राज ठाकरेंच्या सतत बदलत्या भूमिकांमुळे मनसे कार्यकर्ते संभ्रमात

डोंबिवली : मनसे मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठींबा जाहीर केला. मनसे पक्षाच्या सततच्या बदलत्या भूमिकांमुळे येथील मनसेचे काही कार्यकर्ते संभ्रमात आहेत. दरम्यान राज ठाकरे यांच्या या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर पक्ष संघटना वाढविण्यात व नागरिकांपर्यंत योग्य भूमिका मांडण्यात कार्यकर्त्यांना अडचणी येत असल्याचे कार्यकर्तायंचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर डोंबिवली शहर संघटक मिहिर दवते आणि त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी मनसेला रामराम ठोकला आहे. पक्षाच्या होत असलेल्या नुकसानीचे आम्हाला भागीदार बनायचे नसल्याने आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे यावेळी मिहीर यांनी सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर पाठींबा दिला आणि हा निर्णय पटत नसल्याने मनसेचे सरचिटणीस कीर्ती कुमार शिंदे यांनी फेसबुक पोस्टद्वारे मनसेला रामराम ठोकला. यानंतर डोंबिवलीतील मनसे कार्यकर्त्यांनी देखील पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याने पक्षाला गळती लागली आहे. यानंतर डोंबिवलीमधील मनसे शहर संघटक मिहीर दवते आणि त्यांच्या सोबत असलेल्या सहकारऱ्यांनी देखील मनसेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बदल्यात भूमिकेमुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या बदल्यात भूमिकेमुळे मतदारांसमोर जाणे अवघड होते. त्यामुळे आम्ही पक्षाचे काम थांबवत आहोत असे दवते यांनी सांगितले.
राज साहेबांनी आम्हाला राजकारणात ओळख दिली, पण त्याच बरोबर 2010 साली झालेल्या केडीएमसी महापालिका निवडणुकीत व त्यानंतर आम्ही सुद्धा काही ठिकाणी वैयक्तिक पातळीवर झुंज दिली. 10 वर्ष सिटींग नगरसेविका असलेल्या मंगला सुळे यांना पराभव पत्करावा लागलेला, त्यानंतर देखील 2015 साली झालेल्या महापालिका निवडणुकांत मोदी लाटेतही आम्ही टिळकनगर सारख्या भाजपाच्या गडात फक्त आमची संघटना बांधणी व वैयक्तिक संबंधामुळे एक हजारच्या घरात मते घेतली होती.
राज साहेबांची मराठी बद्दलची असलेली कट्टरता हीच आमची दक्षिणा आहे असे आम्ही समजतो. संघटना कुटुंबाप्रमाणे होती. पण गेल्या सात आठ वर्षात पुला खालून बरेच पाणी वाहून गेले आहे. संघटनेतील हेव्या दाव्यांमुळे पक्षाचे होत असलेल्या नुकसानाचे आम्हाला भागीदार बनायचे नाही. म्हणून आम्ही सर्वांनी एक मताने हा निर्णय घेतलाय असे मिहीर यांनी सांगत पक्षाला सोडचिठ्ठी दिली.
दरम्यान मनसे शहर संघटक मिहीर दवते हे शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात जाऊ शकतात अशी एक चर्चा डोंबिवलीत आता रंगू लागली आहे. याबाबत मिहीर यांनी सांगितले की सर्वच पक्षाशी माझे पहिल्यापासून चांगले हितसंबंध राहीले आहेत. पक्षात माझे जुने मित्र राहीले आहेत ते आज नाही. सध्या मी कोणत्या पक्षात जायचे हा निर्णय घेतलेला नाही. राजकारणाला आजच्या घडीला आमचा विराम असेल एवढेच सांगेल असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *