Category: मुंबई

Mumbai news

रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सभापती सविता तोरणे रगडे यांची शहरभर धाव

पूरग्रस्त व बाधित भागांची पाहणी, नुकसानग्रस्तांना मदतीची मागणी सुनिल इंगळे उल्हासनगर : शहरात आज सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू असून हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार शासनाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांत झाडे कोसळणे, रस्त्यांवर पाणी साचणे तसेच इतर आपत्कालीन घटनांची माहिती मिळताच आरोग्य सभापती सविता तोरणे रगडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, आरोग्य विभाग तसेच संबंधित विभागांशी समन्वय साधून तातडीने बचाव व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या. अनेक ठिकाणी पडलेली झाडे हटविणे, धोकादायक फांद्या बाजूला करणे, वीजवाहिन्यांवरील अडथळे दूर करणे तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली. दरम्यान, वालधोनी नदी तुडुंब भरून वाहत असल्याने नदीकाठील सखल भागांतील काही नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. या घटनेची माहिती मिळताच आरोग्य सभापती सविता तोरणे रगडे यांनी संबंधित परिसरांना भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी बाधित नागरिकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला तसेच महानगरपालिका आणि प्रशासनाच्या सर्व यंत्रणा त्यांच्या मदतीसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास दिला. आवश्यकतेनुसार तातडीने मदत व बचावकार्य करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी झाडे कोसळून घरांवरील पत्र्यांचे नुकसान झाले, तर काही ठिकाणी नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी, यासाठी तहसीलदार कार्यालयामार्फत पंचनामे करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी आरोग्य सभापती सविता तोरणे रगडे व युवा समाजसेवक शिवाजी रगडे यांनी तहसीलदार कार्यालयाकडे केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करून पात्र नागरिकांना शासनाची मदत लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी, अशीही त्यांनी विनंती केली. यावेळी नागरिकांना मुसळधार पावसाच्या काळात कोणताही धोका पत्करू नये, तुडुंब भरून वाहणाऱ्या नदी-नाल्यांपासून, ओढ्यांपासून तसेच धोकादायक झाडे व वीजवाहिन्यांपासून सुरक्षित अंतर राखावे, विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. कुठेही झाड पडण्याचा धोका, वीजवाहिन्यांवर झाडे, पाणी साचणे किंवा इतर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आढळल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा. महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, पोलिस विभाग तसेच सर्व संबंधित यंत्रणा २४ तास नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज असून प्रत्येक तक्रारीवर तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे. “नागरिकांची सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कोणताही धोका पत्करू नका. तुडुंब भरून वाहणाऱ्या नदी-नाल्यांपासून सुरक्षित अंतर राखा, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आढळल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती द्या. महानगरपालिकेच्या सर्व यंत्रणा आपल्या मदतीसाठी २४ तास सज्ज आहेत. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन युवा समाजसेवक शिवाजी रगडे यांनी केले.

० ‘एसआयआर’ मोहिमेला सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी मुंबई: राज्यात सुरू झालेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल तपासणीचा ३१ जुलैपर्यंतचा कालावधी अपुरा आहे. त्यात जास्तीत जास्त मतदारांचा सहभाग मिळण्यासाठी त्या मोहिमेला सप्टेंबर अखेर पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल इंजिनीअर्स असोसिशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष कुलदीप रामटेके यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. पश्चिम बंगालमधील २७ लाख मतदारांपाठोपाठ ओडिशात २० लाख मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. तसेच १७ लाख लोकसंख्या असलेल्या गोवा राज्यातही दीड लाख मतदारांना यादीतून वगळण्यात आले आहे. बाद करण्यात येणाऱ्या मतदारांची वाढती  संख्या अविश्वसनीय आणि चिंताजनक आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल तपासणी निमित्त संविधान जागर अभियानतर्फे जागृती मोहीम हाती घेण्यात आली असून त्यात रामटेके यांचा विशेष पुढाकार आहे. त्या मोहिमेद्वारे ‘एसआयआर’मध्ये मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी मतदानाचा अधिकार जपा; लोकशाही बळकट करा, असे आवाहन थेट संपर्कातून केले जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ग्रामीण भागात पेरणीच्या कामासाठी शेतकरी आणि शेतमजूर हे गावात घरी सापडत नाहीत. ते शेतावर जातात. त्यामुळे गावात ‘बीएलओ’ आणि त्यांची भेट होणे कठीण आहे, असे कुलदीप रामटेके म्हणाले. खेड्यापाड्यातील गावकरी बांधवांकडे लॅपटॉप, अँड्रॉइड फोन नसतात. आवश्यक कागदपत्र वेळेवर मिळत नाहीत. अशा प्रतिकूल परिस्थितीत मतदार याद्यांच्या विशेष सखोल तपासणीपासून ग्रामीण मतदार मोठ्या संख्येने वंचित राहण्याचा आणि यादीतून बाद होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे सांगत एसआयआर मोहिमेला सप्टेंबर अखेर पर्यंत मुदतवाढ मिळण्याची नितांत गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

चोवीसाव्या माजल्यावरून पेवर ब्लॉक कोसळले

 महिलेसह चारजण जखमी मिरा -भाईंदर : काशिमीरा येथील एका निर्माणधीन बिल्डिंगमधून आज बैठ्या चाळीतील घरावर पेवर ब्लॉक कोसळला. यात एका महिलेसह चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  पावसाच्या पाण्याने सगळीकडे पाणी भरलेल्ले असताना आज या चाळीवर दुहेरी संकट कोसळले. मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा यामुळे आज सकाळी पेवर ब्लॉक घरावरील पत्र्यावर पडला. पत्रा तोडून आत आलेल्या या ब्लॉकमुळे एका महिलेसह चार जण जखमी झाले. पहाटेच्या झोपेत असल्याने त्यांना सावरता आले नाही. मिरा गावठाण मधील विघ्नहर्ता ही बिल्डिंग निर्माणधीन असून लगतच्या हरिधाम सोसायटीतील चाळीतील घरावर हार्दिक ब्लॉक पडला. बिल्डर तसेच संबंधितांवर निष्काळजीपणाबद्दल कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

-टिटवाळ्यातील त्या ८८ वर्षीय आजींच्या घरात शिरलेल्या पाण्याची प्रशासनाने केली पाहणी

वृत्त प्रसारित होताच होताच प्रशासन जागे; सुरक्षिततेसाठी निवारा केंद्रात हलविण्याचा प्रस्ताव कल्याण : टिटवाळ्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंदिरानगर स्मशानभूमी रस्त्यावरील पालांडे चाळ परिसरात पाणी साचण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या परिसरातील चाळ क्रमांक ३, खोली क्रमांक १ मध्ये राहणाऱ्या ८८ वर्षीय सखूबाई मुरलीधर हिरे यांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने त्यांना स्वतःच घरातील पाणी बाहेर काढावे लागले. या घटनेचे वृत्त वृत्तपत्रात प्रसिद्ध होताच तसेच  व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर केडीएमसी प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. एकट्याच वास्तव्यास असलेल्या सखूबाई हिरे यांना सतत घरात शिरणाऱ्या पाण्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वयाच्या या टप्प्यावरही घरातील साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत असल्याचे दृश्य व्हिडिओमध्ये दिसून येते. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाच्या पावसाळी नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्वच्छता निरीक्षक अक्षय कराळे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी सखूबाई हिरे यांची विचारपूस करण्यात आली तसेच त्यांना बिस्किटे व अन्य आवश्यक साहित्य देण्यात आले. वृद्ध महिलेची सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांना तात्पुरत्या निवारा केंद्रात स्थलांतरित होण्याची विनंतीही प्रशासनाकडून करण्यात आली आहे. याशिवाय, केडीएमसीचे सहायक आयुक्त जयवंत चौधरी हेही पालांडे चाळ परिसराची पाहणी करणार असल्याची माहिती आहे. या भेटीनंतर पाणी साचण्याच्या समस्येवर तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना जाहीर होणार का, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे. दरवर्षी पावसाळ्यात पालांडे चाळ परिसरात पाणी साचण्याची समस्या उद्भवत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे केवळ पाहणी आणि तात्पुरत्या मदतीवर न थांबता प्रभावी जलनिस्सारण व्यवस्था उभारून या भागातील नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा देण्याची गरज असल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या 85 वर्षांच्या इतिहासात सलग दुसऱ्यांदा संदीप चव्हाण यांच्या परिवर्तन पॅनलने शंभर टक्के यश संपादन करुन ऐतिहासिक विजयाची नोंद केली. अध्यक्ष संदीप चव्हाण यांना ४८४ पैकी ३६६ मते मिळाली. त्या निमित्ताने अध्यक्ष संदीप चव्हाण आणि  उपाध्यक्षपदी निवडून आलेल्या स्वाती घोसाळकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन मनोहर विचारे प्रतिष्ठान, मुंबईचे संस्थापक  अध्यक्ष अजय विचारे यांनी सत्कार केला. डावीकडून दुसऱ्या  प्रतिष्ठानाच्या मानद सचिव पूर्णिमा कोटीयन सुद्धा उपस्थित होत्या.

वात्सल्य सेवाभावी संस्थेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांचा सन्मान सोहळा

उल्हासनगर: वात्सल्य सेवाभावी संस्था (रजि.) यांच्या विद्यमाने १० जून, मिलिंद नगर येथे वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच द्वितीय वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांचा सन्मान सोहळयाचे आयोजन करण्यात आले. ऍड.महेंद्र निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या…

Heading – कल्याण पूर्व येथे श्रीराम रक्षा स्तोत्र पठण व महाआरती

 अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील चोरीच्या निषेधार्थ कल्याण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, कल्याण पूर्व शहर शाखेच्या वतीने कोळशेवाडी, कल्याण पूर्व येथील गणपती मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेसमोर श्रीराम रक्षा स्तोत्र…

राज्य बालनाट्य स्पर्धेत संदेश विद्यालयला ३ पारितोषिकं

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २०२५ – २६ मध्ये आयोजित २२व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचा विभागीय पारितोषिक वितरण समारंभ नुकताच रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या…

 रेल्वे कामगारांचे नेते विकास गुप्ते यांचे निधन

गोदी कामगारांनी वाहिली श्रद्धांजली ! मुंबई : महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे खजिनदार, वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियनचे खजिनदार तसेच मणिबेन कारा फाउंडेशनचे डेप्युटी डायरेक्टर  विकास गुप्ते यांचे ६ जुलैला वयाच्या ६५  व्या वर्षी  कल्याण येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. विकास गुप्ते हे शेवटच्या श्वासापर्यंत कामगार चळवळीमध्ये सक्रिय होते. आझाद मैदान येथे 3 जुलै रोजी चार कामगार कायदे मागे घ्या, या इतर मागण्यासाठी झालेल्या आंदोलनामध्ये त्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला होता. रेल्वे कामगारांच्या बैठका घेऊन अन्यायाविरुद्ध त्यांनी सातत्याने आवाज उठविला. अभ्यासू कामगार नेते असल्यामुळे वेतन आयोगामध्ये सातत्याने त्यांचा  सक्रिय सहभाग होता. हिंद मजदूर सभेच्या अधिवेशन आणि  कामगार प्रशिक्षण आयोजनामध्ये त्यांचा नियमित सहभाग होता. रेल्वे कामगारांमधील एक अभ्यासू वक्ता म्हणून त्यांचा नावलौकिक होता.  कामगार चळवळीच्या प्रत्येक आंदोलनामध्ये ते सक्रिय होते. रेल्वे व्यवस्थापनासमोर कामगारांची बाजू ते नेहमी ठामपणे मांडत होते. त्यांच्या निधनाने रेल्वे कामगारांचे तसेच कामगार चळवळीचे फार मोठे नुकसान झाले आहे. एका अभ्यासू कामगार नेत्याला कामगार चळवळ मुकली आहे. याची जाणीव नेहमीच कामगार चळवळीला होईल.  विकास गुप्ते यांच्या कुटुंबीयांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर देवो. ही प्रार्थना, अशा शब्दांत रेल्वे कामगारांचे नेते विकास गुप्ते यांना मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष  ॲड. एस. के. शेट्ये  आणि जनरल सेक्रेटरी एक मिनिट फक्त सुधाकर अपराज यांनी गोदी  कामगारांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

आजा पर्वात, डेहणे रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात

 वाहनांना अपघाताची भीती ठाणे : आजा पर्वात, डेहणे, वाल्मिकी नगर वरपडी गाव कडे जाणाऱ्या रस्त्याला प्रवास करणाऱ्या प्रवाशी, विद्यार्थी यांना खड्क्यांमुळे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पावसाच्या पाण्याने हे खड्डे…