Category: होम

ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचा ‘स्मॅश’ दबदबा

 – महाराष्ट्र राज्य ज्युनिअर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा ३ सुवर्णपदके तर एका ब्रॉंझ पदकाची कमाई” मुंबई येथील वरळीच्या  विलिंग्टन जिमखाना  येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा उल्लेखनीय आणि दिमाखदार कामगिरी करत ३ सुवर्ण पदके आणि १ कांस्य पदकाची कमाई केली. राज्यस्तरावरील स्पर्धांमध्ये सातत्याने पदकांची कमाई करत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीने महाराष्ट्रातील अग्रगण्य बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्र म्हणून आपला ठसा अधिक अधोरेखित केला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेअंतर्गत सराव करणाऱ्या खेळाडूंनी ही यशस्वी कामगिरी नोंदवली. मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्या मार्गदर्शनाखाली मयूर घाटणेकर,  अक्षय देवलकर,  मितेश हाजीरनीस,  राजीव गणपुळे,  एकेंद्र दर्जी,  प्रसेनजीत शिरोडकर आणि  देवांग दलाल यांच्या प्रशिक्षणाखाली खेळाडू सातत्याने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवत आहेत. १९ वर्षांखालील मिश्र दुहेरी गटात सानिध्य एकाडे याने शानदार खेळ करत सुवर्ण पदक पटकावले. उपांत्यपूर्व फेरी गाठण्यापूर्वी सानिध्य आणि त्याच्या जोडीदाराने उदयान साळुंखे व सारा साळुंखे यांचा पराभव केला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत सर्थक नलावडे व दितीशा सोमकुवर यांच्या विरोधात रंगलेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात २१-१४, २०-२२, २१-१८ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत ओजस जोशी व तन्वी घरपुरे यांच्या विरोधात पहिला गेम गमावल्यानंतर सानिध्यने दमदार पुनरागमन करत १२-२१, २१-१७, २१-१७ असा विजय मिळवला. अंतिम सामन्यात सयरा आणि सयाजी शेलार या जोडीवर २१-१४, २१-११ असा सरळ गेममध्ये विजय मिळवत सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली. १९ वर्षांखालील मुलांच्या दुहेरी गटात प्रथम मानांकित आर्यन बिराजदार आणि अर्जुन बिराजदार या जोडीने संपूर्ण स्पर्धेत अक्षरशः वर्चस्व गाजवत सुवर्ण पदक पटकावले. उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी आदित्य पुजारी व प्रसन्न मन्ना यांचा २१-१०, २१-१६ असा सहज पराभव केला. उपांत्य फेरीत अभिक शर्मा व स्वरित सातपुते या जोडीवर २१-१२, २१-१३ असा एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात आयुष अडे आणि तनय मेहेंदळे यांच्या विरोधातही त्यांनी आक्रमक आणि नियंत्रित खेळाचे प्रदर्शन करत २१-१२, २१-१४ असा दिमाखदार विजय मिळवून सुवर्ण पदकाची कमाई केली. तर अपूर्व दवाडते याने मिश्र दुहेरी गटात कांस्य पदकाची कमाई करत अकॅडमीच्या पदकतालिकेत आणखी भर घातली. गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे खेळाडू राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत असून, ठाणे शहराच्या क्रीडा क्षेत्राचा लौकिक उंचावत आहेत. खेळाडूंमधील शिस्त, मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि प्रशिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन यामुळे अकॅडमी महाराष्ट्रातील यशस्वी बॅडमिंटन केंद्र म्हणून ओळख निर्माण करत आहे. या स्पर्धेच्या यशामुळे सदर वर्षाच्या बॅडमिंटन खेळाच्या हंगामाची दणदणीत सुरुवात झाली आहे आणि या पुढील हंगामात केवळ राज्य नव्हे तर राष्ट्रीय  स्तरावर देखील ठाणे शहराचे नाव आपण मोठे करू असा विश्वास खेळाडूंनी व्यक्त केला आहे. खेळाडूंच्या या यशाबद्दल मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी समाधान व्यक्त करत आगामी राष्ट्रीय स्पर्धांमध्येही खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपायुक्त  मीनल पलांडे यांनी सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आर्यन, विराज, योगेश, राजेश, सेजल, तन्वी, रुबी ठरले सर्वोत्तम लिफ्टर

 मुंबई महापौर पॉवरलिफ्टिंग स्पर्धा मुंबई : कीर्ती कॉलेज , वीर सावरकर मार्ग, दादर (पश्चिम) येथे मुंबई महानगरपालिकेच्या सौजन्याने आणि मुंबई शहर पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई महापौर चषक…

मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने व खयालग्रुप यांच्या वतीने ५० वर्षावरिल पुरुष व महिला एकेरी कॅरम स्पर्धा ३० मे ते ३१ मे रोजी प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलनात घेण्यात येणार आहेत. तरी उपनगरातील खेळाडूंनी २६ मेपर्यत संतोष चव्हाण मो. नं  ९७६९२९२९२६ यांच्या बरोबर संपर्क साधावा.

– वियोम फाऊंडेशन विरुद्ध ऑसम अंधेरी यांच्यात अंतिम लढत

 मुंबई महापौर चषक इनडोअर क्रिकेट स्पर्धा  श्रेयसची घातक गोलंदाजी; ४ बळी घेत वियोमला फायनलमध्ये पोहोचवले मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील पार्क क्लबच्या अर्बन स्पोर्ट टर्फवर सुरू असलेल्या भव्य ‘मुंबई महापौर चषक इनडोअर क्रिकेट स्पर्धे’त आता अंतिम सामन्याची रंगत शिगेला पोहोचली आहे. पहिल्या उपांत्य फेरीत ऑसम अंधेरी इनडोअर क्रिकेट क्लबने अत्यंत थरारक लढतीत ओर्नेट क्रिकेट क्लबवर शेवटच्या चेंडूवर ४ धावांनी निसटता विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात वियोम फाऊंडेशन इनडोअर क्रिकेट क्लबने एसएसए स्टायकर्सवर १४ धावांनी दणदणीत विजय नोंदवत अंतिम फेरीत शानदार प्रवेश केला. या स्पर्धेला सरस्वत बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, नितीन दलाल – स्टार सीसी आणि श्री स्वामी समर्थ मेडिकल यांचे सहकार्य लाभले आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात ऑसम अंधेरी इनडोअर क्रिकेट क्लबने ओर्नेट क्रिकेट क्लबवर ४९-४५ असा थरारक विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना ओर्नेटच्या आकाश आणि रजनीश यांनी २४ धावांची दमदार सुरुवात करून संघाला भक्कम पाया रचून दिला. त्यानंतर अभिजित आणि कमलेश यांनी १४ धावा जोडल्या, तर अक्षिश आणि अश्विन यांनी १२ धावांची भर घातली. मात्र शेवटच्या जोडीतील घसरणीमुळे ओर्नेटला ४५ धावांपर्यंतच मजल मारता आली. ४६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑसम अंधेरीकडून मोनू आणि मयांक यांनी १७ धावांची सुरुवात केली. त्यानंतर रोहित आणि अहमद यांनी १८ धावा फटकावत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात ऑसम अंधेरीने ४९ धावा करत अंतिम फेरीत धडक मारली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात वियोम फाऊंडेशन इनडोअर क्रिकेट क्लबने एसएसए स्टायकर्सवर ४२-२८ असा दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या वियोमने सुरुवातीपासून एसएसएवर दबाव निर्माण केला. एसएसएच्या पहिल्या जोडीतील नितीश आणि सिकंदर यांना खातेही उघडता आले नाही. त्यानंतर विल्सन आणि विजय यांनी १४ धावा केल्या, तर नितीन आणि विश्वनाथ यांनी २९ धावांची आक्रमक भागीदारी केली. मात्र शेवटच्या जोडीतील सुयोग आणि संदेश यांना श्रेयस आणि शुभम यांच्या अचूक गोलंदाजीसमोर मोठा फटका बसला आणि संघ २८ धावांवर रोखला गेला. वियोमकडून श्रेयसने ४ बळी घेत सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाजी केली, तर रोहनने २ बळी घेतले. प्रसाद आणि शुभम यांनी प्रत्येकी १ बळी घेत महत्त्वाचे योगदान दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना अनिकेत माडीये आणि रोहन गावडे यांनी १५ धावांची सावध सुरुवात करत वियोमला स्थिरता मिळवून दिली. त्यानंतर श्रेयस वैद्य आणि अजित सेठी यांनी १० धावांची भर घालत विजयाचा पाया मजबूत केला. कर्णधार ओमकार पाटोळे आणि प्रसाद आंब्रे यांनी संयमी फलंदाजी करत संघाला विजयाच्या जवळ पोहोचवले. अखेरीस शुभम गुरव आणि सिद्धेश घोगरे यांनी ७ महत्त्वाच्या धावा जोडत संघाला १४ धावांनी शानदार विजय मिळवून दिला. आता स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वियोम फाऊंडेशन आणि ऑसम अंधेरी इनडोअर क्रिकेट क्लब यांच्यात विजेतेपदासाठी जबरदस्त लढत रंगणार असून, क्रिकेट प्रेमींमध्ये या सामन्याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

कर्जतच्या आगरी समाज सभागृहाचे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते शानदार उदघाटन

आगरी समाजाच्या विकासाला माझे सर्वप्रथम प्राधान्य : महेंद्रशेठ घरत उलवा : कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या वातानुकूलित भव्य सभागृहाचे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते शनिवारी शानदार उदघाटन करण्यात आले. या समारंभाला बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य बाबूशेठ घारे, उद्योजक मयूर पिसे आदी मान्यवर उपस्थित होते. कर्जतच्या आगरी समाज सभागृहाचे संपूर्ण अत्याधुनिक नूतनीकरण यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी १२ लाख ५० हजार रुपये सढळ हस्ते केलेल्या देणगीतून करण्यात आले आहे. त्यामुळे कर्जत तालुका आगरी समाज संघटनेतर्फे महेंद्रशेठ घरत यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला. “महेंद्रशेठ घरत हे आगरी समाजातील आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे नेतृत्व करणारे अवलिया आणि दानशूर व्यक्तिमत्त्व आहेत, याचा कर्जतच्या आगरी समाजाला अभिमान आहे,” असे कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “मला आगरी असल्याचा सार्थ अभिमान आहे. आपला समाज मेहनतीने आणि सन्मानाने जगण्याला अधिक प्राधान्य देतो. कुणापुढे कारण नसताना झुकत नाही. ताठ कण्याचा आपला समाज मला प्रिय आहे. त्यामुळे आगरी समाजाच्या उत्कर्षासाठी मी सर्व प्रकारचे सहकार्य करतो. समाजाच्या मागे मी कायमच खंबीरपणे उभा आहे आणि राहीन. कर्जतचा आगरी समाज संघटित होऊन समाजाच्या भल्यासाठी प्रयत्न करतोय. त्यामुळे कर्जतच्या आगरी समाजावर माझे विशेष प्रेम आहे. त्यांच्यासाठी माझा मदतीचा हात कायमच राहील. मी जागतिक पातळीवर कामगारांचे नेतृत्व करीत आहे. त्यामुळे जगभर फिरतो; परंतु मी माझ्या गावाच्या विकासाबाबत संवेदनशील आहे. आज राज्यात रोल मॉडेल ठरेल, असा माझ्या शेलघर गावाचा सुनियोजित विकास मी करून घेतला आहे. आज तिथे ग्रामस्थांना बोट ठेवायला जागा नाही. मी जिल्हा परिषद सदस्य असताना गावोगावी जलकुंभ बांधून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतविला. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावर अभ्यास करून अधिकाऱ्यांवर वचक ठेवला आणि विकासात्मक कामे करून घेतली. रायगडमध्ये सी. डी. देशमुख यांच्यानंतर मी जगाच्या व्यासपीठावर नावलौकिक मिळवतोय. तिथेही मी त्या त्या देशांच्या कामगार नेत्यांवर वचक ठेवून आहे.” या समारंभाला बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य बाबूशेठ घारे, उद्योजक मयूर पिसे, कर्जत पंचायत समिती सदस्य भगवान चंचे, नितीन धुळे, रेश्माताई जोशी, मंगेश म्हसकर, विपूल पाटील, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. हा समारंभ हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील सामाजिक सभागृह नेरळ-बोपेले येथे पार पडला. यावेळी कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे, माजी अध्यक्ष नागो गवळी, एकनाथ धुळे, सावळाराम जाधव, कर्जत तालुका काँग्रेस अध्यक्ष संजय गवळी, उरण तालुका प्रमुख विनोद म्हात्रे, किरीट पाटील, वैभव पाटील, निखिल ढवळे आणि एम. जी. ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. यावेळी जितेंद्र गवळी यांनी सूत्रसंचालन केले, तर भरत भगत यांनी प्रास्ताविक केले.

सद्भावना वृद्धाश्रमात निराधार वृद्धांना मोफत आधार

 अंथरुणाला खिळलेल्यांसाठीही विशेष सेवा रमेश औताडे मुंबई : वाढते शहरीकरण, तुटत चाललेली संयुक्त कुटुंब व्यवस्था आणि वृद्धांकडे होणारे दुर्लक्ष या पार्श्वभूमीवर गुजरातमधील राजकोट येथे उभारण्यात आलेला “सद्भावना वृद्धाश्रम” अनेक निराधार वृद्धांसाठी आशेचा किरण ठरत आहे. “जगातील सर्वात मोठा वृद्धाश्रम” असा दावा करण्यात आलेल्या या प्रकल्पामध्ये निराधार, आजारी, अंथरुणाला खिळलेले तसेच कर्करोग आणि कोमाग्रस्त वृद्धांना पूर्णपणे मोफत निवारा, वैद्यकीय उपचार आणि मानवी आधार दिला जात आहे. विनुभाई बघुभाई नारोळा यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या वृद्धाश्रमात वृद्धांना केवळ राहण्याची सोय नाही, तर त्यांना सन्मानाने जगण्याची संधी दिली जात आहे. तब्बल ४०० खाटांची व्यवस्था असलेल्या या प्रकल्पात सध्या ७०० हून अधिक ज्येष्ठ नागरिक राहत असून, अनेक वृद्धांना आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात माणुसकीचा आधार मिळत आहे. वृद्धाश्रमामध्ये नियमित आरोग्य तपासणी, फिजिओथेरपी, मानसिक समुपदेशन, पौष्टिक आहार, औषधोपचार आणि मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांसाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला असून, प्रशिक्षित कर्मचारी दिवस-रात्र सेवा देत आहेत. कर्करोग आणि कोमामध्ये असलेल्या रुग्णांसाठी विशेष काळजी घेतली जात असल्याचे संस्थेने सांगितले. संस्थेच्या माहितीनुसार, वृद्धाश्रमात धर्म, जात, भाषा किंवा आर्थिक स्थिती न पाहता गरजू वृद्धांना प्रवेश दिला जातो. “प्रत्येक वृद्धाला कुटुंबासारखी वागणूक मिळाली पाहिजे,” या भावनेतून संपूर्ण प्रकल्प उभारण्यात आल्याचा दावा संस्थेने केला आहे. या परिसरात मोठे सभागृह, वाचनालय, आध्यात्मिक कार्यक्रमांसाठी जागा तसेच विरंगुळ्यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. वृद्धांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमही आयोजित केले जातात. समाजातील नागरिकांनी निराधार, असहाय्य किंवा अंथरुणाला खिळलेले वृद्ध आढळल्यास त्यांना सद्भावना वृद्धाश्रमात आणण्यासाठी मदत करावी, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे. “कोणीही वृद्ध एकटा राहू नये,” हा संदेश देत हा प्रकल्प सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

योगीधाम चौक ते सिटिपार्क रस्त्याच्या कामाची नगरसेविका अनघा देवळेकर यांनी केली पाहणी                                                

कल्याण :  कल्याण पश्चिमेतील योगीधाम चौक ते सिटी पार्क कडे जाणाऱ्या रस्त्याचे क्राँक्रटीकरणाचे काम सुरु असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी  या रस्त्याचे काम पुर्ण होण्यासाठी शिवसेना नगरसेविका अनघा  देवळेकर यांनी अधिकारी आणि,कार्यकर्ता सह पाहणी…

ठाणे अग्निशमन दलातील सुविधांबाबत

नगरसेविका नम्रता कोळी यांची लक्षवेधी ठाणे : गावदेवी मंडईतील आगीच्या पार्श्वभूमीवर ठाणे अग्निशमन दलातील सुविधा व क्षमता आणि शहरातील सरकारी व महापालिकेच्या इमारतींच्या अग्निसुरक्षेबाबत भाजपच्या नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्याकडे लक्षवेधी सूचना सादर केली आहे. तसेच आगामी महासभेत चर्चा करण्यासाठी परवानगी देण्याची विनंती केली आहे. गावदेवी मंडईतील दुर्घटनेत अग्निशमन दलाचे स्थानक अधिकारी व एका सुरक्षारक्षकाला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेनंतर गावदेवी मंडईत आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन सुविधा नसल्याचे लक्षात आले होते. ठाणे शहरात वेगाने नागरीकरण होत असून बहुमजली इमारतींचे जाळे निर्माण झाले आहे. या परिस्थितीत ठाणे अग्निशमन दलाच्या आधुनिकीकरणाची आवश्यकता आहे. एकीकडे अग्निशमन दलात अनेक पदे रिक्त असताना, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अग्निशमन दलावर ताण येत आहे. बदलत्या काळानुसार आग लवकर आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल सुसज्ज असण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीकोनातून महासभेत चर्चा करावी, अशी मागणी नगरसेविका नम्रता कोळी यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली आहे. गावदेवी मंडईतील दुर्घटनेनंतर महापालिका मुख्यालयासह इतर कार्यालयीन संकुले, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व महापालिकेची इतर रुग्णालये, आरोग्य केंद्रे, शहरातील इतर सर्व भाजी मंडई आणि विविध इमारतींमधील फायर सुरक्षांचा आढावा घ्यावा. महापालिकेच्या प्रत्येक संकुलाचे फायर ऑडिट करणे गरजे आहे. त्यादृष्टीकोनातूनही लक्षवेधी सूचनेवर चर्चा करावी, अशी मागणी नगरसेविका नम्रता कोळी यांनी केली आहे.