Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

मॉडेल इंग्लिश हायस्कूलमध्ये भीम जयंती उत्साहात साजरी

मॉडेल इंग्लिश हायस्कूलमध्ये भीम जयंती उत्साहात साजरी भव्य रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन कल्याण: कल्याण पूर्वेतील द ईस्ट कल्याण वेलफेअर संचलित मॉडेल इंग्लिश हायस्कूल आणि मॉडेल कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराने संपूर्ण परिसर भीममय झाला होता. जयंती उत्सवाची सुरुवात माता रमाबाई चौक, सिद्धार्थ नगर ते कोळसेवाडी येथील मॉडेल शाळेपर्यंत काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने झाली. या रॅलीमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीचे मुख्य आकर्षण शिस्तबद्धता आणि विद्यार्थ्यांचा उत्साह हे होते. रॅली शाळेच्या प्रांगणात पोहोचल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून पुढील कार्यक्रमांना सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. मंचावरील मान्यवर आणि शिक्षकांनी आपल्या भाषणांतून डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची प्रासंगिकता स्पष्ट केली आणि उपस्थित विद्यार्थी व पालकांना त्यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. तसेच, बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित एक माहितीपटही यावेळी दाखवण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या अंगभूत कलागुणांचे दर्शन घडवत विविध भीमगीते सादर केली. बाबासाहेबांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित नाट्यप्रयोगांनी उपस्थितांची मने जिंकली. विशेषतः भीमगीतांवर आधारित नृत्याविष्कारांनी कार्यक्रमात रंगत आणली, ज्याला पालकांनी भरभरून दाद दिली. शाळेचे समन्वयक सूर्यकांत तांबोळी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, केवळ शालेय शिक्षण न देता विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि संस्कृतीची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ महोत्सव, विज्ञान प्रदर्शने, विविध सण उत्सवासह सर्व महापुरुषांची जयंती साजरी केली जाते. यात पालक आणि शिक्षकही तितक्याच आनंदाने सहभागी होतात. पुढील वर्षी शाळेचा सुवर्ण महोत्सव असल्याने आणखीन जोरदार कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचेही तांबोळी म्हणाले. या सोहळ्याला संस्थेचे पदाधिकारी भगवान भोईर, बी.जी. उन्नीथन, के.व्ही. सुर्वे, नरेंद्र सूर्यवंशी, आनंद नायर, दत्ता गायकवाड तसेच मुख्याध्यापिका शशिकला चव्हाण, शिरीन गोंसालवेझ, ममता भट्टाचार्य, कल्याणी अधारी, संगीता तांबोळी यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय प्रगती अशक्य – संदीप गोवळकर

वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय प्रगती अशक्य – संदीप गोवळकर ठाणे : आपण विज्ञानाने निर्माण केलेल्या आधुनिक साधनांचा वापर करतो; पण वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्यास मात्र टाळाटाळ करतो. हाच विरोधाभास अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहे. अंधश्रद्धेच्या विळख्यातून समाजाला मुक्त करायचे असेल, तर विज्ञानाचा प्रचार व प्रसार करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिप्रादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव संदीप गोवळकर यांनी केले. क्राऊड बुद्धिस्ट कम्युनिटी, लोढा माजिवडा,ठाणे यांच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष जयवंत गायकवाड, उपाध्यक्ष प्रतीक पवार, सुभाष आचालखांब, सचिव निलेश गरुड, सहसचिव प्रवीण धुतराज, खजिनदार दीपक जाधव, सहखजिनदार निलेश निरभवणे, सल्लागार रवींद्र जाधव, महेंद्र नाकते, सदस्य सुनील माने, भत्ते लघु पवार सोसायटी नागरिक उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अंनिसचे संदीप गोवळकर म्‍हणाले की, भारतीय राज्यघटनेतील कलम ५१ नुसार प्रत्येक नागरिकाला वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती जोपासण्याची जबाबदारी देते. पण प्रत्यक्षात समाजात याच्या अगदी उलट चित्र दिसते. अंधश्रद्धा, चमत्कारांचे दावे आणि अवैज्ञानिक समजुती आजही मोठ्या प्रमाणावर टिकून आहेत.वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कुठल्याही घटनेमागील कारण शोधण्याची वृत्ती. जेवढा पुरावा, तेवढाच विश्वास  ही त्याची भूमिका. निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि प्रयोग या मार्गांनीच सत्य समजून घेता येते. कोणी मोठी व्यक्ती सांगते म्हणून ते सत्य मानणे, किंवा एखाद्या ग्रंथात लिहिले आहे म्हणून त्याची चिकित्सा न करणे ही गुलाम मानसिकता आहे.चमत्कार हे वास्तव नसतात; ते हातचलाखी किंवा अज्ञानाचा फायदा घेणारी फसवणूक असते. प्रत्येक घटनेमागे कारण असतेच. ‘चमत्कार’ हा शब्दच माणसाला विचार करणे थांबवायला भाग पाडतो. मानवाची आजवरची सर्व प्रगती ही विज्ञानामुळेच झाली आहे. विज्ञान नम्र आहे, बदल स्वीकारते आणि स्वतःची चूकही मान्य करते. पण धर्म अंतिम सत्याचा दावा करतो  हीच मोठी समस्या आहे.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना मंडळाचे अध्यक्ष जयवंत गायकवाड म्हणाले की, बाबासाहेबांनी बालपणापासूनच अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करत शिक्षणाच्या जोरावर स्वतःला घडवले. जातीय भेदभाव, सामाजिक अन्याय आणि उपेक्षा यांना न जुमानता त्यांनी ज्ञान, परिश्रम आणि चिकाटीच्या बळावर इतिहास घडवला.बाबासाहेबांचा संघर्ष हा केवळ वैयक्तिक नव्हता, तर तो संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी होता. त्यांनी समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांच्या या संघर्षातून आजच्या पिढीने प्रेरणा घेऊन अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन प्रतीक पवार यांनी केले.

ठाणे जिल्ह्यात जवळपास २ हजार रुग्णांना सुमारे २१. ७४ कोटींची मदत

ठाणे जिल्ह्यात जवळपास २ हजार रुग्णांना सुमारे २१. ७४ कोटींची मदत अनिल ठाणेकर ठाणे,शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे.  ठाणे जिल्ह्यात आर्थिक वर्षात २ हजार ५१४ रुग्णांना सुमारे २१ कोटी ७४ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आले. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रूग्णालय, धर्मादाय रूग्णालय, संस्था, दाते आदींच्या सहकार्य लाभत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग वाढला आहे. परिणामी, अधिकाधिक पात्र गरजू रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य उपलब्ध होत आहे. कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्ष २ ते ६), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, हाताचे, गुडघ्याचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान बालकांची शस्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायालिसिस, कर्करोग (केमोथेरपी / रेडिएशन), अस्थिबंधन, नवजात शिशुंचे आजार, बर्न (भाजलेले) रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण या अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी आर्थसहाय्य दिले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन व टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत उपचारांसाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. आर्थिक अडचणी कमी होऊन गरजू बालकांना गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार सुलभ होणार आहेत. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील तब्बल ४० हजार ७७६ रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. तर, याच कालावधीत ठाणे  जिल्ह्यातील २५१४ रुग्णांना सुमारे २१  कोटी ७४ लाख ५० हजार  रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या जिल्हा कक्ष, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, सामंजस्य करार आदीमुळे रूग्णांना वेळेत अर्थसहाय्य होत आहे. गरजू रूग्णांनी योजनेचा लाभ घेण्याकरिता आणि अधिक माहितीकरिता १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

दिव्यात गॅस सिलेंडर घोटाळा?

दिव्यात गॅस सिलेंडर घोटाळा? श्रद्धा गॅस एजन्सीवर फसवणुकीचे आरोप आरती परब दिवा : आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशभरात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असताना, दिवा शहरात मात्र कृत्रिम तुटवडा निर्माण करून काळ्या बाजाराचा संशय व्यक्त केला जात आहे. एचपी गॅसचा पुरवठा करणाऱ्या श्रद्धा गॅस एजन्सीविरोधात नागरिकांनी गंभीर तक्रारी केल्या आहेत. दिव्यातील अनेक ग्राहकांनी सिलेंडरसाठी आगाऊ बुकिंग करूनही त्यांना वेळेवर गॅस मिळत नसल्याची तक्रार आहे. विशेष म्हणजे, सिलेंडर बुक केल्यानंतर डिलिव्हरी झाल्याचे ओटीपी प्राप्त होऊन २५ ते ३० दिवस उलटूनही प्रत्यक्षात सिलेंडर मिळालेले नाहीत, असा आरोप करण्यात येत आहे. तक्रारींबाबत एजन्सीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, श्रद्धा गॅस एजन्सीने दिवा व डोंबिवली येथील आपली कार्यालये बंद ठेवली असून कोणताही प्रतिसाद दिला जात नसल्याचे समोर आले आहे. तसेच एचपी गॅस कंपनीच्या सेल्स ऑफिसर चित्रा नायर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्नही निष्फळ ठरल्याचे दिवा मनसेचे शहर सचिव प्रशांत गावडे यांनी सांगितले. या प्रकरणी संबंधित गॅस एजन्सीकडून नागरिकांची फसवणूक होत असल्याचा आरोप करत, Essential Commodities Act अंतर्गत कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. यासाठी तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली. दरम्यान, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

नाशिक कुंभभेळ्यासाठी २५०० जादा बसेस धावणार

नाशिक कुंभभेळ्यासाठी २५०० जादा बसेस धावणार हरिभाऊ लाखे नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार आहे. २०२६-२०२७ या वर्षी नाशिक तसेच त्र्यंबकेश्वर या ठिकाणी विविध धार्मिक विधीसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने नियमित बससेवेव्यतिरिक्त दोन हजार ५०० पेक्षा अधिक बससेवेचे नियोजन करण्यात येत आहे. कुंभमेळ्यासाठी देशाच्या विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येणार आहेत. कुंभपर्वात पर्वणींना अधिक महत्व असते. भाविकांची संख्या प्रत्येक पर्वणीला २० लाखांहून अधिक राहण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. येणारे भाविक खासगी वाहनाने, रेल्वे तसेच बसने येतील. या अनुषंगाने राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बाहेर गावहून येणाऱ्या भाविक तसेच पर्यटकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. महामंडळाच्या ताफ्यात या काळात जिल्ह्यातील विविध आगारासह राज्याच्या वेगवेगळ्या भागातून दोन हजार ५०० जादा बस मागविण्यात येणार आहेत. या बस चालविण्यासाठी २० हजारांहून अधिक कर्मचारी सेवा बजावणार आहेत. नाशिक तसेच त्र्यंबकमध्ये पर्यटक तसेच भाविक खासगी वाहनांनी दाखल झाल्यास मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन बाहेरगावाहून येणारी खासगी वाहने तसेच महामंडळाच्या बस या थेट त्र्यंबक तसेच नाशिकमध्ये दाखल न होऊ देता ती बाहेर कुठे थांबविता यावीत, यासाठी वाहनतळाचे नियोजन सुरू आहे. राज्य परिवहन महामंडळ, नाशिक महानगरपालिका, पोलीस विभाग, त्र्यंबक नगर परिषद, नाशिक प्राधिकरण, कुंभमेळा आयुक्त यांच्या वतीने सध्या नाशिक तसेच त्र्यंबक या ठिकाणी खासगी वाहने कुठे उभी करता येतील, यासंदर्भात तसेच वाहनातून उतरलेल्या पर्यटकांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून अमृत स्नानासाठी घाट परिसरात ने-आण करण्याची व्यवस्था याचे नियोजन सुरू आहे. या वाहनांमुळे शहर परिसरासह त्र्यंबक नगरीत वाहतूक कोंडी होऊ नये, याकरीता नियोजनावर भर देण्यात येत आहे. दरम्यान, महामंडळाच्या वतीने २० हजार कर्मचाऱ्यांसाठी वेगववेगळ्या मंगल कार्यालय, लॉन्स यासह अन्य ठिकाणी व्यवस्था करण्यात येणार आहे. मागील कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कुंभ पर्वणीसाठी येणाऱ्या बसेस, खाजगी वाहने पहिने नजीक थांबवल्या जात होत्या. तेथुन राज्य परिवहन महामंडळाच्या बस या काही विशिष्ट अंतरावर भाविकांना सोडत. एक किलोमीटर अंतर पायी चालावे लागत हाेते. नाशिक मध्येही याच धर्तीवर नियोजन होते. यंदा भाविकांची तसेच पर्यटकांची पायपीट थांबवण्यासाठी प्रशासन काय करत या कडे सर्वांचे लक्ष आहे.

अलविदा आशाताई…सुरांचा ‘साज’ पंचतत्वात विलीन

अलविदा आशाताई…सुरांचा ‘साज’ पंचतत्वात विलीन स्लग – उरले उरात काही आवाज चांदण्यांचे, आकाश तारकांचे उचलून रात गेली स्वाती घोसाळकर मुंबई : उरले उरात काही आवाज चांदण्यांचे , आकाश तारकांचे उचलून रात गेली या केव्हातरी…

वराह पालन योजनेला सरकारची अखेर मंजूरी

वराह पालन योजनेला सरकारची अखेर मंजूरी   मुंबई : राज्य सरकारकडून वराह पालनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वराह पालनासंदर्भात भाजप आमदार गोपीचंद पडळकर  आणि मंत्री नितेश राणे यांनी पाठपुरावा केला…

चैत्यभूमीवरील अभिवादनासाठी  प्रशासन सज्ज

चैत्यभूमीवरील अभिवादनासाठी  प्रशासन सज्ज मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमीवरीस अभिवादनासाठी येणाऱ्या लाखो अनुयायांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र प्रशासन,  मुंबई महापालिका व पोलिस प्रशासन पूर्णतः सज्ज आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे चैत्यभूमीवर अभिवादनासाठी उपस्थित राहणार आहेत. चैत्यभूमी परिसरात नागरी सुविधा पुरविण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. जी/उत्तर विभागातर्फे चैत्यभूमी, शिवाजी पार्क व आसपासच्या परिसरात सुरक्षा, आरोग्य आणि स्वच्छतेची व्यापक तयारी करण्यात आली असून संपूर्ण यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून उंच टेहळणी मनोरेही उभारले आहेत. याशिवाय ३२ सीसीटीव्ही कॅमेरे, २० मेटल डिटेक्टर आणि ३० हँडहेल्ड मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत. उन्हापासून संरक्षणासाठी अनुयायांसाठी सुमारे ५०० मीटर अंतरावर दुतर्फा पडदे लावण्यात आले आहेत. आरोग्य सेवांसाठी ३० वैद्यकीय अधिकारी आणि ७० सहाय्यक कर्मचारी तीन शिफ्टमध्ये कार्यरत राहणार असून पाच रुग्णवाहिका, एक अतिदक्षता रुग्णवाहिका तसेच दादर चौपाटीवर सुरक्षेसाठी रेस्क्यू बोटही सज्ज ठेवण्यात आली आहे.

“सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम” निमित्त विशेष मोहिमेचे आयोजन

“सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम” निमित्त विशेष मोहिमेचे आयोजन जयंत चाचरकर यांची माहिती अशोक गायकवाड अलिबाग : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी राज्यात ‘सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम’ ही विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्यानुंषगाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून १४ एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात “सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम” ही विशेष मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती रायगड जयंत चाचरकर यांनी दिली आहे. इ. ११ वी व १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या तसेच अभियांत्रिकी पदविका शिक्षण घेत असलेल्या व पुढील उच्च शिक्षणाकरिता व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्याने बऱ्याचदा मागासवर्गीय विद्यार्थ्यास प्रवेशापासून वंचित राहण्याची परिस्थिती उद्भवते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर असा बिकट प्रसंग येऊ नये व त्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र मिळावे याकरिता जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यापासून वंचित राहू नये. यास्तव ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केलेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी ज्या जिल्ह्यातून जात प्रमाणपत्र मिळवले आहे त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्वरीत अर्ज सादर करावेत. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत परंतु अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही अशा विद्यार्थ्यांनी समिती कार्यालयात हजर राहून त्रुटींची पूर्तता करावी

कल्याण मुरबाड मार्गावर भीषण अपघात

कल्याण मुरबाड मार्गावर भीषण अपघात इकोची सिमेंट मिक्सरला धडक, भीषण अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू कल्याण : कल्याण मुरबाड मार्गावर काळजाचा थरकाप उडवणारी घटना सोमवारी घडली. एक सिमेंट मिक्सर आणि काळी-पिवळी इको टॅक्सी यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, इको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून गाडीचा सांगाडा ओळखणेही कठीण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रायते पुलावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या इको गाडीचा सकाळी ८.३० च्या सुमारास अपघात झाला. गाडीतील सर्व ११ प्रवाशांचा मृत्यू झाला त्यामध्ये ८ पुरुष व ३ महिलांचा समावेश असून मृतदेह गोवेली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आली. प्रवाशांनी भरलेली इको कार मार्गावरून जात असताना समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सरने तिला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारमधील प्रवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. या कारमध्ये एकूण 1२ प्रवासी होते, त्यापैकी 11 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली. एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. चक्काचूर झालेल्या कारमधून मृतदेह बाहेर काढण्याचे काम स्थानिकांनी अत्यंत जड अंतःकरणाने केले. टिटवाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला? चालकाचा ताबा सुटला की वेगाचा अतिरेक नडला? हे अद्याप समजू शकलेले नाही. टिटवाळा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला होता. या मृतांमध्ये प्रशांत उर्फ बबलू रुपेश चंदने, वय २1 वर्ष, देवगाव मुरबाड, भूषण घोरपडे, वय ४९ वर्ष, अंधेरी मुंबई. तहसीलदार कार्यालय मुरबाड या कार्यालयात महसूल सहाय्यक, जिजा गोविंदा केंबारी, वय ५० वर्ष, टेंभरे मुरबाड, अनंता पवार, साखरे मुरबाड, दीपक गवळी, राहणार कल्याण, गणपत जैनू मधे, वय ३२ वर्ष, देवराळवाडी मुरबाड, स्नेहा मोहपे, वय अंदाजे २२ वर्ष, मानसी मोहपे, वय अंदाजे २० वर्ष, प्रथमेश मोहपे, वय अंदाजे 1७ वर्ष हे तिघेही एकाच कुटुंबातील  नारायणगाव मुरबाड येथील आहेत. तर अन्य दोन व्यक्तींची ओळख पटवणे सुरू आहे. कल्याण मुरबाड अहिल्यानगर मार्गावर सकाळी रायते परिसरात झालेल्या अपघतात प्राथमिक माहिती नुसार नऊ प्रवासी मृत्यूमुखी झाले आहेत. या अपघातातील इको संर्वगातील वाहनाची सर्व कागदपत्रे वैध्य आहेत, आरटीओ इनस्पेक्टर यांनी घटनास्थळी पोहचत माहिती घेऊन याबाबत सविस्तर अवहाल तयार करणार आहोत. अनधिकृत प्रवासी वाहतूक, अवजड वाहनांची वर्दळ बाबत आरोप असल्याच्या बाबत अवैध वाहतूक संदर्भात आरटीओकडून कारवाई केली जाते अशी प्रतिक्रिया कल्याण उप प्रादेशिक अधिकारी अशुतोष बारकुल यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. तर रायते येथील महामार्गावर झालेल्या भीषण अपघाता संदर्भात, रायते येथील ग्रामस्थ संतोष सुरोशी यांनी प्रतिक्रिया दिली की, रायते, पिंपळोली ग्रामस्थांनी रस्त्या संदर्भात निवेदन देखील दिले होते. रस्त्याचे काम अर्धवट असून, दिशा दर्शक फलक लावले नाहीत, वाहतूक सुरु करू नका असे असून देखील मिक्सर अवजड वाहनांची होणारी वाहतूक पाहता आरटीओचे नियंत्रण नाही यामुळेच आजच्या या भीषण अपघातात निष्पाप लोकांचे बळी गेले असल्याचा आरोप करत  शासनाचा  धिक्कार करतो अशी संतप्त प्रतिक्रिया संतोष सुरोशी यांनी दिली. तर एनएच ६१ महामार्गावर रायते येथे इको आणि मिक्सर या वाहनांच्या अपघाततील इको मधील प्रवाशांचे मृतदेह गोवेली शासकीय रूग्णालयात आणले असून ११ मृतदेह असल्याची प्रतिक्रिया कल्याण ग्रामीण डीवायएसपी अनिल लाड यांनी दिली.