Category: महाराष्ट्र

Maharashtra News

– झाराप रेल्वे स्टेशनवरून होते हजारो टन अवैध खनिज सदृश्य मातीची वाहतूक…!

– चौकशी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘उबाठा ‘ सेनेला आश्वासन…! सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील झाराप रेल्वे स्टेशनवरुन अवैधरित्या हजारो टन खनिज सदृश्य मातीची रेल्वेने वास्को-गोवा येथे वाहतुक केली जात आहे.त्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील तळवणे, कोंडुरा येथे अवैद्यरित्या उत्खनन केले जात आहे. ‘उबाठा ‘सेनेचे जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर आणि पक्षाचे  प्रवक्ते जयेंद्र परुळेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली. त्याबाबतचे लेखी निवदेन यावेळी त्यांना देण्यात आले. जनसुनावणी न घेता मायनिंग उद्योग कसा काय सुरु करण्यात आला.संबंधितांनी  उत्खनन आणि वाहतुकीसाठी आवश्यक असणारे शासकीय परवाने घेतले आहेत का? असे प्रश्न यावेळी उपस्थित करत  प्रति वर्षी २५ कोटी रुपयांचा शासनाचा महसूल बुडविण्यात आला आहे असा आरोप यावेळी  करण्यात आला. या माध्यमातून सिंधुदुर्गात मोठा खनिज घोटाळा होत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी जिल्हा खनिकर्म अधिकारी उमेश बर्डे देखील उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी या अवैध उत्खनन आणि वाहतुकीच्या  तक्रारीची गंभीर दखल घेत उत्खननासाठी आवश्यक असणारे शासकीय परवाने व इतर कायदेशीर बाबींची संपूर्ण माहिती देण्याचे आदेश खनिकर्म  अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकऱ्यांना  देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, गेले दोन आठवडे कुडाळ तालुक्यातील झाराप रेल्वे स्टेशनवरुन फार मोठ्या प्रमाणावर खनिज सदृश्य मातीची वाहतुक वास्को-गोवा येथे होत आहे. गेल्या दोन आठवड्यात १० ते १२ रेल्वे वॅगन  मालवाहतूक  दररोज भरुन ही खनिज सदृश्य माती नेली जात आहे. दिवसाला ५००-६०० डंपर भरुन आणण्यात येणाऱ्या खनिज सदृश्य मातीच्या  वाहतुकीमुळे झाराप येथील ग्रामस्थांना प्रदुषणाचा त्रास होत आहे. शिवाय या परिसरातील अरुंद रस्ते यामुळे अपघात होण्याची भिती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत  याकडे लक्ष वेधण्यात आले. सावंतवाडी तालुक्यातील तळवणे, कोंडुरा येथून अवैद्यरित्या उत्खनन करुन ही खनिज माती आणली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर ही खनिज माती तळवणे, कोंडुरा भागातून आणण्यात येत आहे तर तिथे कुठल्याही शासकीय, प्रशासकीय परवानग्या न घेता तसेच कुठल्याही प्रकारचा पर्यावरण आघात अहवाल तसेच  जनसुनावणी न घेता मायनिंग उद्योग सुरु झाला आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कुठल्याही शासकीय प्रशासकीय परवानग्या न घेता होत असलेला अवैद्य मायनिंग उद्योग शासनाचा महसुल बुडवून सुरु आहे काय? असाही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. दोडामार्ग तालुक्यातील आडाळी ‘एमआयडीसी’ क्षेत्रात रात्रीच्या अंधारात होत असलेल्या खनिज सदृश्य मातीच्या चोरीचा प्रकार उघड झालेला आहे. असे असताना झाराप रेल्वे स्टेशनवरुन नेण्यात आलेली हजारो टन खनिज सदृश्य माती ही  कुठल्या नियमांतर्गत नेण्यात आली आहे. हे जनतेला कळले पाहिजे. अशाच प्रकारे जिल्ह्यात जागोजागी होत असलेल्या बेकायदेशीर अवैध मायनिंग विरोधात देखील कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

– सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाचा ‘एम बीबीएस’चा ९८.९४ टक्के निकाल….!

९५ पैकी ९४ विद्यार्थी उत्तीर्ण …! सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची एम बी बी एसची पहिली बॅच आता आरोग्य सेवेसाठी सज्ज झाली असून महाविद्यालयातील ९५ पैकी ९४ विद्यार्थी  उत्तीर्ण झाले असून ९८.९४ टक्के निकाल लागला आहे. २०२१ साली सेना -भाजपा युती सरकारच्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या सिंधुदुर्गनगरीत,जिल्हा रुंग्णालयाच्या भव्य संकुलात हे महाविद्यालय सुरु झाले. महाविद्यालय सुरु झाले तेव्हा कसल्याच सोयी सुविधा नाहीत.स्वतःचे म्हणून असे काहीच नाही. जिल्हा रुंग्णालयाच्या  इमा तींमध्ये आपला संसार थाटला. कोणत्याही मूलभूत, पायाभूत सोयीसुविधा नाहीत.त्यातच जुन्या इमारतींची  पाडापाडी, वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुंग्णालय या दोघांचा संसार एकाच संकुलात सुरु झाला. महाराष्ट्र वैद्यकीय विदयापीठाचा काल निकाल आल्यानंतर अधिष्ठाता डॉ. अनंत दवांगे, त्यांचे सर्व सहकारी प्राध्यापक,अधिकारी, कर्मचारी वर्ग या सर्वांनी आनंद व्यक्त केला. नव्याने सुरू झालेल्या या महाविद्यालयात सुरुवातीची दोन -तीन वर्ष परिस्थिती अत्यंत प्रतिकुल होती.अनेक अडचणी होत्या, साधनांची कमतरता, पूर्णपणे तयार नसलेली व्यवस्था आणि नवीन वातावरण. सुरुवातीला सगळ्यांनाच जुळवून घ्यावे लागले. विभाग तयार होत होते, आणि शिकण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत होती. महाविद्यालयात वरिष्ठ विद्यार्थी नसल्यामुळे त्यांचेही  मार्गदर्शन नव्हते. त्यामुळे ही पहिली ‘बॅच’ खऱ्या अर्थाने ‘पायोनियर’ ठरली अशी प्रतिक्रिया सहाय्यक प्राध्यापक (मेडिसिन )डॉ. गौरव घुर्ये यांनी व्यक्त केली आहे. या सगळ्या अडचणी असूनही विद्यार्थ्यांनी हार मानली नाही. त्यांनी स्वतः अभ्यास केला, एकमेकांना मदत केली आणि उपलब्ध संधींचा योग्य उपयोग केला. शिक्षकांनीही खूप सहकार्य केले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. चार-साडेचार वर्षांच्या प्रवासात हे विद्यार्थी खूप काही शिकले.फक्त अभ्यासच नाही तर परिस्थितीशी जुळवून घेणे, आत्मविश्वासाने काम करणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे. त्यांचा प्रवास सोपा नव्हता, पण त्यांनी मेहनतीने तो पूर्ण केला. ‘एमबीबीएस’ पूर्ण केल्याने   ते डॉक्टर झालेच पण त्यांचे यश हे या महाविद्यालयाची मजबूत पायाभरणी ठरली आहे.  अडचणी असल्या तरी मेहनत आणि जिद्दीने यश मिळवता येते.हे त्यांच्या यशामुळे सिद्ध झाले आहे. भविष्यात हे महाविद्यालय विस्तीर्ण होईल आणि प्रगतीचे नवीन टप्पे गाठेल यात शंका नाही. सिंधुदुर्ग वासियांसाठी आरोग्याच्या सुविधा टप्प्याटप्प्याने अत्युच्च दर्जाच्या  होतील असा विश्वास डॉ.घुर्ये यांनी व्यक्त केला आहे. या यशाबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे,शिंदे सेनेचे स्थानिक आमदार डॉ.निलेश राणे, उबा ठा चे माजी खासदार विनायक राऊत माजी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जि. प.मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील आदींनी सर्व यशस्वी विद्यार्थी,महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अनंत दवांगे,सर्व प्राध्यापक वर्ग ,अधिकारी ,कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. प्रथम क्रमांक- गायत्री शिवराम शिर्के ७४.२२% व्दितीय क्रमांक- मिथ जयेश जोशी ७३.२२% तृतीय क्रमांक- सानिका भाऊसाहेब चौगुले ७१.५०% 00000000

स्वीकाराचा संवेदनशील प्रवास मांडणारा ‘बाप्या’

मराठी चित्रपटसृष्टीने नेहमीच सामाजिक वास्तवाशी निगडित विषयांना प्राधान्य दिले आहे. दिग्दर्शक समीर तिवारी यांचा ‘बाप्या’ हा चित्रपट ट्रान्स-मेनच्या अस्तित्वाचा विषय अत्यंत संवेदनशील आणि समजूतदारपणे पडद्यावर आणतो. कोकणातील एका छोट्याशा गावात…

कल्याण-डोंबिवलीत १२ जूनपासून टप्प्याटप्प्याने २४ तास पाणीपुरवठा बंद

कल्याण : यंदाच्या वर्षी अल निनो  आणि आयओडी  यांच्या प्रभावामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलसाठ्याचे ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत नियोजनासाठी दररोज २० टक्के पाणी…

माथेरान वीज प्रश्न लवकरच सुटणार!

मुकुंद रांजाणे माथेरान : माथेरान मध्ये या वर्षी सतत वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे त्याचा परिणाम येथील पाणीपुरवठा योजनेवर मोठ्या प्रमाणात होत आहे ज्यामुळे येथील पर्यटन धोक्यात आले आहे त्यामुळेच येथील स्थानिक सर्व पक्षीय नेत्यांनी येथील वीज वितरण कार्यालयात कर्जत विभाग अभियंते  चंद्रकांत केंद्रे यांची भेट घेऊन आपल्या तक्रारी दाखल केल्यानंतर हा प्रश्न लवकरच सुटणार आल्याचे त्यांनी सांगितले. या पर्यटन हंगामामध्ये माथेरानकरांना वीज व पाणी प्रश्नाने हैराण केले आहे त्यामुळे येथे वीज वितरण केंद्र बाबत प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे,त्यामुळेच येथील नागरिकांनी कार्यालयावर मोर्चा नेण्याचे निश्चित केले होते परंतु कर्जत येथील अधिकाऱ्यांनी स्थानिकांची भेट घेत हा प्रश्न लवकरच सुटणार असल्याचे सांगत माथेरान,नेरळ करिता स्वतंत्र सब स्टेशन उपलब्ध करून देताना येथे होणारा पुरवठा पॉईंट एक वरून पॉईंट दोन करण्यात येणार असून माथेरान करिता २० किमी केबल टाकण्यात येणार असल्याने केबल नादुरुस्त प्रश्न ही मार्गी लागणार असल्याचे सांगितले तर माथेरान करांना भेडसावणारा कमी दाबाने वीज पुरवठा प्रश्न मार्गी लावण्याकरिता तातडीने चार ते पाच ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. येथील भौगोलिक स्थिती पाहता विद्युत वाहिन्यांना पक्षी,प्राणी यांच्या पासून संरक्षण मिळावे या करिता आवरणे बसविण्यास ही मान्यता मिळाली आहे,त्यामुळे लवकरच माथेरान चा वीज प्रश्न निकाली लागणार असल्याचे दिसत आहे. यावेळी माथेरान वीज वितरण कार्यालय येथे कर्जत तालुका अभियंता चंद्रकांत केंद्रे, माथेरान अभियंता सचिन आटपाटकर,  उपनगराध्यक्ष संतोष शेलार नगरसेवक  सिताराम कुंभार, गौरांग वाघेला, प्रवीण सकपाळ, नगरसेविका अर्चना भिलारे,रिजवान शेख,कुलदीप जाधव राजेश चौधरी चंद्रकांत जाधव राजेश दळवी,भास्कर शिंदे,योगेश दळवी व माथेरान मधील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

माथेरान वीजवितरण विरोधातील मनसेचे उपोषण मागे

मुकुंद रांजाणे माथेरान: माथेरान मधील सातत्याने गायब होत असल्यामुळे माथेरान मनसे पक्षाकडून येथील राम चौक येथे आजपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते परंतु कर्जत विभागीय अभियंते चंद्रकांत केंद्रे यांनी लेखी दिलेल्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. माथेरान येथे सातत्याने गायब होत असलेल्या वीजे मुळे येथील स्थानिक व्यावसायिकांच्या व्यापारावर मोठा परिणाम झाला होता त्यामुळे व्यापारी वर्गामध्ये वीज वितरण कार्यालयाबाबत त्रिव्र नाराजी व्यक्त केली जात होती त्यामुळेच माथेरान नवनिर्माण सेनेचे माथेरान शहर प्रमुख संतोष कदम यांनी वीज वितरणाला सेवा अखंडित करण्याकरिता इशारा दिला होता परंतु या काळात वीज जाण्याचे प्रमाण वाढल्याने आज त्यांनी माथेरान येथील श्रीराम चौक येथे आमरण उपोषण चालू केले होते परंतु त्यांच्या सर्व मागण्या या माननीय करण्यात आले होते व त्याचे लेखी पत्र अभियंते केंद्रे साहेब यांनी त्यांना दिल्यानंतर मात्रांचे नगराध्यक्ष  चंद्रकांत चौधरी यांच्या हातून ज्यूस घेत त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, राजकीय विश्लेषक विजय वैद्य यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या जय महाराष्ट्र नगर बोरीवली पूर्व येथील उपनगराचा राजा या भव्य गणेशोत्सवातील गणेशमूर्तीची पाद्यपूजा मोठ्या थाटामाटात, अभूतपूर्व उत्साहात भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी सपत्नीक तसेच नगरसेविका ॲड. सीमा शिंदे व किरण शिंदे या दांपत्यांनी केली. मोठ्या संख्येने श्रीगणेश भक्त यावेळी उपस्थित होते. मुंबई तील प्रख्यात मूर्तीकार विजय खातू यांच्या कन्या रेश्मा विजय खातू या ही भव्य मूर्ती साकारणार आहेत. (छाया : योगेश पाडलोसकर) ०००००००० ०००००

 कुंभमेळ्याच्या पहिल्याच मोठ्या सोहळ्याकडे भुजबळ, भुसेंनी फिरवली पाठ

 महाजनांच्या उपस्थितीत रंगली चर्चा! हरिभाऊ लाखे नाशिक : पुढील वर्षी नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा निमित्त गुरुवारी रामकुंड परिसरात ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन करण्यात आले. कुंभमेळा स्वच्छ, सुरक्षित व भव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी शासन, प्रशासन, साधू-संत, महंत, विविध सामाजिक, धार्मिक संघटना आणि नागरिकांचा सहभाग आवश्यक असून भाविकांचे आदरातिथ्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. या कार्यक्रमाकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याने हा चर्चेचा विषय ठरला. श्री गंगा गोदावरी पंचकोठी (तीर्थ) पुरोहित संघाच्या वतीने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीरामाच्या जयघोषात आणि वेद मंत्रोच्चारात हा सोहळा झाला. महापौर हिमगौरी आडके-आहेर, सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त मनीषा खत्री, उपमहापौर विलास शिंदे, जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्यासह विविध आखाड्यांचे प्रमुख साधू-संत, महंत उपस्थित होते. मंत्री महाजन यांनी, मागील कुंभमेळ्यापेक्षा चार ते पाच पट अधिक, म्हणजेच १२ कोटींपेक्षा जास्त भाविकांच्या आगमनाची अपेक्षा पुढील कुंभमेळ्यात असल्याचे सांगितले. कुंभमेळा यशस्वी करण्याची जबाबदारी शासन, प्रशासनाबरोबरच प्रत्येक नागरिकाची आहे. गोदावरी नदी स्वच्छ ठेवण्यासाठी विविध संघटनांनी आणि भक्तगणांनी पुढाकार घेतला असून ही स्वच्छता केवळ एका दिवसापुरती नसून सातत्याने राखली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांचे आदरातिथ्य करण्यासाठी प्रत्येक नाशिककराने स्वयंसेवक बनून पुढाकार घ्यावा. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि जिल्ह्यात विविध विकासकामांना वेग आला आहे. रस्ते, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता आणि नागरी सुविधांसाठी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांची अंमलबजावणी सुरू आहे. या विकासकामांमुळे पुढील वर्षी नाशिकचा चेहरामोहरा पूर्णपणे बदललेला दिसेल, असेही त्यांनी सांगितले. कुंभमेळ्याच्या तयारीत साधू-संत, महंत, आखाडे, लोकप्रतिनिधी, प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि नागरिक यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. यावेळी गंगा गोदावरीचे पूजन करण्यात आले. शंखनाद आणि उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन समारंभ भक्तीमय वातावरणात पार पडला. पुरोहित संघाच्या सदस्यांनी मंत्रोच्चार केले. ध्वज स्तंभाची रचना रामकुंडावर उभारण्यात येणारा ध्वजस्तंभ सुमारे ५१ फूट उंच असणार असून, त्याची रचना अत्यंत आकर्षक व धार्मिक प्रतिकांनी समृद्ध आहे. या संपूर्ण स्तंभाच्या संकल्पनेत ‘अमृत मंथन’ कथेचा आधार घेण्यात आला आहे. यात प्रामुख्याने अश्व, हत्ती, रत्न, कल्पवृक्ष, अप्सरा, तसेच देवी-देवतांची प्रतिकात्मक शिल्पे कोरली जाणार आहेत. याशिवाय स्तंभावर गणपती आणि कमळ यांसारखी शुभचिन्हे देखील असतील. या सर्व घटकांमधून अमृत मंथनातील विविध पैलू आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे.स्तंभाच्या तळभागाची रचना कमळाच्या आकारात करण्यात येणार असून, मध्यभागात कोरीव कलाकुसर असलेले पट्टे आणि विविध धार्मिक चिन्हांनी सजवलेले भाग असतील. शीर्षस्थानी ध्वजासह देवतांची प्रतिमा स्थापित केली जाणार आहे, ज्यामुळे संपूर्ण स्तंभ अधिक भव्य आणि दैदिप्यमान दिसेल. लोकप्रतिनिधींची पाठ शिलान्यास पुजन सोहळ्याचे निमंत्रण पुरोहित संघाच्या वतीने लोकप्रतिनिधी, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी , पोलीस आयुक्त यांच्यासह अन्य मान्यवरांना देण्यात आले. कार्यक्रमास महापालिका आयुक्त मनीषा खत्री काही वेळ उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आलेच नाही. दादा भुसे, छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ या मंत्र्यांसह देवयानी फरांदे, राहुल ढिकले हे अनुपस्थित राहिले. उद्योगमंत्री उदय सामंत शहरात असतांनाही ते कार्यक्रमास उपस्थित नव्हते. लोकप्रतिनिधींनी कार्यक्रमाकडे फिरवलेली पाठ चर्चेचा विषय ठरली. 00000000

अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात सभापतींवर कारवाई का नाही?

 सय्यद आफरीन यांचा भाजपला प्रश्न मिरा -भाईंदर : काशीमिरा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनिता पाटील यांचे सख्खे भाऊ राजेश चव्हाण यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या दुसऱ्या भावाचे नावही तक्रारीत समोर आले आहे. या गंभीर प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मिरा -भाईंदर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या सय्यद आफरीन मुझफ्फर हुसेन यांनी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनिता पाटील यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. सय्यद आफरीन मुझफ्फर हुसेन म्हणाल्या की, “महिला आणि बालकांच्या संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या समितीच्या सभापतींच्या निकटवर्तीयांवर अशा गंभीर स्वरूपाचे आरोप होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनेमुळे महिला व बालकल्याण समितीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे निष्पक्ष चौकशीसाठी आणि समितीची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी सभापतींनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा.” तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून पीडितेला न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महिलांच्या सन्मान व सुरक्षेच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने ठोस भूमिका घ्यावी, अन्यथा जनतेसोबत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही सय्यद आफरीन मुझफ्फर हुसेन यांनी दिला आहे. ०००००००००

भिसेगाव दिशेकडील तिकीट खिडकी आता दोन शिफ्टमध्ये सुरू

– कमर्शियल चिफ इन्स्पेक्टर शिरीष कांबळे यांचे विशेष प्रयत्न  कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनच्या पाठपुराव्याला यश अशोक गायकवाड कर्जत : कर्जत रेल्वे स्थानक परिसरातील हजारो प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, भिसेगाव बाजूच्या तिकीट बुकिंग खिडकीचे कामकाज शनिवारपासून दोन शिफ्टमध्ये सुरू करण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय कमी होण्यास मदत होणार असून, तिकीट काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे. मागील अनेक महिन्यांपासून कर्जत रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनकडून या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. विशेषतः सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांना लांबच लांब रांगा, वेळेचा अपव्यय आणि तिकीट मिळवण्यासाठी होणारा त्रास यामुळे ही मागणी अधिक जोर धरत होती. प्रवाशांची वाढती संख्या आणि वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने अखेर सकारात्मक निर्णय घेतला आहे. यासाठी कमर्शियल चिफ इन्स्पेक्टर शिरीष कांबळे यांनी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवत विशेष पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचे सांगितले जात आहे. या नव्या व्यवस्थेमुळे भिसेगाव परिसरातील तसेच स्थानकाच्या त्या बाजूने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. विशेषतः कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी आणि नियमित प्रवाशांसाठी ही सुविधा अधिक उपयुक्त ठरणार आहे. तिकीट बुकिंग खिडकीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे : पहिली शिफ्ट : सकाळी ६.३० ते दुपारी २.३० ️ जेवणाची वेळ : दुपारी १२.१५ ते १२.३५ हिशोबाची वेळ : दुपारी २.३० ते २.४५ ️ दुसरी शिफ्ट : दुपारी २.४५ ते रात्री १०.३० ️ जेवणाची वेळ : रात्री ८.४० ते ९.०० या निर्णयामुळे कर्जत रेल्वे स्थानक परिसरातील प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचे प्रवाशांकडून स्वागत केले जात आहे.