Month: August 2026

 ९ ऑगस्ट क्रांतीदिनी गिरणी कामगारांची मूक मिरवणूक!

 राष्ट्रीय मिल मजदूर संघ,महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या वतीने राजेंद्र साळसकर मुंबई -येत्या ९ऑगस्ट क्रांतीदिनी राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या संयुक्त विद्यमाने,गिरणी कामगारांची सालाबाद प्रमाणे,…

महावितरणाने गृह संकुलात दाखवले स्मार्ट मीटर प्रात्यक्षिक

कल्याण: स्मार्ट मीटर संदर्भात असलेले गैरसमज दूर करून त्याचे महत्त्व वीज ग्राहकांना पटवून देण्यासाठी महावितरण कडून गृहसंकुलात थेट वीज ग्राहकांच्या दारात त्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यास सुरुवात केली आहे. महावितरणच्या कल्याण पूर्व…

 शेतकरी कर्जमुक्ती- ठाणे जिल्ह्यात पहिल्या टप्प्याला वेग

 जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन अशोक गायकवाड ठाणे : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कमाल रु.२.०० लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांना या योजनेचा तात्काळ लाभ मिळावा यासाठी आधार प्रमाणीकरणाची (आधार ई-केवायसी ) प्रक्रिया सध्या गतिमान करण्यात आली आहे. ३१ जुलैला अखेर प्राप्त झालेल्या यादीतील जिल्ह्यातील एकूण १० हजार ९६२ पात्र खातेदार शेतकऱ्यापैकी ८ हजार ४४४ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. तर उर्वरित २ हजार ५१८ शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत १६ हजार ८३६ आणि राष्ट्रीयकृत बँकांमार्फत १ हजार २३२ अशा एकूण १८ हजार ६८ शेतकरी खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १० हजार ५२५ आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या ४३७ अशा एकूण १० हजार ९६२ पात्र खातेदार शेतकऱ्यांची पहिली यादी प्राप्त झाली आहे. ३१ जुलै २०२६ अखेर प्राप्त झालेल्या यादीतील ८ हजार ४४४ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. तर उर्वरित २ हजार ५१८ शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व व्यापारी, राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा अग्रणी व्यवस्थापकांना (एलएमडी) तात्काळ सर्व खात्यांचे (उर्वरित २ हजार ५१८) आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे निर्देशही डॉ. पांचाळ यांनी दिले आहेत. आधार प्रमाणीकरणाचे काम सर्व ‘आपले सरकार’ व ‘महा-ई-सेवा’ केंद्रांवर सुरू असून या कामासाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी १५ ऑगस्टनंतर प्रसिद्ध केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करताच थकीत कर्जाची रक्कम थेट त्यांच्या खात्यावर वर्ग केली जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामासाठी पुन्हा नवीन पीककर्ज मिळणे शक्य होणार आहे. पात्र सभासदांच्या याद्या संबंधित बँक शाखा, सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या ‘आपले सरकार’ किंवा ‘महा-ई-सेवा’ केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण त्वरित पूर्ण करून घ्यावे; यासाठी कोणतेही शुल्क द्यायचे नाही. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ‘अ‍ॅग्रीस्टॅक’ नोंदणी केलेली नाही, त्यांनी ती तात्काळ करून घ्यावी. याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच प्रमाणीकरणात अडचण आल्यास संबंधित सेवा सहकारी सोसायटीचे गटसचिव किंवा बँक निरीक्षक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ व जिल्हा उपनिबंधक डॉ.मांडे यांनी केले आहे.

दिशा वेल्फेअर ग्रुपतर्फे मोफत आरोग्य शिबीर

मुंबई – विक्रोळी कन्नमवार नगर जनता मार्केट येथील गेटवेल सर्जिकल येथे दिशा वेल्फेअर ग्रुप, सामाजिक संस्था मुंबई(रजि.)आणि मनराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर रविवार २ ऑगस्टला सकाळी १०…

‘महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार – २०२६’ ने प्रा. वसंतराव पाटील यांचा गौरव

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने व मिरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा, भाईंदरचे संस्थापक-मार्गदर्शक, ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक व समाजसेवक प्रा. वसंतराव यशवंत पाटील यांना “दैनिक लोक युवा वृत्तपत्राच्या” वतीने लोकमान्य बाळगंगाधर…

वाढवण बंदर खाण प्रकल्पाच्या जन सुनावणीमध्ये आंदोलकांचा गोंधळ

 दगड उत्खननासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयोजित केली होती जन सुनावणी पालघर :  खोल समुद्रामध्ये उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी वाढवण बंदराच्या उभारणीसाठी समुद्रात भराव करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक गौण खनिजांचे उत्खनन करण्यात येणार आहे. पालघर तालुक्यातील गारगाव आणि खाणीवडे या नजीकच्या दगड खाणींमधून दगडाचे उत्खनन करण्यात येणार आहे. सदर बाबीच्या पर्यावरणीय मंजुरीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने जाहीर सुनावणीचे आयोजन रविवार दिनांक २ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. यावेळी प्राधिकरणाकडून देण्यात येणाऱ्या तज्ञ मंडळींच्या अहवालावरून आणि जन सुनावणी पुढे ढकलण्याच्या मुद्द्यावरून आंदोलकांनी जन सुनावणीत गोंधळ घातला. गारगाव आणि खाणीवडे या नजीकच्या दगड उत्खननामुळे पर्यावरणावर त्याचा होणारा परिणाम आणि या प्रक्रियेमुळे स्थानिकांच्या जीवनमानावर होणारा बदल याबाबत मंडळाकडून एक अहवाल सादर करण्यात आला. सदर अहवाल अध्ययनासाठी दिलेला कालावधी अपुरा असल्याचे प्रथमतः आंदोलकांकडून सांगण्यात आले. सदर अहवाल मराठी मध्ये आणि त्याचा मतितार्थ संक्षिप्त रूपात सादर करण्याचे प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी त्याला देखील नकार दिला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने रविवारी शिगाव- खुताड येथे जाहीर जन सुनावणी आयोजित केली होती. या जनसुनावणीत आंदोलकांनी तज्ञ मंडळींच्या अहवाला सोबतच अतिवृष्टी आणि शेतीची कामे सुरू असताना जन सुनावणी का घेतली? असा सवाल उपस्थित केला. दगडखणींमधून होणाऱ्या उत्खननाचा संभाव्य जीवनमानावरील आणि पर्यावरणावरील परिणाम याबाबत तयार केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने आजूबाजूच्या पाच ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना या  सुनावणीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. अतिवृष्टी आणि शेतीची कामे यांची कारणे देत जन सुनावणी रद्द करून पुढे ढकलण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. गारगाव गट क्रमांक ८२ (क्षेत्र.२४.९४ हे.) साठी आयोजित सुनावणीमध्ये ९० नागरिक, गट क्रमांक ८२ (क्षेत्र.१७.०८ हे.) साठी ७२ आणि खानिवडे गट क्रमांक ९ (क्षेत्र.१५.३९ हे.) ६० ते ७० नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध पर्यायांना आंदोलकांनी धुडकारले. जन सुनावणीच्या सभा मंडपा बाहेर येऊन त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. पोलीस प्रशासनाने त्यांची समजूत काढल्यानंतर देखील आंदोलन सुरूच राहिले. अखेरीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने जन सुनावणीचा कारभार सुरू करण्यात आला. यादरम्यान कुठलीही पोलिसी कारवाई होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेतली. जन सुनावणीचा कारभार सुरू असलेला पाहता घोषणाबाजीचे रूपांतर गोंधळबाजी मध्ये झाले. तुमच्या हरकती व सूचना लिखित अथवा कथित स्वरूपामध्ये प्रशासनाकडे नोंदवा अशी पोलिसांच्या वतीने वारंवार विनंती करण्यात आली. एकंदरीतच जन सुनावणी उधळून लावण्याचा आंदोलकांचा मानस होता. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने एकंदरीत झालेल्या घडामोडींची नोंद घेऊन जन सुनावणी पूर्ण केली.पोलिस प्रशासनाने देखील सर्व आंदोलकांच्या मागण्यांची नोंद केली. प्रशासनाच्या वतीने जन सुनावणी मध्ये ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. चौकट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने सादर करण्यात आलेला तज्ञ मंडळींचा अहवाल इंग्रजीमध्ये असून तो फार मोठा आणि क्लिष्ट असल्याचा आरोप उपस्थित ग्रामस्थांनी केला. त्यावर मंडळाच्या वतीने तो मराठीमध्ये व संक्षिप्त स्वरूपात तुम्हाला सादर करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले ते देखील ग्रामस्थांनी झिडकारले.सुनावणी मध्ये अपेक्षित समस्या निराकरण करण्यासाठी शक्य ते प्रयत्न करण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी स्मार्ट कार्ड व मोफत बस पास शिबिर उत्साहात संपन्न

औचित्य माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसाचे मुंबई, दि. (प्रतिनिधी) :  ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार  संदीप नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे एनसीएमसी स्मार्ट कार्ड तसेच नवी मुंबई परिवहन उपक्रमाचा मोफत बस पास काढून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक  सुनिल कुरकुटे,  नगरसेवक प्रभाग क्रमांक १९ यांच्या पुढाकारातून, भारत ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमाला ज्येष्ठ नागरिकांसह महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अत्यंत आनंदमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात हे शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन नवी मुंबई परिवहन समितीचे सदस्य राजेश राय, नगरसेवक सुनिल कुरकुटे आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष  मारुती विश्वासराव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले तसेच  संदीप नाईक यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. नगरसेवक  सुनिल कुरकुटे यांची नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मध्य रेल्वेच्या बोर्डावर सल्लागार सदस्यपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ नागरिकांना नवी मुंबई परिवहन उपक्रमाचा मोफत बस पास मिळवून देण्यासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल परिवहन समितीचे सदस्य  राजेश राय यांचाही सन्मान करण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा मोठा व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ०००००

अभिनेता ऋषिकेश कानडे काळाच्या पडद्याआड

अवघ्या ३८‌व्या वर्षी घेतली ‘एक्झिट’ मुंबई : पुण्यातील एक हरहुन्नरी आणि अतुलनीय अभिनेता ऋषिकेश कानडे याचे आज पहाटे पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्याचे वय अवघे ३८ वर्षांचे होते.  अजात शत्रु असलेला ऋषिकेश एक प्रगल्भ अभिनेता तर होताच पण देशप्रेमाने पूर्ण भारलेला होता. तो मुख्य भूमिका करत असलेल्या ‘मी भारतीय ‘ ह्या दिर्घांकाचे जवळपास ३०० प्रयोग करतांना  त्याच्या देशप्रेमाचे प्रत्यंतर यायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर व्याख्यान देताना तो महाराजमय होऊन जायचा. त्याने केलेल्या प्रत्येक भूमिका तो जगला, त्यामुळे प्रेक्षकांच्या ह्रदया पर्यंत पोहोचला. त्याला राज्य नाट्य स्पर्धेत दोन वर्ष अभिनयाच्या रौप्य पदकाने गौरवले होते. त्याच्या पश्चात आई-वडील, बहिण आणि पत्नी असा परिवार आहे. ३ ऑगस्टला संध्याकाळी ऋषिकेशवर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वत:चा ऑनलाईन फिटनेस क्लब चालवणाऱ्या ऋषिकेशच्या निधनाने पुण्याच्या रंगकर्मींमधे हळहळ व्यक्त होत आहे. ००००

खड्डे बुजविण्यासाठी मनपा अ‍ॅक्शन मोडवर

मंत्री गिरीश महाजन, मनपा आयुक्त मनीषा खत्री उतरले रस्त्यावर हरिभाऊ लाखे नाशिक : शहरामध्ये रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू आणि त्यानंतर नाशिककरांची झालेली ओरड यामुळे खडबडून जागे झालेले महापालिका प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. दोन दिवसांपासून शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम वेगाने सुरू असून, रविवारी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, मनपा आयुक्त मनीषा खत्री स्वतः रस्त्यावर उतरले होते. मंत्री महाजन यांनी खड्डेमय रस्त्यांची पाहणी करत, आठवड्याभरात शहरातील सर्व खड्डे बुजवले जातील आणि आगामी ३ ते ४ महिन्यांत नाशिकमध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते दिसणार असल्याचा दावाही या वेळी दिला. तर, रस्ते दुरुस्तीचे काम गतीने करण्याचे आदेश मनपा आयुक्त खत्री यांनी दिले. शहरातील मखमलाबाद रोड, पंचवटी, सिडको, सातपूर आणि नाशिकरोड परिसरातील अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी भलेमोठे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने रोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत असून, वाहनधारकांना पाठीच्या आजारांना आणि वाहनांच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. माध्यमांनी या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवल्यानंतर महापालिका प्रशासनाविरोधात नागरिकांमधून तीव्र असंतोष व्यक्त केला जात होता. आयुक्त मनीषा खत्री यांनी रविवारी शहरातील रस्त्यांच्या परिस्थितीची आणि सुरू असलेल्या दुरुस्ती कामांचा आढावा घेतला. पावसाची उघडीप मिळताच सर्व प्रभागांमध्ये पेव्हर ब्लॉक आणि कोल्ड मिक्सच्या साहाय्याने तातडीने खड्डे बुजवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. कामाच्या गुणवत्तेत कसूर करणाऱ्या कंत्राटदारांवर आणि निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः शहरात उतरून खड्डेमय रस्त्यांची पाहणी केली. आगामी ३ ते ४ महिन्यांत नाशिकमधील रस्ते सिमेंट काँक्रीटचे पाहायला मिळतील, अशी ग्वाही मंत्री महाजन यांनी दिली. शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून, आतापर्यंत ५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मखमलाबाद रस्ता पुढील दोन दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मंत्री महाजन म्हणाले की, कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकसाठी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. दरवर्षी डांबरी रस्त्यांवर वाहनांचा भार आणि पावसामुळे खड्डे पडतात. त्यामुळे या वर्षी सर्व मुख्य रस्त्यांचे ‘व्हाइट टॉपिंग’ करून सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुढील ३० ते ४० वर्षे रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या पाणीपुरवठा, ड्रेनेज, गॅस लाईन आणि फायबर केबल यांसारख्या युटिलिटी लाईन्स जमिनीखाली दाबण्याचे काम सुरू असल्याने खुदाई करावी लागत आहे. त्यातच यंदा मुसळधार पाऊस झाल्यामुळे खड्डे पडले आहेत. मात्र, येत्या आठवड्याभरात शहरातील सर्व खड्डे बुजवले जातील. या कामाचा वेग वाढवण्यासाठी सर्व अधिकारी, कंत्राटदार आणि केंद्रीय एजन्सींची तातडीची बैठक घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 ‘लँड टायटलिंग’ कायदा अंमलात आणून प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना राबविणार- चंद्रशेखर बावनकुळे

१५ ऑक्टोबर २०२४ पूर्वी खाजगी जागेवर  बांधलेल्या घरांना गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करणार…! कणकवली(प्रतिनिधी )–सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आधुनिक पद्धतीने  ‘ड्रोन सर्वेक्षण’ करून प्रत्येक मालमत्तेला ‘प्रॉपर्टी कार्ड ‘देण्याची योजना राबविण्यात येणार.त्यासाठी दोनशे सर्व्हेअर्सना परवाने  देऊन हंगामी स्वरूपाची नियुक्ती करण्यात येणार आहे. भविष्यात लँड टायटलिंग कायदा  लागू करून शासनमान्य  मालकी हक्काचे कार्ड देण्याचा सरकारचा मानस आहे. तसेच नोंदणीपूर्वी मोजणी आणि त्यानंतर फेरफार करण्याची नवी व्यवस्था कायद्याद्वारे लागू केली जाईल अशा घोषणा राज्याचे  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्या. राज्य शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत ‘आयोजित महसूल समाधान शिबिराच्या निमित्ताने आटोजीत करण्यात आलेल्या समारंभात बावनकुळे बोलत होते. ३१ मार्च २०२७ पर्यंत जिल्ह्यातील सर्व शेत रस्त्यांचे सीमांकन, मोजणी, अतिक्रमण हटवून क्रमांक देण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून, मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ता योजनेतून प्रत्येक शेतकऱ्याला शेतरस्ता उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये महसूल समाधान शिबिरे आयोजित करण्यात आली असून, शासनाच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम असल्याचे बावनकुळे म्हणाले. या शिबिरात प्राप्त झालेल्या नागरिकांच्या निवेदनांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. १ जानेवारी २०११ पूर्वीच्या सरकारी जागांवरील घरांचे सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांना पट्टे देण्यात येणार असून, १५ ऑक्टोबर २०२४ पूर्वी खाजगी जागेवरील ले-आउट मध्ये बांधलेल्या घरांना गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करण्याचा निर्णयही त्यांनी यावेळी  जाहीर केला. सिंधुदुर्गचे  पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि स्थानिक प्रशासनाच्या कार्याचे कौतुक करताना, जिल्ह्याची बदनामी करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. आवश्यक तेथे चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, मात्र प्रामाणिक नागरिक व शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वास बावनकुळे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला. जनतेच्या हिताचे निर्णय प्रत्यक्षात पोहोचविणारे मंत्री म्हणजे बावनकुळे अशा शब्दात जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी बावनकुळे यांच्या कामाचे कौतुक केले. बावनकुळे यांच्या कार्यशैलीतून आम्ही शिकतो, तरुण मंत्र्यांसाठी ते आदर्श आहेत असे गौरवोदगार राणे यांनी काढले. बावनकुळे यांनी आपल्या भाषणात राणे  बंधूंचे तोंड भरून कौतुक केले. मत्स्य व्यवसाय आणि बंदर खात्याचे मंत्री म्हणून नितेश राणे हे अतिशय उत्तम प्रकारे काम करत आहेत शिवाय हे खातं ते प्रभावीपणे सांभाळत आहेत अशा शब्दात त्यांनी नितेश राणे यांचा गौरव केला. आमदार निलेश राणे यांच्याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, विधानसभेत ते महसूल विभागाशी संबंधित विषय अत्यंत अभ्यासपूर्ण, तळमळीने आणि जनहिताची भूमिका घेऊन मांडत आहेत. त्यांनी सिंधुदुर्गच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला असून, त्यांनी मांडलेल्या महसूल विभागाच्या सर्व विषयांवर निर्णय घेण्याचे मी वचन देतो, असे त्यांनी यावेळी  स्पष्ट केले. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा माजी महसूल मंत्री नारायण राणे यांच्या कार्याचाही गौरव करत, महसूल मंत्री म्हणून नारायण राणे यांनी घेतलेल्या अनेक दूरदृष्टीच्या निर्णयांचा पाया आजही भक्कम आहे. त्या निर्णयांना पुढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत. कोकण दौऱ्यावर येण्यापूर्वी मी त्यांचा आशीर्वाद घेतला, असेही त्यांनी सांगितले. कोकणात झालेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणांची महसूल विभागाने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणांच्या चौकशीसाठी २० अधिकाऱ्यांची विशेष चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे ही समिती मागील दहा वर्षांच्या कागदपत्रांची चौकशी करणार आहे. या तपासात य चौकशीत जे कोणी अधिकारी कर्मचारी दोषी आढळतील त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल अशी घोषणा महसूल मंत्री बावनकुळे यांनी काल रत्नागिरी येथे बोलताना केले शेतकऱ्यांना कर्ज देणे ही बँक आणि महसूल विभागाची जबाबदारी आहे. कोकणात सातबारावर अनेक नावे असतात.परंतु कर्ज देताना संमती पत्र मिळणं अवघड होऊन जातं त्यामुळे बँका कर्ज देत नाहीत तेव्हा हमीपत्रावर कर्ज देण्याबाबत शासन विचार करीत असून त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.