Category: होम

बीपीसीएल, आयएसपीएल उपांत्यपूर्व फेरीत

 महिलांच्या गटात राजमाता जिजाऊ, धर्मवीर, विवेक बाद फेरीत  चषक कबड्डी स्पर्धा मुंबई, दि. २0 (क्री.प्र.) क्रीडाप्रेमी आमदार सुनील राऊत यांच्या संयोजनाखाली सुरु असलेल्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी पुरुषांच्या व्यावसायिक गटात भारत पेट्रोलियम (बीपीसीएल), इन्शुअरकोट स्पोर्ट्स प्रा.लि. (आयएसपीएल), ठाणे महानगर पालिका, मीरा-भायंदर महानगर पालिका, मुंबई बंदर आणि संत सोपान काका बँकेने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे. महिलांच्या गटात राजमाता जिजाऊ, धर्मवीर, स्वराज्य स्पोर्ट्स, शिवशक्ती आणि विवेक स्पोर्ट्स क्लबने गटविजेतेपद पटकावत उपांत्यपूर्व फेरीत मजल मारलीे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त  विक्रोळी पूर्वेला टागोर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात उभारलेल्या क्रीडानगरीत दुसर्‍या दिवशी मॅटवरच्या कबड्डीचा अस्सल व्यावसायिक संघांचा थरार हजारो कबड्डीप्रेमींना याची देही अनुभवता आला. कालच प्रभादेवीत बाजी मारलेल्या बीपीसीएलने आज मैदानात उतरताच आधी रिझर्व्ह बँकेचे ३६-१८ असे डिपॉजिट जप्त करत खणखणीत विजय मिळवला. बीपीसीएलच्या मिलन दहिया आणि प्रसाद दिघोळेच्या खेळापुढे रिझर्व्ह बँकेचे काहीएक चालले नाही. या एकतर्फी विजयानंतर बीपीसीएलने ठाणे महानगर पालिकेविरुद्धचा संघर्ष १४-१३ अशा एका गुणाने जिंकत थेट उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. ठाणे महानगर पालिकेने आपल्या दुसर्‍या सामन्यात रिझर्व्ह बँकेचा ४६-३४ असा धुव्वा उडवत अंतिम आठ संघात प्रवेश केला. बीपीसीएलपाठोपाठ आयएसपीएलने आपल्या दुसर्‍या सामन्यात संत सोपान काका बँकेला ३९-२४ असे नमवत अ गटाचे विजेतेपद पटकावून उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले, तसेच मुंबई पोस्टल आणि सीजीएसटी यांच्यातील अटीतटीचा सामना पोस्टलने १६-१५ असा जिंकला आणि इ गटातून बाद फेरीत धडक मारली. क गटात मिरा भायंदर पालिकेने मिडलाइन रायगडविरुद्धची साखळी लढत ३७-३६ अशी जिंकत बाद फेरी गाठली. युनियन बँक आणि मुंबई बंदर यांच्यातील सामना युनियन बँकेने १६-१४ असा जिंकत ड गटातून बाद फेरीत प्रवेश केला. महिलांच्या गटातही जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. पुण्याच्या राजमाता जिजाऊने आपले दोन्ही साखळी सामने सहज जिंकले. पहिल्या साखळी सामन्यात श्रीराम संघाचा ३५-१० असा फडशा पाडला तर दुसर्‍या सामन्यात भांडुपच्या स्नेहविकास मंडळाची ४०-६ अशी धुळधाण उडवली. या दोन्ही सामन्यात  महेश्वरी वाघ आणि निमिता पडवळ यांचा वेगवान खेळ पाहायला मिळाला. नंदूरबारच्या धर्मवीर कबड्डी संघाने डॉ. शिरोडकर क्लबचा ४६-२४ असा सहज पराभव केला. समृद्धी कोळेकर, हर्षदा सोनावणे, हर्षदा हंडोरे आणि ईश्वरी कोंढाळकर यांनी तुफानी चढाया-पकडींचा खेळ करत आपल्या संघाला मोठे विजय मिळवून दिले. मुंबईच्या शिवशक्ती महिला संघानेही स्वस्तिक आणि पतंगराव कदम संघाचा दारुण पराभव करत बाद फेरीत प्रवेश केला. विवेक स्पोर्ट्स क्लबनेही संजना पोळ आ्िण जीवा श्रीरंगन यांच्या खेळाच्या जोरावर दोन्ही साखळी लढती आरामात जिंकल्या.

 नारी शक्ती वंदन विधेयकावरील सभा तहकूबी महापौरांनी नाकारली

 ठाण्यात भाजपच्या नगरसेवकांचा संताप, भरत चव्हाण यांची तहकूबीची मागणी ठाणे: संसद व राज्याच्या विधानसभांमध्ये `नारी शक्ती वंदन अधिनियम’ विधेयक मंजूर न करणाऱ्या काँग्रेससह विरोधी पक्षांच्या भूमिकेच्या निषेधार्थ ठाणे महापालिकेची महासभा दिवसभरासाठी तहकूब करण्याची भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांची मागणी महापौर व प्रशासनाने नाकारल्यानंतर, उपमहापौर कृष्णा पाटील व गटनेते मुकेश मोकाशी यांच्यासह भाजपाच्या नगरसेवक-नगरसेविकांनी तीव्र संताप व्यक्त केला. यापुढील महासभेत पुन्हा हा विषय मांडण्याचा भाजपने निर्धार केला असल्याचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी सांगितले. `नारी शक्ती वंदन अधिनियमा’ला विरोध करीत काँग्रेससह विरोधी पक्षांनी महिलांच्या अधिकाराची भ्रूणहत्या केली. महिला आरक्षणाला विरोध करण्यातून विरोधी पक्षांचा खरा चेहरा समोर आला आहे, याकडे लक्ष वेधत नगरसेवक भरत चव्हाण यांनी महापौर व महापालिका सचिव यांना आजची महासभा काँग्रेससह विरोधी पक्षांच्या भूमिकेच्या निषेधार्ह दिवसभरासाठी तहकूब करावी, अशी मागणी केली. मात्र, या मागणीचे पत्र महापौर व महापालिका सचिवांकडून स्वीकारण्यात आले नाही. त्यामुळे भाजपाच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर घोषणा देत निषेध केला. या आंदोलनात उपमहापौर कृष्णा पाटील, गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेविका नंदा पाटील, नम्रता कोळी, अर्चना मणेरा, मृणाल पेंडसे, काजोल गुणिजन, उषा वाघ, वेदिका पाटील, माधुरी मेटांगे, अनिता भोईर यांच्यासह नगरसेविका सहभागी झाल्या होत्या. नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या माध्यमातून संसद व विधानसभेत महिलांना जादा प्रतिनिधीत्व मिळाले असते. मात्र, काँग्रेससह विरोधी पक्षांकडून विधेयक नामंजूर केले. देशातील ७० कोटींहून अधिक महिलांचा हा अपमान होता, असे भरत चव्हाण यांनी सांगितले. या विषयावर सभा तहकूबीची मागणी भरत चव्हाण यांनी केली होती. तर नगरसेविका नंदा पाटील यांनी अनुमोदन दिले होते.

कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसन आढावा बैठक पात्रता पडताळणी करुन पुढील कार्यवाही

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे निर्देश रत्नागिरी : (अशोक गायकवाड )—कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी पात्रतेच्या निकषांची पडताळणी करुन पुढील कार्यवाही करावी असे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले. कुवारबाव ग्रामपंचायत सभागृहात पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, तहसिलदार राजाराम म्हात्रे, नगरपरिषद मुख्याधिकारी वैभव गारवे, नगरसेविका वर्षा ढेकणे, नगरसेवक बंड्या साळवी, पंचायत समिती उपसभापती गजानन धनावडे, जि.प.सदस्य प्रकाश रसाळ, कुवारबाव ग्रामपंचायत प्रशासक तळेकर आदी उपस्थित होते. गेली अनेक वर्षे कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. याबाबतची योजना रहिवाशांना समजावून सांगणे आवश्यक आहे. गरीब लोकांना घरे देवून त्यांची जीवनशैली सुधारण्यास यामुळे मदत होणार आहे. याकरिता पात्रता पडताळणी करणे आवश्यक आहे. याबाबतच्या शासन निर्णयाबाबत अफवा पसरविल्या जात आहेत त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन पालकमंत्री सामंत यांनी उपस्थितांना केले. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना शिकण्यासाठी, खेळण्यासाठी जागा, अंगणवाडी, बालवाडी एकाच आवारात उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यामुळे कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात उत्तम प्रकल्प होणार आहे, असेही पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.

पेटीएम आता भारतीय मालकी कंपनी

मुंबई / रमेश औताडे पेटीएम वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड जी एमएसएमई आणि मोठ्या उद्योगांना सेवा देणारी अग्रगण्य व्यापारी देयक सेवा कंपनी आता भारतीय मालकी कंपनी बनली आहे.  ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीच्या भागभांडवल रचनेनुसार, आता कंपनीच्या इक्विटी शेअर भांडवलापैकी ५०.३ टक्के हिस्सा देशांतर्गत गुंतवणूकदारांकडे आहे, ज्यामुळे भारतीय मालकी आणि नियंत्रणात बहुमत प्रस्थापित झाले आहे. स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांचा सहभाग सातत्याने वाढत आहे. त्यांचे होल्डिंग कू ४ आर्थिक वर्ष २०२६  मध्ये २३.१ टक्के पर्यंत पोहोचले असून, मागील तिमाहीतील २०.३ टक्के आणि एक वर्षापूर्वीच्या १४.० टक्के च्या तुलनेत ही वाढ लक्षणीय आहे. भारतीय म्युच्युअल फंडांकडे कंपनीतील १६.६ टक्के   हिस्सा असून, ४१ म्युच्युअल फंड हे भागधारक आहेत. स्थानिक विमा कंपन्यांनीही आपला हिस्सा वाढवून ५.१ टक्के केला आहे. ही कामगिरी पेटीएमच्या व्यवसायावर भारतीय गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास दर्शवते आणि देशभर मोबाईल देयके व वित्तीय सेवांचा विस्तार करण्यात कंपनीची भूमिका अधोरेखित करते. यासह, पेटीएम भारतासाठी काम करण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अधिक बळकटी देत आहे, ज्यामध्ये मालकी हळूहळू देशांतर्गत संस्था आणि गुंतवणूकदारांशी अधिक जुळत आहे. 00000000

 रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य निर्णयाविरोधात निषेध

मुंबई / रमेश औताडे महाराष्ट्रातील लाखो ऑटोरिक्षा – टॅक्सी चालकांची उपजिवीका नष्ट करून त्यांचे कुटुंब उद्धवस्त करण्याचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा डाव आम्ही आंदोलन करून हाणून पडणार असल्याचा इशारा कामगार नेते शशांक राव यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र चे कार्याध्यक्ष मारुती कोंडे म्हणाले, परिवहन मंत्री यांनी या प्रकरणी गांभीर्याने विचार करावा व हा निर्णय मागे घ्यावा. रिपब्लिकन रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे कल्याण शहराध्यक्ष मोहन पाठारे म्हणाले, सरकारने परवाना देण्याअगोदर विचार केला पाहिजे होता. १ मे, २०२६ पासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सीचालक निषेध आंदोलन करणार आहेत. महाराष्ट्रात १५ वर्ष वास्तव्यास असलेल्यांनाच ऑटोरिक्षा टॅक्सीचे परवाने दिले जातात. परवाने देताना त्यांची पोलिस पडताळणी केली जाते व त्यानंतर ऑटोरिक्षा टॅक्सी चालकांना परवाने दिले जातात. राज्यात बेकायदेशीररीत्या परिवहन मंत्रालयाच्या कृपेने बाईक टॅक्सी सुरू आहे आणि या सेवेवर जाणिवपूर्वक कारवाई केली जात नाही.आता आम्ही रिक्षा-टॅक्सीचालकांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन २८ एप्रिल रोजी परिवहन मंत्री यांना देणार आहे. ४ मे, २०२६ पासून रोज शहरी व ग्रामीण भागांमध्ये प्रमुख ठिकाणी ऑटोरिक्षा टॅक्सी चालक निदर्शने करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

 नौपाड्यात नालेसफाईला सुरूवात

 ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्या हस्ते शुभारंभ ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महापालिका क्षेत्रात यंदा नौपाड्यात प्रथम नालेसफाईला सुरुवात करण्यात आली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्या हस्ते नालेसफाईला आज सकाळी शुभारंभ करण्यात आला. यंदाच्या पावसाळ्यात नौपाडा परिसरात कोठेही पाणी साचू नये, याची काळजी घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही नगरसेवक संजय वाघुले यांनी दिली. ठाणे महापालिका क्षेत्रात दरवर्षी पाणी साचण्याची काही ठिकाणे आहेत. त्यात नौपाड्यातील काही ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचू नये, यासाठी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी काळजी घेण्यासाठी सुरुवात केली आहे. त्यानुसार नाले सफाईसाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला जात होता. त्यामुळे यंदा शहरात पहिल्यांदा नौपाड्यात नालेसफाई सुरू झाली आहे. प्रभाग क्र. २१ मधील लोकमान्य सोसायटी नाला, सोपान सोसायटी ते एम. एच. हायस्कूल नाला, नाईकवाडी नाला, सर्व्हिस रोडवरील भोईर हॉटेल ते कोपरी ब्रिज चिखलपाडी, रेल्वेमार्गावरील आनंद ब्रिज ते ठाणे प्लॅटफॉर्म क्र. १ आणि एमटीएनएल ते चिखलवाडी येथील नाल्यांच्या सफाईला आज शुभारंभ करण्यात आला. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले व शिवसेनेचे माजी नगरसेवक भास्कर पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

– जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया

 चिखलातून वाट काढत विद्यार्थ्यांची ये जा कल्याण : केडीएमसीच्या अ प्रभाग क्षेत्रातील आंबिवली स्टेशन नजीक असणाऱ्या वाल्मिकी शाळा रस्त्यावर जलवाहिनी बाधित झाल्याने लाखो लीटर पाणी वाया जात असून, विद्यार्थ्यांना चिखलातून पाण्यातून वाट काढीत शाळेत ये जा करावी लागत आहे. समन्वय अभावामुळे गेली चार दिवसापासून प्रशासन भिंजत घोगंडे कारभार समोरा येत असून प्रशासन कधी समस्या मार्गी लावणार अशी मागणी यानिमित्ताने होत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे आंबिवली स्टेशन नजीक वाल्मीकी शाळा रस्ता परिसरात गेल्या तीन चार दिवसा पासून लाखो लीटर पाणी वाया जात आहे. अमृत अंतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या कामात जुनी लाईन बाधित झाल्याने लिकेज मुळे लाखो लीटर पाणी वाया जात असून समन्वय अभावामुळे समस्या मार्गी लागत नसल्याचे चित्र दिसत आहे. या संदर्भात माजी नगरसेवक दशरथ तरे यांनी अ प्रभागाचे पाणी खात्याचे उप अभियंता उदय सूर्यवंशी यांना संपर्क साधला असता त्यांनी अमृत अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु असून ती जबाबदारी त्यांची असल्याचे सांगत, अंग काढले. तर या कामामुळे, जुनी लाईन बाधित झाल्याने लिकेजमुळे लाखो लीटर पाणी वाया जात असून रस्त्यालगत चिखलाचे साम्राज्य झाले असून लिकेजमुळे पाणी वाल्मिकी शाळेच्या मैदान रस्त्यावर साचत असल्याने या साचलेल्या पाण्यातून विद्यार्थ्यांना ये जा करण्याचा प्रसंग उद्भवला असून हा प्रश्न मार्गी लावण्या संदर्भात मागणी जोर धरू पाहत आहे. अ प्रभाग पा.पु. उप अभियंता उदय सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला लिकेज दुरुस्ती काम सोमवारी करण्यात आले असून रस्ता दुरूस्ती संदर्भात अमृत विभागाशी संपर्क केला आहे. अमृत प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता शैलेष कुलकर्णी यांच्याशी रस्ता दुरूस्ती संदर्भात संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

 भाजपा गटनेते मुकेश मोकाशी यांच्या महापालिकेतील दालनाचे उद्घाटन

आमदार संजय केळकर, निरंजन डावखरेंची प्रमुख उपस्थिती ठाणे,   २० (प्रतिनिधी) : भाजपाचे महापालिकेतील गटनेते मुकेश मोकाशी यांच्या महापालिकेतील दालनाचे आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. ठाणे महापालिकेतील भाजपच्या दालनातून ठाणेकरांच्या हिताची पूर्तता होईल, असा विश्वास व्यक्त करीत दोन्ही आमदारांनी मुकेश मोकाशी यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी उपमहापौर कृष्णा पाटील यांचीही उपस्थिती होती. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे २८ नगरसेवक निवडून आले असून, पक्षाच्या सदस्यसंख्येनुसार महापालिकेकडून प्रशस्त दालन उपलब्ध करण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेच्या तळमजल्यावर गटनेत्यांसाठी दालन देण्यात आले. या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. ठाणे शहरातील नागरिकांनी भाजपला कौल दिला. यापुढील काळात गटनेता दालनाच्या माध्यमातून ठाणे शहरातील जनहितांच्या कामांना न्याय मिळेल. ठाणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, अशी प्रतिक्रिया आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केली. ठाण्यातील २५ लाखांहून अधिक नागरिकांच्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षाची पूर्ती करण्यासाठी भाजप कार्यरत आहे. महापालिकेकडून जनतेला नागरी सुविधा मिळाव्यात, यासाठी आम्ही दक्ष राहणार आहोत. महापालिकेसंदर्भातील विविध नागरी सुविधांसाठी नागरिकांनी गटनेते कार्यालयाबरोबर संपर्क साधावा, असे आवाहन गटनेते मुकेश मोकाशी यांनी केले. या वेळी भाजपाचे नगरसेवक, नगरसेविका आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून मुकेश मोकाशी यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी ज्येष्ठ नगरसेवक व माजी गटनेते संजय वाघुले, नारायण पवार, मनोहर डुंबरे, नगरसेवक सुनेश जोशी, दीपक जाधव, सिताराम राणे, वैभव कदम, सुरेश कांबळे, विकास पाटील, नगरसेविका नम्रता कोळी, अर्चना मणेरा, नंदा पाटील, प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, स्नेहा आंब्रे, उषा वाघ, वेदिका पाटील, अनिता ठाकूर यांच्यासह भाजपाचे ठाण्यातील सरचिटणीस विक्रम भोईर, सचिन पाटील, समिरा भारती, पदाधिकारी जयेंद्र कोळी, डॉ. राजेश मढवी, अश्विन शेट्टी, स्वप्नाली साळवी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

– राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेल प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे यांना विधान परिषदेवर संधी द्या

अण्णा बनसोडे यांच्या सोबत शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे मागणी.. मुंबई -राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग सेल प्रदेश अध्यक्ष सुनील मगरे यांना विधान परिषदेवर संधी  द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री…

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल निवडणूक कायद्याप्रमाणे व्हावी

मुंबई / रमेश औताडे महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या मूळ हेतूचे उल्लंघन मानला पाहिजे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या ७ जानेवारी २०२६ आणि २ एप्रिल २०२६ च्या आदेशानुसार अनिवार्य केलेली ही  महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ची निवडणूक प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांमार्फत किंवा माननीय न्यायालयाला योग्य वाटेल त्याप्रमाणे देखरेख केली जावी. अशी मागणी हीलिंग हँडचे युनिटी पॅनल चे संयोजक डॉ तुषार जगताप, डॉ संजय वाठोरे, डॉ ललित आनंदे यांनी पत्रकार परिषदेत केली. या  निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्यासंदर्भात रजिस्ट्रार  त्यांच्या पूर्ववर्तींनी मतदार यादी तयार करताना केलेल्या गंभीर चुका टाळण्याची विनंती केली आहे. एमएमसी निवडणुकीचे नामनिर्देशन अर्ज उपलब्ध नसणे. वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिवांना पत्र, नियमानुसार आक्षेप आणि सूचना. नावे वगळल्याबद्दल सहसचिवांना पत्र, सूचना, दिशाभूल करणारी, कायद्यानुसार अनिवार्य असूनही प्रसिद्ध केलेल्या याद्या कार्यालयात ठेवल्या नाहीत. असे अनेक आरोप यावेळी करण्यात आले.