Category: होम

श्री राजपूत करणी सेनेचे चिंतन-मंथन शिबीर

रमेश औताडे मुंबई: राजपुत समाजाच्या दुर्लक्षित प्रश्नांवर चर्चा करून ठोस निर्णायक भूमिका घेण्यासाठी श्री राजपूत करनी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महिपाल सिंह मकराणा यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मराठी पत्रकार संघ येथे चिंतन-मंथन शिबीर झाले. महाराज्य प्रदेश अध्यक्ष श्याम सिंह ठाकूर व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्ह्यातील, सर्व विभागातील व सर्व तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील राजपुत समुदायतील सर्वांना, समाजाच्या असंख्य दुर्लक्षित प्रश्नांवर चर्चा तसेच ठोस भूमिका घेण्यासाठी एकत्र येण्याचे विनम्र आवाहन या चिंतन शिबिरातून करण्यात आले. महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यांनीही आरक्षण व इतर महत्वाच्या विषयावर आपली भूमिका चिंतन शिबिरात मांडली. समाजातील सुशिक्षित बेरोजगार, समाजातील युवांवर वाढते व्यसनाचे संकट, समाजातील व वर्तमान परस्थितीतील आरक्षणाचे राजकारण संपले तरच जाती पातीचे राजकारण संपेल असे महिपालसिंह जी मकराणा यांनी सांगितले. यावेळी श्याम सिंह ठाकूर म्हणाले सरकारने जर आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. ००००००००

महापौरच्या पतीला आयुक्तांच्या दालनात प्रवेश दिल्यावरून आयुक्तांच्या दालना बाहेर भाजपा नगरसेवकांचा गोंधळ

सुनिल इंगळे उल्हासनगर: महापौरच्या पतीला पालिका आयुक्तांच्या दालनात प्रवेश दिला तर भाजपाच्या नगरसेवकांना दालनाबाहेरच उभे राहण्यास सांगून त्यांना रोखण्यात आल्याने याचा निषेध करत भाजपा नगरसेवकांनी पालिका आयुक्तांच्या कार्याला बाहेर जोरदार घोषणाबाजी करत तिथेच गोंधळ घातल्याची घटना बुधवारी सायंकाळी महापालिकेत घडली. या घटनेमुळे सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये एकच राडा झाला. त्यामुळे उल्हासनगर महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपाचे युती टिकणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बुधवारी सायंकाळी महासभा झाल्यावर पालिका आयुक्त यांच्या दालनात शिवसेना गटनेते अरुण आशान आणि शिवसेनेच्या महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम हे गेले होते. त्यावेळी भाजपचे गट नेता राजेश वाधारीया यांना देखील पालिका आयुक्ताच्या दालनात बोलण्यात आले होते. पण त्यावेळी कमलेश निकम हे अरुण आशान सोबत आल्याचे पाहून व त्यांना कोणतेही पद नसताना आयुक्तांच्या दालनात जाऊन दिले गेले आणि भाजपच्या नगरसेवकांना सुरक्षारक्षकांकडून बाहेर रोखण्यात आले याचा राग भाजपा नगरसेवकांना आला. या गोष्टीचा राग येऊन त्यांनी या घटनेचा निषेध करत पालिका आयुक्तांच्या दालना बाहेर घोषणाबाजी करत एकच गोंधळ घातला. त्यावेळी पोलिसांना तातडीने त्या ठिकाणी बोलण्यात आले. या घटनेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच झोपली. याशिवाय काँग्रेसचा एक नगरसेवक असताना महासभेमध्ये महापौरांनी थेट काँग्रेसच्या एकमेव नगरसेविका अंजली साळवे यांची विरोधी पक्ष नेते म्हणून महासभेत घोषणा केल्याने त्यावेळी भाजपाच्या नगरसेवकांनी त्याला जोरदार विरोध केला. या संदर्भात राजेश वधारिया यांनी सांगितले आम्ही सत्तेत असताना शिवसेना आम्हाला विश्वासात न घेता महापौर हे परस्पर निर्णय घेतात. विरोधी पक्ष नेता निवडी प्रकरणी घेतलेला निर्णय हा चुकीचा असून त्या संदर्भात आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागू असा इशारा दिला. शिवसेनेने युती धर्म पाळला नाही आम्हाला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेत असल्याचा आरोप भाजपने केला. या घटनेबाबत शिवसेना गटनेता अरुण आशान यांनी सांगितले महासभेच्या अगोदर जी ऑडिशन बैठक होते त्या बैठकीमध्ये निर्णय होतात.आणि यामध्ये काय निर्णय घ्यायचे हे बैठकीच्या अगोदर गट नेत्याला कळवले जातात. आजच्या महासभेमध्ये पहिल्यांदा त्यांचे नगरसेवक खाली डम्पिंग ग्राउंड च्या प्रश्नसंदर्भात जमिनीवर बसून ठिय्या आंदोलन सुरू केले. युतीमध्ये असताना सुद्धा महापौरांना आणि प्रशासनाला घेरण्याचा प्रयत्न होता. परंतु त्यांना हे समजायला पाहिजे की आपण युतीमध्ये आहोत ज्यावेळेस युतीमध्ये आपण असतो त्यावेळेस त्यांनी युतीचा त्यांना भान नाहीये. प्रत्येक महासभेच्या वेळी त्यांना गोंधळ घालायचा असतो. आणि आज त्यांनी या पद्धतीत गोंधळ घातला. परंतु जे काही निर्णय झाले ते महापौर सर्वांच्या वतीने सगळ्यांना समक्ष घेऊनच ते निर्णय घेतात. परंतु त्यांची भाषा आता बदललेली आहे हे मात्र नक्की. पालिका आयुक्तांकडून गट नेत्यांना आमंत्रण देण्यात आले होते. माझ्यासोबत कमलेश निकम हे देखील पालिका आयुक्तांच्या दालनात आले होते. सोबत येण्यास आयुक्तांची परवानगी घेतली होती बाहेरील जास्ती लोक आत मध्ये घेऊन येऊ नका अशा आयुक्तांनी सांगितले होते. आयुक्तांनी बोललेले शिवाय कोणी आत जाऊ शकत नाही. त्यामुळे दालना बाहेर उभे असलेल्या भाजपच्या काही नगरसेवकांना थांबायला सांगितलं होतं. गट नेता असल्यामुळे स्वाभाविक आहे माझ्या बरोबर जो व्यक्ती आहे तो आत मध्ये आला. त्याच्यामध्ये पद असो की नसो आयुक्तांनी जर कोणाला बोलवलं असेल तर आणि गटनेता बरोबर असेल तर त्यांना आक्षेप घेण्याचा काही प्रश्न येत नाही असे अरुण आशान यांनी सांगितले . याबाबत शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सांगितले भारतीय जनता पक्ष सत्तेत राहते, सत्तेचा सहभाग घेते, सत्तेमध्ये भागीदारी घेते. मग महासभेच्या वेळेला खाली बसणं आणि महापौरांच्या विरुद्ध अविश्वास दाखवणे हे कितपत खरं आहे. युती म्हणून युतीचा धर्म त्यांनी पाळला पाहिजे. जर खाली बसून महापौरांच्या विरुद्ध अविश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला तो चुकीचा आहे. युतीच्या बाबतीमध्ये वरिष्ठ नेते विचार करतील त्याचा निर्णय घेतील. आमचे नेते सक्षम आहेत आमचे नेते निर्णय घेतील असे सांगितले. सत्तेत असताना देखील भाजप आणि शिवसेना या घटनेवरून उल्हासनगर महानगरपालिकेत आमने-सामने आल्याने त्यांच्यात झालेल्या या राड्यावरून या सत्तेला तडा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असे बोलले जात आहे.

हिवताप टाळण्यासाठी प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करावे

ठाणे: २५ एप्रिल हा दिवस ठाणे महानगरपालिकेअंतर्गत जागतिक हिवताप (मलेरिया) दिन म्हणून राबविला जातो. या दिनी महापालिकेच्या फायलेरिया विभागाच्यावतीने महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी हिवताप टाळण्यासाठी प्रत्येक…

– एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सज्ज

चारा सुरक्षा आराखड्याचे आदेश अशोक गायकवाड अलिबाग: भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, २०२६ च्या मान्सूनवर ‘एल-निनो’ या हवामान घटकाचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पशुधनाच्या संरक्षणासाठी व संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व तातडीचे निर्देश दिले आहेत. राज्यात सर्वसाधारणपणे हिरव्या चाऱ्याची ४३.९८% तर सुक्या चाऱ्याची २५.१२% तूट असते. ‘एल-निनो मुळे पाऊस कमी झाल्यास ही तूट वाढण्याची भीती आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याने ‘जिल्हा नियोजन व विकास समिती अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना किंवा आपत्ती निवारण निधीतून चारा बियाणे खरेदीसाठी निधीला प्राधान्य द्यावे. बिया (पंच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता, मका, ज्वारी, बाजरी यांसारख्या चारा बियाणांचे कार्यारंभ आदेश महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), अकोला यांना तातडीने देण्याच्या सूचना मा. मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. ५ मे २०२६ पूर्वी हे आदेश देऊन बियाणे शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात येत आहे. चारा उत्पादन वाढवण्यासाठी शासनाने वैरण बियाणे वाटप, हायड्रोपोनिक पद्धतीने चारा उत्पादन, मिनी टीएमआर आणि कडबाकुट्टी यंत्रांचे वाटप यासह विविध योजनांवर भर दिला आहे. विशेष जिल्हा चारा सुरक्षा आराखडा :- जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील पशुधनाची संख्या लक्षात घेऊन स्वतंत्र ‘जिल्हा चारा सुरक्षा आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. यात प्रामुख्याने पुढील बाबींचा समावेश असेलः धरणांचे गाळपेरा क्षेत्र व नदीपात्रालगतच्या जमिनींवर चारा लागवडीची विशेष मोहीम राबवणे. टंचाईच्या काळात चाऱ्याची उपलब्धता राहण्यासाठी मुरघास प्रकल्पांना गती देणे. भविष्यात चारा छावण्यांची वेळ येऊ नये, यासाठी आतापासूनच चारा साठवणुकीचे अचूक नियोजन करणे. पशुसंवर्धन विभागाने जिल्हा उप आयुक्त व स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने या मोहिमेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पशुपालकांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे व उपलब्ध योजनांचा लाभघ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

कीहोल स्पाइन सर्जरीनंतर ७३ वर्षीय रुग्ण १२ तासांत पुन्हा चालू लागला

दिवा: किम्स हॉस्पिटल्स, ठाणे येथे करण्यात आलेल्या अत्याधुनिक कीहोल स्पाइन सर्जरीनंतर ७३ वर्षीय रुग्णाने अवघ्या १२ तासांत पुन्हा चालण्यास सुरुवात केली. गेल्या महिनाभरापासून तीव्र पायाच्या वेदनांमुळे त्याला दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ उभे राहणे किंवा चालणे शक्य नव्हते. रुग्णाला पायात तीव्र वेदना होत होत्या, ज्या दिवसेंदिवस वाढत गेल्या. त्यामुळे दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला होता. रुग्णालयात दाखल होण्याच्या दोन दिवस आधी त्याला मल-मूत्र नियंत्रणाशी संबंधित समस्या देखील निर्माण झाल्या, ज्यामुळे परिस्थिती गंभीर बनली. तपासणीत L४–L५ स्तरावरील प्रोलॅप्स्ड डिस्क आढळली. या अवस्थेत मणक्यातील डिस्क सरकून मज्जातंतूवर दबाव आणते, ज्यामुळे तीव्र वेदना, मुंग्या येणे आणि चालण्यात अडचण निर्माण होते. रुग्णाला इतरही सहव्याधी होत्या तसेच तो रक्त पातळ करणारी औषधे घेत होता. त्यामुळे पारंपरिक ओपन सर्जरीमध्ये जास्त रक्तस्रावाचा धोका होता. हे लक्षात घेऊन डॉ. अमोघ झावर, कन्सल्टंट स्पाइन सर्जन यांच्या नेतृत्वाखाली एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या किमान हस्तक्षेप शस्त्रक्रियेत छोट्या छिद्रांद्वारे कॅमेरे आणि विशेष उपकरणांच्या सहाय्याने मज्जातंतूंवरील दबाव कमी करण्यात आला. डॉ. अमोघ झावर म्हणाले, “एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरीमुळे प्रभावित भागावर अचूक उपचार करता येतात आणि स्नायूंना कमी इजा होते. विशेषतः वृद्ध आणि उच्च-जोखमीच्या रुग्णांसाठी ही पद्धत अधिक सुरक्षित आहे.” शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती झपाट्याने सुधारली. तो १२ तासांत चालू लागला आणि ४८ तासांत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तज्ज्ञांच्या मते, एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीमुळे कमी वेदना, कमी रक्तस्राव, कमी संसर्ग धोका आणि जलद पुनर्प्राप्ती असे अनेक फायदे मिळतात. या प्रकरणामुळे अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने वृद्ध रुग्णांनाही पुन्हा स्वावलंबी व सक्रिय जीवन जगणे शक्य होत असल्याचे अधोरेखित झाले आहे.

 ‘युवाशक्ती जागर मोर्चा’या राज्यव्यापी दौऱ्याचा शुभारंभ

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित   डोंबिवली, दि. 22 एप्रिल (आरती परब) – भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित ‘युवाशक्ती जागर मोर्चा’या राज्यव्यापी दौऱ्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतून दणक्यात शुभारंभ झाला. यामुळे राज्यातील युवकांना राष्ट्रनिर्मितीच्या ध्येयाशी जोडण्याची आणि त्यांच्या उर्जेला सकारात्मक दिशा देण्याची व्यापक मोहीम सुरू झाल्याचे उद्गार भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी काढले. या प्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे व्यासपीठावरील सर्वात युवा मनाचे आणि ऊर्जावान नेतृत्व असल्याचे नमूद केले. आपल्या मनोगतात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी यात्रेचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, “भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राबवण्यात येणारा हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. केंद्र व राज्य सरकारने तरुणाईसाठी घेतलेले लोककल्याणकारी निर्णय या यात्रेच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यातील युवकांपर्यंत पोहोचवले जातील. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेले सक्षम आणि प्रभावी युवाशक्तीचे संघटन उभारणे, हेच या यात्रेचे मुख्य ध्येय आहे.” ‘जागर युवाशक्तीचा, सशक्त राष्ट्रनिर्मितीचा’हा संदेश देणारी ही यात्रा राज्यातील युवकांना एकत्र आणत त्यांना विकास, नवकल्पना आणि राष्ट्रहिताच्या विचारांशी जोडण्याचे कार्य करणार आहे. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वात ही यात्रा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार असून, युवकांमध्ये जागर निर्माण करून त्यांना सामाजिक आणि राष्ट्रीय बांधिलकीची जाणीव करून देईल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास मंत्री जयकुमार गोरे, मंत्री अतुल सावे, मंत्री नितेश राणे, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, राज्यसभा खासदार अशोक चव्हाण, भाजपा प्रदेश सरचिटणीस व भाजयुमो प्रदेश प्रभारी सुनील राणे, मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्यासह इतर मान्यवर, भाजयुमोचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. 0000000000

 मुंबईतील माणुसकी हरवत चालली असल्याची गंभीर घटना

एक पत्रकार रेल्वेत १५ तास बेशुद्ध तरीही कुणाला माहिती नाही मुंबई / रमेश औताडे तब्बल पंधरा तास एक पत्रकार बेशुद्धावस्थेत लोकल ट्रेनच्या डब्ब्यात पडून आहे आणि तरीही रेल्वे प्रशासन किंवा पोलिसांना याची खबरही नाही. असे एक प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या रेल्वे पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, तसेच यापुढे अशा घटना घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी लोकांचे दोस्त संघटनेच्या वतीने मध्य रेल्वेच्या महा व्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे. लोकांचे दोस्त संघटनेचे चे अध्यक्ष रवि भिलाणे यांनी मध्य रेल्वे महा व्यवस्थापक यांचे उपसचिव उमंग दुबे यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच रेल्वेच्या सार्वजनिक तक्रार विभागात तक्रार नोंदवली.निवेदन देताना ज्योती बडेकर, संजीता मालणकर, प्रकाश महिपती कांबळे इतर संघटनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. पत्रकार संजय नागनाथ शिंदे (वय वर्षे ६०) हे मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये १५ एप्रिल रोजी दुपारी चार वाजेपासून दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेपर्यंत जवळपास पंधरा तास बेशुद्ध अवस्थेत होते. शिंदे हे नेहमीप्रमाणे १५ एप्रिल २०२६ रोजी धारावी परिसरात वार्तांकन करत होते. ते दुपारी चार वाजेच्या सुमारास मध्य रेल्वेच्या सायन ( शीव ) रेल्वे स्थानकावर ट्रेन पकडण्यासाठी पोहोचले. मात्र, त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचा त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. संजय शिंदे यांच्या मोबाईल ची रिंग वाजत होती. पण कोणीही फोन घेत नव्हते. त्यांची काळजी वाटल्याने त्यांच्या धारावी परिसरातील मित्रांनी संध्याकाळी उशिरा धारावी पोलिस ठाण्यात मिसिंग तक्रार दिली. त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्या पत्नी सुषमा संजय शिंदे आणि मुलगा राहुल संजय शिंदे यांनी ते रहात असलेल्या डोंबिवली येथील स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार देऊन त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. १६ तारखेला सकाळी सात वाजेच्या सुमारास रेल्वे पोलिसांनी राहुल संजय शिंदे यास मोबाईल वरून कळविले की संजय शिंदे हे कल्याण रेल्वे स्थानकात आहेत. त्यानुसार कुटुंबियांनी तिकडे धाव घेतली. त्यावेळी पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील खाजगी क्लिनिक मध्ये त्यांना उपचारासाठी दाखल केल्याचे आढळून आले. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय शिंदे हे सकाळी सहा साडेसहा च्या दरम्यान टिटवाळा रेल्वे स्थानकात, मुंबईकडे जाण्यासाठी यार्ड मधून आलेल्या लोकल ट्रेन मध्ये आढळून आले होते. इतर प्रवाशांनी कळविल्यावरून पोलिसांनी त्यांना कल्याण रेल्वे स्थानकात उतरवून घेतले होते. पोलिसांनी त्यांना कल्याण स्थानकातील खासगी क्लिनिक मध्ये दाखल केल्यानंतर त्यांना दोन सलाईन लावली गेली. त्याचे चार हजार रुपये बिल घेऊन त्यांना घरी घेऊन जाण्यास सांगण्यात आले. मात्र संजय शिंदे यांची प्रकृती अतिशय गंभीर व चिंताजनक झाली होती. ते बेशुद्धच होते. म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तिथूनच कल्याण पश्चिम येथील होली क्रॉस रुग्णालयात दाखल केले. तिथे आय सी यू मध्ये दोन दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तेव्हा त्यांची प्रकृती सुधारली. रुग्णालयाचे साठ हजार रुपये बिल भरून कुटुंबीयांनी त्यांना घरी आणले. अजूनही त्यांच्यावर घरगुती उपचार सुरू आहेत.त्यांना गाडीतून उतरवताना पोलिसांनी मारहाण केल्याची आणि उर्मटपणे वागवल्याची शिंदे कुटुंबीयांची तक्रार आहे.

रेल्वे पोलिसांना चौकशी निवेदन देताना लोकांचे दोस्त संघटनेचे अध्यक्ष रवी भिलाने, संजीता मालणकर, प्रकाश महिपती कांबळे उपस्थित होते.