Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

धोरणात्मक बदलावर जोर द्या – प्रशांत जाधवर

धोरणात्मक बदलावर जोर द्या – प्रशांत जाधवर पार्किंग प्लाझा, ए आय, रोबोटिक्स तंत्रज्ञान, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातली धोरणात्मक बदलांबाबत मांडले विचार ठाणे : ठाणे शहराला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि धोरणात्मक उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचे ठाम प्रतिपादन ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सहाचे नगरसेवक प्रशांत ( राजा) जाधवर यांनी केले. ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पीय चर्चेत सहभागी होत जाधवर यांनी शहराच्या ठोस विकासाची गरज बोलून दाखवताना विकासाबरोबर पालिकेच्या उत्पन्नात भर पडण्यासाठी काही उपायही सुचवले आहेत. ठाणे महापालिकेचा पुढील आर्थिक वर्षाचा ६२२१ कोटी १२ रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी नुकताच सादर केला. ठाणे महापालिकेत पहिल्यांदाच निवडून आलेल्या प्रशांत (राजा) जाधवर यांनी अर्थसंकल्पावर सुरु असलेल्या चर्चेत वेगवेगळे मुद्दे, आर्थिक उपाय योजना आणि उत्पन्नाच्या स्त्रोताबाबत विचार मांडून सभागृहाचे लक्ष वेधून घेत राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा दाखला दिला. विकासाभिमुख प्रशासनाकरिता आर्थिक नीतीची अमंलबजावणी करण्यासाठी उत्तम प्रशासकाची आवश्यकता असल्याची यशवंतराव चव्हाणांच्या वाक्याची आठवण करुन दिली. प्रशासकीय सुधारणा आणि महसूलवाढी करता जाधवर यांनी पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागा ताब्यात घेऊन त्याठिकाणी वाहनतळ सुरु करणे, परिवहन सेवेत नव्याने सामील होणाऱ्या दुमजली बसेस फिरते डिजिटल फलक लावणे, महापलिकेच्या शाळा शालेय वेळेनंतर नाममात्र दरात खासगी शिबिरे, कार्यक्रमांना भाड्याने देणे, करवसुली करण्यासाठी १०० टक्के कर भरणाऱ्या गृहनिर्माण संकुलनांना विशेष सवलत देणे, स्वछ व प्रमाणिक गृहनिर्माण संकुल स्पर्धा घेण्याची मागणी केली आहे. याशिवाय शहरातील वाढते प्रदूषण टाळण्यासाठी नवीन बांधकामांच्या जागी डास्ट कंट्रोल युनिट सक्तीचे करण्याची गरज जाधवर यांनी बोलून दाखविली. सुमारे एक कोटी रुपयांचे नगरसेवकांचे अभ्यास दौरे आयोजित करण्यापेक्षा शहरात राष्ट्रीय महापौर परिषद आयोजित करून त्यातून विकास कामाबाबत विचाराची देवघेव करण्याची सूचना जाधवर यांनी यावेळी मांडली. पालिकेच्या शाळांची रंगरंगोटी करण्यापेक्षा शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम, रोबोटिक्स लॅब, परदेशी भाषांचे वर्ग सुरु करण्याची आग्रही मागणीही केली. स्वतः राष्ट्रीय कबड्डीपटू असल्याने दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये विविध खेळांचे हाय परफॉर्मन्स सेंटर सुरु करण्याची मागणी केली. महापालिकेच्या तिजोरीत वाढ होण्यासाठी कांदळवनाभोवती लोखंडी कुंपण लावण्याऐवजी त्याठिकाणी पर्यटन क्षेत्र तयार करताना लाकडी वॉकवेज, बोटिंग सुरू करण्याची मागणी जाधवर यांनी केली. शहरातील सुमारे ९५टक्के पाण्याचे मीटर्स चोरी झाले असल्याने, सरसकट पाण्याचे मीटर हटवून त्याऐवजी १५६० रुपयांनुसार पाण्याची देयके आकारण्याची सूचना केली. शहरातील नाल्यांची पक्की डागडुजी करणे, विठ्ठल क्रीडा मैदान आणि त्याच्या शेजारी असणाऱ्या छत्रपती शिवजी महाराजांच्या स्मारक परिसराचे सुशोभिकरण करण्याची आवश्यकता असल्याची भावना जाधवर यांनी बोलून दाखवली. प्रशांत (राजा) जाधवर यांनी शिवसेना ( एकनाथ शिंदे गट) तिकिटावर प्रथमच निवडणूक लढवून पहिल्याच प्रयत्नात प्रभाग क्रमांक सहामधून महापालिकेत प्रवेश केला आहे.

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय शाखांच्या अनुदानासाठी कटिबद्ध

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय शाखांच्या अनुदानासाठी कटिबद्ध महापौर  रितू तावडे यांनी दिली मदतीची ग्वाही मुंबई : “वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाद्वारे चालविण्यात येणाऱ्या महानगरपालिका शाखांच्या प्रलंबित अनुदान वाढीसाठी मी पूर्णपणे सकारात्मक आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” अशी ग्वाही मुंबईच्या महापौर  रितू तावडे यांनी दिली. दादर (पूर्व) स्थित मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या  ‘मुंबई शहर ग्रंथोत्सव’ मध्ये मुंबईच्या महापौर  रितू तावडे या प्रमुख पाहुण्या म्हणून  उपस्थित होत्या. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. सार्वजनिक ग्रंथालयातील उत्कृष्ट ज्येष्ठ व बाल सभासदांचा महापौर  रितू तावडे यांच्या हस्ते यावेळी प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.ग्रंथोत्सवातील शासकीय मुद्रण व लेखनसामग्री संचालनालयाच्या दालनास भेट देऊन महापौरांनी ‘भारताचे संविधान’ (सुधारित आवृत्ती २०२५) हा ग्रंथ स्वत: खरेदी केला. ‘हा अमूल्य ग्रंथ सर्व नगरसेवकांकडे असायला हवा, या  कार्याध्यक्ष  व द ग्लोबल टाइम्स दैनिकाच्या कार्यकारी संपादक  शीतल  करदेकर  यांच्या सूचनेचे स्वागत करुन तशी सूचना करून महापौरांनी याबाबत योग्य नियोजन करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यासह इतरही विविध ग्रंथ, पुस्तके यांची महापौरांनी खरेदी केली. संदर्भ विभागात मांडण्यात आलेल्या दुर्मिळ हस्तलिखितांच्या आणि पुस्तकांच्या प्रदर्शनाला भेट देऊन त्यांनी समाधान व्यक्त केले. इतिहासाचा हा ठेवा जतन करणे ही काळाची गरज असल्याचे महापौरांनी यावेळी नमूद केले. महाराष्ट्र शासनाच्या निधीतून सुरू असलेल्या ग्रंथसंग्रहालयातील डिजिटलायझेशन प्रकल्पाची महापौरांनी बारकाईने पाहणी केली. दुर्मिळ ग्रंथ आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कसे जतन केले जातात, या स्कॅनिंग प्रक्रियेची त्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली. शालेय आणि महाविद्यालयीन तरुणांची ग्रंथोत्सवातील उपस्थिती पाहून महापौरांनी आनंद व्यक्त केला आणि ग्रंथोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर राज्य भाषा संचालक  अरुण गीते, जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकड, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे आणि कार्याध्यक्ष  शीतल करदेकर उपस्थित होते. तसेच ग्रंथपाल  मिताली तरळ,  उमा नाबर, जयवंत गोलतकर, विनायक परब यांच्यासह मोठ्या संख्येने वाचक आणि विद्यार्थी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालय, मुंबई शहर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

अचलगच्छाधिपती कलाप्रभसागर सुरीश्वरजींना गुजराती गौरव पुरस्कार डॉ हेमराज शाह यांच्या शुभहस्ते प्रदान

अचलगच्छाधिपती कलाप्रभसागर सुरीश्वरजींना गुजराती गौरव पुरस्कार डॉ हेमराज शाह यांच्या शुभहस्ते प्रदान मुंबई, दि. (प्रतिनिधी) :  बृहन्मुंबई गुजराती समाजतर्फे आयोजित करण्यात आलेल्या गिरनार ॲवॉर्ड समारंभात अचलगच्छाधिपती कलाप्रभसागर सुरीश्वरजींना गुजराती गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. रविवारी त्यांचे मुंबईत एका कार्यक्रमासाठी आगमन झाले असतांना बृहन्मुंबई गुजराती समाजाचे संस्थापक अध्यक्ष डॉ हेमराज शाह यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. याचवेळी डॉ हेमराज शाह यांनी अचलगच्छाधिपती कलाप्रभसागर सुरीश्वरजींना गुजराती गौरव पुरस्कार प्रदान केला. बृहन्मुंबई गुजराती समाज तर्फे गेल्या तीस हून अधिक वर्षांपासून समाजातील विशिष्ट व्यक्तींचा, खेळाडू, कलावंत आदींना प्रतिष्ठेचा राष्ट्रीय स्मारक गिरनार ॲवॉर्ड प्रदान करण्यात येतो. संतांच्या श्रेणीत अचलगच्छाधिपती कलाप्रभसागर सुरीश्वरजींना गुजराती गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. त्याप्रमाणे रविवारी हा गुजराती गौरव पुरस्कार डॉ हेमराज शाह यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी वयाची ८६ वर्षं पूर्ण करणाऱ्या डॉ हेमराज शाह यांना अखिल भारती अचलगच्छ संघा तर्फे गौरविण्यात आले. अचलगच्छाधिपती कलाप्रभसागर सुरीश्वरजींनी डॉ हेमराज शाह यांना आशीर्वाद देतांना सांगितले की, बृहन्मुंबई गुजराती समाजाचे महत्त्व अनोखे आणि त्यांचे योगदान अभूतपूर्व असेच आहे. अंधेरी येथील सात मजली गुजराती भवन म्हणजे आपला गौरव आहे. यात नवनीत परिवाराचे योगदान सुद्धा महत्वपूर्ण आहे. डॉ. हेमराजभाई शाह यांच्या ‘हेमूदादा’चा सुगंध या वर्षातही डोळे दीपविणारा आहे.  अचल गच्छाधिपती प. पू. कलाप्रभ महाराज यांना गुजराती गौरव पुरस्कार बृहन्मुंबई गुजराती समाजचे अध्यक्ष डॉ हेमराज शाह यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी राजेश दोशी, एल एम शाह, चिमण मोता, दिनेश टी. शाह, हिराचंद दंड, नयन भेडा आणि डॉ. उर्मी पासद आदी मान्यवर उपस्थित होते.

तब्बल १५० दिवसांच्या ‘सेवाकर्मी प्लस’ कार्यक्रमात “एमएमआरडीए” प्रथम

तब्बल १५० दिवसांच्या ‘सेवाकर्मी प्लस’ कार्यक्रमात “एमएमआरडीए” प्रथम मुंबई: महाराष्ट्र  राज्यात तब्बल १५० दिवसांच्या ‘सेवाकर्मी प्लस’ कार्यक्रमात एमएमआरडीएने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबई महानगर प्रदेश अधिक आधुनिक आणि डिजिटल होत असताना, “एमएमआरडीए” देखील आता अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि लोकांसाठी सोयीस्कर अशी प्रशासन व्यवस्था उभारण्यावर भर देत आहे.  यामुळे प्राधिकरणाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आनंद होत व्यक्त होत आहे. तब्बल  १५० दिवसांच्या ‘सेवाकर्मी प्लस’ कार्यक्रमात एमएमआरडीएने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.      तसेच, महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठित १५० दिवसांच्या ‘ई-गव्हर्नन्स सुधारणा’ कार्यक्रमांतर्गत ‘एमएमआरडी’एने राज्यात चौथा क्रमांक प्राप्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. संजय मुखर्जी  महानगर (आयुक्त) एमएमआरडीए यांनाही प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली आहे. ‘सेवाकर्मी प्लस’ कार्यक्रम पुरस्कारासाठी सहभागी शासकीय संस्थांचे मूल्यमापन कर्मचारी विकास आणि सेवा नियमांच्या पालनाशी संबंधित ९ निकषांवर करण्यात आले. तसेच, ‘ई-गव्हर्नन्स सुधारणा’ पुरस्कारासाठी नाविन्यपूर्ण डिजिटल प्रशासनाचा वापर करण्यासंदर्भातील ७ विविध निकषांच्या आधारे संस्थांचे मूल्यमापन करण्यात आले. हे यश डॉ. संजय मुखर्जी यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि टीम “एमएमआरडीए”च्या प्रत्येक सदस्याच्या अथक परिश्रमाचा पुरावा आहे, ज्यांची वचनबद्धता, नाविन्यपूर्ण कल्पना आणि उत्कृष्टतेवरील विश्वास या प्रदेशाच्या परिवर्तनाला दररोज नवी ऊर्जा देत आहे.

जव्हार येथे उत्साहात “मन की बात” कार्यक्रमाचे आयोजन

जव्हार येथे उत्साहात “मन की बात” कार्यक्रमाचे आयोजन योगेश चांदेकर पालघर- देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १३२ व्या मन की बात कार्यक्रमाचे आज जव्हार येथे उत्साहपूर्ण वातावरणात सामूहिक श्रवण करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस  माधवी  नाईक, जिल्हाअध्यक्ष भरत राजपूत, पालघर लोकसभेचे खासदार डॉ. हेमंत सवरा, भाजपचे ज्येष्ठ नेते  बाबाजी काठोले, विक्रमगड विधानसभा मतदार संघाचे आमदार हरिश्चंद्र भोये तसेच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संवादातून देशाच्या प्रगतीचा वेग, सामान्य नागरिकांच्या प्रेरणादायी कथा आणि राष्ट्रनिर्मितीची नवी दिशा यांचा सखोल आढावा घेण्याची संधी मिळाली. प्रत्येक वेळेसारखेच, या कार्यक्रमातून सकारात्मक ऊर्जा आणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थित नागरिकांकडून करण्यात आली.

दीपक केसरकरांची भोंदू खरातवर ‘कृपा’ शालार्थ आयडी घोटाळ्यात हरिभाऊ लाखे नाशिक : दीपक केसरकर शिक्षणमंत्री असताना नाशिकचा लिंगपिसाट भोंदूबाबा अशोक खरातवर ‘केसरकर कृपा’ झाल्याचे पुरावे समोर येत आहेत. राज्यभर गाजलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात भोंदू अशोक…

ठाण्यात भ्रष्टाचाराचे ‘गटार’ २५६० कोटींचा घोटाळा !

ठाण्यात भ्रष्टाचाराचे ‘गटार’ २५६० कोटींचा घोटाळा ! गटार पायवाटांमध्ये भ्रष्टाचाराचा भाजपाचाच आरोप  श्वेतपत्रिका काढण्याची मृणाल पेंडसे यांची मागणी सिद्धेश शिगवण ठाणे : भ्रष्ट्राचार करणाऱ्यांनी ‘गटाराला’ही सोडले नाही. गेल्या चार वर्षांत ठाणे महानगरपालिकेला राज्य सरकारकडून तब्बल…

बस्तर नक्षलमुक्त – अमित शाह

बस्तर नक्षलमुक्त – अमित शाह नवी दिल्ली :  देशाला दीर्घकाळ सतावणाऱ्या नक्षलवादाचा पुर्णता बिमोड केला  असून त्यातून देशाची मुक्तता झाली आहे. बस्तर विभागातून नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात आला आहे, अशी घोषणा लोकसभेत ‘नक्षलमुक्त भारत’ या विषयावरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी  केली. शाह म्हणाले की, देशातील १२ राज्ये नक्षलवादाने प्रभावित होती. डाव्या विचारसरणीमुळे या राज्यांमध्ये नक्षलवाद पसरला होता. मात्र आता बस्तर परिसरातून नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे. लाल दहशतीमुळे त्या भागात विकास झाला नव्हता. पण, आता बस्तरमधील प्रत्येक गावात शाळा उभारण्यात आल्या. यापुढे जो कोणी शस्त्र उचलेल, त्याला कायद्याने उत्तर दिले जाईल. यावेळी शाहांनी विरोधकांवर आरोप केला की, त्यांना नक्षलवाद्यांची सहानुभूती आहे, पण आदिवासींच्या विकासासाठी त्यांनी काही केले नाही. नक्षलवादी विचारसरणीनुसार सत्ता बंदुकीच्या जोरावर मिळते. नक्षलवाद्यांनी आदिवासी युवकांना भडकावून त्यांना शस्त्रे दिली आणि हिंसाचाराच्या मार्गावर नेले. नक्षलवादाचा विकासाशी काहीही संबंध नाही. उलट नक्षलवादामुळे त्या भागांमध्ये विकास थांबला होता. रेड कॉरिडॉरमध्ये नक्षलवादामुळे गरिबी वाढली. नक्षलवाद्यांनी शाळा जाळल्या, त्यामुळे आदिवासी मुलांना शिक्षण मिळू शकले नाही. 75 वर्षांत 60 वर्षे काँग्रेसचे सरकार होते, मग आदिवासी विकासापासून वंचित का राहिले? देश अनेक वर्षे नक्षलवादामुळे त्रस्त होता आणि आता नक्षलमुक्त भारताच्या दिशेने सरकार काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी विकास होत असल्याचा दावा शाहांनी केला.

पनवेलमध्ये २२ शाळा अनधिकृत

पनवेलमध्ये २२ शाळा अनधिकृत पनवेल – पनवेल तालुक्यामध्ये आतापर्यंत एकुण २२ शाळा अनधिकृत असल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ११ अनधिकृत शाळांवर गुन्हे दाखल झाले आहेत. अजून उलवे येथील एका शाळेवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाची सुरू आहे. पनवेल तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी शाहू सतपाल यांनी पदभार स्विकारल्यापासून अनधिकृत शाळांविरोधात कठोर मोहीम हाती घेतली आहे. सतपाल यांनी पदभार स्विकारला त्यावेळेस १२ शाळा अनधिकृतपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर प्रत्येक महिन्याला एक ते दोन अशा आतापर्यंत ११ अनधिकृत शाळा चालविणा-या शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापकावर सतपाल यांनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले. पनवेल तालुका पोलीस ठाण्यात चार दिवसांपूर्वी (ता.२६ मार्च) शिक्षण विभागाच्या तक्रारीनंतर नेरे येथील न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थाचालक, अध्यक्ष आणि मुख्याध्यापकांविरोधात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गट शिक्षणाधिकारी सतपाल यांनी दिलेल्या तक्रारीत २०२३ पासून ही शाळा अनधिकृत चालविली जात होती. यामुळे पालक व विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या शाळेत पहिली ते आठवी या इयत्तेमधील ६९ मुले शिकत होती. पनवेल तालुक्यामध्ये अजून उलवे येथील एका अनधिकृत शाळेविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या व्यतिरीक्त तालुक्यामध्ये अजून १० शाळा अनधिकृत आहेत. गटशिक्षण अधिका-यांनी केंद्रप्रमुखांना अनधिकृत शाळेविषयी सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. त्यामध्ये या १० शाळा अनधिकृत असल्याचे आढळले आहे.

 गारपीट-पाऊस -वादळी वाऱ्यामुळे सिंधुदुर्गातील आंबा -काजूचे उरले -सुरले पीकही धोक्यात…!

गारपीट-पाऊस -वादळी वाऱ्यामुळे सिंधुदुर्गातील आंबा -काजूचे उरले -सुरले पीकही धोक्यात…! पाच वर्षानंतर पुन्हा एकदा तडाखा…! राजन चव्हाण सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकताच पडलेला अवकाळी पाऊस, काही भागाला बसलेला गारपिटीचा तडाखा आणि वादळी वाऱ्यामुळे आंबा आणि काजूचे उरले- सुरले पीकही आता हातचे जाणार अशी भिती व्यक्त केली जात आहे. तर काढणीला आलेल्या रब्बी पिकालाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अचानक आलेल्या या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील आंबा – काजू बागायतदार -शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. गेल्यावर्षी अवकाळी पाऊस आणि मान्सून वेळेअगोदर सुरू झाल्याने ‘कोकम’ या पिकाचे फार मोठे नुकसान झाले होते त्यामुळे त्याचे दरही वाढले होते यंदाही या पिकावर परिणाम होऊन दर वाढण्याची शक्यता आहे. कोकणची काळी -मैना म्हणून ओळखली जाणारे करवंदे यंदा खायला मिळतील की नाही याची शाश्वती नाही. शिवाय जांभुळ पिकावरही या अवकाळी पावसाचा परिणाम होणार आहे. कणकवली,देवगड आणि वैभववाडी या तालुक्यांच्या अनेक भागात  गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आणि कांही भागात तर वीजेचे  खांबही कोसळले. रामनवमीच्या आदल्या दिवशी जिल्ह्यात सकाळपासूनच प्रचंड  उकाडा जाणवत होता आणि रामनवमीच्या दिवशी सकाळपासून अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू झाली.वैभववाडी तालुक्याच्या काही भागात तर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि तालुक्यातील अनेक गावांना त्याचा तडाखा बसला. मालवण तालुक्यातील कसाल,आंब्रड,ओसरगाव,फोंडाघाट, शिवडाव आदी ठिकाणी तब्बल अर्धा ते पाऊण तास पाऊस झाला. देवगड तालुक्यातील अनेक गावांनाही पावसाने चांगलाच तडाखा दिला. बदलत्या हवामानामुळे आधीच संकटात असलेल्या आंबा – काजू बागायतदार आणि शेतकऱ्यांची ब चिंता त्यामुळे अधिक वाढली आहे.शासकीय सर्वेक्षणानुसार बदलत्या हवामानामुळे आणि अवकाळी पावसामुळे ९० टक्के पीक वाया गेले आहे आणि आता उरले -सुरले १० टक्के पिकही हातचे जाईल अशी भिती व्यक्त केली जात आहे. यापूर्वी १९ फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी गारपीट झाली होती त्यामुळे शेतकरी आणि बागायतदारांचे खूप मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीला शेतकरी- बागायतदारांना सामोरे जावे लागत आहे.