Category: मुंबई

Mumbai news

वालधुनी नदीत केमिकलयुक्त पाणी सोडल्यामुळे गंभीर प्रदूषण

कल्याण : कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्रमांक २ मधील भवानी नगर, अनुपम नगर, घोलप नगर, विधी परिसर, शिव अमृतधाम व योगीधाम या भागातील नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून तीव्र पर्यावरणीय समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या परिसरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीमध्ये काही औद्योगिक कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर केमिकलयुक्त दूषित पाणी सोडले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः रात्री ८ ते ११ वाजण्याच्या दरम्यान हे प्रकार घडत असून नदीचे स्वरूप नाल्यासारखे झाले आहे. या प्रदूषणामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत आहे, वायू प्रदूषणात वाढ होत आहे. नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना श्वसनाचे त्रास, डोकेदुखी, मळमळ अशा समस्या जाणवत आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शिवसेना भवानी चौक शाखा, विभाग प्रमुख सतीश वायचळ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले आहे. तसेच हे निवेदन केडीएमसी महापौर आणि आयुक्तांना देखील दिले आहे. नदीत सोडले जाणारे केमिकलयुक्त पाणी त्वरित थांबविणे, संबंधित कंपन्यांवर कडक कारवाई करणे, प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत तपासणी करून अहवाल सादर करणे. हवा व पाण्याची गुणवत्ता नियमित तपासणे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे. याबाबत स्थानिक नागरिकांच्या वतीने प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, लवकरात लवकर ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 एनआरसीच्या थकबाकी करावरून केडीएमसी महासभेत गदारोळ

  एनआरसीचे नळ कनेक्शन कापले जाणार कल्याण : कल्याणच्या बंद पडलेल्या एनआरसी कंपनीच्या थकीत कराच्या वसुलीवरून सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात जोरदार वादावादी झाली. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एनआरसीमधून कर वसूल होऊ शकला नाही आणि आता काही कोटींचा कर तीनशे कोटींहून अधिक झाल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला. कराची थकबाकी असतानाही महापालिका प्रशासनाने एनआरसीचे नवीन पाणी कनेक्शन दिले आणि शिवाय एनआरसीचे भूखंड खरेदी करणाऱ्या लोकांना महापालिकेने ना हरकत पत्रेही दिली.  स्थानिक नगरसेविका उपेक्षा भोईर, स्थानिक नगरसेवक राहुल कोट, रोहन कोट यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करत सर्व बाजूंच्या नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. नगरसेवक राहूल कोट यांनी एनआरसी  कोट्यवधीची थकबाकी प्रकरणी प्रशासनाला पत्र देत, महासभेत उपसूचना मांडित एनआरसी थकबाकी प्रकरणी  विषय लावून धरला आहे. एनआरसीच्या मुद्द्यावरून नगरसेविका उपेक्षा भोईर यांनी महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब करण्याची मागणी केली. जे सुरुवातीला महापौरांनी फेटाळले होते, नंतर चर्चेअंती एनआरसीला दिलेले नळ कनेक्शन तात्काळ खंडित करण्यात यावे आणि महापालिका प्रशासनाने दिलेल्या सर्व परवानग्याही रद्द कराव्यात, असा निर्णय घेण्यात आला. यासोबतच काही नगरसेवक आणि प्रशासनाची समिती स्थापन करावी.  ही समिती एनआरसीद्वारे महापालिकेविरुद्ध विविध न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यांचा आढावा घेणार आहे. आणि थकीत कर वसूल करण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करणार.

 पी.आर. जॅग्वार्सने पटकावला टीडब्ल्यूपीएल चषक

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण  ठाणे – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाला संलग्न असलेल्या ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीच्या वतीने ठाण्यातील पोलिस मैदान येथे आयोजित टीडब्ल्यूपीएल क्रिकेट स्पर्धेत पी.आर. जॅग्वार्सने व्ही.पी. पँथर्स संघाला पराभूत करत चषकावर नाव कोरले.  टीडब्ल्यूपीएलचा अंतिम सामना व्ही.पी. पँथर्स विरुद्ध पी.आर. जॅग्वार्स या दोन संघात रंगला. पी.आर. जॅग्वार्ससाठी प्रथम फलंदाजी करत ५ गडी बाद ६७ धावा केल्या. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना व्ही.पी. पँथर्स ने ५ गडी बाद ५९ धावा केल्या. पी.आर. जॅग्वार्स संघाने हा अंतिम सामना ८ धावांनी जिंकला. सामनावीर म्हणून विक्रम विश्वकर्मा (पी.आर. जॅग्वार्स) तर इंडिया आयकॉन मॅन ऑफ द सिरीज विवेक शेलार, ठाणे आयकॉन मॅन ऑफ द सिरीज जुगेश यादव यांचा सन्मान करण्यात आला. पारितोषिक वितरण समारंभाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या महिला संघटक मीनाक्षी शिंदे, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक मंदार केणी, युवासेना कार्यकारिणी सदस्य अर्जुन डाभी, नितीन लांडगे, मिलिंद चव्हाण, किरण जाधव, नितेश पाटोळे, पी. आर. जग्वार्स संघाचे मालक रोहित पिंपळकर, प्रकाश कोटवानी, व्ही पी पँथर्स संघाचे मालक विशाल जाधव, ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष निखिल बुडजडे, उपाध्यक्ष अभिजित पवार यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर मंडळी उपस्थित होते.

बीपीसीएल, आयएसपीएल उपांत्यपूर्व फेरीत

 महिलांच्या गटात राजमाता जिजाऊ, धर्मवीर, विवेक बाद फेरीत  चषक कबड्डी स्पर्धा मुंबई, दि. २0 (क्री.प्र.) क्रीडाप्रेमी आमदार सुनील राऊत यांच्या संयोजनाखाली सुरु असलेल्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी पुरुषांच्या व्यावसायिक गटात भारत पेट्रोलियम (बीपीसीएल), इन्शुअरकोट स्पोर्ट्स प्रा.लि. (आयएसपीएल), ठाणे महानगर पालिका, मीरा-भायंदर महानगर पालिका, मुंबई बंदर आणि संत सोपान काका बँकेने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे. महिलांच्या गटात राजमाता जिजाऊ, धर्मवीर, स्वराज्य स्पोर्ट्स, शिवशक्ती आणि विवेक स्पोर्ट्स क्लबने गटविजेतेपद पटकावत उपांत्यपूर्व फेरीत मजल मारलीे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त  विक्रोळी पूर्वेला टागोर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात उभारलेल्या क्रीडानगरीत दुसर्‍या दिवशी मॅटवरच्या कबड्डीचा अस्सल व्यावसायिक संघांचा थरार हजारो कबड्डीप्रेमींना याची देही अनुभवता आला. कालच प्रभादेवीत बाजी मारलेल्या बीपीसीएलने आज मैदानात उतरताच आधी रिझर्व्ह बँकेचे ३६-१८ असे डिपॉजिट जप्त करत खणखणीत विजय मिळवला. बीपीसीएलच्या मिलन दहिया आणि प्रसाद दिघोळेच्या खेळापुढे रिझर्व्ह बँकेचे काहीएक चालले नाही. या एकतर्फी विजयानंतर बीपीसीएलने ठाणे महानगर पालिकेविरुद्धचा संघर्ष १४-१३ अशा एका गुणाने जिंकत थेट उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. ठाणे महानगर पालिकेने आपल्या दुसर्‍या सामन्यात रिझर्व्ह बँकेचा ४६-३४ असा धुव्वा उडवत अंतिम आठ संघात प्रवेश केला. बीपीसीएलपाठोपाठ आयएसपीएलने आपल्या दुसर्‍या सामन्यात संत सोपान काका बँकेला ३९-२४ असे नमवत अ गटाचे विजेतेपद पटकावून उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले, तसेच मुंबई पोस्टल आणि सीजीएसटी यांच्यातील अटीतटीचा सामना पोस्टलने १६-१५ असा जिंकला आणि इ गटातून बाद फेरीत धडक मारली. क गटात मिरा भायंदर पालिकेने मिडलाइन रायगडविरुद्धची साखळी लढत ३७-३६ अशी जिंकत बाद फेरी गाठली. युनियन बँक आणि मुंबई बंदर यांच्यातील सामना युनियन बँकेने १६-१४ असा जिंकत ड गटातून बाद फेरीत प्रवेश केला. महिलांच्या गटातही जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. पुण्याच्या राजमाता जिजाऊने आपले दोन्ही साखळी सामने सहज जिंकले. पहिल्या साखळी सामन्यात श्रीराम संघाचा ३५-१० असा फडशा पाडला तर दुसर्‍या सामन्यात भांडुपच्या स्नेहविकास मंडळाची ४०-६ अशी धुळधाण उडवली. या दोन्ही सामन्यात  महेश्वरी वाघ आणि निमिता पडवळ यांचा वेगवान खेळ पाहायला मिळाला. नंदूरबारच्या धर्मवीर कबड्डी संघाने डॉ. शिरोडकर क्लबचा ४६-२४ असा सहज पराभव केला. समृद्धी कोळेकर, हर्षदा सोनावणे, हर्षदा हंडोरे आणि ईश्वरी कोंढाळकर यांनी तुफानी चढाया-पकडींचा खेळ करत आपल्या संघाला मोठे विजय मिळवून दिले. मुंबईच्या शिवशक्ती महिला संघानेही स्वस्तिक आणि पतंगराव कदम संघाचा दारुण पराभव करत बाद फेरीत प्रवेश केला. विवेक स्पोर्ट्स क्लबनेही संजना पोळ आ्िण जीवा श्रीरंगन यांच्या खेळाच्या जोरावर दोन्ही साखळी लढती आरामात जिंकल्या.

पेटीएम आता भारतीय मालकी कंपनी

मुंबई / रमेश औताडे पेटीएम वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड जी एमएसएमई आणि मोठ्या उद्योगांना सेवा देणारी अग्रगण्य व्यापारी देयक सेवा कंपनी आता भारतीय मालकी कंपनी बनली आहे.  ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीच्या भागभांडवल रचनेनुसार, आता कंपनीच्या इक्विटी शेअर भांडवलापैकी ५०.३ टक्के हिस्सा देशांतर्गत गुंतवणूकदारांकडे आहे, ज्यामुळे भारतीय मालकी आणि नियंत्रणात बहुमत प्रस्थापित झाले आहे. स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांचा सहभाग सातत्याने वाढत आहे. त्यांचे होल्डिंग कू ४ आर्थिक वर्ष २०२६  मध्ये २३.१ टक्के पर्यंत पोहोचले असून, मागील तिमाहीतील २०.३ टक्के आणि एक वर्षापूर्वीच्या १४.० टक्के च्या तुलनेत ही वाढ लक्षणीय आहे. भारतीय म्युच्युअल फंडांकडे कंपनीतील १६.६ टक्के   हिस्सा असून, ४१ म्युच्युअल फंड हे भागधारक आहेत. स्थानिक विमा कंपन्यांनीही आपला हिस्सा वाढवून ५.१ टक्के केला आहे. ही कामगिरी पेटीएमच्या व्यवसायावर भारतीय गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास दर्शवते आणि देशभर मोबाईल देयके व वित्तीय सेवांचा विस्तार करण्यात कंपनीची भूमिका अधोरेखित करते. यासह, पेटीएम भारतासाठी काम करण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अधिक बळकटी देत आहे, ज्यामध्ये मालकी हळूहळू देशांतर्गत संस्था आणि गुंतवणूकदारांशी अधिक जुळत आहे. 00000000

 रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य निर्णयाविरोधात निषेध

मुंबई / रमेश औताडे महाराष्ट्रातील लाखो ऑटोरिक्षा – टॅक्सी चालकांची उपजिवीका नष्ट करून त्यांचे कुटुंब उद्धवस्त करण्याचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा डाव आम्ही आंदोलन करून हाणून पडणार असल्याचा इशारा कामगार नेते शशांक राव यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र चे कार्याध्यक्ष मारुती कोंडे म्हणाले, परिवहन मंत्री यांनी या प्रकरणी गांभीर्याने विचार करावा व हा निर्णय मागे घ्यावा. रिपब्लिकन रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे कल्याण शहराध्यक्ष मोहन पाठारे म्हणाले, सरकारने परवाना देण्याअगोदर विचार केला पाहिजे होता. १ मे, २०२६ पासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सीचालक निषेध आंदोलन करणार आहेत. महाराष्ट्रात १५ वर्ष वास्तव्यास असलेल्यांनाच ऑटोरिक्षा टॅक्सीचे परवाने दिले जातात. परवाने देताना त्यांची पोलिस पडताळणी केली जाते व त्यानंतर ऑटोरिक्षा टॅक्सी चालकांना परवाने दिले जातात. राज्यात बेकायदेशीररीत्या परिवहन मंत्रालयाच्या कृपेने बाईक टॅक्सी सुरू आहे आणि या सेवेवर जाणिवपूर्वक कारवाई केली जात नाही.आता आम्ही रिक्षा-टॅक्सीचालकांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन २८ एप्रिल रोजी परिवहन मंत्री यांना देणार आहे. ४ मे, २०२६ पासून रोज शहरी व ग्रामीण भागांमध्ये प्रमुख ठिकाणी ऑटोरिक्षा टॅक्सी चालक निदर्शने करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

– जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया

 चिखलातून वाट काढत विद्यार्थ्यांची ये जा कल्याण : केडीएमसीच्या अ प्रभाग क्षेत्रातील आंबिवली स्टेशन नजीक असणाऱ्या वाल्मिकी शाळा रस्त्यावर जलवाहिनी बाधित झाल्याने लाखो लीटर पाणी वाया जात असून, विद्यार्थ्यांना चिखलातून पाण्यातून वाट काढीत शाळेत ये जा करावी लागत आहे. समन्वय अभावामुळे गेली चार दिवसापासून प्रशासन भिंजत घोगंडे कारभार समोरा येत असून प्रशासन कधी समस्या मार्गी लावणार अशी मागणी यानिमित्ताने होत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे आंबिवली स्टेशन नजीक वाल्मीकी शाळा रस्ता परिसरात गेल्या तीन चार दिवसा पासून लाखो लीटर पाणी वाया जात आहे. अमृत अंतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या कामात जुनी लाईन बाधित झाल्याने लिकेज मुळे लाखो लीटर पाणी वाया जात असून समन्वय अभावामुळे समस्या मार्गी लागत नसल्याचे चित्र दिसत आहे. या संदर्भात माजी नगरसेवक दशरथ तरे यांनी अ प्रभागाचे पाणी खात्याचे उप अभियंता उदय सूर्यवंशी यांना संपर्क साधला असता त्यांनी अमृत अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु असून ती जबाबदारी त्यांची असल्याचे सांगत, अंग काढले. तर या कामामुळे, जुनी लाईन बाधित झाल्याने लिकेजमुळे लाखो लीटर पाणी वाया जात असून रस्त्यालगत चिखलाचे साम्राज्य झाले असून लिकेजमुळे पाणी वाल्मिकी शाळेच्या मैदान रस्त्यावर साचत असल्याने या साचलेल्या पाण्यातून विद्यार्थ्यांना ये जा करण्याचा प्रसंग उद्भवला असून हा प्रश्न मार्गी लावण्या संदर्भात मागणी जोर धरू पाहत आहे. अ प्रभाग पा.पु. उप अभियंता उदय सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला लिकेज दुरुस्ती काम सोमवारी करण्यात आले असून रस्ता दुरूस्ती संदर्भात अमृत विभागाशी संपर्क केला आहे. अमृत प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता शैलेष कुलकर्णी यांच्याशी रस्ता दुरूस्ती संदर्भात संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

– राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेल प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे यांना विधान परिषदेवर संधी द्या

अण्णा बनसोडे यांच्या सोबत शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे मागणी.. मुंबई -राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग सेल प्रदेश अध्यक्ष सुनील मगरे यांना विधान परिषदेवर संधी  द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री…

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल निवडणूक कायद्याप्रमाणे व्हावी

मुंबई / रमेश औताडे महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या मूळ हेतूचे उल्लंघन मानला पाहिजे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या ७ जानेवारी २०२६ आणि २ एप्रिल २०२६ च्या आदेशानुसार अनिवार्य केलेली ही  महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ची निवडणूक प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांमार्फत किंवा माननीय न्यायालयाला योग्य वाटेल त्याप्रमाणे देखरेख केली जावी. अशी मागणी हीलिंग हँडचे युनिटी पॅनल चे संयोजक डॉ तुषार जगताप, डॉ संजय वाठोरे, डॉ ललित आनंदे यांनी पत्रकार परिषदेत केली. या  निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्यासंदर्भात रजिस्ट्रार  त्यांच्या पूर्ववर्तींनी मतदार यादी तयार करताना केलेल्या गंभीर चुका टाळण्याची विनंती केली आहे. एमएमसी निवडणुकीचे नामनिर्देशन अर्ज उपलब्ध नसणे. वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिवांना पत्र, नियमानुसार आक्षेप आणि सूचना. नावे वगळल्याबद्दल सहसचिवांना पत्र, सूचना, दिशाभूल करणारी, कायद्यानुसार अनिवार्य असूनही प्रसिद्ध केलेल्या याद्या कार्यालयात ठेवल्या नाहीत. असे अनेक आरोप यावेळी करण्यात आले.

 शरीरसौष्ठवपटूंच्या पाठीवर राज्य शासनाकडून कौतुकाची थाप पडू दे

 राष्ट्रीय विजेत्या शरीरसौष्ठवपटूंच्या कौतुक सोहळ्यात अध्यक्ष खानविलकरांचे शासनाला आवाहन मुंबई, दि.२० -जिंकायला दम लागतो आणि जिंकल्यावर पाठीवर पडलेली कौतुकाची थाप पुढच्या यशाची आग पेटवते. यंदा ही आग क्रीडाप्रेमी कुणाल केरकर यांनी शरीरसौष्ठवपटूंच्या नसानसांत पेटवली आहे. त्यांच्यासारख्या क्रीडाप्रेमींमुळे मुंबईच्या शरीरसौष्ठवाची ताकद आणखी बळकट झालीय. अशीच कौतुकाची थाप शासनाकडूनही आमच्या खेळाडूंच्या पाठीवर पडायला हवी. राजकीय व्यक्तींनी आमच्या खेळाला आपले बळ दिले तर शरीरसौष्ठवाचा बालेकिल्ला असलेली मुंबई अभेद्य राहील. तिला कुणीही तोडू शकणार नाही, वाकवू शकणार नाही, अशा शब्दांत मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील विजेत्या मुंबईकर खेळाडूंचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले. मुंबईच्या शरीरसौष्ठवपटूंनी उज्जैन येथे झालेल्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत एक-दोन नव्हे तर १४ पदकांची कमाई करत मुंबईची ताकद अवघ्या हिंदुस्थानला दाखवली होती. या यशानिमित्त पदकविजेत्या खेळाडूंचे कुणाल केरकर यांनी मालाड पश्चिमेला आयर्न पॅराडाइज जिममध्ये कौतुक सोहळ्याचे प्रेरणादायी आयोजन केले होते. गेल्या २५ वर्षांपासून फिटनेस क्षेत्रात सक्रिय असलेल्या कुणाल केरकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या खेळाडूंना व्यासपीठ मिळावे आणि नवोदितांना प्रेरणा मिळावी, या हेतूने या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यांचा हा पुढाकार शरीरसौष्ठवाला बळ देणारा ठरला. केरकर यांचे शरीरसौष्ठव आणि खेळाडूंवर असलेले प्रेम असेच बळ देणारे होत जावो, असे गौरवोद्गारही याप्रसंगी संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी काढले. याप्रसंगी केरकर यांनीही आपण खेळाडूंच्या पाठीशी सदैव उभे राहू, असे आश्वासन दिले. या कौतुक सोहळ्यानिमित्त हरमीत सिंग, उमेश गुप्ता, रेखा शिंदे, राजेश तारवे, संदीप सावळे, नीलेश दगडे, विश्वंभर राऊळ, नीलेश गुरव या सुवर्णविजेत्या खेळाडूंसह गणेश पेडामकर, ओंकार कळके, मनोज बोचरे, विशाल धावडे, अविनाश शिंदे, नीलेश रेमजे यांचे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. तसेच आयर्न पॅराडाइजच्या प्रशांत घोलम, सिद्धांत यादव आणि क्षितीज साळुंखे या शरीरसौष्ठवपटूंनाही सन्मान चिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्याला शरीरासौष्ठव संघटनेचे किट्टी फणसेका, विशाल परब, सुनील शेगडे, राम नलावडे, किरण कुडाळकर, अशोक शेलार, राजेश निकम, जयदीप पवार आणि शरीरसौष्ठवातील दिग्गजांसह विजेत्या खेळाडूंचे कुटुंबीयही मोठ्या संख्येने उपस्थित होते.