Category: होम

नाशिककरांनो, आता अनियंत्रित पार्किंग महागात पडणार!

 अखेर ‘स्मार्ट पार्किंग’ योजनेला मिळाला मुहूर्त” हरिभाऊ लाखे नाशिक : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजित करण्यात आलेल्या महापालिकेच्या स्मार्ट पार्किंग योजनेला अखेर मुहूर्त सापडला आहे. पाचव्यांदा राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत तीन ठेकेदार पात्र ठरल्यामुळे संबंधित प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महापालिका आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. येत्या आठवडाभरात ठेकेदार निश्चितीची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र, शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर सुरू असलेल्या खोदकाम आणि विकासकामांमुळे स्मार्ट पार्किंगची अंमलबजावणी सुरुवातीला निवडक ठिकाणीच करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिकेने नाशिक पूर्व आणि पश्चिम विभागातील सुमारे सहा चौरस किलोमीटर परिसरात प्रायोगिक स्वरूपात २२ ऑन-स्ट्रीट आणि ६ ऑफ-स्ट्रीट अशा एकूण २८ स्मार्ट पार्किंग स्थळांची योजना आखली आहे. प्रत्येक पार्किंग परिसरात सुमारे १०० ते १५० मीटर अंतरावर पार्किंग व नो-पार्किंग झोन निश्चित करण्यात येणार आहेत. या योजनेसाठी यापूर्वी चार वेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. सुरुवातीला महापालिकेला दरमहा निश्चित रॉयल्टी देण्याच्या अटीला ठेकेदारांनी विरोध दर्शविला होता. त्यानंतर प्रशासनाने अटी-शर्तींमध्ये बदल करून रॉयल्टीची रक्कम ३५ लाख रुपयांवरून २० लाखांपर्यंत कमी केली. या बदलानंतर पाच कंपन्यांनी निविदा भरली होती; मात्र तांत्रिक तपासणीत त्या अपात्र ठरल्या होत्या. अखेर पाचव्या फेरनिविदेत तीन कंपन्या पात्र ठरल्याने प्रकल्पाच्या अंमलबजावणीत मार्ग मोकळा झाला. महासभेच्या मंजुरीनुसार दुचाकीसाठी दोन तासांपासून २४ तासांपर्यंत १० ते ६० रुपये, तर चारचाकीसाठी २० ते १०० रुपये (ऑन-स्ट्रीट) आणि ऑफ-स्ट्रीट पार्किंगसाठी २० ते २०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. टोइंग शुल्कामध्ये दुचाकी व तीनचाकी वाहनांसाठी ७०० रुपये, तर चारचाकी वाहनांसाठी १,१५० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. स्मार्ट पार्किंग योजनेमुळे शहरातील अनियंत्रित पार्किंगला आळा बसण्याबरोबरच वाहतुकीला अधिक शिस्त लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. टोइंगचे दर (रुपये) दुचाकी: ७०० तीनचाकी: ७०० चारचाकी: १,१५० ४,१५५ वाहनांच्या पार्किंगची सुविधा स्मार्ट पार्किंग योजनेअंतर्गत एकूण ४,१५५ वाहनांच्या पार्किंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. अधिकृत रिक्षा थांबे वगळता अन्य ठिकाणी उभी असलेली वाहने टोइंग करण्याचा अधिकार संबंधित ठेकेदाराला असेल. तसेच पार्किंग शुल्क आणि दंडाची संपूर्ण वसुली ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असून, त्यामुळे महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या महसुलातही भर पडणार आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण

चिकणघर परिसरातील रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी  कल्याण : कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले असून या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे  रस्त्यांवरील हे खड्डे तातडीने बुजवून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी हेल्पिंग हँड सामाजिक संस्थेने केली असून याबाबत संस्थेचे अध्यक्ष सचिन राऊत यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्र दिले आहे. काही दिवसांपूर्वी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर रस्ते तातडीने दुरुस्त करण्यासाठी महानगरपालिकेकडे निवेदन दिले होते. त्यानंतर काही ठिकाणी रस्त्यांचे काम करण्यात आले. मात्र, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या काही दिवसांतच पावसात ते रस्ते पुन्हा वाहून गेले आणि खड्ड्यांची समस्या पूर्वीपेक्षा अधिक गंभीर झाली आहे. याच कारणामुळे पुन्हा महानगरपालिकेकडे निवेदन देऊन संबंधित रस्त्यांची तातडीने, दर्जेदार आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी संस्थेतर्फे करण्यात आली आहे. जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास आणि अपघातांचा धोका कमी होईल. चिकणघर परिसरातील संदीप हॉटेल ते मधुरीमा स्वीट्स या दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्‌डे पडले असून रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावर तीन ते चार शाळा असून दररोज हजारो शाळकरी वि‌द्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर नागरिक या रस्त्याचा वापर करतात. रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांसाठी हा रस्ता अधिक धोकादायक ठरत आहे. परिसरातील नागरिकांनी यापूर्वीही यासंदर्भात महानगरपालिकेकडे लेखी तक्रारी सादर केल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. तरी या बाबीची तातडीने दखल घेऊन संदीप हॉटेल ते मधुरीमा स्वीट्स या मार्गावरील सर्व खड्डे त्वरित बुजवून रस्त्याची योग्य दुरुस्ती करण्याचे आदेश संबंधित विभागास देण्याची मागणी हेल्पिंग हँड सामाजिक संस्थेने केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे.

प्रस्तावित डेटा सेंटरविरोधी लढ्याला ज्येष्ठ नागरिकांचा जाहीर पाठिंबा

अनिल ठाणेकर ठाणे: ठाण्यातील प्रस्तावित डेटा सेंटर प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या जनआंदोलनाला आता ज्येष्ठ नागरिकांचाही ठाम पाठिंबा मिळाला असून, या लढ्यात ते सक्रिय सहभाग घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या मते, प्रस्तावित डेटा सेंटरमुळे परिसरातील पर्यावरण, ध्वनी प्रदूषण, वाहतूक कोंडी, उष्णतेत वाढ आणि नागरिकांच्या आरोग्यावर होणारे संभाव्य परिणाम यांचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिकांनाच बसू शकतो. त्यामुळे हा प्रश्न केवळ विकासाचा नसून सार्वजनिक आरोग्य आणि जीवनमानाशी संबंधित असल्याचे त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांनी स्थानिक नागरिकांसह प्रस्तावित प्रकल्पाविरोधातील आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरणाचे संरक्षण, नागरिकांचे आरोग्य आणि भविष्यातील पिढ्यांच्या हितासाठी हा लढा अधिक व्यापक करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे प्रकल्पाबाबत संपूर्ण पारदर्शकता ठेवण्याची, पर्यावरणीय परिणामांचा सखोल अभ्यास सार्वजनिक करण्याची आणि स्थानिक नागरिकांच्या आक्षेपांचा गांभीर्याने विचार करण्याची मागणी केली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागामुळे या आंदोलनाला अधिक बळ मिळणार असून, नागरिकांच्या आरोग्य व पर्यावरणाच्या संरक्षणासाठी हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरला संजय राऊतांनी शोधून द्यावे-गिरीश महाजन

हरिभाऊ लाखे नाशिक : खासदार संजय राऊत यांना गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर कुठे दिसत आहेत ? त्यांनीच ते शोधून द्यावेत. स्वतः काही करायचे नाही आणि काहीही बोंब ठोकतात. त्यांच्या मागे आता कोणी उरलेले नाही. पंतप्रधानांपासून ते सरन्यायाधीश, निवडणूक आयोग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वाटेल ते बोलणे, हा एकच गुणधर्म त्यांच्याकडे उरला आहे, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली. राऊत यांच्या जिभेला हाड नाही, हा त्यांचा ‘मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट’ आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. भाजपचे संकटमोचक मंत्री महाजन यांनी रविवारी नाशिक येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. कुंभमेळ्याची सर्व कामे ही गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरला दिल्याच्या राऊत यांच्या आरोपांवर बोलताना मंत्री महाजन म्हणाले की, राऊत यांच्या आरोपांना फार उत्तर देण्याची गरज नाही. पूर्वी ‘हम दो, हमारे दो’ चालत होते, पण आता ठाकरे गटात ‘उद्धवजी, आदित्यजी आणि त्यांचे हे एक अपत्य (संजय राऊत)’ एवढेच उरले आहेत, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला. नाशिकमधील नगरसेवकांच्या संभाव्य फुटीवर मंत्री महाजन म्हणाले की, मला याची पूर्ण कल्पना नाही, पण सध्या ठाकरे गटाकडे शिल्लक तरी कोण राहिले आहे, त्यांची महापालिका नाही, १७ पैकी एकही आमदार नाशिकमध्ये निवडून आला नाही, नगरपालिका त्यांच्याकडे नाही. भविष्यात त्यांचे काहीच दिसत नाही. त्यांचे भविष्य आता २ ते ५ टक्केही उरलेले नाही. त्यांनी स्वतःचा पक्ष बुडवला, हेच त्यांच्यासाठी काफी आहे, असे सांगत त्यांनी ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एकनाथ खडसे यांनी केलेल्या दाव्यांवर मंत्री महाजन म्हणाले की, मी कधीच मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नव्हतो. खडसेसाहेब पूर्वी शर्यतीत होते आणि ते स्वतः तसे म्हणायचे. मी कधीही असा दावा केला नाही. तसेच, खडसेंना अमित शाह यांचा फोन आल्याच्या मुद्द्यावर त्यांची दिल्लीसोबत डायरेक्ट ‘हॉटलाइन’ आहे, असे ते स्वतःच म्हणायचे. आम्ही छोटे लोक आहोत, त्यामुळे त्या हॉटलाइनबाबत आम्ही न बोललेलेच बरे असा टोला त्यांनी यावेळी लगावला. आमदार बच्चू कडू हे महायुतीचे मोठे नेते आहेत. ते रोज काही ना काही बोलत असतात, त्यांना काही तरी झाले असेल. हे काही असे लोक आहेत की त्यांच्याबद्दल न बोललेलेच बरे, असे म्हणत मंत्री महाजन यांनी त्यावर अधिक बोलणे टाळले. ००००००००

 ३४० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

 अजिंक्यतारा सामाजिक सेवा संस्था व सातारा जिल्हा रहिवासी संघाच्या वतीने दिवा : अजिंक्यतारा सामाजिक सेवा संस्था आणि सातारा जिल्हा रहिवासी संघ (दिवा शहर) यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य…

– अविनाश पाठक लिखित आयुष्यातले सांगाती चे प्रकाशन नागपूरमध्ये

– साहित्य भारती आणि साईज्योती पब्लिकेशन्स चे आयोजन नागपूर: ज्येष्ठ पत्रकार, स्तंभलेखक आणि साहित्यिक अविनाश पाठक लिखित आयुष्यातले सांगाती भाग १ भाग २ आणि भाग ३ चे प्रकाशन गुरुवार दिनांक १६ जुलै  २०२६ रोजी सायंकाळी  ६ वाजता नवदृष्टी सभागृह, अंध विद्यालय परिसर, दक्षिण अंबाझरी मार्ग, नागपूर येथे होणार आहे. अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती, विदर्भ प्रांत, आणि साईज्योती पब्लिकेशन च्या संयुक्त विद्यमाने आयोजित एका समारंभात महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांचे हस्ते हे प्रकाशन होणार असून माजी राज्यपाल आणि भारतीय विद्या भवन चे राष्ट्रीय अध्यक्ष बनवारीलालजी पुरोहित हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक प्रकाश एदलाबादकर पुस्तकांवर भाष्य करणार आहेत. आपल्या ५४ वर्षाच्या पत्रकारिता आणि सामाजिक जीवनाच्या कालखंडात ज्या अनेक मान्यवर व्यक्तींशी अविनाश पाठक यांचे व्यक्तिगत संबंध आले आणि ते उभयपक्षी जपले गेले, अशा एकूण  ५१ मान्यवर व्यक्तींवर अविनाश पाठक यांनी लेख लिहिले असून त्याचे संकलन तीन भागात साईज्योती पब्लिकेशन ने “आयुष्यातले सांगाती” भाग १, २ आणि ३ असे प्रकाशित केले आहेत. या ५१ मान्यवर व्यक्तींमध्ये माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव, माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी, ज्येष्ठ साहित्यिक विद्याधर गोखले, गिरिजा कीर, नाट्य दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योगपती शक्तीकुमार संचेती, पत्रकार मा.गो. वैद्य, संघ प्रचारक लक्ष्मीनारायण भाला, प्राच्यविद्या संशोधक महामहोपाध्याय डॉ वासुदेव विष्णू मिराशी, पत्रकार नीला उपाध्ये, सुरेश द्वादशीवार, श्रीपाद सहस्रभोजने, राम खांडेकर, अनंत तरे, डॉ. तनुजा नाफडे, दत्ता मेघे, डॉ. प्रफुल्ल मोकदम, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत. प्रमिलाताई मेढे, डॉ. नीलम गोऱ्हे, डॉ. विकास महात्मे, अजय संचेती, चैनसुख संचेती, डॉ  विश्वास मेहेंदळे, सुधीर गाडगीळ, डॉ उदय निरगुडकर, हंसराज अहिर, वामनराव चोरघडे, मारोती चितमपल्ली, शुभांगी भडभडे, भगतसिंह कोशियारी, उल्हास पवार, न्या. विकास सिरपुरकर, डॉ वि.भि.कोलते, गोपीनाथ मुंडे, प्रा बी.टी.देशमुख, डॉ श्रीकांत जिचकार, वसंतराव साठे, डॉ मनोहर पिंगळे, अभिनंदन थोरात, गंगाधरराव फडणवीस,दत्ताजी डिडोळकर, कवी अनिल, डॉ मधुकर आष्टीकर, प्रतापदादा सोनवणे,नीतिन केळकर,सद्गुरुदास महाराज, डॉ प्रमोद कोलवाडकर या मान्यवरांचा समावेश आहे. या तीन भागांना डॉ. नीलम गोऱ्हे, डॉ. विकास महात्मे आणि अजय संचेती यांच्या प्रस्तावना आहेत. अविनाश पाठक यांची यापूर्वी एकूण पंधरा पुस्तके प्रकाशित झाली असून त्यात डावपेच, शह काटशह आणि सत्तेच्या सावलीत हे तीन राजकीय कथासंग्रह, गाभाऱ्यातला कवडसा, माझ्या खिडकीतले आकाश, आठवणीतले नेते, थोडं आंबट थोडं गोड आणि हितगुज हे ललित लेखांचे संग्रह, दाहक वास्तव, मागोवा घटितांचा, काल प्रवाहाच्या वळणांवरून आणि दृष्टीक्षेप हे वैचारिक लेखांचे संग्रह, काळ्या कोळशाची काळी  कहाणी हे देशातील गाजलेल्या कोळसा घोटाळ्यावरील पुस्तक, पूर्णांक सुखाचा ही लघु कादंबरी, आणि मराठी वांङमय व्यवहार: चिंतन आणि चिंता हे संपादित पुस्तक यांचा समावेश आहे. यातील काही पुस्तके विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित झालेली आहेत. या समारंभाला नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारतीचे विदर्भ प्रांत अध्यक्ष चंद्रकांत लाखे, कार्याध्यक्ष डॉ शेखर भुसारी, महामंत्री विनय माहुरकर साईज्योती पब्लिकेशन चे ज्योती खापेकर,  गणेश राऊत प्रभृतींनी केले आहे. 0000000000

उल्हासनगरातील आरओ व पाणी जार प्रकल्पांच्या चौकशीची मागणी

सुनिल इंगळे उल्हासनगर : युवासेना कल्याण लोकसभा सचिव हरजिंदर सिंह भुल्लर (विक्की) यांनी उल्हासनगर शहरातील आरओ व पाणी जार प्रकल्पांची सखोल तपासणी करून बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या…