Category: होम

 कल्याणमध्ये युवक काँग्रेसची महागाई विरोधात ‘अंत्यसंस्कार यात्रा’

 तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत सरकारची काढली अंत्यसंस्कार यात्रा कल्याण : कल्याणमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने साखरेच्या दरवाढीविरोधात तहसील कार्यालयावर  ‘अंत्यसंस्कार यात्रा’ काढण्यात आली. साखर आणि साखरपिकाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुगर डॅडी असा उल्लेख असलेला बॅनर हातात घेऊन भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वाढती महागाई सरकारने कमी करावी अशी मागणी यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जपजीत सिंग यांनी केली. यावेळी कॉंग्रेसच्या गटनेत्या तथा महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांच्यासह मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. साखर महागली, चहाचा गोडवा पळाला, भाजप सरकारच्या कारभाराने जनतेचा खिसा मात्र जळाला. आता चहात साखर टाकायची की साखरेसाठी कर्ज काढायचं? असा उपरोधिक टोला लगावत साखर आणि साखरपिकाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्यात आला. ऊस शेतकऱ्याचा, साखर जनतेची, पण दरवाढीचा फटका जनतेच्या खिशाला. गोड बोलणाऱ्या सरकारने साखर मात्र कडू केली. महागाईच्या या तडाख्याला आता युवक काँग्रेस सडेतोड उत्तर देत जनतेच्या हक्कासाठी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरली असल्याची माहिती युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जपजीत सिंग यांनी दिली.

 गरीबाच्या घराची जबरदस्तीने तोडफोड केल्याचा आरोप

नगरसेवक महेश गायकवाड विकासकावर संतापले; ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या गंगाराम राठोड यांचे घर पाडले कल्याण : कल्याण पूर्वेतील कैलास नगर परिसरात गॅस कंपनी जवळ सोसायटीच्या विकासकामादरम्यान एका गरीब कुटुंबाच्या घराची कथितरित्या जबरदस्तीने तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोसायटीच्या पुनर्विकासाच्या नावाखाली विकासक संतोष केंगळे यांनी गंगाराम राठोड यांच्या घराची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. राठोड कुटुंब गेल्या ३० वर्षांहून अधिक काळापासून या घरात वास्तव्यास असल्याचे सांगण्यात आले. तोडफोडीच्या कारवाईत घरातील संसारोपयोगी साहित्याचेही नुकसान झाल्याने गरीब कुटुंबाचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत विकासकाच्या कारवाईबाबत तीव्र संताप व्यक्त केला. “मी कोणत्याही गरीबावर अन्याय होऊ देणार नाही. विकासाच्या नावाखाली गरीबांच्या घरांवर कारवाई करून त्यांच्या हक्कांवर गदा आणली जात असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही,” अशी भूमिका गायकवाड यांनी घेतली. तसेच विकासक आणि त्यांना कथितरित्या राजकीय पाठबळ देणाऱ्यांच्या दादागिरीविरोधात आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्यायाची मागणी करणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले. पीडित गंगाराम राठोड आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, विकासक संतोष केंगले यांनी महेश गायकवाड यांनी आपल्यासोबत मारहाण केल्याचा तसेच जातिविषयक शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. घटनेमुळे परिसरात नाराजीचे वातावरण असून, पोलीस आणि प्रशासनाकडून या प्रकरणात कोणती कारवाई केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. बातमी लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

खाजगी हितसंबंधामुळे स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर

रमेश औताडे मुंबई : विकास आराखड्यात स्मशानभूमीसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर अद्यापही पालिकेकडून कोणताही अधिकृत माहिती फलक न लावल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले यांच्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब मिरजे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नेरूळ सेक्टर १४ येथील या मोकळ्या भूखंडासमोर रिजसी नावाचा मोठा  टॉवर आहे. या टॉवर मधील घरांची विक्री सुरळीत व्हावी यासाठीच प्रशासन जाणूनबुजून स्मशानभूमीचा अधिकृत बोर्ड लावण्यास व बांधकामास टाळाटाळ करत तर नसेल ना ? असे मिरजे यांनी सांगितले. पालिकेकडून होत असलेल्या या दिरंगाई विरोधात  मिरजे यांनी महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन सादर करून १५ दिवसांचा इशारा दिला आहे. 0000

आपले सरकार सेवा केंद्रांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा: जिल्हाधिकारी किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड-अलिबाग: रायगड जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ‘आपले सरकार सेवा केंद्रां’साठी इच्छुक नागरिकांनी ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणे अनिवार्य आहे. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज ३० सप्टेंबर, सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. राज्यातील महा ई-सेवा, सेतू सुविधा, नागरी सुविधा व संग्राम केंद्रांना ‘आपले सरकार सेवा केंद्र’ असे एकसमान नाव व ब्रँडिंग देण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील रिक्त केंद्रांची माहिती raigad.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज करताना तांत्रिक अडचण आल्यास जिल्हा माहिती तंत्रज्ञान कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत व नगरपंचायत क्षेत्रात किमान दोन, तर पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या क्षेत्रात किमान चार केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. महानगरपालिका व नगरपरिषद क्षेत्रात दहा हजार लोकसंख्येमागे दोन केंद्रे प्रस्तावित आहेत. अर्ज मागविण्याचा कालावधी १ ते ३० सप्टेंबर २०२६ असा असून, अर्जांची छाननी १ ते १५ ऑक्टोबर आणि जिल्हास्तरीय कार्यवाही १६ ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यात तालुकानिहाय नव्याने सुरू होणाऱ्या केंद्रांची संख्या पुढीलप्रमाणे आहे : अलिबाग २६, कर्जत ४३, खालापूर ४५, महाड ११८, माणगाव ३४, म्हसळा ३३, मुरुड १२, पनवेल ग्रामीण २२, पनवेल शहरी ७९, पेण ४१, पोलादपूर ३५, रोहा ५३, श्रीवर्धन ३१, सुधागड २२, तळा २२ आणि उरण ३८. या संधीचा लाभ घेण्यासाठी पात्र व इच्छुक नागरिकांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करून त्याची प्रत आवश्यक कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालयात वेळेत जमा करावी.

नाशिक जिल्ह्यातील महिला बचतगटांना आता येणार ‘अच्छे दिन’

हरिभाऊ लाखे नाशिक : शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना आता घरच्या जेवणाचा स्वाद आणि पौष्टिक आहार मिळणार आहे. रुग्णांना महिला बचतगटांकडून जेवण दिले जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशाने राज्यातील २०० पेक्षा कमी खाटांच्या जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात आहार पुरवण्याचे कंत्राट स्थानिक महिला स्वयंसहायता गटांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण व शहरी भागातील महिला बचतगटांसाठी रोजगाराचे मोठे दालन उघडले आहे. जिल्ह्यातील ३३ हजारांहून अधिक बचतगटांना यामुळे ‘अच्छे दिन’ आले आहेत. जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि १०५ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या ठिकाणी दरदिवशी किमान एक हजारपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करून दाखल करण्यात येतात. या रुग्णांसाठी सकस अन्न देता यावे, यासाठी आधीपासूनच प्रयत्न सुरू आहेत. यात आता शासनाच्या निर्णयामुळे अन्नपुरवठ्याची प्रक्रिया सोपी होणार आहे. यासाठी पात्र बचतगटांची निवड विविध निकषांवर केली जाणार आहे. आहाराच्या गुणवत्तेबरोबरच वेळ आणि स्वच्छतेबाबतही कडक नियम लागू करण्यात आले आहेत. बचतगटांची निवड थेट कंत्राट देऊन न करता १०० गुणांच्या निकषांवर केली जाणार आहे. गटाचा अनुभव, आहार तयार करण्याची क्षमता, उपलब्ध सुविधा, मनुष्यबळ, स्वच्छता, आर्थिक क्षमता आणि संबंधित कामाचा अनुभवांचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे सक्षम आणि दर्जेदार सेवा देऊ शकणाऱ्या गटांची निवड होणार आहे. शासनाकडून प्रतिरुग्ण दररोज १९१.४० रुपये या दराने बचतगटांना रक्कम दिली जाणार आहे. यात रुग्णाचा निर्धारित आहार आणि व्यवस्थापनाच्या खर्चाचा समावेश असेल. रुग्णसंख्या जास्त असलेल्या रुग्णालयांत बचतगटांना यातून मोठा आर्थिक लाभ आणि शाश्वत रोजगार मिळणार आहे. आहार पुरवठ्यात हलगर्जीपणा करणाऱ्या बचतगटांवर दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. वेळेत जेवण न दिल्यास ५०० रुपये दंड, अपुरा आहार दिल्यास २२० रुपये दंड, अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्यास एक ते पाच हजार रुपये दंड, आहाराची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्न सुरक्षा याबाबत तडजोड झाल्यास संबंधित गटावर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. या निर्णयामुळे केवळ रुग्णांना सकस आहारासह जिल्ह्यातील हजारो महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची एक नवी व सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

लाइफ वॉचर्स तर्फे विद्यार्थ्यांसाठी जनजागृती परिसंवाद

राग नियंत्रण, समवयस्कांचा दबाव, शैक्षणिक ताण आणि अमली पदार्थांच्या गैरवापराबाबत मार्गदर्शन कल्याण : लाइफ वॉचर्सतर्फे युवकांमध्ये सामाजिक आणि शालेय आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग म्हणून एस.डी.टी. कलानी स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादात राग नियंत्रण, समवयस्कांचा दबाव, शैक्षणिक ताण आणि अमली पदार्थांच्या गैरवापरापासून बचाव या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. हा उपक्रम लाइफ वॉचर्सच्या स्कूल हेल्थ एज्युकेशन प्रोग्रामअंतर्गत, मनॊदय न्यूरोसायकट्रीक हॉस्पिटल, कल्याण यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अमित धर्माधिकारी यांनी राग समजून घेणे, भावनिक प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवणे तसेच समवयस्कांचा दबाव आणि शैक्षणिक ताण यांचा आरोग्यदायी पद्धतीने सामना करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच तरुणांमध्ये वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या आणि व्यसनांच्या समस्येबाबत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि योग्य व जबाबदार निर्णय घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. या परिसंवादातील एक महत्त्वपूर्ण संदेश होता — “अमली पदार्थांना ठामपणे ‘नाही’ म्हणायला शिका.” मित्र किंवा इतर व्यक्तींकडून अमली पदार्थ घेण्यासाठी दबाव आणला जात असल्यास आत्मविश्वासाने नकार कसा द्यावा, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अशा कठीण किंवा धोकादायक परिस्थितीत विश्वासू व्यक्ती, शिक्षक, पालक किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले. या संवादात्मक सत्रातून विद्यार्थ्यांना आपल्या भावनांना समजून घेणे, समवयस्कांचा दबाव ओळखणे आणि तणावपूर्ण परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी आरोग्यदायी सामोरे जाण्याच्या पद्धती तसेच समस्या निवारणाची कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. हा कार्यक्रम लाइफ वॉचर्सच्या संस्थापक डॉ. रुपिंदर कौर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला. त्या लाइफ वॉचर्सच्या शालेय आरोग्य शिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. शालेय जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून प्रतिबंधात्मक आरोग्य शिक्षण रुजवणे आणि बालक व किशोरवयीन मुलांच्या शारीरिक, भावनिक आणि सामाजिक आरोग्याचा सर्वांगीण विचार करणारे जनजागृती कार्यक्रम विकसित करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. कार्यक्रमाला लाइफ वॉचर्सचे सहसंस्थापक रत्नेश महाडिक यांचीही उपस्थिती होती. एस.डी.टी. कलानी स्कूलच्या मुख्याध्यापिका लीना मनुजा तसेच शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाला सहकार्य करून उपस्थिती दर्शवली. या उपक्रमाबाबत बोलताना डॉ. रुपिंदर कौर यांनी सांगितले की, योग्य वयात योग्य माहिती आणि मार्गदर्शन मिळाल्यास तरुणांना जबाबदार निर्णय घेण्यास मदत होते आणि त्यांना अधिक निरोगी, आत्मविश्वासपूर्ण आणि सक्षम भविष्य घडवता येते.

ईद-ए-मिलाद व रक्षाबंधनातून ‘एकतेचा धागा, सद्भावनेचा संदेश’

कल्याण : पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालय, मराठी शाळा आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत गफूर शेठ डोन उर्दू शाळेच्या संयुक्त विद्यमाने ‘सद्भावना संगम – ईद-ए-मिलाद व…

महिला आरक्षण विधेयकावरून भाजपा व मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिशाभूल

– विधेयक २०२३ मध्येच मंजूर –वर्षा गायकवाड मुंबई : महिला आरक्षण विधेयकाला राहुल गांधी व काँग्रेस पक्षाचा विरोध आहे असा खोटा आरोप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. काँग्रेस पक्षानेच महिला आरक्षणचा निर्णय देशात सर्वात आधी घेऊन तो लागूही केला पण भाजपाची महिला विरोधी मानसिता असल्यानेच २०२३ मध्ये संसदेत एकमताने महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊनही भाजपाचे काही बोलघेवडे नेते व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेची दिशाभूल करत आहेत, असे प्रत्युत्तर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिले आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महिलांना लोकसभा व विधानसभेत ३३% आरक्षण देणारे ‘संविधान (१०६ वी घटनादुरुस्ती) विधेयक’ २०२३ मध्ये संसदेत मंजूर झाले आहे, या विधेयकाला काँग्रेस पक्षासह विरोधी पक्षांनीही एकमुखाने पाठिंबा दिलेला आहे पण त्याची अंमलबजावणी मात्र भाजपाच्या नरेंद्र मोदी सरकारने अद्याप केलेली नाही. महिलांना आरक्षण देण्याची मानसिकता भाजपाची नाही. त्यांच्या मुळ विचारसरणीत आरक्षणाला विरोध आहे आणि महिलांबद्दलचा भाजपाचा दृष्टीकोन सर्वांना माहित आहे. महिला आरक्षण विधेयक मंजूर झालेले आहे पण आता भाजपा सरकार महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशन विधेयक मांडण्याचा प्रयत्न करत आहे. डिलिमिटेशन विधेयक हे देशाचे उत्तर व दक्षिण असे दोन तुकड्यात विभाजन करणारे विधेयक आहे म्हणून त्याला विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुद्धीभेद करू नये असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुण्यातील महिला विशेष छात्रों की गुंज कार्यक्रमात महिलांची सुरक्षा, अधिकार व त्यांच्या समस्यांवर चर्चा केली. ही चर्चा सर्व जाती धर्माच्या मुली व महिलांसाठी होती पण प्रत्येक गोष्टीकडे जात व धर्माच्या चष्म्यातून पाहण्याची विकृत मानसिकता भाजपाची असल्याने ते या मुद्द्यालाही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. छात्रों की गुंज कार्यक्रमात मुलींनी भाजपाला योग्य तो संदेश दिल्याने भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून बिथरलेला भाजपा राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप करत आहे, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या. ००००००

 आधारवाडी कारागृहात बंदींची शिपायासोबत धक्काबुक्की

 खडकपाडा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल कल्याण : आधारवाडी कारागृहात ई-मुलाखतीच्या कारणावरून दोन न्यायाधीन बंदींनी कारागृह शिपायासोबत धक्काबुक्की आणि झटापट केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत शिपाई राजू पोरे यांच्या खांद्याला दुखापत झाली. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी दोन्ही बंदींविरोधात बीएनएसच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, कारागृह शिपाई राजू पोरे हे सोमवारी बंदींच्या नातेवाईकांसोबत होणाऱ्या ई-मुलाखतीच्या कक्षात ड्युटीवर होते. विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी विक्रम ऊर्फ विकी राजेंद्र कवठणकर आणि हितेश ऊर्फ मोगली कवठणकर हे दोघे आधारवाडी कारागृहात न्यायाधीन बंदी म्हणून आहेत. दोन्ही बंदींच्या नातेवाईकांनी ई-मुलाखतीसाठी केलेल्या विनंतीला शिपाई पोरे यांनी मंजुरी दिली होती. मात्र, काही कारणामुळे ई-मुलाखत कनेक्ट होऊ शकली नाही. त्यामुळे दोन्ही बंदींना मुलाखत कक्षाबाहेर उभे राहण्यास सांगण्यात आले. मात्र, दोन्ही बंदी पुन्हा ई-मुलाखत कक्षात आले आणि तेथील लॅपटॉप उचलला. शिपाई पोरे यांनी त्यांना लॅपटॉप घेण्यास मनाई केली. यावरून दोन्ही बंदींनी पोरे यांच्या वर्दीला हात घालत त्यांच्यासोबत धक्काबुक्की व झटापट केली. यावेळी बंदींनी पोरे यांना कमरेला पकडून उचलण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्या खांद्याला दुखापत झाली. घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार शिपाई राजू पोरे यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही न्यायाधीन बंदींविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. ००००