Category: ठाणे

Thane news

‘माझे कल्याण शहर’ प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

‘माझे कल्याण शहर’ प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न कल्याण: छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले सांस्कृतिक, सामाजिक व ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर म्हणजे कल्याण शहर. कल्याण शहराला विशिष्ट असे व्यक्तिमत्व आहे  याच कल्याण शहराविषयी आपल्याला बहुविध माहिती असणं ही एक फार मोठी प्रेरणा ठरते, याच अनुषंगाने मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त  सार्वजनिक वाचनालय कल्याणच्यावतीने “माझे कल्याण शहर प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२६” चे आयोजन करण्यात आले होते. कल्याण शहरातील तब्बल ४३ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. कल्याण सांस्कृतिक इतिहास,सुभे कल्याण, १०० वर्षाचा नगरपालिका अहवाल अशा विविध संदर्भग्रंथातील प्रश्न छत्रपतीशिवाजी महाराज कल्याणमध्ये कधी आले? कल्याणमध्ये इलेक्ट्रिक सप्लाय केव्हा आली? प्रभाकर ओक टॉवर बांधणीचा खर्च किती आला? भारताचार्य चिंतामण वैद्य यांना भारताचार्य पदवी कोणी दिली? स्वातंत्र्यवीर सावरकरांचे काव्यमय चरित्र लिहिण्याचा मान कोणाला मिळाला? कल्याणचे पहिले दैनिक कोणते? पोखरण तलाव कोठे आहे? असे विविध प्रश्न स्पर्धकांना विचारण्यात आले होते. वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांच्या संकल्पनेतून ही माहितीपर स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली “कल्याण” या संदर्भग्रंथाचे लेखक श्रीकांत पेटकर, विवेकानंद विचारमंचचे ज्येष्ठ साहित्यिक प्रविण देशमुख, वाचक दिप्ती जोशी, धनंजय गोरे यांनी या स्तुत्य उपक्रमासाठी आभार मानुन शुभेच्छा दिल्या. प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, उपाध्यक्षा आशा जोशी, कार्यकारिणी सदस्य अरविंद शिंपी, वाचक वर्ग, श्रोता वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता

कल्याणात उलगडली ‘विणलेली’ परंपरा

कल्याणात उलगडली ‘विणलेली’ परंपरा बिर्ला महाविद्यालयात वस्त्रे, विणकाम आणि हस्तकलांचे प्रदर्शन कल्याण : बांधणीचे, यंत्रमागावरील कापड, रेशीम, ताग, सुती अशा विविध प्रकारचे कापड, त्यावर केली जाणारी छपाई, त्याची कला, त्यापासून बनवली जाणारी वेगवेगळी कापडांचे प्रकार आणि त्यामागचा इतिहास तसेच परंपरा पाहण्याची संधी नुकतीच कल्याणकरांना मिळाली. कल्याणच्या बी. के. बिर्ला महाविद्यालयात इतिहास विभागातर्फे विणलेल्या परंपरा (वूवन लेगसीज) या अनोख्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी कापडाचा प्रवास उलगडून सांगितला. कल्याणच्या बी. के. बिर्ला महाविद्यालयातील इतिहास विभागाने शनिवारी विणलेल्या परंपरा: भारतातील उत्कृष्ट वस्त्रे, विणकाम आणि हस्तकला हे प्रदर्शन आयोजित केले होते. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या प्रदर्शनात देशाची वस्त्र परंपरा उलगडून सांगितली. प्रदर्शनाची संकल्पना तृतीय वर्षाच्या इतिहासाच्या विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणाऱ्या ‘भारतीय कलेचा इतिहास’, ‘जागतिक कलेचा इतिहास’ आणि ‘वारसा पर्यटनाची ओळख ‘ या विषयांवर आधारित होती. या प्रदर्शनाचा उद्देश सिंधू संस्कृतीपासून ते आजपर्यंतच्या भारतीय वस्त्रोद्योगाच्या इतिहासाबद्दल विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढवणे हा होता. या प्रदर्शनासाठी सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनचे फॅशन डिझाइन विभागाचे प्रमुख डॉ. नितीन हडप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्य डॉ. अविनाश पाटील आणि शिक्षण संचालक डॉ. नरेश चंद्र यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. डॉ. हडप यांनी ‘वस्त्रांपासून फॅशनपर्यंत: भारतावरील एक ऐतिहासिक दृष्टिकोन’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बिर्ला महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ. सुवर्णा जाधव, सहाय्यक प्राध्यापिका डॉ. प्रणिता हरड यांनी यात मोलाची भूमिका बजावली. या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी अन्य महाविद्यालये आणि शाळांनाही आमंत्रित करण्यात आले होते. उपस्थितांनी भारतीय वस्त्रपरंपरेच्या समृद्ध वारशाचा अनुभव घेतला. या प्रदर्शनात देशातील साड्यांचे प्रकार, पैठणी, इरकल, कापडांचे प्रकार, बांधणीचे कापड, मॅँचेस्टरवरून आलेला आणि यंत्रमागावर बनलेला मांजरपाट कापड, मेंढराऱ्या केसांपासून तयार होणारी घोंगडी, तागाचे गोणपाट, रेशीम कापड मांडण्यात आले होते. तसेच या विविध प्रकारच्या कापडापासून बनलेल्या इतर वस्तुही होत्या. सुती, बांधणी, साधे कापड, त्यांची माहिती, त्यावर विविध रंगांची हाताने केली जाणारी छपाई, इम्ब्रोडरी, तसेच कापडासोबत केली जाणारी कलाकारी उपस्थितांना पाहता आली. यावेळी विद्यार्थ्यांनी आलेल्या प्रेक्षकांची संवाद साधून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

प्रभाग क्र. ४ मध्ये ठाकरे गटाच्या विजयामागे भाजपाचा हात ?

प्रभाग क्र. ४ मध्ये ठाकरे गटाच्या विजयामागे भाजपाचा हात ? नगरसेविका तेजश्री गायकवाड यांच्या अभिनंदनाचे भाजपाने लावले बॅनर कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा निकाल नुकताच लागला असून यामध्ये शिवसेनेचे ५३, भाजपा ५०, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ११, मनसेचे ५, कॉंग्रेसचे २ तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाचे १ नगरसेवक निवडून आले आहेत. यात प्रभाग क्र. ४ मध्ये शिवसेनेच्या दोन उमेदवारांचा पराभव करत शिवसेना ठाकरे गटाचे दोन नगरसेवक निवडून आले असून या विजयामागे भाजपाचा हात असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. त्याला कारण हि तसे असून ठाकरे गटातून निवडून आलेल्या नगरसेविका तेजश्री गायकवाड यांनी निवडून येताच भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांची भेट घेतली. तसेच मोहने परिसरात तेजश्री गायकवाड यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावले असून या बॅनरवर माजी आमदार नरेंद्र पवार आणि भाजपा पदाधिकारी संतोष शिंगोळे यांचा फोटो असल्याने तर्क वितर्क लावले जात आहेत. केडीएमसीच्या प्रभाग क्र. ४ मध्ये लागलेल्या निकालाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रभागात शिवसेनेचे दिग्गज मानले जाणारे माजी नगरसेवक मयूर पाटील त्यांच्या पत्नी नमिता पाटील, शिवसेनेचे शाखा प्रमुख रोहन कोट आणि शिवसेना विभाग प्रमुख अंकुश जोगदंड यांच्या पत्नी पूजा जोगदंड यांना उमेदवारी देण्यात आली होती. यापैकी नमिता पाटील या अवघ्या ८ मतांनी तर रोहन कोट हे १७०३ मतांनी निवडून आले. मात्र शिवसेनेच्या मयूर पाटील आणि पूजा जोगदंड यांचा ठाकरे गटाच्या राहुल कोट आणि तेजश्री गायकवाड यांनी पराभव केला आहे. हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला असतानाच, मोहने परिसरात लावलेल्या  तेजश्री गायकवाड यांच्या अभिनंदनाच्या बॅनरवर भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि भाजपा पदाधिकारी संतोष शिंगोळे यांचे फोटो आहेत. तर तेजश्री गायकवाड यांनी निवडून येताच माजी आमदार नरेंद्र पवार यांची भेट घेतली होती. प्रभाग क्र. ४ मध्ये भाजपाला एकही जागा न दिल्याने भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांचे काम केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे शिवसेना भाजपा महायुतीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा चारोटी ते पालघर ५०,००० लोकांच्या  मोर्चाची सुरुवात!

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा चारोटी ते पालघर ५०,००० लोकांच्या  मोर्चाची सुरुवात! मागण्या पूर्ण होईपर्यंत अनिश्चित काळासाठी पालघरमध्ये धरणे आंदोलनाचा निर्धार अनिल ठाणेकर ठाणे : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आज पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून आलेल्या सुमारे ५०,००० लोकांचा एक अतिभव्य पायी मोर्चा काढला. हा मोर्चा डहाणू तालुक्यातील चारोटी येथून सुरू झाला असून, रात्री मनोर येथे मुक्काम करेल आणि उद्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करेल. जोपर्यंत सरकारच्या वतीने निश्चित कालमर्यादेसह लेखी स्वरूपात आपल्या ज्वलंत आणि प्रलंबित मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत हा प्रचंड जनसमुदाय पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन करणार आहे. अखिल भारतीय किसान सभा (एआयकेएस), सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू), अखिल भारतीय जनवादी महिला संघटना (एडवा), डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय), स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आणि आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच (एएआरएम) यांसारख्या संघटनाही मोठ्या संख्येने सामील झाल्या आहेत. या मोर्चाचे नेतृत्व माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य आणि एआयकेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, पॉलिट ब्युरो सदस्य आणि एडवाच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे, केंद्रीय समिती सदस्य, माकप राज्य सचिव आणि किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ. अजित नवले, केंद्रीय समिती सदस्य आणि सीटूचे राज्य सचिव, डहाणूचे दोन वेळा आमदार असलेले विनोद निकोले, राज्य सचिवमंडळ सदस्य आणि एएआरएमचे राज्य निमंत्रक किरण गहला आणि इतर अनेक जण करत आहेत. उद्या सीपीएमचे पॉलिट ब्युरो सदस्य आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस विजू कृष्णन हे देखील या मोर्चात सामील होतील. या मोर्चाच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत: वनाधिकार कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे; सर्व देवस्थान, इनाम, वरकस आणि सरकारी जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर करणे; मोदी सरकारने रद्द केलेली मनरेगा योजना पूर्ववत सुरू करणे; स्मार्ट मीटर योजना रद्द करणे; पेसा कायद्याची अंमलबजावणी करणे; चार श्रम संहिता रद्द करणे; वाढवण आणि मुरबे बंदरांचे जनविरोधी प्रकल्प रद्द करणे; पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाण्याची सोय करणे; शिक्षण, रोजगार, रेशन, आरोग्य इत्यादी सुविधांमध्ये वाढ करणे.

सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार

सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सानपाडा प्रभाग क्रमांक १९ मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गणपत (भाऊ) दगडु भापकर, सुनिल  रामदास कुरकुटे, सौ. शैला जगदीश पाटील आणि सौ. शिल्पा राजेश ठाकूर हे विजयी झाल्याबद्दल त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने १८ जानेवारीला सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, शासकीय योजना ज्येष्ठ नागरिकांना मिळण्यासाठी आपण सहकार्य करावे. सानपाड्याचा उत्तम विकास करावा. नगरसेवकांनी सांगितले की, आता तुम्ही आमच्याकडे येऊ नका, आम्ही तुमच्याकडे येऊ आणि आपणास सहकार्य करू. काम करणं ही आमची सर्वांची जबाबदारी आहे. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव,  सचिव जगदीश एकावडे, खजिनदार महादेव पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे, सीमा बोराडे,  सहसचिव राजेंद्र कदम, सहखजिनदार नाना शिंदे, कार्यकारणी सदस्य जे. पी.  देसाई,  मंगला मानधने, माजी अध्यक्ष मारुती कदम, माजी उपाध्यक्ष बळवंत पाटील, माजी सहखजिनदार सुभाष बारवाल  आदी मान्यवर व सभासद उपस्थित होते.

कल्याणचा राजाचे जल्लोषात आगमन

कल्याणचा राजाचे जल्लोषात आगमन कल्याण : कल्याण पूर्वेतील तिसाई प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने “कल्याणचा राजा” श्री गणरायाची भव्य दिव्य आगमन मिरवणूक भक्तिभावात व जल्लोषात रविवारी संपन्न झाली. ढोल-ताशांच्या निनादात, हरिनामाच्या पवित्र गजरात विघ्नहर्त्याचे मंगलमय आगमन झाले. भक्तांच्या अपार श्रद्धा, आनंद आणि उत्साहाने संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारून गेला. या सोहळ्याला  आमदार सुलभा गायकवाड, माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, नगरसेविका मनिषा गायकवाड, तिसाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव गायकवाड यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कल्याणची अस्मिता आणि श्रद्धेचे स्थान असलेल्या “श्री तिसाई प्रतिष्ठाण” आयोजित “कल्याणचा राजा” – माघी गणेशोत्सवांचे यंदाचे वर्ष हे उत्सवाचे आणि अभूतपूर्व चैतन्याचे आहे. या वर्षापासून बाप्पाच्या “पारंपारिक आगमन सोहळ्याचे” आयोजन करण्यात आले आहे.  रविवारी कल्याण पूर्वेतील चक्की नाका, पुनालिंक रोड ते आई तिसाई देवी मंदिर, तिसगाव अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. यंदाच्या माघी गणेशोत्सवाचे  विशेष आकर्षण पर्यावरणपूरक मूर्ती असून ठाणे जिल्ह्यातील सर्वात प्रथम अशी माघी गणेशोत्सवातील “टिशू पेपर” पासून (कागदी) बनवलेली भव्य श्री गणेश मूर्ती आहे. तसेच ६१ फूट उंच केदारनाथ मंदिराची नेत्रदीपक प्रतिकृती देखील याठिकाणी साकारण्यात आली आहे.

 मनसेचे गणेश लांडगे ठरले केडीएमसी निवडणुकीत जायंट किलर

मनसेचे गणेश लांडगे ठरले केडीएमसी निवडणुकीत जायंट किलर भाजपाचे माजी स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांचा केला पराभव कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक नुकतिच पार पडली असून, या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक तथा केडीएमसीचे माजी स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांचा देखील सहभाग आहे. मनसेचे शाखा अध्यक्ष गणेश लांडगे यांनी त्यांचा पराभव करून जायंट किलर ठरले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कल्याण मधील प्रभाग क्र. ७ ड मधून भाजपाच्या वतीने डॉ. पंकज उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी पक्ष आदेशानुसार उपाध्याय यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यानंतर भारतीय जनता पार्टीने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या माजी स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांना भाजपा पुरस्कृत उमेदार म्हणून जाहीर केले. मात्र कोविड काळानंतर प्रभागात न फिरकल्याने मतदारांनी त्यांना नाकारत मनसेच्या गणेश लांडगे यांना पसंती दिल्याची चर्चा आहे. तर मनसेचे विभाग अध्यक्ष कपिल पवार आणि मनसेचे शाखा अध्यक्ष गणेश लांडगे हे गेली १० वर्षे प्रभागासः कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात सक्रीयपणे काम करत असल्याचे पाहायला मिळाले. प्रभागातील नागरिकांच्या समस्या असो कि शहरातील नागरिकांच्या संदर्भात एखादा विषय, या दोघांच्या जोडीने अनेक विषय लावून धरत नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे. त्याप्रमाणे मनसे पक्षातर्फे प्रभाग क्र.७ ड मध्ये गणेश लांडगे यांना आणि कपिल पवार यांच्या पत्नी सोनल पवार यांना प्रभाग क्र. ९ ब मधून उमेदवारी देण्यात आली. मात्र सोनल पवार यांचा यात पराभव झाला असून गणेश लांडगे यांनी भाजपाच्या संदीप गायकर यांचा पराभव करत जायंट किलर ठरले आहेत. या निकालानंतर आता कपिल पवार यांच्याकडे शहराची जवाबदारी देण्याची मागणी मनसे कार्यकर्त्यांमधून होत आहे.

डॉ. विजय पंडित यांच्या “बडे भाग मानुष तन पाव” या कथासंग्रहाचे प्रकाशन

डॉ. विजय पंडित यांच्या “बडे भाग मानुष तन पाव” या कथासंग्रहाचे प्रकाशन कल्याण : कल्याण पश्चिमेतील के.एम. अग्रवाल महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद १६-१७ जानेवारीला संपन्न झाला. देशभरातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील प्रतिष्ठित शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय परिसंवादात सक्रिय आणि उत्साहाने सहभाग घेतला. परिसंवादाचे उद्घाटन सत्र महाविद्यालयाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध साहित्यिक डॉ. विजय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. उद्घाटन सत्राचे अध्यक्षपद महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या माजी अध्यक्षा प्राध्यापक शितला दुबे यांनी भूषवले. मुख्य भाषण प्राध्यापक मनोज सिंह यांनी केले. ज्यांनी हिंदी साहित्यातील समकालीन प्रवचन, सामाजिक चिंता आणि वैचारिक ट्रेंडबद्दल सखोल आणि विचारप्रवर्तक अंतर्दृष्टी दिली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स, मुंबई झोनल डायरेक्टर रेणू पृथियानी उपस्थित होत्या. उद्घाटन सत्राचे विशेष आकर्षण म्हणजे चार महत्त्वाच्या पुस्तकांचे प्रकाशन. यामध्ये अमरकांत वरील लेखांचा संग्रह, मध्य आशियातील हिंदीवरील लेखांचा संग्रह, पंडित विद्यानिवास मिश्रावर लक्ष केंद्रित करणाऱ्या समीचिन मासिकाचा विशेष अंक आणि डॉ. विजय पंडित यांचा नवीनतम लघुकथा संग्रह, “बडे भाग मानुष तन पाव” यांचा समावेश होता. उपस्थितांनी डॉ. विजय पंडित यांच्या लघुकथा संग्रहावर आपले विचार व्यक्त केले, तो मानवी संवेदनशीलता, जीवन दृष्टिकोन आणि सामाजिक वास्तवाने ओतप्रोत एक शक्तिशाली काम असल्याचे म्हटले आणि त्याचे मनापासून कौतुक केले.

आझाद मैदानात आंदोलनास बसलेल्या नोवेल साळवे यांचा आत्मदहनाचा इशारा

आझाद मैदानात आंदोलनास बसलेल्या नोवेल साळवे यांचा आत्मदहनाचा इशारा कल्याण:  आझाद मैदान येथे धरणा आंदोलन करत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी सरकार त्यांच्या आंदोलनाची दखल घेत नसल्याकारणाने साळवे यांनी आपले आंदोलन तिव्र करून आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत मला महाराष्ट्र शासन गृह विभागाचे उप सचिव यमुना जाधव यांनी साळवे यांना बोलवून अडचण ऐकून घेत ठाणे पोलीस आयुक्त यांना कार्यवाही करण्यासाठी पत्र पाठविण्यात आले. परंतु त्या पत्रावर अद्याप कुठलीच कार्यवाही झाली नसल्याने नोवेल साळवे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. काही महिन्यांपूर्वी नोवेल साळवे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यावर त्यांचे ओपन हार्ट सर्जरी झाली  होती. नागपूरचे हिवाळी अधिवेशन सुरू झालेल्या दिवसांपासून साळवे यांनी आझाद मैदानावर न्याय मिळण्यासाठी आंदोलन सुरू केले होते व त्यांनी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मागणी केली की त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करून दोषींना वाचविणारे उल्हासनगर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निलंबित करण्यात यावे परंतु आजपर्यंत कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार पक्ष देखील याकडे लक्ष देत नसल्याने   त्यामुळे 28 जानेवारी रोजी साळवे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

 प्राथमिक आरोग्य केंद्र पडघा येथे आयुक्तांची भेट

अरुणोदय सिकलसेल अ‍ॅनिमिया विशेष अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र पडघा येथे आयुक्तांची भेट ठाणे : अरुणोदय सिकलसेल अ‍ॅनिमिया विशेष अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे की नाही, याचा आढावा घेण्यासाठी १६ जानेवारी रोजी आयुक्त डॉ.…