Category: ठाणे

Thane news

बल्याणीत पतीने केली पत्नीची हत्या               

पती पोलिसांच्या ताब्यात कल्याण : कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बल्याणी येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने अमानुष मारहाण करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून सुरू झालेला वाद काही क्षणांत रक्तरंजित हत्येत बदलल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सतीश काळुराम वाघे उर्फ गुड्डू (वय २१) याला पत्नी सारिका उर्फ रुक्सार हिच्या चारित्र्यावर संशय होता. या कारणावरून पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. शनिवारी पुन्हा दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. संतापाच्या भरात सतीश याने घरातील टीव्ही उचलून पत्नीच्या डोक्यात मारला. त्यानंतरही तो थांबला नाही. घरातील हंड्याने तिच्या डोक्यावर वारंवार प्रहार करत तिला गंभीर जखमी केले. या क्रूर मारहाणीत सारिका उर्फ रुक्सार हिचा जागीच मृत्यू झाला. घरातून आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेचा मृतदेह पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच कल्याण तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. संशयाच्या विळख्यात अडकलेल्या संसाराचा असा भीषण अंत झाल्याने बल्याणी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 एडिबल ऑईलच्या नावाखाली बेकायदेशीर डिझेलची वाहतूक करणारा टँकर जप्त

४६.५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत जिल्हाधिकाऱ्यांचे कडक कारवाईचे निर्देश ठाणे :मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाक्याजवळ ठाणे शहर गुन्हे शाखा घटक-१ आणि शिधावाटप विभागाच्या संयुक्त पथकाने एक मोठी आणि धाडसी कारवाई केली आहे. खाद्यतेलाच्या नावाखाली बेकायदेशीररीत्या डिझेल सदृश ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करणारा एक मोठा टँकर या पथकाने जप्त केला असून या कारवाईत तब्बल ४६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. लोकांची दिशाभूल करण्यासाठी संबंधित टँकरवर ‘ईडीबल ऑईल’ (खाद्यतेल) असे लिहिण्यात आले होते. या प्रकरणी मुख्य आरोपी चालकासह एकूण ८ जणांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा घटक-१ ला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे खारेगाव टोलनाक्याच्या अगोदर, मुंब्रा वळण रस्त्याजवळ सापळा रचण्यात आला होता. या ठिकाणी संशयास्पद टाटा कंपनीचा टँकर (क्रमांक MH-46-BB-7१३4) थांबवून त्याची तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील द्रव पदार्थ आढळून आला. टँकर चालकाकडे या डिझेल सदृश पदार्थाची वाहतूक करण्याचा कोणताही परवाना, खरेदी बिल किंवा वैध कागदपत्रे नव्हती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून उपनियंत्रक शिधावाटप विभाग, ठाणे यांच्या आदेशानुसार शिधावाटप अधिकारी  सुभाष रामनाथ डुंबरे व त्यांच्या पथकाला तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या संयुक्त तपासणीत टँकरच्या ५ कप्प्यांमध्ये एकूण २५,००० लिटर बेकायदेशीर डिझेल सदृश पदार्थ आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये २४ लाख ५० हजार रुपये किमतीच्या २५,००० लिटर डिझेल सदृश पेट्रोलियम पदार्थाचा आणि २२ लाख रुपये किमतीच्या टाटा टँकरचा समावेश आहे. नियमानुसार तपासणी अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून रासायनिक चाचणीसाठी नमुने गोळा केले असून, टँकर व इतर मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. प्राथमिक तपासणीत महत्वाची माहिती समोर आली असून सर्व आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगनमत करून विरार खाडीच्या किनारी बोटीमधून आणलेले डिझेल टँकरमध्ये भरले होते आणि ते नाशिकच्या दिशेने घेऊन जाण्याचा त्यांचा बेत होता. पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करण्याचे कोणतेही वैध मापदंड न पाळता, सामान्य टँकरमधून अशी धोकादायक वाहतूक करून नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण करण्याचे कृत्य आरोपींनी केले आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी चालक धर्मेंद्रकुमार श्यामलाल पटेल (वय ३७ वर्षे, रा. वाशी, नवी मुंबई) याला अटक करण्यात आली आहे. तसेच टँकर मालक रितेश अभय नारायण सिंग (रा. दिवा, ठाणे) यांच्यासह पालघर व सुरत येथील रोशन शिरोडकर, नितीन कोली, राजू पंडित, दीपक पवार, सागर पाटील आणि अनिल सुरत या इतर ७ साथीदारांची नावे निष्पन्न झाली आहेत. शिधावाटप अधिकारी  सुभाष रामनाथ डुंबरे यांच्या फिर्यादीवरून सर्व आरोपींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५, मोटार स्पीरीट अँड हायस्पीड डिझेल ऑर्डर २००५ आणि बायोडिझेल धोरण २०२१ च्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस निरीक्षक अशोक रावजी उतेकर या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. या मोठ्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव मस्के-पाटील यांनी ठाणे जिल्ह्यातील जनतेला जाहीर आवाहन केले आहे की, जिल्ह्यात डिझेल व तत्सम इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. जनतेने कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त इंधन साठा करून ठेवू नये आणि इंधनाच्या तुटवड्याबाबत पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अवैध वाहतूक करणाऱ्याविरुद्ध प्रशासनाकडून अत्यंत कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

ठाणे रेल्वे स्थानकातील विकासकामांना गती

नरेश म्हस्के आणि डीआरएम हिरेश मीना यांचा संयुक्त पाहणी दौरा ठाणे – ठाणे रेल्वे स्थानकातील नविन सार्वजनिक शौचालय, एक्सलेटरच्या कामाला गती देणे, फलाटांवर मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे, वैद्यकिय कक्ष कायान्वयित करणे, पावसाळापूर्व कामे तातडीने पुर्ण करणे, दिघा विभागातील इलठणपाडा येथिल रेल्वेच्या मालकीचे `मोगली धरण’ नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरीत करणे आदी विविध विकासकामांना गती देण्यासाठी बुधवार, २० मे रोजी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के आणि मध्य रेल्वेचे डीआरएम हिरेश मीना यांचा संयुक्त पाहणी दौरा संपन्न झाला. हरिष मीना यांनी तातडीने अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे आदेश रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. ठाणे पूर्व आणि पश्चिम दरम्यान मायक्रो टनेलचे काम पूर्ण झाल्याने पावासात रुळांवर पाणी साचणार नसून मुलुंड दिशेला पादचारी पूलाला मंजूरी मिळाल्याने खासदार नरेश म्हस्के यांनी समाधान व्यक्त केले. तसेच लवकरच ठाणे पूर्व येथिल सॅटिस पूलावरुन टीएमटीची वाहतूक सुरु होईल, अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. ठाणे रेल्वे स्टेशनवरील विविध प्रलंबित प्रश्न, रखडलेली कामे आणि प्रवाशांच्या गैरसोयींचा आढावा घेण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वे प्रशासनाचे डीआरएम हिरेश मीना आणि वरिष्ठ रेल्वे अधिकारी यांचा पाहणी दौरा आयोजित केला होता. या दौऱ्यात संपूर्ण ठाणे स्थानक परिसराची पाहणी केली गेली. त्यानंतर स्टेशन मास्तर यांच्या कक्षात रेल्वे प्रशासन, ठाणे महापालिका, प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनीधी यांची बैठक संपन्न झाली. डी-मार्टच्या सीएसआर फंडातून ठाणे रेल्वे स्थानकावर स्वच्छतागृह उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र या कामात मोठी दिरंगाई होत असल्याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता हे कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली. प्लॅटफॉर्म क्रमांक ५ आणि ६ वरील सरकत्या जिन्यांचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने त्यालाही गती देण्याची मागणी करण्यात आली. तसेच पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण करून पाणी तुंबण्याची समस्या टाळण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली.  लवकरच ठाणे स्थानकावर १५ डब्यांच्या लोकल गाड्या सुरू होणार असल्याने प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे काम वेगाने पूर्ण करण्याबाबत चर्चा झाली. नवी मुंबई आणि परिसरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या ताब्यात असलेल्या मोगली धरणाचा विषयही बैठकीत उपस्थित करण्यात आला. हे धरण सध्या नादुरुस्त असून रेल्वे प्रशासन त्याचा वापर करत नसल्याचे सांगण्यात आले. नवी मुंबई महापालिकेच्या ताब्यात हे धरण दिल्यास परिसरातील पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दूर होऊ शकते, यासाठी खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील नगरसेविका सौ. चांदणी विजय चौगुले, अॅड. श्वेता सुभाष काळे, गौरी किशोर आंग्रे यांनी डीआरएम हिरेश मीना यांना लेखी निवेदन बैठकीत दिले. बी केबिन परिसरातील रहिवशांच्या घरांना निष्कासनाची नोटीस रेल्वे प्रशासनाने बजावली आहे. यामुळे स्थानिक नागरिक बेघर होण्यापासून वाचविण्यासाठी तोडगा काढण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली.   ठाणे रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास, प्रवाशांच्या सुविधा आणि भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन विविध विकासकामे सुरू आहेत. त्यासाठी आवश्यक निधीही मंजूर झाला आहे. आज रेल्वे प्रशासनासमवेत सकारात्मक चर्चा झाली असून कामे तातडीने सुरु होऊन प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल, असा विश्वास यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी बोलतांना खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला. यावेळी मध्य रेल्वेचे डीआरएम हिमेश मीना यांनीही सुरू असलेल्या विकासकामांबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, “ठाणे रेल्वे स्थानकावर विविध प्रकारची विकासकामे सध्या सुरू आहेत. प्रवाशांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेत ही कामे वेगाने पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही मोठ्या प्रकल्पांना, विशेषत सॅटीस सारख्या कामांना थोडा वेळ लागणार असला तरी ते कामे शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. ते पुढे म्हणाले, “पावसाळ्यापूर्वीची सर्व आवश्यक कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही विशेष लक्ष देत आहोत. रेल्वे सेवा सुरळीत ठेवणे आणि गाड्या वेळेत सोडणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. त्या दृष्टीने जे काही अडथळे किंवा समस्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने दूर करण्याचे काम सुरू आहे. यावेळी भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार माधवी नाईक, शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, माजी नगरसेवक भास्कर पाटील, शिवसेना ठाणे लोकसभा सचिव बाळा गवस,  ठाणे विधानसभा सचिव संजीव कुलकर्णी, किरण नाकती, रमाकांत पाटील, विकास पाटील, निखिल बुडजडे, विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे, विभाग प्रमुख प्रशांत पाटील, सचिन माने, वृषाली वाघुले, संतोष बोडके, किरण नक्की, ज्येष्ठ शिवसैनिक प्रीतम राजपूत आदी पदाधिकरी आणि कार्यकर्ते  यावेळी उपस्थित होते.

कल्याणमध्ये कर्णिक रोड समितीच्या वतीने हिंदू संमेलन संपन्न

जगण्यातील मूल्य नवीन पिढीमध्येही हे रुजवण्याचा प्रयत्न करा – धर्मगुरू कृष्ण गौर दास कल्याण : हिंदू सकल समाज, कर्णिक रोड समितीच्या वतीने  भव्य ‘हिंदू संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले होते. धर्मगुरू कृष्ण गौर दास यांनी ‘हिंदुत्व व सद्यपरिस्थिती’ या विषयावर भाष्य करताना आपल्या संस्कृतीची जोपासना करताना आपण कोणत्याही प्रांतातले असू पण प्रथम आपण हिंदू आहोत हे विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या आदर्श राजानेही राम आणि कृष्णाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला होता. त्यामुळे जगण्यातील मूल्य, शरीराची अंतर्बाह्य जोपासना ही आपल्या ग्रंथानीच होते हे विसरू नका आणि नवीन पिढीमध्येही हे रुजवण्याचा प्रयत्न करा असे त्यांनी आपल्या विवेचनात संगितले. डॉ. रुपाली जोशी ‘महिला सशक्तिकरण’  या विषयावर मार्गदर्शन करताना “आजच्या काळात स्त्री एकटी का पडते आणि तिला बाहेर आधार का शोधावा लागतो?” याचे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे सांगितले.  अनिल भालेराव यांनी  संघ शताब्दी वर्षाच्या निमित्ताने संघाच्या प्रवासावर आणि भविष्यातील ध्येयांवर प्रकाश टाकला. सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, आत्मबोध, पर्यावरण संरक्षण अशा विविध विषयांवर भाष्य करत त्यांनी प्लास्टिकचा वापर कसा कमी करता येईल यावर मार्गदर्शन केले. केवळ व्याख्यानेच नव्हे, तर भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध कलाप्रकार या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले. कार्यक्रमाच्या सुरवातीला गोमाता, भारतमाता यांचे पूजन करून शंखनाद करण्यात आला. नवीन पिढीतील बाल आणि युवा कलाकारांनी नांदी, पोवाडा, शौर्य गीत, बासरी आणि तबला वादन तसेच गणेश वंदना (नृत्य) सादरीकरण केले. योगाभ्यासावरील प्रात्यक्षिक हिमगौरी प्रमोद शेट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केले. समाजात ऐक्य निर्माण करणे आणि सद्यस्थितीत हिंदू संस्कृतीचे रक्षण करणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी  हिंदू सकल समाज, कर्णिक रोड समितीच्या अध्यक्ष डॉ आशिष एकलहरे, उपाध्यक्ष नितीन अहिरराव, रवींद्र वाणी, सचिव प्रमोद शेट्टी, उपसचिव महेश दीक्षित, उपसचिव जयश्री कोलते, कोषध्यक्ष सीए मनोहर नेवे व सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. ००००००००००००००

व्ही.पी.एम.आर.झेड शाह महाविद्यालयात वार्षिक दीक्षांत समारंभ संपन्न

कल्याण:  विद्या प्रसारक मंडळाचे आर झेड शाह महाविद्यालात मोठ्या दिमाखात वार्षिक दीक्षांत सोहळा पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वकील पद्मश्री उज्ज्वल निकम यांची उपस्थिती प्रेरणादायी ठरली. तसेच मुबई विद्यापीठाचे डी.एल.एल.इ…

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांची ठाणे महापालिकेस भेट

ठाणे महापालिका सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबवित असलेल्या योजनांचे अनुकरण इतर महापालिकांनी करावे – मुकेश सारवान ठाणे (२०) : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी ठाणे महापालिकेस भेट देवून महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न, मूलभूत सुविधा तसेच इतर बाबींचा सविस्तर आढावा घेतला. दरम्यान सफाई कर्मचारी हा सर्वात महत्वाचा घटक असून सफाई कर्मचाऱ्यांसाठी ठाणे महानगरपालिका राबवित असलेल्या योजना या अभिमानास्पद असून इतर महापालिकांनी देखील याचे अनुकरण केले तर सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न राहणारच नाहीत असे वक्तव्य त्यांनी केले. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी महापालिकेच्या कै. अरविंद पेंडसे सभागृहात त्यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी.गोदेपुरे, उपाआयुक्त जितेंद्र निकम, डॉ. मिताली संचेती, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, आरोग्य अधिकारी डॉ राणी शिंदे, आस्थापना अधीक्षक दयानंद गुंडप आदी अधिकाऱ्यांसह सफाई कामगारांच्या युनियनचे पदाधिकारी, कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. ठाणे महापालिकेच्या वतीने १५ ऑगस्ट, २६ जानेवारी व १ मे या दिवशी १० कर्मचाऱ्यांचा गुणवंत सफाई कर्मचारी म्हणून सन्मान, सफाई कामगारांसाठी घरे, त्यांच्या वारसांना शैक्षणिक अर्हतेनुसार पदावर सामावून घेणे, आरोग्य विषयक सुविधा, पदोन्नती, आतापर्यत वारसाहक्काने दिलेल्या नियुक्त्या यांची सविस्तर माहिती उपायुक्त जी.जी. गोदेपुरे यांनी आयोगासमोर मांडली. सफाई कर्मचारी हा महत्वाचा घटक असून शहर स्वच्छ ठेवण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. तसेच महापालिका देखील सफाई कर्मचाऱ्यांना असलेल्या समस्या तातडीने मार्गी लावत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या बैठकीत ज्या सफाई कर्मचाऱ्यांनी निवेदने सादर केली त्या निवेदनांवर १५ दिवसात अहवाल आयोगासमोर सादर करण्याचे निर्देश त्यांनी महापालिका प्रशासनास दिले. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सफाई कर्मचात्यांसाठी उत्कृष्ट सफाई कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणे, मासिक वेतन वेळेवर अदा करणे, सफाई कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरचे फायदे हे सेवानिवृत्ती दिवशीच दिले जातात. सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य साधन दिली जातात, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाते तसेच महिला कर्मचाऱ्यांची मॅमोग्राफी तपासणी  केली जाते या  सुविधांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई  कर्मचारी  आयोगाच्या उपाध्यक्षांनी  समाधान व्यक्त केले.

कल्याणात टँबेबुइया झाडांवर विषप्रयोगाचा संशय

ड्रिल करून इंजेक्शन सदृश्य द्रव्य टाकल्याचा संशायास्पद प्रकाराने खळबळ कल्याण  : कल्याण पश्चिमेतील गणपती चौक ते डी बी चौक दरम्यान असलेल्या टँबेबुइया झाडांवर अज्ञात व्यक्तींनी ड्रिल मारून इंजेक्शनसदृश्य द्रव्य टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक प्रकराचा व्हिडीओ सोशल मिडिया वर व्हायरल झाल्याने  घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पर्यावरणप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. कल्याण पश्चिम गणपती चौक ते डी बी चौक दरम्यान असलेल्या सात ते आठ टँबेबुइया झाडांच्या खोडांमध्ये ड्रिल मशीनच्या सहाय्याने छिद्रे करण्यात आली होती. या छिद्रांमधून काही द्रव्य इंजेक्ट केल्याचा संशय व्यक्त केला जात असून झाडांना जाणीवपूर्वक नुकसान पोहोचवण्यात आल्याच्या चर्चा रंगल्या असून घटनेची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. संबंधित झाडांची पाहणी करण्यात आली असून या प्रकारामागे नेमके कोण आहे याचा शोध घेतला जात आहे. अज्ञात व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकारी सुत्रांनी माहिती दिली.  शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या आणि पर्यावरणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या झाडांवर अशा प्रकारे हल्ला झाल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दोषींना तात्काळ शोधून कठोर कारवाईची मागणी यानिमित्ताने जोर धरू पाहत आहे. केडीएमसी मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव यांच्या शी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, घटनास्थळी जात पंचनामा करीत त्याअंती याप्रकरणी गुन्हा दाखल करणार आहोत. तर केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी यांनी या घटनेची दखल घेत चौकशी, कारवाई चे आदेश दिले असल्याचे संपर्क साधला असता सांगितले.

कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या शाखा बैठकीदरम्यान गोंधळ

६०-७० जणांचा प्रवेश, वातावरण बिघडले कल्याण : मंगळवारी रात्री कल्याण पूर्व जिल्ह्यातील कोळसेवाडी परिसरात शिवसेनेच्या (ठाकरे गटाच्या) शाखा बैठकीदरम्यान मोठा गोंधळ उडाला. बैठकीत महत्त्वाच्या संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना अचानक सुमारे ६० ते ७० जण शाखेच्या आवारात घुसले आणि त्यांनी संपूर्ण वातावरण बिघडवले. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले, ज्यामुळे परिसरात तणाव पसरला. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या (ठाकरे गटाच्या) सह-संपर्क प्रमुखांच्या उपस्थितीत बैठक सुरू होणार होती, तेव्हाच हा वाद सुरू झाला. शाखा प्रमुख सोमनाथ भोईर आणि देवेंद्र प्रसाद यांनी आरोप केला आहे की, जिल्हाप्रमुख आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला केला. शाखा प्रमुख सोमनाथ भोईर यांनी गंभीर आरोप केले आहेत की, जिल्हा प्रमुख शरद पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी कट रचून बाहेरून ६०-७० तरुणांना बोलावले होते. त्यांचा दावा आहे की, यापैकी अनेक तरुण नशेत होते आणि त्यांचा पक्षाशी काहीही संबंध नव्हता. भोईर म्हणाले की, या लोकांनी शाखेत घुसून त्यांच्यावर आणि देवेंद्र प्रसाद यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. देवेंद्र प्रसाद यांनीही या घटनेवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, ते गेल्या २० वर्षांपासून पक्षाशी संबंधित आहेत, परंतु अंतर्गत वादामुळे त्यांना लक्ष्य करण्यात आले. ते म्हणाले की, ही घटना निष्ठावान कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय आहे. दुसरीकडे, जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, संघटनात्मक आणि निवडणुकीच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी झालेल्या बैठकीदरम्यान केवळ किरकोळ बाचाबाची आणि झटापट झाली होती. त्यांच्या मते, कोणतीही गंभीर हिंसा झाली नाही आणि ही संपूर्ण घटना जुन्या राजकीय मतभेदांचा परिणाम होती. या घटनेनंतर कोळसेवाडी परिसरात राजकीय गोंधळ वाढला आहे. पक्षांतर्गत वाद उघडकीस आल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. आता सर्वांचे लक्ष पक्ष नेतृत्वाच्या या भूमिकेकडे लागले आहे.

 रायगड सुरक्षा रक्षक मंडळातील युवांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार विक्रांत पाटील आक्रमक!

कामगार मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन! राज भंडारी पनवेल: आमदार विक्रांत पाटील यांच्या मागणीनुसार रायगड जिल्ह्यातील नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांना न्याय मिळावा तसेच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, या मागणीसंदर्भात कामगार मंत्री ना. आकाशजी फुंडकर यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक ऑनलाइन स्वरूपात पार पडली. रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ हे शासनाच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेले मंडळ असून त्याच्या कार्यक्षेत्रात पनवेल व संपूर्ण रायगड जिल्हा परिसराचा समावेश होतो. मात्र, या कार्यक्षेत्रात बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षक मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याने रायगड जिल्ह्यात नोंदणीकृत तरुणांवर अन्याय होत आहे व यामुळे नाराजीचे वातावरण निर्माण झाले असल्याची बाब आमदार विक्रांत पाटील यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली. रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडे ३००० हुन अधिक नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांची प्रतीक्षा यादी असून ५ वर्षांहून अधिक कालावधी उलटूनही अद्याप त्यांना रोजगार उपलब्ध झालेला नाही व यासाठी अधिकाऱ्यांची उदासीन मानसिकता कारणीभूत असल्याचे आमदार विक्रांत पाटील यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले. रायगड जिल्ह्यात हजारो कंपन्या व इतर आस्थापना असताना बोर्डाकडे केवळ  सुमारे  २५० आस्थापनाच नोंदीत आहेत व इतर आस्थापना खाजगी सुरक्षा रक्षक एजन्सी कडून सुरक्षा रक्षक घेत आहेत हे नियमबाह्य असून सर्व कंपन्या व आस्थापना बोर्डाकडे नोंदीत होणे अपेक्षित आहे व नोंदीत नसल्यास त्यांनी किमान अधिकृत सूट प्राप्त सुरक्षा रक्षक एजन्सीकडून सुरक्षा रक्षक घेणे बंधनकारक आहे. मात्र असे होताना दिसत नाही व अधिकारी या सर्वांना पाठीशी घालत असल्याचे आमदार विक्रांत पाटील यांनी बैठकीमध्ये निदर्शनास आणून दिले. याविषयात जास्तीत जास्त आस्थापना बोर्डाकडे नोंदीत व्हाव्यात यासाठी तात्काळ मेगाड्राईव्ह घेण्यात यावा व जास्तीत जास्त प्रतीक्षा यादीतील तरुण नोकरीला लागावेत यासाठी कार्यवाही करण्यात यावी ही मागणी आमदार विक्रांत पाटील यांनी आक्रमकपणे केली. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी मेगाड्राईव्ह विषयात तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देऊन एक महिन्यात जास्तीत जास्त आस्थापना नोंदीत होणे व प्रतिक्षा यादीतील तरुणांना नोकऱ्या देणे याविषयात परिणामकारक काम करावे व अहवाल सादर करावा अशा सूचना दिल्या. बैठकीतील या सकारात्मक चर्चेमुळे रायगड सुरक्षा रक्षक प्रतीक्षा यादीतील युवांना न्याय मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या बैठकीत कामगार मा.मंत्री आकाश फुंडकर व कामगार विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते.

आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

केडीएमसी आरोग्य विभाग, आयएमएच्या वतीने कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभाग व आयएमए कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन  कार्यशाळेचे आयोजन मंगळवारी आचार्य अत्रे रंगमंदिर येथे करण्यात आले होते.…