Category: होम

पनवेलमध्ये लेन्सकार्टचा निषेध आणि आंदोलनाचा इशारा

पनवेल(प्रतिनिधी)-  लेन्सकार्ट  कंपनीच्या काही शाखांमध्ये कार्यरत हिंदू कर्मचाऱ्यांवर त्यांच्या धार्मिक आचरणांबाबत निर्बंध घातले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नवीन पनवेल युवा मोर्चा, भारतीय जनता पक्षाच्या वतीने कंपनीविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, काही शाखांमध्ये हिंदू कर्मचाऱ्यांना कुंकू, टिळा, गंध लावण्यास तसेच हातावर धार्मिक दोरा धारण करण्यास मनाई करण्यात येत आहे. याशिवाय, काही ठिकाणी हिंदू सण साजरे करण्यावरही बंधने घालण्यात आल्याचे समोर आले आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून तो भारताच्या संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन करणारा आहे. या संदर्भात नवीन पनवेल युवा मोर्चा भाजपाचे अध्यक्ष मयूर कदम यांनी पनवेल येथील लेन्सकार्ट व्यवस्थापनाला लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हंटले आहे कि, भारत हा विविध धर्मांचा देश असून प्रत्येक नागरिकाला आपल्या श्रद्धेनुसार व धार्मिक परंपरांनुसार आचरण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही कंपनीकडून विशिष्ट धर्माच्या कर्मचाऱ्यांवर निर्बंध घालणे हे अयोग्य व निषेधार्ह आहे. म्हणूनच, संबंधित प्रकार तात्काळ थांबवून कंपनीने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत, याची हमी द्यावी. या संदर्भात कंपनीकडून समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्यास नवीन पनवेल युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा लेन्सकार्ट व्यवस्थापनाला देण्यात आला आहे. यावेळी मयूर कदम यांच्या समवेत युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पालकांसाठी कार्यशाळा व प्रभाग क्र ६ व ९ येथे इंडोर गेम झोन सुरु करण्याचा माथेरान शिक्षण समितीने घेतला निर्णय

  मुकुंद रांजाणे (माथेरान) माथेरान नगरपरिषदे च्या शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण समितीची सभा सोमवारी नगरपालिकेच्या स्व.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहात आयोजित बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून  बुधवार दि २२ रोजी अंगणवाडी व माथेरान मधील तिन्ही शाळांच्या पालकांसाठी कार्यशाळा आयोजित केली आहे. सुप्रसिद्ध मनसोपचार तज्ञ् प्राजक्ता गांगल या मार्गदर्शन करणार आहेत. मुलांच्या सर्वांगीण विकासात पालकांची भूमिका व मोबाईल पासून मुलांना कसे दूर ठेवता येईल. या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. तरुणांमध्ये खेळाची आवड जोपासली जावी यासाठी प्रभाग क्र ६ व ९ येथे इंडोर गेम झोन सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे या मध्ये टेबल टेनिस, दोन कॅरम बोर्ड, बॅडमिंटन व बुद्धिबळ याचा समावेश असेल.  तसेच वीर हुतात्मा भाई कोतवाल शाळेच्या पत्र्यांना रंग लावणे कामाला देखील मंजुरी देण्यात आली. शिक्षण समितीचे सभापती सुनिल शिंदे, समिती सदस्य प्रतिभा घावरे, केतन रामाने व सुरेखा साळूंखे यांच्या सह नगरपरिषदेचे समीर दळवी यांनी सभेचे कामकाज पाहिले.

माथेरानमध्ये जंगलाला कुंपण, जबाबदार कोण?

जाळीच्या कंपाऊंडमुळे वन्यजीव अडचणीत; प्राणीमित्र संतप्त मुकुंद रांजाणे ( माथेरान ) माथेरानच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर डोंगरदऱ्यांनी  व्यापलेला असून घनदाट वनराई अशी ख्याती असलेल्या माथेरान मध्ये पूर्वीपासून जंगलात मुक्या प्राण्यांचा वावर होता तो आजही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.परंतु सद्यस्थितीत येथील जुन्या बंगल्यांची विक्री होत गेल्याने काही नवीन मालकांनी बंगल्याच्या भोवती संपूर्ण भागात जाळीचे कंपाऊंड टाकण्यास सुरुवात केल्यामुळे जंगल भागातील मुक्या प्राण्यांच्या अधिवासावर निर्बंध आले आहेत. त्यामुळे साहजिकच आगामी काळात ह्या प्राण्यांच्या संख्येत घट होणार असून त्यांचा मुक्तसंचार लुप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येथील एल्फिन्स्टन बंगल्याच्या नवीन मालकाने जवळपास ३६ एकरांवर असणाऱ्या या बंगल्याच्या सभोवताली जाळीचे कंपाऊंड करत असल्याने हे केलेले कंपाउंड योग्य नसून मुक्या प्राण्यांच्या मुक्तसंचारावर गदा येत आहे.या बंगल्याच्या जवळच मंकी पॉईंट आणि मॅलेट स्प्रिंग हे पाण्याचे स्त्रोत असल्याने याठिकाणी जंगली प्राणी आपली पाण्याची तहान भागवत असतात. परंतु येथील घनदाट जंगलात असणाऱ्या एल्फिन्स्टन बंगल्याच्या नवीन मालकाने बंगल्याच्या सभोवताली तारेचे कंपाउंड केल्याने मुक्या प्राण्यांच्या अधिवासावर गदा आली आहे. यासाठी हे कंपाऊंड ताबडतोब काढून टाकण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी अनेक दिवसांपासून केलेली असून  याबाबत  लेखी पत्र व्यवहार संबंधित विभागाकडे केलेला असताना देखील अद्यापही याबाबत ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने प्रशासनाच्या गलथान कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.नगरपरिषदेच्या सहायक रचनाकार करुणा बांगर यांनी एक दिवस या भागात येऊन हे कंपाऊंड काढायला हवे असा दिखावा केला होता परंतु काहीच योग्य कारवाई करण्यात आलेली नाही. वनखात्याचे वनपाल यांनीही फक्त एक दिवस नाममात्र पाहणी केली होती.त्यानंतर याभागात कुणीही प्रशासकीय अधिकारी वर्ग फिरकलेले नाहीत त्यामुळे निश्चितच यामागे राजकीय वरदहस्ताने मोठे अर्थकारण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ———————————— माथेरान स्थळासाठी वेगळी नियमावली असून जंगल भाग असल्याने मुक्या प्राण्यांच्या अधिवासाकरिता कोणत्याही वास्तूला कंपाऊंड करता येत नाही.आम्ही लेखी निवेदने देऊनही नाममात्र चार ते पाच जाळ्या काढण्याचा दिखावा नगरपरिषदेच्या सहायक रचनाकार करुणा बांगर यांनी केलेला आहे.बाकी सर्व जाळ्या आजही तशाच आहेत. वनखात्याचे अधिकारी सुध्दा मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यांनाही आपल्या कर्तव्याची जाण नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. संतोष शिंदे—उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माथेरान

ड्रग्स प्रकरणानंतर टिटवाळ्यात सुरक्षेचा विषय गंभीर

 नागरिकांची पोलिसांकडे ठोस कारवाईची मागणी कल्याण : टिटवाळा परिसरात अलीकडे उघडकीस आलेल्या अमली पदार्थ (एम.डी.) प्रकरणामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली असून कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी एकत्र येत टिटवाळा पोलीस ठाण्यात निवेदन देत तातडीने कडक सुरक्षा उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या निवेदनाची दखल घेत योग्य त्या उपाययोजना लवकरात लवकर राबवण्याचे आश्वासन दिले आहे. निवेदन सादर करताना ॲड. अविनाश शिळकंदे (उच्च न्यायालय वकील व उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेना), दिलीप राठोड, भाऊसाहेब घोडके व रोहित जोशी उपस्थित होते. याआधी पोलिसांनी संशयित दहशतवाद्यांना अटक करत मोठी कारवाई केली होती, ज्याचे नागरिकांनी स्वागत केले होते. मात्र त्यानंतर उघडकीस आलेल्या ड्रग्स रॅकेटमुळे परिसरातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातील संभाव्य धोके टाळण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, टिटवाळा परिसर झपाट्याने विकसित होत असून मोठ्या प्रमाणात नवीन रहिवासी येथे स्थायिक होत आहेत. मात्र भाडेकरू आणि नव्या रहिवाशांची पोलीस पडताळणी प्रभावीपणे होत नसल्याने संशयास्पद हालचालींना खतपाणी मिळत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे तातडीने काटेकोर पडताळणी यंत्रणा राबवणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी पोलिसांकडे सखोल कोंबिंग ऑपरेशन राबवून ड्रग्स विक्री व पुरवठा साखळी मोडीत काढण्याची मागणी केली आहे. तसेच प्रत्येक भाडेकरूची अनिवार्य पोलीस पडताळणी, सोसायट्यांनी रहिवाशांची संपूर्ण माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक करणे, गुप्त माहिती यंत्रणा अधिक सक्षम करणे आणि नागरिक-पोलीस समन्वय वाढवणे या उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. टिटवाळ्याचा झपाट्याने होणारा विस्तार लक्षात घेता सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ ठोस आणि प्रभावी कारवाई करून नागरिकांचा विश्वास परत मिळवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

वालधुनी नदीत केमिकलयुक्त पाणी सोडल्यामुळे गंभीर प्रदूषण

कल्याण : कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्रमांक २ मधील भवानी नगर, अनुपम नगर, घोलप नगर, विधी परिसर, शिव अमृतधाम व योगीधाम या भागातील नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून तीव्र पर्यावरणीय समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या परिसरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीमध्ये काही औद्योगिक कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर केमिकलयुक्त दूषित पाणी सोडले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः रात्री ८ ते ११ वाजण्याच्या दरम्यान हे प्रकार घडत असून नदीचे स्वरूप नाल्यासारखे झाले आहे. या प्रदूषणामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत आहे, वायू प्रदूषणात वाढ होत आहे. नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना श्वसनाचे त्रास, डोकेदुखी, मळमळ अशा समस्या जाणवत आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शिवसेना भवानी चौक शाखा, विभाग प्रमुख सतीश वायचळ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले आहे. तसेच हे निवेदन केडीएमसी महापौर आणि आयुक्तांना देखील दिले आहे. नदीत सोडले जाणारे केमिकलयुक्त पाणी त्वरित थांबविणे, संबंधित कंपन्यांवर कडक कारवाई करणे, प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत तपासणी करून अहवाल सादर करणे. हवा व पाण्याची गुणवत्ता नियमित तपासणे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे. याबाबत स्थानिक नागरिकांच्या वतीने प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, लवकरात लवकर ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 एनआरसीच्या थकबाकी करावरून केडीएमसी महासभेत गदारोळ

  एनआरसीचे नळ कनेक्शन कापले जाणार कल्याण : कल्याणच्या बंद पडलेल्या एनआरसी कंपनीच्या थकीत कराच्या वसुलीवरून सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात जोरदार वादावादी झाली. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एनआरसीमधून कर वसूल होऊ शकला नाही आणि आता काही कोटींचा कर तीनशे कोटींहून अधिक झाल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला. कराची थकबाकी असतानाही महापालिका प्रशासनाने एनआरसीचे नवीन पाणी कनेक्शन दिले आणि शिवाय एनआरसीचे भूखंड खरेदी करणाऱ्या लोकांना महापालिकेने ना हरकत पत्रेही दिली.  स्थानिक नगरसेविका उपेक्षा भोईर, स्थानिक नगरसेवक राहुल कोट, रोहन कोट यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करत सर्व बाजूंच्या नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. नगरसेवक राहूल कोट यांनी एनआरसी  कोट्यवधीची थकबाकी प्रकरणी प्रशासनाला पत्र देत, महासभेत उपसूचना मांडित एनआरसी थकबाकी प्रकरणी  विषय लावून धरला आहे. एनआरसीच्या मुद्द्यावरून नगरसेविका उपेक्षा भोईर यांनी महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब करण्याची मागणी केली. जे सुरुवातीला महापौरांनी फेटाळले होते, नंतर चर्चेअंती एनआरसीला दिलेले नळ कनेक्शन तात्काळ खंडित करण्यात यावे आणि महापालिका प्रशासनाने दिलेल्या सर्व परवानग्याही रद्द कराव्यात, असा निर्णय घेण्यात आला. यासोबतच काही नगरसेवक आणि प्रशासनाची समिती स्थापन करावी.  ही समिती एनआरसीद्वारे महापालिकेविरुद्ध विविध न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यांचा आढावा घेणार आहे. आणि थकीत कर वसूल करण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करणार.

 १५ मेपूर्वी मान्सूनपूर्व कामे पूर्ण करा

आपत्ती आराखडा अद्ययावत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी: आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवू नये आणि नागरिकांना तात्काळ व प्रभावी मदत मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज मान्सूनपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेतला. सर्व संबंधित विभागांना मान्सूनपूर्व कामे १५ मेपूर्वी पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. तसेच जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी समन्वय साधून सज्ज राहण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली मान्सुनपूर्व तयारी आढावा बैठक संपन्न झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, पोलिस उपअधीक्षक श्वेता खाडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत तसेच महसूल, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, आरोग्य, वीज वितरण, ग्रामविकास, नगरपरिषद तसेच पोलीस विभाग यांचा सहभाग होता. प्रत्येक विभागाने आपापल्या तयारीचा आढावा सादर करताना संभाव्य अडचणी व उपाययोजना मांडल्या. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी धोकादायक झाडे व जीर्ण इमारतींचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. पूरप्रवण क्षेत्रांची अचूक नोंद करून तेथे विशेष दक्षता घेण्यास सांगितले. रस्ते व पुलांची दुरुस्ती वेळेत पूर्ण करून वाहतूक सुरळीत ठेवण्यावर भर देण्यात आला असून वीजपुरवठा अखंडित राहण्यासाठी आवश्यक साहित्यसाठा व मनुष्यबळ तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले. आरोग्य विभागाला संभाव्य साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसा औषधसाठा, वैद्यकीय पथके आणि आपत्कालीन सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. ग्रामपातळीवर आपत्ती व्यवस्थापन समित्या सक्रिय करून जनजागृती मोहीम राबविण्यावर विशेष भर देण्यात यावा,  मान्सून काळात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला त्वरित प्रतिसाद देण्यासाठी नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्याचे आदेश देताना, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा व प्रशासनाशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दामिनी, सचेत आणि भूकंप या ॲप विषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, हे तीनही ॲप्स आपत्ती व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. दामिनी हे ॲप विजेच्या कडकडाट (Lightning) बाबत पूर्वसूचना देते. आपल्या परिसरात पुढील काही मिनिटांत वीज पडण्याची शक्यता असल्यास अलर्ट मिळतो. सचेत ॲपद्वारे पूर, चक्रीवादळ, भूकंप, त्सुनामी इत्यादी आपत्तींबाबत वेळेवर सूचना मिळते तर भूकंप हे ॲप भूकंपाच्या धक्क्यांची माहिती आणि अलर्ट मिळण्यासाठी वापरले जाते. तरी नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 भीम जयंती महोत्सवात रविवारी ‘ प्रबोधन महासभा ‘

नामवंत पत्रकार अशोक वानखेडे, दिवाकर शेजवळ, संविधानतज्ज्ञ ॲड. जयमंगल धनराज मार्गदर्शक नांदेड (२० एप्रिल २०२६) – नांदेड जिल्ह्यातील आंबेडकरवादी लोक मंचातर्फे भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती महोत्सव नांदेड शहरात येत्या रविवारी २६ एप्रिल २०२६ रोजी दणक्यात साजरा करण्यात येणार आहे.  त्यात संध्याकाळी ४ वाजता शंकरराव चव्हाण सभागृहात ‘ धर्मनिरपेक्ष भारताचे भवितव्य ‘ या विषयावर मराठवाड्यातील ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते सुरेशदादा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली  प्रबोधन महासभा ‘ आयोजित करण्यात आली आहे. खासदार रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रतापराव चिखलीकर हे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या महासभेत राजधानी दिल्लीतील नामवंत पत्रकार अशोक वानखेडे, मुंबईतील डॉ. आंबेडकर लॉ कॉलेजचे माजी प्राचार्य, बहुजन समाज पार्टीचे मुंबई – कोकण क्षेत्राचे प्रभारी ॲड. जयमंगल धनराज, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ हे प्रमुख मार्गदर्शक आहेत, अशी माहिती आंबेडकरवादी लोक मंचाचे महासचिव देविदास मनोहरे आणि पी. एस गवळे यांनी  एका पत्रकाद्वारे दिली आहे. यंदाचे वर्ष हे महाडच्या चौदार तळ्यावरील समता संगराच्या शताब्दीचे आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची जन्म द्विशताब्दीही राज्यात सुरू झाली आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवात यावर्षी दलित – बहुजन समाजात मोठा जोश आणि चैतन्य संचारले आहे, असे आंबेडकरवादी लोक मंचाचे  संस्थापक – अध्यक्ष सुरेशदादा गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

 पी.आर. जॅग्वार्सने पटकावला टीडब्ल्यूपीएल चषक

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण  ठाणे – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाला संलग्न असलेल्या ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीच्या वतीने ठाण्यातील पोलिस मैदान येथे आयोजित टीडब्ल्यूपीएल क्रिकेट स्पर्धेत पी.आर. जॅग्वार्सने व्ही.पी. पँथर्स संघाला पराभूत करत चषकावर नाव कोरले.  टीडब्ल्यूपीएलचा अंतिम सामना व्ही.पी. पँथर्स विरुद्ध पी.आर. जॅग्वार्स या दोन संघात रंगला. पी.आर. जॅग्वार्ससाठी प्रथम फलंदाजी करत ५ गडी बाद ६७ धावा केल्या. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना व्ही.पी. पँथर्स ने ५ गडी बाद ५९ धावा केल्या. पी.आर. जॅग्वार्स संघाने हा अंतिम सामना ८ धावांनी जिंकला. सामनावीर म्हणून विक्रम विश्वकर्मा (पी.आर. जॅग्वार्स) तर इंडिया आयकॉन मॅन ऑफ द सिरीज विवेक शेलार, ठाणे आयकॉन मॅन ऑफ द सिरीज जुगेश यादव यांचा सन्मान करण्यात आला. पारितोषिक वितरण समारंभाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या महिला संघटक मीनाक्षी शिंदे, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक मंदार केणी, युवासेना कार्यकारिणी सदस्य अर्जुन डाभी, नितीन लांडगे, मिलिंद चव्हाण, किरण जाधव, नितेश पाटोळे, पी. आर. जग्वार्स संघाचे मालक रोहित पिंपळकर, प्रकाश कोटवानी, व्ही पी पँथर्स संघाचे मालक विशाल जाधव, ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष निखिल बुडजडे, उपाध्यक्ष अभिजित पवार यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर मंडळी उपस्थित होते.