Month: August 2026

 ३० लाख रुपये किंमत असलेली बिबट्याची कातडी जप्त

 डोंगरी पोलिसांची मोठी कारवाई दिनेश मराठे मुंबई : डोंगरी पोलिसांनी बिबट्या या संरक्षित वन्यजीव प्राण्याच्या कातडीची बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या इसमास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.या संदर्भात डोंगरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार डोंगरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये बिबट्या या संरक्षित वन्यजीव प्राण्याची कातडी विक्री करण्याच्या उद्देशाने एक इसम येणार असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली होती.या माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक बाळासाहेब कानवडे यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस उपनिरीक्षक सुनील रणदिवे, पोलीस हवालदार विशाल सोनवणे व पोलीस कॉन्स्टेबल सुरज धायगुडे यांचे पथक तयार करण्यात आले.सदर पथकाने प्राप्त माहितीची खातरजमा करून नियोजनबद्ध, कौशल्यपूर्ण पद्धतीने कारवाई केली. ९ ऑगस्टला निखिल सोनावणे (रा.ताडदेव) मुंबई या इसमास ताब्यात घेतले.त्याच्या ताब्यातून बिबट्या या वन्यजीव प्राण्याच्या कातडीसदृश वस्तूचे जप्ती करण्यात आली. सदर कातडीचे अंदाजे वजन २ किलो ५०० ग्राम असून, तिची अंदाजे किंमत तीस लाख रुपये असल्याचे प्राथमिकदृष्ट्या नमूद करण्यात आले आहे. सदर कातडीची प्रजाती व अधिकृत किंमत सक्षम वनविभाग/वन्यजीव तज्ज्ञांकडून निश्चित करून घेण्यात येत आहे.सदर प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ मधील कलम २, ९, ३९(२),(३), ५१, ५२ या लागू तरतुदींनुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील रणदिवे यांचेकडून करण्यात येत आहे.सदर गुन्ह्यात बिबट्याची कातडी कोणाकडून प्राप्त झाली, तिची विक्री/खरेदी करण्यामागे कोण व्यक्ती सहभागी आहेत, आर्थिक व्यवहार झाला आहे काय, तसेच या वन्यजीव तस्करीमध्ये अन्य कोण व्यक्तींचा सहभाग आहे काय, याबाबत पुढील तपास सुरू आहे.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत लोक भवन येथे ‘हर घर तिरंगा’ अभियान

अशोक गायकवाड मुंबई : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज महाराष्ट्र लोकभवन, मुंबई येथे हाती राष्ट्रीय ध्वज घेऊन राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत व राज्य गीत गायले. राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे तसेच इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत राज्यात साजरा केल्या जात असलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा भाग म्हणून तसेच ‘वंदे मातरम’ या गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोक भवनातील दरबार हॉल, जल विहार यांसह इतर ऐतिहासिक महत्वाच्या इमारतींवर राष्ट्रध्वज लावण्यात आला. ००००००

– कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डर , फसवणुकीचा आकडा ५०० ते ६०० कोटींवर

 मंत्री महाजन यांचा गौप्यस्फोट हरिभाऊ लाखे नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वरमधील कुंभमेळ्यातील कामांच्या नावाखाली बनावट कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) देऊन मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक करणारे रॅकेट कार्यरत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नाशिक विभागाचे महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांचे नाव आणि ‘एस’ अक्षराची डिजिटल स्वाक्षरी असलेले हुबेहूब बनावट कार्यारंभ आदेश तयार करून संबंधितांकडून कोट्यवधी रुपये उकळण्यात आल्याचे समोर आले आहे. हा फसवणुकीचा आकडा तब्बल ५०० ते ६०० कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचा गौप्यस्फोट कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी जळगाव येथे पत्रकार परिषदेत केला. कुंभमेळ्याच्या बंदोबस्तासाठी नियुक्त नाशिक शहर तसेच राज्य राखीव दलाच्या पोलिसांना जेवण, पिण्याचे पाणी, चटया, बादल्या, चादरी आणि अन्य साहित्य पुरविण्याच्या नावाखाली हे कार्यारंभ आदेश देण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. विशेष म्हणजे, प्रत्येक आदेशाची रक्कम १०० ते १५० कोटी रुपयांच्या आसपास असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कुंभमेळ्याच्या कामांसाठी प्रत्यक्षात ऑनलाइन निविदा प्रक्रिया राबविली जाते. मात्र, या प्रकरणात ज्यांना बनावट कार्यारंभ आदेश देण्यात आले, त्यांनी संबंधित कामांसाठी कोणतीही ऑनलाइन निविदा भरलेली नव्हती. तरीही संशयितांनी संबंधितांकडून रोख तसेच धनादेशाद्वारे पैसे उकळून त्यांना ऑफलाइन कार्यारंभ आदेश दिले. हे आदेश शासनाच्या अधिकृत कार्यारंभ आदेशांसारखेच हुबेहूब तयार करण्यात आल्याने अनेकांची फसवणूक झाल्याचे महाजन यांनी सांगितले. सामान्यतः अधिकृत कार्यारंभ आदेशावर क्यूआर कोड असतो. तसेच महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांचे नाव अशा प्रकारे नमूद केले जात नाही. मात्र, बनावट आदेशांमध्ये गेडाम यांचे नाव आणि केवळ ‘एस’ अक्षराची डिजिटल स्वाक्षरी वापरण्यात आल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या आदेशांची सत्यता तपासल्यानंतर त्यामागे मोठे षडयंत्र असल्याचा संशय बळावला आहे. या प्रकारासंदर्भात चार ते पाच जण नुकतेच आपल्याकडे आले होते. त्यांनी काही कार्यारंभ आदेश दाखविल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले. सध्या त्यांच्याकडे चार बनावट कार्यारंभ आदेश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मार्च आणि एप्रिल महिन्यातील हे आदेश असल्याची माहिती असून, त्याद्वारे संबंधितांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळण्यात आल्याचे समोर येत आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील दोन आणि धुळे जिल्ह्यातील एका व्यक्तीचा या प्रकरणातील संशयितांमध्ये समावेश असल्याचा दावाही महाजन यांनी केला. याशिवाय आणखी काही व्यक्ती या रॅकेटमध्ये सहभागी असल्याची शक्यता आहे. 0000

फुले विकणाऱ्या आई- वडिलांच्या लेकीने गाठले यशाचे शिखर!

 मैत्री ठक्करची पोलीस शिपाईपदी निवड; शिवसेनेच्या वतीने ठक्कर कुटुंबीयांसह शिवनेरी अकादमीच्या संचालकांचा सत्कार दिवा, दि. १० ऑगस्ट : परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर स्वप्नांना यशाची किनार देता येते, हे डोंबिवलीतील मैत्री विनोद ठक्कर हिने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात फुले विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे तिचे आई-वडील विनोद विठ्ठल ठक्कर आणि आसमा विनोद ठक्कर यांच्या संघर्षाला अखेर यश मिळाले असून, मैत्रीची पोलीस शिपाईपदी निवड झाली आहे. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतही मुलींना चांगले शिक्षण देण्याची जिद्द ठक्कर दाम्पत्याने सोडली नाही. आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवत मैत्रीनेही आपल्या ध्येयासाठी सातत्याने मेहनत घेतली. डोंबिवलीतील शिवनेरी अकादमी येथे पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेताना तिने शिस्त, सातत्यपूर्ण सराव आणि नियोजनबद्ध तयारीच्या जोरावर हे यश संपादन केले. मैत्रीचे हे यश केवळ ठक्कर कुटुंबासाठी अभिमानाची बाब नसून, आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करत मोठी स्वप्ने पाहणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. शिवनेरी अकादमीचे संचालक लखन मुंडेकर हे स्वतः पोलीस दलात कार्यरत असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांना पोलीस दल, अग्निवीर तसेच विविध शासकीय सेवांमध्ये संधी मिळावी, या उद्देशाने अकादमीच्या माध्यमातून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना केवळ शारीरिक प्रशिक्षण न देता मैदानी सराव, लेखी परीक्षेची तयारी, मानसिक तयारी, नियोजन आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन अशा विविध अंगांनी प्रशिक्षण देण्यावर अकादमीचा भर आहे. डोंबिवलीपुरती मर्यादा न ठेवता सातारा, सांगली, मुंबई उपनगर, ठाणे तसेच महाराष्ट्रातील विविध भागांतील विद्यार्थीही या अकादमीत प्रशिक्षण घेत आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना खीळ बसू नये, यासाठी गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके, शैक्षणिक साहित्य, प्रशिक्षणासाठी आवश्यक सहकार्य, आर्थिक मदत आणि मानसिक आधार देण्याचे सामाजिक कार्य शिवसेना परिवाराच्या माध्यमातूनही सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मैत्री विनोद ठक्कर हिची पोलीस शिपाईपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेच्या वतीने तसेच कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या उपस्थितीत मैत्री, तिचे आई-वडील, बहीण आणि शिवनेरी अकादमीचे संचालक लखन मुंडेकर यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी ठक्कर कुटुंबीयांशी संवाद साधताना शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि गरजू कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगण्यात आले. तसेच मैत्री आणि तिच्या कुटुंबाच्या भविष्यातील वाटचालीत आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाहीही देण्यात आली. “फुले विकणाऱ्या आई-वडिलांच्या कष्टातून पोलीस दलात दाखल झालेली मैत्री ही केवळ एका कुटुंबाच्या संघर्षाची यशोगाथा नाही, तर परिस्थितीशी दोन हात करून स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक मुला-मुलीसाठी प्रेरणेची ज्योत आहे,” अशा शब्दांत कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी मैत्रीच्या यशाचे कौतुक केले. मैत्रीच्या यशामागे तिच्या आई-वडिलांची अथक मेहनत, मुलींना चांगले शिक्षण देण्याची जिद्द, मैत्रीची प्रामाणिक मेहनत आणि शिवनेरी अकादमीचे संचालक लखन मुंडेकर यांचे मार्गदर्शन व नियोजनबद्ध प्रशिक्षण यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. “परिस्थितीपेक्षा जिद्द मोठी असते” हा संदेश मैत्री ठक्करच्या यशाने अधोरेखित केला आहे.

मध्यवर्ती रुग्णालयातील सीटीस्कॅन मशीन १५ दिवसांपासून बंद; गोरगरीब रुग्णांचे हाल

सुनिल इंगळे उल्हासनगर : उल्हासनगर-३ येथील मध्यवर्ती रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त असला, तरी जिल्हा रुग्णालयाच्या तुलनेत आवश्यक त्या सुविधा येथे उपलब्ध नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला आहे.…

कविता या अवघड साहित्यप्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज

 ज्येष्ठ कवयित्री अनुराधा नेरूरकर यांचे प्रतिपादन मुंबई : कविता ही अत्यंत अवघड साहित्यप्रकार असून तिच्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री अनुराधा नेरूरकर यांनी केले.  अखिल भारतीय साहित्य परिषद  साहित्य भारती (कोकण प्रांत), मुंबई उपनगर शाखेच्या वतीने महाकवी कालिदास जयंतीनिमित्त ‘आषाढरंग’ या काव्यपुष्पाचे आयोजन  बोरिवली पूर्व येथील श्रीमती जयाबेन खोत शाळेत   करण्यात आले होते. त्यावेळी ज्येष्ठ कवयित्री अनुराधा नेरुरकर या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. यावेळी अनुराधा नेरूरकर यांनी पावसाची दोन वेगवेगळी रूपे उलगडणाऱ्या कविता सादर केल्या. या कार्यक्रमात विविध ठिकाणाहून आलेल्या सुमारे २२ नवोदित व हौशी कवी-कवयित्रींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. भाग्यश्री फडके धर्माधिकारी यांनी परिषद गीत सादर केले. ज्येष्ठ साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. साहित्य भारतीचे मुंबई उपनगराचे संपर्क प्रमुख जयेश मेस्त्री यांनी ‘आषाढरंग’ या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली व साहित्य, कविता आणि नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या साहित्य भारतीच्या उपक्रमांची माहिती  करून देण्यात आली. ‘आषाढरंग’मध्ये सहभागी नवोदित कवी-कवयित्रींनी आपल्या विविध कविता सादर केल्या. सर्व सहभागी कवी-कवयित्रींना प्रोत्साहनपर प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विठ्ठल घाडी यांनी केले. आभार प्रदर्शन भाग्यश्री फडके-धर्माधिकारी यांनी केले. कार्यक्रमाला साहित्य भारतीचे कोकण प्रांत अध्यक्ष व लेखक दुर्गेश सोनार, हिंदू नववर्ष स्वागत समितीचे सदस्य  किशोर उन्हेलकर आणि त्यांचे सहकारी तसेच सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष महादेव गोविंद रानडे यांच्या सह साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवर यावेळी  उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना गणवेश व साहित्य तातडीने उपलब्ध करून द्या

मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) प्रदेश सचिव बाळासाहेब मिरजे यांनी…

स्वातंत्र्यदिनी डोंबिवलीत भव्य तिरंगा रॅली

कल्याण : १५ऑगस्ट  स्वातंत्र्यदिनी डोंबिवलीत भव्य तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून डोंबिवली शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या सहभागाने…

 कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत

 १२५ हून अधिक नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याचा दावा कल्याण : कल्याण पश्चिमेतील संदीप हॉटेल परिसर ते खडकपाडा परिसरातील एका रस्त्यावर भटक्या कुत्र्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भटक्या कुत्र्याने तब्बल १२५ ते १५० नागरिकांना चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये मोठी भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक आणि  गटनेते उमेश बोरगावकर आपल्या कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले.विशेष म्हणजे, भटक्या कुत्र्याचा शोध घेण्यासाठी खडकपाडा पोलीस आणि महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारीही रात्रभर परिसरात फिरत होते. अखेर रात्री या कुत्र्याला पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने या भटक्या कुत्र्याला पकडला आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी केडीएमसी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र, आता मोठ्या संख्येने नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याची घटना समोर आल्याने प्रशासनाच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या घटनेमुळे संदीप हॉटेल ते खडकपाडा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. रविवारी दुपारपासून हा भटका कुत्रा गाडीवर बसलेल्या, चालणाऱ्या नागरिकांना पाठीमागून येऊन चावण्याच्या तक्रारी आहेत. अचानक वाढलेल्या श्वानदंशाच्या घटनांमुळे अनेक नागरिकांनी उपचारासाठी महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाकडे धाव घेतली. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयात एका दिवसात १३० नागरिक श्वानदंशाच्या उपचारासाठी आले. त्यापैकी गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या २५ नागरिकांना रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. या घटनेतील ११ वर्षीय मुलीवर अधिक उपचारांची आवश्यकता असल्याने तिला मुंबईतील शीव रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर अन्य रुग्णांवर आवश्यक उपचार करून त्यांना अँटी-रेबीज लस देण्यात आली. रविवारच्या घटनेनंतर सोमवारी कल्याण रेल्वे स्थानक परिसरात भटक्या श्वानाची दहशत पाहायला मिळाली. याठिकाणी १० ते १५ प्रवाशांना चावा घेतला.  रुग्णालयात औषधांचे सॅम्पल दाखविण्यासाठी आलेला सेल्स मॅनेजरच भटक्या कुत्र्याची शिकार ठरला असून रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या आवारातच फार्मा कंपनीच्या सेल्स मॅनेजर अतुल सिंग यांना श्वानदंश झाला. सलग दुसऱ्या दिवशी श्वानाच्या हल्ल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर भटक्या कुत्र्यांच्या दहशतीनंतर केडीएमसी प्रशासन खडबडून जागे झाले असून केडीएमसी  आयुक्त आणि महापौरांकडून डॉग सेंटरची पाहणी करण्यात आली. कल्याणमधील खडकपाडा आणि रेल्वे स्टेशन परिसरात भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना चावा घेतल्याच्या घटनांनंतर अखेर केडीएमसी प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आयुक्त अभिनव गोयल आणि महापौर हर्षाली चौधरी यांनी कल्याणमधील डॉग सेंटरची पाहणी केली. डॉग सेंटरचे सुरू असलेले बांधकाम मंगळवारपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासह कुत्र्यांना पकडण्यासाठी मोठी मोहीम राबवण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचा आकडा कमी सांगितल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर आयुक्तांनी हा आकडा पुन्हा व्हेरिफाय करण्याचे मान्य केले आहे. तर रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या मुख्य वैदयकीय अधिकारी कल्याण यांनी दिलेल्या अहवालानुसार रविवारी रुक्मिणीबाई रुग्णालयात एकुण 58 नागरीकांना कुत्रा चावल्याने रुग्ण उपचाराकरिता आले. त्यापैंकी, 17 नागरीकांना संदीप हॉटेल बिर्ला कॉलेज परिसरात कुत्र्याने चावा घेतल्याचे निदर्शनास आलेले आहे. या रुग्णांना महानगरपालिकेच्या रुख्मिणीबाई रुग्णालयात, वैद्यकीय तपासणी करून आवश्यकतेनुसार अँटी-रेबीज लस व इतर आवश्यक उपचार करण्यात आले आहेत. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. संबंधित रुग्णांना आवश्यक पुढील डोस व वैद्यकीय मार्गदर्शन देण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येत असून त्यातील संशयातील कुत्र्याला पकडले आहे. या परिसरात भटक्या कुत्र्यांबाबत आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित पशुवैदयकीय विभागास देण्यात आल्या आहेत. 0000

 रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरूच

 – समाजसेविका वैशाली गावडे यांचा आंदोलनाचा इशारा रमेश औताडे मुंबई : मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातील नावाजलेल्या महानगरपालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. मात्र, याच मुंबई महापालिकेच्या टी.बी. रुग्णालयात झुरळांचा सुळसुळाट झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्याऐवजी त्यांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत असल्याचा आरोप महलत महिला मंडळ अध्यक्षा समाजसेविका वैशाली गावडे यांनी केला आहे. वैशाली गावडे यांनी रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. रुग्णालय परिसरात झुरळ, अस्वच्छता आणि स्वच्छतेच्या व्यवस्थेबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात त्यांनी संबंधित प्रशासनाकडे निवेदनही सादर केले आहे. टी.बी.सारख्या गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळणे अपेक्षित असताना रुग्णालयातच झुरळांचा उपद्रव वाढणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे गावडे यांनी म्हटले आहे. रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्थेवर नियमित देखरेख ठेवली जाते की नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. निवेदन देऊनही सुधारणा झाली नाही तर आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. रुग्णालय प्रशासनाने तातडीने स्वच्छता व्यवस्था सुधारावी, झुरळांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि रुग्णांना स्वच्छ वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी गावडे यांनी केली आहे. या प्रकरणावर आता जाहीर पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणार असल्याचे वैशाली गावडे यांनी स्पष्ट केले आहे. पत्रकार परिषदेनंतरही रुग्णालय प्रशासनाने ठोस कारवाई केली नाही, तर रुग्णांच्या आरोग्याच्या प्रश्नासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. आशिया खंडात नावाजलेल्या मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात अशी परिस्थिती निर्माण होणे ही महापालिका प्रशासनासाठी निश्चितच चिंतेची बाब असून, प्रशासन या तक्रारीची किती गांभीर्याने दखल घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.