Author: bittambatami.com

प्रताप सरनाईक यांनी जिंकली प्रवाशांची मने

एसटीच्या उपहारगृहात मंत्र्यांची साधी-सरळ भेट अशोक गायकवाड संगमेश्वर : एसटी बसस्थानक म्हटले की अनेकांच्या मनात अस्वच्छता, गर्दी, कळमळट वातावरण आणि उपहारगृहांबाबतच्या तक्रारींचे चित्र उभे राहते. मात्र संगमेश्वर बसस्थानकात शुक्रवारी रात्री घडलेले दृश्य या सर्व समजुतींना छेद देणारे ठरले. कारण महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी चक्क प्रवाशांसोबत बसून एसटीच्या कॅन्टीनमधील गरमागरम वडापाव आणि कॉफीचा आस्वाद घेत सर्वांनाच सुखद धक्का दिला. कोकण दौऱ्यावर असलेल्या मंत्री सरनाईक यांनी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर बसस्थानकाला भेट दिली. नव्याने उभारलेल्या या आधुनिक बसस्थानकात संध्याकाळीही प्रवाशांची मोठी वर्दळ होती. बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि उपलब्ध सुविधांबाबत आपुलकीने चौकशी केली. यावेळी त्यांनी बसस्थानकातील प्रसाधनगृहे, हिरकणी कक्ष आणि इतर प्रवासी सुविधांची पाहणी करून स्वच्छता व व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले. स्वच्छ, टापटीप आणि प्रसन्न वातावरणाने नटलेल्या या बसस्थानकाची पाहणी करत असताना त्यांची पावले नकळत एसटीच्या उपहारगृहाकडे वळली. उपहारगृहात अनेक प्रवासी गरमागरम भजी, वडापाव, चहा आणि कॉफीचा आनंद घेत होते. त्या सुगंधाने आणि प्रसन्न वातावरणाने मंत्रिमहोदयांनाही मोह आवरला नाही. त्यांनी थेट प्रवाशांमध्ये जाऊन बसत गरमागरम वडापाव आणि कॉफीची चव चाखली. एका मंत्र्याने कोणताही बडेजाव न करता सर्वसामान्य प्रवाशांसोबत बसून एसटीच्या कॅन्टीनमधील पदार्थांचा आस्वाद घेणे, हा अनुभव उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला. क्षणभर अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. राज्याचे परिवहन मंत्री आपल्या शेजारी बसून गप्पा मारत वडापाव खात आहेत, हे दृश्य पाहून प्रवाशांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद एकाच वेळी झळकत होता. संगमेश्वर बसस्थानकातील हा प्रसंग केवळ एका पाहणी दौऱ्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर एसटीच्या बदलत्या चेहऱ्याचे आणि प्रवाशांशी जपल्या जाणाऱ्या आत्मीय नात्याचे प्रतीक ठरले. स्वच्छता, सुविधा आणि गुणवत्तेचा संदेश देणाऱ्या या भेटीने लालपरीच्या सेवेत होत असलेल्या सकारात्मक परिवर्तनाची जिवंत साक्षच प्रवाशांना अनुभवायला मिळाली.

महिला स्वसंरक्षणाच्या उपक्रमाची मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार दखल

 भाजप नेते माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केला विश्वास कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १३४ व्या भागाचे सामूहिक श्रवण रविवारी कल्याण पश्चिमेतील बेतुरकर पाडा परिसरात उत्साहात पार पडले. भाजप नगरसेविका हेमलता पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रतिष्ठीत सामाजिक संस्थांच्या प्रमुख, सामान्य नागरिक, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार आणि नगरसेविका हेमलता नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम झाल्यानंतर भाजप नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपला संकल्प व्यक्त केला. गेल्या वर्षीच्या महिला दिनाच्या निमित्ताने आपण सुरू केलेल्या महिला स्वसंरक्षणाच्या लाठी-काठी प्रशिक्षण उपक्रमाची पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातमध्ये दखल घेतील असा विश्वास यावेळी भाजप नेते नरेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच या महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रमामध्ये विद्यार्थिनींचा सहभाग वाढवण्यासाठी तुम्ही सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या व्यक्तींना केले. यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, नगरसेविका हेमलता नरेंद्र पवार यांच्यासह प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय कल्याण केंद्राच्या प्रमुख अलका दीदी, श्री संत गजानन शेगांव भक्त मंडळ कल्याण विश्वस्त गणेश खैरनार, नितिन चौधरी, मयुरेश आगलावे, रवी गुप्ता, शत्रुघ्न भोईर, डॉ.सुनिल हरपाले, ॲड.समृद्ध ताडमारे, रोहीत लांबतुरे, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संवादातून देशातील सकारात्मक बदल, सामाजिक उपक्रम, क्रीडा क्षेत्रातील यश तसेच पर्यावरण संवर्धन यावर भर दिला. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करत पारंपरिक भारतीय पेयांचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. आंबा पन्हे, ताक, सोलकढी, कोकम सरबत यांसारखी पारंपरिक पेये शरीरासाठी फायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले.

मुरबाडकरांवर अन्याय, काँक्रीट रस्ता झाला, आता टोलचा भुर्दंड!

राजीव चंदने मुरबाड : सार्वजनिक बांधकाम विभाग व केंद्रीय सडक परिवहन मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू असलेले कल्याण-माळशेज राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ चे काँक्रीटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र रस्ता पूर्ण होताच या मार्गावर टोल वसुली सुरू होणार असल्याने मुरबाडकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या मार्गावर धावणाऱ्या एसटी बस, काळी-पिवळी टॅक्सी, व खाजगी खासगी चारचाकी वाहनांसह सर्वच वाहनांना टोल भरावा लागणार आहे. यामुळे कल्याणकडे जाणाऱ्या सर्वच वाहनांचे भाडे वाढणार असून त्याचा थेट आर्थिक फटका सामान्य प्रवाशांना बसणार आहे लोकमित्र रमेश हिंदुराव यांनी या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. “वास्तविक रस्त्याच्या कामाचे संपूर्ण देयक ठेकेदाराला अदा करण्यात आलेले असताना पुन्हा जनतेकडून टोल वसूल करणे अन्यायकारक आहे. काँक्रीटचा रस्ता करून सामान्य जनतेचे हित नेमके काय साधले, हेच कळत नाही,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “मुरबाड तालुक्यातील नागरिकांना या टोलमधून पूर्णपणे मुक्त करावे,” अशी ठाम मागणी रमेश हिंदुराव यांनी केली आहे. तसेच हा प्रश्न केवळ एका पक्षाचा नसून सर्वसामान्य जनतेचा आहे, त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून एकत्र येत या अन्यायाविरोधात लढा उभारावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. काँक्रीट रस्त्यामुळे प्रवास सुखकर होईल हे खरे, पण त्यासाठी रोजच्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार असेल तर हा विकास कुणासाठी, असा प्रश्न आता मुरबाडकर विचारत आहेत.

डोंबिवलीतील रेल्वे ग्राऊंड वाचवण्यासाठी भाजप-शिवसेनेचे आंदोलन

आरती परब डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील मुला-मुलींसाठी आणि खेळाडूंसाठी महत्त्वाचे मानले जाणारे रेल्वे ग्राऊंड वाचवण्यासाठी आज भाजप आणि शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. रेल्वे प्रशासनाकडून मैदानाच्या काही भागात बांधकाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत स्थानिक खेळाडू आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. डोंबिवली पश्चिमेतील मोठ्या मैदानांपैकी एक असलेल्या या रेल्वे ग्राऊंडवर दररोज शेकडो युवक-युवती विविध खेळांचा सराव करतात. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या प्रस्तावित बांधकामामुळे मैदानाची जागा कमी होऊन खेळाडूंना अडचणी निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज रेल्वे मैदानात स्थानिक तरुण, खेळाडू आणि नागरिकांसह भाजप व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन छेडले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत मैदानावरील बांधकाम तात्काळ थांबविण्याची मागणी करण्यात आली. तसेच रेल्वे अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा होईपर्यंत कोणतेही काम सुरू करू नये, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. आंदोलनानंतर उपस्थित अधिकाऱ्यांनी बैठकीपर्यंत काम स्थगित ठेवण्याचे मान्य केल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. त्यामुळे डोंबिवलीतील खेळाडूंना न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, नगरसेविका, विविध पदाधिकारी तसेच शिवसेनेचे आमदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मैदानाच्या संरक्षणासाठी पुढील काळातही लढा सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.

महा DBT पोर्टलवरील प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढा

सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचे महाविद्यालयांना निर्देश ठाणे: महाराष्ट्र शासनाच्या MahaDBT पोर्टलद्वारे विविध शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्ती योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून, सद्यस्थितीत हे पोर्टल MahaDBT १.० वरून MahaDBT २.० मध्ये परावर्तित (Migration) होत आहे. या पार्श्वभूमीवर सन २०१८-१९ ते २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांतील महाविद्यालय स्तरावरील सर्व प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढावेत, असे निर्देश समाज कल्याण विभाग, ठाणेचे सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी दिले आहेत. सध्या महाविद्यालय स्तरावर एकूण ३१६२ अर्ज प्रलंबित असल्याची माहिती देण्यात आली आहे. संबंधित महाविद्यालयांनी अर्जांची वेळेत पडताळणी व मंजुरी न केल्यास पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाDBT पोर्टल सन २०१८-१९ पासून कार्यरत असून शासनाच्या योजनांचा लाभ पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि कोणताही विद्यार्थी योजनांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेणे ही संबंधित महाविद्यालयांची जबाबदारी असल्याचे इंगळे यांनी नमूद केले. तरी सर्व महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावरील प्रलंबित अर्जांची तात्काळ तपासणी करून मंजुरी व आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी. या प्रकरणी दिरंगाई झाल्यास संबंधित प्राचार्य आणि महाविद्यालय प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी दिला आहे. ०००००००० ००००००

पुरुष, महिला आणि व्यावसायिक गटातील विजेतेपदासाठी आज निर्णायक लढती

मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धा – २०२६ मुंबई : मुंबई खो-खो संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी उद्यान, दादर (प.), मुंबई येथे सुरू असलेल्या मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धा – २०२६ मध्ये…

Heading – विकसित राष्ट्र बनवण्यासाठी संवेदनशील राष्ट्र बनवावे लागेल- राज्यपाल जिष्णु देव वर्मा

चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिव्यांगांना स्मार्ट चष्मे, व्हीलचेअर, शिलाई मशीन व लॅपटॉप वाटप अशोक गायकवाड मुंबई : विकसित भारत म्हणजे आर्थिक दृष्ट्या संपन्न भारत घडवणे इतकेच अभिप्रेत नाही. तर विकसित भारत घडवण्यासाठी दिव्यांग लोकांना देखील विकास कार्यात समान भागीदार बनवावे लागेल. विकसित राष्ट्र घडविण्यासाठी संवेदनशील राष्ट्र बनवावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज येथे केले. हेतू चॅरिटेबल ट्रस्ट व डिस्ट्रिक्ट लीगल सर्विसेस ऑथॉरिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग सक्षमीकरण परिषदेचे उद्घाटन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मालाड मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते दिव्यांग महिलांना शिलाई मशीन, दृष्टिहीन व्यक्तींना एआय – स्मार्ट चष्मे, व्हिलचेयर व दिव्यांग स्नातक युवकांना लॅपटॉप वितरित करण्यात आले. शासन व सामाजिक संस्था एकत्र येऊन कार्य करतात तेंव्हा दिव्यांग सक्षमीकरणाचे कार्य यशस्वी होते असे सांगून राज्यपालांनी हेतू चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याचे कौतुक केले. या कार्यक्रमात १०० दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर, ५० महिलांना शिलाई मशीन, १०० दृष्टिहीन व्यक्तींना एआय स्मार्ट चष्मे व ३ दिव्यांग युवकांना लॅपटॉप देण्यात आले. कार्यक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्या. श्याम चांडक व न्या. मकरंद कर्णिक, न्या. ( सेवानिवृत्त) के के तातेड, हेतु चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव रिखबचंद जैन, उद्योजक प्रवीण कोठारी, देवेंद्र जैन, नरेंद्र राठी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी.जी. तापडिया आदी उपस्थित होते.

– १७ वर्षांखालील गटामध्ये हर्षल राणा, देवश्री अरोराची बाजी

अवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धा २०२६ मुंबई, ३० मे: हरियाणाच्या हर्षल राणा आणि दिल्लीच्या देवश्री अरोराने अवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धेत अनुक्रमे १७ वर्षांखालील मुले आणि मुली गटाचे…

जुन्या वैमनस्यातून राडा

घराची तोडफोड, जीवघेणा हल्ला दोन आरोपी अटकेत कल्याण : म्हारळ गावातील एका कुटुंबाच्या घरात घुसून तोडफोड, महिलेशी गैरवर्तन आणि जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात एकूण नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी सात आरोपी अद्याप फरार आहेत. टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेचा राग आरोपींनी मनात धरला होता. याच जुन्या वादातून २९ मे रोजी सायंकाळी सुमारे ७.२५ वाजता आरोपी आपल्या साथीदारांसह फिर्यादीच्या घरी पोहोचले. आरोपींनी जबरदस्तीने घरात प्रवेश करून लोखंडी रॉडच्या साहाय्याने घरातील वस्तूंची तोडफोड केली. यावेळी फिर्यादीच्या बहिणीसोबत गैरवर्तन करत तिचा  विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. याला विरोध केल्यानंतर आरोपींनी फिर्यादीवर हल्ला चढविला. पोलिसांनी सांगितले की, मुख्य आरोपी हरेश प्रधान उर्फ दैत्या आणि त्याच्या साथीदारांनी लोखंडी रॉड व चाकूच्या सहाय्याने आशिष खांडेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. फिर्यादीने बचाव करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन टिटवाळा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी हरेश प्रधान उर्फ दैत्या आणि करण अमर राजपूत यांना अटक केली. दोन्ही आरोपींना ३० मे रोजी पहाटे ताब्यात घेण्यात आले. पोलिस तपासात मुख्य आरोपी हरेश प्रधान याच्याविरुद्ध यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. सध्या फरार असलेल्या सात आरोपींचा शोध सुरू असून प्रकरणाचा पुढील तपास टिटवाळा पोलीस करत आहेत. या घटनेमुळे म्हारळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गुन्ह्यातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.