Category: मुंबई

Mumbai news

कामगार नेते राजन राजे यांचा सरकारी कर्मचारी संपामध्ये सभा घेऊन जाहीर पाठिबा

अनिल ठाणेकर ठाणे- देवेंद्र फडणवीस यांच्या ‘NDA’ सरकारकडून अनेकदा फसवणूक झाल्यामुळे, आज इथे तुम्ही प्रामुख्याने निवृत्ती वय ५८ वरुन ६० वर्षे व्हावं व पूर्वीचीच निवृत्तिवेतन सुविधा मिळावी म्हणून, ‘राज्यव्यापी संप’ करत…

मेट्रो-५ विस्ताराला १८,१३० कोटींची मंजुरी; कल्याण–उल्हासनगर मार्गाला गती

उल्हासनगर–अंबरनाथ–बदलापूरपर्यंत विस्ताराचा मार्ग मोकळा कल्याण :मेट्रो-५ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या विस्तारित मार्गिकेसाठी तब्बल १८ हजार १३० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे कल्याण ते उल्हासनगरदरम्यान मेट्रो सेवा लवकरच सुरू होण्याचा…

 खरीप हंगामात रासायनिक खताचे लिंकिंग होणार नाही याची दक्षता घ्या

 जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे निर्देश ठाणे- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी येणाऱ्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने विविध बाबींवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. खतांचे लिंकिंग होणार नाही याची दक्षता घेणे, घाऊक विक्री केंद्रांची नियमित तपासणी करणे, शेतकऱ्यांमध्ये विशिष्ट ब्रँडचा आग्रह निर्माण होऊ नये यासाठी प्रबोधन करणे, कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणे, विक्री केंद्रांच्या खरेदी-विक्री नोंदी व साठ्याची पडताळणी करणे यावर भर देण्यात आला.तसेच बोगस खते, बियाणे व कीटकनाशकांच्या विक्रीवर कठोर कारवाई करावी, खतांच्या बेकायदेशीर वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे, तसेच खत पुरवठा सर्व भागांत समप्रमाणात होईल याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. खत वाहतुकीसाठी पुरेशा वाहनांची उपलब्धता ठेवण्याबाबतही आरसीएफ कंपनी व संबंधित पुरवठादारांना निर्देश देण्यात आले. जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा संनियंत्रण समितीची सभा २२ एप्रिलला जिल्हाधिकारी, ठाणे डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे संपन्न झाली. या सभेस समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सहअध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रामेश्वर पाचे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर, मोहीम अधिकारी महेश बनकर, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक बालाजी शिंदे, विस्तार अधिकारी (कृषि) बी. डी. जावीर, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक नितीन जाधव, राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्सचे उपव्यवस्थापक विकास कांबळे, ठाणे जिल्हा ऍग्रो डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष समीर ठाकरे तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सभेच्या प्रारंभी सदस्य सचिव मुनीर बाचोटीकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून सभेच्या कामकाजास सुरुवात केली. ठाणे जिल्ह्यात सध्या १७४ किरकोळ व २२ घाऊक खत विक्री केंद्र, १५६ बियाणे विक्री केंद्र तसेच १५२ कीटकनाशक विक्री केंद्र कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली. रासायनिक खतांची विक्री ePOS मशीनद्वारे तसेच बियाण्यांची विक्री ‘साथी’ पोर्टलद्वारे केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यासाठी एकूण १८० ePOS मशीन प्राप्त झाली असून त्यापैकी १५४ खत विक्री केंद्रांना वितरित करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ठाणे जिल्ह्यासाठी अनुदानित रासायनिक खतांचा पुरवठा आरसीएफ कंपनीमार्फत करण्यात येत आहे. खरीप हंगाम २०२६ साठी जिल्ह्यास ११,५५० मेट्रिक टन खत साठा मंजूर झाला असून त्यामध्ये ९७०० मेट्रिक टन युरिया व १,५०० मेट्रिक टन सुफला खताचा समावेश आहे. याशिवाय ८५० मेट्रिक टन युरिया व १० मेट्रिक टन डीएपीचा संरक्षित साठाही मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील २० गोदामांमध्ये एप्रिल अखेर ८० टक्के व १० मेपर्यंत १०० टक्के खत साठा पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सभेत सांगण्यात आले.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी माती परीक्षण अहवालानुसार शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा यासाठी गावागावांत शेतकरी मेळावे आयोजित करण्याच्या सूचना दिल्या. तसेच खतांच्या वाहतुकीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार पोलीस विभागाची मदत घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.सभेच्या शेवटी मोहीम अधिकारी महेश बनकर यांनी उपस्थितांचे आभार मानून सभा संपन्न झाल्याचे जाहीर केले. ०००००००००००००००

 माथेरान मधील वाढती वृक्षतोड पर्यावरणाला बाधा पोहचवणारी

नव्या वृक्ष लागवडीचे नियोजन हवे मुकुंद रांजणे (माथेरान) माथेरान घाटमाथ्यावर होणारी भरमसाठ वृक्षतोड आता माथेरानच्या मुळावर उठली असून यावर्षी माथेरानमध्ये गर्मीचा उच्चांकी नकोसा विक्रम नोंदला गेला त्यामुळे पुन्हा एकदा वृक्ष संवर्धन हा विषय व त्याचे गांभीर्य समोर आले असून माथेरान मध्ये पुन्हा एकदा वृक्ष लागवड व त्याचे संगोपन व्हावे व तो फक्त दिखावा न करता झाडे जगवण्याकरिता प्रयत्न झाला पाहिजे अशी चर्चा समोर येत आहे. माथेरान हे थंड हवेसाठी जगप्रसिद्ध मुंबई पुण्यापासूनचे जवळचे पर्यटन स्थळ आहे या ठिकाणी थंड हवेचा आस्वाद घेण्याकरिता देश विदेशातून अनेक पर्यटक घेत असतात परंतु मागील काही वर्षापासून माथेरान मधील हवामानामध्ये कमालीचा बदल घडलेला असून कधी नव्हे ती जाणवणारी गर्मी माथेरान मध्ये आता शिरकाव करू लागली आहे, यावर्षी तर गर्मीचा उच्चांक झाला असेल प्रथमच येथील तापमान 4०अंश सेल्सिअस वर पोहोचले होते त्यामुळे माथेरान पर्यटन स्थळा करता ही धोक्याची घंटा असून स्थानिकांनी वेळेतच सावध झाले नाही तर येणाऱ्या काळात फक्त माथ्यावरील रान मधले रान निघून जाणार असून माथेच राहील अशी भीती व्यक्त केली जात आहे. माथेरानच्या चारी बाजूस असणाऱ्या अनेक वाड्यांमधून येथील डोंगर रांगांमध्ये असलेल्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असून ही कत्तल रोखण्यासाठी वन विभाग सपशेल अपयशी ठरलेला आहे माथेरान येथून नेरळ कडे जाणाऱ्या डोंगर रांगांना तर जंगलच शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती काही वर्षांमध्ये होणार आहे रोजच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून लाकडे जमा करणारी मंडळी घाटामध्ये दिसत असतात परंतु यावरती कारवाई होत नाही. माथेरान मध्ये नैसर्गिक आपत्तीतून अनेक झाडे उन्मळून पडली आहेत परंतु या झाडांना पर्यायी वृक्षारोपण करून जंगल वाढवण्याचे प्रयत्न अपयशी ठरलेला आहे वनविभाग दरवर्षी वृक्षारोपण करते परंतु यातील किती झाडे जगतात हा संशोधनाचा विषय आहे वृक्षारोपण करणे व त्याचे संवर्धन करणे यामध्ये मोठी तफावत माथेरानमध्ये पहावयास मिळत आहे या वेळेला नवीन वनसंवर्धन समिती होणार असून त्यांच्याकडून तरी यावेळी वृक्षारोपण हा फक्त प्रयोग न करता प्रत्यक्ष झाडे जगण्यावर भर देतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. माथेरान मध्ये मोठ्या प्रमाणात करंज व इंग्लिश झाडे लावण्यात येतात त्याऐवजी येथील पर्यावरणाला जिवंत ठेवतील अशी झाडेच लावण्यात यावी जेणेकरून येथे पर्यावरण जिवंत राहील अशी मागणी आता स्थानिकांमधून होत आहे. ००००००००००

सार्वजनिक वाचनालय कल्याणच्यावतीने जागतिक पुस्तक दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन

कल्याण- सार्वजनिक वाचनालय कल्याणच्यावतीने जागतिक पुस्तक दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन, तत्काळ सभासद योजना व एक कविता तळ्याकाठी या कार्यक्रमाचे आयोजन प्रबोधनकार ठाकरे सरोवर कल्याण (प) या ऐतिहासिक ठिकाणी करण्यात आले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्याहस्ते पुस्तकगुढीचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. वाचन संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्याच्या उदेशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून तत्काळ सभासद योजनेत जास्तीत जास्त वाचकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांनी केले. वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी यांनी डिजिटल युगात ई – बुक्स व ऑडीओबुक्स उपलब्ध असले तरी हातात पुस्तक घेऊन वाचण्याचा आनंद वेगळाचा असतो असे मत व्यक्त केले. प्रात: काळी फेरफटका मारण्याकरिता येणाऱ्या नागरिकांना विविध प्रकारचे ग्रंथ एकाच ठिकाणी पाहण्याची संधी मिळाली असल्याचे आनंद नागरिकांनी व्यक्त केला. वाचनालयाच्यावतीने सातत्याने नवनवीन उपक्रम राबविले जातात त्याच अनुषंगाने  सदर पुस्तक प्रदर्शनामुळे वाचनसंस्कृतीला चालना मिळेल असे मत वाचनालयाच्या वाचक सभासदांनी मांडले. “एक कविता तळ्याकाठी” या  उपक्रमांतर्गत तळ्याकाठच्या शांततेचा व निसर्गाच्या सौदर्याचा अनुभव घेत कवी मकरंद वांगणेकर, सुधाकर कांबळी, सिने नाट्य अभिनेता सुधाकर वसईकर, रंगकर्मी सुधीर चित्ते, स्वाती नातू, जया पाटील, संयुक्ता राठोड, मंगला कांकणे, सुरेखा गावंडे अशा अनेक रसिक मान्यवर कवींनी स्व कविता सादर केल्या. तत्काळ सभासद योजनेचा लाभ साहित्यप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर घेतला. प्रसंगी वाचनालयाचे अॅड. सुरेश पटवर्धन, वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य अरविंद शिंपी, विजयसिंह परदेशी, बाळकृष्ण धुरी, प्रगती महाविद्यालयाच्या प्रा. मालती पाटील, महाविद्यालयीन विद्यार्थी, वाचक, साहित्यप्रेमी व ग्रंथसेविका आदी उपस्थित होते. ०००००००००००

 रिक्षा- टॅक्सी चालकांसाठी मराठी बोलणे अनिवार्य करण्याच्या निर्णयाला भारतीय मराठाचा जाहीर पाठिंबा

महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेलाच प्राधान्य हवे  दिवा, दि. २4 एप्रिल (आरती परब) : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा व टॅक्सी परवानाधारक तसेच चालकांना मराठी भाषा बोलणे अनिवार्य करण्याचा घेतलेला निर्णय आता चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या निर्णयाला भारतीय मराठा संघाकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला असून, मराठी भाषेच्या वापराबाबत कोणताही विरोध सहन केला जाणार नाही, असा इशाराही संघटनेने दिला आहे. संघटनेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्रात राहून आणि व्यवसाय करताना स्थानिक भाषा म्हणजेच मराठीचा आदर राखणे आवश्यक आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी प्रवाशांशी संवाद साधताना मराठीचा वापर करणे ही केवळ अपेक्षा नसून आता नियमाचा भाग बनत आहे. या निर्णयाच्या विरोधात कोणी आंदोलन किंवा मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्यास भारतीय मराठा संघ रस्त्यावर उतरून त्याला प्रतिकार करेल, असा ठाम इशाराही देण्यात आला आहे. “मराठी भाषेचा अपमान किंवा वापरास विरोध केल्यास त्याला योग्य उत्तर दिले जाईल,” असे संघटनेने स्पष्ट केले आहे. याशिवाय, महाराष्ट्रात उपजीविकेसाठी येणाऱ्यांनी स्थानिक संस्कृती आणि भाषेचा सन्मान राखावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. “पोट भरण्यासाठी आलात तर मर्यादेत रहा, अन्यथा येथे राहणे कठीण होईल,” अशा कठोर शब्दांत संघटनेने आपली भूमिका मांडली आहे. दरम्यान, या निर्णयामुळे राज्यात भाषाविषयक वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असले, तरी काहींकडून विरोधाची शक्यता नाकारता येत नाही.

सिव्हिल डिफेन्स प्रशिक्षण केवळ प्रमाणपत्रापुरते मर्यादित नसून समाजसेवेची मोठी जबाबदारी आहे

  आमदार संजय केळकर यांचे प्रतिपादन अनिल ठाणेकर ठाणे, महाराष्ट्र शासनाच्या सिव्हिल डिफेन्स कार्यालयर्फे आयोजित बेसिक प्रशिक्षण कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आपत्कालीन अधिकारी वर्गाला मुख्य क्षेत्रस्थ नागरिक संरक्षण ठाणे तथा आपत्कालीन कार्यवाही केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम ठाणे पश्चिम येथील तीन हात नाका, एलबीएस मार्गावरील वाहतूक नियंत्रण शाखेच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ५ जून २०२४ ते ९ जून २०२४ या कालावधीत कल्याण येथील ब्राइट स्कूलमध्ये हा प्रशिक्षण कोर्स आयोजित करण्यात आला होता. प्रशिक्षणादरम्यान आपत्ती व्यवस्थापन, नागरिक संरक्षण तसेच आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘सेकंड मार्शल’ श्रेणीतील प्रमाणपत्र देण्यात आले. हे प्रमाणपत्र ठाणे सिव्हिल डिफेन्स विभागामार्फत देण्यात आले असून उपनियंत्रक नागरिक संरक्षण ठाणे विजय बी. तावरे तसेच जिल्हाधिकारी तथा सिव्हिल डिफेन्स नियंत्रक अशोक शिनगारे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला उपनियंत्रक नागरिक संरक्षण ठाणे विजय बी. तावरे, सहायक उपनियंत्रक नागरी संरक्षण अनिल गावित, उपायुक्त क्षेत्रीय नागरी संरक्षण ठाणे कमलेश श्रीवास्तव, उपसंचालक क्षेत्रीय नागरी संरक्षण ठाणे हरिभाऊ शिंग पुरे, विभागीय क्षेत्रीय नागरी संरक्षण ठाणे डॉ. श्रीकांत पाटील, तसेच विविध विभागांतील समन्वयक आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मनोजकुमार पाटील यांनी केले. स्वागत व परिचय अनिल गावित यांनी करून दिला. आभार प्रदर्शनही अनिल गावित यांनीच केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद सोनवणे यांनी केले. यावेळी आमदार संजय केळकर यांनी सांगितले की, सिव्हिल डिफेन्सचे प्रशिक्षण हे केवळ प्रमाणपत्रापुरते मर्यादित नसून समाजसेवेची मोठी जबाबदारी आहे. प्रशिक्षित स्वयंसेवक आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी मिळवलेले ज्ञान प्रत्यक्ष कार्यात उतरवणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. ठाणे शहरासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरात आपत्ती व्यवस्थापनाची सज्जता अत्यावश्यक असून सर्वांनी समाजाच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर राहावे, असे आवाहन त्यांनी केले. 0000000

‘नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल’चे नियम मोडणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा : सुराज्य अभियानाचा इशारा

कल्याण : रस्ते विकास आणि सौंदर्यीकरणाच्या नावाखाली शहरांचे ‘फुफ्फुस’ असलेल्या वृक्षांचा गळा घोटला जात असल्याचे गंभीर वास्तव ‘सुराज्य अभियाना’च्या राज्यव्यापी पाहणीत उघड झाले आहे. नियम धाब्यावर बसवून वृक्षांची ‘मूक हत्या’ केली…

आयडियल मोफत कबड्डी स्पर्धात्मक शिबीरात ४० खेळाडूंचा सहभाग

  नवी मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे यंग स्पोर्ट्स क्लब-घाटकोपर सहकार्याने शालेय मुलांसाठी मोफत कबड्डी स्पर्धात्मक मार्गदर्शन शिबीर २७ एप्रिलपासून माणिकलाल मैदान-घाटकोपर येथे सुरु होत असून शालेय ४० खेळाडू सहभागी झाले आहेत. नवोदित खेळाडूंना तंत्रशुध्द कबड्डी खेळाची प्राथमिक ओळख करून देत दुखापतीच्या भयाचे निराकरण करण्याचा उद्देश देखील आहे. परिणामी कबड्डी खेळाकडे शालेय खेळाडूंमध्ये कबड्डी खेळाचा प्रसार आणखी अधिक जोमाने होईल. समता विद्या मंदिर, माणिकलाल म्युनिसिपल स्कूल, तुलीप हायस्कूल, अभ्युदय विद्यालय आदी शाळांमधील बहुतांश खेळाडूंच्या उत्स्फूर्त प्रतिसाद व सोयीच्या आग्रहास्तव घाटकोपर-पश्चिम येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर उपक्रमात वॉर्म अप व कबड्डी कौशल्यावर भर देण्यासाठी अनुभवी कबड्डीपटू व मार्गदर्शक सुनील खोपकर आणि त्यांचे सहकारी सुशांत खळे व सक्षम म्हात्रे उत्सुक आहेत. दोन दिवसीय शिबिरामधील उत्कृष्ट शालेय ४ खेळाडूंना विशेष पुरस्कार देऊन माजी कबड्डीपटू गोविंदराव मोहिते, कबड्डीप्रेमी विजय चव्हाण, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे. ००००००००

 कुस्‍तीमहर्षी मामासाहेब मोहोळ, कसोटीपटू सदानंद मोहोळ यांच्‍या पुतळ्यांचे अनावरण

– क्रीडाक्षेत्रातील पितापुत्रांना मामासाहेब मोहोळ शैक्षणिक संस्‍थेची अनोखी मानवंदना पुणेः   स्वातंत्र्यसेनानी  व कुस्‍तीमहर्षी स्व. मामासाहेब मोहोळ व त्यांचे पुत्र कसोटीपटू स्व. सदानंद मोहोळ यांच्या अध्याकृती पुतळ्याचे अनावरण शनिवार २५ एप्रिलला पुण्याजवळील मुळशीत होणार आहे. क्रीडामहर्षी पितापुत्रांना मामासाहेब मोहोळ शैक्षणिक संस्‍थेकडून अनोखी मानवंदना एकत्रितपणे दिले जाणार आहे. नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठान पुणे व मामासाहेब मोहोळ विद्या विकास मंडळ संस्‍थेने या समारंभाचे आयोजन केले आहे. हा समारंभ २५ एप्रिलला सकाळी ११ वाजता मुळशीतील पिरंगुट येथील मामासाहेब मोहोळ संस्थेच्या आयटीआय सभागृहात  होणार आहे. स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या पुतळ्याचे अनावरण जेष्ठ विचारवंत माजी आमदार उल्हास दादा पवार यांच्या तर स्व.सदानंद मोहोळ यांच्या पुतळ्याचे व सभागृहाचे अनावरण कसोटीपटू व भारतीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष चंदू बोर्डे यांच्या शुभहस्ते होणार आहे. माजी खासदार अशोक मोहोळ, नानासाहेब नवले, बाळासाहेब गांजवे, दिलीप बराटे, संग्राम मोहोळ, कुणाल मोहोळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मामासाहेब व सदानंद मोहोळ यांचे कार्याचा आदर्श नवीन पिढीपुढे राहावा या उद्देशाने संस्थेने मामासाहेब मोहोळ यांचा पुतळा पिरंगुट येथील विद्यालयात बसविण्यात आला असल्याची माहिती नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक मोहोळ यांनी दिली आहे. चौकट सदानंद मोहोळांच्‍या स्‍मृती जागणार सदानंद नामदेव मोहोळ हे भारताचे  मध्यम-वेगवान गोलंदाज होते. ते १९६० ते १९७१ पर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या मोहोळ यांनी १९६७ मध्ये भारतीय संघासोबत इंग्लंडचा दौरा केला होता. मोहोळ रिव्हर्स स्विंग मध्ये कुशल होते. त्‍यांच्‍या पुतळ्याचे अनावरण चंदू बोर्डे यांच्‍या हस्‍ते होणार असल्‍याने त्‍यांच्‍या क्रिकेट कारकिर्दीला शनिवारी उजाळा मिळणार आहे.