कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील सीआरझेड, आरआरझेड क्षेत्राच्या ऱ्हासाला पायबंद कधी बसणार?
कांदळवनांचा वाढता ऱ्हास कधी थांबणार ?
कल्याण : कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात सीआरझेड आरआरझेड क्षेत्राचा वाढता ऱ्हास पाहता यावर प्रशासनाने कठोर पायबंद घालत हे क्षेत्र संरक्षित करणे गरजेचे आहे. गेली आठ वर्षात प्रशासकीय राजवटीत सीआरझेड, आरआरझेड क्षेत्रात झालेले अनाधिकृत भराव आणि कांदळवनाच्या ऱ्हासाचा फटका पाहता प्रशासनाने सीआरझेड, आरआरझेड क्षेत्राची कठोर अमंलबजावणी केली पाहिजे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रफळ ६७.६५ चौ.कि.मी. अंदाजे, भौगोलिक परिस्थिती समुद्र सपाटीपासून ० ते २० मीटर उंच तीन बाजूंनी खाडी यामध्ये  बारावे जंक्शन जवळील कल्याण खाडी, ते मोठागाव खाडी परिसर असा मोठा परिसर उल्हास खाडी  सीआरझेड  अंतर्गत समावेश आहे. तर कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात  उल्हास नदी, काळूनदी, वालधूनी नदी यादेखील बारावे जक्शंन जवळ कल्याण खाडीला येऊन मिळतात. कल्याण-डोंबिवली मनपा परिसरातील सीआरझेड (कोस्टल रेग्युलेशन झोन) आणि आरआरझेड (रिव्हर रेग्युलेशन झोन) संबधित नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसत असून कल्याण-डोंबिवली हा भाग खाडीच्या जवळ असल्याने येथे सीआरझेड नियम लागू होतात.
डोंबिवलीतील कोपर, आयरे आणि मोठागाव या खाडी नजीकच्या भागांत सीआरझेड, उल्लंघन करून चाळी बांधल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. भूमाफियांनी खाडीकिनारच्या  भागात भराव टाकून अतिक्रमण केले असून, त्यावर कारवाईसाठी पर्यावरण प्रेमी सातत्याने मागणी करत आहेत. शहारातील जमिनी संपल्याने अनधिकृत बांधकामदारांनी आता आपला मोर्चा खाडीकिनारी वळवला आहे. या अनधिकृत बांधकामासाठी खाडी किनारच्या खारफुटीच्या झाडांची तोड सुरु असून ‘पर्यावरणाला यातून धोका निर्माण होत आहे.
खारफुट अर्थात खाडीकिनारच्या जमीनीवर असणाऱ्या वृक्षांना पर्यावरणाच्या दृष्टीने भरपूर महत्व आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या वृक्षांची आवश्यकता असते. या सीआरझेड क्षेत्रातील कांदळवन दलदलीच्या भागावर भूमाफिया यांची वक्र दृष्टीमुळे अनाधिकृत भराव करीत बांधकामाची जागा निर्माण करायला या ठिकाणी असणाऱ्या खाडी किनारच्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होत आहे. तर काही ठिकाणी विकासकामांच्या कॉंक्रीटीकरणामुळे कांदळवनांना फटका बसल्याने खारे पाणी येत नसल्याने कांदळवने बाधित होत आहेत. या वृक्ष तोडीकडे प्रशासनाने योग्य लक्षपुरवून कारवाई करत नसल्याने या वृक्षतोडीला आळा बसत नाही. ग्रामीण भागत नव्हे तर शहरी विभागातील अशा खारफुटीच्या झाडांची मोठया प्रमाणात तोड झाल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या या खारफुटीच्या तोडीने विविध आपत्तींना तोंड देण्याची वेळ यायची संभवाना असून प्रशासन येथे जातीने दुर्लक्ष करत आहे. वास्तविक पाहता कोणताही वृक्ष तोडण्यास रितसर परवानगी घेणे गरजेचे असते. परंतु खाडी किनारी भागात या वृक्षांची खुलेआम कत्तल करुन चाळी वा तत्सम अनधिकृत बांधकामे उभारली जात आहेत. खाडी किनारी संरक्षित करुन हरित पट्ट्याचे जतन करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु आर्थिक गणितातून या खाडी किनारी असणाऱ्या खारफुटीची कत्तल होत असल्याची चर्चा आहे.  तसेच अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती, हाय टाईड यावेळेस कांदळवन क्षेत्रातील खारफुटी ही पाण्याचा वाहता प्रवाह इतरत्र  पसरण्यापासून रोखण्यासाठी नैसर्गिक स्त्रोत्र असल्याचे जाणकार सांगतात त्यामुळे खारफुटीचे संवर्धन काळाची गरज आहे.         आता तरी प्रशासनाने डोळसपणे कारवाईचा बडगा उगरित खारफुटीची झाडे वाचवून खाडी किनारी संवर्धन केले पाहिजे व पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे अशी मागणी जोर धरु पाहत आहे.
“खारफुटीच्या वृक्षतोडीच्या तक्रारी आम्ही मुंबई कांदळवन कक्षकडे वर्ग करतो असे वृक्ष प्राधिकरणाचे क.डों.म.पा अधिकारी संजय जाधव यांनी सांगितले.” तर नदी किनारी भागात देखील किनाऱ्यालगत भराव, नदी किनाराचा नैसर्गिक समतोलला बाधा आणित खोदकाम करीत मातीच्या नैसर्गिक उंचवटे यांचे सपाटीकरण  याबाबत प्रशासनाने दक्ष राहिले पाहिजे, तसेच नदी किनारा जवळील बांधकामा बाबत नियमावलीचे काटेकोर पालन याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
“याबाबत पर्यावरण दक्षता मंडळ व्यवस्थापक रूपाली शाईवाले यांच्याशी संपर्क साधला असता कांदळवन वाढता ऱ्हास संदर्भात सांगितले की, सातपूल जेटी कुभंरखाण पाडा, खाडी परिसर, जुनी डोंबिवली, खाडीपरिसर कोपर खाडीपरिसर, भोपर खाडी परिसर या परिसरात कांदळवन अजूनही अस्तित्वात असून या संदर्भीत परिसरात विकास कामे करताना  कांदळवनाचा ऱ्हास होणार नाही याकडे लक्ष देत खारफुटी चे संवर्धन करीत या परिसरात पाणथळ, दलदलीच्या ठिकाणी आढळणाऱ्या पक्षांचा अधिवास टिकून राहण्यासाठी, तसेच नैसर्गिक समतोल साधण्यासाठी खारफुटीचे संवर्धन करणे गरजेचे आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *