Author: bittambatami.com

नाशिकला वादळी पावसाचा तडाखा

५ तालुक्यांमध्ये वीज यंत्रणा कोलमडली हरिभाऊ लाखे नाशिक : राज्यात मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा सुरू असतानाच, नाशिकच्या ग्रामीण भागाला मान्सूनपूर्व वादळी पावसाने झोडपून काढले आहे. ३, ५ आणि ६ जून रोजी आलेल्या या वादळी पावसाने जिल्ह्यातील वीज वितरण यंत्रणेची अक्षरशः दैना उडवली आहे. वादळाचा सर्वाधिक फटका इगतपुरी, दिंडोरी, ओझर, सिन्नर आणि पेठ या पाच उपविभागांना बसला असून, यामुळे तब्बल चार हजारांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या पायाभूत सुविधांचे अभूतपूर्व नुकसान झाले असून, यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात महावितरणच्या नाशिक ग्रामीण विभागाकडून माहिती देण्यात आली. वाद‌ळ आणि मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसरात शेकडो वीज खांब उन्मळून पडले असून, अनेक किलोमीटर लांबीच्या ओव्हरहेड वीज वाहिन्या तुटल्या आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, १५४ उच्च दाब खांब आणि ३२० लघु दाब खांब जमीनदोस्त झाले आहेत. या शिवाय, २४ किलोमीटर लांबीच्या उच्च दाबाच्या आणि ५५.५ किलोमीटरच्या लघु दाबाच्या ओव्हरहेड वाहिन्या तुटल्या आहेत. या वादळामुळे ९ वितरण रोहित्र केंद्रे पूर्णपणे कोसळली असून तीन मोठ्या उपकेंद्रांमधील उपकरणांचे गंभीर नुकसान झाले आहे, ज्यामुळे प्रादेशिक वितरण नेटवर्क पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे सांगण्यात आले. अनेक भागातील घरगुती आणि निवासी भागातील वीज पुरवठा यशस्वीरित्या पूर्ववत करण्यात आला असून, कोणतीही गावे आता अंधारात नसल्याचा दावाही केला जात आहे. सध्या केवळ शेती पंपांचा प्रलंबित वीज पुरवठा खंडित असून, तो देखील टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहे. सिन्नरला सर्वाधिक फटका या आपत्तीचा सर्वाधिक फटका सिन्नर तालुक्याला बसला, जेथे तीन हजारांहून अधिक ग्राहकांना सलग दोन दिवस १४ तासांपेक्षा अधिक काळ विजेविना काढावा लागला. दुसरीकडे, पेठ उपविभागात उच्च दाबाच्या पायाभूत सुविधांचे सर्वाधिक नुकसान झाले असून ४६ उच्च दाबाचे खांब कोसळले आहेत, तर दिंडोरीमध्ये घरगुती वीज वितरण यंत्रणेला मोठा फटका बसून ९३ लघु दाबाचे खांब कोसळले. वीज पुरवठा सुरळीत कधी होणार ? महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, सिन्नर आणि दिंडोरीमधील वीज पुरवठा येत्या एक-दोन दिवसांत पूर्णपणे सुरळीत होईल. मात्र, पेठ तालुक्यातील दुरुस्तीच्या कामात मोठे भौगोलिक अडथळे येत आहेत. येथील वीज यंत्रणा दुर्गम आणि डोंगरी भागात विखुरलेली असल्याने तेथे दुरुस्ती साहित्य वाहून नेणे आव्हानात्मक ठरत आहे, परिणामी तेथील काम पूर्ण होण्यास अधिक काळ लागणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार सुभाष भोईर यांच्या घरी दिली सदिच्छा भेट

कल्याण :     श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळ डोंबिवली आयोजित कृतज्ञता सोहळा व जाहीर सत्कार कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डोंबिवली येथे आले असताना त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण यांसोबत माजी आमदार…

 उपाशीपोटी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना २०० कोटीचा निधी

 केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन रमेश औताडे मुंबई : पोटभर अन्न आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या दोन मूलभूत गरजा पूर्ण झाल्या तरच देशाचे भविष्य घडते. याच विचारातून मलाबार ग्रुपने राबविलेल्या “ हंगर फ्री वर्ल्ड “ उपक्रमाला मुंबईतील कांदिवली पूर्व येथील अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्रात नवी दिशा मिळाली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सन २०२६-२७ साठी तब्बल २०० कोटी रुपयांच्या सीएसआर निधीची घोषणा करण्यात आली आहे आजही अनेक विद्यार्थी आणि युवक उपाशीपोटी शिक्षण घेत आहेत. अशा परिस्थितीत ‘हंगर फ्री वर्ल्ड’ उपक्रम त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरत आहे. भारतासह विविध आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये हा उपक्रम दररोज एक लाखाहून अधिक गरजू लोकांपर्यंत जेवण पोहोचवत आहे. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले, “युवकांना सक्षम बनविण्यासाठी कौशल्य विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र शिक्षण आणि कौशल्य विकासाचा पाया हा पोषणावर आधारित असतो. विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या तर ते शिक्षण आणि स्वतःच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतात.” मलाबार ग्रुपचे अध्यक्ष एम. पी. अहमद यांनीही पोषण आणि शिक्षण यांच्यातील अतूट नात्यावर भर दिला. “भूक आणि शिक्षण एकत्र नांदू शकत नाहीत. दर्जेदार शिक्षणासाठी पुरेसे पोषण आवश्यक आहे. ‘हंगर फ्री वर्ल्ड’च्या माध्यमातून आम्ही ही मूलभूत गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत,” असे त्यांनी सांगितले. अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्र हे युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणारे केंद्र ठरत आहे. येथे व्यावसायिक प्रशिक्षण, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, करिअर मार्गदर्शन आणि रोजगार सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे युवकांची रोजगारक्षमता वाढून त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनण्यास मदत होत आहे. भूकमुक्त समाज आणि कौशल्यसंपन्न भारत या दुहेरी उद्दिष्टांकडे वाटचाल करणारा हा उपक्रम केवळ अन्नदानाचा कार्यक्रम नसून हजारो युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उभारलेला आशेचा सेतू असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

१० वी, १२ वीच्या पुरवणी परीक्षांसाठी कोकण मंडळाची हेल्पलाईन आणि समुपदेशन सेवा सुरू

– सचिव पुनिता गुरव यांचे आवाहन रत्नागिरी : (अशोक गायकवाड )—महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळाकडून जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या पुरवणी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. परीक्षा काळात विद्यार्थी व पालकांच्या मनातील ताणतणाव, शंका आणि अडीअडचणी सोडवण्यासाठी मंडळाने विशेष हेल्पलाईन आणि समुपदेशन (काउन्सिलिंग) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव पुनिता गुरव यांनी केले आहे.परीक्षांचे वेळापत्रकइयत्ता १२ वी (एचएससी) परीक्षा: १६ जून ते ८ जुलै २०२६इयत्ता १० वी (SSC) परीक्षा: १६ जून ते ३० जून २०२६समुपदेशन सेवा (८ जूनपासून सुरू)विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती वाटू नये किंवा इतर मानसिक अडचणी येऊ नयेत यासाठी ८ जूनपासून परीक्षा संपेपर्यंत समुपदेशन सेवा सुरू करण्यात आली आहे. खालील समुपदेशकांशी पालक व विद्यार्थी संपर्क साधू शकतात: संदिप दत्ताराम शिर्के : ९५५२०६४६४० भाग्यविधाता भास्कर वारंग : ९४२३२१३२४०शंका निरसनासाठी मंडळाचे अधिकारी व संपर्क क्रमांकविद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व तांत्रिक शंकांचे निरसन करण्यासाठी मंडळाने खालील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे: अधिकारी / कर्मचारी यांचे नावपद / विभागमोबाईल क्रमांक पुनिता गुरव विभागीय सचिव ९०११२६२८४० प्रेरणा शिंदे विभागीय सहाय्यक सचिव ९६७३०८००७७ अनिल पवार पर्यवेक्षक लिपिक (इ. १२ वी)९६७३MT१२६७ (९६७३१२१२६७) राजेंद्र यादगिरे पर्यवेक्षक लिपिक (इ. १० वी)९४२०५१८२१३ गजानन जाधव लेखा व भांडार शाखा८०८७७४६१२२ विशेष हेल्पलाईन क्रमांक: विद्यार्थी आणि पालकांसाठी ०२३५२ २३१२५० हा मुख्य हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध असून, यावर सकाळी ८ ते संध्याकाळी ८ या वेळेत संपर्क साधता येईल.

 सत्य विजया एससीची विजयी सलामी

सबर्बन प्रीमियर फुटबॉल लीग २०१६ मुंबई : ॲथलेटिक्स असोसिएशनने आयोजित सबर्बन प्रीमियर फुटबॉल लीगमध्ये (२०३६) पहिल्या फेरीच्या सामन्यात सत्य विजया एससीने आय.सी. स्पोर्टिंगचा ४-० असा धुव्वा उडवला.  बोरिवली येथील सेंट फ्रान्सिस…

 बौद्धांना जनगणनेपासून परावृत्त करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

माहिती दडवणे , खोटी माहिती देणे म्हणजे तीन वर्षे तुरुंगवासाचा गुन्हा ! मुंबई : स्वतः जात प्रमाणपत्रधारक आणि आरक्षणाचे लाभार्थी असतानाही राज्यात काही लोक अनुसूचित जातींना जनगणनेत जात नोंदवण्यापासून जाहीर सभा, सोशल मीडिया व इतर माध्यमांतून परावृत्त करू लागले आहेत. त्याची वेळीच गंभीर दखल घेवून त्यांच्यावर केंद्र आणि राज्य सरकारने कडक कारवाई करावी, अशी मागणी बौद्ध – अनुसूचित जाती एकता परिषदेतर्फे आज  मुंबईत करण्यात आली आहे. या संदर्भात बौद्ध – अनुसूचित जाती एकता परिषदेच्या संयोजन समितीचे सदस्य महेंद्र बनसोडे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्य जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण, राज्य जनगणना संचालिका डॉ. निरुपमा जे. डांगे,  महाराष्ट्र राज्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सामाजिक न्याय राज्यमंत्री संजय शिरसाट यांना निवेदने सादर केली आहेत. बनसोडे हे युनिव्हर्सल बुद्धिस्ट सोसायटीचेही संस्थापक – अध्यक्ष आहेत. ओबीसींच्या मागणीनुसार देशात प्रथमच जातीनिहाय जनगणना होत आहे. अशा वेळी अनुसूचित जातींचा दर्जा दिलेल्या बौद्ध समाजाला त्यापासून अलिप्त राहण्यासाठी प्रवृत्त करणे म्हणजे जनगणनेच्या उद्दिष्टांना पराभूत करणे आहे,असे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय कार्यात अडथळा जातीचा दाखला नमुना क्रमांक : ६ आणि नमुना क्रमांक : ७ नवबौद्ध हे दोन्ही प्रकारचे प्रमाणपत्र घेणाऱ्या लोकांना आरक्षण हे अनुसूचित जाती म्हणुनच मिळते. त्या नुसार अनुसूचित जातीचे सर्व अधिकार घेऊनही स्वतः अनुसूचित जातीची नोंद न करणे आणि इतरांनाही त्याची नोंद करण्यापासून परावृत करणे या कारवाया जनगणना विरोधी असून राष्ट्रीय कार्यात अडथळा आणणाऱ्या आहेत, असे त्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जनगणना अधिनियम १९४८ कलम ११ नुसार शिक्षापात्र गुन्हा जनगणना कर्मचाऱ्यांना खोटी माहिती दिल्यास किंवा माहिती लपवल्यास ‘जनगणना अधिनियम १९४८’ च्या कलम ११ नुसार कारवाई होऊन, दंडासह ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो, याकडे बनसोडे यांनी जनगणना आयोगाचे लक्ष वेधले आहे. अनुसूचित जातींची अचूक माहिती नोंदवण्यासाठी एक जनजागृती अभियान हाती घेण्यात यावे, अशी आग्रही मागणीही त्यांनी निवेदनातून केली आहे. भारत सरकारद्वारे करण्यात येणारी जनगणना ही देशाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक धोरण निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. विशेषतः अनुसूचित जातींची लोकसंख्या, सामाजिक प्रतिनिधित्व, विकास योजना व घटनात्मक हक्क यांचे मूल्यमापन जनगणनेतील अचूक माहितीवरच अवलंबून असते, असे त्यांनी सांगितले. 0000000000

 तलासरी पोलिसांकडून घरफोडीचा अवघ्या ४८ तासांत छडा

 करजगाव घरफोडी प्रकरणातील अल्पवयीन आरोपीसह, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त योगेश चांदेकर  पालघरः तलासरी तालुक्यातील करजगाव, पाटील पाडा येथे घरफोडी करून त्यात तीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर अवघ्या ४८ तासांत या प्रकरणातील संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून तीन लाख दहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान अजय नरेश घुटे हे पाटीलपाडा, करजगाव हे त्यांचे राहते घर  बंद करून त्यांच्या दुकानात गेले होते. घरी कुणी नाही, याबाबत पाळत ठेवून १६ ‍वर्षांच्या मुलाने त्यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजा तोडला. घरात प्रवेश करून लोखंडी कपाट तोडले. त्यातील तीन लाख रुपयांची रक्कम चोरून नेली. या प्रकरणी तलासरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष पथकाची कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी याबाबत तलासरी पोलिसांना तातडीने या प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश दिला. त्यांच्या सूचनेनुसार या प्रकरणाचा त तपास करण्यासाठी तलासरी पोलिसांनी एक विशेष पोलिस पथक तयार केले. या परिसरातील सीटीव्ही कॅमेरे, गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एका अल्पवयीन मुलाकडे संशयाची सुई जात होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून तीन लाख रुपये रोख, दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि पाचशे रुपये किमतीची बॅग असा एकूण तीन लाख दहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. देशमुख यांच्या काळात तपासाची वाढली गती पालघर जिल्ह्यात यतीश देशमुख पोलिस अधीक्षक म्हणून आल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीला बऱ्यापैकी आळा घालण्यात यश मिळवले आहे. वारंवार विविध पोलिस ठाण्यांना मार्गदर्शन करून तपासाची सूत्रे कशी फिरवावीत याचे निर्देश ते देत असतात. पालघर जिल्ह्याला मुख्यमंत्र्यांच्या योजनेतील पहिल्या क्रमांकाचे बक्षीसही देशमुख यांच्या काळातच मिळाले. आत्ताच्या करजगाव घटनेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलिस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली तलासरी पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक अजय गोरड, पोलिस उपनिरीक्षक विष्णू राजड, संदीप नांगरे, अनिल सोनवणे, योगेश मुळे यांच्या पथकाने अवघ्या ४८ तासात घरफोडीचा तपास करून मुद्देमाल जप्त केला. त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

१६ वर्षांखालील मुले गटात डॉन बॉस्को एससी अजिंक्य

१५वी ज्यो फर्नांडिस हॉकी स्पर्धा अंतिम फेरीत रिपब्लिकन्स एससीवर विजय मुंबई, ९ जून: १५ व्या ज्यो फर्नांडिस हॉकी स्पर्धेच्या १६ वर्षांखालील मुले गटात डॉन बॉस्को एससी अजिंक्य ठरला. चुरशीच्या अंतिम फेरीत त्यांनी रिपब्लिकन्स एससीवर ३-२ विजय असा विजय मिळवला. एएचडब्ल्यूए आयोजित वांद्रे येथील सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूलच्या टर्फ मैदानावर खेळल्या गेलेल्या स्पर्धेत १६ वर्षांखालील मुले गटाच्या फायनलमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. त्यात रॉयडेन कोळी, अर्णव खोत आणि सार्थ हिरामठच्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर  डॉन बॉस्को एससीने वर्चस्व राखले. मात्र, रिपब्लिकन्स एससीकडून चिंगशुबम हेथोइबा व शुभम शिंदेने गोल करून सामन्यात रंगत आणली. वरिष्ठ महिला गटात वॉरियर्स एससीला २-० असे हरवत सी व्ह्यू एससीने जेतेपद पटकावले. रेश्मा महाडिकने दोन्ही गोल करत विजयात मोलाचा वाटा उचलला. व्हेटरन्स पुरुष गटाच्या अंतिम फेरीत हॉकी मीरा रोडने मुंबई कस्टम्सवर १-० अशी मात केली. सामन्यातील मॅचविनर गोल मेघराज एस.याने केला. निकाल (१६ वर्षांखालील मुले – अंतिम सामना): डॉन बॉस्को एससी ३ (रॉयडेन कोळी, अर्णव खोत, सार्थ हिरामठ) विजयी वि. रिपब्लिकन्स एससी २ (चिंगशुबम हेथोइबा, शुभम शिंदे). वरिष्ठ महिला (अंतिम सामना): सी व्ह्यू एससी २(रेश्मा महाडिक) विजयी वि. वॉरियर्स एससी ०. व्हेटरन्स पुरुष (अंतिम सामना): हॉकी मीरा रोड १ (मेघराज एस.) विजयी वि. मुंबई कस्टम्स ०. 00000000

नालेसफाई विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अनोखे ‘गटर पूजन’ आंदोलन

दिवा, दि. 9 जून : दिवा शहरातील नालेसफाईची कामे अद्यापही अपूर्ण असल्याने पावसाळ्यात नागरिकांना पुराचा सामना करावा लागू शकतो. ठाणे महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने…

पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!

 शिवसैनिकांचे ‘टमरेल’ आंदोलन आणि महापालिकेवर धडक मोर्चा! मिरा-भाईंदर :मिरा-भाईंदर शहरातील जनतेचा पाण्यासाठी सुरू असलेला टाहो आणि प्रशासनाची निर्लज्ज लाचारी या विरोधात शिवसेना पक्षाच्या वतीने ‘टमरेल आंदोलन’ छेडत महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. भाईंदर (पश्चिम) येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून निघालेल्या या मोर्चात शिवसैनिक हातात ‘टमरेल’ घेऊन प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरली होती. “पाणी द्या, पाणी द्या, त्रस्त जनतेला पाणी द्या!”, “प्रशासकीय लाचारीचा धिक्कार असो!” अशा घोषणांनी संपूर्ण महानगरपालिका परिसर दणदणून गेला. संतापलेल्या आंदोलकांनी थेट आयुक्त आणि महापौर दालनाकडे कूच केली, मात्र नेहमीप्रमाणे जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढणारे महापौर आणि आयुक्त दोघेही दालनात उपस्थित नव्हते. या पळपुटेपणावर शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि महापौरांना दूरध्वनीवरून थेट संपर्क साधून त्यांच्या ‘मौन’ धारण करण्यावर कडक शब्दांत जाब विचारला. अखेर, हे आक्रमक निवेदन महानगरपालिका उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील आणि उपायुक्त संभाजी पानपट्टे यांच्याकडे सोपविण्यात आले. शिवसेनेच्या मुख्य मागण्या आणि चेतावणी: १. पाणीपुरवठा तातडीने पूर्ववत करा: शहरातील प्रत्येक टोकाच्या भागात, चाळी-झोपडपट्ट्यांमध्ये नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा २४ तासांच्या आत सुरळीत झालाच पाहिजे! २. टँकरमाफियांची लूट थांबवा: ज्या भागात ३-४ दिवस पाणी आलेले नाही, तिथे महापालिकेने स्वतःच्या खर्चाने तात्काळ टँकरद्वारे पाणी मोफत पुरवावे. टँकर माफियांची मुजोरी ठेचून काढा! ३. पारदर्शक वेळापत्रक जाहीर करा: पाण्यासाठी नागरिकांना ३-४ दिवस ताटकळत ठेवणे बंद करून पाणीपुरवठ्याचे अचूक वेळापत्रक जाहीर करा आणि त्याचे काटेकोर पालन करा. ४. पाणीचोरांवर FIR दाखल करा: शहरात चालणारी अधिकृत-अनधिकृत पाणीचोरी आणि अवैध नळ जोडण्यांवर तात्काळ गुन्हे (FIR) दाखल करून युद्धपातळीवर विशेष मोहीम राबवा. ५. ‘७/११’ कंपनीची अडीबाजी मोडून काढा: महापालिकेने प्रशासकीय बळाचा वापर करून ७/११ कंपनीच्या जागेचा वाद तात्काळ निकाली काढावा आणि सूर्या धरणाचे पाणी शहरात आणण्याचा मार्ग मोकळा करावा! या ‘टमरेल आंदोलना’बद्दल बोलताना मिरा -भाईंदर महिला जिल्हा संघटक निशा नार्वेकर म्हणतात की, “जनतेच्या संयमाचा आता अंत झाला आहे. कडाक्याच्या उन्हात आमच्या माता-भगिनींना रस्त्यावर उतरायला लावणाऱ्या प्रशासनाला आम्ही आता सुखाने जगू देणार नाही. या निवेदनाची आणि जनतेच्या आक्रोशाची प्रशासनाने गांभीर्याने दखल न घेतल्यास यानंतर शहरात निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला पूर्णतः महानगरपालिका प्रशासन आणि सत्ताधारी जबाबदार असतील!”