Category: होम

कल्याणात टँबेबुइया झाडांवर विषप्रयोगाचा संशय

ड्रिल करून इंजेक्शन सदृश्य द्रव्य टाकल्याचा संशायास्पद प्रकाराने खळबळ कल्याण  : कल्याण पश्चिमेतील गणपती चौक ते डी बी चौक दरम्यान असलेल्या टँबेबुइया झाडांवर अज्ञात व्यक्तींनी ड्रिल मारून इंजेक्शनसदृश्य द्रव्य टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक प्रकराचा व्हिडीओ सोशल मिडिया वर व्हायरल झाल्याने  घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पर्यावरणप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. कल्याण पश्चिम गणपती चौक ते डी बी चौक दरम्यान असलेल्या सात ते आठ टँबेबुइया झाडांच्या खोडांमध्ये ड्रिल मशीनच्या सहाय्याने छिद्रे करण्यात आली होती. या छिद्रांमधून काही द्रव्य इंजेक्ट केल्याचा संशय व्यक्त केला जात असून झाडांना जाणीवपूर्वक नुकसान पोहोचवण्यात आल्याच्या चर्चा रंगल्या असून घटनेची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. संबंधित झाडांची पाहणी करण्यात आली असून या प्रकारामागे नेमके कोण आहे याचा शोध घेतला जात आहे. अज्ञात व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकारी सुत्रांनी माहिती दिली.  शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या आणि पर्यावरणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या झाडांवर अशा प्रकारे हल्ला झाल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दोषींना तात्काळ शोधून कठोर कारवाईची मागणी यानिमित्ताने जोर धरू पाहत आहे. केडीएमसी मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव यांच्या शी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, घटनास्थळी जात पंचनामा करीत त्याअंती याप्रकरणी गुन्हा दाखल करणार आहोत. तर केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी यांनी या घटनेची दखल घेत चौकशी, कारवाई चे आदेश दिले असल्याचे संपर्क साधला असता सांगितले.

कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या शाखा बैठकीदरम्यान गोंधळ

६०-७० जणांचा प्रवेश, वातावरण बिघडले कल्याण : मंगळवारी रात्री कल्याण पूर्व जिल्ह्यातील कोळसेवाडी परिसरात शिवसेनेच्या (ठाकरे गटाच्या) शाखा बैठकीदरम्यान मोठा गोंधळ उडाला. बैठकीत महत्त्वाच्या संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना अचानक सुमारे ६० ते ७० जण शाखेच्या आवारात घुसले आणि त्यांनी संपूर्ण वातावरण बिघडवले. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले, ज्यामुळे परिसरात तणाव पसरला. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या (ठाकरे गटाच्या) सह-संपर्क प्रमुखांच्या उपस्थितीत बैठक सुरू होणार होती, तेव्हाच हा वाद सुरू झाला. शाखा प्रमुख सोमनाथ भोईर आणि देवेंद्र प्रसाद यांनी आरोप केला आहे की, जिल्हाप्रमुख आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला केला. शाखा प्रमुख सोमनाथ भोईर यांनी गंभीर आरोप केले आहेत की, जिल्हा प्रमुख शरद पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी कट रचून बाहेरून ६०-७० तरुणांना बोलावले होते. त्यांचा दावा आहे की, यापैकी अनेक तरुण नशेत होते आणि त्यांचा पक्षाशी काहीही संबंध नव्हता. भोईर म्हणाले की, या लोकांनी शाखेत घुसून त्यांच्यावर आणि देवेंद्र प्रसाद यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. देवेंद्र प्रसाद यांनीही या घटनेवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, ते गेल्या २० वर्षांपासून पक्षाशी संबंधित आहेत, परंतु अंतर्गत वादामुळे त्यांना लक्ष्य करण्यात आले. ते म्हणाले की, ही घटना निष्ठावान कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय आहे. दुसरीकडे, जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, संघटनात्मक आणि निवडणुकीच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी झालेल्या बैठकीदरम्यान केवळ किरकोळ बाचाबाची आणि झटापट झाली होती. त्यांच्या मते, कोणतीही गंभीर हिंसा झाली नाही आणि ही संपूर्ण घटना जुन्या राजकीय मतभेदांचा परिणाम होती. या घटनेनंतर कोळसेवाडी परिसरात राजकीय गोंधळ वाढला आहे. पक्षांतर्गत वाद उघडकीस आल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. आता सर्वांचे लक्ष पक्ष नेतृत्वाच्या या भूमिकेकडे लागले आहे.

 झैद – समृद्धीला अग्र मानांकन

 एम सी एफ कॅरम स्पर्धा मुंबई:महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटना यांच्या मान्यतेने २३ ते २५ मे दरम्यान ११ वी एम सी एफ राज्य मानांकन कॅरम स्पर्धा…

माथेरानचे स्वच्छतादूत राकेश कोकळे यांचा गोव्यात सत्कार

मुकुंद रांजणे माथेरान : माथेरानच्या निसर्गावर निस्सीम प्रेम असणारे भूमिपुत्र राकेश कोकळे यांनी मागील काही वर्षांपासून येथील प्लास्टिक कचरा गोळा करून तो नगरपालिका मध्ये जमा करत असतात. पर्यावरण प्रेमी अवलिया अशीच ओळख निर्माण करून आजपर्यंत गावातील बहुतेक ठिकाणी आपल्या मित्र परिवार सोबत जाऊन वेळप्रसंगी कड्याकपारीत स्वतः उतरून प्लास्टिक बाटल्या, रपेर्स, तसेच अन्य प्लास्टिक जन्य कचरा नियमितपणे गोण्यांमध्ये संकलन करून नगरपालिका सफाई कामगार यांच्या मार्फत योग्य स्थळी हलविण्यात येत आहे. त्यांच्या या निस्सीम कार्याची दखल घेऊन गोवा येथील लायन्स इंटरनॅशनल यांच्या वतीने माथेरानचे स्वच्छतादूत तथा धनगर समाजाचे अध्यक्ष  राकेश विलास कोकळे यांचा १९ रोजी गोवा राज्यात स्वच्छतेच्या कार्याबद्दल विशेष सत्कार पद्मश्री पुरस्कार विजेते तसेच एक्स BARC शास्त्रज्ञ आणि पर्यावरण तज्ज्ञ डॉ. शरद काळे तसेच लायन्स क्लबचे  मुर्तुजा ताहेर माथेरानवाला यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. राकेश कोकळे हा एक ध्येयवेडा असून त्याचा स्वच्छता बाबतीत खूपच कटाक्ष आहे. प्रत्येक पॉईंट्स वर जाऊन तेथील जंगल भागातील परिसराची पाहणी करून जेवढ्या प्रमाणात प्लास्टिक जन्य कचरा असेल तो गोळा करण्यासाठी आपल्या मित्र परिवार सोबत नेहमीच तत्पर असतो त्याच्या या निस्वार्थ कृतीचा सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. ०००००००००

आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

केडीएमसी आरोग्य विभाग, आयएमएच्या वतीने कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभाग व आयएमए कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन  कार्यशाळेचे आयोजन मंगळवारी आचार्य अत्रे रंगमंदिर येथे करण्यात आले होते.…

 बँक एक, खाती अनेक; सर्व खात्यांना वारसदार अशोक खरात

ईडीकडून आता खरातला पाहुणचार हरिभाऊ लाखे नाशिक – भल्याभल्यांची मती गुंग करुन त्यांची आर्थिक फसवणूक आणि शेकडो महिलांचे लैंगिक शोषण करणारा नाशिक जिल्ह्यातील भोंदू अशोक खरातची आता ईडी चौकशी होणार आहे. अशोक खरातचा ताबा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) घेतला असून ईडीचे विशेष पथक त्याला नाशिकहून मुंबईकडे घेऊन गेले. अशोक खरातला पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले असता आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने कोठडीची मागणी केली होती, ईडी विरोधात कोणतीही तक्रार नसल्याचे अशोक खरातने कोर्टात सांगितले. ईडीकडून अनेक बाबी मांडण्यात आल्या. त्यात समता नागरी क्रेडिट सोसायटीमध्ये अशोक खरातने अनेकांच्या नावाने ६३ खाती उघडली, परंतु, त्या सर्व खात्यांना नंबर खरातचा जोडला होता. वारसदार म्हणून अशोक खरातचे नाव होते. सर्व खात्यांचा लाभार्थी देखील अशोक खरात होता. कोट्यवधी रुपये बँकांमध्ये रोख स्वरुपात भरण्यात आले. आणि तसेच ते काढलेही गेले. इतक्या खात्यांमध्ये एवढे पैसे कुठून आले आणि ते कुठे गेले, असा प्रश्न उपस्थित करुन या पैशांच्या शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत आम्हाला पोहोचायचे आहे. या प्रकरणात अजून कोणाचा सहभाग आहे, हा सर्व तपास करणे बाकी आहे. पैसे भरण्याची कोणतीही (डिपॉझिट स्लिप: पावती न भरता रोखपालाच्या (कॅशियर) मदतीने थेट रोकड खात्यांमध्ये जमा करण्यात आली. एका संस्थेचा तर खरातच अध्यक्ष होता, यादरम्यान ३४ बेनामी एफडी खाती उघडण्यात आली. रोख स्वरुपातच संबंधित खात्यांमधून पैसे काढले गेले. २०१४-२०२४ या कालावधीत हा सर्व उद्योग सुरु होता. एफडीचे पैसे अशोक खरातकडेच पुन्हा आल्याने तोच मुख्य आरोपी आहे, असा युक्तीवाद ईडीकडून करण्यात आला. खरात याच्या पत्नीच्या खात्यात आणि तिच्या नावाने देखील मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि मालमत्ता दाखविण्यात आली आहे. बँक अधिकाऱ्यांकडे चौकशी करणे बाकी आहे. आरोपींची चौकशी करणे गरजेचे असल्याचे ईडीने नमूद केले. ६० नावे वापरून बँक खाती उघडल्याचा आरोप आहे. सर्व खातेदारांनी खरातलाच कसे वारसदार केले, असा प्रश्न न्यायालयाने खरातच्या वकिलांना विचारला असता खरातच्या वकिलांनी, हा काही गुन्हा नाही. १० दिवसांच्या कोठडीची गरज नाही, असा युक्तिवाद केला.. खरातला त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांसंदर्भात विचारणा करण्यात आली. त्यावेळी साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे राहत खरातने स्वतःची बाजू मांडली. बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापक यांनी मला काही पैसे आल्याचे सांगितले होते. आवारे यांनी पैसे बँकेत ठेवल्यास ९ टक्के व्याज मिळेल, असे सांगितले. याशिवाय मला कोणतीही माहिती नाही. फक्त व्याज चांगले मिळते म्हणून व्याजासाठी हे केले, असे खरातने सांगितले. खरातला २६ मेपर्यंत ईडी कोठडी अशोक खरातला २६ मेपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने १० दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने सहा दिवसांची कोठडी दिली. कोठडीत चौकशी दरम्यान खरातकडून ईडीला काही वेगळी माहिती मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत न्यायालय, पोलीस कोठडी, न्यायालयीन कोठडी अशा फेऱ्या मारणाऱ्या अशोक खरातला आता ईडीचाही पाहुणचार करावा लागणार आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा

विक्रोळीत ३५० टनांचा कटरहेड उतरवला ठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार पडला असून मुंबईतील विक्रोळी येथे टनेल बोरिंग मशीन (TBM) चा ३५० टन वजनाचा पहिला कटरहेड…

 पार्किंगच्या वादातून कल्याण न्यायालयात वकिलाला पोलिसाची मारहाण

गुन्हा दाखल करत कारवाई करण्याचे जिल्हा न्यायाधीशांचे आदेश कल्याण : पार्किंगच्या वादातून कल्याण न्यायालयात पोलिसाने वकिलाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर सर्व वकिलांनी या मारहाणीचा तीव्र निषेध व्यक्त केला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करत कारवाई करण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीशांनी दिले आहेत. कल्याण न्यायालयात वकील प्रशिक अडांगळे हे मागच्या गेटने बाहेर जात होते. याठिकाणी चौधरी नामक पोलीस कर्मचारी होते. पार्किंग मध्ये असलेली गाडी काढताना पोलिसाने दारू पिऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप वकील प्रशिक अडांगळे यांनी केला असून याबाबत प्रिन्सिपल जज यांना तक्रार केली असून पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर कल्याण क्रिमिनल बार असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनीही निषेध नोंदवला. असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट विनोद गोविल यांनी सांगितले की, संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी करत सत्र न्यायाधीशांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, महात्मा फुले पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सिंग परदेशी यांनी सांगितले की, वाहनांना गेटमधून बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. त्यांच्या मते, वकील आणि पोलीस अधिकारी यांच्यातील वादाचे हेच कारण होते. दोन्ही पक्षांच्या तक्रारींच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. सूत्रांनुसार, जिल्हा न्यायाधीशांनीही ही घटना गंभीर घेत या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत. ०००००००००००००

कडाव ग्रामपंचायतीचा कथित गैरकारभार उघड

माणकिवली ग्रामस्थ, आदिवासी बांधव आणि शेतकरी आक्रमक रायगड- कर्जत: (अशोक गायकवाड )–कर्जत तालुक्यातील कडाव ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, डंपिंग ग्राउंड उभारण्याच्या प्रस्तावावरून ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक ग्रामस्थ, आदिवासी बांधव आणि शेतकरी यांची दिशाभूल करून ग्रामपंचायतीकडून मनमानी व बेकायदेशीर कारभार केला जात असल्याचे आरोप आता उघडपणे समोर येत आहेत. कडाव ग्रामपंचायतीने २७ जून २०२५ रोजी झालेल्या ग्रामसभेतील ठराव क्र. ४/९ चा आधार घेत माणकिवली गावाच्या रस्त्यालगत असलेल्या गुरचरण जागेवर डंपिंग ग्राउंड उभारण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. ग्रामपंचायतीच्या म्हणण्यानुसार हा प्रकल्प सर्व्हे क्रमांक १३७/१७ या जागेवर प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत गंभीर विसंगती आणि दिशाभूल झाल्याचे आता उघड होत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सदर ठरावाबाबत ग्रामपंचायतीतील अनेक सदस्यांनाच माहिती नसून, त्यावेळचे सरपंच, उपसरपंच असलेल्या सदस्यांना देखील या निर्णयाची कल्पना नाही. विशेष म्हणजे ज्या वॉर्डामध्ये डंपिंग ग्राउंड उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे त्या वॉर्डातील प्रतिनिधींनाही या ठरावाची माहिती नसल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे हा ठराव प्रत्यक्ष ग्रामसभेत मंजूर झाला होता का, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. याशिवाय, डंपिंग ग्राउंडसाठी सांगण्यात आलेल्या सर्व्हे क्रमांकाबाबतही धक्कादायक माहिती समोर आली आहे. ग्रामपंचायतीने ज्या सर्व्हे क्रमांक १३७/१७ चा उल्लेख केला आहे, ती जागा सुमारे ६६०.८० हे.आर. चौ.मी. क्षेत्रफळाची असून ती प्रत्यक्षात माणकिवली गावाच्या रस्त्यालगत नसून कडाव गावाच्या बाहेरील गुरचरण क्षेत्रात असल्याचे सांगितले जात आहे. तर माणकिवली गावालगत असलेल्या जागेचा वास्तविक सर्व्हे क्रमांक १३७/१३ असल्याचे समोर आले आहे. ही जागा सुमारे २०० हे.आर. चौ.मी. क्षेत्रफळाची असून ती “सकस आहार” योजनेसाठी राखीव असल्याची माहिती सातबाराच्या नोंदीत नमूद आहे. तसेच जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेश क्रमांक मशा/जमीन/घ-२/९८६६५/०८ दि. १९ डिसेंबर २००८ नुसार या जमिनीपैकी ०.२००० हे.आर. क्षेत्र कडाव मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानासाठी राखीव असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, एका जागेच्या सर्व्हे नंबरवर ठराव मंजूर करून प्रत्यक्षात दुसऱ्याच जागेवर डंपिंग ग्राउंड उभारण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे केवळ ग्रामस्थ, आदिवासी बांधव आणि शेतकरी यांचीच नव्हे तर पोलीस प्रशासनाची देखील दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे माणकिवली गावात संतापाची लाट पसरली असून ग्रामस्थांनी ग्रामपंचायत विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामस्थ आणि आदिवासी बांधवांनी घेतलेल्या बैठकीत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच ग्रामस्थांच्या विरोधाला डावलून डंपिंग ग्राउंड उभारण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

जलद संवादासाठी टाटा तंत्रज्ञानाची नवी घोषणा

मुंबई / रमेश औताडे टाटा सन्सची प्रमुख उपकंपनी असलेल्या टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि जगातील नंबर एक एआय सीआरएम कंपनी असलेल्या सेल्स फोर्सने टीआरआयएलच्या संपूर्ण पोर्टफोलिओमध्ये ग्राहक संवाद सुधारण्यासाठी सेल्स फोर्सच्या एजंटफोर्स प्लॅटफॉर्मच्या यशस्वी उपयोजनाची घोषणा केली आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे ग्राहकांशी संवाद अधिक जलद आणि सोपा झाला आहे. असे गिरीश हड़कर, टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, अरुंधती भट्टाचार्य, प्रेसिडेंट आणि सीईओ, साउथ एशिया सेल्सफोर्स आणि मनकिरन चौहान एमडी यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितले. या भागीदारीबद्दल संजय दत्त, टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड चे एमडी आणि सीओ यांनी सांगितले की, सेल्सफोर्स सोबतच्या आमच्या भागीदारीमुळे आम्हाला डेटा, इंटेलिजन्स आणि ऑटोमेशन यांना एकाच सिस्टीममध्ये आणता आले. अरुंधती भट्टाचार्य, प्रेसिडेंट आणि सीईओ, साउथ एशिया  सेल्सफोर्स यांनी सांगितले की, कोणतेही तंत्रज्ञान वापरताना सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा असतो की ते खरोखर ग्राहकाला अधिक चांगली सेवा देते का? टाटा रियल्टीच्या बाबतीत याचे उत्तर स्पष्ट आहे. प्रीमियम प्रकल्प आणि ग्राहक-केंद्रित कामासाठी ओळखली जाणारी टीआरआयएल आता आपले कामकाज आणि ग्राहक सेवा आणखी मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. पुढील टप्प्यात, कंपनी आपल्या कमर्शियल रिअल इस्टेट व्यवसायातही सेल्सफोर्सचा विस्तार करत आहे. तसेच रेसिडेन्शियल विभागात एजंटफोर्स मार्केटिंग आणि डेटा ३6० च्या मदतीने अधिक वैयक्तिकृत सेवा आणि ग्राहकांविषयी सखोल माहिती देण्यावर भर दिला जात आहे.