Category: ठाणे

Thane news

एमआयडीसी निवासी भागात कचऱ्याचे डबे चोरीला

सीसीटीव्हीत दुचाकीवर आलेले जोडपे कैद कल्याण : डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरात कचऱ्याचे मोठे डबे चोरीला जाण्याच्या घटना वाढत असल्याचे समोर आले आहे. मोठ्या सोसायट्या आणि इमारतींकडून ओला-सुका कचरा वेगळा करण्यासाठी चाक असलेले विशेष डबे ठेवण्यात आले आहेत. मात्र हेच डबे आता चोरट्यांच्या निशाण्यावर आले आहेत. एक डबा चोरी करताना सीसीटीव्हीत कॅमेरात कैद झाला आहे. या कचरा डब्यांची बाजारातील किंमत अंदाजे तीन हजार रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. घंटागाडी आल्यानंतर कमी वेळेत आणि सहज कचरा टाकता यावा यासाठी हे डबे वापरले जातात. मात्र काही जण हे डबे चोरी करून भंगारात किंवा सेकंडहॅण्ड स्वरूपात विकत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास डोंबिवली एमआयडीसी निवासी भागातील सिमेन्स सोसायटीसमोर ठेवलेले कचऱ्याचे डबे दुचाकीवरून आलेल्या एका जोडप्याने चोरी केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांवर पोलिसांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. 00000000

 टिटवाळ्यात सफाई कर्मचाऱ्यांकडून गटारात उतरून सफाई

सुरक्षेच्या नियमांवर प्रश्नचिन्ह कल्याण: टिटवाळा येथील दळवीवाडाजवळील अमृतसिद्धी रोड आणि सुमुख सोसायटी परिसरातील रस्त्यावरील क्रॉस गटाराची सफाई करताना सफाई कर्मचाऱ्यांना थेट गटारात उतरून मैला काढावा लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जोशी यांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही कर्मचाऱ्यांना स्वतः गटारात उतरून सफाई करावी लागणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. हाताने मैला काढणे आणि नाल्यांची सफाई करणे यावर कायद्याने बंदी असतानाही अशा घटना घडत असल्याने संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. जोशी यांनी हा व्हिडिओ संबंधित प्रशासन आणि महापालिका आयुक्तांकडे पाठविणार असल्याचे सांगितले असून, भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी यांत्रिक पद्धतीने गटार सफाई, आवश्यक सुरक्षा साधने आणि नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 0000000000

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार सुभाष भोईर यांच्या घरी दिली सदिच्छा भेट

कल्याण :     श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळ डोंबिवली आयोजित कृतज्ञता सोहळा व जाहीर सत्कार कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डोंबिवली येथे आले असताना त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण यांसोबत माजी आमदार…

नालेसफाई विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अनोखे ‘गटर पूजन’ आंदोलन

नालेसफाई विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अनोखे ‘गटर पूजन’ आंदोलन दिवा, दि. 9 जून : दिवा शहरातील नालेसफाईची कामे अद्यापही अपूर्ण असल्याने पावसाळ्यात नागरिकांना पुराचा सामना करावा लागू शकतो. ठाणे महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने दिव्यात अनोखे ‘गटर पूजन’ आंदोलन करण्यात आले. कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत व कल्याण जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख अॅड. रोहिदास मुंडे आणि दिवा शहरप्रमुख सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. दिवा परिसरातील अनेक नाले व गटारांची सफाई अद्याप अर्धवट अवस्थेत असून, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, दिवा शहरातील नालेसफाईसाठी सुमारे १ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असतानाही प्रत्यक्षात अपेक्षित कामे झालेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यावेळी शिवसैनिकांनी गटर पूजन करून प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध व्यक्त केला तसेच तातडीने संपूर्ण नालेसफाई करून नागरिकांना पावसाळ्यातील संभाव्य संकटातून दिलासा देण्याची मागणी केली. आंदोलनात कल्याण जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत, जिल्हा सचिव भैय्यासाहेब पाटील, उपजिल्हाप्रमुख अॅड. रोहिदास मुंडे, कल्याण ग्रामीण विधानसभा संघटिका योगिता नाईक, शहरप्रमुख सचिन पाटील, उपशहरप्रमुख मारुती पडळकर, विभाग प्रमुख योगेश निकम, संजय जाधव,यांच्यासह उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, संतोष कदम, उमेश भानसे, शशिकांत कुंभारगण, विलास उतेकर, तुषार सावंत. उपशाखाप्रमुख, गटप्रमुख आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

इंडस्ट्रियल एरियाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन व कामाला सुरुवात

उल्हासनगरातील पॅनल क्रमांक ७ मधील इंडस्ट्रियल एरियाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन व कामाला सुरुवात सुनिल इंगळे उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील पॅनल क्रमांक ७ मधील इंडस्ट्रियल एरियाच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती. बऱ्याच वर्षापासून या रस्त्याचे काम झाले नव्हते. पावसाळा सुरू होण्याआधी या रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावी अशी मागणी कंपनी मालकांसह परिसरातील उद्योजकांकडून केली जात होती. अखेर इंडस्ट्रियल एरियाच्या रस्त्याच्या कामाची भूमिपूजन माजी आमदार पप्पू कलानी व महापौर अश्विनी निकम यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडला. त्याचवेळी त्या रस्त्याचे काम देखील सुरू करण्यात आले. महापौर अश्विनी निकम यांनी पॅनल क्रमांक ७ मधील विकास कामांना गती देत त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांनी जवळपास ४० करोड रुपयांचा मूलभूत सुविधा निधी उपलब्ध करण्यात आले असून याच निधीच्या अंतर्गत सुमारे एक करोड रुपयांच्या निधीतून या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी, व्यापारी वर्गांनी महापौर अश्विनी निकम यांचे आभार प्रकट केले आहे. या रस्त्याच्या निर्मनामुळे इंडस्ट्रियल एरियाच्या परिसराची शोभा वाढली आहे. या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, सभागृह नेता अरुण आशान, नगरसेवक जमनादास पुरसवाणी, दुर्गा राय, नगरसेविका संघमित्रा हजारे, कमलेश निकम, राजवानी यांच्यासह परिसरातील नागरिक व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग क्रमांक ७ मध्ये हा रस्ता सिमेंट काँक्रिटी तयार करण्यात येणार आहे. इंडस्ट्रियल एरियाचा हा सिमेंट काँक्रिटी रस्ता २० दिवसाच्या आत पूर्ण करण्यात येणार असल्याचे कमलेश निकम यांनी सांगितले.

आई-बाबा सामाजिक संस्थेतर्फे ठाण्यात आज वह्यावाटप आणि सत्कार

आई-बाबा सामाजिक संस्थेतर्फे ठाण्यात आज वह्यावाटप आणि सत्कार ठाणे : शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आई-बाबा सामाजिक संस्थेतर्फे गडकरी रंगायतनमध्ये बुधवारी १२०० हून अधिक विद्यार्थ्यांना वह्यावाटप व ६० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात येणार आहे. भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी व आई-बाबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र चिंतामणी कोळी यांच्यातर्फे सलग १९ व्या वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या कार्यक्रमात ठाणे शहरातील गरजू विद्यार्थी व दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार माधवी नाईक, उपमहापौर कृष्णा पाटील, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, गटनेते मुकेश मोकाशी आदी उपस्थित राहणार आहेत.

तूर प्रमाणित बियाणे वितरणासाठी महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन

ठाणे, प्रतिनिधी : सन २०२६-२७ च्या कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत तूर पिकासाठी प्रमाणित बियाणे वितरण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले…

 मिलापनगर तलावातील हजारो मासे मृतावस्थेत

Unit-६ कडक उष्मा आणि निर्माल्य, कचऱ्याने पाणी व ऑक्सिजन कमी झाल्याने मासे झाले मृत कल्याण :  डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील मिलापनगर तलाव म्हणजे पूर्वीचा गणेश विसर्जन तलावात गेल्या तीन दिवसांपासून हजारो मासे मरून ते पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. हे मासे कडक उष्मा आणि निर्माल्य, कचऱ्याने पाणी खराब व ऑक्सिजन कमी झाल्याने मृत पडत असल्याचे पर्यावरण तज्ज्ञ यांचे म्हणणे आहे.  अजूनही या तलावात हजारोंनी अनेक जातींचे मासे आणि कासवे जिवंत असून त्यांना वाचविले गेले पाहिजे. त्यासाठी तातडीने उपाययोजना केडीएमसीच्या स्वच्छता आणि पर्यावरण विभागाने करणे आवश्यक आहे. या  तलावातील हजारो मासे मरत असल्याने परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असून केडीएमसी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी येऊन तलावातील मृत मासे बाहेर काढण्याचे काम चालू केले आहे. ५ जून पर्यावरण दिन हा सर्वत्र साजरा करतांना असे तलावातील मासे मृतावस्थेत आढळल्याने पर्यावरण प्रेमींनी खंत व्यक्त केली आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी कल्याणच्या प्रसिद्ध काळा तलावातील मासे मृतावस्थेत आढळले होते. असे तलावातील मासे का मृतावस्थेत आढळत आहेत याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पण याची तपासणी करून माहिती घ्यावी. याच मिलापनगर गणेश विसर्जन तलावात काही वर्षापूर्वी असेच मासे मेले होते. मिलापनगर रेसिडेंड्स वेलफेअर असोसिएशन आणि डोंबिवली वेलफेअर असोसिएशन यांनी केलेल्या याचिकानुसार राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशाने गेल्या दहा वर्षापासून या तलावात मूर्ती विसर्जनाला बंदी आहे. या तलावाची नियमित साफसफाई होताना दिसत नाही. काही नागरिक यात निर्माल्य आणि कचरा टाकत असल्याने तलावातील पाणी अस्वच्छ, खराब होत असते. बऱ्याच वर्षात या तलावातील गाळ काढला गेला नाही आहे. हा तलाव जर जिवंत ठेवायचा असेल तर येथे एक कायमस्वरूपी सुरक्षारक्षक, साफसफाई कर्मचारी ठेवावा, सीसी कॅमेरे बसवावेत, नियमित साफसफाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. जर या तलावाकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही तर काही दिवसांनी हा तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. केडीएमसीचे कार्यतत्पर उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन)  रामदास कोकरे यांनी या तलावाच्या साफसफाई आणि नागरिकांच्या मागणीवर जरूर विचार करावा तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केडीएमसी यांनी या तलावातील पाण्याचे आणि मृत माशांची प्रयोगशाळेत तपासणी करून आलेल्या अहवाल प्रमाणे कार्यवाही करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी केली आहे. ०००००००००

सभागृहनेते अॅड. प्रकाश बिनेदार यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप

अशोक गायकवाड पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते अॅड. प्रकाश बिनेदार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवार १ जून रोजी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, नवीन पनवेल शहराध्यक्ष अमोल राजन जाधव आणि दिव्यांग सेल नवीन पनवेल अध्यक्ष प्रथमेश भगवान भंडारे यांच्यावतीने नवीन पनवेल, सेक्टर ६ येथील रुषिवन व रुपवन या दोन्ही वृध्दाश्रमात जावून सभागृह नेता अॅड. प्रकाश बिनेदार यांच्या हस्ते वृध्द पुरुष-महिलांना फळे वाटप करण्यात आली. यावेळी या दोन्ही वृध्दाश्रमाचे संचालक संतोष पवार यांनी सभागृह नेता अॅड. प्रकाश बिनेदार यांचे शाल व पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या व तेथील महिलांनी औक्षणही केले. यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे माजी सरचिटणीस प्रभाकर पवार, भाजपा उत्तर रायगड जिल्हा सदस्य श्याम साळवी, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, नवीन पनवेल शहराचे सरचिटणीस अॅड. शिवकुमार कांबळे, कोष्याध्यक्ष संतोष म्हस्के, सेलचे संयोजक विलास फडके, सागर येसनकर, जयेश कांबळे, साईनाथ भटकळ, अजिंक्य माने, भावेश बाईट, अनिकेत पंडीत, सुदेश तावडे, सुमित सकपाळ, कुणाल भंडारे आदि मान्यवर उपस्थित होते.

मृत्यूशी झुंज देणाऱ्या बिबट्याला जीवनदान

वन विभागाची थरारक मोहीम यशस्वी!” ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बोरिवली वनपरिक्षेत्रातील येऊर नियंत्रण क्षेत्रात जखमी अवस्थेत झाडावर बसलेल्या बिबट्याची वन विभागाने थरारक बचावमोहीम राबवत यशस्वी सुटका केली. गंभीर जखमी आणि अशक्त झालेल्या या बिबट्याला सुरक्षितपणे पकडून उपचारासाठी बिबट्या बचाव केंद्रात दाखल करण्यात आले आहे. पाचपाखाडी (इंदिरानगर)  राखीव वन क्षेत्रातील सर्व्हे क्रमांक ५२० मध्ये ३० मे रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजता एका झाडावर जखमी बिबट्या बसल्याचे वनकर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. माहिती मिळताच वन विभाग, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळ, WWA आणि RAWW संस्थांच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्या गंभीर जखमी असल्याने त्याच्या हालचालींवर मर्यादा आल्याचे दिसून आले. रात्रीच्या अंधारात बचावकार्य धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने वन विभागाने संपूर्ण रात्र परिसरावर कडेकोट नजर ठेवली. अखेर रविवारी सकाळी सहा वाजता शोधमोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. यावेळी बिबट्या मूळ ठिकाणापासून सुमारे ७० ते ८० मीटर अंतर चालत जाऊन झाडीत पडल्याचे आढळले. वन्यजीव अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी आणि बचाव पथकाच्या उपस्थितीत बिबट्याला सुरक्षितपणे भूल देऊन जेरबंद करण्यात आले. प्राथमिक तपासणीत बिबट्याचे वय अंदाजे चार ते पाच वर्षे असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या चारही पायांच्या तळव्यांना गंभीर जखमा असून मागील पायावरील मोठ्या जखमेमुळे हाड उघडे पडल्याचे दिसून आले. तसेच शरीरावर अनेक ओरखडे आणि जखमांचे व्रण आढळले. उपचारासाठी या बिबट्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बोरिवली येथील बिबट्या बचाव केंद्रात हलविण्यात आले असून त्याच्यावर तज्ज्ञ पशुवैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत. वन विभाग, बचाव पथक आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयामुळे एका  वन्यजीवाचा जीव वाचविण्यात यश आल्याने या मोहिमेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. कोट बिबट्याच्या शरीरावरील जखमा गंभीर स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे त्याला सुरक्षितपणे पकडून तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे आवश्यक होते. बचाव पथकाच्या समन्वयातून ही मोहीम यशस्वी झाली असून बिबट्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मयूर सुरवसे (वनपरिक्षेत्र अधिकारी येऊर)