Month: August 2026

गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे महापालिका कायम कटिबद्ध : शर्मिला पिंपळोलकर

अनिल ठाणेकर | ठाणे भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृती, परंपरा आणि विचारांची ओळख आहे. मातृभाषेवर प्रभुत्व मिळाल्यास व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी बनते आणि इतर भाषांचे ज्ञान आत्मसात करणेही सुलभ…

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक थेरपी सेंटर सुरू

अनिल ठाणेकर ठाणे-जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत समग्र शिक्षा अभियानाच्या समावेशित शिक्षण विभागामार्फत पंचायत समिती भिवंडी मार्फत शेलार येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक बहुउद्देशीय संसाधन कक्ष (थेरपी सेंटर) नव्याने सुरू करण्यात आला.…

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कल्याण तालुका अध्यक्षपदी सोमनाथ मिरकुटे यांची नियुक्ती

कल्याण :  राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कल्याण तालुका अध्यक्षपदी सोमनाथ मिरकुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, प्रदेश सरचिटणीस अविनाश जाधव,जिल्हा अध्यक्ष विधा वेखंडे, माजी…

राज्यातील परिचारिकांचे दोन तास काम बंद आंदोलन

मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी निदर्शने मुंबई, दि. (प्रतिनिधी) : सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिका संवर्गाचे सुधारित सेवा प्रवेश नियम, सुधारित आकृतीबंध ठप्प झालेली पदोन्नती प्रक्रिया या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशन यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत राज्यभर दोन तास काम आंदोलन करून निदर्शने करण्यात आली. सुधारित सेवा प्रवेश नियम अंतिम नसल्यामुळे हजारो परिचारिका पदोन्नती पासून वंचित आहेत सुधारित आकृतीबंधास मान्यता न मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर पदनिर्मिती आणि पदभरती रखडली असून परिचारिका संवर्गावर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे, असे मत संस्थेच्या सल्लागार कमल वायकोळे यांनी व्यक्त केले आहे. रिक्त असलेली पदे त्वरित न भरल्यास तसेच परिचारिकांच्या संवर्गाच्या  रखडलेल्या पदोन्नतीचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बृहन्मुंबई  राज्य सरकारी परिचारिका संघटनेच्या सरचिटणीस कविता ठोंबरे यांनी दिला आहे. सुधारित सेवा प्रवेश नियम तात्काळ अंतिम करावेत; सुधारित आकृतीबंधास त्वरित शासन मान्यता द्यावी; परिचारिका संवर्गातील सर्व प्रलंबित पदोन्नती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी; रिक्त पदावरील  वरील सरळ सेवा भरती त्वरित सुरू करा; परिचारिका संवर्गाच्या सर्व प्रलंबित सेवाविषयक प्रश्नावर कालबद्ध निर्णय घेण्यात यावा अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. परिचारिका संवर्गाच्या या आंदोलनास बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस गणेश बकशेट्टी यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

 कल्याण- शिळफाटा वाहतूक कोंडीवर महत्त्वपूर्ण आढावा बैठक

– अतिक्रमण, बेकायदा पार्किंगवर कारवाईचे निर्देश दिवा, दि. ४ ऑगस्ट (आरती परब): कल्याण- शिळफाटा ते देसाई नाका या परिसरातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कल्याण फाटा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात काल महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. बैठकीत वाहतूक कोंडीची प्रमुख कारणे आणि त्यावरील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांनी डीसीपी शिरसाट यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून वाहतूक कोंडीचा प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना दिल्या. तसेच परिसरातील विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी मांडल्या. त्यानंतर संबंधित अधिकारी आणि प्रशासनाच्या उपस्थितीत ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत वाय जंक्शन ते कल्याण फाटा, कल्याण फाटा ते देसाई नाका तसेच शिळफाटा ते महापे रोड या मार्गांवरील वाहतूक कोंडीची कारणे तपासण्यात आली. अनधिकृत अतिक्रमण, हातगाड्या, फेरीवाले, गॅरेज, हॉटेलसमोरील बेकायदा पार्किंग, सर्व्हिस स्टेशन तसेच महामार्गावर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविणे, कचरा हटविणे आणि वाहतुकीस अडथळा ठरणारे अडसर दूर करण्याबाबत संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. विविध विभागांनी समन्वय साधून तातडीने कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला. यापूर्वीही कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांसोबत वाहतूक नियोजनाबाबत बैठक झाली होती. त्या बैठकीतील निर्णयानुसार प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना सुरू असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. कल्याण-शिळफाटा परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे सातत्याने पाठपुरावा करत असून, प्रशासनाने समन्वयाने काम करून नागरिकांना लवकरात लवकर वाहतूक कोंडीतून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. या बैठकीस माजी उपमहापौर तथा नगरसेवक रमाकांत मढवी, डीसीपी शिरसाट, पोलिस निरीक्षक (पीआय) आहेर, विभागप्रमुख निलेश पाटील, दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे, सचिन भालेराव, कार्यकारी अभियंता अंजुम, मनसेचे शरद पाटील, विनोद वास्कर, साहिल पाटील, बापूराव मुंडे, गणेश मुंडे, रवी पाटील, संतोष पाटील, पंचक्रोशीतील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, स्थानिक नागरिक तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 दिवा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी दिपक जाधव यांची निवड

मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर सत्कार दिवा, दि. ४ ऑगस्ट : ठाणे महानगरपालिकेच्या दिवा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दिपक नामदेव जाधव यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत नागरिकांच्या अपेक्षेनुसार विकास कामांना गती देण्याचा विश्वास व्यक्त केला. या सत्कार समारंभाला कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश गोवर्धन मोरे, आमदार रवी फाटक, ठाण्याच्या महापौर शर्मिलाताई पिंपळकर, मीनाक्षीताई शिंदे तसेच दिवा शहर प्रमुख, नगरसेवक रमाकांत मढवी यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपक जाधव यांचा गौरव करण्यात आला. यावेळी “विश्वासाची ही जबाबदारी, सेवाभावाची ही नवी संधी” या भावनेतून जनतेच्या अपेक्षांना न्याय देत दिवा परिसराच्या विकासाला नवी दिशा देण्याचे आवाहन करण्यात आले. नागरिकाभिमुख प्रशासन, मूलभूत सुविधा आणि प्रभागातील विकासकामांना प्राधान्य देत काम करण्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला. दरम्यान, कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश गोवर्धन मोरे यांनीही दिपक जाधव यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दिवा प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी काम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Heading – सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाला महाराष्ट्राचा सलाम

 इंद्रेश कुमार व पाल्गा रिंपोचे यांचा ५ ऑगस्ट रोजी ‘राष्ट्रीय एकात्मिक समरसता सन्मान सोहळ्या’त गौरव मुंबई | प्रतिनिधी दि-४ ऑगस्ट लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक सिंधू महाकुंभात संपूर्ण देशात राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता, सर्वपंथ समभाव आणि भारतीय सांस्कृतिक ऐक्याचा प्रभावी संदेश दिला. या ऐतिहासिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक व अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार तसेच बौद्ध  आध्यात्मिक धर्मगुरू पाल्गा रिंपोचे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी “राष्ट्रीय एकात्मिक समरसता सन्मान सोहळ्याचे” आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य सन्मान सोहळा महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने आज सायंकाळी ४.०० ते ६.०० या वेळेत सचिवालय जिमखाना, विधान भवन शेजारी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा प्रमुख उपस्थिती म्हणून लाभणार असून, त्यांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. सिंधू महाकुंभाच्या माध्यमातून देशभरात राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि भारतीय संस्कृतीतील विविधतेतून एकतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला. सिंधू नदीच्या पवित्र तीरावर विविध धर्म, पंथ आणि संस्कृतींच्या प्रतिनिधींनी एकत्र येत राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. बौद्ध आध्यात्मिक गुरू पाल्गा रिंपोचे यांच्या हस्ते संपन्न झालेले सिंधू पूजन आणि इंद्रेश कुमार यांच्या दीर्घकालीन प्रयत्नांमुळे या महाकुंभाला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता आणि सर्वपंथ समभावाचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचावा, या उद्देशाने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला  आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनमानसात अधिक दृढ व्हावा, विविध धर्म-पंथांमध्ये परस्पर विश्वास आणि संवाद वाढावा तसेच भारतीय संस्कृतीतील “विविधतेत एकता” हा विचार अधिक बळकट व्हावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा “राष्ट्रीय एकात्मिक समरसता सन्मान सोहळा” महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

उलवेकरांचा पाणीप्रश्न लवकरच संपुष्टात येणार

पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सचिन घरत, सचिन राजेंचा पाठपुरावा राज भंडारी उलवे :उलवे नोडमधील सेक्टर १५ ते १८ मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेली अनेक वर्ष येथील रहिवाशांना सतावत आहे. उलवेकरांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागू नये म्हणून सचिन घरत आणि सचिन राजे येरुणकर यांनी पाठपुरावा करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे आता उलवेमधील पाणीप्रश्न संपुष्टात येणार असल्याचे अश्वासन आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सिद्धिविनायक महागणपती मंदिर, सेक्टर १७, उलवे येथे भव्य जनता दरबाराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या जनता दरबारास गव्हण ग्रामपंचायतचे उपसरपंच सचिन घरत तसेच सचिन राजे येरुणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उलवे नोडमधील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जनता दरबारामध्ये महत्त्वाचा विषय उलवे नोडमधील पाणी टंचाई व पाणीपुरवठ्याची समस्या हा होता. यावेळी सचिन घरत आणि सचिन राजे येरुणकर यांनी सेक्टर १५, १६, १७ व १८ येथील रहिवाशांच्या पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लवकरात लवकर नवीन जलवाहिनी (पाईपलाईन) टाकण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. याशिवाय नागरिकांनी मांडलेल्या विविध नागरी समस्या व अडचणी संयमाने ऐकून घेत, संबंधित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासनही देण्यात आले. या जनता दरबारास सुमारे ६०० रहिवाशांनी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडल्या. अनेक नागरिकांनी आपल्या प्रश्नांचे समाधान झाल्याची भावना व्यक्त करत कार्यक्रमाचे कौतुक केले. ००००

 रत्न व दागिने उद्योगाला महाराष्ट्र शासनाचा भक्कम पाठिंबा

ज्वेल ट्रेण्ड्झ जेम्स अँड ज्वेलरी शो इंडिया २०२६ मध्ये कुशल कारागिरांच्या कल्याणावर भर मुंबई, ३ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्र शासनाचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते आज मुंबईतील विलेपार्ले (पूर्व) येथील हॉटेल सहारा स्टार येथे ज्वेल ट्रेण्ड्झ जेम्स अँड ज्वेलरी शो इंडिया (JTGJS) २०२६ च्या २२ व्या आवृत्तीचे उद्घाटन करण्यात आले. ज्वेल ट्रेण्ड्झ आयोजित या सहा दिवसीय बी२बी प्रदर्शनात १५० हून अधिक आघाडीचे दागिने उत्पादक, १०० हून अधिक प्रदर्शक, तसेच १२ देशांतील ५,००० हून अधिक नोंदणीकृत किरकोळ विक्रेते आणि आंतरराष्ट्रीय खरेदीदार सहभागी झाले असून, भारतीय रत्न व दागिने उद्योगासाठी हे प्रदर्शन देशातील अग्रगण्य व्यावसायिक व्यासपीठ म्हणून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. यावेळी बोलताना मंगल प्रभात लोढा म्हणाले, “रत्न व दागिने उद्योग हा महाराष्ट्रातील सर्वाधिक रोजगारनिर्मिती करणाऱ्या क्षेत्रांपैकी एक असून देशाच्या निर्यातीत त्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. कौशल्य विकास, नावीन्य आणि उद्योजकतेच्या माध्यमातून या उद्योगाला आवश्यक ते सर्व सहकार्य देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. शाश्वत विकास आणि जागतिक नेतृत्वाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या या उद्योगामागे महाराष्ट्र शासन ठामपणे उभे आहे. लाखो कुशल कारागिरांचे कल्याण तितकेच महत्त्वाचे आहे. दागिने उद्योगातील कुशल कामगारांना आवश्यक आर्थिक सुरक्षा आणि संरक्षण मिळावे यासाठी सर्वसमावेशक विमा व सामाजिक सुरक्षा व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने शासन उद्योग संघटनांसोबत सकारात्मकरीत्या काम करेल. उद्योगाच्या समस्या सोडवून त्याची दीर्घकालीन स्पर्धात्मकता अधिक बळकट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” ज्वेल ट्रेण्ड्झ जेम्स अँड ज्वेलरीचे  गोविंद वर्मा म्हणाले, “JTGJS हे केवळ व्यापार प्रदर्शन नसून भारतीय रत्न व दागिने उद्योगाची ताकद, नावीन्य आणि जागतिक स्पर्धात्मकता अधोरेखित करणारे एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. यंदाच्या प्रदर्शनात देश-विदेशातील आघाडीचे प्रदर्शक सहभागी झाले असून सोने, हिरे, जडाऊ, टेंपल, अँटिक आणि फॅशन ज्वेलरी सह मौल्यवान रत्ने, अत्याधुनिक यंत्रसामग्री, नाविन्यपूर्ण पॅकेजिंग सोल्यूशन्स आणि आधुनिक दागिने उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यात आले आहे.” ज्वेल मेकर वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष संजय जीवनलाल शाह म्हणाले, “भारतातील लाखो कुशल कारागीर हे रत्न व दागिने उद्योगाचा कणा आहेत. त्यांना योग्य ओळख, कौशल्य विकास, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सक्षमीकरण मिळाल्यास भारताचे जागतिक नेतृत्व अधिक मजबूत होईल. व्यापारी, खरेदीदार आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा मोठ्या प्रमाणावर झालेला सहभाग नव्या व्यावसायिक संधी निर्माण करेल आणि मुंबईची ‘भारताची ज्वेलरी कॅपिटल’ म्हणून ओळख अधिक दृढ करेल. महाराष्ट्रातील मालाड, बोरिवली आणि दहिसर परिसरातील हिरे उद्योगांमधून सुमारे दोन लाख हिरे कारागीर, दोन लाख सुवर्णकार आणि सुमारे एक लाख अन्य कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आमची दृष्टी केवळ सोन्याच्या दागिन्यांपुरती मर्यादित नाही. चांदी, प्लॅटिनम आणि इतर मौल्यवान धातूंमधील आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणे, कारागिरांचे सक्षमीकरण करणे आणि जागतिक रत्न व दागिने उद्योगात भारताचे नेतृत्व अधिक बळकट करणे हा आमचा संकल्प आहे.” पुढील सहा दिवस हे प्रदर्शन सुरू राहणार असून उत्पादक, घाऊक व किरकोळ विक्रेते, निर्यातदार आणि आंतरराष्ट्रीय खरेदीदार यांना नेटवर्किंग, नव्या बाजारपेठांचा शोध आणि व्यावसायिक भागीदारीसाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. JTGJS २०२६ मुळे भारताचे जागतिक रत्न व दागिने व्यापारातील स्थान अधिक मजबूत होण्याबरोबरच मुंबईची ‘भारताची ज्वेलरी कॅपिटल’ म्हणून ओळख अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. ००००