Category: मुंबई

Mumbai news

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दीर्घायुष्यासाठी श्री पुष्टीपती गणेश मंदिरात महाआरती

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सलग पंतप्रधानपद भूषविण्याचा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मागाठाणे विधानसभेतर्फे श्री पुष्टीपती गणेश मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले…

 भांडुपकरांची पाण्यासाठी वणवण

– पालिकेच्या निष्काळजीपणाविरोधात जल अभियंत्यांकडे धाव  डोंगराळ भागातील नागरिकांचा संताप उफाळला! मुंबई : भांडुप विधानसभा क्षेत्रात पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, विशेषतः डोंगराळ भागातील रहिवाशांना अपुऱ्या व कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याचा मोठा फटका बसत आहे. अनेक ठिकाणी नळांना अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने ते डोंगराळ भागात पोहोचत नाही. परिणामी नागरिकांना पिण्याचे व दैनंदिन वापराचे पाणी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून पालिका प्रशासनाच्या कारभाराविरोधात नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर भांडुपमधील पाणीपुरवठा व प्रभागातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज वरळी येथे जल अभियंता दिलीप पाटील यांच्या दालनात संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला नगरसेवक सुरेश शिंदे,  नगरसेविका दिपमाला बडे, राजोल संजय पाटील, शाखाप्रमुख राजेश कदम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत भांडुपमधील डोंगराळ भागात पाणी पुरेशा दाबाने पोहोचत नसल्याचा मुद्दा अत्यंत ठामपणे मांडण्यात आला. अनेक वर्षांपासून नागरिक या समस्येला सामोरे जात असताना पालिका प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची खंत उपस्थितांनी व्यक्त केली. विशेषतः उंच भागातील वस्त्यांमध्ये नळांना पाणीच न येणे किंवा अत्यल्प दाबाने येणे ही बाब प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचे द्योतक असल्याचा आरोप करण्यात आला. लोकप्रतिनिधींनी जल अभियंत्यांकडे डोंगराळ भागात पाणी वरपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र पंपिंग व्यवस्था, जलवाहिन्यांचे सक्षमीकरण तसेच कमी दाबाच्या भागांसाठी विशेष तांत्रिक उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी केली. तसेच खालच्या भागातही जास्तीत जास्त आणि नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याची आवश्यकता असल्याचे प्रभाग क्र. ११४ च्या नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी सांगितले. दरम्यान, भांडुपकरांना मूलभूत गरज असलेल्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना पालिका प्रशासन मात्र केवळ बैठका व आश्वासनांपुरतेच मर्यादित राहिल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. उन्हाळ्यात आणि वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. बैठकीत नागरिकांच्या पाणीप्रश्नावर तातडीने कार्यवाही करून डोंगराळ भागातील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. आता पालिका प्रशासन प्रत्यक्ष कृती करून भांडुपकरांचा पाणीप्रश्न सोडवते की पुन्हा एकदा आश्वासनांचीच मालिका सुरू राहते, याकडे संपूर्ण भांडुपकरांचे लक्ष लागले आहे.

शिक्षण धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

प्रति शिक्षणमंत्र्याला चपलांचा हार ठाणे-देशभरात नीट पेपर फुटी प्रकरण चांगलेच गाजले आहे या पाठोपाठच सीबीएससी पेपर घोटाळा देखील उघडकीस आला असून यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे यात काही…

 स्कॉर्पिओला कट मारण्याच्या वादातून गोळीबार

 भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला लागली गोळी दोन गटांतील सहा जण अटकेत कल्याण : कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी येथील तुलसा पार्क इमारतीसमोर स्कॉर्पिओला स्कुटीने कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे हिंसक रूपांतर झाले. दोन गटांतील हाणामारीदरम्यान झालेल्या गोळीबारात भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला गोळी लागली. जखमीवर डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असून, कोळसेवाडी पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या तक्रारीवरून स्वतंत्र गुन्हे दाखल करून सहा आरोपींना अटक केली आहे. तसेच दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास प्रेम अजय सिंह उर्फ गुंडा यांच्या स्कॉर्पिओला सुदर्शन संजीव निकाळे उर्फ बुंदी यांच्या स्कुटीने कट मारल्याने दोन्ही गटांमध्ये वाद झाला. हा वाद वाढत जाऊन तुलसा पार्क इमारतीसमोर दोन्ही गट आमनेसामने येत हाणामारी सुरू झाली. यावेळी प्रेम सिंहच्या गटातील ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानू रमेश राठोड याने कथितरित्या देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार केला. भांडण सोडवण्यासाठी गेलेले चक्की नाका येथील राहुल अशोक वर्मा यांच्या कमरेखाली गोळी लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदर्शन निकाळे यांच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात प्रेम अजय सिंह उर्फ गुंडा आणि ओंकार धोंडीराम जगदाळे यांना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. एका आरोपीवर सेंट्रल रुग्णालयात उपचार सुरू असून घटनास्थळावरून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहे. दरम्यान, सनी किरण कटारे यांच्या तक्रारीवरून दाखल दुसऱ्या गुन्ह्यात सुदर्शन संजीव निकाळे उर्फ बुंदी, संजय शर्मा, कार्तिक पवार आणि पवन चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील इतर अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-३) अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने हे तपासावर लक्ष ठेवून आहेत. 000000000

रस्त्यावर थुंकल्याचा जाब विचारणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला ओला चालकाने मारहाण केल्याची घटना ज्युपिटर रुग्णालयाजवळ घडली. या दुर्घटनेत जखमी झालेले ७० वर्षीय सरोश दस्तुर गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ ज्युपिटर रुग्णालयात…

 कल्याण पूर्वेतील यु टाईप रस्ता बाधितांचे केडीएमसी मुख्यालयासमोर धरणे आंदोलन

– पुनर्वसनाबाबत ठोस भूमिका जाहीर करण्याची केली मागणी कलम २६० च्या नोटिसा स्थगित; पुनर्वसन क्लस्टर योजनेद्वारे त्याच ठिकाणी होणार कल्याण : कल्याण पूर्वेतील यू-टाईप रस्त्याच्या रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांना न्याय व त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पुनर्वसन कृती समितीच्या वतीने गुरुवारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी प्रशासनाकडे पुनर्वसनाबाबत ठोस भूमिका जाहीर करण्याची मागणी केली. कल्याण पूर्व भागातील काटेमानीवली नाका ते तिसगाव नाका या यू-टाईप रस्त्यावरील बाधित नागरिकांच्या पुनर्वसन कृती समितीने गुरुवारी दिलेल्या आवाहनानुसार संपूर्ण कल्याण पूर्व बाजारपेठ बंद ठेवून पालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. प्रचंड उन्हात मोठ्या संख्येने महिला, ज्येष्ठ नागरिक व दुकानदार उपस्थित होते. जवळ पास १८०० लोक यात बाधित होणार आहे. त्यात ८०० च्या वर रहिवासी व इतर छोटे मोठे दुकानदार आहेत. आयुक्तांनी चर्चेसाठी बोलावल्यावर शिष्टमंडळ मिटींगसाठी गेले. मात्र यावेळी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक यांनी काही महिला पदाधिकारी व वरिष्ठ नागरिकांना नाहक धक्काबुक्की करून आंदोलन खराब करण्याचा प्रयत्न केला. फक्त पाच लोक सोडू म्हणत पुनर्वसन कृती समितीचे अध्यक्ष उदय रसाळ यांना ही त्यांनी धक्का बुक्की करून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. आयुक्तांसोबत झालेल्या दीर्घ चर्चेत प्रशासनाने  दिलेल्या सर्व कलम २६० च्या नोटिसा तात्काळ स्थगित करण्यात येणार. बाधित नागरिकांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेद्वारे करण्यात येईल. कोणालाही अनधिकृत ठरवून हटवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही अशी आश्वासने दिली. या आंदोलनास काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नवीन सिंग यांनी पाठिंबा दिला. क्लस्टर योजनेचे अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी मुद्देसूद मांडणी केली. तर समितीचे अध्यक्ष उदय रसाळ, उपाध्यक्ष विष्णु जाधव, सचिव दुर्गेश फडोल व ज्ञानेश डुंबरे यांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहून चर्चा केली.

वनार्टीच्या जागावाटपात धनगर समाजावर अन्याय

 ८ जूनची परिपत्रके रद्द करा – बिरू कोळेकर ठाणे,  वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) यांनी ८ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या विविध विद्यार्थी योजना परिपत्रकांमधील VJNT प्रवर्गाच्या जागावाटपात धनगर समाजावर (NT-C प्रवर्ग) अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाचे राज्य संघटक, मुख्य प्रवक्ता तथा आयटी व मीडिया प्रमुख बिरू कोळेकर यांनी याबाबत इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे निवेदन सादर करून सर्व परिपत्रके तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. कोळेकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, महाराष्ट्र शासनाच्या मूळ आरक्षण रचनेनुसार VJ-A – ३ टक्के, NT-B – २.५० टक्के, NT-C – ३.५० टक्के आणि NT-D – २ टक्के असे आरक्षणाचे प्रमाण आहे. या प्रमाणाचे १०० टक्क्यांमध्ये रूपांतर केल्यास VJ-A – २७ टक्के, NT-B – २३ टक्के, NT-C – ३२ टक्के आणि NT-D – १८ टक्के असे वाटप होणे अपेक्षित आहे. मात्र वनार्टीच्या परिपत्रकांमध्ये VJ-A – ४० टक्के, NT-B – २२.५० टक्के, NT-C – २२.५० टक्के आणि NT-D – १५ टक्के असे वाटप करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.शासनाच्या मूळ आरक्षण रचनेनुसार धनगर समाजाचा समावेश असलेल्या NT-C प्रवर्गाचा वाटा सर्वाधिक असताना त्याला केवळ २२.५० टक्के वाटा देण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये, स्पर्धा परीक्षा उमेदवारांमध्ये आणि युवकांमध्ये नाराजी निर्माण झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करून वनार्टीने कोणत्या शासन निर्णय, कायदेशीर तरतूद अथवा धोरणाच्या आधारे हे वाटप केले, याची माहिती सार्वजनिक करावी. तसेच ८ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली सर्व परिपत्रके रद्द करून महाराष्ट्र शासनाच्या मूळ आरक्षण टक्केवारीनुसार नव्याने व न्याय्य पद्धतीने जागावाटप करावे, अशी मागणी बिरू कोळेकर यांनी केली आहे.दरम्यान, या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास धनगर समाजासह VJNT प्रवर्गातील विद्यार्थी, युवक आणि सामाजिक संघटनांच्या वतीने राज्यव्यापी लोकशाही आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही बिरू कोळेकर यांनी दिला आहे.

कल्याण-डोंबिवलीत १२ जूनपासून टप्प्याटप्प्याने २४ तास पाणीपुरवठा बंद

कल्याण : यंदाच्या वर्षी अल निनो  आणि आयओडी  यांच्या प्रभावामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलसाठ्याचे ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत नियोजनासाठी दररोज २० टक्के पाणी…

आठवडी बाजार बंद करण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेला मोर्चा काढण्याची नामुष्की

केडीएमसीच्या ‘ई’ प्रभाग कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा कल्याण : आठवडी बाजार तात्काळ बंद करण्यात यावा या मागणीसाठी बुधवारी सत्ताधारी शिवसेनेच्या वतीने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या  ‘ई’ प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत आंदोलनात महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चाचे नेतृत्व कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे आणि शिवसेना (शिंदे) उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, कल्याण ग्रामीण  तालुका प्रमुख गजानन पाटील  यांनी केले. काळूबाई चौक येथून सुरू झालेला मोर्चा ‘ई’ प्रभाग कार्यालयावर धडकला. मात्र केडीएमसीमध्ये शिवसेना सत्तेत असतांना देखील प्रशासनावर अंकुश नसल्याने सत्ताधारी शिवसेनेला मोर्चा काढण्याची नामुष्की ओढवल्याची चर्चा यामुळे रंगली होती. आंदोलनकर्त्यांनी महापालिका हद्दीतील सर्व आठवडी बाजार तात्काळ बंद करण्याची मागणी करत प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप केला. साप्ताहिक बाजारांमुळे वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनकर्त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले की, गेल्या महिन्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही महापालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आठवडी बाजार बंद करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप करण्यात आला. आठवडी बाजारांबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

– मोरपिसांची खुलेआम विक्री

 वन्यजीव विभागाने लक्ष देण्याची गरज अविनाश उबाळे ठाणे : राष्ट्रीय पक्षी मोरांची पिसे विक्री करताना बाजारपेठेत आणि जत्रा उत्सवामध्ये काही इसम नजरेस पडतात.मोरांची पिसे ते कुठून आणतात याबाबत संशयाचे वातावरण आहे. मोरांच्या पिसांची मोठ्या प्रमाणात विक्री करण्याचा हा प्रकार खुलेआम सर्वत्र सुरू असताना राज्य सरकारच्या वन्यजीव विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.एकीकडे राज्यात मोरांची संख्या कमालीची घटत असताना दुसरीकडे केवळ मोरांची पिसे मिळवण्यासाठी मोरांची शिकार्‍यांकडून हत्या केली जाते का? असा प्रश्न वन्यजीव पक्षीप्रेंमीकडून आता विचारला जात आहे.जंगलात वेचलेली मोरांची पिसे ते विकु शकतात.मात्र मोरांची हत्या करून त्यांच्या पिसांची विक्री करणे हा गंभीर गुन्हा आहे.वन्यजीव नियमानुसार त्या शिकार्‍यास तीन वर्ष तुरुंगवास होऊ शकतो.असे वन्यजीव  कार्यालयातून सांगण्यात आले.मात्र येवढ्या प्रमाणावर जर मोर पिसांची विक्री होत असेल तर ही पिसे नक्की कुठून आणली जातात याची चौकशी आणि तपास करण्याची गरज असल्याची पक्षीप्रेमींची मागणी आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह उपनगर व मुंबई महानगरातही मोरांची पिसे सहज उपलब्ध होत आहेत. शहरांतील काही पिकनिक स्पॉटवर तर ग्रामीण भागांतील बाजारपेठेत जत्रा,उत्सवात काहीजण मोरांची पिसे विकताना दिसतात. १० ते २० रुपयांच्या भावाने मोरांच्या पिसांची विक्री ग्राहकांना ते करतात.अत्यंत आकर्षक दिसणारी ही मोरांची पिसे मोठ्या प्रमाणावर ग्राहकांकडून खरेदी केली जातात.घरामध्ये शोसाठी लावण्याकरीता व देव्हार्‍यांत ठेवण्यासाठी मोरांच्या पिसांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.असे जरी असले तरी शोपिस व आपल्या हौशेसाठी विक्रीला येणारी ही मोराची पिसे येतात तरी नक्की कुठून हा मात्र संशोधनाचा विषय ठरतो.मात्र, वन्यजीव विभागाचे मोर पिसांची विक्री करणार्‍यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.याबाबत माहिती घेण्यासाठी तानसा वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक डि.बी मिसाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही मात्र एका वन अधिकाऱ्यांने नाव न छापण्याच्या अटीवर माहिती देताना सांगितले की जेव्हा जंगलात मोर नाचतात तेव्हा त्यांची मोठ्या प्रमाणावर पिसे गळतात.आणि ही गळालेली पिसे जंगलात वेचून ती विक्रीला आणली जात असावीत,असे त्यांनी सांगितले या मोरपिसाच्या अवैध विक्रीकडे वन्यजीव विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत वन्यजीव व पक्षी प्रेमी आता व्यक्त करीत आहेत.