Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

एनआयए मनोज रामचंद्र बॅडमिंटन स्पर्धा २६ मार्चपासून

एनआयए मनोज रामचंद्र बॅडमिंटन स्पर्धा २६ मार्चपासून मुंबई, २४ मार्च: महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने आणि नॉर्थ इंडियन असोसिएशन आणि जितेश पदुकोण अकादमीद्वारे आयोजित ‘योनेक्स सनराईज मनोज रामचंद्र स्मृती राज्यस्तरीय खुली बॅडमिंटन स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून खेळली जाणार आहे. या स्पर्धेत ३६० हून अधिक प्रवेशिका आल्या असून ही स्पर्धा पुरुष आणि महिला एकेरी तसेच १५ आणि ११ वर्षांखालील मुले आणि मुली एकेरी गटांमध्ये खेळवली जाईल. हे सामने नॉर्थ इंडियन असोसिएशन, एमआयजी क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि माटुंगा जिमखाना येथील कोर्टवर खेळले जातील. पुरुष आणि महिला एकेरीतील विजेत्यांना प्रत्येकी रोख ४१,००० रुपये तर उपविजेत्याला प्रत्येकी रोख ३१,००० रुपये बक्षीस मिळेल. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे २१,००० आणि ११,००० रुपये मिळतील. १५ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या एकेरी गटातील विजेत्याला ८,५०० रुपये, उपविजेत्याला ५,५०० रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला ३,५०० रुपये असे  बक्षीस ठेवण्यात आले आहे. १५ वर्षांखालील गटासाठीची पारितोषिके संदीप ठाकर यांनी त्यांचे पुत्र निहार ठाकर यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली आहेत. ११ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या एकेरी गटातील विजेत्यांना प्रत्येकी ६,००० रुपये रोख बक्षिसे मिळतील तर उपविजेत्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला प्रत्येकी ४,००० आणि २,५०० रुपये मिळतील. अधिक माहितीसाठी आयोजन सचिव जितेश पदुकोण (९८२१० ५१७९०) यांच्याशी संपर्क संपर्क साधा.

एमसीसी ब्ल्यू संघाचा पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय

एमसीसी प्रो-४० क्रिकेट लीग २०२६ एमसीसी ब्ल्यू संघाचा पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय मुंबई, २४ मार्च: ज्वाला स्पोर्ट्स फाउंडेशन (जेएसएफ) आयोजित एमसीसी प्रो-४० क्रिकेट लीग २०२६ स्पर्धेत (एलिट ग्रुप) एमसीसी ब्ल्यू संघाने ज्वाला स्पोर्ट्स फाउंडेशन (जेएसएफ) संघावर पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मात केली. एमसीसी ब्ल्यू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ४७ षटकांत २३९ धावांची मजल मारली. त्यात झैद मुफ्ती ८७(७३) आणि शौर्य वीर नगरचे ६१(९२) सर्वाधिक योगदान राहिले. जेएसएफकडून निशार्ग चौधरी (५/४५) आणि देव जम्मुला (३/५१) सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले. हर्षल वाघमारे (४/३०), हृद्या (२/१९) आणि अफसर अहमदच्या (२/३७) प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर जेएसएफचा पहिला डाव ४०.३ षटकांत १५० धावांमध्ये आटोपला. त्यांच्याकडून मुहम्मद इब्राहिम ५५(८८) आणि देव जम्मुला २७(२७) सर्वाधिक धावा केल्या. पहिल्या डावातील ८९ धावांची आघाडी एमसीसी ब्ल्यू संघासाठी निर्णायक ठरली. एमसीसी ब्ल्यू संघाने दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ३० षटकांत ७ बाद १९८ धावा केल्या. यांच्याकडून दियान कुबाडिया ५०(४६) आणि डॅलरॉन रॉड्रिग्जने ४३(३४) चांगली फलंदाजी केली. जेएसएफकडून निशार्ग चौधरीने (५/४९) अचूक मारा केला. पराभूत जेएसएफचा अष्टपैलू निशार्ग चौधरीला (संपूर्ण सामन्यात १० विकेट) सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. संक्षिप्त धावफलक: एमसीसी ब्ल्यू संघ (पहिला डाव) – ४७ षटकांत सर्वबाद २३९(झैद मुफ्ती ८७(७३), शौर्य वीर नगर ६१(९२); निशार्ग चौधरी ५/४५, देव जम्मुला ३/५१). दुसरा डाव – ३० षटकांत ७ बाद १९८(दियान कुबाडिया ५०(४६), डॅलरॉन रॉड्रिग्ज ४३(३४); निशार्ग चौधरी ५/४९). जेएसएफ (पहिला डाव) – ४०.३ षटकांत सर्वबाद १५०(मुहम्मद इब्राहिम ५५(८८), देव जम्मुला २७(२७); हर्षल वाघमारे ४/३०, हृद्या २/१९, अफसर अहमद २/३७). निकाल: सामना अनिर्णित, एमसीसी ब्लू संघ पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजयी. सामनावीर: निशार्ग चौधरी १२(२७) ५/४५ आणि ५/४९.

मुरली सुब्रमण्यम एकेरीत राष्ट्रीय बॅडमिंटन विजेता

मुरली सुब्रमण्यम एकेरीत राष्ट्रीय बॅडमिंटन विजेता मडगाव (गोवा) : येथे सुरू असलेल्या Yonex Sunrise ४८व्या भारतीय मास्टर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा २०२५-२६ मध्ये मुंबईच्या मुरली सुब्रमण्यम यांनी ६० वर्षांवरील एकेरी गटात दमदार कामगिरी करत…

 महाराष्ट्रात घुमणार इनडोअर क्रिकेटचा आवाज!

 महाराष्ट्रात घुमणार इनडोअर क्रिकेटचा आवाज!  गरवारे क्लब, वानखेडे स्टेडियममध्ये क्रीडा संघटकांचा ऐतिहासिक मेळावा मुंबई: पारंपारिक क्रिकेटच्या चौकटीबाहेर आता नव्या थराराची चाहूल लागली आहे! महाराष्ट्रात इनडोअर क्रिकेटचा झंझावात घुमवण्यासाठी ‘महाइनडोर क्रिकेट…

तेली समाजाचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात

ठाणे : श्री संताजी सहाय्यक संघ, ठाणे यांच्या वतीने तेली समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन न्यू इंग्लिश स्कूल येथील भोळे सभागृहात उत्साही वातावरणात पार पडले. यावेळी विद्यार्थी गुणगौरव, ज्येष्ठ नागरिक सत्कार, हळदी-कुंकू…

 साईंच्या पालखीतून अवतरले ‘देवदूत’

साईंच्या पालखीतून अवतरले ‘देवदूत’ धामणगाव अपघातातील जखमींना दिले जीवदान! मुंबई : ईश्वराच्या भेटीसाठी निघालेली पावले जेव्हा संकटात सापडलेल्या माणसांच्या मदतीसाठी धावतात, तेव्हा खऱ्या अर्थाने देव पावल्याची प्रचिती येते. असाच अंगावर काटा आणणारा आणि प्रत्येकाची छाती अभिमानाने फुलवून टाकणारा प्रसंग रविवारी रात्री धामणगाव – कवडदरा येथे घडला. भीषण रस्ते अपघातात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तीन मरणोन्मुख तरुणांसाठी ‘भटवाडी साईदर्शन सेवा संस्थे’चे पदयात्री अक्षरशः देवदूत बनून धावून आले आणि त्यांनी प्राण वाचवले. नेमके काय घडले होते ? रविवारी धामणगाव – कवडदरा मार्गावर दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. धडक इतकी जोराची होती की तीन जण गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले होते. अंधाराची वेळ आणि मदतीची वानवा अशा अगतिक परिस्थितीत अपघातग्रस्तांचे प्राण कंठाशी आले होते.जेव्हा टाळ-मृदुंगाचा गजर थांबला आणि माणुसकी धावली… नेमक्या त्याच वेळी भटवाडी साईदर्शन सेवा संस्थेची पदयात्रींची दिंडी तिथून मार्गक्रमण करत होती. साईंच्या दर्शनाची ओढ लागलेल्या या भक्तांनी रस्त्यावरील हे विदारक दृश्य पाहताच क्षणाचाही विलंब केला नाही. त्यांनी भक्तीसोबतच कर्तव्याचे भान राखत तातडीने मदत कार्य सुरू केले. डॉ. जयेश सरमळकर यांनी जखमींवर तातडीने उपचार करण्यासाठी त्वरित हालचाली केल्या. मंडळासोबत असलेल्या रुग्णवाहिकेतून या जखमींना अत्यंत सुरक्षितपणे मोहन वामन व जितेंद्र हरमळकर यांनी नजीकच्या रुग्णालयात पोहोचविले.विभागप्रमुख दिपकबाबा हांडे, गुरुनाथ सामंत, सिद्धू मांजरेकर, प्रतिक जाधव, सागर गायकवाड, करन पायमोडे यांनी रुग्णालय गाठून त्यांना उपचारासाठी दाखल केले आणि गोल्डन आवर्स मध्ये अपघातग्रस्थांना सहकार्य केल्यामुळे एसएमबीटी  रुग्णालयाकडून देखील साईभक्तांचे विशेष कौतुक केले. रुग्णालयाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “भटवाडी साई दर्शन सेवा संस्थेची रुग्णवाहिका अगदी वेळेत पोहोचली, ज्यामुळे जखमींना गोल्डन अवरमध्ये योग्य उपचार मिळू शकले. या भक्तांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठे प्राणहानी टळली आहे.” खऱ्या भक्तीचे दर्शन… पायाला फोड आले तरी साई दर्शनाच्या ओढीने शेकडो किलोमीटर चालणाऱ्या या भक्तांनी केवळ मंदिरात देव न शोधता, संकटात सापडलेल्या माणसांत देव पाहिला. अंगात थकवा असतानाही दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी दाखवलेली ही धडपड पाहून आज प्रत्येकाच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू आहेत. या घटनेने भटवाडी साईदर्शन सेवा संस्थेच्या पदयात्रींनी साईंची ‘माणुसकीची’ शिकवण खऱ्या अर्थाने जगून दाखवली आहे. आज मुंबई वरून शिर्डीला येणाऱ्या सर्व पालख्यांना या थोर कार्याचा सार्थ अभिमान वाटत आहे असे निवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुरेश जाधव यांनी म्हटले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीसाठी निधी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीसाठी निधी आमदार अमित गोरखेंच्या प्रयत्नाला यश मुंबई / रमेश औताडे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सावा निमित्त ठाणे, मुंबई महानगरपालिके प्रमाणे नवी मुंबई महानगरपालिके तर्फे प्रतिवर्षी सात लाख रुपया मंजूर करणे बाबत जे समाज आंदोलन व मागण्या झाल्या त्याला आमदार अमित गोरखे यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. अशी माहिती समाजसेवक राजीव मानकर यांनी दिली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रातील महान साहित्यिक, समाजसुधारक व लोकशाहीर होते. त्यांनी आपल्या साहित्य व शाहिरीच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित घटकांचे प्रश्न समाजासमोर मांडले व सामाजिक प्रबोधनाचे मोठे कार्य केले. त्यामुळे त्यांची जयंती महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. ठाणे महानगरपालिका व मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त दरवर्षी आर्थिक तरतूद करण्यात येते. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देखील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी रु. सात लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात यावी अशी मागणी असणारे निवेदन दिल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून समाजप्रबोधनाचे कार्य अधिक प्रभावीपणे करण्यात येणार असल्याचे राजीव मानकर यांनी सांगितले.

कळसुबाई शिखरावर शालेय विद्यार्थ्यांचा झेंडा

कल्याण : शालांत परीक्षा संपल्यानंतर मुलांना सुट्ट्यांचे वेध लागतात. दहावीची परीक्षा संपल्यानंतर पिकनिक, वॉटर रिसॉर्ट, मोबाईल, कम्प्युटर गेम यापासून दूर जात  काही मुलांनी एकत्र येत महाराष्ट्रातील कळसुबाई शिखर पार करण्याची मोहीम आखली. यासाठी गिर्यारोहक आणि प्रशिक्षक प्रदीप नायक यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येत लोक कल्याण पब्लिक स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच ही मोहीम फत्ते केली. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोला तालुक्या मध्ये असणारे सर्वोच्च शिखर (१६४६ मी/५४०० फूट उंच ) ज्याला महाराष्ट्र चा एव्हरेस्ट मानले जाते. मुलांनी सायंकाळी शिखराकडे कूच केल्यानंतर मध्ये अनेक अडचणी आल्या. विद्यार्थ्यांचा हा पहिलाच प्रयत्न होता. या सर्वांवर मात करत सकाळी ६ वाजता शालेय विद्यार्थ्यांनी कळसुबाई शिखर सर केले. या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि पहिल्यांदाच केलेला कामगिरीचा आनंद चेहऱ्यावर दिसत होता.  या टीम मध्ये स्केटिंगची राष्ट्रीय खेळाडू आस्था नाइकर, तीर्था पणिकेर, दिशिता खाचणे, हर्षिल सोळंकी, धनराज सावंत, सार्थक घोडेस्वार, श्रेया प्रसाद, श्लोक बोंबाटकर, शोभित लोखंडे, सई देशमुख, अमेय सोरकाडे, यश भोर, रणबीर प्रसाद, श्रावणी बांदेकर, कृष्णा पाणीग्रही, तृषा खराडे, पार्थ दाभाडे, मनस्वी ढेंगरे, विरेन वानखेडे, अथर्व कदम, वेदिका देवळेकर, मनस्वी फुटाणे, आर्या गुरव आणि प्रशिक्षक प्रदीप नायक यांचा समावेश होता.

टँकरच्या नावाने करोडो रुपयांची झाली सरकारी उधळपट्टी तरीही पाणी टंचाई कायम !

टँकरच्या नावाने करोडो रुपयांची झाली सरकारी उधळपट्टी तरीही पाणी टंचाई कायम ! धरणांच्या तालुक्याची भयानक कैफियत अविनाश उबाळे ठाणे : शहापूर तालुक्यातील दुर्गम आदिवासी गाव पाड्यांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या काळात उन्हाळ्यात दरवर्षी टंचाईग्रस्त गाव पाड्यांना टँकरने पाणी पुरविले जाते.यासाठी पाणी पुरवठा विभागाकडून सरकारी टँकर सुरु केले जातात केवळ आदिवासी गाव पाड्यांवर पाणी पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आजमितीस सरकारी तिजोरीतून करोडो रुपयांची टँकरच्या नावाने उधळपट्टी केलेली आहे.उन्हाळा सुरु झाला की टंचाई गाव पाड्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा पाणी पुरवठा विभागाकडून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला जातो त्यास शासनाची मंजूर मिळाली की टँकर सुरु करण्यासाठी निविदा मागविल्या जातात आपल्या मर्जीतल्याच टँकर लॉबीला पाणी पुरविण्याची दरवर्षी कंत्राट दिली जातात जिथे टँकर पोहचू शकत नाहीत अशा डोंगरदऱ्या खोऱ्यात पठारावर असलेल्या वाड्या वस्त्यांवर बैलगाडीतून पाणी पुरवठा केला जातो गेल्या १० वर्षांत तब्बल ६ कोटींहून अधिक खर्च हा राज्य सरकारला केवळ टंचाई गाव पााड्यांना पाणी पुरविण्यासाठी करावा लागला आहे बरेच वर्ष टँकरवर अवलंबून असणारा शहापूर तालुका दुर्दैवाने आजही टँकरमुुक्त होऊ शकलेला नाही . आजही आदिवासी महिलांची पाण्यासाठी सुरु असलेली वणवण व त्यांच्या डोक्यावर हंडा हे चित्र नजरेस पडते.टँकर उन्हाळ्यात सुरु होऊनही हे टँकर कधीच सुरळीतपणे व वेळेवर टंचाई ग्रस्त गाव पाड्यांवर पोहचले नाहीत अशी ओरड आदिवासी महिलांची असते आणि प्रत्यक्षात वस्तुस्थिती देखील तशीच बघायला मिळते आहे.अनियमित टँकर येत असल्याने टँकरची वाट पाहत बसण्यापेक्षा आदिवासी पाण्यासाठी इतरत्र भटकंती करतात प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका आदिवासींना बसत असल्याने  टँकर नंतरही पाण्यासाठी त्यांचे भयानक हाल सुरुच असल्याचे चित्र तालुक्यातील टंचाई ग्रस्त गाव पाड्यांवर दिसत आहे .टंचाई ग्रस्त भागात टँकरने पाणी पुरवठा करण्याबरोबरच टंचाई आराखड्यात नवीन पाणी योजना प्रस्तावित करणे,नव्या विहीरी बांधणे,विहिरींमधील गाळ काढणे,व विहिरींचे खोलीकरण करणे ,नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्ती करणे, नवीन विंधन विहीरी,जुन्या विंधन विहीरींची दुरुस्ती करणे,हात पंप बसवणे टंचाईग्रस्त भागातील गावासाठी बोअरवेल मंजूर करणे यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होतो पण गेल्या कित्येक वर्षापासून हा निधी खर्च होऊनही अनेक योजनांत गैरव्यवहार झाल्याने बहुतांश योजनांचा खर्च हा अक्षरशः पाण्यात गेलेला दिसतो आहे .या गैरव्यवहार प्रकरणी स्थानिक ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनांवर यापूर्वी गुन्हे देखील दाखल झालेले आहेत या सर्व पाणी योजनांची शासनस्थरावर चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे .या सर्व पाणी योजना या कुचकामी ठरल्याने टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ येथे आली आहे.जवळपास तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींच्या गाव पाड्यावरील अनेक पाणी योजना बोगस ठरलेल्या आहेत.शहापूर तालुक्यात एकूण २०३ पाणी योजना असल्याची माहिती मिळते आहे यातील १३७ पाणी योजना या कशातरी रडतखडत सुरु आहेत तर जवळपास १७ पाणी योजना अपूर्ण अवस्थेत बंद पडून आहेत.बऱ्याच आदिवासी वस्त्यांमध्ये पाणी योजनाच नाहीत ठाणे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग कित्येक वर्ष टँकरने पाणी पुरविण्याचे नियोजन करते परंतु शहापूरची ही पाणी टंचाईची अवस्था पाहता व त्यासाठीचा होणारा अवास्तव खर्च पाहता टंचाईग्रस्तांसाठी पाणी पुरवठा करण्यासाठीच्या ठोस अशा कोणत्याच उपाययोजना पाणी पुरवठा खात्याला एवढया वर्षांत करता आलेल्या नाहीत हे टंचाईग्रस्तांना टँकरने पाणी पुरवठयासाठी झालेल्या सरकारी खर्चावरुन स्पष्ट होत आहे.या कामी ग्रामीण पाणी पुरवठा योजना सपशेल अपयशी ठरल्याने उन्हाळ्यात फक्त पाण्यासाठी टँकरवरच गाव पाड्यांवरील लोकांना अवलंबून राहावे लागत आहे.हे येथील जळजळीत वास्तव आहे.शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई सोडवण्यासाठी सरकारचे कुठलेच योग्य नियोजन दिसून येत नसून केवळ नेहमीची येतो पावसाळा, या युक्ती प्रमाणे दरवर्षी फक्त टँकरने पाणी पुरवठा या गोंडस नावाखाली टँकर लॉबीला पोसण्याचे काम येथे कित्येक वर्ष प्रशासनाकडून सुरु असून ही टँकरच्या नावाने सरकारी उधळपट्टी येथे सुरु असल्याचे दिसत आहे .करोडो रुपये टँकरच्या नावाखाली खर्च होऊनही हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांची उन्हातान्हात वणवण कायम असल्याचे विदारक असे चित्र धरणांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहापूर तालुक्यात दिसत आहे.

ॲट्रॉसिटी प्रकरणातील फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

विष्णू व अक्षय घुडे दोघे अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी राजीव चंदने मुरबाड :सरळगाव येथे वकील एड. प्रफुल्ल अजित रोकडे व त्यांचे भाऊ अक्षय अजित रोकडे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपी विष्णू सदाशिव घुडे व अक्षय सदाशिव घुडे या दोघांना मुरबाड पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर प्रकरणात जातीय द्वेषातून हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर मुरबाड पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात बौद्ध समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता. समाजातील वाढत्या रोषाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपासाला गती देत दोन्ही आरोपींना अटक केली. या कारवाईबद्दल पोलीस उपविभागीय अधिकारी लाड यांच्या कार्याचे आंबेडकरी समाजाकडून अभिनंदन करण्यात येत आहे. या प्रकरणातील सर्व संबंधित आरोपींना अटक करण्यात आल्याने आता तपास पुढील कायदेशीर प्रक्रियेनुसार सुरू असून, पीडितांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 00000000000