Category: होम

 दिवा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी दिपक जाधव यांची निवड

मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर सत्कार दिवा, दि. ४ ऑगस्ट : ठाणे महानगरपालिकेच्या दिवा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दिपक नामदेव जाधव यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत नागरिकांच्या अपेक्षेनुसार विकास कामांना गती देण्याचा विश्वास व्यक्त केला. या सत्कार समारंभाला कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश गोवर्धन मोरे, आमदार रवी फाटक, ठाण्याच्या महापौर शर्मिलाताई पिंपळकर, मीनाक्षीताई शिंदे तसेच दिवा शहर प्रमुख, नगरसेवक रमाकांत मढवी यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपक जाधव यांचा गौरव करण्यात आला. यावेळी “विश्वासाची ही जबाबदारी, सेवाभावाची ही नवी संधी” या भावनेतून जनतेच्या अपेक्षांना न्याय देत दिवा परिसराच्या विकासाला नवी दिशा देण्याचे आवाहन करण्यात आले. नागरिकाभिमुख प्रशासन, मूलभूत सुविधा आणि प्रभागातील विकासकामांना प्राधान्य देत काम करण्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला. दरम्यान, कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश गोवर्धन मोरे यांनीही दिपक जाधव यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दिवा प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी काम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Heading – सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाला महाराष्ट्राचा सलाम

 इंद्रेश कुमार व पाल्गा रिंपोचे यांचा ५ ऑगस्ट रोजी ‘राष्ट्रीय एकात्मिक समरसता सन्मान सोहळ्या’त गौरव मुंबई | प्रतिनिधी दि-४ ऑगस्ट लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक सिंधू महाकुंभात संपूर्ण देशात राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता, सर्वपंथ समभाव आणि भारतीय सांस्कृतिक ऐक्याचा प्रभावी संदेश दिला. या ऐतिहासिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक व अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार तसेच बौद्ध  आध्यात्मिक धर्मगुरू पाल्गा रिंपोचे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी “राष्ट्रीय एकात्मिक समरसता सन्मान सोहळ्याचे” आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य सन्मान सोहळा महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने आज सायंकाळी ४.०० ते ६.०० या वेळेत सचिवालय जिमखाना, विधान भवन शेजारी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा प्रमुख उपस्थिती म्हणून लाभणार असून, त्यांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. सिंधू महाकुंभाच्या माध्यमातून देशभरात राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि भारतीय संस्कृतीतील विविधतेतून एकतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला. सिंधू नदीच्या पवित्र तीरावर विविध धर्म, पंथ आणि संस्कृतींच्या प्रतिनिधींनी एकत्र येत राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. बौद्ध आध्यात्मिक गुरू पाल्गा रिंपोचे यांच्या हस्ते संपन्न झालेले सिंधू पूजन आणि इंद्रेश कुमार यांच्या दीर्घकालीन प्रयत्नांमुळे या महाकुंभाला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता आणि सर्वपंथ समभावाचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचावा, या उद्देशाने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला  आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनमानसात अधिक दृढ व्हावा, विविध धर्म-पंथांमध्ये परस्पर विश्वास आणि संवाद वाढावा तसेच भारतीय संस्कृतीतील “विविधतेत एकता” हा विचार अधिक बळकट व्हावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा “राष्ट्रीय एकात्मिक समरसता सन्मान सोहळा” महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

उलवेकरांचा पाणीप्रश्न लवकरच संपुष्टात येणार

पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सचिन घरत, सचिन राजेंचा पाठपुरावा राज भंडारी उलवे :उलवे नोडमधील सेक्टर १५ ते १८ मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेली अनेक वर्ष येथील रहिवाशांना सतावत आहे. उलवेकरांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागू नये म्हणून सचिन घरत आणि सचिन राजे येरुणकर यांनी पाठपुरावा करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे आता उलवेमधील पाणीप्रश्न संपुष्टात येणार असल्याचे अश्वासन आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सिद्धिविनायक महागणपती मंदिर, सेक्टर १७, उलवे येथे भव्य जनता दरबाराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या जनता दरबारास गव्हण ग्रामपंचायतचे उपसरपंच सचिन घरत तसेच सचिन राजे येरुणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उलवे नोडमधील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जनता दरबारामध्ये महत्त्वाचा विषय उलवे नोडमधील पाणी टंचाई व पाणीपुरवठ्याची समस्या हा होता. यावेळी सचिन घरत आणि सचिन राजे येरुणकर यांनी सेक्टर १५, १६, १७ व १८ येथील रहिवाशांच्या पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लवकरात लवकर नवीन जलवाहिनी (पाईपलाईन) टाकण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. याशिवाय नागरिकांनी मांडलेल्या विविध नागरी समस्या व अडचणी संयमाने ऐकून घेत, संबंधित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासनही देण्यात आले. या जनता दरबारास सुमारे ६०० रहिवाशांनी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडल्या. अनेक नागरिकांनी आपल्या प्रश्नांचे समाधान झाल्याची भावना व्यक्त करत कार्यक्रमाचे कौतुक केले. ००००

 रत्न व दागिने उद्योगाला महाराष्ट्र शासनाचा भक्कम पाठिंबा

ज्वेल ट्रेण्ड्झ जेम्स अँड ज्वेलरी शो इंडिया २०२६ मध्ये कुशल कारागिरांच्या कल्याणावर भर मुंबई, ३ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्र शासनाचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते आज मुंबईतील विलेपार्ले (पूर्व) येथील हॉटेल सहारा स्टार येथे ज्वेल ट्रेण्ड्झ जेम्स अँड ज्वेलरी शो इंडिया (JTGJS) २०२६ च्या २२ व्या आवृत्तीचे उद्घाटन करण्यात आले. ज्वेल ट्रेण्ड्झ आयोजित या सहा दिवसीय बी२बी प्रदर्शनात १५० हून अधिक आघाडीचे दागिने उत्पादक, १०० हून अधिक प्रदर्शक, तसेच १२ देशांतील ५,००० हून अधिक नोंदणीकृत किरकोळ विक्रेते आणि आंतरराष्ट्रीय खरेदीदार सहभागी झाले असून, भारतीय रत्न व दागिने उद्योगासाठी हे प्रदर्शन देशातील अग्रगण्य व्यावसायिक व्यासपीठ म्हणून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. यावेळी बोलताना मंगल प्रभात लोढा म्हणाले, “रत्न व दागिने उद्योग हा महाराष्ट्रातील सर्वाधिक रोजगारनिर्मिती करणाऱ्या क्षेत्रांपैकी एक असून देशाच्या निर्यातीत त्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. कौशल्य विकास, नावीन्य आणि उद्योजकतेच्या माध्यमातून या उद्योगाला आवश्यक ते सर्व सहकार्य देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. शाश्वत विकास आणि जागतिक नेतृत्वाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या या उद्योगामागे महाराष्ट्र शासन ठामपणे उभे आहे. लाखो कुशल कारागिरांचे कल्याण तितकेच महत्त्वाचे आहे. दागिने उद्योगातील कुशल कामगारांना आवश्यक आर्थिक सुरक्षा आणि संरक्षण मिळावे यासाठी सर्वसमावेशक विमा व सामाजिक सुरक्षा व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने शासन उद्योग संघटनांसोबत सकारात्मकरीत्या काम करेल. उद्योगाच्या समस्या सोडवून त्याची दीर्घकालीन स्पर्धात्मकता अधिक बळकट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” ज्वेल ट्रेण्ड्झ जेम्स अँड ज्वेलरीचे  गोविंद वर्मा म्हणाले, “JTGJS हे केवळ व्यापार प्रदर्शन नसून भारतीय रत्न व दागिने उद्योगाची ताकद, नावीन्य आणि जागतिक स्पर्धात्मकता अधोरेखित करणारे एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. यंदाच्या प्रदर्शनात देश-विदेशातील आघाडीचे प्रदर्शक सहभागी झाले असून सोने, हिरे, जडाऊ, टेंपल, अँटिक आणि फॅशन ज्वेलरी सह मौल्यवान रत्ने, अत्याधुनिक यंत्रसामग्री, नाविन्यपूर्ण पॅकेजिंग सोल्यूशन्स आणि आधुनिक दागिने उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यात आले आहे.” ज्वेल मेकर वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष संजय जीवनलाल शाह म्हणाले, “भारतातील लाखो कुशल कारागीर हे रत्न व दागिने उद्योगाचा कणा आहेत. त्यांना योग्य ओळख, कौशल्य विकास, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सक्षमीकरण मिळाल्यास भारताचे जागतिक नेतृत्व अधिक मजबूत होईल. व्यापारी, खरेदीदार आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा मोठ्या प्रमाणावर झालेला सहभाग नव्या व्यावसायिक संधी निर्माण करेल आणि मुंबईची ‘भारताची ज्वेलरी कॅपिटल’ म्हणून ओळख अधिक दृढ करेल. महाराष्ट्रातील मालाड, बोरिवली आणि दहिसर परिसरातील हिरे उद्योगांमधून सुमारे दोन लाख हिरे कारागीर, दोन लाख सुवर्णकार आणि सुमारे एक लाख अन्य कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आमची दृष्टी केवळ सोन्याच्या दागिन्यांपुरती मर्यादित नाही. चांदी, प्लॅटिनम आणि इतर मौल्यवान धातूंमधील आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणे, कारागिरांचे सक्षमीकरण करणे आणि जागतिक रत्न व दागिने उद्योगात भारताचे नेतृत्व अधिक बळकट करणे हा आमचा संकल्प आहे.” पुढील सहा दिवस हे प्रदर्शन सुरू राहणार असून उत्पादक, घाऊक व किरकोळ विक्रेते, निर्यातदार आणि आंतरराष्ट्रीय खरेदीदार यांना नेटवर्किंग, नव्या बाजारपेठांचा शोध आणि व्यावसायिक भागीदारीसाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. JTGJS २०२६ मुळे भारताचे जागतिक रत्न व दागिने व्यापारातील स्थान अधिक मजबूत होण्याबरोबरच मुंबईची ‘भारताची ज्वेलरी कॅपिटल’ म्हणून ओळख अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. ००००

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या क्रीडा पुरस्कारांची घोषणा

 रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणार्‍या…

 क्रिकेट बॉल्स मध्ये  ‘ए३ स्पोर्ट्स क्राफ्ट’ची मोठी झेप

 जुन्या बॉलचा कायापालट अकादमींचे बजेट वाचवणार! मुंबई, ३० जुलै: भारतातील क्रिकेटवेडाचा विचार करता प्रत्येक गल्लीबोळात आणि नामांकित अकादमींमध्ये दररोज हजारो क्रिकेट बॉल्स सरावासाठी वापरले जातात. मात्र, अवघ्या काही सत्रांतच हे महागडे बॉल्स खराब होऊन कचऱ्यात जातात. या समस्येवर मुंबईतील ‘ए३ स्पोर्ट्स क्राफ्ट’ (A३ Sports Craft) या कंपनीने एक भन्नाट आणि पर्यावरणपूरक तोडगा शोधून काढला आहे. कंपनीच्या ‘ए३ रीक्राफ्टेड’ (A३ ReCrafted) या उपक्रमांतर्गत वापरलेल्या जुन्या क्रिकेट बॉल्सवर अत्याधुनिक प्रक्रिया करून ते पुन्हा सरावासाठी ब्रँड न्यू बनवण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे.  यात प्रथम  पृष्ठभागाची दुरुस्ती (Surface रेस्टोरेशन)म्हणजे  बॉलचे बाहेरील लेदर पुन्हा मजबूत केले जाते.यानंतर  “कोर स्टॅबिलायझेशन” (Core स्टॅबिलिझशन) म्हणजे  बॉलचा आतील कडक भाग आणि त्याचे वजन संतुलित केले जाते. त्यानंतर  “फिनिशिंग” (फिनिशिंग), यात  बॉलचा गोल आकार आणि सीमची कामगिरी पूर्ववत केली जाते, ज्यामुळे गोलंदाजांना सराव करताना मूळ मॅच बॉलसारखाच अनुभव मिळतो. “नवीन क्रिकेट बॉल्सच्या वारंवार होणाऱ्या खरेदीमुळे अकादमी आणि क्लबचे बजेट कोलमडते. ‘ए३ स्पोर्ट्स क्राफ्ट’च्या या रीकंडिशनिंग मॉडेलमुळे क्रीडा साहित्यावरील खर्च ५० ते ६० टक्क्यांनी कमी होतो. ही वाचलेली रक्कम तळागाळातील खेळाडूंच्या विकासासाठी आणि चांगल्या पायाभूत सुविधांसाठी वापरता येऊ शकते” असे कंपनी व्यवस्थापनाचे मत आहे. हा उपक्रम केवळ आर्थिकदृष्ट्याच नाही, तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही क्रांतिकारी ठरत आहे. स्पोर्ट्स साहित्यामध्ये ‘सर्कुलर इकॉनॉमी’ (Circular Economy) म्हणजेच कचरा कमी करून पुनर्वापराला प्रोत्साहन देण्याचे काम ‘ए३ स्पोर्ट्स क्राफ्ट’ करत आहे. यामुळे नवीन उत्पादनाची गरज कमी होऊन कार्बन फूटप्रिंट (Carbon Footprint) घटण्यास मोठी मदत होत आहे. हे रीकंडिशन केलेले लाल आणि पांढरे बॉल्स प्रामुख्याने फक्त सराव सत्रांसाठीच डिझाइन केले आहेत.  खेळाला शाश्वत (Sustainable) आणि स्मार्ट बनवणारा मुंबईतील हा उपक्रम आगामी काळात देशातील क्रिकेट कोचिंगचा चेहरामोहरा बदलणारा ठरू शकतो, यात शंका नाही. ए३ स्पोर्ट्स क्राफ्ट’च्या या रीकंडिशनिंग मॉडेलला सध्या क्रिकेट वर्तुळात चांगलाच प्रतिसाद लाभतो आहे.  भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी देखील या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून या चेंडूंच्या पुनर्वापरामुळे होणाऱ्या बचतीला मनापासून दाद दिली आहे. क्रिकेट बॉल्सच्या वाढत चाललेल्या किमतीच्या पार्श्वभूमीवर ही संकल्पना भारतीय क्रिकेटसाठी अधिकच तारक ठरू शकेल.  मुंबई क्रिकेट संघटनेने देखील या संकल्पनेचे कौतुक केले आहे. भारताचे माजी यष्टीरक्षक चंद्रकांत पंडित,  साबा  करीम, राष्ट्रीय निवड समितीचे माजी सदस्य सुरेंद्र भावे, माजी कसोटीवर करसन घावरी अशा बऱ्याच क्रिकेटपटूंनी या प्रकल्पाचे स्वागत केले असून त्यांनी आपल्या क्रिकेट संघटना, क्लब आणि अकादमी साठी हे चेंडू स्वीकारण्यास सुरुवातही केली आहे. एम.सी.ए. सह महाराष्ट्र क्रिकेट अससोसिएशन , मध्य प्रदेश क्रिकेट अससोसिएशन, सौराष्ट्र, विदर्भ या संघटनांनीदेखील क्रिकेटचे जुने चेंडू नवीन करण्याच्या प्रकल्पाला जोरदार प्रतिसाद दिला आहे.  लवकरच तळागाळातील सगळ्या क्लब आणि क्रिकेट अकादमी या प्रकल्पाचा लाभ उठवतील असा ए३ स्पोर्ट्स क्राफ्टला विश्वास आहे. ००००

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून लाखो नागरिकांना दिलासा

 महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी शासन कटिबद्ध –  मेघना साकोरे-बोर्डीकर रायगड-अलिबाग : महिलांना उद्योजक व आत्मनिर्भर बनवण्यासाठी राज्य शासन विविध योजना प्रभावीपणे राबवत असून प्रत्येक महिला लखपती व्हावी, हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा, ऊर्जा, महिला व बालविकास तसेच सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी पनवेल येथे सांगितले. महसूल व वन विभागाच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’त त्या बोलत होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या शिबिराचे उद्घाटन राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते झाले. आमदार प्रशांत ठाकूर व अभिनेते-दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, सातबारा उतारा आदी महसूल विषयक कागदपत्रांचे जलद वितरण करण्यात आले. तसेच विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना लाभांचे वाटप करण्यात आले. राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून त्याच्या सक्षमीकरणासाठी तसेच तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले. राज्यात १० लाख नागरिकांना लाभ देण्याचे उद्दिष्ट असताना, रायगड जिल्ह्यातच सव्वादोन लाखांहून अधिक नागरिकांना समाधान शिबिरांचा लाभ मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासकीय योजना शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधी सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी किशन जावळे, उपविभागीय अधिकारी पवन चांडक, तहसीलदार मिनल भामरे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेकडो नागरिकांनी शिबिराचा लाभ घेत महसूल विषयक कामे तत्परतेने पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ००००

 डॉक्टर हल्ला प्रकरणात रमेश म्हात्रे यांच्या अडचणी वाढल्या

न्यायालयीन कोठडीत १५ दिवसांची वाढ कल्याण: शास्त्री नगर रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यातील मुख्य आरोपी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या अडचणी कमी होताना दिसत आहेत. कल्याण न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी आणखी १५ दिवसांसाठी वाढवली आहे. सोमवारी, रमेश म्हात्रे यांचा जबाब कल्याण न्यायालयासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवण्यात आला. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी वाढवण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांना पुढील १५ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. डोंबिवलीतील शास्त्री नगर रुग्णालयात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर ही घटना घडली. या घटनेनंतर रुग्णालयाच्या परिसरात तणाव निर्माण झाला होता. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला आणि सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. या घटनेमुळे वैद्यकीय समुदायातही संतापाची लाट उसळली होती. रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची आणि रुग्णालयाच्या आवारात शिस्त राखण्याची मागणी करण्यात आली. पोलिसांच्या तपासादरम्यान न्यायालयाने न्यायालयीन कोठडी वाढवल्याने आरोपी रमेश म्हात्रे यांच्या कायदेशीर अडचणी वाढल्या आहेत. पुढील १५ दिवसांत तपास कोणत्या दिशेने जातो आणि पोलीस या प्रकरणात कोणती नवीन तथ्ये उघड करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ आणि या घटनेशी संबंधित इतर पुराव्यांवरही या प्रकरणी चर्चा झाली. तपास पूर्ण झाल्यावर पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. ००००००

Heading – महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली मॅरेथॉन स्पर्धा मार्गाची पाहणी

 स्पर्धा मार्गावरील आवश्यक ती सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या प्रशासनास सूचना ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणारी ३२ वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन २०२६ येत्या ३० ऑगस्टला उत्साहात पार पडणार असून या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमवेत संपूर्ण मॅरेथॉन मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली व स्पर्धा मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी रस्त्याची दुरूस्ती करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. या पाहणी दौऱ्यास उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते शानू पठाण, गटनेते अभिजीत पवार, नगरसेविका एकता भोईर, संध्या मोरे, विजया लासे, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (क्रीडा) मीनल पालांडे तसेच स्पर्धा मार्गावरील कार्यकारी अभियंता] ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव अशोक आहेर, उपाध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, सहसचिव राजेंद्र मयेकर, एकनाथ पोवळे आदी उपस्थित होते. मॅरेथॉनची सुरुवात ठाणे महापालिका भवन येथून होणार असून, महापौरांनी या प्रारंभस्थळाचीही पाहणी केली. यानंतर महापालिका भवन, नितीन कंपनी सर्व्हिस रोड, रोड क्रमांक १६, रोड क्रमांक २२, इंदिरानगर, वर्तकनगर, उपवन मार्ग, पोखरण रोड क्रमांक २, टिकूजीनीवाडी, उथळसर आणि कळवा या संपूर्ण स्पर्धा मार्गाची पाहणी करण्यात आली. प्रत्येक टप्प्यावर आवश्यक सुविधा, वाहतूक नियंत्रण, रस्त्यांची गुणवत्ता आणि स्पर्धकांच्या सुरक्षिततेसंदर्भातील बाबींची तपासणी करण्यात आली. महापौरांनी स्पर्धा मार्गावरील रस्त्यांची स्थिती, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षितता आणि इतर मूलभूत सुविधांचा आढावा घेतला. नितिन कंपनी सर्व्हिस रोड येथे जी कामे सुरू आहेत ती स्पर्धेच्या दिवशी स्पर्धा संपेपर्यत बंद ठेवण्याबाबत संबंधित प्राधिकरणाशी समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या.  तसेच स्पर्धेच्या दिवशी मार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी रस्त्याच्या कडेला  उभी असलेली वाहने हटवून मार्ग  पूर्णपणे मोकळा ठेवण्याच्या सूचना वाहतूक विभागाला देण्यात आल्या यावेळी स्पर्धा मार्गालगत झाडांच्या वाढलेल्या फांद्या छाटून मार्ग मोकळा ठेवण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले. तसेच वाहतूक पोलिसांनी स्पर्धेच्या दिवशी प्रभावी वाहतूक नियोजन करून मॅरेथॉन मार्ग निर्बध ठेवावा, अशा सूचनाही महापौरांनी दिल्या. स्पर्धकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी दिल्या. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहनही महापौरांनी केले आहे.