छायाचित्र – केतन खेडेकर शिवसेना स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचे उपाध्यक्ष देवाभाई कदम यांचा वाढदिवस नुकताच महालक्ष्मी येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी महासंघाचे सरचिटणीस अरुण मोरे, चिटणीस संतोष बामणे, सचिन कदम, उपाध्यक्ष मिलिंद पंडित आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
गंभीरपणे भाजलेल्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात त्वरित उपचार मिळण्यासाठी महापालिकेने पॉलिसी आणावी
नगरसेवक रफिक शेख यांची मागणी मुंबई प्रतिनिधी जानेवारीमध्ये माझ्या प्रभागात मालाड येथे एका इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावर गॅस सिलेंडरचा स्फोट झाला त्या स्फोटाचे परिणाम इतके गंभीर होते की दुसऱ्या मळ्यापर्यंत या स्फोटाची झळ पोहोचली होती. या स्फोटामुळे एकूण सात लोक जखमी झाले होते. त्यानंतर त्यातील पाच जणांचा हा दुर्दैवी मृत्यू झाला. नेमकी घटना अशी झाली की जेव्हा हा स्फोट झाला त्यानंतर या सगळ्या जखमी रुग्णांना त्वरित एका लोकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुविधा मिळाली परंतु त्या रुग्णालयामध्ये बर्न ओढ नसल्याने तेथे त्यांचा इलाज होऊ शकला नाही. त्यांना त्वरित शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तिथे देखील बर्न वॉर्ड हा कार्यान्वित नव्हता. त्यामुळे येथील रुग्णांना पुन्हा साधी वैद्यकीय सुविधा पुरवून त्यांना पुन्हा कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु या रुग्णालयात देखील बर्न वॉर्ड कार्यान्वीत नसल्याने या रुग्णांना पुन्हा केम रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. या रुग्णालयातून चार रुग्णालयात शिफ्ट करण्यामध्ये रुग्णांचा फार मोठ्या प्रमाणात वेळ वाया जातो. यामुळे या रुग्णांना त्वरित उपचार न मिळाल्याने या रुग्णांचा जीव जातो असं माझा गंभीर आरोप आहे. या रुग्णालयातून विचार देण्यासाठी या रुग्णांकडे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पैसे मागितले. हे फार दुर्दैवी आहे. एकाच कुटुंबातील पाच जण जर जखमी असेल तर ते रुग्णांना डिस्चार्ज देण्यासाठी पैसे कसे देणार. तरी मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वार्डामध्ये अशा भाजलेला रुग्णांना त्वरित उपचार मिळण्यासाठी खाजगी रुग्णालयात एक पॉलिसी आणावी जेणेकरून प्रत्येक रुग्णांना त्वरित आणि लवकर योग्य उपचार मिळेल अशी मागणी नगरसेवक रफिक शेख यांनी महापौर रितू तावडे यांच्याकडे केली.
‘अनभिषिक्त देवदासी’ कादंबरीचा भव्य प्रकाशन सोहळा जल्लोषात संपन्न
मुंबई :काही कथा फक्त वाचल्या जात नाहीत. त्या मनाला हादरवून सोडतात. श्रद्धेच्या नावाखाली जे घडतंय, त्याला देव मान्यता देतो की समाज असा प्रश्नच आहे. मात्र गोपाल रायबोले यांच्या ‘अनभिषिक्त देवदासी’…
बोरिवली येथे अजिंक्यतारा मल्लखांब स्पर्धा उत्साही वातावरणात संपन्न
मुंबई : मल्लखांब लव संघ, सुविद्या प्रसारक संघ आणि आर्किटेक्चर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीवली (पश्चिम) येथे “५ वी अजिंक्यतारा मल्लखांब चषक स्पर्धा” उत्साही वातावरणात नुकतीच संपन्न झाली. हि स्पर्धा मल्लखांब खेळातील अनभिषिक्त सम्राट कै. दत्ताराम दुदम यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येते. मुंबई विभागीय स्तरावर झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यातील ५० संघांमधून जवळपास १ हजार पेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला होता. स्पर्धा प्रमुख म्हणून आशिष देवल व स्पर्धा सचिव म्हणून संचिता देवल यांनी स्पर्धेची जबाबदारी उत्तमपणे पार पाडली. कर्ममूर्ती महादेव रानडे सर, मुंबईचे उपमहापौर संजय घाडी, नगरसेविका सीमा शिंदे, सुप्रसिद्ध कलाकार भाग्यश्री मिलिंद, ओंकार भोजने, समाजसेवक प्रशांत पाटील, एअर मार्शल गजेंद्र सर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकारी मंगेश नाईक, एअरफोर्स अधिकारी वाडकर सर, सुप्रसिद्ध उद्योजीका सोनाली कोचरेकर या मान्यवरांनी स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत सुविद्यालय शाळा, मुंबादेवी विद्यानिकेतन, दहिसर विद्यामंदिर, समता क्रीडा भवन, बोरीवली स्पोर्ट्स कल्चरल सेंटर, शैलेन्द्र एज्युकेशन सोसायटी, समर्थ व्यायाम मंदिर दादर, श्रीमा गुरुकुल ठाणे, रुतूराज स्पोर्ट्स अकादमी या संघांनी सर्वाधिक पारितोषिके पटकावली. भारतातील एकमेव पॅरा मल्लखांब स्पर्धा देखील यावेळी उत्साही वातावरणात पार पडली, यामध्ये ५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरलेल्या पॅरा मल्लखांब स्पर्धेतील खेळाडूंनी स्पर्धा आयोजकांचे कौतुक केले, तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मल्लखांब लव टीम चे आभार मानले. पुढील वर्षी या स्पर्धेत अधिक मोठ्या संख्येने खेळाडूंचा सहभाग असेल असा विश्वास स्पर्धा प्रमुख आशिष देवल यांनी व्यक्त केला.
मदार चषक कबड्डी स्पर्धेत महिला जेतेपदावर शिक्कामोर्तब
राजमाता जिजाऊची निकिता पडवळ सर्वोत्तम खेळाडू मुंबई, दि. २२ (क्री.प्र.)-शेवटच्या चढाईपर्यंत श्वास राखायला लावणार्या क्रीडाप्रेमी आमदार सुनील राऊत यांच्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या महिला गटाच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या शिवशक्ती महिला संघाने पुण्याच्या राजमाता जिजाऊविरुद्ध संघर्ष ३२-३० असा जिंकला आणि महिला कबड्डीत आपणच शक्तिशाली असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. मात्र आजचा दिवस गाजवला तो निकिता पडवळच्या वेगवान-कल्पक चढायांनी. ती राजमाता जिजाऊच्या गळ्यात जेतेपदाची माळ घालण्यात थोडक्यात अपयशी ठरली असली तरी ती सर्वोत्तम खेळाडूच्या स्कुटरवर विराजमान झाली. विक्रोळी पूर्वेला टागोर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुरु असलेल्या कबड्डी महोत्सवाच्या राज्यस्तरीय महिला गटाच्या अंतिम सामन्यात थराराने पुन्हा एकदा वातावरण पेटवले. उपांत्य सामन्यात शिवशक्तीच्या महिलांनी धर्मवीर कबड्डी संघाला तर राजमाता जिजाऊने डॉ. पतंगराव कदम संघावर सहज मात करत अंतिम फेरी गाठली. दोन्ही उपांत्य लढती एकतर्फी झाल्यामुळे हजारोंच्या संख्येने गर्दी करणार्या दर्दी कबड्डीप्रेमींची काहीशी निराशा झाली होती, पण अंतिम सामन्यातील संघर्षाने त्याची सव्याज भरपाई केली. शिवशक्ती आणि राजमाता जिजाऊ यांच्यातील सामना मुंबई विरुद्ध पुणे असा असला तरी कबड्डीप्रेमींनी दोन्ही संघांच्या खेळाला भरभरून दाद दिली. पहिल्या मिनिटापासून प्रत्येक गुणासाठी दोघांमध्ये चढाओढ पाहायला मिळाल्यामुळे जो शेवटपर्यंत लढणार तोच जिंकणार, याचे संकेत मिळाले. राज्याच्या महिला कबड्डीत कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या शिवशक्ती आणि राजमाता जिजाऊ संघांनी आपापल्या पहिल्या चढाईतच एकेक गुण मिळवत जोरदार सुरुवात केली. पुढे शिवशक्तीने चांगल्या पकडी करत आघाडी घेण्याचा प्रयत्न केला तर राजमाता जिजाऊच्या निकीताने त्या आघाडीशी बरोबरी साधणारा खेळ करुन सामन्यात रंगत आणली. पहिल्या डावात केवळ दोन खेळाडू मैदानात असलेल्या शिवशक्तीवर लोण चढवण्याची नामी संधी राजमाता जिजाऊला होती, निकीताच्या सुसाट खेळानेच त्यांना ही संधी मिळवून दिली. पण तेव्हाच शुभदा खोत आणि अपेक्षा टाकळे यांनी मगरमिठीसारखी निकीताची पकड करत आपल्यावर पडणार्या लोणला वाचवले. यामुळे शिवशक्तीने मध्यंतराला १४-११ अशी आघाडी मिळवली. मध्यंतरानंतर दोन्ही संघांमध्ये आघाडीसाठीचा संघर्ष आणखी तीव्र झाला. पण शिवशक्तीने शुभदा आणि रियाच्या चढायांमुळे आपली आघाडी २१-१२ अशी वाढवत सामन्यावर वर्चस्व मिळवले होते, पण तेव्हाही निकिताच्या आक्रमक चढायांनी राजमाता जिजाऊला पुन्हा सामन्यात आणण्याची किमया करून दाखवली. त्यानंतर सामन्यातील थरार शेवटपर्यंत कायम राहिला. शेवटची दोन मिनीटे असताना शिवशक्तीवर पडलेल्या लोणने स्कोर २९-२८ वर आणला होता. विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडू शकत होती. पण झटापटीच्या त्याक्षणी शिवशक्तीने आपली आघाडी ३२-३० अशी नेत अवघ्या दोन गुणांच्या फरकाने जेतेपदाला गवसणी घातली. या थरारक सामन्याचे राणाप्रताप तिवारी यांनी आपल्या जोरदार आणि जल्लोषपूर्ण शैलीत निवेदन करून प्रेक्षकांचा उत्साह द्विगुणित केला. महिला विजेत्यांच्या पुरस्कारमध्ये वाढ आमदार सुनील राऊत यांनी महिला गटातील विजेत्यांना दिली जाणारी रोख रक्कम एक लाखावरून दीड लाख रुपयांपर्यत वाढवल्यामुळे अंतिम लढतीत हा पुरस्कार जिंकण्यासाठी दोन्ही संघांनी आपला सर्वोत्तम खेळ केला. विजेत्या शिवशक्तीला दीड लाख आणि आमदार चषकाने गौरविण्यात आले. राजमाता जिजाऊ पाऊण लाखांची मानकरी ठरली. मात्र त्यांच्या निकिता पडवळने स्कुटर जिंकली.सर्वोत्कृष्ट पकडपटूचा मानही त्यांच्याच ऋतुजा निगडेला मिळाला. शिवशक्तीची रिया मडकईकर सर्वोत्तम चढाईपटू ठरली. स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा आयोजक आमदार सुनील राऊत यांच्यासह माजी आमदार रमेश कोरगावकर, महिला विभागप्रमुख रश्मी पहुडकर, नगरसेवक दीपक सावंत, विश्वास शिंदे, म्युनिसिपल कामगार सेनेचे बाबा कदम, मुंबई उपनगर संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तीकर,कार्याध्यक्ष सुधाकर घाग, सचिव राजेश पडेलकर, उपाध्यक्ष सदानंद माजलकर, संयुक्त सचिव राजेंद्र अनभवणे यांच्या उपस्थितीत पार पडला. बीपीसीएल-आयएसपीलमध्येच अंतिम लढत तीन दिवसांपूर्वी प्रभादेवीत ओम ज्ञानदीप क्रीडा मंडळाच्या कबड्डी स्पर्धेत जो अंतिम थरार अनुभवयाला मिळाला तोच थरार विक्रोळीतही पाहायला मिळणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बीपीसीएलने आकाश पिकलमुंडे आणि मिलन दहिया यांच्या आक्रमक चढायांच्या बळावर मुंबई बंदरचा ३५-२२ असा सहज पराभव केला तर आयएसपीएलने ठाणे महानगरपालिकेचे आव्हान ४७-३२ असे मोडीत काढले. नीरज मिसाळ आणि अभिषेक गुंगे यांच्या तुफानी चढायांना रोखण्यात ठाणे पालिकेच्या खेळाडूंना अपयश आल्यामुळे मध्यंतरालाच २८-१४ अशा आघाडीसह आयएसपीएलने आपली अंतिम फेरी निश्चित केली होती. आता जेतेपदासाठी पुन्हा एकदा बीपीसीेएल आणि आयएसपीएल एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्यामुळे बीपीसीएल पुन्हा विजेता होतो की आयएसपीएल आपल्या पराभवाचा वचपा काढतो याकडे कबड्डीप्रेमींचे लक्ष लागले आहे.
कागदावरच मान्सून तयारी, दिवा पुन्हा पाण्याखाली जाण्याची भीती
दिवा, दि. २२ एप्रिल (आरती परब) : मान्सून तोंडावर आला असतानाही दिवा शहरातील नालेसफाईचे काम अद्याप सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून मान्सूनपूर्व तयारीचा गाजावाजा केला जात असला, तरी प्रत्यक्षात दिव्यातील परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे चित्र दिसत आहे. महापालिकेकडून आयुक्तांच्या आढावा बैठका, प्रभागनिहाय निर्देश आणि कामांच्या दाव्यांची माहिती प्रसिद्धी माध्यमांतून दिली जात आहे. मात्र, दिव्यातील मुख्य नाल्यांमध्ये कचऱ्याचे ढीग आणि साचलेला गाळ कायम असल्याने प्रत्यक्ष कामाचा अभाव स्पष्टपणे जाणवत आहे. त्यामुळे प्रशासनाचा ‘आढावा’ हा केवळ कागदापुरताच मर्यादित असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. दरवर्षी नाले सफाईसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. तरीही पावसाळ्याच्या अगोदर केवळ वरवरची सफाई करून काम पूर्ण झाल्याचे दाखवले जाते, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. परिणामी, नाल्यातील गाळ न काढल्यामुळे पहिल्याच पावसात पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण होते आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही तासांत ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत नालेसफाई रखडल्यामुळे दिवा शहर पुन्हा पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होत आहे. “दरवर्षी प्रशासन फक्त बैठका घेते, पण प्रत्यक्षात काहीच होत नाही. कंत्राटदार वरवरची सफाई करून निघून जातात. यंदाही तीच परिस्थिती राहिली, तर नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याला जबाबदार कोण?” – दर्पण गावडे, स्थानिक नागरिक, दिवा मान्सूनपूर्व कामांबाबत प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या आश्वासनांवर आता नागरिकांचा विश्वास उरलेला नाही. त्यामुळे तातडीने प्रभावी नालेसफाई करून संभाव्य पूरस्थिती टाळण्याची मागणी जोर धरत आहे. ००००००००००००
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य
प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक मुंबई,: महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी तसेच ओला ,ऊबर इ-बाईक टॅक्सी सारख्या इतर व्यावसायिक अमराठी वाहनचालकांनी प्रवाशांशी मराठीतून संवाद साधणे अनिवार्य करण्याच्या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने ठोस पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ, साहित्यिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक आयोजित केली आहे. शासनाने २०१९ मध्ये घेतलेल्या निर्णयानंतरही अनेक ठिकाणी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. विशेषतः परप्रांतीय वाहनचालकांकडून प्रवाशांशी मराठीत संवाद साधला जात नसल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. याच पार्श्वभूमीवर हा विषय गांभीर्याने घेत राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. परिवहन विभागाच्या वतीने ‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधत या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. मराठी भाषेला नुकताच ‘अभिजात भाषा’ दर्जा मिळाल्याने या उपक्रमाला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून, हा निर्णय केवळ प्रशासकीय न राहता अमराठी वाहनचालकांमध्ये मराठी भाषेबद्दल आत्मीयता निर्माण करणारा ठरावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या उपक्रमांतर्गत अमराठी वाहनचालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. मुंबई मराठी साहित्य संघाच्या अध्यक्षा श्रीमती उज्ज्वला मेहेंदळे तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवण, महेश केळुसकर, संतोष राणे, अशोक बागवे, बाळ कांदळकर, सुनील तांबे, शिवाजी गावडे, सतीश सोळांकुरकर, अरुण म्हात्रे, एकनाथ आव्हाड, प्रसाद कुलकर्णी, प्राचार्य अशोक चिटणीस, ज्येष्ठ साहित्यिका अनुपमा उजगरे, दीपा ठाणेकर आणि मनीषा राजपूत आदींच्या मार्गदर्शनामुळे या मोहिमेला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी परिवहन आयुक्तही उपस्थित राहणार आहेत. आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी ११.०० वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत मराठी भाषेची अनिवार्यता, अंमलबजावणीची रूपरेषा आणि प्रशिक्षणाचा आराखडा यावर व्यापक चर्चा होणार आहे. वाहनचालक आणि प्रवाशांमधील संवाद सुलभ करण्यासोबतच मराठी भाषेचा सन्मान राखण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन ‘व्हायाडक्ट’वर ट्रॅक बसविण्याला वेग
जपानी J-स्लॅब तंत्रज्ञानाचा भारतात प्रथमच वापर मुंबई : मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात ‘व्हायाडक्ट’वर ट्रॅक बसविण्याच्या कामाला वेग आला असून, जपानी ‘शिंकान्सेन’ तंत्रज्ञानावर आधारित J-स्लॅब बॅलेस्टलेस ट्रॅक प्रणालीचा भारतात प्रथमच वापर होत आहे. ही प्रणाली RC ट्रॅक…
मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग टोल वसुलीला जून २६ पासून सुरुवात?
सिंधुदुर्गातील ओसरगाव टोल वसुलीची निविदा प्रसिद्ध…! स्थानिकांना सवलत, सूट नाही..! सिंधुदुर्ग (प्रतिनिधी )–गेली अनेक वर्ष रखडलेला मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण (एनएच -६६) येत्या मे, २६ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिली असतानाच आता या महामार्गावरील टोल वसुलीच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि कसाल यांच्यामध्ये असलेल्या ओसरगाव टोल नाक्यावर लवकरच टोल वसुलीला सुरुवात होणार आहे. या टोल नाक्यावर वसुलीसाठी यापूर्वी एका एजन्सीला नियुक्ती देण्यात आली होती.मात्र १४ जून २०२३ रोजी वसुलीला सुरुवात होताच सर्व राजकीय पक्ष आणि टोल विरोधी कृती समितीच्या झेंड्याखाली एकत्र झालेल्या सिंधुदुर्गवासीयांनी वसुली बंद पाडली होती. त्यानंतर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत गेली तीन वर्षे टोल नाका सुरू करून वसुली करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. मात्र आता याबाबतच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या असून १७ एप्रिल ला या संदर्भात ऑनलाईन निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. २०१२ सालापासून मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले असून येत्या मे, २६ अखेर ते पूर्णत्वास जाईल अशी घोषणा गडकरी यांनी १० एप्रिल रोजी खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत आयोजित करण्यात आलेल्या समारंभात बोलताना केली होती. त्यानंतर आठवड्याभरातच टोल वसुलीची निविदा काढण्यात आली आहे. या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या निविदेमध्ये कणकवली शहराजवळचा जानवली पूल ते पत्रादेवी (सिंधुदुर्ग- गोवा सीमा) या ६० किलोमीटरच्या लांबीच्या महामार्गासाठी दुचाकी आणि तीन आसनी वाहने वगळता उर्वरित सर्व वाहनांच्या टोल वसुलीसाठी संस्था निश्चित केली जाणार आहे.दरवर्षी या वाहनांकडून टोलच्या स्वरूपात स्वरूपात ५८ कोटी रुपयांचा महसूल मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. ओसरगाव टोल नाक्यावरील टोल वसुलीला सुरुवात झाल्यानंतर जून महिन्यापासून महामार्गावरील सर्व टोल नाके सुरू करण्याची प्रक्रिया महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू असल्याचे प्राधिकरणाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. या टोल वसुलीतून स्थानिक वाहनांना वगळण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते मात्र निविदेमध्ये स्थानिक वाहनांना टोल करातून वगळण्याबाबत कोणताही उल्लेख नाही मात्र इतर वाहनांपेक्षा स्थानिक वाहनांना काही प्रमाणात सवलत देण्यात आल्याचे निविदे वरून स्पष्ट होत आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून मोटार गाड्या जीप आणि व्हॅन यासारखी हलकी वाहने जाण्याचे प्रमाण वाहतुकीचे प्रमाण हलक्या वाहनांचे वाहतुकीचे प्रमाण ४९ टक्के आहे बस आणि ट्रक दोन ऍक्सल वाहनांचे प्रमाण २७% मल्टी ऍक्सल वाहनांचे प्रमाण १९% असल्याचे नियोजित निविदेत निविदेत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
