Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

भायखळा येथील शूटिंगबॉल स्पर्धेत इस्तियाक मालेगावने पटकावला प्रथम क्रमांक

केतन खेडेकर मुंबई : अग्निशमन सेवा कला व क्रीडा मंच, मुंबई आणि मुंबई शूटिंगबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विधानाने मुंबई अग्निशमन दल विभागीय अधिकारी कै. किशोर घाडीगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एकदिवसीय राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन मुंबई अग्निशमन केंद्र मुख्यालय, भायखळा, येथे नुकतेच करण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत मुंबई, ठाणे, रायगड, मालेगाव, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे येथील २२ संघ सहभागी झाले होते. सर्व संघांमध्ये राष्ट्रीय खेळाडूंचा भरणा होता त्यामुळे स्पर्धा खूप रंगतदार झाली. अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात मालेगावच्या इस्तियाक संघाने प्रतिस्पर्धी मालेगावच्याच आय एस सी संघाचा सरळ दोन सेट मध्ये १५-०७, १६-१४ असा पराभव केला. विजयी इस्तियाक मालेगाव संघातून इस्तियाक, यासीन, मुबासिर यांनी सुंदर खेळ केला; पराभूत आयएससी मालेगाव संघातून वकार याने दुसऱ्या सेट मध्ये आघाडी घेतली होती, तरीही इस्तियाक याने त्याचे आव्हान परतवून विजय संपादन केला. उपांत्य फेरीच्या दोन सामन्यात आय एससी मालेगाव संघाने आमिर काझी यांच्या संजय भोसले प्रतिष्ठान या सोलापूर संघाचा १५-०६, १५-०६ असा पराभव केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात इस्तियाक मालेगाव संघाने सांगली जिल्हा संघाचा तीन सेट मध्ये ०६१५, १५-११, १५-०८ असा पराभव केला. या सामन्यात महेश माने व संदेश घारे यांनी अप्रतिम खेळ केला पण इष्टियाकच्या आक्रमणापुढे त्यांना हर पत्करावी लागली. स्पर्धेतील मालिकावीर म्हणून उत्कृष्ट शूटिंग केलेल्या इस्तियाक (मालेगाव संघ) याची निवड करण्यात आली, तर स्पर्धेतील बेस्ट शूटर म्हणून संदेश घारे (सांगली) याची निवड करण्यात आली. उपउपांत्य फेरीचे निकाल : अमीर काझी सोलापूर विजयी विरुद्ध टेंभुर्णी संघ २१-१४ इस्तियाक मालेगाव विजयी विरुद्ध कल्याण संघ २१-१० आयएससी मालेगाव विजयी वि. मुंबई महानगरपालिका २१-६ सांगली संघ विजयी विरुद्ध रायगड अलिबाग संघ २१-१६ स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुंबई अग्निशमन दल, सर्व अधिकारी, अग्निशमन सेवा कला व क्रीडा मंच चे सचिव भगत, स्पर्धा प्रमुख मंगेश भोसले, स्पर्धा निरीक्षक व माजी राष्ट्रीय खेळाडू रत्नदीप रावराणे तसे अग्निशन संघाचे राष्ट्रीय खेळाडू महेश कदम यांनी खूप परिश्रम घेतले. स्पर्धा नियंत्रक म्हणून प्रफुल्ल वाईरकर यांनी काम पाहिले., तंत्री सल्लागार म्हणून मिलिंद बिर्जे यांनी काम पाहिले. स्पर्धेचे आयोजन मुंबई शूटिंगबॉल असोसिएशनच्या कार्यकारिणीने पाहिले, सचिव दीपक सावंत यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी उपप्रमुख अग्निशमन अधिकारी भोर एस.डी सावंत, सेवानिवृत्त विभाग अधिकारी पाटील साहेब, सहाय्यक विभागीय अधिकारी सांगळे, भगत; केंद्र अधिकारी बोरुले, के किशोर घाडीगावकर कुटुंबिय, यांच्या उपस्थितीत झाले. नगरसेवक रोहिदास लोखंडे, समीर चव्हाण, प्रदेश प्रतिनिधी मुंबई काँग्रेस, दत्तप्रसाद पेडणेकर, अध्यक्ष, मालवण तालुका पत्रकार संघ; गजानन आंगणे, श्री भराडी देवस्थान आंगणेवाडी, मालवण यांनीही स्पर्धेला उपस्थिती दर्शवली. बक्षीस समारंभ उपप्रमुख अग्निशमन अधिकारी घोष साहेब व भोर सहाय्यक विभागीय अधिकारी सांगळे साहेब व भगत साहेब वरिष्ठ केंद्र अधिकारी विशाल चंद्रकांत विश्वासराव केंद्र अधिकारी जितेश गोरुले आणि प्रमुख अतिथी सुरज चव्हाण सचिव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. असोसिएशन अध्यक्ष माजी आमदार शाम सावंत यांनी उपस्थित राहून खेळाडूना मार्गदर्शन केले. ००००००००

सुवर्ण महोत्सवी सांगता सोहळ्यानिमित्त संगीत रजनी

ठाणे – ज.ए.ई.चे मो. ह. विद्यालय आणि रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय व अभिरुची मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्ष, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने २८ मार्चला सायं. ६ वा. मो. ह. विद्यालय शाळेचे…

हर्षवर्धन सदगीरला शरद पवारांकडून १२ लाखांची शिष्यवृत्ती

हर्षवर्धन सदगीरला शरद पवारांकडून १२ लाखांची शिष्यवृत्ती काका पवार यांच्‍या तालमीला ५० लाखांचे आर्थिक सहाय्य पुणेः खासदार व कुस्ती श्रेत्राचे आश्रयदाते  शरद पवार साहेब यांनी  डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला १२ लाख रूपयांची शिष्यवृत्ती तर काका पवार यांच्‍या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल,पुणे या संकुलसाठी ५० लाख रुपयेंचे बक्षिस दिले आहे. मुंबईत हर्षवर्धन सदगीरसह अर्जून पुरस्‍कार विजेते काका पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली.  यावेळी उद्योजक श्री मोहसीन बागवान, कुस्ती प्रशिक्षक शिवाजी कोळी सर महाराष्ट्र चॅम्पियन पृथ्वीराज पाटील आदी मान्‍यवर उपस्‍थित होते. हर्षवर्धन सदगीर यांचे कौतुक करीत ऑलिम्‍पिकपटू होण्यासाठी पुढील २ वर्षांसाठी महिना ५० हजार प्रमाणे १२ लाखांचे शिष्यवृत्ती धनादेश दिला आहे. काका पवार यांच्‍या तालमीतील हर्षवर्धनसह ११ मल्‍लांनी पदकाची लयलुट केल्‍याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलला ५० लाख रूपयांचे शरद पवार यांनी आर्थिक सहाय्य दिले आहे. शरद पवार यांचे आभार र्‍व्यक्‍त करीत काका पवार म्‍हणाले की, पवार हे खेळाडूंसाठी तारणहार व आधार आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे आम्ही सर्व पहिलवान व खेळाडू कायम ऋणी आहोत. पवार यांनी केवळ घोषणाच केली नाही तर धनादेश देऊन वेळीच विजेत्‍यांचे व प्रशिक्षण केंद्राचे कौतुक केले आहे. क्रिकेटनंतर इतक्‍या वेगाने पवार हेच कुस्‍तीगीरांसाठी अनेकदा धावून आले आहेत. हर्षवर्धन सदगीर यांनी सांगितले की, गुरूवर्य काका पवार यांच्‍या सल्‍ल्‍यानंतर मी पुन्‍हा महाराष्ट्र केसरीच्‍या मैदानात उतरणार आहे. परंतु ऑलिम्‍पिक खेळण्याचे माझे ध्येय आहे. त्‍यासाठी शरद पवार यांची मदत प्रोत्‍साहन देणारी ठरली आहे. चौकट शासनाकडून नोकरीचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही काक पवार व हर्षवर्धन सदगीर यांनी भेट घेतली. त्‍यावेळी येत्‍या अधिवेशनात नाशिक महानगरपालिकेत नोकरी देण्याचे आश्चासन एकनाथ शिंदे यांनी दिली असल्‍याचे काका पवार यांनी सांगितले आहे.

पत्रकार आरती मुळीक परब यांना मातृशोक

पत्रकार आरती मुळीक परब यांना मातृशोक दिवा, दि. २५ मार्च : पत्रकार आरती मुळीक परब यांच्या आई कै. सौ. लक्ष्मी चंद्रकांत मुळीक परब यांचे दिनांक २४ मार्च २०२६ रोजी सायन…

बंद असलेल्या बसेस ची वाहतूक पुन्हा सुरु करा

बंद असलेल्या बसेस ची वाहतूक पुन्हा सुरु करा शिवसेनेची मागणी मुंबई: देवीपाडा व जय महाराष्ट्र नगर, टाटा विद्युत संग्राही केंद्र, जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील  नागरिकांसाठी असलेली मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) बस क्र.२९९ व बस क्र. २९3 या बेस्टची बंद असलेली सेवा पुन्हा पूर्ववत  सुरु करण्यात यावी अशी आग्रही मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा १२ व १४ च्या वतीने करण्यात आली. ही बंद असलेली सेवा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या स्थानिक नगरसेविका सारिका शशिकांत झोरे यांनी मागाठाणे डेपो प्रमुख जितेंद्र सामंत यांना भेटून लोकांच्या समस्या सविस्तर सांगितल्या व मागण्यांचे निवेदन दिले.  यावेळी मागाठाणे विधानसभा निरीक्षक, सिनेट सदस्य शशिकांत झोरे, मागाठाणे विधानसभाप्रमुख रेखाताई बोऱ्हाडे, उपविभागसंघटक सिमीतिनी नारकर, वैभवी तावडे, शाखाप्रमुख सचिन मोरे, माधुरी खानविलकर, वनिता दळवी, प्रतीक चव्हाण, दिनेश विचारे, मूर्तिकार नंदकिशोर शिवलकर, विजया गायकवाड, सीमा सानप, मंगल करडे, कौस्तुभ खानविलकर उपस्थित होते.  

जलसंपदा अधिकाऱ्यांचा मृद-जलसंधारणात नियमबाह्य समावेश?

 जलसंपदा अधिकाऱ्यांचा मृद-जलसंधारणात नियमबाह्य समावेश? पदोन्नतीसाठी ‘५० लाखांचा दर’ चर्चेत; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही चौकशी लांबणीवर मुंबई : राज्यात जलसंपदा विभागातील काही अधिकाऱ्यांचा मृद व जलसंधारण विभागात नियमबाह्य पद्धतीने समावेश करून त्यांना…

 ३० कलाकारांची अभूतपूर्व ऐतिहासिक शास्त्रीय स्वरमैफल ‘अर्घ्य २०२६’

३० कलाकारांची अभूतपूर्व ऐतिहासिक शास्त्रीय स्वरमैफल ‘अर्घ्य २०२६’ पद्मश्री तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत रंगली मुंबई:  बांद्रा येथील बालगंधर्व रंगमंदिरात ‘अर्घ्य इंडियन क्लासिकल म्युझिक अँड फाईन आर्ट फाउंडेशन’तर्फे आयोजित ‘अर्घ्य २०२६’ ही भव्य आणि ऐतिहासिक शास्त्रीय संगीत स्वरमैफल अत्यंत उत्साहात आणि रसिकांच्या दादेत पार पडली. संध्याकाळी ६.३० वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात तब्बल ३० कलाकारांनी एकत्रित सादरीकरण करत एक अद्वितीय सांगीतिक अनुभव प्रेक्षकांना दिला. या विशेष स्वर मैफिलीत सतारवादक पं. रवी चारी, प्रख्यात गायक पं. राम देशपांडे, बासरीवादक पं. रूपक कुलकर्णी, तबलावादक पं. योगेश साम्सी आणि पखवाजवादक श्री कृष्णा साळुंके या पाच दिग्गज कलाकारांनी आपल्या शिष्यांसह एकाच मंचावर सादरीकरण करत गुरु-शिष्य परंपरेचा भव्य आविष्कार साकारला. विविध घराण्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या कलाकारांनी राग आणि ताल यांच्या शाश्वत संगमातून एक सुरेल, समन्वयपूर्ण आणि मंत्रमुग्ध करणारी ‘सिम्फनी’ साकारली. या कार्यक्रमाला पद्मश्री तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांची मुख्य अतिथी म्हणून लाभलेली उपस्थिती ही मैफलीची विशेष आकर्षण ठरली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला एक वेगळीच उंची आणि आध्यात्मिक अधोरेखित अर्थ प्राप्त झाला. आजच्या काळात फ्युजन संगीताचा प्रभाव वाढत असताना ‘अर्घ्य २०२६’ने शुद्ध भारतीय शास्त्रीय संगीताचा एक भव्य आणि सखोल पर्याय रसिकांसमोर यशस्वीपणे मांडला. अनेक वाद्ये आणि स्वर एकत्र आणत तयार झालेल्या या संगीतमय संवादाने श्रोत्यांना भावनिक आणि ध्यानमग्न अनुभव दिला. ही केवळ एक मैफल नसून भारतीय संगीत परंपरेचा एक जिवंत उत्सव ठरला. ‘अर्घ्य २०२६’ने परंपरा, विद्वत्ता आणि भक्तिभाव यांचा संगम घडवत रसिकांच्या मनात अविस्मरणीय ठसा उमटवला.

उत्तरार्ध एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी २ एप्रिलला गडकरीमध्ये

उत्तरार्ध एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी २ एप्रिलला गडकरीमध्ये रंगतदार प्राथमिक फेरी ठाण्यात उत्साहात संपन्न ठाणे : सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखा यांच्या सहकार्याने मोरया इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट आयोजित उत्तरार्ध एकांकिका स्पर्धेची रंगतदार प्राथमिक फेरी ठाण्यात उत्साहात पार पडली. अंतिम फेरी २ एप्रिलला सकाळी ११ वाजल्यापासून गडकरी रंगायतन, ठाणे येथे पार पडणार आहे. २२ मार्च रोजी गडकरी रंगायतन, तालीम हॉल मध्ये उत्तरार्ध एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली.  स्पर्धेत सहभागी होणाऱ्या लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांचे वय हे ५० किंवा त्यापेक्षा जास्त असावं, या विशेष नियमामुळे ही स्पर्धा इतर स्पर्धांपेक्षा वेगळी ठरत आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून ठाणे, नवी मुंबई, मुंबई, चिपळूण, अलिबाग, नाशिक, सोलापूर, सातारा, कल्याण, पुणे इथल्या एकूण १५ संघांनी स्पर्धेला भरघोस प्रतिसाद दिला. सॉफ्ट कॉर्नरचे एमडी आणि सीईओ दिलीप कुलकर्णी, त्यांच्या पत्नी आणि मुलासह स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेचे पदाधिकारी आणि अनोख्या स्पर्धेचे कल्पनासूचक रवी मिश्रा देखील प्राथमिक फेरीतील एकांकिकांचा अनुभव घेण्यासाठी उपस्थित होते. प्राथमिक फेरीसाठी एकांकिका, नाटक, सिनेमा, मालिका या क्षेत्रात लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयाचा अनुभव असलेले विशाल कदम आणि विनोद जाधव हे परीक्षक होते. वयाची पन्नाशी उलटल्यानंतर राहून गेलेल्या किंवा जबाबदाऱ्यांमुळे मागे ठेवलेल्या इच्छा आणि कलागुणांना पुन्हा एकदा नव्याने वाव देता यावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणांच्या जोश आणि उत्साहात आपण कुठे मागे पडतोय असेही होऊ नये म्हणून खास या वयोगटासाठी ही स्पर्धा आणि त्याला नवीन संहिता, उत्तम अभिनय याद्वारे मिळालेला प्रतिसाद याचे दोन्ही परीक्षकांनी तोंडभरून कौतुक केले आणि सहभागी संघांना प्रोत्साहन दिले. तरुण वयात अनुभवलेला किंवा काही कारणास्तव राहून गेलेला रंगमंचावर प्रयोग सादर करण्याचा जोश अनेक वर्षांनी पुन्हा अनुभवता आला, अशा प्रतिक्रिया अनेक स्पर्धकांनी दिल्या. त्याचबरोबर स्पर्धेच्या आयोजनाचे आणि नियोजनाचे सुद्धा कौतुक केलं. स्पर्धेला आलेल्या प्रतिसादाचं कौतुक करत ही स्पर्धा अजून संपूर्ण महाराष्ट्रभर पसरावी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संघांनी स्पर्धेत सहभागी व्हावं, अशी इच्छा स्पर्धेचे आयोजक मोरया इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंटचे प्रमुख प्रफुल्ल गायकवाड, कल्पिता पावसकर आणि शिशिर कोण्णुर यांनी व्यक्त केली. प्राथमिक फेरीतून प्राण, मुंबई – ‘साठी’, कला संस्कृती, ठाणे – ‘आर्टिकल २१’, रंगा थिएटर्स, ठाणे – ‘तरुणाई’, मित्र सहयोग, ठाणे – ‘अनोळखी’, ठाणे आर्टगिल्ड – ‘ती येते आणिक जाते’ या पाच एकांकिका अंतिम फेरीत दाखल झाल्या आहेत. दमदार नाट्यप्रयोग पाहण्यासाठी प्रेक्षकांनी आवर्जून उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे. यासंबंधी अधिक माहितीसाठी शिशिर – ९९२०१३७८०५, प्रफुल्ल – ९००४९१२४६८, कल्पिता – ९१६७२४६८३३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

गावदेवी मंडईत दहशत, भाजी विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला

गावदेवी मंडईत दहशत, भाजी विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला भाजप नगरसेवक संजय वाघुले यांची कठोर कारवाईची मागणी ठाणे : महापालिकेच्या गावदेवी मंडईत काही समाजकंटकांमुळे दहशत पसरली असून, एका समाजकंटकाने भाजी विक्रेत्यावर सोमवारी दुपारी हल्ला केला. या हल्ल्यात भाजी विक्रेता जखमी झाला आहे. या प्रकाराने विक्रेत्यांमध्ये घबराट पसरली आहे. या प्रकरणी भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनी आरोपीविरोधात व प्रवेशद्वार बळकावणाऱ्या बेकायदा विक्रेत्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून गावदेवी भाजी मंडईच्या प्रवेशद्वारावर बेकायदा विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. मंडईत ये-जा करणाऱ्या ग्राहकांनी तक्रार केल्यास, बेकायदा विक्रेत्यांकडून ग्राहकांना शिविगाळ केली जाते.त्यातील एक विक्रेता समाजकंटक नवनाथ वायकर याच्या आईचे मंडईत गाळे आहेत. मात्र, त्याच्याकडून व त्याच्या काही साथीदारांकडून प्रवेशद्वारालगत दुकाने उभारून अधिकृत भाजी विक्रेत्यांवर दादागिरी केली जात आहे. तसेच अनेक गाळेधारकांना मारहाणही करण्यात आली, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केला. गावदेवी मार्केटमध्ये किशोर नऱ्हे यांचे तीन गाळे आहेत. तर मार्केटमध्येच नवनाथ वायकर याच्या आईच्या नावावरील तीन गाळे आहेत. त्याच्याबरोबर अनेक गाळेधारकांचे सातत्याने वाद होत आहेत. मार्केटमधील एक जादा गाळा किशोर नऱ्हे यांच्या नावावर आहे. त्याच्या ताब्यावरून नवनाथ याच्याकडून धमक्या दिल्या जात होत्या. मार्केटमध्ये दिसल्यास जिवंत सोडणार नाही, अशी त्याने धमकी दिली होती, असे किशोर नऱ्हे यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. गावदेवी मंदिराबाहेरील श्री साईबाबा मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्ताने गाळेधारकांकडून बुधवारी वर्गणी जमा केली जात होती. त्यावेळी नवनाथ याने किशोर नऱ्हे याच्यावर शहाळे सोलण्याच्या सुऱ्याने हल्ला केला. त्यात ते जखमी झाले. नवनाथ याने गाळेधारक अलका काजळे व प्रमिला कोल्हे यांनाही शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. तसेच पंकज काजळे यांनाही मारहाण केली. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे गावदेवी भाजी मंडईमध्ये घबराट पसरली आहे. गावदेवी मंडईतील मूळ विक्रेते हे बेकायदा विक्रेत्यांच्या अतिक्रमणांमुळे हैराण झाले आहेत. या अतिक्रमणांकडे महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केला.

ग्रामीण विकास, डिजिटल पारदर्शकता, सामाजिक सक्षमीकरणाला गती देणारा रु. ११६.९९ कोटीचा अर्थसंकल्प – रणजित यादव

ग्रामीण विकास, डिजिटल पारदर्शकता, सामाजिक सक्षमीकरणाला गती देणारा रु. ११६.९९ कोटीचा अर्थसंकल्प – रणजित यादव अनिल ठाणेकर ठाणे- ठाणे जिल्हा परिषदेच्या सन २०२६-२७ च्या हा अर्थसंकल्प केवळ निधी वाटपाचा दस्तऐवज नसून ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला सक्षम, सुरक्षित आणि स्वावलंबी बनविण्याचा संकल्प आहे. सर्वांगीण ग्रामीण विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण व आरोग्य सेवा, जलसुरक्षा व शाश्वत कृषी, सामाजिक सक्षमीकरण आणि डिजिटल पारदर्शक प्रशासन या पाच प्रमुख तत्वांवर आधारित हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. ई-गव्हर्नन्स व डिजिटल उपक्रमांच्या माध्यमातून प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख करण्याचा आमचा प्रयत्न राहील. या माध्यमातून ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल,” असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी केले. सन २०२६-२७ या वर्षासाठी एकूण अंदाजपत्रकीय जमा रु. ११६.९९ कोटी इतकी असून एकूण खर्च रु. ११६.९३ कोटी प्रस्तावित करण्यात आला आहे. वर्षअखेरीस रु. ५.८४ लाख इतकी शिल्लक अपेक्षित आहे. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत प्रमोद काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, कार्यकारी अभियंता बांधकाम पद्माकर लहाने, उपायुक्त पशुसंवर्धन वल्लभ जोशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छ भारत मिशन) पंडित राठोड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देविदास महाजन, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास संजय बागुल, जिल्हा कृषी अधिकारी एम. एम. बाचोटीकर, समाज कल्याण विभाग प्रमुख उज्वला सपकाळे, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी अंजली अंबेकर, जनसंपर्क अधिकारी रेश्मा आरोटे आदी अधिकारी उपस्थित होते. ठाणे जिल्हा परिषदेचा सन २०२५-२६ चा सुधारित व सन २०२६-२७ या वित्तीय वर्षाचा मूळ अर्थसंकल्प बुधवार, २५ मार्चला सकाळी ११ वाजता बी. जे. हायस्कूल येथील सभागृहात सादर करण्यात आला.जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्याकडे अर्थसंकल्पाची प्रत सुपूर्द केली. राज्यातील नागरी व ग्रामीण संस्कृतीचा समतोल साधत ठाणे जिल्हा परिषद ही विकासाच्या दृष्टीने अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते. अशा या जिल्हा परिषदेचा सन २०२५-२६ चा सुधारित व सन २०२६-२७चा मूळ अर्थसंकल्प सादर करताना मला अभिमान वाटतो. या अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील विकासाचा प्रत्येक पैलू लक्षात घेऊन रचनात्मक व परिणामकारक नियोजन करण्यात आले आहे. पंचायत सशक्तीकरण, ग्रामीण आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि विविध केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ठाणे जिल्हा परिषदेला राज्यस्तरावर मानाचे स्थान मिळाले आहे.ठाणे जिल्हा परिषदेच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पामध्ये विविध विभागांसाठी भरीव तरतूद करण्यात आली असून विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागासाठी रु. १.१५ कोटी तर संकीर्ण सामान्य प्रशासनासाठी रु. २.६१ कोटी निधी राखीव ठेवण्यात आला आहे. शिक्षण विभागासाठी रु. ११.३६ कोटी तर प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी रु. २.०८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी बांधकाम विभागासाठी सर्वाधिक रु. १९.८७ कोटी निधी देण्यात आला आहे. लघुपाटबंधारे व जलसंधारण विभागासाठी रु. २.४८ कोटी, तर आरोग्य विभागासाठी रु. ३.७८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागासाठी रु. २ कोटी निधी प्रस्तावित आहे. कृषी विभागासाठी रु. ३.७४ कोटी तर पशुसंवर्धन विभागासाठी रु. ३.७२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. समाजकल्याण विभागासाठी रु. ९.७९ कोटी व दिव्यांग कल्याणासाठी रु. ३.०५ कोटी निधी राखीव ठेवण्यात आला आहे. महिला व बालकल्याण विभागासाठी रु. ४.८९ कोटी तर ग्रामपंचायत विभागासाठी मुद्रांक शुल्क वाटपासाठी रु. ३७.५० कोटी आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानासाठी रु. ३.६५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच वित्त विभागासाठी विविध प्रशासकीय बाबींसाठी सुमारे रु. ०.६७ कोटी निधी राखीव ठेवण्यात आला आहे. अशा प्रकारे सर्व विभागांना समतोल निधी वाटप करून सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी माहिती दिली आहे.