Category: होम

इंद्रलोक अग्नितांडवमध्ये तीन निष्पापांचा बळी

भाईंदर पूर्व, येथील इंद्रलोक फेज ३ परिसरात काल रात्री सिलेंडर स्फोटामुळे घडलेली आगीची घटना केवळ एक अपघात नसून, तो महापालिका प्रशासन आणि महसूल विभागाच्या भ्रष्ट डोळेझाकपणाचा क्रूर परिणाम आहे. या भीषण दुर्घटनेत ३ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, या घटनेची माहिती मिळताच *महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि पीडितांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. या दुर्दैवी घटनेत ज्या निष्पाप मुलांनी आणि व्यक्तीने आपला जीव गमावला, त्यांच्या कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त करत, त्यांना शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळावी यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रशासकीय ढिसाळपणामुळे सामान्य जनतेचा बळी जाऊ देणार नाही आणि इंद्रलोक परिसरात चालणारे हे अवैध साम्राज्य मुळासकट उखडून टाकेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा ठाम निर्धार प्रताप सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केले.सदर घटना घडलेला परिसर हा खाजगी मालकीचा असून तो कांदळवन क्षेत्रात येतो. नियमानुसार येथे कोणत्याही बांधकामाला परवानगी नसतानाही, भूमाफियांनी कांदळवनाची कत्तल करून येथे बेकायदेशीर वस्त्या वसवल्या आहेत. कमलेश गुप्ता नावाच्या व्यक्तीने येथे अवैधरित्या झोपड्या बांधून गरिबांकडून अव्वाच्या सव्वा भाडे उकळले, तसेच बेकायदेशीर बोअरवेल आणि वीज जोडण्याही पुरवल्या होत्या. तब्बल २३ सिलेंडरचा स्फोट होणे, हे या परिसरात चालणाऱ्या मोठ्या अवैध धंद्यांचे जिवंत उदाहरण आहे.या भीषण परिस्थितीवर संताप व्यक्त करत मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त आणि स्थानिक तहसीलदार यांची कडक शब्दांत कानउघडणी केली.”वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने या अवैध बांधकामांकडे दुर्लक्ष का केले? अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच आज तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याला सर्वस्वी जबाबदार इथले प्रशासन आहे,” अशा शब्दांत सरनाईक यांनी आपला रोष व्यक्त केला. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आणि तात्काळ सर्व अवैध वस्त्यांवर बुलडोझर फिरवण्याचे निर्देश दिले आहेत.या दुर्घटनेत मृत पावलेले व्यक्ती हे पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशचे असल्याचे प्राथमिक दर्शनी दिसत असले तरी, ते बांगलादेशी घुसखोर किंवा रोहिंगे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मीरा-भाईंदर शहरात वाढणारी ही घुसखोरी सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असून, पोलिसांनी अशा बेकायदेशीर झोपडपट्ट्यांची झाडाझडती घेऊन घुसखोरांवर तात्काळ कारवाई करावी, अशा कडक सूचना मंत्री सरनाईक यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.

कर्जत-जामखेड मध्ये डिजिटल शैक्षणिक क्रांती

मुंबई,  (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास आणि त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आपल्या स्थानिक विकासनिधीतून कर्जत आणि जामखेड…

महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्म द्विशताब्दीवर्षाचा शुभारंभ

विधान भवनात अभिवादन मुंबई, (प्रतिनिधी ) : महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्म द्विशताब्दीवर्ष प्रारंभानिमित्त आज शनिवार, ११ एप्रिल, २०२६ रोजी विधान भवन येथे त्यांच्या प्रतिमेस विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव  शिवदर्शन साठ्ये व उप सचिव  विजय कोमटवार, उपसभापतींचे खाजगी सचिव अविनाश रणखांब, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक आणि जनसंपर्क अधिकारी  निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

 महिलांच्या सुयोग्य सहभागाने सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास शक्य

मुंबई: व्यापार, पर्यटन, शहरीकरण, पर्यावरण आणि सागरी संपर्क या क्षेत्रांत महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या तीन राज्यांचा समावेश असलेल्या विभाग –७ साठी विकास आणि व्यापारवृध्दीच्या दृष्टीने अनेक संधी आहेत. विकासाच्या संकल्पनेत लिंगसमानता आणि महिला  सक्षमीकरण केंद्रस्थानी असणे अत्यावश्यक आहे. या पाचही क्षेत्रांमध्ये महिलांच्या सुयोग्य सहभागाने सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास शक्य होईल, असे मत महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या  महाराष्ट्र – गोवा – गुजरात या विभाग –७ च्या पणजी येथे आयोजित वार्षिक परिषदेमध्ये “व्यापार, पर्यटन, नागरीकरण, पर्यावरण, तटीय संपर्कयंत्रणा यासाठी क्षेत्रीय प्राधान्यक्रम” या विषयावर त्या बोलत होत्या. लोकसभा अध्यक्ष  ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली ९ व १० एप्रिल, २०२६ रोजी ही परिषद पणजी येथे आयोजित करण्यात आली असून त्यास राज्यसभेचे उप सभापती  हरिवंश सिंह, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णा बनसोडे, महाराष्ट्रासह राज्यविधानमंडळांचे सदस्य उपस्थित आहेत. गोवा विधानसभेचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही या परिषदेत आपले महत्वपूर्ण विचार मांडले. व्यापार क्षेत्राबाबत, महाराष्ट्र आणि गुजरात हे औद्योगिक इंजिन असून गोवा सेवा, पर्यटन क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावतो, असे सांगत त्यांनी अंतर्गत व्यापार मजबूत करण्यावर भर दिला. सूक्ष्म, लघु उद्योगांमध्ये महिलांचा मोठा वाटा असून, त्यांना औपचारिक अर्थव्यवस्थेत आणण्यासाठी तांत्रिक साधने आणि आर्थिक साक्षरता प्राप्त करुन देण्याची गरज आहे. मत्स्यव्यवसाय आणि पारंपरिक उद्योगांमध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. पर्यटन क्षेत्रात महिलाच संस्कृतीच्या प्रमुख संवाहक असल्याचे नमूद करत त्यांनी महिला नेतृत्वाखालील होम-स्टे, सहकारी संस्था आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली. सुरक्षित आणि सन्मानजनक पर्यटन वातावरण निर्माण करणे ही राज्यांची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. शहरीकरणाच्या संदर्भात, वाढत्या शहरांमध्ये महिलांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक आहे. महिला-अनुकूल अशी सुरक्षित सार्वजनिक वाहतूक, प्रकाश व्यवस्था, स्वच्छतागृहे सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाव्यात. पर्यावरण आणि सागरी संपर्काबाबत, विकास आणि पर्यावरण यामध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे. महिलांना स्थानिक पर्यावरण समित्या आणि सागरी मंडळांमध्ये सहभागी करून घ्यायला हवे. त्या पर्यावरण संवर्धनात प्रभावी भूमिका बजावू शकतात, याकडे उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लक्ष वेधले. विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी बोलतांना पुढे सांगितले की विकास प्रक्रियेत ग्रामीण भागातील महिला, आदिवासी समाज, लघु – मध्यम क्षेत्रातील व्यापारी आणि असंघटित कामगार यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. संसदीय यंत्रणेमार्फत योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करता येईल. नारी शक्ती वंदन अधिनियमामुळे महिलांचे प्रतिनिधित्व वाढणार असल्याच्या पार्श्वभूमीवर, महिलांकडे केवळ संख्यात्मक नव्हे तर निर्णयक्षम गुणात्मक नेतृत्व देण्याची आवश्यकता आहे. विभाग –७ चा विकास करताना समता, पर्यावरण संरक्षण आणि सर्वसमावेशकता या मूल्यांना प्राधान्य देण्यात यावे. महिला नेतृत्वामुळे समाजाची सर्वांगीण प्रगती होत असते, हा मुद्या त्यांनी आपल्या भाषणात अधोरेखीत केला.

 प्रशांत – समृद्धीला अग्र मानांकन

 राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने ६० वी सिनियर महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा २०२६-२०२७ , १३ ते १६ एप्रिल २०२६ दरम्यान नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन, सेक्टर १-ए,…

ठाणेची ५ सुवर्ण, ४ रौप्यांसह एकूण ९ पदकांची दिमाखदार कमाई!

राज्य अजिंक्यपद खुली बॅडमिंटन स्पर्धा ऋषिकेश जोगळेकर, विनय पाटील, मृणाल पोद्दार चमकले! मुंबई येथील पवई येथील आय आय टी येथील बॅडमिंटन कोर्टावर ३ एप्रिल ते ५ एप्रिल २०२६ दरम्यान पार पडलेल्या आवाहन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करत तब्बल ५ सुवर्ण व ४ रौप्य पदकांसह एकूण ९ पदकांची कमाई केली. विविध गटांमध्ये ठाण्याच्या खेळाडूंनी केलेला दमदार खेळ, जिद्द आणि सातत्यपूर्ण कामगिरी यामुळे संपूर्ण स्पर्धेत ठाण्याचा दबदबा पाहायला मिळाला. ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडांगणातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल येथे सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेअंतर्गत चालणाऱ्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीतील खेळाडूंनी या स्पर्धेत आपली छाप उमटवत उच्च दर्जाच्या खेळाचे प्रदर्शन केले. मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशिक्षक मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, मितेश हाजीरनिस, तसेच इतर सहाय्यक प्रशिक्षकांच्या सहकार्याने खेळाडूंनी ही यशस्वी कामगिरी साकारली. पुरुष एकेरी गटात विनय पाटीलने उत्कृष्ट खेळ करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. सुरुवातीच्या फेरीत शारविल तेंबुळकरला १५-३, १५-८ अशा सहज पराभूत केले. उपांत्यपूर्व फेरीत राफेल मस्कारेनहासला १५-१०, १५-७ अशा सरळ सेटमध्ये हरवले. उपांत्य फेरीत ऋतुराज चिपटविरुद्ध २१-१९, २१-१० असा प्रभावी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात माजी ठाणे अकॅडमीच्या वरिष्ठ खेळाडूविरुद्ध पराभव पत्करावा लागला आणि रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पुरुष दुहेरी गटात नव्याने तयार झालेल्या ऋषिकेश जोगळेकर व विनय पाटील या जोडीने सर्वांना आश्चर्यचकित करत सुवर्ण पदक पटकावले. १६ फेरीत अथर्व बागवे व प्रथमेश कांबळे यांना १५-६, १५-४ अशा सहज पराभूत करत सुरुवात केली. उपांत्यपूर्व फेरीत सोहम फाटक व तेजस प्रभुदेसाई यांच्याविरुद्ध १०-१५, १५-१२, १५-१३ असा थरारक विजय मिळवला. उपांत्य फेरीत ठाणे अकॅडमीच्याच माजी वरिष्ठ खेळाडू कृष्ण देसाई व पार्थिव नायर या जोडीविरुद्ध १८-२१, २४-२२, २१-१८ अशा दीर्घ आणि उत्कंठावर्धक सामन्यात विजय मिळवत सर्वांना थक्क केले. अंतिम फेरीत आर्यन वर्मा व कृष्णा मजेठिया या जोडीवर २१-१८, २१-१६ असा विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावले. महिला दुहेरी गटात मृणाल पोतदार हिने आपल्या जोडीदारासह उत्कृष्ट खेळ करत सुवर्ण पदक जिंकले. अंतिम फेरीत ठाणे अकॅडमीच्या अनुभवी जोडी अनामिका सिंग व अनघा करंदीकर यांच्यावर २१-१९, १७-२१, २१-१६ अशा चुरशीच्या सामन्यात विजय मिळवत विजेतेपद पटकावले. मिश्र दुहेरी गटात सर्वेश यादव व अनामिका सिंग या जोडीने सुवर्ण पदक जिंकत ठाण्याच्या यशात भर घातली. अंतिम फेरीत त्यांनी कडव्या प्रतिस्पर्ध्यांवर १७-२१, २१-१७, २१-१९ असा थरारक विजय मिळवत विजेतेपद मिळवले. या यशाबद्दल मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी आनंद व्यक्त करत सांगितले की, “या स्पर्धेत आमच्या खेळाडूंनी दाखवलेली कामगिरी ही त्यांच्या सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि खेळावरील निष्ठेचे फलित आहे. विशेषतः नव्या जोड्यांनी दिलेली कामगिरी आशादायक आहे आणि भविष्यात ते मोठ्या स्तरावर नक्कीच चमकतील.” ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपायुक्त मीनल पलांडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करत सांगितले की, “ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे खेळाडू सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत ठाण्याचे नाव उंचावत आहेत. या यशामुळे इतर खेळाडूंनाही प्रेरणा मिळेल. सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.” ००००००००

कुमार गट व प्रथम श्रेणी पुरुष गट कबड्डी स्पर्धा

महाड तालुका क्रीडा मंडळ, जय भवानी क्रीडा मंडळ उपांत्य फेरीत मुंबई. . महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ   हनुमान क्रीडा मंडळ कुर्ला, गौरीशंकर क्रीडा मंडळ कुर्ला आणि  कुर्ला क्रीडा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गांधी मैदानात आयोजित केलेल्या  कुमार गट व प्रथम श्रेणी पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत कुमार गटात महाड तालुका क्रीडा मंडळ, जय भवानी क्रीडा मंडळाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.  कुमार गटाच्या उपांत्य पुर्व फेरीच्या सामन्यात  विक्रोळीच्या महाड तालुका क्रीडा मंडळाने    नवशक्ती स्पोर्ट्स अकॅडमी चेंबूरचा ८ गुणांनी पराभव  केला . दुसऱ्या सामन्यात जय भवानी क्रीडा मंडळाने हनुमान क्रीडा मंडळाचा सहज‌ पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला इतर सामन्यात  बालवीर स्पोर्ट्स क्लबने ट्रान्सपोर्ट क्लब घाटकोपरचा १६  गुणांनी आरामात पराभव केला. तर भानवे अकॅडमी विरुद्ध पार्ले महोत्सव यांच्यात झालेल्या सामन्यात भानवे अकॅडमीने पार्ले महोत्सवांचा अवघ्या ३ गुणांनी पराभव केला. प्रथम श्रेणी पुरुष गटाच्या सामन्यात सन्मित्र क्रीडा मंडळ घाटकोपर व चेंबूर क्रीडा मंडळ यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली  विश्रांतीला दोन्ही संघाचे ९-९ असे समान गुण होते. सन्मित्र क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी निकराचा प्रयत्न करत चेंबूर क्रीडा केंद्राला जोरदार लढत‌ दिली.पण अखेर चेंबूर संघाने २ गुणांनी बाजी मारली. सन्मित्र क्रीडा मंडळचा अजिंक्य जाधवने   तर चेंबूर क्रीडा केंद्राकडून गुफ्रानने चांगला खेळ केला. ०००००००

एमजीएसएम आंतर महाविद्यालयीन टी -२०  क्रिकेट स्पर्धा

धनश्री वाघमारेचे नाबाद अर्धशतक मुंबई : सलामीची फलंदाज धनश्री वाघमारेने केलेल्या दोन महत्वपूर्ण भागीदारी आणि नाबाद अर्धशतकी खेळीमुळे रमणीरंजन झुनझुनवाला महाविद्यालयाने महर्षी दयानंद महाविद्यालयाचा ३७ धावांनी पराभव करत एमजीएसएम आंतर महाविद्यालयीन टी -२० क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली. प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १३७ धावा उभारल्यावर रमणीरंजन झुनझुनवाला महाविद्यालयाने प्रतिस्पर्ध्यांना १०० धावांवर रोखत स्पर्धेच्या पुढल्या फेरीत स्थान मिळवले. या सामन्यात धनश्रीने आपल्या ५१ धावांच्या नाबाद खेळीसह सलामीची जोडीदार सृष्टी नाईक आणि किमया राणेसोबत संघाला आश्वासक अशा भागीदारी रचल्या. पहिल्या गड्यासाठी धनश्रीने सृष्टीच्या साथीने अर्धशतकी ६७ धावांची भागीदारी केली. नंतर किमयाला हाताशी घेऊन ४३ धावांची भागीदारी केली. सृष्टीने ३४ आणि किमयाने ४७ धावांचे योगदान दिले. महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या प्रियदर्शनी सिंगने दोन फलंदाज बाद केले. विजयासाठी धावांचा पाठलाग करणाऱ्या महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या अलिना मुल्लाचा अपवाद वगळता त्यांच्या इतर फलंदाजांना मोठ्या खेळी करता आल्या नाहीत. अलिनाने ३३, ईश्वरी खत्रीने नाबाद १४ आणि मेहेक पटेलने १७ धावा केल्या. झुनझुनवाला महाविद्यालयाच्या दिक्षा पवारने तीन, अदिती सुर्वे आणि वैष्णवी पाटीलने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. संक्षिप्त धावफलक : रमणीरंजन झुनझुनवाला महाविद्यालय – २० षटकांत ४ बाद १३७ ( धनश्री वाघमारे नाबाद ५१, सृष्टी नाईक ३४, किमया राणे २७, प्रियदर्शनी सिंग ४-२५-२) विजयी विरुद्ध महर्षी दयानंद महाविद्यालय : २० षटकात ९ बाद १००( अलिना मुल्ला ३३, ईश्वरी खत्री नाबाद १४, मेहेक पटेल १७, दिक्षा पवार ४-२०-३, अदिती सुर्वे ४-१७-२, वैष्णवी पाटील २-५-२). ०००००००००

दुसऱ्या मानांकित सामंतला हरवून वर्तक उपांत्य फेरीत

जी. डी. बिर्ला स्मृती मास्टर्स आंतर-क्लब बॅडमिंटन स्पर्धा मुंबई: बॅडमिंटन गुरुकुल आयोजित जी. डी. बिर्ला स्मृती मास्टर्स आंतर-क्लब बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्या मानांकित राजन सामंतवर तीन गेममध्ये विजय मिळवून कौशिक वर्तकने…

 कळंब येथे महाराजस्व समाधान शिबिर संपन्न

 तहसीलदार धनंजय जाधव आणि उप अधिक्षक भूमि अभिलेख नितिन आटाळे यांची प्रमुख उपस्थिती कर्जत : (अशोक गायकवाड) महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१’ अंतर्गत शुक्रवार, १० एप्रिलला महसूल मंडळ कळंब अंतर्गत प्रगती माध्यमिक विद्यालय कळंब येथे महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला रायगड जिल्हा समाजकल्याण सभापती नारायण डामसे, पंचायत समिती सदस्य रेश्मा जोशी, तहसीलदार धनंजय जाधव, उप अधिक्षक भूमि अभिलेख नितिन आटाळे, निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मंडळ अधिकारी कळंब, संतोष जांभळे यांनी केले . यावेळी नागरिक, महिला, शेतकरी, विद्यार्थी तसेच मंडळ कळंब अंतर्गत ग्राम महसुल अधिकारी निलेश पवार, मोहिनी भडांगे, आकाश निकाळे, रणजीत कोळेकर, शशिकांत हुलगुंडे, दर्शना कांबळे, तहसील व भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नागरिकांच्या महसूल व इतर शासकीय सेवांशी संबंधित प्रश्नांचा तात्काळ निपटारा करण्यावर भर देण्यात आला. शिबिरामध्ये नागरिकांना ७/१२ उतारे, ८-अ उतारे तसेच विविध दाखले यांचे वितरण करण्यात आले. याशिवाय ७/१२ अद्यावत करणे, ई-मोजणी, पाणंद रस्त्यांबाबत कार्यवाही, अभिलेख दुरुस्ती हेल्पडेस्क, अकृषिक सुधारणा मार्गदर्शन, पीएम किसान योजना, दुय्यम शिधापत्रिका वाटप, प्रलंबित फेरफार निकाली काढणे, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत कार्यवाही, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ, आरोग्य तपासणी, मोफत डिजिटल सातबारा, वनपट्ट्यावर सातबारा नावे नोंद करणे, लक्ष्मी मुक्ती योजना, प्रॉपर्टी कार्ड आदी विविध सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. या शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाशी संबंधित अनेक प्रलंबित कामांचा जलदगतीने निपटारा होत असून शासनाच्या “एका दिवसात डिलिव्हरी सेवा” उपक्रमामुळे नागरिकांना शासकीय सेवा सुलभ व पारदर्शक पद्धतीने मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. शासनाचा हा उपक्रम सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. ०००००