Category: ठाणे

Thane news

 एकविरा देवी यात्रेसाठी टोलमाफी करण्याची मागणी

एकविरा देवी यात्रेसाठी टोलमाफी करण्याची मागणी विजय देशेकर यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र कल्याण :  २५ व २६ मार्च रोजी लोणावळा येथील कार्लेगडावर एकविरा देवीची यात्रा पार पडणार असून या यात्रेसाठी लाखो भक्त येत असतात. यात्रेसाठी येणाऱ्या एकविरा भक्तांना टोलमाफी करण्याची मागणी टिटवाळा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा एकविरा भक्त विजय देशेकर यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठवून केली आहे. लोणावळा परिसरातील एकविरा देवी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनांक २५ व २६ मार्च रोजी मोठ्या उत्साहात जत्रा व धार्मिक उत्सव साजरा होणार आहे. या दिवशी आगरी-कोळी समाजासह लाखो भाविक कुटुंबासह दर्शनासाठी उपस्थित राहतात. अनेक भक्तांनी घेतलेले नवस फेडण्यासाठीही याच दिवशी विशेष गर्दी होत असते. एकविरा आई ही कोळी-आगरी समाजाची आराध्य देवता असून, हा उत्सव समाजासाठी अत्यंत भावनिक व श्रद्धेचा विषय आहे. रायगड, ठाणे, पालघर, मुंबई उपनगर आदी जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात भाविक स्वतःच्या वाहनांनी येत असतात. त्यामुळे संबंधित मार्गांवरील टोल नाक्यांवर मोठा आर्थिक भार सामान्य भक्तांवर पडतो. शासन विविध सण-उत्सवांच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी टोलमाफीसारखे सकारात्मक निर्णय घेत असते. त्याच धर्तीवर, दिनांक २५ व २६ मार्च २०२६ रोजी एकविरा आईच्या जत्रेनिमित्त संबंधित मार्गांवरील टोलमाफी जाहीर करण्यात यावी. या निर्णयामुळे लाखो भाविकांना दिलासा मिळेल आणि शासनाविषयी अधिक आत्मीयता निर्माण होईल. या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने योग्य तो निर्णय घेण्याची मागणी विजय देशेकर यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

कर्जत स्टेशनवर गुटखा तस्करीचा पर्दाफाश उपनिरीक्षक प्रतिभा साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई

अशोक गायकवाड कर्जत : रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) कर्जत यांनी अवैध गुटखा व पान मसाला वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक करून सुमारे ₹ २,००,७१५/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी सकाळी कर्जत रेल्वे स्थानकावर करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, आरपीएफचे कर्मचारी बाबुशा इंगोले व शेषराव खिल्लारे हे शनिवारी सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेत ड्युटीवर होते. यावेळी ट्रेन क्रमांक २२९४४ डाउन इंदौर–दौंड एक्सप्रेस कर्जत रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर सकाळी ७:१२ वाजता दाखल झाली. ट्रेनची नियमित तपासणी सुरू असताना एस-२ डब्यातून दोन व्यक्ती मोठ्या ४ ते ५ बॅगांसह संशयास्पद हालचाली करत उतरताना दिसले. संशय आल्याने त्यांची चौकशी करण्यात आली, मात्र त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर दोघांना आरपीएफ कर्जत येथे आणण्यात आले. उपनिरीक्षक प्रतिभा साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांनी आपली नावे गोलू कुमार राजेंद्र कुमार (वय २३, रा. कामोठे, पनवेल), अंकुश कुमार हरी कुमार (वय २१, रा. कामोठे, पनवेल) अशी सांगितली. त्यानंतर त्यांच्या पाच बॅगांची तपासणी केली असता त्यामध्ये विविध प्रकारचा गुटखा, पान मसाला व तंबाखू मोठ्या प्रमाणात आढळून आला. यामध्ये विमल, राजश्री, रजनीगंधा, तुलसी जर्दा, व्ही -१ तंबाखू आदी ब्रँडचा समावेश असून एकूण ₹२,००,७१५/- किंमतीचा माल जप्त करण्यात आला. सदर मुद्देमाल पंचनामा करून आरपीएफच्या ताब्यात घेण्यात आला. तसेच आरोपींची कर्जत येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पुढील कार्यवाहीसाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न निरीक्षक प्रशांत शिंदे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांच्या सूचनेनुसार आरोपी व जप्त माल रेल्वे पोलीस (जीआरपी) कर्जत यांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी कर्जत रेल्वे पोलीस यांनी के.र.नं.३१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (बीएनएस ) कलम १२३, २७५, २२३, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या कलम ३०(२)(ए) ५९, ३ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण कड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या कारवाईत आरपीएफचे कर्मचारी बाबुशा इंगोले व शेषराव खिल्लारे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

२7 गावांमध्ये चर्चा तर होणारच

२7 गावांमध्ये चर्चा तर होणारच क्लस्टर योजनेविरोधात प्रत्येक गावात करणार जनजागृती कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रांतील २७ गावांमध्ये क्लस्टर योजना राबविण्यात येणार असून या क्लस्टर योजनेला येथील नागरिकांनी विरोध केला आहे. याबाबत सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने एल्गार पुकारला असून चर्चा तर होणारच या कार्यक्रमाच्या माध्यमातून २७ गावांतील प्रत्येक गावांमध्ये क्लस्टर योजने विरोधात जनजागृती केली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून सोनारपाडा येथील साई बाबा मंदिरात जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या सभेत कशाप्रकारे क्लस्टर योजना २७ गावांवर लादून येथील भूमिपुत्रांना भूमिहीन करण्याचा डाव असल्याचे सांगण्यात आले. क्लस्टर योजना रद्द न केल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष समिती अध्यक्ष खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिला आहे. यावेळी समितीचे उपाध्यक्ष सत्यवान म्हात्रे, सुमित वझे, रतन पाटील, रामचंद्र पाटील, मधुकर माळी, शिवाजी माळी, संदीप पालकरी, राहुल जाधव, विठ्ठल वायले, तुळशीराम पाटील, हरिश्चंद्र राणे, तकदीर काळन, नगरसेवक  महेश पाटील, जालिंदर पाटील, कैलास जोशी, निलेश खांबायत, माजी नगरसेवक  गणेश  भाने, संदीप माळी, संतोष केणे आदींसह सर्वच राजकीय पक्षांचे, इतर अनेक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. क्लस्टरमुळे पूर्ण गावंच्या गावं उध्वस्त होणार आहेत. याबाबत केडीएमसी आयुक्तांना निवेदने दिली, मोर्चा देखील काढला. त्याअनुषंगाने गावांमध्ये जनजागृती होण्यासाठी सभा लावली होती. जो पर्यंत २७ गावांची स्वतंत्र महानगरपालिका होत नाही तोपर्यंत क्लस्टरचे भूत आपोआप उडून जाईल. यासाठी आमची लढाई शेवटच्या टोकापर्यंत लढणार आणि आमचा विजय होणार असा विश्वास सत्यवान म्हात्रे यांनी व्यक्त केला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आपल्या मर्जीविरुद्ध २७ गावांना समाविष्ट केले आहे. याविरोधात सर्व पक्षीय हक्क सरंक्षण संघर्ष समिती लढा देत आहे. या समितीच्या नेत्तृत्वात नुकतेच केडीएमसी मुख्यालयावर आंदोलन करण्यात आले. यामध्ये क्लस्टर आणि कर या विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यावर सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्वांसह बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. क्लस्टर योजनेबाबत माहिती देण्यासाठी २७ गावातील नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांना या सभेसाठी बोलविण्यात आले होते. २७ गावात क्लस्टर योजना नसल्याच्या अफवा पसरविण्यात येत होत्या मात्र क्लस्टर योजनेचे शासन परिपत्रक आणि नकाशे नागरिकांना दिले असून या अफवा पसरवीणार्यांना उत्तर जनताच देणार आहे. या सभेबाबत चर्चा तर होणारच अशी जाहिरातबाजी २७ गावांमध्ये करण्यात आली होती. चर्चा तर होणारच हा संघर्ष समितीचा नवा अध्याय असून यामाध्यमातून प्रत्येक गावात जनजागृती करणार असल्याचे सुमित वझे यांनी सांगितले. तर क्लस्टर योजना हि झोपडपट्टी भागासाठी असते मात्र २७ गावांत सरसकट क्लस्टर योजना लादली  आहे. यामध्ये जबरदस्ती जागा अधिग्रहण केली जाणार असून या क्लस्टर योजनेला विरोध असून याबाबत महापालिकेत देखील विरोध केला जाणार असून, कायदेशीर लढाई लढू, वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून देखील लढाई लढण्याचा इशारा भाजपा नगरसेवक महेश पाटील यांनी दिला आहे.

महिलेचा जीव वाचवणाऱ्या धाडसी व्यक्तीचा सत्कार

कल्याण : कल्याण पश्चिम येथील काळातलाव परिसरात एका धाडसी व्यक्तीचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका प्रसंगात संत रोहिदास वाडा येथे राहणारे शैलेंद्र भोईर  यांनी पाण्यात बुडणाऱ्या…

सुखटणकर सावित्री मोहन यांना राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत कास्य पदक

मंडगाव, गोवा येथे सुरू असलेल्या  ४८वी भारतीय मास्टर राष्ट्रीय बॅडमिंटन २0२५-२६ स्पर्धेत  ६५ वर्षावरील मिश्र दुहेरी गटात  दिलीप सुखटणकर व सावित्री मोहन यांना “” कास्य पदक “” मिळाले.  त्यांनी उपउपांत्य फेरीत मणके राम चौधरी…

युवा कुस्तीपटू सुरज मानेला रौप्य

ठाणे : पुण्यात ,वाघोली येथे संपन्न झालेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्यातील पैलवान व क्रांतीअग्रणी जी.डि…

किर्तन व प्रवचन कार्यक्रमासह मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर

किर्तन व प्रवचन कार्यक्रमासह मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर उल्हासनगर : उल्हासनगर आगरी सेना ठाणे जिल्हाप्रमुख स्वर्गीय विठ्ठलजी तुकाराम जोशी यांच्या सातवे पुण्यस्मरण दिनानिमित्त ठाणे जिल्हा आगरी सेना नेते विजय जोशी यांनी किर्तन व प्रवचन कार्यक्रमासह मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते आयोजित करण्यात आलेले या शिबिरात मोफत नेत्र तपासणी, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, मोतीबिंदू निदान, व निवडक रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया ठेवण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. हा कार्यक्रम माणेरेगाव येथील सोमेश्वर पॅलेस या ठिकाणी शुक्रवारी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला होता. तसेच ह. भ. प राजेश महाराज देसाई यांचे कीर्तन व प्रवचन ठेवण्यात आले होते. नागरिकांनी कीर्तन व प्रवचनला मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थिती भाजप जिल्हा प्रमुख नंदू परब , शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी, नगरसेवक महेशजी पाटील, निलेशजी शिंदे, नवीनजी गवळी, आगरी सेना कार्यअध्यक्ष प्रदीप साळवी, जिल्हा प्रमुख चंद्रकांतजी ठाणकर, संघर्ष समितीचे सुमित वजे, संजय फुलोरे ,नगरसेविका पूजा गायकवाड, कविता म्हात्रे , सरोज रॉय, इंदिरा तरे, हेमलता पावशे आदी मान्यवर उपस्थित होते अशी माहिती उल्हासनगर आगरी सेना तालुकाप्रमुख जितेंद्र जोशी यांनी दिली.

साबेगाव खाडी परिसरात विसर्जन व दशक्रिया घाटासाठी पाठपुरावा सुरू

साबेगाव खाडी परिसरात विसर्जन व दशक्रिया घाटासाठी पाठपुरावा सुरू खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना नगरसेविका अर्चना पाटील यांच्याकडून निवेदन आरती परब दिवा: साबेगाव खाडी परिसरात दिवा शहरासाठी स्वतंत्र व भव्य गणेश विसर्जन घाट तसेच दशक्रिया विधीसाठी घाट उभारण्याची मागणी पुढे आली असून, यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे यांची नगरसेविका अर्चना पाटील यांनी भेट घेऊन निवेदन सादर केले. या प्रस्तावासाठी महाराष्ट्र सागरी महामंडळ यांची परवानगी मिळविण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. दिवा शहरातील वाढती लोकवस्ती आणि मोठ्या सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी सध्या शहराबाहेर जावे लागत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शहरातच योग्य व सुरक्षित विसर्जन व्यवस्था उभी करावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. नगरसेविका अर्चना निलेश पाटील यांनी या प्रकल्पाची सविस्तर संकल्पना खासदारांना समजावून सांगितली. या संकल्पनेचे कौतुक करत “ही चांगली आणि उपयुक्त योजना आहे,” असे मत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. संबंधित विभागाला याबाबत पत्र पाठवून पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. माजी उपमहापौर तथा शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या सूचनेनुसार या कामाचा पाठपुरावा सुरू असल्याचे नगरसेविका अर्चना पाटील यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक बाबाजी बाळाराम पाटील आणि विभाग प्रमुख नीलेश पाटील हेही उपस्थित होते. या प्रस्तावित घाटामुळे दिवा शहरातील नागरिकांना गणेश विसर्जन व दशक्रिया विधींसाठी सुरक्षित, सोयीस्कर आणि स्थानिक सुविधा उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

२९ मार्चला ठाण्यात ३० वा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा

२९ मार्चला ठाण्यात ३० वा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा ठाणे- ठाणे जिल्हा धनगर समाज उन्नती मंडळ, ठाणे यांच्या वतीने तिसावा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा रविवार, २९ मार्च , दुपारी ४.०० ते ८.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा एन. के. टी. कॉलेज हॉल, खारकर आळी, ठाणे (प.) येथे पार पडणार असून, राज्यभरातील धनगर समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींना एकत्र आणून योग्य जोडीदार निवडण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या राज्यस्तरीय मेळाव्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, महाराष्ट्राच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने वधू-वर, पालक व नातेवाईक सहभागी होणार आहेत.सदर मेळाव्याचे आयोजन  प्रमुख मार्गदर्शक  ॲड. नानासाहेब मोटे, अध्यक्ष डॉक्टर अरुण गावडे, खजिनदार रमेश तोंडे व चिटणीस सुनील राहींज यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली होत असून, ही माहिती संघटक प्रा. प्रमोद वाघमोडे यांनी जाहीर केली. या प्रसंगी प्रा. वाघमोडे यांनी समाजबांधवांना आवाहन करताना सांगितले की, ‘राज्यस्तरीय वधू-वर मेळावा हा समाजातील एकोपा वाढवणारा महत्त्वाचा उपक्रम आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला यशस्वी करावे.’ तसेच इच्छुक वधू-वरांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क: सुरेश पिंगळे -९००४८९४२१२, बाळकृष्ण लवटे ९९६७५९१९५५

शहिद कॅप्टन विनयकुमार सचान यांना मिरवणूक द्वारे आदरांजली

शहिद कॅप्टन विनयकुमार सचान यांना मिरवणूक द्वारे आदरांजली कल्याण : येत्या मंगळवारी २४ मार्च रोजी डोंबिवलीतील शहीद कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मृतीदिनी अभिवादन मिरवणुकीद्वारे आदरांजली वाहण्यात येणार आहे. शहिद कॅप्टन विनयकुमार सचान प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध शाळांमधील विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि नागरिक सहभागी होणार आहेत. डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागातील कॅप्टन विनयकुमार सचान या सचान कुटूंबातील सुपुत्राने देशहित रक्षणासाठी प्राण पणाला लावले. त्याला वर्षे पूर्ण होत आहेत. मंगळवार २४ मार्च या स्मृतीदिनी त्यांच्या स्मारकावर आदरांजली अर्पण करण्याकरिता सकाळी ठिक ८ वाजता वीर सावरकर वाचनालय एम.आय.डी.सी. निवासी विभाग येथे उपस्थित राहून तद्नंतर सचान यांच्या राहत्या घरी जावून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम होईल. तेथून दिव्यज्योत प्रज्वलीत करुन सर्वाच्या समवेत घरडा सर्कल येथील  कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मारकापर्यंत मिरवणुकीने ज्योत नेण्यात येणार आहे. शहिद कॅप्टन विनयकुमार सचान प्रतिष्ठानची स्थापना २०१० साली झाली असून यंदा त्यांच्या या उपक्रमाचे १६ वे वर्ष आहे. कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करणे हे जागृत देशप्रेमी नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यामुळे कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मारकावर स्मृतिगंधाच्या सुमनांची आदरांजली वाहण्याकरिता मिरवणुकीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन शहिद कॅप्टन विनयकुमार सचान प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकूंद म्हात्रे यांनी केले आहे.