Category: ठाणे

Thane news

मोहने येथील एन.आर.सी. कामगारांचा नवीन कराराला तीव्र विरोध

अदानी समूहासोबतच्या बैठकीनंतर कामगारांमध्ये संताप कल्याण : गेल्या वीस वर्षापासून मोहने येथील एनआरसी कारखाना बंद असून कामगारांना अद्याप त्यांची हक्काची देणी मिळालेली नाहीत. एनसीएलटी कोर्ट मुंबई आणि दिल्ली येथे कामगार न्यायालयात कामगारांच्या न्याय हक्कासाठी आयटक आणि महाराष्ट्र जनरल कामगार युनियन कामगारांच्या बाजूने लढा देत आहेत. हा लढा अंतिम टप्प्यात आला आहे. कामगार युनियन च्या माध्यमातून कामगारांची देणी देण्यासंदर्भात कामगारांच्या प्रतिनिधींची नुकतीच मुंबई येथे एन.आर.सी युनिट अदानी व्यवस्थापना सोबत पार पडलेल्या बैठकीत आयटक आणि महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे प्रतिनिधी म्हणून एस. शुक्ला उपस्थित होते. या बैठकीमध्ये कामगार विरोधी करार पाहून शुक्ला यांनी या कराराला विरोध केला. या नवीन करारानुसार  कामगारांवर अन्याय होत असल्याचे स्पष्ट करत शुक्ला यांनी कराराला कडाडून विरोध केला. प्रतिनिधी म्हणून एस शुक्ला उपस्थित असल्याने घडलेला प्रकार समोर आला असून या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या बैठकीमुळे कंपनी व्यवस्थापन आणि काही संघटनांमध्ये संगनमत झाल्याची चर्चा कामगारांमध्ये जोर धरू लागली आहे. तसेच हा करार संगनमताने झालेला असून कामगार विरोधी असल्याचे कामगारांचे मत कामगारांनी व्यक्त केले. आयटक आणि एनआयसी मजदूर संघ यांनी केलेला करार हा सर्वसामान्य कामगारांच्या हिताला बाधा आणणारा असून, यामध्ये कामगारांच्या हक्कांबाबत कोणतीही ठोस भूमिका आणि कामगारांचे हित नसल्याचा आरोप संतप्त कामगारांनी केला आहे. इतकी वर्ष वाट पाहून जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर हा करार आम्हाला मान्य नसल्याचे कामगारांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात एन.आर.सी. परिसरातील कामगार चळवळ अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजप नगरसेविका वर्षा भानुशाली यांच्याकडून दलित चर्मकाराचा छळ

गळ्यात मंडकं आणि मागे झाडू बांधून आंदोलन मिरा -भाईंदर : महानगरपालिका प्रशासनाने मिरा-भाईंदर शहरातील चर्मकार समाजातील बेरोजगारांना चर्मकार व्यवसायासाठी गटई स्टॉल मंजूर केले होते. हे गटई स्टॉलधारक नियमानुसार शहरात आपला व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र त्यांच्यावर कारवाई करून त्यांना देशोधडीला लावण्याचे काम सुरू झाले आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक संपन्न झाल्यानंतर बहुमताने भाजप नगरसेवक निवडून आले. या बहुमताच्या जोरावर विशेषता शहरातील ज्या विभागात गुजराती राजस्थानी नगरसेवक जास्त आहेत, अशा ठिकाणाच्या नगरसेवकांनी मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनावर दबाव टाकून चर्मकार समाजाला त्रास देणे सुरू केले आहे. या प्रकारानुसार या प्रभागातील काही गुजराती राजस्थानी भाजप नगरसेवकांतर्फे मनपा प्रशासनावर दबाव टाकून यांच्यामार्फत त्यांनी महापालिकेस सदर स्टॉल हटवीण्यासाठी नोटीस काढण्यास लावली आहे. यावर सदर स्टॉल धारकाने सभापती श्रीमती वर्षा भानुशाली यांना १९ फेब्रुवारी रोजी आमच्या स्टॉलवर कारवाई करू नका, अशा पद्धतीने दया याचना केली होती, मात्र या नगरसेविकेने तुमच्यावर कारवाई होणारच असे या स्टॉलधारकास सांगितले. यामुळे महापालिका प्रशासनाने स्टॉल परवानगी रद्द केली. त्यामुळे या गरीब कुटुंबांने सदर स्टॉलला कर्ज काढून केलेला खर्च कुठून परतफेड करायचा ? तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा धारकाला दिलेली करायचा? या विवंचनेतून या कुटुंबाने नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान येथे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. सदर सागर कुंभारे आणि त्यांची पत्नी भाग्यश्री या युवक युवतींचा मोठा साडेतीन वर्षाचा मुलगा आदर्श, आणि पाळण्यातील चार महिन्याच्या नील या मुलास घेऊन हे कुटुंब उपोषण स्थळी बसलेले आहेत. मात्र १२ मे रोजी सुरू केलेल्या या उपोषणास एवढे दिवस झाले, तरीही महापालिका प्रशासन किंवा भाजप पक्षाचे कोणीही नेते या गरीब कुटुंबास भेटण्यास आले नाही. २६ मे रोजी कुंभारे यांनी गळ्यात मंडकं बांधून तसेच मागे झाडू बांधून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना अटक करून सोडून दिले. यावर वंचित आघाडीने त्यांना समर्थन दिले असून हे आंदोलन शहरभर पसरविण्यात येणार असल्याचे अध्यक्ष इकबाल महाडिक यांनी सांगितले.

प्रगणकांनी घेतले जनगणना विषयक प्रशिक्षण राष्ट्रीय कामात सहभाग नोंदवा

आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे आवाहन अशोक गायकवाड नवी मुंबई : जनगणना २०२७ चे काम नियोजनबध्द रितीने सुरू असून प्रगणकांव्दारे घरोघरी जाऊन गृहगणना केली जात आहे. या अनुषंगाने महानगरपालिका मुख्यालयात ज्ञानकेंद्र येथे १५० हून अधिक प्रगणकांच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. हे प्रशिक्षण फिल्ड ट्रेनर यांच्यामार्फत उत्तम रितीने पार पडले. प्रशिक्षणानंतर एपीएमसी, सिडको तसेच शासनाच्या विविध विभागातील कर्मचारी समाधान व्यक्त केले आणि जनगणनेचे काम करण्यास स्वेच्छेने स्वीकृती दर्शवली. महाराष्ट्र राज्यामध्ये जनगणनेचे प्रत्यक्ष घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्याचे काम दिनांक १६ मे पासून सुरू झाले आहे. हे काम दिनांक १४ जून पर्यंत सुरू असणार आहे. तरी सर्व नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या अधिकृत प्रगणकांना जनगणनेविषयक आपल्या घराची व कुटुंबाची सत्य माहिती द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. आपल्या घरी येणारे प्रगणक हे शासकीय कर्मचारी असून या राष्ट्रीय कामामध्ये त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे त्यामुळे नागरिकांनी त्यांचे स्वागत करावे आणि त्यांना आवश्यक संपूर्ण माहिती पुरवावी. ही माहिती राष्ट्रीय नियोजनाप्रमाणेच त्या त्या क्षेत्रामध्ये शासकीय योजना राबवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. आपल्या क्षेत्रातील विकास कामे ही या आकडेवारीवर अवलंबून असतात याची नोंद घ्यावयाची आहे. तरी नागरिकांनी आपल्या घरी येणा-या प्रगणकाचे अधिकृत ओळखपत्र तपासून त्यांना आवश्यक माहिती पुरवावी आणि जनगणनेच्या राष्ट्रीय कामामध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रमुख जनगणना अधिकारी तथा महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे सार्वजनिक कर्ज १० लाख कोटींच्या पुढे

कल्याण : राज्यातील जवळपास तीन लाख लघु कंत्राटदार आणि विकासकांना पूर्ण केलेल्या शासकीय प्रकल्पांची देयके न देता भाजपप्रणीत महाराष्ट्र सरकार त्यांना आर्थिक विनाशाच्या उंबरठ्यावर आणत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस…

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना महापालिकेचा दिलासा

ठाणे: ठाणे महानगरपालिकेकडून यंदाच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू माती तसेच पर्यावरण पूरक साहित्य वापरून गणेशमूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर मोफत जागा उपलब्ध करून देण्याचा…

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये पोलिसांचे पथसंचलन

दुर्गाडी किल्ला परिसरात कडेकोट बंदोबस्त, पोलिस प्रशासन सतर्क कल्याण : बकरी ईदच्या नमाजच्या पार्श्वभूमीवर तसेच हिंदुत्ववादी संघटनांकडून देण्यात आलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण पोलिसांनी बुधवारी सायंकाळी शहरात पथसंचलन केले. विशेषतः दुर्गाडी किल्ला परिसर आणि संवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर असलेल्या दुर्गामाता मंदिराशेजारील ईदगाहमध्ये दरवर्षी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने बकरी ईदची नमाज अदा करतात. नमाजसाठी मोठी गर्दी होत असल्याने रस्त्यावरही नमाज अदा केली जाते. याच पार्श्वभूमीवर मंदिर प्रवेश आणि पूजा-अर्चनेचा मुद्दा दरवर्षी चर्चेत येत असतो. काही हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे की नमाजच्या वेळी हिंदू भाविकांना मंदिरात प्रवेश रोखला जातो. तसेच नमाज सुरू असताना घंटानाद होऊ नये म्हणून मंदिरातील घंटादेखील बांधण्यात येतात. या मुद्द्यावरून दरवर्षी आंदोलन केले जाते. सुमारे ४० वर्षांपूर्वी शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी नमाजच्या वेळी मंदिर प्रवेशाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर दरवर्षी ईदच्या काळात पोलिस प्रशासन विशेष सतर्कता बाळगत आहे. यंदा भाजपच्या वतीनेही नमाजच्या वेळी मंदिर प्रवेशाची मागणी केल्याने पोलिस प्रशासनाची धावपळ वाढली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी पोलिसांनी पथसंचलन केले. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. ०००००००

 टिटवाळा स्टेशन परिसरात वाहतूक शाखेची धडक कारवाई

५३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई, ४० हजार ७०० रुपयांचा दंड वसूल कल्याण : टिटवाळा स्टेशन परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग आणि नियमांचे सातत्याने होणारे उल्लंघन याविरोधात स्वतंत्र वाहतूक शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली असून विविध मोटार वाहन कायद्यांतर्गत एकूण ५३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत नो पार्किंगमध्ये उभ्या करण्यात आलेल्या तब्बल ४० दुचाक्यांवर कारवाई करण्यात आली असून ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या एका वाहनचालकावर, वाहन चालविताना परवाना जवळ न बाळगणाऱ्या चार जणांवर तसेच विनायूनीफॉर्म वाहन चालविणाऱ्या सात वाहनचालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. या संपूर्ण मोहिमेत एकूण ४० हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कल्याण तालुका पोलीस ठाण्यांतर्गत वाहतूक शाखेकडून टिटवाळा स्टेशन परिसरात ही विशेष मोहीम राबवण्यात आली. वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पी. बी. घोरपडे, पोलीस शिपाई निलेश मोरे, पोलीस शिपाई अमित पवार आणि महिला पोलीस शिपाई वैशाली ढेरे यांनी ही कारवाई केली. स्टेशन परिसरातील बेशिस्त पार्किंग आणि वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर नियंत्रण आणण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, टिटवाळ्यासह ठाणे ग्रामीण परिसरासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा सुरू करण्याची मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे शहराध्यक्ष ॲड. जितेंद्र जोशी यांनी सातत्याने लावून धरली होती. वाढती लोकसंख्या, झपाट्याने वाढणारा शहर विस्तार, स्टेशन परिसरातील गर्दी आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधले होते. ००००००००

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात माजी पंतप्रधान ‘पंडित जवाहरलाल नेहरु’ यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभ‍िवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, दीपक झिंजाड, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, सुरक्षा अध‍िकारी घनश्याम फर्डे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

 दिव्यातील वीज समस्येने नागरिक त्रस्त

स्थानिक नगरसेवकांनी लक्ष देण्याची मागणी दिवा, दि. २७ मे : कडक उन्हाळ्यात दिवा परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. उकाड्यामुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांचे हाल होत असून स्थानिक नगरसेवकांनी पुढाकार घेऊन तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दिव्यात वाढत्या वीज चोरीचा फटका सामान्य नागरिकांना बसत असल्याचे बोलले जात आहे. उन्हाळ्यात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने ट्रान्सफॉर्मरवर अतिरिक्त ताण येत असून त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बंद पडल्याने किंवा तांत्रिक बिघाड झाल्याने वीज पूर्ववत होण्यासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे मोठ्या लोकवस्तीच्या भागासाठी एकाच ट्रान्सफॉर्मरवर भार असल्याने त्याची देखभाल आणि दुरुस्ती वारंवार करावी लागत आहे. दिव्यातील काही भागात दिवसातून एक ते दोन वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, पिण्याच्या पाण्याच्या वेळेतही वीजपुरवठा बंद होत असल्याने अनेकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि संबंधित वीज कंपनीने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी दिवेकरांकडून जोर धरत आहे. ०००००००

येऊरमधील अनधिकृत बंगले पुन्हा चर्चेत

अनधिकृत नळजोडणी, बंगल्याची वन विभाग आणि महापालिकेकडे कागदोपत्री नोंदच नाही ठाणे : येऊर आणि अनधिकृत बंगले यांची सांगड जुनीच आहे.  अनधिकृत नळ जोडणी, स्विमिंग पूल आणि महिन्याला हजारो रुपयांची कमाई करून देणाऱ्या बंगल्याची महापालिका सोडाच पण आदिवासींच्या वन जमिनीवर बांधलेल्या बंगल्याची वन विभागाकडे कुठलीही कागदोपत्री नोंदच नसल्याचं प्रकरण उघडकीस आले आहे. सर्वश्री गणेश टाक, गौतम मोरे, संजय पडवळ आणि हितेश राठोड या चौघा मित्रांनी २०१०-११ दरम्यान वन विभाग शेणाचा पाडा येथील जागा भूमापन क्र न स ७ उपविभाग १५(७/१७) ही १० गुंठे  जागा विकत घेतली होती. त्यानंतर काही वर्षांनी गणेश टाकने हितेश राठोडला त्याचे पैसे परत दिले. यादरम्यान घेतलेल्या जमिनीत भराव टाकून त्याठिकाणी बोअर वेल, वृक्षारोपण केले होते. नंतर गणेश टाकने इतर दोघांना डावलून त्याठिकाणी जलतरण तलाव असलेल्या हेरंब फार्म नावाचे पक्के अनधिकृत बांधकाम केले. विशेष म्हणजे ठाणे महापालिकेच्या पाणी विभागाचा कंत्राटदार असलेल्या गणेश टाकने या फॉर्ममध्ये १इंची पाण्याची पाईप लाईनही जोडून घेतली. बेकायदेशीर असलेला हा फॉर्म शनिवार – रविवार भाड्याने देऊन महिन्याला हजारो रुपयांची कमाई करत आहे. या बंगल्यासंदर्भात प्रशासनाकडे विचारणा केली असता, या बंगल्याची आमच्याकडे कुठल्याही प्रकारची नोंद नसल्याचे ठाणे महापालिका आणि वन विभागाने लिहून दिले आहे. महापालिकेचा हजारो रुपयांचा महसूल बुडवणारा गणेश टाक हा महापालिकेचा कंत्राटदार असल्याने त्या बंगल्यावर कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे.