Category: मुंबई

Mumbai news

आयएसपीएलकडून बीपीसीएलचा हिशेब चुकता

आमदार चषक कबड्डी स्पर्धा    नीरज मिसाळ ठरला सर्वोत्तम, मिलन दहिया चढाईवीर तर साईप्रसादला पकडपटूचा मान मुंबई : आयएसपीएलने (इन्शुअरकोट स्पोर्ट्स)चार दिवसांपूर्वी झालेल्या पराभवाच्या जखमेवर आमदार चषक स्पर्धेच्या जेतेपदाचे मलम लावण्याचा पराक्रम केला. प्रभादेवीतील अंतिम सामन्यात बीपीसीएलकडून झालेल्या पराभवाचा बदला घेत त्यांनी एका झटक्यात आपला हिशेबही चुकता केला. शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त क्रीडाप्रेमी आमदार सुनील राऊत यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत आयएसपीएल आणि बीपीसीएल यांच्यात झालेल्या जेतेपदाच्या संघर्षाने उपस्थित कबड्डीप्रेमींचे हृदयाचे ठोकेच चुकवले नाही तर हॉलीवूडच्या अ‍ॅक्शनपटाला साजेसा थरारक क्लायमॅक्स सादर केला. पाच-पाच चढायांच्या क्लायमॅक्समध्ये आयएसपीएलने बीपीसीएलवर ९-४ (४६-४१) अशी मात केली. हे आयसएपीएलचे हंगामातील चौथे जेतेपद ठरले आहे. विक्रोळी पूर्वला टागोर नगरातील डॉ. आंबेडकर उद्यानात उभारलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडानगरीत रंगलेल्या कबड्डी महोत्सवाचा शेवट रोमहर्षक झाला. एकीकडे शिवशक्तीने राजमाता जिजाऊचे आव्हान ३२-३० असे मोडीत काढल्यानंतर पुरुषांच्या व्यावसायिक गटात थराराने परमोच्च िंबदू गाठला. पराभवाच्या उंबरठ्यावर असलेल्या बीपीसीएलने १९-३३ अशा पिछाडीवर असताना शेवटच्या पाच मिनीटात डाव फिरवण्याची किमया साधली आणि सामना ३७-३७ असा बरोबरीत सोडवला. या बरोबरीनंतर बीपीसीएल सलग दुसर्‍यांदा आयएसपीएलकडून जेतेपद हिसकावणार असे वाटत होते, पण आयएसपीएलने शेवटच्या पाच मिनिटात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती पाच-पाच चढायांच्या डावात टाळली आणि ९-४ अशा फरकाने बाजी मारत बीपीसीएलविरुद्धचा हिशेब चुकता केला. उपांत्य फेरीचे दोन्ही सामने एकतर्फी झाल्याने क्रीडाप्रेमी काहीसे निराश होते. त्यामुळे आयएसपीएल-बीपीसीएल यांच्यातील लढतीत सर्वांना थराराची मेजवानी अपेक्षित होती. पण नीरज मिसाळ आणि राकेश खटकर यांनी सुसाट खेळ करत आयएसपीएलला पहिल्या चार मिनीटातच १०-३ अशी जबरदस्त आघाडी मिळवून दिली. एवढेच नव्हे तर किशोर जाट, वैभव रबाडे यांनी अप्रतिम पकडी करत बीपीसीएलच्या चढाईबहाद्दरना रोखत सामन्यावर २१-१३ अशी पकड घट्ट केली. मध्यंतराला ८ गुणांची आघाडी घेत आयएसपीएलने जेतेपदाच्या दिशेने आपली घोडदौड सुरु केली होती. त्यामुळे उत्तरार्धात बीपीसीएलला आक्रमक खेळाची गरज होती आणि ती गरज मिलन दहियाने पूर्ण केली. त्याने आपल्या वेगवान आणि गुणकारी चढायांच्या जोरावर संघाला कमबॅक मिळवून देण्याचे प्रयत्न केले. तो एकटाच आयएसपीएलला भिडत होता. पण ते कमी पडत होते. अन्य खेळाडूंच्या सावध खेळामुळे बीपीसीएल सामना संपायला शेवटची काही मिनीटे शिल्लक असताना १९-३१ अशी पिछाडीवर होती. १२ गुणांच्या फरकामुळे बीपीसीएलने जवळजवळ सामना गमावला होता. पण तेव्हाच मिलन दहियाचे वादळ घोंगावले आणि त्याच्या चपळाईने बीपीसीएलला पुन्हा सामन्यात आणले. शेवटच्या पाच मिनीटात एकीकडे बीपीसीएल आणि मिलन प्रत्येक चढाईला गुण मिळवत आयएसपीएलच्या जवळ जात होते तर दुसरीकडे आयएसपीएलचे खेळाडू केवळ बचावात्मक खेळ करून वेळ काढत होते. त्यांच्या या घाबरट वृत्तीमुळे बीपीसीएलने अनपेक्षितपणे ३७-३७ अशी बरोबरी साधत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. पूर्ण सामन्यावर आयएसपीएलचे वर्चस्व असतानाही सामना बरोबरीत सुटला. पण पाच-पाच चढायांच्या खेळात आयएसपीएलने जोरदार खेळ करत चढायाही केल्या आणि बीपीसीएलच्या चढाईवीरांनाही रोखत आणखी एका जेतेपदावर आपले नाव कोरले. आएसपीएलचे चौथे जेतेपद याआधी आयएसपीएलने राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या व्यावसायिक स्पर्धेत बाजी मारली होती. तसेच अमरावती येथील तिवसा येथे झालेल्या  अखिल भारतीय व्यावसायिक गटाच्या आमदार चषक आणि मग वाशिमच्या आमदार चषकात अजिंक्यपद पटकावले होते. या हॅटट्रिक जेतेपदानंतर त्यांना ओम ज्ञानदीप क्रीडा मंडळाच्या स्पर्धेत त्यांच्या यशाची मालिका बीपीसीएलने मोडीत काढली  होती. नीरज मिसाळ बाईकवर स्वार अत्यंत संघर्षपूर्ण अंतिम सामन्यात आयएसपीएलसाठी झुंजार खेळ करणार्‍या नीरज मिसाळला त्याच्या वेगवान चढायांनी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळवून दिला. त्याच्या या कर्तृत्वाबद्दल आमदार सुनील राऊत यांनी नीरजला लाखमोलाची बाईक भेट दिली. विजेता आयएसपीएल विजेत्याच्या चषकासह दोन लाख रुपयांचा मानकरी ठरला. उपविजेत्या बीपीसीएलला दीड लाखांचा पुरस्कार लाभला. उपांत्य पराभूत संघांना प्रत्येकी ७५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. बीपीसीएलचा मिलन दहिया सर्वोत्तम चढाईवीर ठरला तर सीजीएसटीच्या साईप्रसाद पाटीलने पकड पटूचा मान मिळवला. स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा आयोजक आमदार सुनील राऊत यांच्यासह माजी आमदार रमेश कोरगावकर, महिला विभागप्रमुख रश्मी पहुडकर, नगरसेवक दीपक सावंत, विश्वास शिंदे, म्युनिसिपल कामगार सेनेचे बाबा कदम, मुंबई उपनगर संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तीकर, कार्याध्यक्ष सुधाकर घाग, सचिव राजेश पडेलकर, उपाध्यक्ष सदानंद माजलकर, संयुक्त सचिव राजेंद्र अनभवणे , प्रसिद्ध कबड्डी निवेदक राणाप्रताप तिवारी यांच्या उपस्थितीत पार पडला.

गोदरेज इंडस्ट्रीजचा भविष्यातील प्रगतीशी मेळ

  मुंबई : गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपने आज आपले नवे ध्येय आणि नवी ब्रँड ओळख प्रस्तुत केली. ग्रुपच्या उत्क्रांतीमधील हा एक निर्णायक क्षण असून, यातून नवी ओळख, धोरण आणि महत्त्वाकांक्षा यांचा भविष्यातील प्रगतीशी मेळ घातला गेला आहे. असे गोदरेज इंडस्ट्रीज चे कार्यकारी संचालक तान्या दुबाश यांनी सांगितले. १२९ वर्षांचा प्रदीर्घ वारसा आणि नव्या स्वरूपातील आधुनिक ऊर्जेने प्रेरित ही ओळख, समूहाच्या कंज्यूमर प्रॉडक्ट्स, रिअल इस्टेट, फायनान्शिअल सर्व्हिसेस, ॲग्रीकल्चर आणि केमिकल्स अशा वैविध्यपूर्ण व्यवसायांमध्ये एक स्पष्ट धोरणात्मक ताळमेळ प्रस्थापित केला आहे. या ऐतिहासिक बदलाची घोषणा मुंबईतील ‘गोदरेज वन’ या समूहाच्या मुख्यालयात आयोजित मीडिया बैठकीत करण्यात आली. गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे नियुक्त अध्यक्ष, पिरोजशा गोदरेज म्हणाले, १८९७ पासून निरंतर निर्मिती, प्रत्येक येणाऱ्या उद्याची’ हे ब्रीदवाक्य आमचा हा विश्वास मूल्ये आणि परिणाम सदैव हातात हात घालून चालले असल्याने पुढील पाच वर्षांत एकूण मार्केट कॅपिटलायझेशन ५ लाख कोटींपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. गोदरेज इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालक आणि मुख्य ब्रँड अधिकारी, तान्या दुबाश म्हणाल्या, “ही नवी ब्रँड ओळख आम्ही कोण आहोत आणि आम्ही कोणत्या दिशेने वाटचाल करत आहोत याचे प्रतिबिंब आहे.

ब्रँड ॲम्बेस्टर बदलले… पण ‘लाल परी’ अजूनही रुग्णालयातच!

 रमेश औताडे मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (ST) पुन्हा एकदा आकर्षक चेहरा पुढे करत अभिनेता रितेश देशमुख यांची ब्रँड ॲम्बेस्टर म्हणून नियुक्ती केली. मात्र, प्रत्यक्षात ‘ लाल परी ’ची अवस्था सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकच खालावत चालली असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ब्रँड ॲम्बेस्टर बदलून प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न होत असताना, जमिनीवरची परिस्थिती मात्र पूर्णपणे वेगळी आहे. बसस्थानकांवर स्वच्छतेचा अभाव, पिण्याच्या पाण्याची सुविधा बंद, डेपो मधील पंखे बंद अवस्थेत, तसेच इंडिकेटरनुसार बस न लागल्याने प्रवाशांना बॅगा घेऊन धावपळ करावी लागत आहे. परिणामी प्रवाशांचा त्रास वाढत असून, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी हा प्रवास अधिकच कष्टदायक ठरत आहे. याशिवाय, वाढलेले अपघात, कंत्राटी पद्धतीने भरती केलेले वाहक चालक आणि कर्मचाऱ्यांवरील ताण यामुळे एस टी सेवेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे सरकार विविध सवलतींचा गाजावाजा करत असताना, दुसरीकडे मूलभूत सुविधा पुरवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, याआधीही अनेक नामांकित ब्रँड ॲम्बेस्टर नेमले गेले, पण ‘लाल परी’ची स्थिती सुधारण्याऐवजी ती अधिकच ढासळत गेली. त्यामुळे “ब्रँड ॲम्बेस्टर की फक्त दिखावा?” असा सवाल आता सामान्य प्रवाशांकडून विचारला जात आहे. परिवहन विभागाने केवळ प्रतिमेवर नव्हे, तर प्रत्यक्ष सेवेच्या गुणवत्तेवर लक्ष देण्याची गरज आहे.

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत भात व हिरवळीच्या खताच्या बियाण्यास अनुदान

 टोकण यंत्रासाठीही ९०% अनुदान; शेतकऱ्यांना दिलासा ठाणे : जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत कृषि विभागामार्फत सन २०२६-२७ च्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांच्या माध्यमातून मोठा दिलासा देण्यात येत आहे. भात पिकाचे उत्पादन वाढविणे, जमिनीची सुपिकता सुधारणा करणे तसेच मजूर टंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने सुधारित भात बियाण्यास ५० टक्के व हिरवळीच्या खताच्या बियाण्यास ९० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांना तूर व भात पिकासाठी कर्जत-३, कर्जत-७, जया, रत्नागिरी-८ तसेच एमटीयू-१०१० या सुधारित व अधिक उत्पादनक्षम जातींचे बियाणे ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. या जाती हवामानास अनुकूल असून चांगले उत्पादन देणाऱ्या असल्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी आणि सेंद्रिय घटकांची वाढ करण्यासाठी धैंचा या हिरवळीच्या खताचे बियाणे प्रति शेतकरी प्रति एकर २० किलो प्रमाणात ९० टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. धैंचा पिकामुळे जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून पुढील पिकासाठी पोषक वातावरण निर्माण होते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित पंचायत समितीच्या कृषि विभागाकडे तात्काळ नाव नोंदणी करावी. अर्जासोबत ७/१२ किंवा ८-अ उतारा, आधार कार्ड तसेच आधारसंलग्न बँक पासबुक यांच्या छायांकित प्रती सादर करणे बंधनकारक राहील. दरम्यान, शेतीमधील वाढत्या मजूर टंचाईचा विचार करून भात पिकाची टोकण यंत्राद्वारे (Dibbler) पेरणी करण्यासाठी यावर्षीपासून ९० टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. SRT पद्धतीने भात लागवड करण्यासाठी किमान ५ टोकण यंत्रांची आवश्यकता असते. त्यामुळे एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त ५ टोकण यंत्र खरेदीसाठी अनुदान देय राहील. या पद्धतीमुळे वेळ, खर्च व मजुरीची बचत होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद ठाणेच्या अधिकृत https://zpthaneschemes.com संकेतस्थळावर दि. १५ मे २०२६ पर्यंत नाव नोंदणी करावी. शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन उत्पादन खर्च कमी करावा आणि उत्पन्नात वाढ साधावी. सुधारित बियाणे व यंत्रांच्या वापरामुळे शेती अधिक फायदेशीर होऊ शकते,  असे कृषि विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर यांनी सांगितले. ०००००००  

तुटलेल्या पाणी व्हॉल्वच्या झाकणावर महापौरांचा संताप

कल्याण : कल्याण पश्चिम शहराच्या पाहणी दरम्यान महापौर हर्षाली चौधरी यांनी रस्त्यावर असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या व्हॉल्वच्या झाकणाच्या खराब अवस्थेबाबत कडक भूमिका घेतली. प्रेम ऑटो जवळील रस्त्यावर हे झाकण तुटलेले आढळले, ज्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. ही स्थिती पाहताच महापौर अॅक्शन मोडमध्ये दिसल्या आणि ते तात्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश दिले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना महापौरांनी चांगलेच फटकारले. त्यांनी सांगितले की, अशा तुटलेल्या झाकणामुळे कधीही गंभीर अपघात होऊ शकतो, विशेषतः हे ठिकाण हिंदू स्मशानभूमीजवळ असल्याने नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. महापौरांनी नाराजी व्यक्त करत विचारले की, एवढी खराब अवस्था असतानाही वेळेवर दुरुस्ती का करण्यात आली नाही. तसेच, कामात कोणतीही हलगर्जी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, स्थानिक नागरिकांनीही आपल्या समस्या महापौरांसमोर मांडल्या आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. महापौरांनी नागरिकांना आश्वासन दिले की, ही समस्या त्वरित सोडवली जाईल आणि शहरातील रस्ते व संबंधित सुविधा प्राधान्याने दुरुस्त करण्यात येतील, जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळेल आणि वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहील.

 कल्याणातील मेट्रो आता खडकपाडा मार्गेच धावणार

शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील कल्याण : कल्याणातील मेट्रो आता खडकपाडा मार्गेच धावणार असून पुढील २ महिन्यांत या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.  ठाणे–भिवंडी–कल्याण मेट्रोच्या नव्या मार्गाला राज्य शासनाची अधिकृत मान्यता मिळाली असून प्रकल्पासाठी वाढीव निधीही मंजूर करण्यात आला आहे. महिन्याभरात निविदा प्रक्रिया पूर्ण करून अवघ्या ६० दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे नियोजन असून शहराच्या विकासाला गती देणाऱ्या या निर्णयासाठी शहरप्रमुख रवी पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आहेत. या पत्रकार परिषदेला केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी, शिवसेना उपनेत्या व नगरसेविका विजया पोटे, नगरसेवक गणेश जाधव, रोहन कोट, बंदेश जाधव, किरण भांगले, अनघा देवळेकर, प्रतिक पेणकर, रुपेश सकपाळ, माजी नगरसेवक मयुर पाटील, विजय काटकर, श्रेयस समेळ, अरविंद पोटे, युवासेनेचे सुजीत रोकडे, सुचेत डामरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. धामणकर नाका भिवंडी ते कल्याण दुर्गाडी ५ मेट्रो व मेट्रो५ अ म्हणजे दुर्गाडी चौक आधारवाडी -खडकपाडा -भोईरवाडी – उल्हास नगर या मेट्रो च्या  सुधारित कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून एका महिन्यात टेंडर प्रक्रिया पूर्ण होईल. यामुळे कल्याण डोंबिवलीकरांचे स्वप्न पूर्ण होईल. यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे आभार शहरप्रमुख रवि पाटील यांनी मानले. यावेळी रवि पाटील यांनी सांगितले की सन २०१५ मध्ये भारतानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भिवंडी – कल्याण मेट्रोच्या कामाचे भुमिपुजन झाले होते, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे काम थांबले होते, परंतु आता नव्याने पुन्हा काम सुरू होणार आहे, भिवंडी -कल्याण व कल्लाण ते उल्हासनगर पुढे बदलापूर चिखलोली पर्यंत मेट्रो धावणार आहे. पुर्वी मेट्रोचा मार्ग वेगळा होता, त्यामुळे कल्याण पश्चिम भागातील काही नागरीकांना  मेट्रोचा काहीच उपयोग नव्हता, म्हणून मेट्रो चा मार्ग बदलण्यासाठी  सन २०१६ पासून शिवसेना शहरप्रमुख रवि पाटील याचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिल्ली येथे बैठक घेऊन संबंधित अधिकारी यांना मेट्रो मार्ग बदलण्यासाठी बैठक झाली व  त्यानी मान्य केले. नवीन मेट्रो मार्ग आधारवाडी, खडकपाडा बिर्ला  परिसरातील व कल्लाण पश्चिम भागातील पाच लाख नागरिकांना फायदा होणार आहे. ००००००००

तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्ण संख्येत वाढ

रमेश औताडे मुंबई : डोके आणि मान या अवयवाजवळ होणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, त्यातील सुमारे ६२ टक्के प्रकरणं ही केवळ मौखिक कर्करोगाची असून ही वाढ एक चिंतेची बाब ठरत आहे. अशी माहिती मुंबई प्रेस क्लब येथे प्रसिध्द सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल च्या संचालक डॉ. सेवांती लिमये यांनी दिली. डोके आणि मान कॅन्सर जागरूकता मोहीम मर्क स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेली तोंडाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी दोन मिनिटांची कृती ही मोहीम आहे. नागरिकांना आरशासमोर दोन मिनिटांत स्वयं तपासणी करून तोंडाच्या कॅन्सरच्या सुरुवातीची लक्षणे ओळखण्यास आणि वेळीच उपचार घेण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. यामध्ये नाकाजवळील सायनस, नाकाची पोकळी, तोंड, घसा आणि स्वरयंत्र या भागांमध्ये होणाऱ्या कर्करोगांना समावेश आहे. डॉ. सेवांती त्या पुढे सांगतात की, अनेक टर्शरी केअर रुग्णालयांमध्ये निदान होणाऱ्या एकूण कॅन्सरपैकी सुमारे ३० टक्के प्रकरणं ही हेड अँड नेक कॅन्सरची असतात आणि त्यापैकी ६२ टक्के मौखिक कर्करोगाची असतात. ०००००००००

 आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा

 जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे निर्देश अशोक गायकवाड अलिबाग: रायगड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मान्सून काळात येणाऱ्या पाऊस, पूर, वीज तसेच अन्य आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक आहे. आपत्ती काळात सर्व यंत्रणानी सतर्क व दक्ष रहावे, तसेच मान्सून पूर्व तयारी करताना सर्व बाबींची काटेकोरपणे तपासणी आणि उपाययोजना करावी असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी जावळे बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, भारतीय तटरक्षक दलाचे अभिषेक कुमार, आपत्ती व्यवस्थापन अधिकार सागर पाठक उपस्थित होते. जिल्हाधिकारी जावळे म्हणाले, पावसाळा सुरु होण्याकरिता एक महिन्याचा कालावधी बाकी असून सर्व शासकीय यंत्रणानी अतिधोकादायक व धोक्याची संभावना असलेल्या ठिकाणांची पाहणी करावी. या ठिकाणच्या नागरिकांना मान्सून कालावधीमध्ये सुरक्षित जागी स्थलांतरीत करता यावे यासाठी निवाऱ्याची सज्जता करावी. आपत्ती काळात आपदामित्रांचे सहकार्य खूप महत्वाचे असून ते तात्काळ मदतीला धावून येवून महत्वाची भूमिका बजावत असतात. याकरिता आपदा मित्र हे रायगड जिल्ह्याला लाभलेले एक वरदानच आहे. प्रत्येक विभागांनी आपला नियंत्रण कक्ष २४x७ कार्यान्वित ठेवावा. याकरिता एक समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. जलसंपदा विभागाने आपल्या अखत्यारित असलेली धरणे, मध्यम प्रकल्पांची तपासणी करावी. आरोग्य विभागाने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशा औषधसाठा, व्हॅक्शीन उपलब्ध ठेवाव्यात. आपत्तीकाळात रोगराई पसरणार नाही याची दक्षता घ्यावी. विविध विभागांचे परिपूर्ण आपत्ती व्यवस्थापन आराखडे जिल्हा प्रशासनास पाठविण्यात यावेत. तसेच रायगड पाटबंधारे विभागाने धरणांची तातडीने तांत्रिक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अतिवृष्टी विचारात घेवून टप्प्या-टप्प्याने धरणांतून विसर्ग करावा अशा सूचनाही जावळे यांनी केल्या. जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, तसेच या काळात पूर्व परवानगी शिवाय कुणीही मुख्यालय सोडू नये असे निर्देश ही त्यांनी यावेळी दिले. दरड प्रवण गावांकरिता नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी गावातील लोकांच्या संपर्कात राहिले पाहिजे. आम्ही तुम्ही एक आहोत या भावनेने सर्वांनी काम करावे. आपणास काही मदत हवी असल्यास याकरिता आम्ही सदैव तत्पर आहोत अशी ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक पूलांची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती तात्काळ करावी व पर्यायी मार्ग सुस्थितीत ठेवावेत. तसेच रस्त्यावरील खडे, साईडपट्टी भरुन घेणे, रस्त्यावरील ब्लिंकर्स, बोर्ड, डायव्हर्शनचे बोर्ड, ब्लॅक स्पॉटवर रिफ्लेक्टर्स बसवावेत. सर्व विभागांकडील शोध व बचाव साहित्यांची दुरुस्ती करून सर्व साहित्य सुस्थितीत राहील, याची दक्षता घ्यावी. आवश्यक शोध व बचाव पथक, रुग्णवाहिका, स्थलांतराचे ठिकाण, अन्न पाण्याची व्यवस्था, जेसीबी मशिन्स, वूड कटर्स, बोट, लाईफ जॅकेट, स्पीड बोट, जनरेटर इ. साहित्य व मनुष्यबळ सर्व विभागांनी सज्ज ठेवावेत, असे जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले. तसेच या काळात उपविभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी व तहसीलदार यांनी उत्तम समन्वय राखत काम करावे. नगरपालिका, महानगरपालिकांनी नालेसफाईची कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करावीत. तसेच महाड शहरात दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होते. अशा पूरपरिस्थितीत मदत कार्य व बचावासाठी आवश्यक पूर्वतयारी व उपाययोजना केली जावी. आपत्तीच्या प्रसंगी रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग आदी विभागांनी देखील नागरिकांच्या मदत व सुरक्षेच्या दृष्टीने पूर्वतयारी करावी. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले म्हणाल्या की, ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर ग्रामसेवक व सरपंच यांनी समन्वयाने आढावा बैठका घेवून त्याप्रमाणे नियोजन करावे. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी केले. या बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यासह एन डी आर एफ, होमगार्डा,महावितरण, सार्वजनिक बांधकाम, प्रादेशिक परिवहन अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे अधिकारी यासह विविध शासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

ठाण्यात एस टीची शिवशाही एसी बस भीषण आगीत जळून खाक.

ठाणे : ठाणे स्टेशन जवळील सॅटीस उड्डाणपुलावर दुपारी १:२८ वाजताच्या सुमारास महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची शिवशाही एसी बस क्रमांक- MH ०९ EM ९९४२, (चालक श्री. संतोष किसन गवळी, वाहक – मिलिंद सोनावणे, मार्ग – स्वारगेट ते वसई.) या बसला ठाणे रेल्वे स्टेशन बस स्थानक येथून वसईला जाताना सॅटिस ब्रिजवरती आग लागली होती.  प्रसंगी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वाय. एम. तडवी, ठाणे नगर पोलीस कर्मचारी, ठाणे नगर वाहतूक पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान १-फायर वाहनासह, १-रेस्क्यू वाहनासह, १- वॉटर टँकर वाहनासह, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी १-पिकअप वाहनासह व महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी उपस्थित होते. सदर आग लागलेली बस ही वसई बस डेपोची असून बस मध्ये  स्वारगेट वरून वसईला जाणारे १० प्रवासी व ठाणे येथून ४ प्रवासी असे एकूण १४ प्रवासी प्रवास करत होते. सदर बसला आग लागताच सर्व प्रवासी व बसचे चालक व वाहक सुरक्षित बसच्या बाहेर आले त्यामुळे अनर्थ टळला परंतू शिवशाही बस पूर्णतः जळून नुकसान झाले आहे. सदर आग लागलेल्या बस मधील डिझेल व ऑइल रस्त्यावरती पसरले होते त्यावरती आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने माती पसरविण्यात आली.  

 रुग्णवाहिकेला उशीर झाल्याने वृद्धाचा रस्त्यातच तडफडून मृत्यू

नागरिकांचा संताप कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णवाहिका न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  मेवालाल गुप्ता असं मृत व्यक्तीचे नाव आहे. कल्याण स्टेशन परिसरात प्रकृती बिघडल्यानंतर १०८ नंबरवर कॉल करुन रुग्णवाहिकेची मागणी केली, मात्र रुग्णवाहिका तब्बल ४० मिनिटे उशिरा आली, तोपर्यंत रुग्णाचा मृत्यू झाला. या घटनेने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील दीपक हॉटेलजवळ एका अज्ञात व्यक्तीला अचानक छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. संबंधित इसमाने स्वतः १०८ आपत्कालीन सेवेला फोन करून रुग्णवाहिकेची मागणी केली. त्याची प्रकृती झपाट्याने खालावत असल्याचे पाहून स्थानिक नागरिकांनीही वारंवार १०८ वर संपर्क साधला. तरीही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यास तब्बल ४० मिनिटांचा विलंब झाला. ॲम्बुलन्स मध्ये डॉक्टर ही नव्हता. विशेष म्हणजे, दीपक हॉटेल ते रुक्मिणीबाई हॉस्पिटल हे अंतर अवघे ३ मिनिटांचे असतानाही रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्याने संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी परिसरात मोठा गोंधळ घालत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. वेळेत मदत मिळाली असती तर जीव वाचला असता,असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणात १०८ ॲम्बुलन्सवरील डॉक्टर मोहम्मद तोफिक आणि चालक प्रकाश चोरगे यांनी वेगळीच बाजू मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रात्री १० वाजून २९ मिनिटांनी कॉल मिळाल्यानंतर ते केवळ १२ मिनिटांत घटनास्थळी पोहोचले होते. संबंधित व्यक्तीची तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झालेला होता. ००००००००