Month: July 2026

एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिराचे यशस्वी आयोजन

– ज्येष्ठ नागरिक सेवा समितीचा उपक्रम मुंबई: पामबीच ज्येष्ठ नागरिक सेवा समितीच्या वतीने नुकतेच विरंगुळा केंद्रात सानपाडा येथील भारत ई सेवा केंद्राच्या  सहकार्याने  नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत आणि नगरसेवक निशांत भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एनसीएमसी  स्मार्ट कार्डचे नोंदणी शिबिर संपन्न झाले.  उपमहापौर दशरथ भगत यांनी याप्रसंगी सांगितले की, उरलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अशाच प्रकारचे शिबिर पुन्हा आयोजित केले जाईल.  त्यावेळेस इतर ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. या शिबिरात १०६ ज्येष्ठ नागरिकांनी एनसीएमसी कार्डसाठी आपल्या नावाची नोंदणी करून,  या योजनेचा लाभ घेतला. शिबिर आयोजन करण्यासाठी पामबीच ज्येष्ठ नागरिक सेवा समितीचे अध्यक्ष देवेंद्र खाडे, सचिव चंद्रकांत काळे, खजिनदार हेमंत देसाई, इतर पदाधिकारी आणि कार्यकारी मंडळाने विशेष परिश्रम घेतले. एनसीएमसी कार्ड नोंदणीसाठी सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव, भारत ई सेवा केंद्राच्या विजया विश्वासराव, दिपाली पाटील यांनी मदत केली.  एनसीएमसी म्हणजे राष्ट्रीय सामायिक परिवहन कार्ड असून हे ‘वन नेशन, वन कार्ड’ या संकल्पनेवर आधारित आहे. हे कार्ड मेट्रो, बस, लोकल ट्रेन, टोल, पार्किंग यासाठी वापरण्याची सोय असून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसमध्ये ६५ वर्षावरील पुरुषांना  ५० टक्के व ७५ वर्षावरील ज्येष्ठांना विनामूल्य प्रवासाची सवलत मिळते.  महिलांसाठी ही सवलत १२ वर्षानंतर लागू आहे.  खरेदी व इतर रक्कम अदा करण्यासाठी डेबिट कार्ड प्रमाणे हे कार्ड वापरता येते.  या कार्डची एकदाच नोंदणी केल्यानंतर वारंवार कागदपत्रे दाखवण्याची  आवश्यकता  रहात नाही. शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी नाव नोंदणीसाठी शिस्तीचे पालन केले,  त्याबद्दल पामबीच ज्येष्ठ नागरिक सेवा समितीच्या वतीने सर्व ज्येष्ठ नागरिकांचे आभार मानण्यात आले. 00000000

शहीद भीमसैनिकांच्या बलिदानावर राजकारण थांबवा – उत्तमराव गायकवाड

रमेश औताडे मुंबई : रमाबाई घाटकोपर शहिद भीम सैनिक स्मृतीला २९ वर्ष झाले आणि त्याचे राजकीय भांडवल सुद्धा भरपूर झाले. परंतु शहिदांचा परिवार कसा जगत आहे. त्यांना मरणारे आजही मोकाट आहेत. त्यांना कोणाचे संरक्षण आहे. ती समीक्षा करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते उत्तमराव गायकवाड यांनी केले.  शहिद भीम सैनिक स्मृती दिनानिमित्त आयोजित आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा मुंबई प्रदेशच्या वतिने समिक्षा अभियान प्रारंभ करताना बोलत होते. अभियानात प्रामुख्याने स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक हिरे, मुंबई प्रदेश अध्यक्ष विकास काटे, रिपब्लिकन नेते मंगेश पगारे, चिंतामण गांगुर्डे, काका गांगुर्डे, झुंजार गवळी प्रफुल्ल इंगोले,गुडु रंगारी उपस्थित होते.  मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येणार आहे. आम्ही सर्व सहन करू शकतो परंतु आंबेडकरी अस्मितेच्या प्रश्नावर ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या सन्मानार्थ हा लढा आहे असे मत विकास काटे यांनी मनोगत भाषणात व्यक्त केले.

मुदतबाह्य दूध, पाव सोसायटीत फेकणाऱ्या नामांकित ऑनलाईन कंपनीचे गोदाम सील!

अनिल ठाणेकर ठाणे-ऑनलाईन वस्तू विक्री करणाऱ्या नामांकित कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मुदतबाह्य दूध, पावाच्या पुड्यांसह विविध नाशवंत माल सोसायटीच्या आवारात फेकून दिल्यानंतर सोसायटीतील रहिवाशी व महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर दादागिरी करण्याचा प्रकार घडला…

कच्छ समाजातील गुणवंतांचा गौरव सोहळा १५ जुलैला

ठाणे- कच्छ समाजाचे नवीन वर्ष म्हणून साजऱ्या होणाऱ्या आषाढी बीज निमित्त कच्छ समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा गौरव करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या कच्छ अस्मिता मंचातर्फे यंदाचा ‘कच्छ पागडी…

श्रीराम मंदिरातील कथित लुटीविरोधात माजी खासदार राजन विचारे यांचे आंदोलन

अनिल ठाणेकर ठाणे : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित देणगी घोटाळा व लूटप्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने राज्यभर सुरू केलेल्या ‘रामरक्षा आंदोलन’ अंतर्गत माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात श्रीराम मंदिरासाठी देशभरातील भाविकांनी श्रद्धेने दिलेल्या देणगीच्या कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. “प्रभू श्रीरामाच्या नावावर जमा झालेल्या जनतेच्या पैशांचा अपहार झाल्याचा आरोप अत्यंत गंभीर असून सत्य जनतेसमोर यावे,” अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. राजन विचारे यांनी यावेळी सरकारवर टीका करत, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केला. राज्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून ‘रामरक्षा आंदोलन’ विविध ठिकाणी राबविण्यात येत असून, श्रीराम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

 एसआयआरसाठी 20 लाख मतदारांना अर्जांचे वितरण

– विशेष शिबिराचा लाभ पावणेदोन लाख मतदारांना हरिभाऊ लाखे नाशिक : जिल्ह्यात मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेंतर्गत शुक्रवारी सायंकाळी ६ पर्यंत १ लाख ६१ हजार ६१२ अर्जांचे वितरण करण्यात आले. गेल्या १० दिवसांत २० लाख अर्ज घरोघरी जाऊन वितरित करण्यात आले. जिल्ह्यातील ५१ लाख ४ हजार ४५८ मतदारांपैकी ४० टक्के मतदारांपर्यंत अर्ज पोहोचल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली. विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेंतर्गत प्रत्येक मतदारापर्यंत एसआयआरचा अर्ज पोहोचविण्याचे काम बीएलओंकडून सुरू असून, शुक्रवारपासून विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यात शनिवार व रविवार या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात अर्ज वितरण व संकलन होऊन जिल्ह्यातील कामकाज ५० टक्क्यांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास निवडणूक विभागाने व्यक्त केला आहे. ३१ जुलैपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. एसआयआरसाठी विविध राजकीय पक्षांनी आतापर्यंत १४ हजार ४९८ बीएलए उपलब्ध करून दिले आहेत. यात सर्वाधिक ४,५३४ बीएलए शिवसेना (ठाकरे गट), त्यानंतर भाजपने ३,४५१, शिवसेना (शिंदे गट) ३,४३०, काँग्रेसने १,०८९, राष्ट्रवादीने १,७१५, राष्ट्रवादी शरद पवार गटाने २७८, बसपा ९ यांचा समावेश आहे. मनसेने अद्याप एकही बीएलए उपलब्ध करून दिलेला नाही. नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक वितरण करण्यात आले. पश्चिम- १८,२६१, येवला- १४,६०१, चांदवड-१४,१५४ निफाड- १३,१०४, दिंडोरी- १२,५००, सिन्नर- १०,५३१, मालेगाव बाह्य- १०,०४२, इगतपुरी- ९,२३९, नांदगाव- ८,८६८, नाशिक पूर्व- ८,८२३, बागलाण- ८,६५६, नाशिक मध्य- ६,९७७, देवळाली- ६,९४१, मालेगाव मध्य- ४,२२१, एकूण- १,६१,६१२

रोथे एर्डे कंपनी व्यवस्थापनाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी

 कामगारांना न्याय देण्याचे कामगार मंत्र्यांचे आश्वासन अनिल ठाणेकर ठाणे- इगतपुरी तालुक्यातील रोथे एर्डे (Rothe Erde) कंपनीतील कामगारांवरील कथित दडपशाही आणि कमी करण्यात आलेल्या कामगारांना पुन्हा सेवेत न घेण्याच्या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले. मुंबईतील विधान भवन येथे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत रोथे एर्डे कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांवर सुरू असलेल्या कथित अन्याय आणि दडपशाहीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्या उपस्थितीत सीटू (CITU) प्रतिनिधींनी सविस्तर निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली. बैठकीत प्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिले की, ३ जून २०२६ रोजी कामगार मंत्री, आमदार हिरामण खोसकर, कंपनी व्यवस्थापन आणि युनियन पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या ऑनलाइन बैठकीत कंपनीने कमी केलेल्या सर्व १६० कामगारांना पूर्ववत सेवेत घेण्याचा निर्णय झाला होता. तसेच पुढील प्रक्रिया कामगार उपायुक्तांच्या माध्यमातून राबविण्याचे निर्देशही देण्यात आले होते. मात्र, या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नसून, एकाही कामगाराला पुन्हा कामावर घेतले गेले नाही. उलट व्यवस्थापनाकडून कामगारांवर दडपशाही सुरू असल्याचा आरोप सीटूने केला. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनावर कठोर कारवाई करून सर्व कामगारांना तातडीने पूर्ववत सेवेत घेण्याची मागणी करण्यात आली. यावर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, तसेच कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेईल, असे आश्वासन दिले. या बैठकीला सिटूचे जिल्हा सरचिटणीस कॉ. देविदास आडोळे, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे, सागर नाठे, कामगार प्रतिनिधी आकाश राजोळे, सागर गुळवे, किरण थोरात तसेच कामगार कुटुंबीय आणि महिला उपस्थित होत्या.

डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रे सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत

 शास्त्रीनगर हॉस्पिटल डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रे कल्याण न्यायालयात हजर कल्याण : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील  डॉक्टरांना मारहाण प्रकरणातील प्रमुख आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवार…

वालधुनी पुलावरील अवजड वाहन प्रतिबंधक बॅरिकेडला टेम्पोची धडक संपूर्ण बॅरिकेड कोसळले कल्याण : कल्याण पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या वालधुनी पुलावर अवजड वाहनांना प्रतिबंध करण्यासाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी बॅरिकेडला शुक्रवारी सकाळी सुमारे ८ च्या दरम्यान एका दुध वाहतूक करणाऱ्या टेम्पोची जोरदार धडक बसल्याने संपूर्ण बॅरिकेड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी अथवा कोणीही जखमी झालेले नाही. घटनेनंतर काही काळ पुलावरील वाहतुकीवर परिणाम झाला. बॅरिकेड कोसळल्यामुळे अवजड वाहनांच्या प्रवेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी उभारण्यात आलेली व्यवस्था निष्प्रभ झाली. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सुरुवात केली. दरम्यान, ही घटना सकाळच्या वर्दळीच्या वेळेत घडल्याने मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. पुलावरील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्याबरोबरच बॅरिकेडची मजबुती आणि नियमित देखभाल करण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.