता. एका मैफिलीसाठी अष्टपैलू व्यक्तिमत्व पु. ल.देशपांडे यांनी कारेकरबुवांना प्रिये पहा हे नाट्यपद शिकविले होते. अन्, त्या मैफिलीनंतर प्रभाकर कारेकर नावाचा उष:काल घडला, अशी आठवण निवेदिका अनघा मोडक यांनी सांगितली. `प्रिये पहा,रात्रीचा समय सरुनी’ या नाट्यगीताने पं. सुरेश बापट यांनी मैफिलीला उंचीवर नेले. चंदनाचे परिमळ, दिनांची माऊली, गगना गंध आला, माझ्या देहाची पालखी या गीतांनी मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. पंडित सुरेश बापट यांनी अजरामर झालेल्या `मै कही समझाऊं सब जग अंधा’ या भैरवीने रसिकांना मंत्रमुग्ध केलेल्या या मैफिलीचा समारोप केला. तत्पूर्वी कारेकरबुवा व प्रसिद्ध नाटककार सतीश दुभाषी यांच्या अखेरच्या भेटीचा किस्सा पंडित सुरेश बापट यांनी सांगितला. शिवाजी मंदिर येथे झालेल्या जून १९८० मधील प्रयोगावेळी अष्टपैलू अभिनेते सतीश दुभाषी यांनी `मै केही समझाऊं’ ही भैरवी ऐकली. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी कारेकर बुवांची भेट घेतली. पुन्हा कधी ही भैरवी ऐकेल माहित नाही, असे म्हणून दोन मिनिटे भैरवी सादर करण्याची विनंती केली. कारेकर बुवांनी सर्व वाद्यांसह संपूर्ण भैरवी सादर केली. दुर्दैवाने त्यानंतर सप्टेंबर महिन्यात सतीश दुभाषींचे अचानक निधन झाले होते. त्यावेळी एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला दिलेली दाद आम्ही अनुभवली होती, या आठवणीने रसिक गहिवरून गेले. पंडित सुरेश बापट यांच्याबरोबरच गायक श्रीरंग भावे, ओंकार प्रभुघाटे, केतकी भावे जोशी, गोव्यातील संदेश खेडेकर यांनी कारेकर बुवांना सांगीतिक मानवंदना दिली. नीला सोहनी, हर्षल काटदरे, सुहास चितळे, गणेश मेस्त्री, धनंजय पुराणिक आणि श्रेयस व्यास या प्रतिथयश वादकांनी समर्पक साथ दिली. तर अनघा मोडक यांनी निवेदनाची धुरा सांभाळली.

एस.एस.टी. महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा दिमाखात संपन्न

एस.एस.टी. महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा दिमाखात संपन्न कल्याण: एस.एस.टी. कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथे पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करणारा हा सोहळा महाविद्यालयाच्या वातानुकूलित प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आला होता. या समारंभाला उल्हासनगर महानगरपालिकेचे उपमहापौर  अमर लुंड, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केटचे जनरल मॅनेजर संजीव बजाज तसेच सुप्रसिद्ध मेंटर आणि उद्योजक सागर पगार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे  संस्थापक अध्यक्ष डॉ. पुरस्वानी आणि प्रभारी प्राचार्य डॉ. दीपक गवादे यांचेही मार्गदर्शन लाभले. अध्यक्ष डॉ. पुरस्वानी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत महाविद्यालयाशी असलेले नाते पुढेही टिकवून ठेवण्याचे आवाहन केले. तसेच भविष्यातील विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. मेंटर  सागर पगार यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांना सामोरे जात आपल्या ध्येयाकडे ठामपणे वाटचाल करण्याचे मार्गदर्शन केले. समारंभात विद्यार्थ्यांनी पदवी प्रदान समारंभाचा पोशाख परिधान करून पदव्या स्वीकारल्या. काही विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देत शिक्षकांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा साजरा करत महाविद्यालयाने त्यांच्या यशाचा गौरव केल्याने हा सोहळा संस्मरणीय ठरला.