Month: April 2026

जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे पुरस्कार जाहीर

   विजय वैद्य यांच्या नावाचा पहिला पुरस्कार संजय डहाळे यांना मुंबई : जय महाराष्ट्र नगर बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी पुरस्कृत केलेल्या विजय वैद्य उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराची तसेच जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. विजय वैद्य यांच्या नावाचा पहिला उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ नाट्य समीक्षक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दैनिक सामना मध्ये प्रारंभापासून सुमारे तीस वर्षे उच्च पदावर निष्ठापूर्वक जबाबदारी पार पाडणारे ज्येष्ठ पत्रकार संजय डहाळे यांना देण्यात येणार आहे. जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचा शारदा पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट समीक्षक म्हणून लोकप्रियता मिळविलेले दिलीप ठाकूर यांना, प्रेरणा पुरस्कार वायंगणकर साई स्पोर्ट्स च्या आधारस्तंभ पल्लवी राकेश वायंगणकर यांना तसेच जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय पडकील यांना देण्यात येणार आहे. जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला येत्या २४, २५ आणि २६ एप्रिल २०२६ असे तीन दिवस आयोजित करण्यात आली असून या वसंत व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. एकता विनायक चौक, जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथे रोज सायंकाळी साडेसात वाजता ही व्याख्यानमाला होणार आहे. रसिक श्रोत्यांनी या बौद्धिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही संयोजकांनी केले आहे. ०००००००

ठाणेची ५ सुवर्ण, ४ रौप्यांसह एकूण ९ पदकांची दिमाखदार कमाई!

राज्य अजिंक्यपद खुली बॅडमिंटन स्पर्धा ऋषिकेश जोगळेकर, विनय पाटील, मृणाल पोद्दार चमकले! मुंबई येथील पवई येथील आय आय टी येथील बॅडमिंटन कोर्टावर ३ एप्रिल ते ५ एप्रिल २०२६ दरम्यान पार पडलेल्या आवाहन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करत तब्बल ५ सुवर्ण व ४ रौप्य पदकांसह एकूण ९ पदकांची कमाई केली. विविध गटांमध्ये ठाण्याच्या खेळाडूंनी केलेला दमदार खेळ, जिद्द आणि सातत्यपूर्ण कामगिरी यामुळे संपूर्ण स्पर्धेत ठाण्याचा दबदबा पाहायला मिळाला. ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडांगणातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल येथे सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेअंतर्गत चालणाऱ्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीतील खेळाडूंनी या स्पर्धेत आपली छाप उमटवत उच्च दर्जाच्या खेळाचे प्रदर्शन केले. मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशिक्षक मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, मितेश हाजीरनिस, तसेच इतर सहाय्यक प्रशिक्षकांच्या सहकार्याने खेळाडूंनी ही यशस्वी कामगिरी साकारली. पुरुष एकेरी गटात विनय पाटीलने उत्कृष्ट खेळ करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. सुरुवातीच्या फेरीत शारविल तेंबुळकरला १५-३, १५-८ अशा सहज पराभूत केले. उपांत्यपूर्व फेरीत राफेल मस्कारेनहासला १५-१०, १५-७ अशा सरळ सेटमध्ये हरवले. उपांत्य फेरीत ऋतुराज चिपटविरुद्ध २१-१९, २१-१० असा प्रभावी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात माजी ठाणे अकॅडमीच्या वरिष्ठ खेळाडूविरुद्ध पराभव पत्करावा लागला आणि रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पुरुष दुहेरी गटात नव्याने तयार झालेल्या ऋषिकेश जोगळेकर व विनय पाटील या जोडीने सर्वांना आश्चर्यचकित करत सुवर्ण पदक पटकावले. १६ फेरीत अथर्व बागवे व प्रथमेश कांबळे यांना १५-६, १५-४ अशा सहज पराभूत करत सुरुवात केली. उपांत्यपूर्व फेरीत सोहम फाटक व तेजस प्रभुदेसाई यांच्याविरुद्ध १०-१५, १५-१२, १५-१३ असा थरारक विजय मिळवला. उपांत्य फेरीत ठाणे अकॅडमीच्याच माजी वरिष्ठ खेळाडू कृष्ण देसाई व पार्थिव नायर या जोडीविरुद्ध १८-२१, २४-२२, २१-१८ अशा दीर्घ आणि उत्कंठावर्धक सामन्यात विजय मिळवत सर्वांना थक्क केले. अंतिम फेरीत आर्यन वर्मा व कृष्णा मजेठिया या जोडीवर २१-१८, २१-१६ असा विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावले. महिला दुहेरी गटात मृणाल पोतदार हिने आपल्या जोडीदारासह उत्कृष्ट खेळ करत सुवर्ण पदक जिंकले. अंतिम फेरीत ठाणे अकॅडमीच्या अनुभवी जोडी अनामिका सिंग व अनघा करंदीकर यांच्यावर २१-१९, १७-२१, २१-१६ अशा चुरशीच्या सामन्यात विजय मिळवत विजेतेपद पटकावले. मिश्र दुहेरी गटात सर्वेश यादव व अनामिका सिंग या जोडीने सुवर्ण पदक जिंकत ठाण्याच्या यशात भर घातली. अंतिम फेरीत त्यांनी कडव्या प्रतिस्पर्ध्यांवर १७-२१, २१-१७, २१-१९ असा थरारक विजय मिळवत विजेतेपद मिळवले. या यशाबद्दल मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी आनंद व्यक्त करत सांगितले की, “या स्पर्धेत आमच्या खेळाडूंनी दाखवलेली कामगिरी ही त्यांच्या सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि खेळावरील निष्ठेचे फलित आहे. विशेषतः नव्या जोड्यांनी दिलेली कामगिरी आशादायक आहे आणि भविष्यात ते मोठ्या स्तरावर नक्कीच चमकतील.” ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपायुक्त मीनल पलांडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करत सांगितले की, “ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे खेळाडू सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत ठाण्याचे नाव उंचावत आहेत. या यशामुळे इतर खेळाडूंनाही प्रेरणा मिळेल. सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.” ००००००००

कामे करा नाहीत घरी बसा’, कामचुकार नेत्यांना श्रीकांत शिंदेंची तंबी

आरती परब डोंबिवली : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी आणि आगामी राजकीय नियोजनाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली येथे आयोजित आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांशी सविस्तर संवाद साधला. या बैठकीत मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीबाबत सखोल चर्चा करण्यात आली. भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमेला गती देण्यासाठी ‘बीएलए’ (BLA) नियुक्ती लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. यासोबतच या संपूर्ण प्रक्रियेबाबत सर्व कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येकाने सक्रिय भूमिका घेत मतदारांना नोंदणीसाठी आवश्यक मदत व माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले. यामुळे मतदार नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक, अचूक आणि विश्वासार्ह करण्यावर भर देण्यात आला. यावेळी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी संपूर्ण प्रक्रिया समजून घेत याबाबत काम करण्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार डॉ.बालाजी किणीकर, आमदार राजेश मोरे, युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, शिवसेना उपनेते रवींद्र फाटक, उल्हासनगर महापौर अश्विनी निकम, कल्याण- डोंबिवली महापौर हर्षाली चौधरी, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, अरविंद मोरे, महिला आघाडीच्या लता पाटील यांच्यासह सर्व स्थानिक नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुमार गट व प्रथम श्रेणी पुरुष गट कबड्डी स्पर्धा

महाड तालुका क्रीडा मंडळ, जय भवानी क्रीडा मंडळ उपांत्य फेरीत मुंबई. . महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ   हनुमान क्रीडा मंडळ कुर्ला, गौरीशंकर क्रीडा मंडळ कुर्ला आणि  कुर्ला क्रीडा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गांधी मैदानात आयोजित केलेल्या  कुमार गट व प्रथम श्रेणी पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत कुमार गटात महाड तालुका क्रीडा मंडळ, जय भवानी क्रीडा मंडळाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.  कुमार गटाच्या उपांत्य पुर्व फेरीच्या सामन्यात  विक्रोळीच्या महाड तालुका क्रीडा मंडळाने    नवशक्ती स्पोर्ट्स अकॅडमी चेंबूरचा ८ गुणांनी पराभव  केला . दुसऱ्या सामन्यात जय भवानी क्रीडा मंडळाने हनुमान क्रीडा मंडळाचा सहज‌ पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला इतर सामन्यात  बालवीर स्पोर्ट्स क्लबने ट्रान्सपोर्ट क्लब घाटकोपरचा १६  गुणांनी आरामात पराभव केला. तर भानवे अकॅडमी विरुद्ध पार्ले महोत्सव यांच्यात झालेल्या सामन्यात भानवे अकॅडमीने पार्ले महोत्सवांचा अवघ्या ३ गुणांनी पराभव केला. प्रथम श्रेणी पुरुष गटाच्या सामन्यात सन्मित्र क्रीडा मंडळ घाटकोपर व चेंबूर क्रीडा मंडळ यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली  विश्रांतीला दोन्ही संघाचे ९-९ असे समान गुण होते. सन्मित्र क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी निकराचा प्रयत्न करत चेंबूर क्रीडा केंद्राला जोरदार लढत‌ दिली.पण अखेर चेंबूर संघाने २ गुणांनी बाजी मारली. सन्मित्र क्रीडा मंडळचा अजिंक्य जाधवने   तर चेंबूर क्रीडा केंद्राकडून गुफ्रानने चांगला खेळ केला. ०००००००

एमजीएसएम आंतर महाविद्यालयीन टी -२०  क्रिकेट स्पर्धा

धनश्री वाघमारेचे नाबाद अर्धशतक मुंबई : सलामीची फलंदाज धनश्री वाघमारेने केलेल्या दोन महत्वपूर्ण भागीदारी आणि नाबाद अर्धशतकी खेळीमुळे रमणीरंजन झुनझुनवाला महाविद्यालयाने महर्षी दयानंद महाविद्यालयाचा ३७ धावांनी पराभव करत एमजीएसएम आंतर महाविद्यालयीन टी -२० क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली. प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १३७ धावा उभारल्यावर रमणीरंजन झुनझुनवाला महाविद्यालयाने प्रतिस्पर्ध्यांना १०० धावांवर रोखत स्पर्धेच्या पुढल्या फेरीत स्थान मिळवले. या सामन्यात धनश्रीने आपल्या ५१ धावांच्या नाबाद खेळीसह सलामीची जोडीदार सृष्टी नाईक आणि किमया राणेसोबत संघाला आश्वासक अशा भागीदारी रचल्या. पहिल्या गड्यासाठी धनश्रीने सृष्टीच्या साथीने अर्धशतकी ६७ धावांची भागीदारी केली. नंतर किमयाला हाताशी घेऊन ४३ धावांची भागीदारी केली. सृष्टीने ३४ आणि किमयाने ४७ धावांचे योगदान दिले. महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या प्रियदर्शनी सिंगने दोन फलंदाज बाद केले. विजयासाठी धावांचा पाठलाग करणाऱ्या महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या अलिना मुल्लाचा अपवाद वगळता त्यांच्या इतर फलंदाजांना मोठ्या खेळी करता आल्या नाहीत. अलिनाने ३३, ईश्वरी खत्रीने नाबाद १४ आणि मेहेक पटेलने १७ धावा केल्या. झुनझुनवाला महाविद्यालयाच्या दिक्षा पवारने तीन, अदिती सुर्वे आणि वैष्णवी पाटीलने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. संक्षिप्त धावफलक : रमणीरंजन झुनझुनवाला महाविद्यालय – २० षटकांत ४ बाद १३७ ( धनश्री वाघमारे नाबाद ५१, सृष्टी नाईक ३४, किमया राणे २७, प्रियदर्शनी सिंग ४-२५-२) विजयी विरुद्ध महर्षी दयानंद महाविद्यालय : २० षटकात ९ बाद १००( अलिना मुल्ला ३३, ईश्वरी खत्री नाबाद १४, मेहेक पटेल १७, दिक्षा पवार ४-२०-३, अदिती सुर्वे ४-१७-२, वैष्णवी पाटील २-५-२). ०००००००००

दुसऱ्या मानांकित सामंतला हरवून वर्तक उपांत्य फेरीत

जी. डी. बिर्ला स्मृती मास्टर्स आंतर-क्लब बॅडमिंटन स्पर्धा मुंबई: बॅडमिंटन गुरुकुल आयोजित जी. डी. बिर्ला स्मृती मास्टर्स आंतर-क्लब बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्या मानांकित राजन सामंतवर तीन गेममध्ये विजय मिळवून कौशिक वर्तकने…

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात सध्या एमडीचा सुळसुळाट

ठाणे: येथे आणि पालघर जिल्ह्यामधे सध्या एमडीचा (मेफेड्रीन) बोलबाला आहे.  पूर्वी या जिल्ह्यांमधे गांजा, चरस, अफू, कोकेन व नशा करणाऱ्या इंजेक्शनची चलती होती. आता मात्र नशेखोरांना एमडीची चटक लागली आहे. इतर…

 कळंब येथे महाराजस्व समाधान शिबिर संपन्न

 तहसीलदार धनंजय जाधव आणि उप अधिक्षक भूमि अभिलेख नितिन आटाळे यांची प्रमुख उपस्थिती कर्जत : (अशोक गायकवाड) महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१’ अंतर्गत शुक्रवार, १० एप्रिलला महसूल मंडळ कळंब अंतर्गत प्रगती माध्यमिक विद्यालय कळंब येथे महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला रायगड जिल्हा समाजकल्याण सभापती नारायण डामसे, पंचायत समिती सदस्य रेश्मा जोशी, तहसीलदार धनंजय जाधव, उप अधिक्षक भूमि अभिलेख नितिन आटाळे, निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मंडळ अधिकारी कळंब, संतोष जांभळे यांनी केले . यावेळी नागरिक, महिला, शेतकरी, विद्यार्थी तसेच मंडळ कळंब अंतर्गत ग्राम महसुल अधिकारी निलेश पवार, मोहिनी भडांगे, आकाश निकाळे, रणजीत कोळेकर, शशिकांत हुलगुंडे, दर्शना कांबळे, तहसील व भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नागरिकांच्या महसूल व इतर शासकीय सेवांशी संबंधित प्रश्नांचा तात्काळ निपटारा करण्यावर भर देण्यात आला. शिबिरामध्ये नागरिकांना ७/१२ उतारे, ८-अ उतारे तसेच विविध दाखले यांचे वितरण करण्यात आले. याशिवाय ७/१२ अद्यावत करणे, ई-मोजणी, पाणंद रस्त्यांबाबत कार्यवाही, अभिलेख दुरुस्ती हेल्पडेस्क, अकृषिक सुधारणा मार्गदर्शन, पीएम किसान योजना, दुय्यम शिधापत्रिका वाटप, प्रलंबित फेरफार निकाली काढणे, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत कार्यवाही, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ, आरोग्य तपासणी, मोफत डिजिटल सातबारा, वनपट्ट्यावर सातबारा नावे नोंद करणे, लक्ष्मी मुक्ती योजना, प्रॉपर्टी कार्ड आदी विविध सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. या शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाशी संबंधित अनेक प्रलंबित कामांचा जलदगतीने निपटारा होत असून शासनाच्या “एका दिवसात डिलिव्हरी सेवा” उपक्रमामुळे नागरिकांना शासकीय सेवा सुलभ व पारदर्शक पद्धतीने मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. शासनाचा हा उपक्रम सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. ०००००

 शेलटी जेटी ते सर्जेकोट बंदर परिसरात यापुढे वाळू उपसा नाही!

निलेश राणे यांच्या आश्वासनानंतर तळाशील ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित…! मालवण :  कालावल खाडीपात्रात शेलटी  जेटी ते सर्जेकोट बंदर परिसरात वाळू उपसा होणार नाही असा शब्द शिंदे सेनेचे स्थानिक आमदार निलेश राणे यांनी दिल्यानंतर तळाशील  येथील ग्रामस्थांनी आपले आंदोलन स्थगित केले. तळाशील येथे गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनस्थळी प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर आणि त्यांना आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. राणे यांचे सोबत यावेळी शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, नायब तहसीलदार प्रिया हरणे,तळशील ग्राम विकास समितीचे अध्यक्ष संजय केळुसकर पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर पतन विभागाचे अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पट्ट्यात यापुढे वाळू उपसा करण्यास परवानगी मिळणार नाही तसेच आंदोलकांच्या अन्य मागण्यांवर लवकरच कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन ही राणे यांनी यावेळी दिले. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सरकार हे तळाशील ग्रामस्थांच्या सोबतच असून ग्रामस्थांनी मनात कोणतीही शंका बाळगू नये असेही राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. तळाशील गावासमोरील कालावल खाडीतील बेकायदा वाळू उपशावर कारवाई होऊन तो बंद व्हावा यासह अन्य मागण्यासाठी तळाशील ग्रामस्थांनी गेले आठ दिवस कालावल खडीपात्रात  होड्यांमध्ये बसून,तसेच पाण्यात उतरून आंदोलन छेडले होते. गावातील महिला तर चक्क चार तास पाण्यात उतरल्या होत्या. या दरम्यान दोन महिलांची  प्रकृतीही  बिघडली.तेव्हा कुठे असंवेदनशील प्रशासनाला खडबडून जाग आली.अखेर आमदार निलेश राणे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्तक्षेपानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलक  आणि आमदार निलेश राणे यांना बैठकीसाठी पाचारण केले. अखेर सिंधुदुर्गनगरीतील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आमदार निलेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आंदोलनकर्त्यांशी  तासभर चर्चा केल्यानंतर त्यावर सर्वमान्य तोडगा काढण्यात आला. बैठकीनंतर  ठरल्याप्रमाणे आमदार राणे यांनी सायंकाळी तळाशील गावाला  भेट देत संपूर्ण परिसराची पहाणी केली. स्थानिक ग्रामस्थ आणि आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आणि वरील आश्वासन दिल्यानंतर  आंदोलन मागे घेण्यात आले. गेले आठवडा भर हे आंदोलन सुरु आहे मात्र निद्रिस्त महसूल प्रशासन काही हलेना. मालवणच्या नायब तहसिलदार सोडल्या तर महसूल विभागाचा एकही बडा अधिकारी आंदोलनाच्या ठिकाणी फिरकला नाही.तरीही आंदोलन शांतपणे सुरु होते मात्र प्रशासन दाद फिर्याद घेत नाही असे लक्षात येताच संतप्त ग्रामस्थ आणि खास करून महिला, चक्क खाडी पात्रात उतरल्या आणि आम्ही स्वतःला संपवू असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर  जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी तळाशील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष संजय केळूसकर यांना काल घाईघाईने पत्र पाठवले आणि या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी त्यांना व आंदोलनकर्त्यांना  चर्चेला बोलावले.स्थानिक आमदार या नात्याने निलेश राणे यांनाही आमंत्रित करण्यात आले. बैठकीला केळुसकर यांच्यासह अजित केणी, संजय जुवाटकर, सीताराम तोडणेकर, गोपाळ मालवणकर, स्नेहा तोंडवळकर आदी आंदोलनकर्त्यांचे  प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार राणी म्हणाले, या प्रश्नावर आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आणि आणि त्यावर सर्वमान्य तोडगा काढण्याचे ठरले लवकरच या संदर्भात योग्य ते निर्णय घेण्यात येतील. तळाशील आणि आसपासच्या परिसरातील गावांचे अनेक प्रश्न आहेत मग ते ‘सीआरझेड ‘संबंधी असोत, अनधिकृत बांधकामे, वाळू उपसा, किनाऱ्याची धूप होणे. या सर्व प्रश्नांवर सर्व संबंधित विभागांशी  चर्चा करून तोडगा काढण्यात येईल असेही  राणे यांनी सांगितले.

तेलानी मेरीटाईम इंस्टिट्युटवर युवासेनेची धडक

मुंबई प्रतिनिधी पुणे जिल्हा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे नुकताच घडलेल्या दुर्दैवी अपघातात २० वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तेलानी मेरीटाईम इंस्टिट्युट च्या आवारात बास्केटबॉल खेळताना पोस्ट कोसळून ही घटना घडली. ह्या घटनेची त्वरित दखल घेऊन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने व वरून सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाने माझ्या नेतृत्वाखाली युवासेनेने संबंधित इंस्टिट्युटवर धडक देऊन त्यांस धारेवर धरले.व इंस्टिट्युटच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याच्या झालेल्या जीवितहानी संदर्भात जाब विचारला.  त्यात  इंस्टिट्युटने शासनाने दिलेल्या नियम व अटीचे पालन न केल्याचा ठपका ठेवण्यात आला. व त्या संदर्भात लेखी निवेदन देण्यात आले त्यात प्रामुख्याने बास्केटबॉल स्टॅन्डची सुव्यवस्था तपासणी (मेंटेनन्स) का करण्यात आली नव्हती. खेळाडू संदर्भात आपत्कालीन परिस्थितीतील वैद्यकीय सेवेचा अभाव होता. तसेच कॉलेज कॅम्पसच्या मैदानात नियमानुसार सी. सी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नाही. सदरच्या घटनेचे फुटेज उपलब्ध नाही . अशा अनेक महत्त्वाच्या विषयावर कॉलेज प्रशासनास धारेवर घरले. कॉलेज प्रशासनाने देखील घडलेल्या प्रसंगावर दुःख व दिलगीर व्यत्त करत अशा घटना भविष्यात पुन्हा होऊ देणार नाही. तसेच मृत विध्यार्थीच्या परिवारास सर्वोत्परी सहकार्य करून पोलिसांमार्फत होणाऱ्या तपासात पारदर्शकपणे सहकार्य करण्याचे तसेच ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासन्याच्या चुका निदर्शनास आणल्या त्यांना कॉलेज प्रशासना कढून  कोणत्याही पद्धतीने दबाव अथवा त्रास देण्यात येणार नाही आश्वासित केले. सदरची घटना कॉलेज प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे  घडली असून त्यास दुघृटनेच्या दिशेने तपास न करता कालेज   प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन वरीष्ठ पोलीस आधिकारी यास युवासेनेतर्फे देण्यात आले. पोलीसांनी देखील सखोल चौकशी करून मृत विद्यार्थ्यांच्या पालकांस न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी युवासेना महाराष्ट्र वितरक नीलेश बडदे, शिवसेना जिल्हा प्रमुख – गौतम चाबुकस्वार, शहर प्रमुख – राजेंद्र मोरे, तालुका प्रमुख – आशिष ठोमरे, महिला संघटिका – शैला ताई खंडागळे,युवासेना उपशहर प्रमुख – निखिल दळवी, प्रसाद जठार, तालुका प्रमुख – उमेश गावडे, रवींद्र बावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.