Category: होम

 कल्याण पूर्वेतील यु टाईप रस्ता बाधितांचे केडीएमसी मुख्यालयासमोर धरणे आंदोलन

– पुनर्वसनाबाबत ठोस भूमिका जाहीर करण्याची केली मागणी कलम २६० च्या नोटिसा स्थगित; पुनर्वसन क्लस्टर योजनेद्वारे त्याच ठिकाणी होणार कल्याण : कल्याण पूर्वेतील यू-टाईप रस्त्याच्या रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांना न्याय व त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पुनर्वसन कृती समितीच्या वतीने गुरुवारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी प्रशासनाकडे पुनर्वसनाबाबत ठोस भूमिका जाहीर करण्याची मागणी केली. कल्याण पूर्व भागातील काटेमानीवली नाका ते तिसगाव नाका या यू-टाईप रस्त्यावरील बाधित नागरिकांच्या पुनर्वसन कृती समितीने गुरुवारी दिलेल्या आवाहनानुसार संपूर्ण कल्याण पूर्व बाजारपेठ बंद ठेवून पालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. प्रचंड उन्हात मोठ्या संख्येने महिला, ज्येष्ठ नागरिक व दुकानदार उपस्थित होते. जवळ पास १८०० लोक यात बाधित होणार आहे. त्यात ८०० च्या वर रहिवासी व इतर छोटे मोठे दुकानदार आहेत. आयुक्तांनी चर्चेसाठी बोलावल्यावर शिष्टमंडळ मिटींगसाठी गेले. मात्र यावेळी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक यांनी काही महिला पदाधिकारी व वरिष्ठ नागरिकांना नाहक धक्काबुक्की करून आंदोलन खराब करण्याचा प्रयत्न केला. फक्त पाच लोक सोडू म्हणत पुनर्वसन कृती समितीचे अध्यक्ष उदय रसाळ यांना ही त्यांनी धक्का बुक्की करून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. आयुक्तांसोबत झालेल्या दीर्घ चर्चेत प्रशासनाने  दिलेल्या सर्व कलम २६० च्या नोटिसा तात्काळ स्थगित करण्यात येणार. बाधित नागरिकांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेद्वारे करण्यात येईल. कोणालाही अनधिकृत ठरवून हटवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही अशी आश्वासने दिली. या आंदोलनास काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नवीन सिंग यांनी पाठिंबा दिला. क्लस्टर योजनेचे अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी मुद्देसूद मांडणी केली. तर समितीचे अध्यक्ष उदय रसाळ, उपाध्यक्ष विष्णु जाधव, सचिव दुर्गेश फडोल व ज्ञानेश डुंबरे यांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहून चर्चा केली.

वनार्टीच्या जागावाटपात धनगर समाजावर अन्याय

 ८ जूनची परिपत्रके रद्द करा – बिरू कोळेकर ठाणे,  वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) यांनी ८ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या विविध विद्यार्थी योजना परिपत्रकांमधील VJNT प्रवर्गाच्या जागावाटपात धनगर समाजावर (NT-C प्रवर्ग) अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाचे राज्य संघटक, मुख्य प्रवक्ता तथा आयटी व मीडिया प्रमुख बिरू कोळेकर यांनी याबाबत इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे निवेदन सादर करून सर्व परिपत्रके तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. कोळेकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, महाराष्ट्र शासनाच्या मूळ आरक्षण रचनेनुसार VJ-A – ३ टक्के, NT-B – २.५० टक्के, NT-C – ३.५० टक्के आणि NT-D – २ टक्के असे आरक्षणाचे प्रमाण आहे. या प्रमाणाचे १०० टक्क्यांमध्ये रूपांतर केल्यास VJ-A – २७ टक्के, NT-B – २३ टक्के, NT-C – ३२ टक्के आणि NT-D – १८ टक्के असे वाटप होणे अपेक्षित आहे. मात्र वनार्टीच्या परिपत्रकांमध्ये VJ-A – ४० टक्के, NT-B – २२.५० टक्के, NT-C – २२.५० टक्के आणि NT-D – १५ टक्के असे वाटप करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.शासनाच्या मूळ आरक्षण रचनेनुसार धनगर समाजाचा समावेश असलेल्या NT-C प्रवर्गाचा वाटा सर्वाधिक असताना त्याला केवळ २२.५० टक्के वाटा देण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये, स्पर्धा परीक्षा उमेदवारांमध्ये आणि युवकांमध्ये नाराजी निर्माण झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करून वनार्टीने कोणत्या शासन निर्णय, कायदेशीर तरतूद अथवा धोरणाच्या आधारे हे वाटप केले, याची माहिती सार्वजनिक करावी. तसेच ८ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली सर्व परिपत्रके रद्द करून महाराष्ट्र शासनाच्या मूळ आरक्षण टक्केवारीनुसार नव्याने व न्याय्य पद्धतीने जागावाटप करावे, अशी मागणी बिरू कोळेकर यांनी केली आहे.दरम्यान, या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास धनगर समाजासह VJNT प्रवर्गातील विद्यार्थी, युवक आणि सामाजिक संघटनांच्या वतीने राज्यव्यापी लोकशाही आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही बिरू कोळेकर यांनी दिला आहे.

ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर प्रताप सरनाईक यांचे कारवाईचे निर्देश

– खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची परिवहन मंत्र्यांकडून तात्काळ दखल कल्याण : ॲप-आधारित टॅक्सी आणि राईड-हेलिंग सेवांच्या माध्यमातून प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप मागणे, अतिरिक्त रकमेची सक्ती करणे तसेच प्रवाशांच्या अडचणीचा…

कल्याण-डोंबिवलीत १२ जूनपासून टप्प्याटप्प्याने २४ तास पाणीपुरवठा बंद

कल्याण : यंदाच्या वर्षी अल निनो  आणि आयओडी  यांच्या प्रभावामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलसाठ्याचे ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत नियोजनासाठी दररोज २० टक्के पाणी…

माथेरान वीज प्रश्न लवकरच सुटणार!

मुकुंद रांजाणे माथेरान : माथेरान मध्ये या वर्षी सतत वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे त्याचा परिणाम येथील पाणीपुरवठा योजनेवर मोठ्या प्रमाणात होत आहे ज्यामुळे येथील पर्यटन धोक्यात आले आहे त्यामुळेच येथील स्थानिक सर्व पक्षीय नेत्यांनी येथील वीज वितरण कार्यालयात कर्जत विभाग अभियंते  चंद्रकांत केंद्रे यांची भेट घेऊन आपल्या तक्रारी दाखल केल्यानंतर हा प्रश्न लवकरच सुटणार आल्याचे त्यांनी सांगितले. या पर्यटन हंगामामध्ये माथेरानकरांना वीज व पाणी प्रश्नाने हैराण केले आहे त्यामुळे येथे वीज वितरण केंद्र बाबत प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे,त्यामुळेच येथील नागरिकांनी कार्यालयावर मोर्चा नेण्याचे निश्चित केले होते परंतु कर्जत येथील अधिकाऱ्यांनी स्थानिकांची भेट घेत हा प्रश्न लवकरच सुटणार असल्याचे सांगत माथेरान,नेरळ करिता स्वतंत्र सब स्टेशन उपलब्ध करून देताना येथे होणारा पुरवठा पॉईंट एक वरून पॉईंट दोन करण्यात येणार असून माथेरान करिता २० किमी केबल टाकण्यात येणार असल्याने केबल नादुरुस्त प्रश्न ही मार्गी लागणार असल्याचे सांगितले तर माथेरान करांना भेडसावणारा कमी दाबाने वीज पुरवठा प्रश्न मार्गी लावण्याकरिता तातडीने चार ते पाच ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. येथील भौगोलिक स्थिती पाहता विद्युत वाहिन्यांना पक्षी,प्राणी यांच्या पासून संरक्षण मिळावे या करिता आवरणे बसविण्यास ही मान्यता मिळाली आहे,त्यामुळे लवकरच माथेरान चा वीज प्रश्न निकाली लागणार असल्याचे दिसत आहे. यावेळी माथेरान वीज वितरण कार्यालय येथे कर्जत तालुका अभियंता चंद्रकांत केंद्रे, माथेरान अभियंता सचिन आटपाटकर,  उपनगराध्यक्ष संतोष शेलार नगरसेवक  सिताराम कुंभार, गौरांग वाघेला, प्रवीण सकपाळ, नगरसेविका अर्चना भिलारे,रिजवान शेख,कुलदीप जाधव राजेश चौधरी चंद्रकांत जाधव राजेश दळवी,भास्कर शिंदे,योगेश दळवी व माथेरान मधील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

माथेरान वीजवितरण विरोधातील मनसेचे उपोषण मागे

मुकुंद रांजाणे माथेरान: माथेरान मधील सातत्याने गायब होत असल्यामुळे माथेरान मनसे पक्षाकडून येथील राम चौक येथे आजपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते परंतु कर्जत विभागीय अभियंते चंद्रकांत केंद्रे यांनी लेखी दिलेल्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. माथेरान येथे सातत्याने गायब होत असलेल्या वीजे मुळे येथील स्थानिक व्यावसायिकांच्या व्यापारावर मोठा परिणाम झाला होता त्यामुळे व्यापारी वर्गामध्ये वीज वितरण कार्यालयाबाबत त्रिव्र नाराजी व्यक्त केली जात होती त्यामुळेच माथेरान नवनिर्माण सेनेचे माथेरान शहर प्रमुख संतोष कदम यांनी वीज वितरणाला सेवा अखंडित करण्याकरिता इशारा दिला होता परंतु या काळात वीज जाण्याचे प्रमाण वाढल्याने आज त्यांनी माथेरान येथील श्रीराम चौक येथे आमरण उपोषण चालू केले होते परंतु त्यांच्या सर्व मागण्या या माननीय करण्यात आले होते व त्याचे लेखी पत्र अभियंते केंद्रे साहेब यांनी त्यांना दिल्यानंतर मात्रांचे नगराध्यक्ष  चंद्रकांत चौधरी यांच्या हातून ज्यूस घेत त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, राजकीय विश्लेषक विजय वैद्य यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या जय महाराष्ट्र नगर बोरीवली पूर्व येथील उपनगराचा राजा या भव्य गणेशोत्सवातील गणेशमूर्तीची पाद्यपूजा मोठ्या थाटामाटात, अभूतपूर्व उत्साहात भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी सपत्नीक तसेच नगरसेविका ॲड. सीमा शिंदे व किरण शिंदे या दांपत्यांनी केली. मोठ्या संख्येने श्रीगणेश भक्त यावेळी उपस्थित होते. मुंबई तील प्रख्यात मूर्तीकार विजय खातू यांच्या कन्या रेश्मा विजय खातू या ही भव्य मूर्ती साकारणार आहेत. (छाया : योगेश पाडलोसकर) ०००००००० ०००००

आठवडी बाजार बंद करण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेला मोर्चा काढण्याची नामुष्की

केडीएमसीच्या ‘ई’ प्रभाग कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा कल्याण : आठवडी बाजार तात्काळ बंद करण्यात यावा या मागणीसाठी बुधवारी सत्ताधारी शिवसेनेच्या वतीने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या  ‘ई’ प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत आंदोलनात महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चाचे नेतृत्व कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे आणि शिवसेना (शिंदे) उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, कल्याण ग्रामीण  तालुका प्रमुख गजानन पाटील  यांनी केले. काळूबाई चौक येथून सुरू झालेला मोर्चा ‘ई’ प्रभाग कार्यालयावर धडकला. मात्र केडीएमसीमध्ये शिवसेना सत्तेत असतांना देखील प्रशासनावर अंकुश नसल्याने सत्ताधारी शिवसेनेला मोर्चा काढण्याची नामुष्की ओढवल्याची चर्चा यामुळे रंगली होती. आंदोलनकर्त्यांनी महापालिका हद्दीतील सर्व आठवडी बाजार तात्काळ बंद करण्याची मागणी करत प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप केला. साप्ताहिक बाजारांमुळे वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनकर्त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले की, गेल्या महिन्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही महापालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आठवडी बाजार बंद करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप करण्यात आला. आठवडी बाजारांबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

 कुंभमेळ्याच्या पहिल्याच मोठ्या सोहळ्याकडे भुजबळ, भुसेंनी फिरवली पाठ

 महाजनांच्या उपस्थितीत रंगली चर्चा! हरिभाऊ लाखे नाशिक : पुढील वर्षी नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा निमित्त गुरुवारी रामकुंड परिसरात ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन करण्यात आले. कुंभमेळा स्वच्छ, सुरक्षित व भव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी शासन, प्रशासन, साधू-संत, महंत, विविध सामाजिक, धार्मिक संघटना आणि नागरिकांचा सहभाग आवश्यक असून भाविकांचे आदरातिथ्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. या कार्यक्रमाकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याने हा चर्चेचा विषय ठरला. श्री गंगा गोदावरी पंचकोठी (तीर्थ) पुरोहित संघाच्या वतीने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीरामाच्या जयघोषात आणि वेद मंत्रोच्चारात हा सोहळा झाला. महापौर हिमगौरी आडके-आहेर, सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त मनीषा खत्री, उपमहापौर विलास शिंदे, जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्यासह विविध आखाड्यांचे प्रमुख साधू-संत, महंत उपस्थित होते. मंत्री महाजन यांनी, मागील कुंभमेळ्यापेक्षा चार ते पाच पट अधिक, म्हणजेच १२ कोटींपेक्षा जास्त भाविकांच्या आगमनाची अपेक्षा पुढील कुंभमेळ्यात असल्याचे सांगितले. कुंभमेळा यशस्वी करण्याची जबाबदारी शासन, प्रशासनाबरोबरच प्रत्येक नागरिकाची आहे. गोदावरी नदी स्वच्छ ठेवण्यासाठी विविध संघटनांनी आणि भक्तगणांनी पुढाकार घेतला असून ही स्वच्छता केवळ एका दिवसापुरती नसून सातत्याने राखली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांचे आदरातिथ्य करण्यासाठी प्रत्येक नाशिककराने स्वयंसेवक बनून पुढाकार घ्यावा. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि जिल्ह्यात विविध विकासकामांना वेग आला आहे. रस्ते, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता आणि नागरी सुविधांसाठी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांची अंमलबजावणी सुरू आहे. या विकासकामांमुळे पुढील वर्षी नाशिकचा चेहरामोहरा पूर्णपणे बदललेला दिसेल, असेही त्यांनी सांगितले. कुंभमेळ्याच्या तयारीत साधू-संत, महंत, आखाडे, लोकप्रतिनिधी, प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि नागरिक यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. यावेळी गंगा गोदावरीचे पूजन करण्यात आले. शंखनाद आणि उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन समारंभ भक्तीमय वातावरणात पार पडला. पुरोहित संघाच्या सदस्यांनी मंत्रोच्चार केले. ध्वज स्तंभाची रचना रामकुंडावर उभारण्यात येणारा ध्वजस्तंभ सुमारे ५१ फूट उंच असणार असून, त्याची रचना अत्यंत आकर्षक व धार्मिक प्रतिकांनी समृद्ध आहे. या संपूर्ण स्तंभाच्या संकल्पनेत ‘अमृत मंथन’ कथेचा आधार घेण्यात आला आहे. यात प्रामुख्याने अश्व, हत्ती, रत्न, कल्पवृक्ष, अप्सरा, तसेच देवी-देवतांची प्रतिकात्मक शिल्पे कोरली जाणार आहेत. याशिवाय स्तंभावर गणपती आणि कमळ यांसारखी शुभचिन्हे देखील असतील. या सर्व घटकांमधून अमृत मंथनातील विविध पैलू आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे.स्तंभाच्या तळभागाची रचना कमळाच्या आकारात करण्यात येणार असून, मध्यभागात कोरीव कलाकुसर असलेले पट्टे आणि विविध धार्मिक चिन्हांनी सजवलेले भाग असतील. शीर्षस्थानी ध्वजासह देवतांची प्रतिमा स्थापित केली जाणार आहे, ज्यामुळे संपूर्ण स्तंभ अधिक भव्य आणि दैदिप्यमान दिसेल. लोकप्रतिनिधींची पाठ शिलान्यास पुजन सोहळ्याचे निमंत्रण पुरोहित संघाच्या वतीने लोकप्रतिनिधी, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी , पोलीस आयुक्त यांच्यासह अन्य मान्यवरांना देण्यात आले. कार्यक्रमास महापालिका आयुक्त मनीषा खत्री काही वेळ उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आलेच नाही. दादा भुसे, छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ या मंत्र्यांसह देवयानी फरांदे, राहुल ढिकले हे अनुपस्थित राहिले. उद्योगमंत्री उदय सामंत शहरात असतांनाही ते कार्यक्रमास उपस्थित नव्हते. लोकप्रतिनिधींनी कार्यक्रमाकडे फिरवलेली पाठ चर्चेचा विषय ठरली. 00000000

– मोरपिसांची खुलेआम विक्री

 वन्यजीव विभागाने लक्ष देण्याची गरज अविनाश उबाळे ठाणे : राष्ट्रीय पक्षी मोरांची पिसे विक्री करताना बाजारपेठेत आणि जत्रा उत्सवामध्ये काही इसम नजरेस पडतात.मोरांची पिसे ते कुठून आणतात याबाबत संशयाचे वातावरण आहे. मोरांच्या पिसांची मोठ्या प्रमाणात विक्री करण्याचा हा प्रकार खुलेआम सर्वत्र सुरू असताना राज्य सरकारच्या वन्यजीव विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.एकीकडे राज्यात मोरांची संख्या कमालीची घटत असताना दुसरीकडे केवळ मोरांची पिसे मिळवण्यासाठी मोरांची शिकार्‍यांकडून हत्या केली जाते का? असा प्रश्न वन्यजीव पक्षीप्रेंमीकडून आता विचारला जात आहे.जंगलात वेचलेली मोरांची पिसे ते विकु शकतात.मात्र मोरांची हत्या करून त्यांच्या पिसांची विक्री करणे हा गंभीर गुन्हा आहे.वन्यजीव नियमानुसार त्या शिकार्‍यास तीन वर्ष तुरुंगवास होऊ शकतो.असे वन्यजीव  कार्यालयातून सांगण्यात आले.मात्र येवढ्या प्रमाणावर जर मोर पिसांची विक्री होत असेल तर ही पिसे नक्की कुठून आणली जातात याची चौकशी आणि तपास करण्याची गरज असल्याची पक्षीप्रेमींची मागणी आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह उपनगर व मुंबई महानगरातही मोरांची पिसे सहज उपलब्ध होत आहेत. शहरांतील काही पिकनिक स्पॉटवर तर ग्रामीण भागांतील बाजारपेठेत जत्रा,उत्सवात काहीजण मोरांची पिसे विकताना दिसतात. १० ते २० रुपयांच्या भावाने मोरांच्या पिसांची विक्री ग्राहकांना ते करतात.अत्यंत आकर्षक दिसणारी ही मोरांची पिसे मोठ्या प्रमाणावर ग्राहकांकडून खरेदी केली जातात.घरामध्ये शोसाठी लावण्याकरीता व देव्हार्‍यांत ठेवण्यासाठी मोरांच्या पिसांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.असे जरी असले तरी शोपिस व आपल्या हौशेसाठी विक्रीला येणारी ही मोराची पिसे येतात तरी नक्की कुठून हा मात्र संशोधनाचा विषय ठरतो.मात्र, वन्यजीव विभागाचे मोर पिसांची विक्री करणार्‍यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.याबाबत माहिती घेण्यासाठी तानसा वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक डि.बी मिसाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही मात्र एका वन अधिकाऱ्यांने नाव न छापण्याच्या अटीवर माहिती देताना सांगितले की जेव्हा जंगलात मोर नाचतात तेव्हा त्यांची मोठ्या प्रमाणावर पिसे गळतात.आणि ही गळालेली पिसे जंगलात वेचून ती विक्रीला आणली जात असावीत,असे त्यांनी सांगितले या मोरपिसाच्या अवैध विक्रीकडे वन्यजीव विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत वन्यजीव व पक्षी प्रेमी आता व्यक्त करीत आहेत.