Category: मुंबई

Mumbai news

मधु मोहिते लिखित ‘शोध परिवर्तनाचा’ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई : मधु मोहिते लिखित ‘शोध परिवर्तनाचा’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार, १ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वाजता माटुंगा येथील दादर- माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये होणार आहे. हा प्रकाशन समारंभ मान्यवर स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. परिख, डॉ. भालचंद्र मुणगेकर, कुमार केतकर, हुसेन दलवाई व डॉ. लता प्रतिभा मधुकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. महाराष्ट्राला सामाजिक व राजकीय लढ्याचा एक गौरवशाली इतिहास आहे. त्यामुळे ह्या इतिहासाचा वारसा व प्रेरणा घेऊन अनेक तरुण कार्यकर्त्यांनी विद्यार्थिदशेपासूनच सामाजिक/राजकीय चळवळीत झोकून देऊन निःस्पृह काम केले आहे. आमदार, खासदार, मंत्री अशी स्वप्ने त्यांना पडली नाहीत किंवा ते अशा गोष्टींसाठी कधी लांगूनचालन करीत बसले नाहीत. अन्यायपीडित, शोषित जातीवर्गांमध्ये ते काम करत राहिले. काहींना प्राणघातक हल्ल्यांना सामोरे जावे लागले, तुरुंगवास भोगावा लागला. तरीही त्यांनी निष्ठा कायम ठेवली व सातत्यपूर्वक काम करीत आहेत. स्वातंत्र्याच्या वीस-पंचवीस वर्षांत भारतीय शोषित वर्गजातींच्या जीवनमानात काही फरक पडत नाही म्हटल्यावर देशभर तरुणांचे उठाव झाले. जागृत बंडखोर तरुण आयुष्याची तमा न बाळगता श्रमिकांच्या या लढ्यात सहभागी झाले. पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात मधुकर म्हणजेच मधु मोहिते याने शोषितांच्या लढ्यात स्वतःला झोकून दिले. अनेक कठीण प्रसंग आले. प्राणघातक हल्ले, टिकाटिप्पणी व आर्थिक विवंचना खूप होती. अशा परिस्थितीत दिलेला संघर्ष त्यांनी त्यांच्या ‘शोध परिवर्तनाचा’ या पुस्तकात नमूद केला आहे. ‘ग्रंथाली’च्या वतीने हा पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. या प्रकाशन समारंभाला सर्वांनी उपस्थित राहावे, मूळ ४०० रुपयांचे हे पुस्तक केवळ २५० रुपयांत मिळेल त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘ग्रंथाली’चे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांनी केले आहे.

महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन आणि हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयातील ॲम्फीथिएटर येथे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी समाजविकास विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण, वैदयकीय अधिकारी डॉ. प्रविण कटके, प्रशासकीय अधिकारी उत्तम खरात, तसेच इतर अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते. आजच्या हुतात्मा दिनानिमित्त     देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करीत सकाळी 11.00 वा. ते 11.02 पर्यंत स्तब्ध उभे राहून मौन पाळण्यात आले.

महायुती सरकारच्या अडीच वर्षांच्या काळातील शालेय शिक्षण विभागाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा – वर्षा गायकवाड.

महायुती सरकारने ‘एक राज्य, एक गणवेश’ व पाठ्यपुस्तकात कोरी पाने’ प्रयोग लादून काय साध्य केले? १- ३५ लाख विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाला नाही याची जबाबदारी कोणाची? मुंबई : शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आपल्याच पक्षाच्या माजी मंत्र्याने घेतलेले निर्णय रद्द करण्याची कृती हे उशिरा आलेले शहाणपण आहे. दीपक केसरकर यांनी शिक्षण मंत्री म्हणून घेतलेले निर्णय चुकीचे आणि विद्यार्थी विरोधी होते. केसरकरांनी ‘एक राज्य, एक गणवेश’ हा हट्ट कशासाठी धरला होता? कोणाच्या फायद्यासाठी? यामागील ‘अर्थपूर्ण’ कारण काय? असे सवाल विचारून महायुती सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात शालेय शिक्षण विभागाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी माजी शालेय शिक्षण मंत्री खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. यासंदर्भात प्रतिक्रीया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की,तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी पाठ्यपुस्तकाचे चार भाग करून त्यात कोरी वह्यांची पानं लावण्याचा निर्णय घेण्यापूर्वी शिक्षक, शाळा आणि शिक्षणतज्ज्ञांशी कोणतीही चर्चा का केली नाही? या दोन्ही निर्णयांना चहूबाजूंनी प्रखर विरोध होत असताना, महायुती सरकारनं हे प्रयोग लादून नेमकं काय साध्य केलं? विद्यार्थ्यांच्या नुकसानाचं काय?. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी माजी मंत्र्याचे चुकीचे आणि विद्यार्थी विरोधी निर्णय रद्द करण्याचे धाडस दाखवले पण या बोगस आणि भ्रष्ट निर्णयांमुळे लाखो सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले. त्यांच्या झालेल्या शैक्षणिक नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा भुर्दंड कोण भरणार? असे प्रश्न खा. गायकवाड यांनी विचारले आहेत. ३५ लाख विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाला नाही – जबाबदारी कोणाची? शैक्षणिक वर्ष संपत आलं तरी, ३५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेला नाही. यासाठी जबाबदार ठरवून संबंधितांवर कारवाई होणार की नाही? शिक्षणाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी मागील शिक्षणमंत्री केसरकर यांच्या काळात अशा भोंगळ कारभार आणि अनावश्यक उद्योगांवर अधिक भर दिला गेला. यातून नेमकं कोणाचा स्वार्थ साधला गेला? ठराविक लाडक्या कंत्राटदारांना फायदा करून देण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला आहे. ‘असर’ अहवालाचा इशारा……

शिवसेनेतर्फे आदिवासी भागात घोंगडी वाटप !

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मागाठाणे विधानसभा निरीक्षक व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य  शशिकांत झोरे यांच्या  माध्यमातून शिवसेना शाखा क्र.१२ तर्फे बोरिवली नॅशनल पार्क मधील आदिवासी नागरिकांना विभागप्रमुख  उदेश पाटेकर यांच्या शुभहस्ते ब्लँकेट वाटप  करण्यात आले. याप्रसंगी विधानसभाप्रमुख अशोक म्हामुणकर, विधानसभा संघटक सौ शुभदा शिंदे, उपविभागप्रमुख सचिन शिर्के, उपविधानसभा समन्वयक सारिका झोरे, शाखाप्रमुख सचिन मोरे, शाखा समन्वयक योगेश देसाई, शाखा संघटक शुभदा सावंत, शाखा समन्वयक माधुरी खानविलकर, युवासेना सचिन शिरसाट, वृषल पुसाळकर, आशिष सोंडकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन  शशिकांत झोरे यांच्या सह  उपशाखा संघटक सौ इति महाडिक, रईसा मुल्ला, सुलभा गावकर, सोनाली रोकडे यांनी यशस्वीपणे केले.

नाही तर आरोग्य यंत्रणा आजारी पडेल

रमेश औताडे मुंबई :राज्यातील सरकारी आरोग्य विभागात महत्वाची भूमिका बजावणारी स्टाफ नर्स व स्टाफ ब्रदर आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. सरकारने जर आमच्या मागण्यांचा विचार गांभीर्याने केला नाही तर आरोग्य यंत्रणा आजारी पडेल असा इशारा यावेळी देण्यात आला. आरोग्य विभागात ९०० जागा रिक्त असताना जर आम्हाला आंदोलन करत नोकरी मागावी लागत असेल तर यासारखे दुर्दैव नसावे. असे यावेळी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे अध्यक्ष प्रेमराज बोबडे यांनी सांगितले. यावेळी बोलताना अभिलाष टेकाडे यांनी सांगितले की, वयोमर्यादा संपून गेल्यावर जर आम्हाला नोकरी मिळत असेल किंव्हा मयत झाल्यावर नोकरी मिळणार असेल तर त्या नोकरीचा काय फायदा. सरकारने जर आता आमच्या मागण्याचा गांभीर्याने विचार करणार नसेल तर राज्याची आरोग्य यंत्रणा बंद पडू शकते असा इशारा यावेळी या आंदोलनकर्त्या उमेदवारांनी दिला आहे.

जीवनदान देण्यासाठी पुढे आले ११० रक्तदाते

रमेश औताडे मुंबई : कराड को -ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, कोपरखैरणे नवी मुंबई आणि नवी मुंबई महानगर पालिका रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने  प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संस्थेने सलग २५ व्या वर्षी भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले होते. नवी मुंबई विभागातील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून एकूण ११० रक्तदात्यानी  रक्तदान केले. यावेळी ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के, नवी मुंबई सागर नाईक, विभागातील सर्व नगरसेवक उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष आंनदराव कचरे, उपाध्यक्ष डी. आर. पाटील आणि सर्व संचालक व कर्मचारी यांनी उपस्थित मान्यवरांचे व रक्तदात्यांचे आभार मानले.

कृषी उद्योगातील परिवर्तनासाठी एआयएम कॉन्क्लेव्ह सज्ज

मुंबई : भारतीय कृषी क्षेत्रात अमुलाग्र परिवर्तन करण्यासाठी खते आणि शेती औषधे निर्मिती क्षेत्रात कार्यरत असणाऱी ऑल इंडिया अँग्रो इनपुट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने पुढाकार घेतला असून याचाच एक भाग म्हणून पुण्यात अखिल भारतीय ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (AIM B2B ) बीटूबी परिषद आयोजित केली आहे. एआयएमतर्फे आयोजित ही दुसरी परिषद आहे. गेल्यावर्षी दिल्लीत ही परिषद आयोजित करण्यात आली होती. कृषी इनपुट क्षेत्राला समर्पित एक विशेष प्रदर्शनासह या परिषदाचे पुण्यातील कोरेगाव पार्क येथील द वेस्टिन हॉटेलमध्ये आयोजन केले आहे. येत्या ३ आणि ४ मार्च २०२५ रोजी ही परिषद होईल अशी माहिती एआयएम असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील यांनी दिली. यावेळी असोसिएशनचे सचिव समीर पाथरे आणि खजीनदार सर्जेराव शिसोदे उपस्थित होते. कृषी- निविष्ठा (इनपुट) उद्योगाचे सक्षमीकरण करण्यासाठी तसचे भारतातील कृषी- निविष्ठा (इनपुट)  उद्योगाला बळकटी देण्याचा प्रयत्न या परिषदेव्दारे केली जाणार आहे, ज्यामुळे जोडणी, सहयोग आणि वाढीसाठी एक व्यासपीठ उपलब्ध होईल. हा कार्यक्रम उत्पादक, पुरवठादार, उद्योग तज्ञ आणि उद्योजकांना संधी शोधण्यासाठी,  नियामक चौकटींवर चर्चा करण्यासाठी आणि बायोस्टिम्युलंट्स, जैव कीटकनाशके आणि जैव खतांमधील नवीनतम प्रगती प्रदर्शित करण्यासाठी एकत्र आणेल. शंभर हून अधिक स्टॉल्स या परिषदेत मांडली जाणार आहे. त्याशिवाय अत्याधुनिक कृषी निविष्ठा (इनपुट)  उपाय, नाविन्यपूर्ण कच्चा माल आणि शाश्वत शेती तंत्रज्ञानाचे प्रदर्शन यात सादर होणार आहे. परिषद सत्रांमध्ये बायोस्टिम्युलंट नियम, कर धोरणे, उद्योग आव्हाने आणि भविष्यातील वाढीच्या शक्यतांबद्दल अंतर्दृष्टी.  उद्योग नेटवर्किंग: B2B कृषी-इनपुट क्षेत्रातील प्रमुख घटकांना जोडणारे विशेष नेटवर्किंग सत्रे,  लघू आणि मध्यम उद्योजकीय क्षेत्रातील लहान आणि उदयोन्मुख व्यवसायांकडून सहभागाला प्रोत्साहन देणे. , आयात अवलंबित्व कमी करणे: आयात केलेल्या कच्च्या मालाला पर्याय म्हणून भारतीय उत्पादकांना प्रोत्साहन देणे. व्यवसाय संबंध निर्माण करण्यासाठी आणि बाजार विस्ताराच्या संधींचा शोध घेण्यासाठी या व्यासपीठाचा फायदा घेण्यासाठी देशभरातून खत तसेच शेती औषधे तसेच उत्पादन उपयुक्त मिशनरी, आधुनिक शेती तंत्रज्ञान निर्मिती करणाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेतील स्टॉलच्या मर्यादेमुळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे. म्हणूनच उत्पादक, पुरवठादार, उद्योजक आणि उद्योग व्यावसायिकांना या परिवर्तनकारी परिषदेत सहभागी व्हावे असे आवाहन धुरगूडे पाटील यांनी केले. नोंदणी, प्रायोजकत्व आणि स्टॉल बुकिंगबद्दल अधिक माहितीसाठी, abc.aimassociationindia.com ला भेट द्या किंवा +९१ ९६८९१५२८३७ वर संतोष दळवी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन समीर पाठारे यांनी केले आहे. PHOTO CATION मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित अखिल भारतीय अँग्रो इनपुट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या पत्रकार परिषदेत मार्गदर्शन करताना असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार धुरगूडे पाटील. सोबत सचिव समीर पाथरे आणि खजिनदार सर्जेराव शिसोदे.

साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने घोषित

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा मुंबई : साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातील पुरस्काराची घोषणा सांस्कृतिक मंत्री . आशिष शेलार यांनी मुंबईत केली. नामांकने प्राप्त झालेले कलाकार तसेच पुरस्कार प्राप्त तांत्रिक व  बालकलाकार यांचे मंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी अभिनंदन केले आहे. सन 2022 या वर्षातील साठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीसाठी अनन्या,पाँडिचेरी, सनी, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, 4 ब्लाईंड मॅन, समायरा,गाभ,ह्या गोष्टीला नावच नाही,ग्लोबल आडगाव,हर हर महादेव या दहा चित्रपटांना अंतिम फेरीत नामांकन प्राप्त झाले आहे. तर उत्कृष्ट बालकलाकार म्हणून निवास पोकळे (छुमंतर) व अर्णव देशपांडे (आम्ही बटरफ्लाय) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.त्याचबरोबर उत्कृष्ट कला दिग्दर्शन महेश कुंडलकर(उनाड), उत्कृष्ट छाया लेखन अभिजीत चौधरी, (फोर ब्लाइंड मॅन) ओंकार बर्वे (फोर ब्लाइंड मॅन) , प्रियंकर घोष (ह्या गोष्टीला नावच नाही) उत्कृष्ट संकलन यश सुर्वे (काटा किर्र), उत्कृष्ट ध्वनिमुद्रन सुहास राणे (ह्या गोष्टीला नावच नाही), उत्कृष्ट ध्वनी संयोजन लोचन प्रताप कानविंदे (हर हर महादेव), उत्कृष्ट वेशभूषा उज्वला सिंग (ताठ कणा), उत्कृष्ट रंगभूषा सुमित जाधव (ताठ कणा), यांना तांत्रिक विभातील पुरस्कार जाहीर झाले आहेत. पुरस्काराच्या प्राथमिक फेरीसाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या वर्षात सेन्सॉर झालेल्या एकूण ५० प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. या चित्रपटांचे परीक्षण मुग्ध गोडबोले, विवेक लागू,बाबासाहेब सौदागर, विजय भोपे,श् रीरंग आरस, राजा फडतरे, शरद सावंत, मेधा घाडगे, चैत्राली डोंगरे, विनोद गणात्रा, प्रकाश जाधव, शर्वरी पिल्लेई, जफर सुलतान, देवदत्त राऊत, विद्यासागर अध्यापक यांनी केले होते. नामनिर्देशन विभागातील पुरस्कारांची नामांकने पुढीलप्रमाणे १. सर्वोत्कृष्ट कथा : १.अनिल कुमार साळवे (ग्लोबल आडगाव) २. पूर्वल धोत्रे (4 ब्लाईंड मॅन) ३. सुमित तांबे (समायरा ) २. उत्कृष्ट पटकथा : १. इरावती कर्णिक (सनी) २.पूर्वल धोत्रे- अभिषेक मेरुरकर (4 ब्लाईंड मॅन) तेजस मोडक – सचिन कुंडलकर (पॉंडिचेरी) ३. उत्कृष्ट संवाद: १. प्रवीण तरडे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे) २.मकरंद माने सोयरिक ३. सचिन मुल्लेमवार (टेरिटरी) ४. उत्कृष्ट गीते: १. प्रशांत मडपूवार (ग्लोबल आडगाव, गाणे : यल्गार होऊ दे) २.अभिषेक रवणकर (अनन्या,गाणे-ढगा आड या) ३.प्रकाश (बाबा) चव्हाण : (फतवा गाणे-अलगद मन हे) ५. उत्कृष्ट संगीत : १.हितेश मोडक (हर हर महादेव) २.निहार शेंबेकर (समायरा) ३.विजय गवंडे (सोंग्या) ६. उत्कृष्ट पार्श्वसंगीत : १.अविनाश विश्वजीत (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे) २.हनी सातमकर (आतुर) ३.सौमिल सिध्दार्थ (सनी) ७.उत्कृष्ट पार्श्वगायक: १.मनिष राजगिरे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे गीत :भेटला विठ्ठल माझा) २.पद्मनाभ गायकवाड (गुल्हर गीत – का रे जीव जळला) ३.अजय गोगावले (चंद्रमुखी गीत : घे तुझ्यात सावलीत) ८. उत्कृष्ट पार्श्वगायिका: १.जुईली जोगळेकर (समायारा गीत – सुंदर ते ध्यान)२.आर्या आंबेकर (चंद्रमुखी गीत बाई ग कस करमत नाही) ३.अमिता घुगरी (सोयरिक गीत – तुला काय सांगु कैना) ९. उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक : १.राहूल ठोंबरे-सजीव होवाळदार (टाईमपास 3 गीत : कोल्ड्रीक वाटते गार) २.उमेश जाधव (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे गीत- आई जगदंबे) . सुजीत कुमार (सनी गीत – मी नाचणार भाई) १०.उत्कृष्ट अभिनेता:१. प्रसाद ओक (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे )२.वैभव तत्ववादी (पॉन्डीचेरी)३.ललीत प्रभाकर (सनी) ११.उत्कष्ट अभिनेत्री : १.सई ताम्हणकर (पॉन्डीचेरी)२.अमृता खानविलकर(चंद्रमुखी) ३.सोनाली कुलकर्णी (तमाशा लाईव्ह) १२.उत्कृष्ट विनोदी अभिनेता १.मकरंद अनासपुरे (वऱ्हाडी वाजंत्री)२.संजय नार्वेकर (टाईमपास 3) ३.भारत गणेशपुरे ( पिल्लू बॅचलर) १३. सहाय्यक अभिनेता :१. योगेश सोमण (अनन्या) २ किशोर कदम (टेरीटरी)…

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून द्या- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नांबाबात मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग शासकीय माहाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पदे सहा महिन्यात भरण्याच्या सूचना देऊन मंत्री . मुश्रीफ म्हणाले की, वर्ग तीन आणि वर्ग चारची पदे तसेच तांत्रिक आणि अतांत्रिक पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास परवानगी दिली आहे. ही पदभरती पारदर्शक व्हावी याकडे कटाकक्षाने लक्ष  द्यावे. ही सर्व पदे येत्या 8 महिन्यात भरावीत. तसेच ज्या ठिकाणी जादा पदे आहेत तेथील प्राध्यापक वर्गाची सेवा सिंधुदुर्ग येथे देण्याची व्यवस्था करावी. नर्सिंग महाविद्यालयाची वसतीगृहाची इमारत पाडण्यास आरोग्य विभागाने परवानगी द्यावी, नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात यावी. यासाठी भाडेतत्वावर जागा घ्यावी,  विभागाच्या अधिकाऱ्यांनी या महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थिती जाणून घ्यावी, करावयाच्या सुधारणा, पुरवावयाच्या सोयी यांची माहिती द्यावी, नव्याने उभारण्यात येणाऱ्या  इमारतींची कामे तातडीने मार्गी लावावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री . राणे यांनी वैद्यकीय महाविद्यालयास साधनसामुग्री पुरवण्याविषयी सूचना दिल्या. तसेच वर्ग तीन आणि वर्ग चार पदांची भरती पारदर्शी होण्याच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नागरिकांना दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी नियोजन करण्यात यावे, औषधांसाठी लागणारा निधी देण्यात यावा. अशा सूचना दिल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जादाची 13 एकर जमीन देण्याचा प्रस्ताव आहे. त्यापैकी कौशल्य विकास विभागाकडील आयटीआयची 3 एकर जागा देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच सामाजिक वनीकरण विभागाकडील 10 एकर जागेसाठी पाठपुरावा करावा, मंत्रिमंडळासमोर लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावा, अशा सूचनाही बैठकीमध्ये देण्यात आल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध झाली असून येत्या मे महिन्यापर्यंत ही पदे भरली जातील. तर वर्ग तीन, वर्ग चार आणि तांत्रिक, अतांत्रिक पदे येत्या 8 महिन्यात भरली जातील, अशी माहिती आयुक्त निवतकर यांनी दिली.

दूध व्यवसायाच्या विकासासाठी उपाययोजना कराव्यात-मंत्री अतुल सावे

मुंबई : दूध व्यवसाय हा भारतीय कृषी क्षेत्राचा एक महत्त्वाचा घटक आहे. दूध व्यवसायाच्या संकलन, प्रक्रिया व विक्री या तीन महत्त्वाच्या क्रिया आहेत. त्यापैकी दूध संकलन केंद्र ही पहिली पायरी असून, दूध प्रक्रिया क्रेंद्र व दूध उत्पादक यांच्यातील दुवा ठरते. यातून बेरोजगार युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. दूध योजना केंद्रचालक यांच्या मागण्यांबाबत तसेच व्यवसायाच्या विकासासाठी उपाययोजना कराव्यात, असे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री अतुल सावे यांनी निर्देश दिले. मंत्रालयात मंत्री . सावे यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई दूध योजना केंद्रचालक वेल्फेअर असोसिएशन व महाराष्ट्र दूध वितरक सेना यांच्या मागण्यांबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी  मंत्री .सावे बोलत होते. मंत्री सावे म्हणाले,की दूध व्यवसायाच्या विस्ताराने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते. त्यामुळे या क्षेत्राचा विकास महत्त्वाचा आहे. दूध व्यवसायाच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यात काम करणाऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. या बैठकीत दूध वितरक, केंद्रचालक व राज्यातील दुग्धशाळांमधील कर्मचाऱ्यांच्या समस्यांसंदर्भातही चर्चा करण्यात आली. या समस्या निराकरणासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, असेही मंत्री सावे यांनी सांगितले. या बैठकीस दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.